01/06/2026
लातूर विमानतळाच्या विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर; परिचालनासाठी वार्षिक ३७.७८ लाख खर्चासही मान्यता
#लातूरविमानतळ
लातूर | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित असलेल्या लातूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ५६ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असून विमानतळाच्या परिचालनासाठी प्रतिवर्ष ३७ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लातूर विमानतळ कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी व पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लातूर विमानतळावर आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या विषयावर विधिमंडळातही आवाज उठविण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर शासनाने विमानतळ विकासासाठी निधी मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मंजूर निधीतून विमानतळावर "रनवे एंड सेफ्टी एरिया (RESA)" विकसित करण्यात येणार असून ३.३८ किलोमीटर लांबीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येईल. याशिवाय ४.५ मीटर रुंदीचा व सुमारे ८ किलोमीटर लांबीचा परिघीय रस्ता उभारण्यात येणार आहे. रनवेच्या सुधारणा कामांसह नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
तसेच अग्निशमन केंद्र, आपत्कालीन सेवा केंद्र, अँटी-हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आणि विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कामांमुळे विमानतळाचे आधुनिकीकरण होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित व दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
लातूर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ मध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली होती. तसेच मार्च २०२६ मध्ये सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लातूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाणासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येतील, अशी घोषणाही करण्यात आली होती. या निर्णयानंतर विमानतळ विकासाच्या कामांना वेग आला असून आता निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
लातूर विमानतळाच्या विकासामुळे मराठवाड्यातील हवाई संपर्क अधिक सक्षम होणार असून उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठीही नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लातूरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमानतळ विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.