05/06/2025
नित्शे आणि वेडाचा झटका
मला काही दु:खांचं, वेदनांचं, शोकांतिकांचं आकर्षण नाहीय. अनेकदा माझ्या परिचयातील अनेकांना तसं माझ्याबद्दल वाटत राहतं. म्हणजे, हेमिंग्वेच्या आत्महत्येबद्दल मी कायम सांगत राहतो किंवा त्याच्या घरातल्याच इतर दोन आत्महत्यांबद्दल. किंवा मग सिल्व्हिया प्लाथनं ओव्हनमध्ये डोकं टाकून केलेल्या आत्महत्येबद्दल किंवा व्हर्जिनिया वुल्फनं नदीत हळूहळू सरत जात केलेल्या आत्महत्येबद्दल. किंवा मग आल्बेर काम्यूच्या काहींना विचित्र वाटणाऱ्या स्वभावाबद्दल. हे सगळं मला थोडं क्युरिएसिटीच्या पातळीवरच इंटरेस्टिंग वाटतं. मृत्यूबद्दल दु:ख आहे. आकर्षण नाहीय. हेमिंग्वे असो सिल्व्हिया असो किंवा व्हर्जिनिया असो, किंवा काम्यू असो, हे सगळे इंटेलेक्चुअली आणि क्रिएटिव्हिटीच्या पातळीवर कमाल माणसं होती. पण मग मनावरचे (खरंतर, मेंदूवरचेच. कारण मन नावाचा काही प्रकार नसतो. सगळं ओझं असतं ते मेंदूवरच. आपलीच सोय म्हणून मन नावाचा प्रकार वेगळा काढून, मेंदूच्या ताणाला काहीशी हुलकावणी दिलीय! असो.) हे आघात ही मंडळी का सहन करू शकली नसतील, असं काहीसं वाटून जातं. हेही असो. हाही एक वेगळ्याच चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. नुकतेच हे पुस्तक वाचलं. हे म्हणजे, नित्शेवरंच. तेही याच कुतुहलातून.
खरं सांगू का, मला अशी पुस्तकं कमालीची आवडतात. मागे विशाखा पाटलांचं 'करून जावे असेही काही' वाचले. ते होते जॉर्ज ऑर्वेलवरचं. तेही असंच होतं. 'असंच' म्हणजे, लेखक किंवा विचारवंत त्यांचं कार्य आणि त्याचं आयुष्य यांचं समांतर नातं कसं राहिलं, हे मांडणारं पुस्तक. विशाखा पाटलांनी ऑर्वेलवरील पुस्तकात किती सुंदररित्या ऑर्वेलचं लेखन आणि त्याचं समांतर चाललेलं खाचखळग्यांचं आयुष्य मांडलंय. विश्वास पाटील या रत्नागिरीस्थित लेखकानं लिहिलेलं फ्रेडरिख नित्शेवरचं हे पुस्तक तसंच आहे. नित्शेचं आयुष्य आणि लेखन याचं समांतर चित्रण. (इथे 'रत्नागिरीस्थित लेखक' असं नमूद करण्याचं कारण, हे काही ते 'पानिपत'वाले विश्वास पाटील नाहीत, हे कळावे यासाठी!)
तर नित्शे माझ्या कुतुहलाच्या यादीतलाच तत्वज्ञ. त्यानं अफलातून मांडणी केलीय. पुढे त्याच्या मांडणीत सर्वच विचारधारांच्या अनुयायांनी आपापल्या विचारांना समर्थनीय काही सापडतं का, ते शोधलं. असला अफलातून नित्शे. म्हणजे, कुणी एक विचारधारा आपल्याला बाजूला त्याला खेचून घेत नाही. पण तो त्याची भूमिका घेऊन ठाम, निश्चित ठिकाणी मात्र उभा आहे.
नित्शेचं वैयक्तिक आयुष्य फार इंटरेस्टिंग होतं.
नित्शे १८४४ साली जन्मून १९०० साली मृत्यू पावला. म्हणजे, मोजून ५४ वर्षे जगला. मरणाआधीची त्याची १० वर्षे भ्रमिष्ट अवस्थेत गेली. १८८९ साली त्याला वेडाचा झटका आला. नित्शेच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनाही भ्रमिष्टपणाचा झटका आला आणि त्यातच ते गेले.
नित्शे जेव्हा गेला, तेव्हा त्याच्या शरीराचं शवविच्छेदन झालं. त्याला अनुवांशिक काही आजार होता वगैरे असं काही नाही. पण वडिलांसारखाच त्यालाही वेडाचा झटका आला हे खरं.
नित्शे जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होता. तिथं एकदा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'माझा आवडता कवी' यावर निबंध लिहायला सांगितला गेला. नित्शेनं फ्रेडरिख होल्डरलीन या कवीवर निबंध लिहिला. तेव्हा बहुतांश जर्मन लोक होल्डरलीनला ओळखत नव्हते किंवा त्याला मोठा कवी वगैरे मानतही नव्हते. शिक्षकानं काहीसा नकारात्मक शेराच नित्शेच्या या निबंधावर दिला.
पुढे होल्डरलीन हा जर्मनमधला गटेनंतरचा दुसरा सर्वात महान कवी म्हणून नावाजला गेला. विशेष म्हणजे, या होल्डरलीननं आयुष्याची शेवटची काही दशकं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घालवली.
नित्शे आणि वेडाचा झटका, असं काहीसं गूढ नातंच जणू होतं की काय, अशी शंका यावी, असं. नित्शे खरंच ट्रॅजिक फिलॉसॉफर होता. त्याच्याबद्दल, त्यानं मांडलेल्या विचारांबद्दल, त्यानं देव-धर्म-परंपरांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून त्याच्या कामाबद्दल कुतुहल वाटतं, आवाक् व्हायला होतं. जवळपास पाच दशकांचं आयुष्य, त्यातली शेवटची दहा वर्षे भ्रमिष्टावस्थेत, सुरुवातीची एक-दीड दशक अर्थातच बालपण-शिक्षण वगैरे. म्हणजे दोन-अडीच दशकात त्यानं केलेल्या कामाकडे पाहता, तो खऱ्या अर्थानं महान तत्वज्ञ होता!
मला व्यक्तिश: या पुस्तकामुळे नित्शेच्या मांडणीबद्दल अधिक नीट कळू शकलं. विशेषत: त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्या आयुष्यातील मित्रपरिवार, कुटुंब यांचं महत्त्वं, शाळा-कॉलेज-विद्यापीठं, त्याचं काम - असं सगळंच कळलं. नित्शेबद्दल अधिक वाचण्यासाठी प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे.
— नामदेव काटकर