24/08/2026
#सन्मान_एका_पुस्तकाचा… ौरव_माणुसकीचा..! ❣️
✍🏻
काही सोहळे फक्त कार्यक्रम म्हणून संपत नाहीत; तर ते मनात कायमची आठवण बनून राहतात. काल राजगुरुनगर येथील चंद्रमा गार्डन हॉलमध्ये झालेला लेखक आणि समाजसेवक कैलास भाऊ दुधाळे यांच्या ‘माणुसकी जिवंत आहे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाच मनाला स्पर्श करून गेला.
आपल्या माणसांचं कौतुक आपणच करायचं असतं, त्यांच्या चांगल्या कामाची दखल आपणच घ्यायची असते. कालच्या सोहळ्यात याचा प्रत्यय अगदी मनापासून आला. विवाह सोहळ्याचा हॉल अक्षरशः भरून गेला होता आणि बाहेरही असंख्य माणसं उभी होती. इतका मोठा जनसमुदाय एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जमणे,हीच खरंतर कैलास भाऊंनी आपल्या आयुष्यात कमावलेल्या माणुसकीची खरी पावती होती.
कैलास भाऊ अनेक वर्षांपासून माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार, व्यसनाधीन आणि रस्त्यावर असहाय अवस्थेत आढळणाऱ्या व्यक्तींना आधार देत आहेत. कोणी रस्त्यावर पडलेलं असेल, गटारीत सापडलं असेल किंवा मदतीची गरज असेल, तर स्वतःच्या रिक्षातून त्याला हॉस्पिटलमध्ये, व्यसनमुक्ती केंद्रात किंवा निराधार केंद्रात पोहोचवण्याचं काम ते निःस्वार्थपणे करतात. गोरगरीब आणि आदिवासी बांधवांसाठी शहरातील श्रीमंतांकडून कपडे गोळा करून ते धुवून, इस्त्री करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी अनेक वर्षे केलं आहे आणि करत आहेत.
याच अनुभवांची, वेदनांची, माणुसकीची आणि समाजसेवेची कहाणी त्यांनी शब्दबद्ध केली आणि त्यातून जन्माला आलं—‘माणुसकी जिवंत आहे’ हे पुस्तक.
या सोहळ्याला साहित्यिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री.श्रीपाल सबनीस सर यांनी पुस्तक प्रकाशनासाठी एवढी गर्दी क्वचितच पाहिल्याचे सांगत कैलास भाऊंच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. ‘एक भाकर तीन चुली’चे सुप्रसिद्ध लेखक श्री.देवा झिंजाड यांनी सामाजिक कार्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी योगदान द्यावे,अशा शुभेच्छा दिल्या.कीर्तनकार चेतनानंद महाराज पुणेकर यांनी तर कैलास भाऊंच्या सामाजिक कार्यासाठी आपल्या मृत्युपत्रात तरतूद करून ठेवली असल्याचे सांगितले.पद्मश्री गिरीश प्रभुणे सर, सुधाताई कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री.रवी बोडके सर यांनी तर त्यांच्या गोड स्वभावाला साजेसा असा भला मोठा पेढ्यांचा हार आणून अनोख्या पद्धतीने सत्कार केला.
विशेष म्हणजे, हा दिवस कैलास भाऊंच्या पुस्तकाचा आणि त्यांच्या सन्मानाचा होता; पण त्यांनी स्वतःचा सन्मान बाजूला ठेवून आजवर सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला. ज्यांनी दिलं, त्यांना परत देण्याची हीच तर खरी माणुसकी!
आपला भाऊ ब्लड कॅन्सरने गमावल्यानंतर संपूर्ण राजगुरुनगर शहराने केलेल्या मदतीची जाणीव मनात ठेवून आपलं उर्वरित आयुष्य समाजासाठी देण्याचा संकल्प कैलास भाऊंनी केला. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे मित्र, बॉर्डरलेस पँथर ग्रुपचे सदस्य, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते या सोहळ्यासाठी आले होते.
म्हणतात ना, ‘पेरलं ते उगवतं!’ काल राजगुरुनगरमध्ये ते अक्षरशः दिसून आलं. वर्षानुवर्षे कैलास भाऊंनी माणुसकीची बीजं पेरली आणि काल ती प्रेम, आदर, आपुलकी आणि हजारो माणसांच्या उपस्थितीत उगवून आली.
या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट न झालेल्या जवळच्या बॉर्डरलेस पँथर परिवारातील अनेकांची अनपेक्षित भेट झाली, त्यामुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला. दिवसाची सुरुवात प्रभाकरदादा पवार यांनी प्रेमाने दिलेल्या उकडीच्या मोदकांनी गोड केली होती आणि दिवसाचा शेवटही तितकाच गोड अनुभव घेऊन झाला.
आता कैलास भाऊंनी राजगुरुनगरमध्ये लवकरच वृद्धाश्रम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. अनेक मान्यवरांनी त्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले.एका रिक्षाचालकाने आपल्या प्रामाणिकपणाने,संवेदनशीलतेने आणि माणुसकीने समाजाला काय देता येतं,याचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.
कैलास भाऊ, तुमचं कार्य असंच वाढत राहो, तुमच्या लेखणीतून आणखी माणुसकी जन्माला येवो आणि तुमच्या सेवेमुळे अनेक निराधारांना आधार मिळो. ‘माणुसकी जिवंत आहे’ हे केवळ पुस्तकाचं नाव न राहता, तुमच्या आयुष्याची ओळख बनत राहो. तुमच्या सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
✍🏻 #कल्पनादांगट
#माणुसकी_जिवंत_आहे #राम_कृष्ण_हरी 🙏🏻 #पेरलंतेउगवतं #माणुसकी #समाजसेवा #मराठीसाहित्य