19/08/2025
राज्यात पुढील २४ तासासाठी 'या' पाच जिल्ह्यात रेड अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
मुंबई (MBP Live24) - राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटरउंच लाटांचा इशारा दिला आहे.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्थासोबत सतत संपर्क साधत आहेत. तसेच पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.