
22/01/2025
हो राम जी , बडा दुःख दिना ...
अचानक,फोन आला ,"साहेब आलेत ...
"मग मी येऊ का? "
हो , या ....
भेट होईल ना ? ...
हो ,नक्की होईल ..
मी घाई घाईत , कामावर जायचं कॅन्सल करून , मंत्रालयाच्या तयारीला लागलो . तशी तयारी म्हणजे १५/१६ वर्षापासून भोळे भाबडे "वारकरी" पंढरीची वारी करतात तशी ..ते वर्षातून एकदा करतात , पण माऊली चोवीस तास त्यांच्यासाठी धावते .... आपली वारी मात्र , आंधळ्यानी अंधारात खडा मारावा त्यातली ... साहेबांनी मान डोलवली तरी ,हसले बरका साहेब .. आपलं काम होतंय बरका , असल्यातली गत ..!! ते सुख घेऊन साहेबांचा उदो उदो करत , दुसऱ्या भेटी पर्यंत आशावादी होऊन राहायचं ...असली काही तरी विद्रूप चेष्टा स्वतःने स्वतःची केलेली .....!!! मग त्या भेटीसाठी वेळ महत्वाचा , मग पोटात ली भूक सुद्धा विसरून वेळचं भान ठेवायचं ..( ते फक्त आपण बरका साहेबांचं तसं काही नसतं ) भुकेल्या पोटी ,बोरीवली चा रस्ता गाठला . ..पोचून काही तरी खाऊ असा विचार करत ,मन मोडत निघालो .
बरं ...आज मात्र रस्त्यात श्रीराम भेटले , सीतामाई आणि लक्ष्मणा सोबत स्मित हास्य करणारे ....नुसते भेटले नाही , तेज बघताना मात्र मनातून आनंद वाटला . बाजूला लाईन होती पण थोडीशी ..मी दर्शन घेऊन प्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये लागलो ..आपल्यात देव म्हणलं की , येळकाळ उशीर बिशीर काहीच न बघण्याची प्रथा आहे ... मी प्रसादासाठी हात पुढे केला आणि बुंदीचा प्रसाद हातात आला , बुंदी आणि माझा जुना संबंध , वडील बुंदीचे लाडू द्यायचे ..प्रसाद तोंडांत टाकला आणि , समोरून खिचडीची प्लेट एका स्मित हास्य करणाऱ्या भक्ताने पुढे केली ..अन्न नाही कसं म्हणायचं ?
हातात आलेली खिचडी अशी अचानक आली .. आणि क्षणात मनात विश्वास आणि भाव उमगला ..एरवी बऱ्यापैकी नास्तिक असणारा मी , सहज जय श्रीराम बोलून गेलो ..आणि नकळत ...मन गहिवरलं ..
अरे असं कुठं असतं का ? मला लागलेली भूक त्याला कशी कळली??? .....मी ती डोळे झाकून खिचडी चाखली ..मन तृप्त झाले ,अतिशय स्वादिष्ट होती ..त्यात आस्था होती , तिनं चव दिली होती . ..माझ्यासारखे बरेच जण तो प्रसाद आनंदाने आणि शिस्तीत खात होते ..
मागे बॅनर होते ......त्या बॅनर चा हेतू काय होता ,राम जाने!!
पण श्रीराम आणि माझ्यातला संवाद मात्र माई लेकराचा होता ....ते नातं मात्र घट्ट झालं ..तुला मी कळलो ना .. मला तू कळला ....
विसरू नको रे श्रीरामा मला !!!!