08/10/2024
*“बुद्ध लेणी बचाव मोर्चा: बौद्ध समाजाची अभूतपूर्व एकी*
*”हे टिपू सुलतानचे राष्ट्र आहे” अशी घोषणा देऊन बौद्ध समाजाची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध”*
भिक्खु संघाच्या नेतृत्वाखाली ७ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे “बुद्ध लेणी बचाव मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाचा उद्देश छ. संभाजीनगर येथील पवित्र बुद्ध लेणीचे संरक्षण करणे हा होता. बुद्ध धर्मीयांसाठी ही लेणी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणाचा आणि षड्यंत्राचा विरोध करण्यासाठी लाखो बौद्ध अनुयायी शांतताप्रिय मार्गाने या आंदोलनात सहभागी झाले. या मोर्चाद्वारे बौद्ध समाजाने अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले, ज्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.
मोर्चा पूर्णपणे अराजकीय ठेवण्याचा आयोजकांचा कटाक्ष असताना, काही समाजकंटकांनी याला राजकीय आणि सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला. राजकीय घोषणाबाजी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले. त्यातच दीपक केदार नावाच्या व्यक्तीने “हे टिपू सुलतानचे राष्ट्र आहे” अशी घोषणा देऊन बौद्ध समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हा केविलवाणा प्रयत्न म्हणजे बौद्ध समाजाची दिशाभूल करून जातीय वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते.
मोर्चा बुद्ध लेणी च्या संरक्षणासाठी निघालेला असताना दीपक केदार सारख्या सोशल मीडिया वरील स्टंटमॅन ने आरडा ओरडा करत टिपू सुलतानची घोषणा का दिली असावी? याचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या स्टंटमॅन ला त्याचा राजकीय हेतू साध्य कराईचा आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत याच स्टंटमॅन ने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केला होता, यावरून हे स्पष्ट होते की या स्टंटमॅन ला मुस्लिम मते मिळवायची आहेत म्हणून त्याने या बुद्ध लेणी बचाव मोर्चाच्या आडून “हे टिपू सुलतानचे राष्ट्र आहे” अशी घोषणा दिली आहे. वेळोवेळी समाजाला भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्या स्टंटमॅन चा नाद बौद्ध समाजाने सोडून देऊन बाबासाहेबांच्या राष्ट्रीय विचारांचा अभ्यास करून मार्गस्थ होण्याची ही वेळ आहे.
या आंदोलनाची मुख्य मागणी म्हणजे बुद्ध लेणीचे संरक्षण आणि तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणे ही होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्र घोषित करण्याचे आश्वासन दिलेले असताना, याच दीपक केदार नामक स्टंटमॅन ने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून या आंदोलनात जाणीवपूर्वक राजकीय वादंग निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला, ज्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडल्याची चर्चा होऊ लागली आहे. यामुळे समाजातील गटांमध्ये अनावश्यक वाद निर्माण होण्याचा देखील धोका वाढला आहे. अश्या प्रवृत्तीच्या सोशल मीडिया स्टंटमॅन मुळे आंबेडकरी चळवळीची दिशाभूल होत आहे त्यामुळे मुद्दाम हे सर्व सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंदोलन करताना आपला मुख्य उद्देश बाजूला राहू नये, याची काळजी घेणे आवश्यक असते. समाजाच्या एका गटाच्या भावनांना भडकवून मुख्य मुद्द्यांपासून लक्ष हटवणे हा कायमच एक धोकादायक खेळ राहिला आहे. बौद्ध समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धरून शांततेने आपली भूमिका मांडण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे.
बुद्ध विचारांच्या अहिंसात्मक मार्गावर चालत, भिक्खु संघाने या आंदोलनाचे नेतृत्व केले आणि अनुयायांनी शांततेचे पालन करत आपली मागणी सादर केली. या आंदोलनाद्वारे बौद्ध समाजाने राजकारण आणि सांप्रदायिकतेपासून अलिप्त राहून एकी दाखवली, हे या आंदोलनाचे मोठे यश आहे.
दीपक केदारसारख्या व्यक्तींनी केलेल्या सांप्रदायिकतेच्या आणि राजकीय वादाच्या प्रयत्नांचा मी कट्टर आंबेडकरी अनुयायी म्हणून निषेध करतो. हे राष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आधारावर सर्वांसाठी निर्माण केले आहे, कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा धर्माचे नाही. “हे टिपू सुलतानचे राष्ट्र आहे” अशी घोषणा देणाऱ्यांचा खोटारडेपणा समाजाने ओळखून, बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या एकसंघ भारताच्या निर्मितीसाठी आपली ऊर्जा आणि एकी टिकवणे अत्यावश्यक आहे.
- ॲड. प्रबोधन निकाळजे
(फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्ता)