01/05/2026
नमस्कार.
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा! महाराष्ट्राच्या मंगल कलशाची स्थापना झाली तो आजचा दिवस! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. ती नुसती चळवळ नव्हती; तो अस्तित्वाचा, अस्मितेचा लढा होता. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य, स्वभाषा आणि संस्कृतीची पुनर्स्थापना होती.
आजच्या दिवशी त्याचं स्मरण करतांना मराठी भाषेच्या सन्मानाचा जो वसा हाती घेतला आहे - त्या प्रकल्पाने जे पुढे पाऊल टाकलं आहे त्याविषयीचं हे सांगणं! मराठी अस्मिता कल्चरल फाऊंडेशनने ‘अमृताचा वसा - मराठीचे विश्वरूप दर्शन’ हा प्रकल्प सुरू केला. केशवसुत ते नारायण सुर्वे असा अभिजात मराठी कवितेचा संगीतमय आविष्कार करायचं योजलं. नव्या पिढीपर्यंत मराठी भाषेचं तेज आणि ओज पोहोचावं, आपल्या भाषेचं महत्त्व अनुभवता यावं, तिचा संस्कार झालाच पाहिजे, ही सजगता निर्माण व्हावी याचा हा वसा आहे. या प्रकल्पातली पहिली कविता गीतरूपात आपल्यासमोर येत आहे. पहिलं गीत प्रकाशनाच्या मार्गावर आहे.