02/05/2025
भुतांची यात्रा -
प्रस्तुत कथा व्हिडिओ पाहून लिहिलेली आहे त्यामुळे थोडे मागे पुढे होऊ शकते सो प्लिज समजून घ्या.
राकेश चा जन्म एका छोट्याश्या खेडेगावातला त्यामुळे त्याच्या आई वडिलांची प्रबळ इच्छा होती की त्याने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे डॉक्टर बनावे,तसा मुळातच तो खूप हुशार होता, गावातील शाळेत ही तो नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असताना तर तो जिल्ह्यातून पहिला आला म्हणून त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा गावात मोठा सत्कार करण्यात आला.
पुढे त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीला ही त्याला चांगले गुण मिळवले त्यामुळे एम बी बी एस ला त्याचा नंबर लागला, त्यात त्याच्या आई वडिलांची आता स्वप्न पूर्ती होत होती पण अभ्यासाच्या ताणामुळे त्याला काही वर्ष आपल्या गावात यायला जमलेच नाही त्यामुळे तो नाराज व्हायचा, त्यात अधून मधून त्याचे आई वडील त्याला शहरात भेटायला यायचे पण गाव ते गाव असते म्हणून शेवटी त्याने काही दिवस सुट्टी घेऊन गावाला जायचा निर्णय घेतला.
जवळपास चार वर्षांनी आता तो गावात आला पण गावात आल्यावर त्याला भरपूर बदल झालेले दिसले, गावातली लोक आधी सारखी एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत नव्हती, अनेका चे आपआपसात वाद होत होते हे पाहून थोडा निराश झाला, पुढे तो आपल्या आजी आजोबांना येऊन भेटला.
तसे ते ही आपल्या लाडक्या नातवाला इतक्या वर्षानंतर भेटून खूप खुश झाले, त्याला घरी आलेलं पाहून दोघांच्या ही डोळ्या त एकदम पाणी तराळल, पुढे त्याने त्यांच्या सोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि मग बोलता बोलता त्याच्या जिगरी मित्रा चा धन्याचा विषय निघाला तसा तो त्याला भेटायला त्याच्या घरी गेला, तसा धन्या तेव्हा म्हशी धुत होता पण अचानक राकेश ला समोर बघून धन्याला विश्र्वासच बसला नाही.
हातातले काम तसेच टाकून त्याने राकेश ला कडकडून मिठी मारली कारण दोघे अनेक वर्षांनी एकमेकांना भेटले होते, पुढे ते दोघं जण नंतर गावात एक फेरफटका मारायला बाहेर पडले पण राकेश ला गावातल्या लोकांच्या वागण्यात फरक दिसत होता, कोणीच एकमेकांसोबत प्रेमाने वागत नव्हतं. जिथे पाहू तिथे भांडण,ओरडणे, मारामाऱ्या चालू होत्या हे पाहून राकेश ने न राहवून धन्याला विचारले त्यावर तो म्हणाला.
“ जाऊ दे रे हे सगळे गावातल्या राजकारणामुळे, सरपंचाच्या मुलीने तालुक्यातल्या एका छपरी मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले, तेव्हा पासून विरोधक त्याला बोलतात आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी मारामाऱ्या होत असतात, तू लक्ष नको देऊस, सोड चल आपण शेतात जाऊ..”
हे ऐकून राकेश ने ही तो विषय तिथेच सोडून दिला, पुढे ते दोघे मस्त शेतात गेले, बैलगाडी वर शेतात एक चक्कर मारून आले त्यामुळे मजा मस्ती करण्यात त्यांना वेळेचं थोडे ही भान राहिले नाही,पुढे आता दिवे लागायची वेळ झाली होती त्यामुळे आजी आजोबा काळजी करतील म्हणून राकेश ही लगबगीने घरी जायला निघाला तसा त्याचा मित्र ही त्याच्या घरी निघून गेला.
पुढे जेवण झाले आणि आजोबांनी राकेश चे अंथरूण केले हे पाहून तो म्हणाला की आपण सगळे आज गच्ची वर झोपायला जाऊ तसे हे ऐकून आजी आजोबा म्हणाले.
“ बाळा आम्हाला थंड वातावरण काही सहन होत नाही, उगाच वर झोपलो तर आजारी पडू त्यामुळे आम्ही खालीच झोपू..” हे ऐकून यावर राकेश म्हणाला.
“ बर तुम्ही झोपा घरात, मी एकटा गच्चीवर जाऊन झोपतो..” असे बोलून राकेश आपले अंथरूण घेऊन गच्चीवर गेला, त्यात आकाशातल्या चांदण्याकडे आज तो एकटक बघत होता, भर म्हणून मस्त थंडगार हवा सुटली होती, त्यात रातकिड्यांचा मंद मंद आवाज आणि मध्येच कुठून तरी दोन तीन काजवे नजरे समोर यायचे त्यामुळे तो खूप खुश झाला कारण खूप वर्षांनंतर तो अश्या सुंदर वातावरणात झोपला होता त्यामुळे त्याने आपल्या मैत्रिणीला म्हणजे पूजा ला फोन केला आणि तिच्या शी गप्पा मारू लागला.
त्यात आज दिवसभरात केलेल्या धमाल गोष्टींबद्दल तो तिला तो सांगत होता, पुढे दिड दोन तास गप्पा मारून झाल्यावर त्याने मोबाईल वर वेळ बघीतली तर साडे बारा वाजले होते त्यामुळे पूजाला ही झोप आली होती म्हणून त्याने ही मोबाइल ठेवून दिला आणि थोड्या वेळात त्याला ही झोप लागली पण, तासाभराने त्याला जाग आली, त्यात त्याच्या घशाला कोरड पडली होती म्हणून तो पाणी पिण्यासाठी उठला तर त्याच आकाशाकडे एकदम लक्ष गेलं.
तसा चंद्र ढगाआड गेला होता, चांदण्याही दिसत नव्हत्या त्यामुळे आधी पेक्षा गडद अंधार पसरला होता,रातकिंड्याचा आवाज देखील येत नव्हता त्यामुळे वातावरणात एक भयाण शांतता पसरली होती यामुळे राकेश जरा विचारात पडला, थोड्या वेळापूर्वी इतकं सुंदर वातावरण होत ते अचानक काही वेळात इतकं भकास का वाटू लागलंय तो असा विचार करत असताना च एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडू लागला तो म्हणजे वाद्य वाजवन्याचा आवाज आणि तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला पण तसे पुढे हळु हळू वाद्यांचा आवाज स्पष्ट होत गेला त्यामुळे तो उठून कठड्याजवळ येऊन उभा राहिला.
त्याला दुर काही अंतरावर मशाली दिसू लागल्या आणि त्याच्याच घराच्या दिशेने त्या येत होत्या पण इतक्या रात्री हे कोण आहेत हे तो पाहू लागला, तसे काही वेळात वीस पंचवीस जण हातात मशाली घेऊन अर्धनग्न अवस्थेत एक वेगळाच आवाज करत येत होते, ते ओरडत, रडत येत होते.
त्यातले काही जण आपल्या शरीरावर चाबकाचे फटके मारत होते त्याचा आवाज ही परिसरात घुमत होता तर काही जण वाद्य वाजवत होते, त्याचाही आवाज खूप भीतीदायक वाटत होता, खर तर असा आवाज राकेश ने या आधी कधीच ऐकला नव्हता, पुढे ते हळु हळु त्याच्या घराजवळ येऊ लागले, तर त्या लोकांत काही स्त्रिया देखील असल्याचे राकेशच्याच लक्षात आले, त्यात त्या स्त्रियांनी आपले केस मोकळे सोडले होते, इतकेच नव्हे तर हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसली होती आणि त्या वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या आणि आपली मान गरागरा फिरवत होत्या हे सगळे भयाण दृश्य बघून राकेशच्या तोंडचे पाणीच पळाले, त्याला दरदरून घाम फुटला आणि तो हे सगळे दृश्य धडधडत्या काळजाने लपून पाहत होता, पुढे बघता बघता ते राकेशच्याच अगदी घराजवळ आले आणि त्यांचे ओरडणे, रडणे, वाद्य वाजवणे एकाएकी थांबले.
त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली त्यामुळे त्याने आवंढा गिळला पण त्या जीवघेण्या शांततेत तो आवाज ही स्पष्ट ऐकू आला यामुळे आता पुढे काय होतंय ते तो पाहू लागला तितक्यात तो घामाने अगदी ओलाचिंब झाला होता आणि मग खाली वाकून बघत असताना राकेशच्या कपाळा वरून एक घामाचा थेंब टपकन खाली पडला आणि जे व्हायला नको होत ते झालं.
त्यातल्या काही बायकांना राकेश ची चाहूल लागली आणि त्याने झटकन वर पाहिलं आणि त्यांची नजरानजर झाली, त्यात त्यांचे विस्कटलेले केस, लालभडक डोळे पाहून राकेश पुरता घाबरला आणि त्यामुळेच त्याच्या हाता पायातला त्राणच निघून गेला, तशी त्याची इच्छा असताना ही तो तिथून हलू शकत नव्हता, उलट कोणीतरी फक्त नजरेने जखडून ठेवल्या सारखे त्याला झाले होते, त्यात या बायक्या त्याच्या कडे पाहत विक्षिप्त पणे हसू लागल्या आणि तितक्यात नकळतपणे तो वरून खाली त्यांच्या पुढ्यात येऊन पडला, त्याला जागेवरून हलता येत नसले तरी तो भयाण प्रकार बघायला नको म्हणून त्याने डोळे बंद केले पण जसे त्याने डोळे मिटले तसे सगळे काही एकदम शांत झाले, पुढे बराच वेळ तो तसाच पडून राहिले पण काही वेळाने त्याने हिम्मत करून डोळे उघडले आणि त्याला धक्काच बसला.
त्या बायका त्याच्या समोर मांडी घालून बसल्या होत्या आणि काही तरी खात होत्या हे पाहून त्याने डोळे नीट उघडुन पाहण्याचा आणि काय चालले आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की त्या बायका एका जिवंत मांजरीला ओरबाडून खात आहेत. ती मांजर असहाय्य होऊन त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती पण तो मात्र केविलवाण्या नजरेने त्या मांजरीच्या डोळ्यात बघत होता.
तितक्यात अचानक एकीने मांजरीच्या मानेचा चावा घेतला आणि माने पासून पोटापर्यंतचा भाग टर्रकन फाडला त्यामुळे अवयवांचा एक लगदा बाहेर आला आणि त्या सोबतच रक्ताची एक धार राकेशच्या चेहऱ्यावर उडाली,आता मात्र त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती, तो फक्त विस्फारलेल्या डोळ्यां नी समोर घडत असलेला नकोस किळसवाणा आणि तितकाच भयानक प्रकार पाहत होता.
पुढे हळु हळु त्या बायका त्याच्या दिशेने सरकत येऊ लागल्या आणि त्यांनी राकेशचा गळा धरला पण तो मात्र अर्धमेल्या सारखा निपचित पडून होता, त्यांना प्रतिकार करण्याची देखील त्याच्यात शक्ती उरली नव्हती,पुढे हळु हळु त्याच्या डोळ्यां समोर अंधारी येऊ लागली आणि तो एकदम बेशुद्ध झाला.
काही वेळानंतर नकळत त्याचे डोळे उघडले आणि त्याने समोर पाहीले तर ते सगळे जण त्याचीच वाट पाहत होते, पुढे त्याच्या हातात एक मशाल दिली गेली आणि त्याने त्या मशालीच्या प्रकाशात स्वतःकडे पाहिले तर तो ही आता अर्धनग्न अवस्थेत होता हे पाहून त्याच्या लक्षात येत नव्हते की हे काय चालू आहे, तसे त्याने मागे वळून पाहिले आणि त्यांच्या सर्वांगातून विजेची एक तीव्र लहर गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण मागे त्याचे प्रेत तसेच पडले होते आणि तो, तो आता या मानवी जगात नव्हताच.
त्या बायका त्याला पुन्हा त्या वीस पंचवीस जणांमध्ये घेऊन गेल्या आणि मग परत त्या भयावह वाद्यांचा आवाज सुरू झाला आणि त्या सगळ्यांनी पुन्हा रडत, ओरडत ती यात्रा सुरू केली,तसा आता राकेश ही रडत ओरडत हातात मशाल घेऊन चालू लागला.
खर तर राकेश आता या जगात राहिला नव्हता त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गावात हा हा करता पसरली, त्यात सगळ्यांना वाटले की तो घराच्या छता वरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे पण खरे कारण काही वेगळेच होते.
त्यात त्याच्या शहरात राहणाऱ्या मित्र मैत्रिणींना त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या फोन वरून कळवली गेली त्यामुळे त्याच्या अकस्मात जाण्याने त्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला, पुढे काही वेळात सगळे जण राकेश च्या गावी आले तर त्या सर्व मित्र मैत्रिणी मध्ये त्याची खास मैत्रीण पूजा देखील होती, खरंतर पूजा आणि राकेश दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण त्यांनी त्यांचे प्रेम कधीही एकमेकांसमोर व्यक्त केलेले नव्हते.
पण राकेश आता या जगात नाही हे ऐकल्यानंतर पूजा पूर्णपणे तुटली होती कारण असं काही होईल यावर तिला विश्वास च बसत नव्हता कारण तो जाण्याच्या आदल्या रात्री कितीतरी वेळ ते एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारत होते तेव्हा तर राकेश अगदी आनंदात होता आणि आज पहाटे अशी बातमी यावी यामुळे ती खूप दुखी झाली होती.
त्यात राकेश चे प्रेत बघताच क्षणी पूजा ने एकदम जोराचा टाहो फोडला आणि सगळ्यांसमोर तिने तिच्या राकेश वर असलेल्या प्रेमाची कबुली दिली पण यामुळे तिला आता खूप यातना होत होत्या तू मला असं कसं सोडून जाऊ शकतोस, मी माझं पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत घालवायचे स्वप्न बघत होते,मी योग्य वेळ बघून तुला लग्नासाठी मागणी घालणार होते पण तू त्या आधी च मला सोडून गेलास अस म्हणत ती जोर जोरात रडत होती.
हे पाहून तिला तिचे मित्र मैत्रिणी सावरत थोडे बाजूला घेऊन आले, पुढे काही वेळात राकेश चे सगळे नातेवाईक गावामध्ये जमा झाले आणि त्यांनी त्याचे अंतिम विधी संध्याकाळ पर्यंत करायचे ठरवले कारण काही लांबचे नातेवाईक अजूनही यायचे बाकी होते, त्यात पुढे सगळे ते तयारी मध्ये व्यस्त झाले.
पण काही वेळानंतर त्यांच्या मित्रा मधील कोणाच्या तरी लक्षात आले की पूजा कुठे दिसत नाही म्हणून सगळी मुलं मुली तिला शोधू लागले इतकेच नाही तर तिला शोधत काही जण गावाच्या वेशीपर्यंत आले तेव्हा त्यांना दिसले की पूजा गावाच्या वेशी जवळ एकटीच जाऊन बसली आहे आणि कोणाशी तरी एकटीच बोलत आहे पण ती कोणा सोबत बोलत आहे हे कोणालाच कळेना कारण तिच्या आजुबाजुला कोणीही दिसत नव्हते.
ती स्वतःशीच बोलत होती हे पाहून सगळ्यांना वाटले की राकेश असा अचानक सोडून गेल्यामुळे तिला मानसिक झटका बसला असावा हे पाहून काही जण तिच्याकडे अवाक होऊन बघत होते तर इतरांना तिची कीव वाटत होती तेवढ्यात पूजा अचानक उभी राहिली आणि तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलले, तिचा चेहरा पांढरा पडला,डोळे विस्फारले आणि तिच्या तोंडून एकदम एक वाक्य बाहेर पडले
“ राकेश, अरे राकेश थांब ना, कुठे चालला आहेस, राकेश मला पण येऊ दे ना तुझ्या सोबत..” अस म्हणत ती अतिशय वेगाने पळत सुटली.
हे पाहून काही जण तिला सावरायला तिच्या मागे गेले तर काही घाबरून तिथेच थांबले कारण ती अतिशय जोरात धावत गेली आणि पुढे एकाएक झाडी झुडपात गायब झाली, त्यात मागे पळणाऱ्या ना कळलेच नाही की काही क्षणात ती कुठे निघून गेली म्हणून त्यांच्या ग्रुप मधल्या काही मुलांनी त्यांच्या बाईकस् काढल्या आणि ते पूजा ला शोधायला निघाले.
इथे पूजा आता एक नदीच्या किनाऱ्यावर आली होती पण इतका वेळ पूजाला ती काय करत होती याचं काहीच भान नव्हत पण आता अचानक तिला शुद्ध आली, तिचे हावभाव पूर्ववत झाले होते हे पाहून तिने आजूबाजूला पाहिले आणि जरा गोंधळली च आणि मग एकदम विचारात पडली.
" मी इथे कशी आले,मी तर गावाच्या वेशीवर बसले होते मग आता इथे कशी.." असा विचार तिचे लक्ष एकदम तिच्या पाया कडे गेले तर तिच्या पायाला अनेक जखमा झाल्या होत्या कारण ती अनवाणी किती तरी वेळ पळत होती तिला कसलेही भान नव्हते त्यामुळे काटेरी झुडपातून पळत असताना तिला बरेच लागले होते.
पळून पळून तिचे पाय दुखायला लागले होते, एव्हाना आता संध्याकाळ झाली होती आणि हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती तितक्यात दूर कुठे तरी पूजाला काही मशाली दिसू लागल्या हे पाहून अचानक वातावरणात गारवा जाणवू लागला.
आजूबाजूला एकदम दाठ धुकं पसरल हे पाहून पूजा पुरती घाबरली होती पण आता काय करावं तिला काहीच समजत नव्हतं, त्यात आजू बाजूला कोणीही दिसत नव्हतं, पण तेवढ्यात तिला हळु हळु तिला त्या भयानक वाद्यांचा आवाज येऊ लागला आणि कोणी तरी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत ओरडतय, रडतंय अस तिला वाटू लागले.
तो जीवघेणा आवाज ऐकून मात्र आता ती घाबरली आणि बेंबीच्या देठापासून ओरडत पळत सुटली पण ती कुठे जाते आहे तिला काहीच समजत नव्हत पण कोणी तरी होत जे तिच्या पाठीमागे पळत असल्याचा तिला भास सारखा होत होता त्यामुळे ती जीवाच्या आकांताने ती पळत सुटली.
पायाखाली येणारे दगड,धोंडे आणि काटे तिला तळपायात टोचत आणि घुसत होते,त्यात या आधीच्या जखमा देखील दुःखत होत्या पन त्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती जिवाच्या आकांताने ती पळत होती,आपल्या मागे कोण आहे हे बघायची देखील तिची हिम्मत होत नव्हती, पुढे पळता पळता तिच्या पायाला जोरात ठेच लागली आणि ती पडली तोच तिला मागून एकदम आवाज आला.
“ पूजा,तुला लागलं तर नाही ना, दूर का पळतेस तू, अग मी तुझ्यासाठीच इथवर आलो आहे..“ हे ऐकल्यावर पूजाच्या हृदयात अगदी चरर झालं करण तो आवाज राकेशचा होता त्यामुळे तिने झटकन मागे पाहिले तर राकेश अर्धनग्न अवस्थेत तिच्या समोर उभा होता आणि त्याच्या एक हातात चाबूक तर दुसऱ्या हातात मशाल होती आणि सर्व अंगावर भस्म लावलेले होते आणि इतकेच नव्हे तर त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.
त्यात राकेशला अचानक समोर पाहून ती घाबरली पण दुसऱ्या च क्षणी तिनी राकेशच्या डोळ्यात बघितले आणि तिचे अश्रू अनावर झाले कारण राकेशच्या देखील डोळ्यात पाणी आलं होतं म्हणून ती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोक्याच्या जखमेवर हात फिरवण्यासाठी हात पुढे नेला असता तो हात राकेशच्या आर पार गेला,खर तर ती राकेशला जरी पाहू शकत असली तरी त्याला स्पर्श करू शकत नव्हती हे पाहून तेव्हा राकेश म्हणाला.
” मी तुझ्या पासून आता खूप दूर गेलो आहे पूजा आणि माझ्या जवळ जास्त वेळ देखील नाही, माझ्या शरीराचे एकदा अंत्य संस्कार झाले की मला मुक्ती मिळेल..“
" तू इथपर्यंत आलीस कारण मी तुला इथं घेऊन आलो आहे आणि माझ्यासोबत जे घडलं आहे ते पुन्हा कोणासोबत पण घडू नये म्हणून मी तुला इथे बोलावले आहे..“ हे ऐकून तिला काही कळेनासे झाले म्हणून त्याने त्याच्या सोबत घडलेली सर्व हकीकत पूजा ला सांगितली.
त्या रात्रीची ती भयानक गोष्ट ऐकताना पूजाला दुःख आवरलं नाही आणि ती हुंदके देत आपले अश्रू पुसत होती, खर तर तिच्या मनात असंख्य प्रश्न होते, पुढे राकेश चे बोलणे संपल्या वर तिने त्याला विचारले.
” पण ते लोक आणि त्या बायका कोण आहेत,ते का लोकांना मारत आहेत आणि जशी तुझ्या शरीराच्या अंतिम संस्कारा नंतर तुला मुक्ती मिळणार म्हणतोयस तशी त्यांना अजून मुक्ती का नाही मिळाली..? “ हे ऐकून त्यावर राकेश म्हणाला.
" हे ते लोक आहेत ज्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार झालेलेच नाहीत, गेली कित्येक वर्षे ते असेच भटकत आहेत,यातील कोणाचा खून झाला आहे तर कोणाचा अपघात आणि पोलीस यांच्या घरच्या लोकांना शोधण्यात अपयशी ठरल्यामुळे यांच्या शरीरावर योग्यरीत्या अंत्य संस्कार झाले नाहीत आणि यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही.."
“ त्यांना मुक्ती मिळत नसल्याने त्यांनी त्यांचा राग माझ्या सारख्या वर काढला पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी त्यांना मुक्ती मिळवून देईल अशी हमी दिली..”
“ अरे पण तू कसकाय त्यांना मुक्ती देशील..? ” पूजा ने त्याला विचारले त्यावर राकेश म्हणाला.
“ गावाच्या वेशीपाशी तुला एक मोठं पिंपळाचे झाड दिसेल त्या झाडाच्या खोडाला एक छोटंसं छिद्र आहे आणि त्या छिद्रात एक पुडी ठेवली आहे, त्या पुडी मध्ये त्या सर्व अतृप्त आत्म्याच्या शरीरा वरचे थोडे थोडे भस्म आणि त्या बायकांच्या कपाळाची हळद काही प्रमाणात बांधून ठेवली आहे..“
“ त्यात त्यांचा काही प्रमाणात अंश देखील आहे,ती घेऊन जा आणि माझ्या शरीराच्या बाजूला ठेऊन दे, म्हणजेच माझ्या शरीरा सोबत त्यांच्या अंशाचा देखील अंत्य संस्कार होईल आणि त्यांना देखील मुक्ती मिळेल.." इतके ऐकल्यावर पूजा ने त्याला परत विचारले.
“ तू यासाठी माझीच निवड का केलीस, तू या कामासाठी दुसऱ्या कोणालाही निवडू शकला असतास,खासकरून तुझ्या मित्रांना किंव्हा तुझ्या जवळच्या नातेवाईकांना.." त्यावर राकेश ने उत्तर दिले.
" हा जो विधी तू करणार आहेस तो विधी करण्यासाठी मला अश्या व्यक्तीची गरज होती की त्या व्यक्तीसोबत माझं जन्मतः कोणतं ही नातं नसावं पण माझं त्या व्यक्तीवर आणि त्याच प्रमाणे त्या व्यक्तीच माझ्यावर अगदी मनापासून खरं प्रेम असायला हवं तरच त्या व्यक्तीला मी माझ्या मृत्यूनंतरही दिसू शकेन आणि आणि त्याच्या सोबत मी संवाद साधू शकेन..“
" मी किती तरी मित्रांना हा का दिल्या पण कोणीही माझा आवाज ऐकू शकले नाही,कोणी मला बघू देखील शकले नाही. पण गावाच्या वेशीवर तू मला बघितलं आणि माझ्यासोबत बोलायला म्हणून आलीस.."
“ इतरांना तू बोलतांना दिसत होतीस पण मी दिसत नव्हतो, तुझ्या मनावर परिणाम झाला असा विचार करून लोक तुला वेडी समजतील म्हणून मी तुला गावापासून दूर घेऊन आलो.."
" पूजा माझं तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे ग पण मला हे तुला सांगायला खुप उशीर झाला.." त्यावर पूजा म्हणाली
" माझं पण,मला तर तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा होती, मी शिक्षण पूर्ण होताच तुला लग्नासाठी मागणी घालणार होते पण मध्ये हे झालं.." हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात टचकन पाणी तरळल तसा राकेश परत म्हणाला.
" तू मला बघू शकलीस आणि बोलू शकलीस यातच मला समजलं आपलं प्रेम किती निरागस आणि खरं आहे,माझं आयुष्य छोटं होतं पण मला त्या आयुष्यात माझ्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती मिळाली यातच मी माझं भाग्य समजतो.." हे बोलून परत एकदा दोघांच्या डोळ्यात पाणी आले पण आपल्या मनातली गोष्ट शेवटच्या भेटेला का होईना सांगता आली याचं त्यांना समाधान होतं.
आता राकेशला त्याच्यामध्ये काही तरी फरक जाणवू लागला हे पाहून त्याने पूजा ला सांगितले बहुतेक माझ्या अंत्यविधी सुरू झाला आहे, तू पटकन ती पिंपळाच्या झाडातली पुडी माझ्या प्रेताजवळ नेऊन ठेव नाहीतर या अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळायला अजून किती वर्षे लागतील काही सांगता येणार नाही आणि ते अजून किती निरपराध लोकांचे प्राण घेतील हे देखील सांगता येणार नाही.
आपण या जन्मात तर एकमेकांना जास्त वेळ देऊ शकलो नाही पण पुढच्या जन्मी आपण पुन्हा भेटू आणि नक्कीच एकत्र येऊ, असे बोलून दोघांनी एकमेकांना शेवटचं स्मित हास्य करून निरोप दिला आणि पूजा पळत वेशी जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी गेली.
झाडाच्या त्या खोडा मधल्या छिद्रातून पुडी काढली आणि गावात आली, राकेशच्या पार्थिवाला सगळे लोक शेवटचा नमस्कार करत होते हे पाहून पूजा ने देखील नमस्कार करता करता अलगत पुडी राकेशच्या पायाच्या खाली ठेवली.
आता सगळे पुरुष मंडळी पार्थिवाजवळ आली आणि त्यांनी पार्थिव उचलले आणि त्यांची पावले स्मशानभूमी कडे निघाली हे पाहून, सगळ्या बायकांनी टाहो फोडला, पूजाला देखील अतिशय दुःख झाले होते पण आपल्या राकेशने त्या अतृप्त आत्म्यांना मुक्ती देत अनेक लोकांचे जीव वाचवले याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं.
ती पळतच परत नदीकिनारी गेली तर तिथे राकेश तिचीच वाट बघत उभा होता,आता त्या दोघांनी परत एकमेकांकडे पाहिले आणि परत एकदा दोघांच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील होते.
खर तर त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते पण त्यांची नजर एकमेकांशी खूप काही बोलतं होती, त्यांना ठाऊक होत या नंतर ते परत एकमेकांना भेटू शकणार नाहीत पण आज त्या शेवटच्या क्षणामध्ये ते सारं काही साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते.
पुढे जसा राकेशच्या चीतेला अग्नी देण्यात आला तसा राकेश हळू हळू दिसेनासा होऊ लागला, जाता जाता त्यांनी एक मेकांना पुढच्या जन्मी एकत्र येण्याचे वचन दिले आणि आणि शेवटची आपल्या प्रेमाची कबुली दिली.
पुढे हळू हळू राकेश पूजाच्या नजरेपासून दूर होत पूर्णतः दिसेनासा झाला आणि त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांना एकदाची कायमची मुक्ती मिळाली..
समाप्त
#मराठी #मायमराठी #कथा #लेखक