29/05/2026
देशात एकीकडे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत'च्या मोठ्या घोषणा होत असताना, दुसरीकडे मात्र सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकताच एका एक्सप्रेसवेवरील कथित निकृष्ट कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या खालच्या बाजूला सिमेंट काँक्रीटचा थातूरमातूर थर आणि त्यावर तांत्रिक निकष न पाळता थेट डांबराचा थर टाकल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे हे काम नेमक्या कोणत्या नियमांनुसार झाले, कामाची गुणवत्ता तपासली गेली होती का आणि संबंधित विभागाने याची पाहणी केली होती का, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जर हे काम दर्जेदार आणि प्रामाणिकपणे झाले असेल, तर एवढ्या कमी कालावधीत रस्त्याची अशी दैनावस्था कशी होऊ शकते? आणि जर कामात हलगर्जीपणा किंवा कथित भ्रष्टाचार झाला असेल, तर यासाठी नक्की जबाबदार कोण? केवळ नफा कमावणारा कंत्राटदार, कामाकडे डोळेझाक करणारे देखरेख अधिकारी, की संपूर्ण प्रशासन, असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे!...
हा प्रश्न केवळ रस्त्याच्या दर्जापुरता मर्यादित नसून तो थेट नागरिकांच्या जिवाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे या एक्सप्रेसवेवर अनेक किलोमीटरपर्यंत कोणतीही वस्ती नाही आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नाहीत. अशा निर्जन ठिकाणी रस्त्यातील त्रुटींमुळे किंवा निकृष्ट बांधकामामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे.