13/04/2026
नवी मुंबई गुन्हे शाखेकडून ऐरोली गोळीबार प्रकरण उघड; ५ आरोपी अटकेत
ऐरोलीतील RTI कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गावस यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा नवी मुंबई गुन्हे शाखेने छडा लावला असून या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल उर्फ पवन साहनी (शूटर), गुरफान खान (सूत्रधार), सय्यद खान, नागेश माने आणि विशाल महाडिक यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना ६ एप्रिल रोजी ऐरोली परिसरात घडली होती. आरोपींनी हेतूपुरस्सर जीवे मारण्याच्या उद्देशाने चार गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात RTI कार्यकर्ता अमित मौर्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस तपासानुसार, या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकामांवरून झालेला वाद तसेच जुन्या आर्थिक व्यवहारातील तणाव कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या वादातूनच हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.