Rajhans Prakashan Pune

Rajhans Prakashan Pune मराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव - राजहंस प्रकाशन
विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

गुरु ने काय करावं आणि काय करू नये... त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत..गुरू म्हणून...
09/10/2025

गुरु ने काय करावं आणि काय करू नये...

त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत..

गुरू म्हणून रोहिणीताई छोट्या-मोठ्या गोष्टी न कंटाळता त्या समजावून द्यायच्या. 'शरीराचं वजन कुठल्या बिंदूवर बदलतं, शरीराची रेषा कशी बनते, त्यावेळी मान व वक्ष यांची स्थिती कशी असते, हे सांगतांना त्या प्रात्यक्षिक तर करतच, पण जवळ येऊन हाताला हात लावून दुरुस्त्याही करत. हात, मान यांचे कोन सुधारत. हाताच्या मुव्हमेंटमधून जी रेष निघते, ती हाताच्या लांबीपर्यंतच मर्यादित नसते, तर दूरवर जाऊन पोहोचते; त्यामुळे कितीतरी मोठा परीघ तुम्ही नजरेनं स्पर्श करू शकता, यासारखं शाश्वत तत्त्व त्या बोलता बोलता ओघांत सहज समजावून देत. त्यांना #नृत्य शिकवायला मनापासून आवडायचं. एखादी गोष्ट उलगडून सांगताना त्या रमून जात. तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावतानाही त्या कधी थकत किंवा कंटाळत नसत. पहिल्या इतक्याच ऊर्मीने, ऊर्जेने आणि उत्कटतेने त्या पुन्हा पुन्हा करून दाखवत. अगदी समोरच्या व्यक्तीवर अपेक्षित परिणाम दिसेपर्यंत. एखादी गोष्ट, एखादा क्षेप, किंवा अभिनयाचा एखादा उत्कट क्षण परत परत करून दाखवताना त्या ती गोष्ट त्याच उत्साहाने, त्याच उत्कटपणे आणि त्याच सौंदर्याचा प्रत्यय देत दरवेळी करून दाखवत. '
त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत असत. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार जिला तिला शिकवत. एखादीवर कोणती हालचाल शोभेल, ते सांगत. सरसकट एकसारखं करण्याच्या नादात स्वतःचा वेगळेपणा हरवू नका, असं सांगणं असे त्यांचं. प्रत्येकीला 'स्वतः' असायला शिकवलं त्यांनी. मुली गरोदर असतील तरी त्या त्यांना क्लासवर बोलावत. बैठकी भाव शिकवत. रत्ना दासवानी, अरुणा केळकर इत्यादी विद्यार्थिनींना नृत्यशिक्षणात खंड पडला असूनही शिकण्याची इच्छा आहे..म्हटल्यावर त्यांनी पुन्हा प्रवेश दिला. नृत्याशी जोडून ठेवलं.

कलेच्या, विशेषतः नृत्य आणि संगीताच्या क्षेत्रात #गंडाबंधन विधीचं असणारं माहात्म्य आपण जाणतो. रोहिणीताईंनी कधी कोणत्याही गुरूंकडून गंडाबंधन करून घेतलं नाही आणि स्वतःही कोणाला गंडा बांधला नाही. इथे पुन्हा त्यांच्या वडिलांचा विचार-वारसा दिसतो. ते चिकित्सक होते. अंधभक्त नव्हते. रोहिणीताईंनाही कधी 'गुरूबाजी' मान्य नव्हती. ऊठसूठ गुरूंच्या पायांवर डोकं ठेवणं, वगैरे बाह्य उपचार त्यांना फारसे पसंत नव्हते. गुरू-शिष्य दोघांनाही काही बंधनं असतात. गुरूने उदारहस्ते सर्व विद्या शिष्याला देणं, त्याची हरत-हेची जबाबदारी घेणं, त्याचं क्षेम वाहणं आणि शिष्यानं गुरूची विद्या आत्मसात करून ती स्वपराक्रमानं वाढवणं, असं त्या बंधनाचं पावित्र्य उभयपक्षी राखणं अपेक्षित असतं. त्यांनी स्वतः तर अखेरच्या श्वासापर्यंत ते राखलं आणि आपल्या शिष्यांमध्येही ते रुजवलं. गंडाबंधनाचा खरा अर्थ त्यांनी आचरणातून दाखवला. प्रत्यक्ष गंडा न बांधताही त्यांनी आपलं शिष्यत्व जसं कसोशीनं निभावलं, तसं गुरूपणही ! म्हणूनच 'नृत्यभारती' ही केवळ नृत्य शिकण्याची जागा नव्हती, तर जीवनशिक्षण मिळण्याचं तीर्थक्षेत्र होतं, अशी त्यांच्या सर्व शिष्यांची भावना आहे. ते चरितार्थासाठी शिकवणं नव्हतं तर घडवणं होतं.

(वंदना बोकील - कुलकर्णी लिखित
' रोहिणी निरंजनी' पुस्तकातून साभार)

दुबईत असताना मध्यरात्री दारावरची बेल वाजली अन...  आमच्या  घराच्यावर घराचा मालकच राहायचा. अनेक वर्षांपूर्वी ते इथे स्थायि...
07/10/2025

दुबईत असताना मध्यरात्री
दारावरची बेल वाजली अन...

आमच्या घराच्यावर घराचा मालकच राहायचा. अनेक वर्षांपूर्वी ते इथे स्थायिक झाले होते आणि म्हणून आम्ही त्याला 'इराणी अरबी' म्हणत असू. अशी अनेक इराणी कुटुंबे यूएईत येऊन स्थायिक झाली होती. तो, त्याचो बायको, चार मुले, आईवडील, दोन भाऊ आणि घरातील नोकर असे सर्व कुटुंब राहत होते. आपल्याकडे पूर्वी कशी एकत्र कुटुंबपद्धती होती, तिचीच आठवण व्हायची मला.

मी माझ्या दोन महिन्यांच्या मुलाला, अमेयला घेऊन नुकतीच मुंबईहून आले होते. एक दिवस रात्रीचे दीड-दोन वाजले होते आणि अचानक अमेय रडायला लागला. काही केल्या तो थांबतच नव्हता. काय करावे,, 😢
काही समजतच नव्हते. मुंबईहून निघताना आईने दिलेल्या सर्व सूचना आठवून बघत होते. अक्षरशः रडकुंडीला आले होते मी आणि अचानक दारावरची बेल वाजली. एवढ्या रात्री कोण आले म्हणून खरे म्हटले, तर जरा घाबरायलाच झाले. हळूच दरवाजा उघडून पाहिले, तर आमच्या मालकाची म्हातारी आई उभी होती. वय असेल साधारण सत्तरीच्या आसपास. हातांनी खाणाखुणा करून, थोडेफार मोडक्यातोडक्या हिंदीत त्यांनी मला विचारले, "बाळाला काय होतंय?" येताना बरोबर त्या कसल्या तरी तेलाची बाटली घेऊन आल्या होत्या. त्यांनी ते तेल बाळाच्या पोटावर चोळले. पाच मिनिटांत तो गाढ झोपूनही गेला. 'कधीही काही लागले तर मला सांग हक्काने' असे सांगून, आजी नातीचे नाते जोडून त्या गेल्या.😊🩷🩷

आपल्याकडे आजीबाईंच्या बटव्यातील औषध असे आपण पूर्वी म्हणायचो, त्याचीच मला आठवण झाली. त्यांची आणि माझी ती पहिलीच भेट होती; पण एका भेटीतच आमची मने जुळली. केवळ त्यांनी माझ्य मुलाला #औषध दिले, तो रडायचा थांबला, यासाठी नव्हे, तर भर मध्यरात्र उठून अनोळखी माणसाला, जो आपल्या जातीपातीचा नाही..नाही, त्याला माणुसकीच्या नात्याने मदत करायचा स्वभाव, बोलण्यातील प्रेमळपणा यामुळे जुळली. अक्षरशः दुबईत एक आजी मिळाली मला.😊
दुबईतील आमच्या प्रत्येक घराच्या आठवणी आमच्या आयुष्याशी अशाच जोडल्या गेल्या.

आणि त्याच वेळी #अरबी लोकांचा आणखी एक गुण लक्षात आला, तो म्हणजे त्यांच्याजवळ 'आम्ही मालक, तुम्ही भाडेकरू' ही भावना नसते. ही जी दुसऱ्यांना मदत करण्याची, आपलेपणाची भावना असते, ती पावलोपावली आढळली आणि ह्या प्रेमामुळेच #दुबईत आमची पावले दृढ होत गेली.

१९८०-९०च्या काळात दुबईत सर्वत्र प्रगतीला जोरदार सुरुवात झाली होती. नवनवीन इमारती बांधून तयार होत होत्या, पण अर्थातच परदेशी नागरिकांना जमीन विकत घेता येत नव्हती. घर घ्यायचे म्हणजे भाड्याने. त्यामुळे लोक चार-पाच वर्षे झाली की, जागा बदलत असत. आम्हीसुद्धा बर दुबईतील मीनाबाजारमधील नवीन इमारतीत राहायला आलो. अमेय, अनघा, अश्विनी या आमच्या तीन मुलांच्या आगमनामुळे मोठ्या जागेत राहायला आलो. मीनाबाजार म्हणजे आम्ही त्याला मुंबईतील दादरचा रानडे रोड म्हणत असू. अख्ख्या मुंबईतून लोक दादरला रानडे रोडवर शॉपिंगला येतात, तद्वतच अख्या यूएईचे लोक शॉपिंगसाठी मीनाबाजारमध्ये येत असत. अक्षरशः जीवनावश्यक प्रत्येक गोष्ट तिथे मिळत होती. खरे म्हटले तर आम्ही दुबईत गेलो, तेव्हा डांबरी रस्तासुद्धा मीनाबाजारमध्ये नव्हता. पण दुबईचा संपूर्ण बाजारच तिथे होता. साहजिकच आमचे हे घर एकदम बाजारात होते.

(मेघना अशोक वर्तक लिखित
#दुबई 'काल आणि आज ' या पुस्तकातून )
पुस्तक खरेदीसाठी लिंक कमेंटमधे.

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू..?(कोजागिरी पौर्णिमा आणि शरद जोशी) कोजागिरी पौर्णिमा ही अनेक वर्षांपासून मला क...
06/10/2025

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू..?

(कोजागिरी पौर्णिमा आणि शरद जोशी)

कोजागिरी पौर्णिमा ही अनेक वर्षांपासून मला काहीशी उदासवाणीच वाटत आली आहे. एकदा मी आणि माझी आई आंबेठाणला गेलो होतो. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. संध्याकाळी हातात काठी घेऊन शरद जोशी धडपडत कारमध्ये गेले. त्यांनी एक हार विकत आणला. आणि लीला काकूंच्या फोटोला घातला. लीला काकू म्हणजे शरद जोशींच्या पत्नी. मी त्यांना विचारलं हार का आणला तर काका म्हणाले लीला कोजागिरी पौर्णिमेला गेली होती...( त्यांनी आत्महत्या केली होती)

माझ्या पुस्तकातला (शरद जोशीः शोध अस्वस्थ कल्लोळाचा) लीला काकूंवर लिहिलेला भाग खाली पोस्ट करतेय..

लीला काकू...
आता शेवटी शेवटी त्यांना लीला काकूंची खूपच आठवण येत होती. बोपोडीच्या त्यांच्या घरी एकदा गेले होते. शरद जोशी, मी अन् दीदी ( दीदी म्हणजे शरद जोशींच्या केअर टेकर) बसलो होतो. बोपोडीचं त्यांचं हे घर खूप सुंदर होतं. खूप स्पेशियस बाल्कनीज. चार बेडरूम्स, हॉल. केनचं फर्निचर. आणि काकांची ठरलेली बसायची खुर्ची अन् जागा. पहिल्यांदा गेले तेव्हा कौतुकाने त्यांनी सगळं घर मला स्वत: दाखवलं होतं. पुस्तकं ही शरद जोशींच्या घराचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या दोन्ही घराला म्हणजे आंबेठाण आणि बोपोडीला एक गंध होता. तो अर्थातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गंध होता. तो गंध म्हणजे बुद्धीचा, प्रज्ञेचा, मेधावी असा गंध होता. घरात प्रवेश करताच येणाऱ्याला तो जाणवत असे. हे घर प्रज्ञावंताचे, सरस्वतीच्या उपासकाचे आणि जीवनातील सत्य शोधू पाहणाऱ्या एका प्रयोगशील यात्रिकाचे घर आहे हे जाणवून देणारा गंध...

तर सांगत होते की, मी, शरद जोशी अन् दीदी बसलो होतो. माझ्या आईचा विषय निघाला. माझ्या आईला काका फार मानत. आमच्या वाईट परिस्थितीत आई मोठ्या धैर्याने बाबांच्या पाठीमागे उभी राहीली, लढली याचे त्यांना कोण कौतुक होते. ते माझ्या आईला नेहमी म्हणायचे, ‘’तुम्ही सगळा संसार रस्त्यावर आला असताना नवऱ्याच्या मागे उभ्या राहील्यात, मुलांना सांभाळलं, मोठं केलं. अहो, जीवनात साधा ओरखडा उमटला तरी काही बायका संसार मोडतात. तुम्ही माझ्या आदराचा विषय आहात’’. असे म्हणून कितीदा त्यांनी आईला नमस्कार केला होता. आई त्यांना नमस्कार करायला जायची तर ते आईला नमस्कार करू देत नसत. ‘’तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात त्या अर्थाने नमस्कार करू शकता पण नका करू’’ असे ते म्हणत. जेव्हां यावेळी लीलाकाकूंचा विषय निघाला त्यावेळी ते अक्षरश: रडायला लागले. लीला मला का सोडून गेली, माझी आज काय अवस्था झाली आहे, असे म्हणत खूप चिडले. लहान मुलासारखे चिडून हुंदके देत देत ते रडत होते.

त्यादिवशी मला भयंकर अस्वस्थ वाटलं होतं. राहवलं गेलं नाही म्हणून घरी येऊन मी नव-याशी हे बोलले. म्हंटलं काय करता येईल त्यांच्यासाठी. नवरा म्हणाला की, ‘’तो लीलाकाकूंचा फोटो जो सतत डोळ्यांसमोर असतो तो काढून टाकावा. त्याने त्यांना सतत आठवण येते, पण मी हे कसे सांगू शकणार होते. मला एकदा म्हणाले, ‘’ वसू, लीला आज असती तर, मी काही केलं नसतं. नुसतं खुर्चीत बसून पुस्तकं वाचले असते’’. हे ऐकल्यावर अक्षरश: पोटात ढवळून आलं. एवढा मोठा वाघासारखा माणूस असा बघवत नव्हता. वाटलं, तरूणपणापेक्षाही म्हातारपणी पुरूषाला स्त्रीची खूप भावनिक, मानसिक गरज असते. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला ते काकूंच्या फोटोला हार घालत. कारण काकू त्या दिवशी गेल्या होत्या. मला एकदा बोलता बोलता ते म्हणाले, ‘’बच्चू माझही काही चुकलं आहेच. तरूणपणी अंगात रग होती. कधी दुर्लक्ष झालं असेल लीलाकडे’’. दोन व्यक्तीमधलं नातं हे केवळ अन् केवळ त्याच व्यक्तींना माहिती असतं. ती इतकी खाजगी आणि अनंत पदर असलेली बाब आहे की, कोणी सांगण्याचा प्रयत्नही केला तरी ते सांगू शकणार नाही. त्यातही ते नवरा-बायकोचं नातं असेल तर मग विचारायलाच नको. नात्यातले रंग-बेरंग, त्यातली गुंतागुंत यावर तिसऱ्या व्यक्तीने भाष्य करणं चुकीचं ठरतं.

अन् मुळात शरद जोशींचं आयुष्यच वादळी, चाकोरीबाहेरचं. विवाह आणि दोन मुली ही एकच गोष्ट त्यांनी आयुष्यात चाकोरीतली केली असं मला वाटतं.
पण लीलाकाकूंचं त्यांना खूप कौतुक होतं. एकदा सांगत होते, ‘’लीला स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच शिकली, जर्मन शिकली. गाडी उत्तम चालवायची. जोशी सांगत होते, की आंबेठाणला आल्यावर सगळं आयुष्य बदललं. कोरडवाहू शेती, घरी येणाऱ्यांचा सतत राबता, कार्यकर्ते...अशी सगळी धामधूम असे. लोकांना अटेंड करणं, घरातली सगळी व्यवस्था बघणं, मुलींचं सगळं बघण...हे सर्व करूनही काकू स्वत:ला अत्यंत मेंटेन ठेवत. दिवसातून तीन वेळा त्या साड्या बदलवत असे त्यांनी आवर्जून सांगितले. बऱ्याच स्त्रिया संसाराच्या धबडग्यात, विशेषत: मुलं झाल्यावर खूप गबाळ्या होऊन जातात. मग नॅचरली नवऱ्याला ते आवडेनासं होतं. नवऱ्याला बायकोबदद्ल आकर्षण कमी व्हायला लागतं. संसार सांभाळताना नवरा आणि बायकोच्या नात्यातला शारीर पैलू सांभाळणे, त्यातलं आकर्षण टिकवून ठेवणे ही कसरत असते. असं त्यांना सुचवायचं होतं. पण लीला काकूंनी हे ही सांभाळलं होतं सगळं सांभाळता सांभाळता, हे जोशींना खूप आवडलं होतं. हे सांगतांना लीला काकूंबद्दल त्यांच्या डोळ्यात विलक्षण कौतुकाचे भाव होते.

जोशी तुरूंगात असताना लीला काकूंनी शेतकऱ्यांसमोर भाषण दिले होते आणि आंदोलन सुरू ठेवले होते अशी एक आठवणही शरद जोशींनी सांगितल्याचे मला आठवते. ही आठवण सांगताना लीला काकूंमध्ये किती गट्स होते हे सांगण्याचा त्यांच्या बोलण्यातील भाव होता.
आम्ही जेव्हा जोशींची पुतणी राधा हिच्याकडे गुरगावला तिच्या फार्म हाऊसवर गेलो तेव्हा ती म्हणाली, मिम्मी चॉकलेट छान करायची नाही. मी म्हंटलं कोण ‘मिम्मी’? तेव्हा जोशींनी सांगितलं, की लीला काकूंना गौरी आणि श्रेयाताई ‘मिम्मी’ म्हणत असत. जोशींना ते आवडायचं म्हणून त्यांनी मुलींना ‘मिम्मी’ म्हणायला शिकवलं. मग राधाताई अन् सगळेच त्यांना ‘मिम्मी’ म्हणू लागले. मलाही खूप गोड वाटलं होतं ते नाव ‘मिम्मी’. स्वित्झर्लंडमध्ये त्या चॉकलेट करायला शिकल्या. त्यांनी एक कादंबरी लिहली होती. ती शरद जोशींनी एका पेटीत जपून ठेवली होती. मला ती कादंबरी आंबेठाणला जोशींनी दाखवली, लीला काकूंचे अक्षरं दाखवण्यासाठी.

लीला काकूंबद्द्ल एक गोष्ट ते जवळच्या सगळ्यांना सांगत. शरद जोशींचा ठरवून झालेला विवाह होता. ते जेव्हा लीला काकूंना पहायला गेले त्यावेळी काकू १७ वर्षांच्या होत्या. मग १ वर्ष जोशी थांबले अन् परत जाऊन त्यांनी काकूंना मागणी घातली. लग्न जमलं तेव्हा काकूंचे केस लांबसडक, मोठे होते. आणि लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या अन् केस कापून आल्या. जोशींना त्यांना बघितल्यावर धक्काच बसला. जोशी त्यांना म्हणाले की, ‘तू केस का कापलेस’ त्यावर लीला काकूंनी उत्तर दिले, ‘मला कधीपासून कापायचे होते’. जोशींना त्याचा थोडा रागच आला होता पण ते काहीच बोलले मात्र नाहीत. लीला काकूंनी असं का केलं असेल असा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला स्त्री म्हणून त्याचं उत्तर सापडलं. लग्नापूर्वी आई-वडिलांच्या फार बंधनात असणाऱ्या स्त्रियांना लग्न झाल्यावर खूप स्वतंत्र वाटतं. जे काही करायचं फॅशन वगैरे ते लग्नानंतर करू असं बऱ्याच बायका करतात. नवरा असतोच कौतुक करायला आणि त्याच्यावर गाजवताही येतं. उच्च् मध्यमवर्गीय घरात हे चित्र सर्रास बघायला मिळतं. तसंच काहीसं लिलाकाकूंचं झालं असावं. पण यावरून लिला काकूंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचीही कल्पना येते. त्याही आधुनिक आणि काळाच्या पुढे होत्या हे लक्षात येतं. कारण आज त्या असत्या तर ७३-७४ वयाच्या असत्या. त्या काळात ६० च्या दशकात एखादी स्त्री असा निर्णय घेते यातून तीचं व्यक्तिमत्व कळतं.

स्वित्झर्लंडला युनोमध्ये काम करत असतानाचा एक मोठा गमतीदार प्रसंग शरद जोशींनी सांगितला. एकदा त्यांनी घरी कॉकटेल पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला शरद जोशींची सेक्रेटरी आली होती. लीला काकूंशी बोलता बोलता ती सेक्रेटरी म्हणाली की, मिसेस जोशी तुमचे मिस्टर एवढे लाजाळू आणि संकोची आहेत म्हणून सांगू. कोणत्याच स्त्रीशी ते शेकहँडसुद्धा करत नाहीत.’ जोशी म्हणाले की, ‘सेक्रेटरीचं हे बोलणं ऐकून लीला काय म्हणून खूष झाली आणि नंतर अख्खा दिवस ती खूपच आनंदात होती’.
काकूंचं जाणं ही त्यांच्या आयुष्यातली एक भळभळती जखम झाली होती. काकूंचा विषय निघाल्यावर कळायचं की काय भीषण वेदना घेऊन हा माणूस जगतोय.

जिस तरह से हंस रहां हू, मैं पी पी के गर्म अश्क
यूं दुसरा हंसे तो, कलेजा निकल पडे...

त्यांचं दु:ख तेच जाणोत. एकदा चांदवड अधिवेशनाबद्दल बोलत असताना ते मला म्हणाले होते, ‘’वसू, ज्या माणसाची बायको आत्महत्या करते त्या माणसाकडे समाज कशा नजरेने बघतो हे सांगण्याची गरज नाही. मान वर करून समाजात चालावं अशी स्थिती राहत नाही. त्या पार्श्वभूमीवर चांदवडच्या अधिवेशनाला दोन लाखाहून जास्त महिला आल्या. हा विश्वास त्या वेळी या सगळ्या स्त्रियांनी, माझ्या माय-बहिणींनी माझ्यावर दाखवला त्याने मी पुन्हा उभा राहू शकलो. तो त्यांच्या नाही तर माझ्या आयुष्यातील परिवर्तनाचा क्षण होता’’.

वसुंधरा काशीकर

(वसुंधरा काशीकर यांच्या fb वॉल वरून साभार)

#शरदजोशीशोधअस्वस्थकल्लोळाचा
#शरदजोशी 🌾

🪻🪻सर्वांना विजयादशमीच्या  हार्दिक शुभेच्छा🪻🪻              !
01/10/2025

🪻🪻सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🪻🪻

!

 #लाल चिखल! भास्कर चंदनशिव!😥🙏  भावपूर्ण श्रद्धांजली!   #बालभारती च्या  #मराठी विषयात त्यांचा ‘लाल चिखल’ धडा झरकन डोळ्यास...
28/09/2025

#लाल चिखल!
भास्कर चंदनशिव!😥🙏 भावपूर्ण श्रद्धांजली!

#बालभारती च्या #मराठी विषयात त्यांचा ‘लाल चिखल’ धडा झरकन डोळ्यासमोर आला.. तो धडा वाचताना वर्गातल्या मुलांचे डोळे भरून यायचे!
शेतात कष्टाने पिकवलेल्या टोमॅटो ला भाव मिळत नाही.. मातीमोलभावानेही तो ग्राहकांना घ्यायचा नसतो. परिणामी शेतकऱयाला ते टोमॅटो पायाने तुडवण्याशिवाय पर्याय राहत नाही..आणि त्याचा झालेला 'लाल चिखल'.. साधारण असं कथानक होतं..

मराठी शाळेत शिकलेल्या मुलांच्या भावविश्वात आणि सामाजिक जाणिवांमध्ये :लाल चिखल' चा वाटा खूप मोठा आहे.🙏🙏
शेतकरी कुटुंबात जन्मलेली स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरची एक मोठी पिढी सतरीच्या दशकात लिहायला लागली. मातीतल्या माणसांच्या वेदनेबद्दल...चंदनशिव हे त्या पिढीतील महत्वाचे शिलेदार👍

भावपूर्ण श्रद्धांजली!!

आज दीदींचा जन्मदिन!"म्हणून' ही ‘ सुरांची सम्राज्ञी’© डॉ.मृदुला दाढे                              लता मंगेशकर ! या आवाजाच...
28/09/2025

आज दीदींचा जन्मदिन!

"म्हणून' ही ‘ सुरांची सम्राज्ञी’

© डॉ.मृदुला दाढे

लता मंगेशकर ! या आवाजाच्या अस्तित्वानं आपलं हे सहस्रक पुनीत झालं. या आवाजानं आपलं बालपण ,तारुण्य यातले कित्येक सोनेरी क्षण आपल्याला बहाल केले... ‘जीनेका बहाना’ म्हणता येईल असा , जगण्याला सुरेख अर्थ दिला,अश्रू पुसले.स्वत्वाची जाणीव दिली.अपमान, दुखः.,वंचना या भावना समजून घेताना हाच आवाज पाठीवर हात ठेवत होता..तारुण्यातले कित्येक तरल क्षण या आवाजालाच सांगितलेत आपण. रस्ता दिसू नये..आपण दिशाहीन व्हावं..कुणाशीच बोलावसं वाटू नये,.अशा वेळी फक्त आणि फक्त या आवाजालाच प्रवेश होता .
©डॉ.मृदुला दाढे
लता मंगेशकर म्हणजे विश्वाच्या निर्मात्यांनं,हे विश्व निर्माण केल्याबद्दल स्वतःलाच दिलेलं बक्षीस! या सम्राज्ञीपुढे ठेवलेल्या बाराही अलंकारांना तिने स्वतःच्या गळ्यात मानाची जागा दिली...त्यांना खुलवलं.त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान वाटावा अशा डौलात,अशा दिमाखात वाढवलं...आणि ते स्वर या राणीच्या गळ्यात असे काही बहरले ,की त्याची जागा विश्वातला कुठलाही गळा,कुठलंही वाद्य कधीच घेऊ शकलं नाही..कारण या गळ्यातली स्वरवेल जेव्हा थरथरली तेव्हा कुठल्यातरी अनामिक दैवी सुगंधाची फुलंच ओठावर उमलली.या आवाजाची व्याख्या करण्याच्या फंदात शहाण्यांनी पडू नये कारण शब्दात बांधायला तो काही कुठला धातू नव्हे,किंवा भूमितीचं प्रमेय नव्हे..’.लता’ साठी भाषासुद्धा नवीच जन्माला घालावी..उपमाही नव्याच...कारण त्या आवाजाची लिपीच वेगळी आहे...कष्टात घालवलेलं बालपण म्हणजे लता नव्हे..वाटेल तिथे पोचू शकणारा गळा म्हणजे लता नव्हे..भावनेचे पदर उलगडू शकणारा लवचिक आवाज म्हणजे लता नव्हे..सूक्ष्म हरकती, मुरक्या स्वच्छ ऐकू येणं म्हणजे लता नव्हे.. ऐकणाऱ्याचा श्वास कोंडावा असा दमश्वास म्हणजे लता नव्हे..दोन ओळीत लपलेला भावार्थ आपल्या आवाजात अचूक दाखवण्याचं कसब म्हणजे लता नव्हे आणि प्रत्येक अभिनेत्री साठी वेगळा टोन आवाजात आणू शकणे म्हणजेही लता नव्हे..लता म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एकत्र येणं ते ही योग्य प्रमाणात.!..म्हणूनच ते गाणं रुक्ष हरकतीनी कोरडं होत नाही...नुसतंच तुम्हाला दम कोंडून अचंबित करत नाही..अति लाडिक होत नाही... अति भावबंबाळ..नाटकी होत नाही...गायन या विषयातल्या सगळ्या सौंदर्यकल्पना एकत्र येऊन घडवलेलं प्रमाणबद्ध शिल्प आहे लता मंगेशकर. ©डॉ.मृदुला दाढे
काही आवाज ‘आपल्यातले’ वाटतात..काही आवाज किंचित परके, पण तरीही हवेहवेसे,.तर काही आवाज’ इथले’ नाहीत हे कळूनही ‘त्या’ दुनियेशी आपलंही नातं जोडण्याच्या विलक्षण ताकदीचे.लता हा आवाज ‘त्या’ प्रकारचा.संगीत हे परमेश्वरापर्यंत पोचण्याचं साधन असेल तर त्या प्रवासाला स्वतःचा मखमली रस्ता दिला या आवाजानं. सगळा खडबडीतपणा स्वतःच्या त्या मुलायम आवाजाखाली दडवून हा रस्ता केशराच्या शेतातून नेला.आपल्या पायाखाली सतरंजी असण्याची सुद्धा पात्रता नसणाऱ्यांसाठी पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या ,त्या या आवाजानी.त्या आवाजाला ‘दैवी’ हे विशेषण आपण लावतो.पण देवाचा आवाज आपण ऐकलाय का? मग लताबाईंचा आवाज दैवी कसा? तर देवालासुद्धा आपला ‘असा ‘आवाज असावा असं वाटायला लावणारा हा आवाज..!

#पुस्तक खरेदीसाठी लिंक कमेंटमधे
©डॉ.मृदुला दाढे
('सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर'
राजहंस प्रकाशन पुणे
या पुस्तकातून )

खरेदीसाठी लिंक कॉमेंट मध्ये

हो.. हो...डॉक्टर सुद्धामाणसचं असतात.. #डॉक्टर म्हणून जगवताना.. #नऊ दिवस नऊ पुस्तकंघरी आम्ही नवरा, बायको आणि तीन वर्षांची...
27/09/2025

हो.. हो...डॉक्टर सुद्धा
माणसचं असतात..

#डॉक्टर म्हणून जगवताना..

#नऊ दिवस नऊ पुस्तकं

घरी आम्ही नवरा, बायको आणि तीन वर्षांची मुलगी, मुग्धा, असे राहत असू. रात्री इमर्जन्सी पेशंट आला आणि दोघांपैकी एकाला जावे लागले तर दुसरा मुलीजवळ असायचा. एके दिवशी जवळच्या गावात, शास्त्रीय संगीताची मैफिल ऐकण्यासाठी अजय गेला होता. रात्री अकरा वाजता मला हॉस्पिटल मधून कॉल आला. मी कुलूप लावून निघाले. त्यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे बांधकाम अजून सुरूच होते. रस्ता अगदी दगडगोट्यांचा होता. साप-विंचू सुद्धा निघत. पण सगळ्याची सवय होती. कधी भीतीही वाटत नसे. घरातून वॉर्डात जायला साधारण दहा मिनिटे लागत. मी जाऊन पेशंट पाहिला. सात आठ वर्षांची मुलगी होती. तिला घटसर्प झाला होता, तोही स्वरयंत्राचा. श्वास घेणे तिला फार जड जात होते. वेळ अगदी थोडा होता. एका छोट्या ऑपरेशनने (ट्रॅकिओस्टॉमी) तिच्या स्वरयंत्राखालील श्वासनलिकेला एक भोक पाडून श्वास घेण्याची व्यवस्था करायला हवी होती. या ऑपरेशनसाठी कान-नाक-घशाच्या सर्जनला बोलावणे आवश्यक होते.
मी त्या मुलीला #आय.सी.यू. मध्ये घेतले. ऑक्सिजन लावला, सलाईन लावले. घटसर्पाची औषधे मागवून घेतली. टेस्ट करून, रिअॅक्शन येत नाही हे पाहून ती शिरेतून दिली. कान-नाक-घसा तज्ज्ञाला कॉल लिहून पाठवला. हे सारे होईपर्यंत आपल्याला एक तीन वर्षांची मुलगी आहे आणि ती घरी एकटीच झोपली आहे, हे मी विसरूनच गेले होते.🫣
मन थोडे स्थिरावल्यावर मला हे आठवले. मला वाटले, 'आपण बाहेर कुलूप लावून आलोय, पण ती जर जागी झाली तर आसपासचा अंधार बघून आणि जवळ कोणी नाही हे जाणवून जबरदस्त घाबरेल. तिच्या मनावर काही आघात तर होणार नाही?
काही विचार न करता मी तडक निघाले. अंधारातून, खाचखळग्यातून धावत घरी आले. कुलूप काढले, पाहते तो काय? माझी मुलगी अगदी शांत झोपली होती. आता मला काय करावे तेच कळेना.
माझ्या लेकीला शांत झोपलेले पाहिल्यावर मला त्या मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीचा चेहरा दिसू लागला. कुलूप लावून मी तडक हॉस्पिटलमध्ये आले. परिस्थिती आहे तशीच होती. सर्वजण शांतपणे सर्जनची वाट पाहत होते.आता पुन्हा मला पुन्हा माझ्या मुलीची काळजी वाटू लागली. इथे उभी राहून तरी मी काय करणार होते ? माझे जे काम होते ते मी केले होते. मग मी पुन्हा घरी गेले. मी घामाने डबडबून गेले होते.
रात्री बारा-एकची वेळ, खाचखळग्याचा रस्ता आणि एका
श्वास घ्यायला धडपणारी ती मुलगी आणि दुसऱ्या टोकाला गाढ झोपलेली माझी मुलगी यांच्यामध्ये लंबकाप्रमाणे धावणारी मी. हे सारे स्वप्न आहे की मला वेड लागले आहे, काहीच कळेना. या साऱ्या दुष्टचक्रातून त्या बिचाऱ्या सर्जनने येऊन माझी सुटका केली. ते ऑपरेशन पार पडले. ती मुलगी शांतपणे श्वास घेऊ लागली. दोनच मिनिटात तिला गाढ झोप लागली आणि मग मी घरी येऊन पडले.
तीस वर्ष बालरोगतज्ञ् म्हणून काम करताना वेगवेगळे अनुभव आले. आज एवढी वाट चालून आल्यावर या घटनेकडे मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा त्या वेळेची अगतिकता, असाहाय्यता, कोंडी सारे विरून जाते. राहतो तो फक्त निखळ अनुभव. आणि आज तो अनुभव माझा वैयक्तिकही राहत नाही.
उंबरठ्याबाहेर पाय ठेवणारी आणि त्याचवेळी संसारही कवेत ठेवू पाहणारी कोणतीही स्त्री या अनुभवावर आपला हक्क सांगू शकते.
करिअर करताना मुले लहान असतानाचा काळ सर्वात कसरतीचा होता. घरातून पाय निघायचा नाही. चिमुकल्या हातांची मिठी सोडवायची नाही. लहान मुले, त्यांची आजारपणे, बेभरवशाचे मदनतीस, अचानक येणारे नातेवाईक, मित्रमंडळी, सतत फक्त दोषच दाखवणारा रिकामटेकडा समाज, अशा समस्त स्त्री वर्गाला भोवंडून टाकणाऱ्या अडचणी डॉक्टर म्हणून काम करताना मलाही आल्याच. कुटुंबाकडे आपण खरे आणि पुरे लक्ष देऊ शकत नाही, असेही कधी कधी वाटून गेले. अनेकदा एकटेपणा आला. भावनिक कोसळणं, गुंतणं हे तर स्त्री स्वभाव विशेष! मलाही ते चुकले नाहीतच.

डॉक्टर म्हणून काम करताना मला इतकी वेगवेगळी रूपे अनुभवायला मिळाली की मी जर वैद्यकीय व्यवसायात नसते, तर त्यासाठी मला शंभर जन्म घ्यावे लागले असते. माणसांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांचे कंगोरे, त्यांतील सूक्ष्म छटा, माणसांचे एकमेकांशी नाते, त्यांतील ताणे-बाणे, आयुष्याला भिडण्याची त्यांची पद्धत, त्यांचे नीतीनियम मला वेगळीच जाण देऊन गेले. या प्रवासात अनेक सौंदर्यस्थळे, ज्ञानाचे क्षण, माणुसकीचे झरे भेटले. माणूस उमजत गेला आणि माणसातला #माणूस शोधताना स्वतःलाही शोधता आले.

(डॉ. #सुलभा ब्रम्हनाळकर यांच्या 'डॉक्टर म्हणून जगवताना' या पुस्तकातून)....
तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत #डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे हे आत्मकथन - नक्की वाचा.

 #विवाह नाकारताना.. #नऊ  दिवस नऊ पुस्तकं"गिरगावातली एक चाळ. दादा आणि मी गेलो. बाहेर बैठकीच्या खोलीत बसलो. नंतर एक बाई आल...
26/09/2025

#विवाह नाकारताना..

#नऊ दिवस नऊ पुस्तकं

"गिरगावातली एक चाळ. दादा आणि मी गेलो. बाहेर बैठकीच्या खोलीत बसलो. नंतर एक बाई आल्या. मला दुसरीकडे चलण्याची खूण केली. ते स्वयंपाकघर होतं. सहा-सात बायका होत्या. त्यांच्यात मी बसले. मला वाटलं, तो लग्नाचा मुलगा बाहेर. त्याची ओळख करून द्यायची, तर मला इथे कशाला बोलावलं कोणास ठाऊक ! किती जुनकट माणसं! मी मूकस्तंभ बसून राहिले. त्या आपसात बोलत होत्या. मधूनच मला घरात कोण कोण आहे, नोकरी किती वर्ष झाली, असले फुसकट प्रश्न विचारत होत्या. जरा वेळानं त्यांनी ट्रेमध्ये चहाचे कप ठेवले आणि ते मला बाहेर न्यायला सांगितले. हा मात्र भयंकर अपमान वाटला. घर तुमचं, मी पाहुणी आणि हे काय? पण इतका अनपेक्षितपणे हा प्रसंग अंगावर आला, की मला काही सुचलंच नाही. मी ट्रे उचललाच नाही. त्यांनी पुन्हा म्हटलं, "तुम्ही हा ट्रे बाहेर नेऊन सगळ्यांना चहा द्या." माझा नाइलाज झाला. त्या बाहेरच्या खोलीत जायला आतून वाट दिसली नाही. मी गॅलरीतूनच ट्रे घेऊन पुरुष बसले होते, त्या खोलीत गेले. दोघं खाली सतरंजीवर बसले होते. दोन-तीन जण खुर्चीवर होते. मी तो ट्रे सतरंजीवर मध्येच ठेवून दिला. कुठे बसावं म्हणून इकडेतिकडे पाहिलं. माझ्या मागोमाग आलेल्या बाई म्हणाल्या, "चहा द्या सगळ्यांना. मग तुम्ही बसा." त्यांनी सतरंजीवर बसण्याची खूण केली. एक खुर्ची रिकामी दिसली. ती जरा ओढून मी खुर्चीवरच बसले. पुरुषांपैकी कोणीतरी म्हटलं, "चहा द्या ना सगळ्यांना." मी जागची हालले नाही. तशीच बसून राहिले. मग कोणीतरी म्हटलं, "असू दे, असू दे. आपण घेऊ." कोणीतरी सगळ्यांना चहा दिला. माझ्यापुढेही कप धरला. मी चहा घेत नसल्यामुळे प्रश्न मिटला. मग त्यांची दादांशी काहीतरी बोलणी सुरू झाली. मी निर्विकार बसून होते.

आम्ही परत निघालो. निघताना त्या लोकांनी माझ्या हातांत पेढ कुडा दिला. लग्राचं हो-नाही ठरण्याआधीच हे कशासाठी?

प्रसंग दुसरा
दाखवण्याचा समारंभ न करता ऑफिसमध्ये परस्पर भेटण्यास क्वचित काही मुलांनी संमती दिली. असा एक आर्किटेक्ट मुलगा माझ्या ऑफिसमध्ये आला. मला भेटायला कोणीतरी येऊन लिफ्टपाशी थांबलंय, असं प्यूननं सांगितल्यावर मी उठून लिफ्टच्या पॅसेजमध्ये आले. त्यानं नाव सांगितल्यावर मी हसून म्हटलं, "चला, कँटीनमध्ये चहा घेऊ."

त्यानं लगेच म्हटलं, "नको. मी जातो. वेळ नाही." निघून गेला. वेळ नाही तर कडमडला कशाला, असं वाटलंच! सोडून दिलं.

घरी आल्यावर आईदादांना सांगितलं, "मला पाव मिनिटात दर्शन घेऊन, होकार-नकार देता येत नाही."

मग दादा म्हणाले, "त्यांना तसं सांगून, पुन्हा भेटायला विचारू?" मी म्हटलं, "चालेल." दादा विचारायला गेल्यावर त्यानं नकार सांगितला. वाटलं, एवढी चाणाक्ष वाटते मी मला! तो इतका झटकन म्हणजे नकाराच्याच निर्णयानं निघून गेला, हे माझ्या लक्षात कसं आलं नाही? मूर्खच मी.

(विनया खडपेकर यांच्या ' #विवाह नाकारताना' या पुस्तकातून)

अजून लग्न नाही केलं असं म्हटलं तरी आजही समाजाच्या भुवया उंचावतात..आजही समाजाच्या दडपणाखाली अनेक वेळा लग्न केली जातात, रडत खडत निभावलीही जातात.. अशा समाजात 'न पटलेला माणूस गळ्यात बांधून घेण्यापेक्षा कोणी भेटलं मनासारखं तर करू लग्न !' ही मोकळीक लेखिका स्वतःला देते, (साधारण 50-60 वारसापूर्वीचा काळ आहे..
आयुष्यकडे लेखिका संयमीत दृष्टिकोनातून बघते.. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कुठेही कटूता नाही, उलट मिश्कीलपणा आहे. हे पुस्तक म्हणजे लेखिकेची जीवनकथा नाही. फक्त अविवाहित्व केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आठवणी आहेत.
पुस्तक वाचत असताना आपल्या आजूबाजूच्या अशा प्रसंगातून जाणाऱ्या अनेक स्त्रिया डोळ्यांपुढे येतात.. त्यांचीच तर गोष्ट आपण वाचतोय की काय असे वाटून जाते..
कदाचित या अनुभवामुळे पुस्तक अधिक परिणामकरक ठरत..
नक्की वाचा..

#सध्या हे पुस्तक 25% #सवलततीत,
शिवाय फ्री #शिपिंग उपलब्ध आहे..
#खरेदीसाठी लिंक कमेंट मधे 👍

सती ते सरोगसी..समाजाच्या मानसिकतेचा लांबलचक प्रवास #नऊ दिवस नऊ पुस्तकंअनेकदा महिला कायद्याविषयी  जागरूकच नसतात. कायदा, न...
25/09/2025

सती ते सरोगसी..
समाजाच्या मानसिकतेचा लांबलचक प्रवास

#नऊ दिवस नऊ पुस्तकं

अनेकदा महिला कायद्याविषयी जागरूकच नसतात. कायदा, न्याय, पैसा ही पुरुषांची कामं आहेत, या भ्रमात राहणं अनेकींना आरामदायी वाटतं. निदान आपल्या हिताच्या कायद्यांची नीट माहिती करून घ्यायला हवी, तशी मागणी करण्यात कोणताही पुरुषीपणा, रूक्षपणा, धूर्तपणा नाही; किंबहुना आपल्या आयुष्यावर आपली नीट पकड येण्यासाठी या जाणिवा आवश्यक आहेत. हे 'सती ते सरोगसी' हे पुस्तक
वाचताना आपल्याला नकळत पटत..
धर्मसत्तेनं, राजसत्तेनं बायकांच्या 'बोलण्याला' प्रोत्साहन दिलेलं नाही, ही पार्श्वभूमीही आहेच; पण आता धार्मिक राष्ट्रापासून सार्वभौम प्रजासत्ताकापर्यंत प्रवास झाल्यावर या भीतीला काही आधार नाही. तुमची व्यक्तिगत मतं आणि सार्वजनिक चर्चा यात अनेक कायद्यांमधल्या सुधारणांची बीजं असतात. त्यांची त्या वेळी कदाचित चेष्टा झाली, तरी पुढं स्वीकार केला जातो. तुम्ही व्यक्त व्हा.. असा नवा विचार हे पुस्तक देत..

आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज ‘सरोगसी’द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी सर्व महिलां -पुरुषांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.

Address

Rajhans Prakashan Pvt Ltd, 1025 Sadashiv Peth, Near Nagnath Par
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Telephone

02024465063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajhans Prakashan Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajhans Prakashan Pune:

Share

Category