26/10/2025
#श्रीदत्तगुरूंच्या_पादुकांचे_महत्त्व
श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी नव्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल? तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,
‘तुम्हासहित औदुंबर । आमुच्या पादुका मनोहर ।
पूजा करिती जे तत्पर । मनकामना पुरती जाणा ॥ (अ. १९ ओवी ८०)
त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वतीमहाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजतगाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैलपर्वतास जाऊन, पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास ‘निर्गुणपादुका’ असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित, असाही भावार्थ आहे. सत्त्व-रज-तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी-सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुणपादुकांची पूजा-आराधना केल्यास निर्गुण-सगुण असे दर्शन होते.
सायंदेवांकडील ‘करुणा-पादुका’
श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चार पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायंदेव, नंदिनामा, नरहरी, सिद्धमुनी- हे होत.सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकिकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी-नामधारक संवाद डोळयापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ लिहिला. “महाराजांनी आपल्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायंदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलिकडे १९५५ मध्ये प. पू. श्रीगुरुनाथबाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण ‘करुणापादुका’ असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत.” अशी माहिती श्री. शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री. शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की, त्यांनी सायंदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे.
कडगंची येथील श्रीदत्तात्रेय
श्री शिवशरणप्पांचे कार्य
श्री शिवशरणप्पांनी देवस्थानचा जीर्णोद्धार करताना अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना (स्व) दादामहाराज जोशी यांची मार्गदर्शनही लाभले होते. पुष्कळ भ्रमंती केली आहे. ‘श्रीगुरुदेव दत्त” एवढ्याच नामघोषाने ते आवाहन करतात. त्यांची कानडी आणि हिंदी भाषा अत्यंत मधुर आहे. कारण त्यात कमालीची विनम्रता व सेवाभावीवृत्ती दडलेली आहे. तिचे प्रकटीकरण होताना जणू ‘भक्तिसंवाद’ घडत असल्याची अनुभूती येते. त्यांचे बोलणे हेही प्रवचन म्हणावे इतके भक्तीने होत असल्याने त्यांना सर्वांकडून सर्वतोपरी साहाय्य मिळत आहे. याची ग्वाही त्यांच्या कार्यानेच मिळते. खरे तर कोणत्याही कार्याचे श्रेय ते स्वत:कडे कधीच घेत नाहीत. नेहमी ‘श्रीनृसिंह सरस्वतीजीकी कृपा’ एवढेच वचन ते उच्चारतात. हीच त्यांच्या मोठेपणाची ओळख आहे. दत्तगुरूंची त्यांच्यावर अपारकृपा आहे, याची ग्वाही त्यांच्या मंदिर उभारणीतून दिसून येते. श्रीदत्तगुरूंची अत्यंत सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झाली.
सायंदेवाचे घर म्हणजेच सध्याचे कडगंची होय. याठिकाणी साधकांना सर्व सोयी उपलब्ध आहेत. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस बरेच जिर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे.
श्री गुरूंचा पट्ट शिष्य श्री सायंदेव
श्री क्षेत्र कडगंची विशेष
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –
श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल.श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.
गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.