दत्त माझा । मी दत्ताचा ।।

  • Home
  • India
  • Pune
  • दत्त माझा । मी दत्ताचा ।।

दत्त माझा । मी दत्ताचा ।। || श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन् ||
(644)

दत्त महाराजा ,दैवत म्हणून असलेला आदरभाव ,सखा या नात्यात देखील आहे . गीर्वाण भाषेत असलेले स्तुतीपर आणि आवाहनपर मंत्र अत्य...
01/09/2025

दत्त महाराजा ,दैवत म्हणून असलेला आदरभाव ,सखा या नात्यात देखील आहे . गीर्वाण भाषेत असलेले स्तुतीपर आणि आवाहनपर मंत्र अत्यंत प्रभावी जरी असले तरी माझ्या मनी तुझी येणारी आठवण हि त्या मंत्रांसारखीच प्रभावी आहे . तुझ्याशी मनात होणारा नित्य संवाद हा वैखरीने नसला तरी तो तू जाणतोस कारण तू हृदयस्थ आहेस . आणि बरं का भगवंता , ह्या जन्मीच केवळ तू सोबत आहेस असे नाही तर मागील अनेक जन्म हे तुझ्या संगतीत / सोबतीने राहिलो आहे . तुझ्या विषयी तेव्हा फार काही जणू शकलो नाही पण कधी रस्त्याकडेला ,कधी मठाबाहेर ,कधी संगमावर असे तुझे दर्शन मी हात जोडून घेत असे . तेव्हा घडलेले दृष्टिक्षेप आणि मंदस्मिताने झालेली कृपा आज या जन्मात फलद्रुप झाली आहे हे निश्चित .

तुझ्याविषयी केलेली चौकशी तुला आवडत नाही हे माझ्या पक्के लक्षात आहे .नृसिंहवाडीला गुरुभक्तानी तुझी जन्मतिथी विचारताच तुझे उत्तर आले पण त्यांच्याकडे तू पुन्हा येणे मात्र केले नाहीस ,म्हणून मी तुझ्या कालमानाविषयी अधिक काही जाणत नाही .पण हि माहिती नसल्याने माझ्या सख्य भक्तीत बाधा येत नाही . तुझ्या स्वरूपाविषयी मात्र नित्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी दिसलेले वेगळे रूप पाहता अनेक जन्म हे जाणून घेणे सुरूच राहणार आहे . शेष तुझे रुप आणि गुणवर्णन करताना दुजिव्हा झाला तिथे मी काय पुरा पडणार ?

तुझ्या लीलांचे वर्णन करणे हा माझा आनंद आणि विरंगुळा आहे . तुझे भक्त भेटताच मी अनेक आख्यानांना सुरुवात करतो आणि त्यांच्याकडून त्याच कथा पुन्हा ऐकतोही .भक्तांना कायम राखणारा असा तू नेहेमीच त्यांच्या रक्षणार्थ धाव घेतोस आणि ह्या लीला पाहता मला संकटांची भीती वाटत नाही . भयालाही भय देणारा असा तू आहेस . भक्ताला कधी शाप देताच तो तू स्वतः आपल्यावर घेतोस ,भक्ताला उद्दामपणे विचारताच खांबातून प्रकट होतोस ,भक्ताचा वध करताच तिथे प्रकट होत त्याला राखतोस ,प्रत्येक रूप तुझे मनाला भावणारे आहे .

एखाद्या जन्मी फार दुर्लभतेने मिळणारा मनुष्य देह तुझ्या कृपेने मला वारंवार लाभल्याने तुझे काही अंशी ज्ञान होऊ शकले . या मनुष्य देहात असताना नित्य येणाऱ्या नाना आपत्ती ह्या तुझ्या लीला आहेत हे मला ठाऊक झाले आहे त्यामुळे आपत्ती येताच आता पुढे यात तुझी काय बरं लीला असेल ? याची मला उत्सुकता असते .काही काळातच तुझे कराल नृसिंहरूप या आपत्तींना सहज गिळंकृत करते आणि आपली भक्तवत्सलता दाखवते .

आपत्तींना विदीर्ण करणारे हे रूप मला मात्र प्रल्हादाप्रमाणे जवळ घेते आणि मला दत्त या नामाची महती पटते ,भक्ताभिमानी हे बिरुद सत्य आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे.मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण...
01/09/2025

ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे.

मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता.
भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ?

लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे.
पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला.

मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले !

आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्या कशाचीही आठवण ठेवली नाही.

माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.

जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले.

माझे सांगणे ऐकल्यानंतर पुनः तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे,तुम्हाला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल.

तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे.
पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो.

मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते.
पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय.

माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे ? मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.

२४४. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.

“आस्तिक”“नाथा चल रे! गाडी काढ. माझी तयारी झालेय.” असं आक्कांनी म्हणताच  नाथा धावला गाडी काढायला. तशी गाडी तयारच होती. फक...
01/09/2025

“आस्तिक”

“नाथा चल रे! गाडी काढ. माझी तयारी झालेय.” असं आक्कांनी म्हणताच नाथा धावला गाडी काढायला. तशी गाडी तयारच होती. फक्त चालू करून दाराशी आणायची होती. आक्का म्हणजेच, श्रीमती. मालिनी मधुकर अत्रे, पुण्यामधलं नावाजलेलं प्रस्थ. मधुकरराव असताना त्यांनी अत्र्यांचं पूर्वापार चालत आलेलं घराणं जपलं होतं आणि तद्नंतर वाढवलं पण होतं. त्याकाळी 'बायकांना व्यवसाय काय जमणार!' अशा स्वभावाचे लोक असूनही त्यांची तोंडं आक्कांनी बंद केली होती. मधुकररावांनी त्यांना अगदी अथपासून इतिपर्यंत व्यवसाय शिकवला होता. त्यात त्यांना साथ द्यायला गणपती बाप्पा होताच. अत्र्यांची बाप्पावर कोण श्रद्धा. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला अभिषेक ठरलेला. पहिले पहिले गरिबीच्या दिवसांमध्ये चालू केलेला ११ मोदकांचा नैवेद्य आता १०१ पर्यंत पोहोचला होता. आक्का पण अगदी आनंदाने आणि मनापासून सगळं श्रद्धेने करायच्या. लग्न झाल्यावर वर्षभरातच गोड बातमी कानी आली आणि बाप्पाचा नैवेद्य म्हणून माघी गणेश चतुर्थीला जन्म झालेल्या मुलाचं नाव ठेवलं “प्रसाद”! हा प्रसाद आता डॉक्टर प्रसाद मधुकर अत्रे या नावाने स्त्री रोगतज्ञ म्हणून पुण्यामध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालवत होता. पण आईबाबांची बाप्पावर असलेली अपार श्रद्धा याच्यामध्ये काही उतरली नाही. त्याचा देवावर अजिबातच विश्वास नाही. त्याचं एकच म्हणणं, “श्रद्धा ठेवायची असेल तर आपल्या कर्तृत्वावर ठेवा.. देव वगैरे सगळं थोतांड आहे.”
तर आज संकष्टी चतुर्थी त्यामुळे आक्का छानशी हलक्या पिवळ्या रंगाची साडी, त्यावर मोहनमाळ, कानात मधुकररावांनी दिलेल्या मोत्याच्या कुड्या असं सगळं घालून स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकाला असलेली मंजुळा आणि स्वतः खुद्द आक्का दोघींनी सकाळीच हाताने वळून तयार केलेल्या मोदकांचा नैवेद्य देवळात न्यायच्या तयारीला लागल्या. ते झाल्यावर त्यांनी प्रसाद ला हाक मारली. “प्रसाद, अरे येतोयस न खाली? चल नाश्ता करून घे. मग मला देवळात जायचंय रे. ये लवकर!” प्रसाद हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या निमित्ताने तयार होऊन खाली आला तोच जरा चेहरा कसनुसा करतच. "आई काय ग हे तुझं? नेहमीप्रमाणे चाललीस वाटतं तू? अग मी कितीवेळा सांगितलं आहे हे देव वगैरे काही नसतं गं.. आपलं नशीब आपण घडवतो. उगीच नको त्या गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस. आणि देवळात वगैरे जाऊन काही होत नाही. आपल्याला बरं नसलं की फक्त डॉक्टरच आपल्याला बरं करतात तो तुझा देव नाही गं." हे संवाद आक्कांना आता दर वेळचेच झाले होते. दर वेळी आक्का मात्र त्याला त्याच मृदू स्वरात समजवायच्या. "अरे मला माहितेय आपलं नशीब आपणच घडवतो. आपणच आपले शिल्पकार असतो. सगळं मान्य आहे. पण तुझे बाबा हेच म्हणायचे आणि मी पण की, देव आहे की नाही हे मानायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निदान आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला बळ देते. आपल्याला सावरते आणि हरभऱ्याच्या झाडावर चढलो असू तर आपली जागा पण दाखवते. यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे. ते काही केल्या तुला पटत नाही. शिवाय आज तर मला सकाळपासून काहीतरी विचित्र होतंय. पण काय ते नाही सांगता येत आहे. दरवेळेस असणारा उत्साह आज नाहीये असं वाटतंय. असं आक्कांनी म्हणताच प्रसाद म्हणाला, " चला माझ्या सान्निध्यात राहून वाण नाही पण गुण लागला म्हणायचा तुला आई.” त्याला तिथेच थांबवत त्या म्हणाल्या, "नाही हो. अजिबातच असं नाही.. सध्या तू हरभऱ्याच्या झाडावर चाललायस तेव्हा ये खाली. नाहीतर काहीतरी विचित्र होऊन बसेल बरं!" आक्कांचे शब्द लगेच झेलत प्रसाद उद्गारला, “छे छे! काही होत नाही. जाऊदे! तुझ्याशी आणि त्या तुझ्या देवाशी कोण वाद घालणार. चल मी सोडतो तुला देवळात.” आक्कांनी मात्र नकार दिला, “नको रे बाबा! तू जा तुझा तुझा. मी नाथाला सांगितलं आहे गाडी काढायला. नाश्ता झाला की तू निघ आणि सावकाश जा. उगीच तुझी इच्छा नसताना माझ्याकडून पातक नको घडायला देवळात नेल्याचं..." असा प्रेमळ संवाद करून आक्का हसतच बाहेर पडल्या. देवळात सुंदर आणि मनाजोगं दर्शन झालं. त्यांनी बाप्पाला हात जोडून विनवणी केली, “बाप्पा आज काही ठीक वाटत नाही. काही घडणार आहे का? सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. मला काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला सुखरूप ठेव रे बाबा.” असं मागणं मागून अर्पण केलेला नैवैद्य गुरुजींना सांगून भाविकांमध्ये वाटायला सांगितला आणि त्यांनी परतीची वाट धरली.
इथे थोड्या वेळाने प्रसाद एका महिलेची अचानक आलेली सिझरची शस्त्रक्रिया करून मोकळा झाला. आल्यावर मोबाईल बघायला घ्यावा तर त्याच्या मोबाईल वर १० मिसकॉल होते नाथाच्या नंबरवरून. इतकं काय झालं असेल म्हणून फोन केला तर त्याला एकदम धक्काच बसला. तो मटकन खुर्चीत बसला. त्याच्या लाडक्या आईला म्हणजेच आक्कांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि नाथा त्यांना मंगेशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता इतकेच कळले त्याला. पुढे तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो लगोलग तिकडे धावला. त्याला अचानक आक्कांचे आजचे सकाळचे शब्द आठवले. सकाळीच आई म्हणत होती 'कसंतरी होतंय.' आपण तेव्हाच लक्ष द्यायला हवं होतं. तो लगेचच त्याच्या लाडक्या आणि जिवापेक्षा ही महत्वाच्या आक्कांना बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला कळलं की अजून डॉक्टरच आले नाहीत. तिथले जे डॉक्टर हार्ट सर्जन होते, डॉक्टर पाटील, तेच प्रसादचेही ओळखीचे होते आणि ते कालच अमेरिकेला गेलेत. तिथले असिस्टंट डॉक्टर बरेच प्रयत्न करत होते. पण आक्का म्हणाव्या तितक्या प्रतिसाद देत नव्हत्या. प्रसाद ला आता काय करावं ते सुचत नव्हतं. त्याने अजून ओळखीच्या एक-दोन डॉक्टर मित्रांना बोलावण्याचा प्रयत्न केला पण ते ही 'आऊट ऑफ टाऊन' होते. तो बराच वेळ हताश बसला होता. तिथेच समोर एक गणपती बाप्पाची सुरेख आखीव-रेखीव आणि लक्ष वेधून घेईल अशी सुबक मूर्ती होती. बाप्पाचे डोळे तर जणू प्रसादला जवळ येण्यासाठी खुणावतच होते. तो उठून तिकडे गेला. आणि त्याने नकळतपणे हात जोडले. “माझ्या वडिलांची तुझ्यावर खूप श्रध्दा.. आई तर कित्येक वर्ष न चुकता तुझं सगळं मनापासून करतेय. मी मानत नसलो म्हणून काय झालं, तू निदान तिच्यासाठी तरी काहीतरी कर. तुला जशी तुझी आई अत्यंत प्रिय आहे तशीच माझी आई माझा जीव की प्राण आहे. तिला काही झालं तर मला सहन होणार नाही. आई म्हणते ते आज कुठेतरी पटतंय मला. ती नेहमी म्हणते, देवाची लीला अगाध असते. बघ ना मी डॉक्टर असूनही आज तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि तिच्या उपचारासाठी पण इथे कुणी हजर नाही. हा तुझाच खेळ आहे ना? मला हरभऱ्याच्या झाडावरून खाली आणण्यासाठी हे सगळं करतोयस ना? मग नको बघू आता परीक्षा. मी आज तुझं सकारात्मक अस्तित्व मान्य करतो पण माझ्या आईला बरं कर. तिच्यावर उपचार होऊदेत आणि ती सुखरूप घरी येऊदेत.” अशी त्याने मनोमन देवाला प्रार्थना केली. आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि चमत्कार व्हावा तशी नर्स धावत आली. “पाटील डॉक्टरांच्या ओळखीचे हार्ट सर्जन मुंबईहून एका सेमिनार साठी आले होते ते इथे आले आहेत. आता ते तुमच्या आईवर उपचार करतील. हा फॉर्म तेवढा भरून द्या.” हे ऐकून प्रसाद खूप खुश झाला. मग भरभर सगळं घडत गेलं. आणि नंतर आठवड्याभराने आक्का घरी आल्या. प्रसाद त्यांची खूप मनापासून काळजी घेत होता. महिन्याभराने एका रविवारी सकाळी आक्कांनी बसून बसून यादी करायला घेतली. तेवढ्यात प्रसाद आला. “काय करतेस आई? नाश्ता झाला का?” त्यावर आक्का म्हणाल्या, “काही नाही रे. यादी करतेय. १५ दिवसांवर गणपती बाप्पा आले की. तयारी करायला हवी ना? दादाला बोलवायला हवं. तोच आणतो न आपल्याकडे बाप्पा. आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा पण तोच करतो.” असं म्हणाल्यावर लगेचच प्रसाद म्हणाला, “ मामाला येऊदेत नेहमीप्रमाणे. पण यावर्षीपासून दर वर्षी मीच आणणार बाप्पाला आणि मीच करणार प्राणप्रतिष्ठा. त्याला नको सांगू.” यावर आक्का चकित झाल्या. त्यावर मंद हसून प्रसाद म्हणाला, "एवढं काही तोंड उघडायची गरज नाही.आई, अगं बाबा गेले तेव्हा मला एवढं कळत नव्हतं. आणि तेव्हा तुझा खंबीर आधार होता मला. तुला काही होऊ शकतं हे मन मान्य करतच नव्हतं. आणि मी माझाच टेंभा मिरवत बसलो होतो. पण तू आणि बाबा काय सांगायचात ते तुझ्या आजारपणात मला पुरेपूर कळलं आहे. आपल्या आजूबाजूला खरंच एक सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असते. तिचा मान राखायलाच हवा. तिच्यापुढे नतमस्तक व्हायलाच हवं. शेवटी तो एक सिनेमातला हिरो म्हणतो ना ते खरं आहे. “अगर किसी चीज को बडी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है.” आणि कायनात म्हणजेच तुझा सॉरी! 'आपला' बाप्पा. हो ना?” असं म्हणून तो आक्कांना आनंदाने मिठी मारतो. त्यावर आक्का नुसतंच हो म्हणतात.. आणि त्याच्या केसातून हात फिरवत म्हणतात, “गुणी माझं बाळ ते. बाप्पाने शेवटी सद् बुध्दी दिली म्हणायची तुझ्यासारख्या नास्तिकाला..” असं म्हणून दोघे खो-खो हसतात आणि आक्का मनानेच बाप्पाला भावपूर्ण हात जोडतात आणि मनात म्हणतात,
ll तूच कर्ता आणि करविता,
शरण तुला भगवंता,
शरण तुला भगवंता ll

ll शुभम् भवतु ll
✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.

(पोस्ट शेअर करावयाची असल्यास कृपया नावासकट करावी ही विनंती..🙏🏻 फोटो गुगलवरून साभार😊)

श्री गणेश प्रतापश्री गणेश पुराण संमत उपासना खंडसर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल...
01/09/2025

श्री गणेश प्रताप
श्री गणेश पुराण संमत उपासना खंड
सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.

अध्याय १८
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वतै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

श्रीक्षेत्रपालाय नमः । जयजयाजी गजवदना । पूर्णब्रह्मा मनमोहना । भवभयगजारीपंचानना । निरंजना सुखाब्धे ॥१॥

तुझे स्मरलो चरणासी । तेणे संतोषलो मानसी । टाकोनिया भवभयासी । सदा सेवेसी सादर ॥२॥

टाकोनिया सकल आधी । आरंभिला हा ग्रंथोदधी । तूचि कर्ता याची सिद्धी । इतर बुद्धिमान कोण पै ॥३॥

श्रोते ऐका सावध आता । कौंडिण्य सांगे गणेशकथा । सादर ऐके त्याची वनिता । दूर्वामाहात्म्य कौतुके ॥४॥

मुनि म्हणे नितंबिनी । एके दिवसी नारदमुनी । गेला गणेशदर्शनालागुनी । आनंद मनी तयाच्या ॥५॥

गणेशे धरोनि नारदकर । आसनी बैसविला सादर । गणपतीस म्हणे ऋषीश्वर । कौतुक थोर सांगू आलो ॥६॥

भूलोकी जगविख्यात । मिथिलानगरी पुण्यवंत । जनकराजा राज्य करीत । शांतदांतउदार पै ॥७॥

यथेष्ट पुरवी याचककाम । अन्नदान करी उत्तम । महाधार्मिक तो परम । त्यासि उपमा नाही नाही ॥८॥

धर्मार्थ तो असंख्य धन । वेची परी नोहे न्यून । त्याचे पाहोनि महिमान । मी वचन बोलिलो तया ॥९॥

तुजला प्रसन्न गजवदन । तेणे तूते भाग्यधन । सदैव पुरवी भगवान । गजानन कृपाळू ॥१०॥

ऐसी ऐकता माझी भारती । ब्रह्मज्ञानवेत्ता भूपती । काय बोलला मजप्रती । ते गणपती ऐकावे ॥११॥

माझेच स्वरूपावाचोन । जगत्रयी नसे दुजे आन । कर्ता कारण मीच जाण । गर्वै करोन बोले असे ॥१२॥

मग मी बोललो तयासी । अरे कर्ता भगवान या जगासी । असोन गर्वै तू भुललासी । आता प्रत्ययासि पावशील ॥१३॥

ऐसे बोलोनि तयासी । सांगो पातलो तुजपाशी । मग पुसोनि हेरंबाशी । वैकुंठाशी मुनि गेला ॥१४॥

त्याचे सत्व अवलोकन । करावयासि निघे गजवदन । होवोनि वृद्ध ब्राह्मण दीन । कुश्चित काय तेधवा ॥१५॥

हातपाय गेले झडोन । रक्त गळे अंगातून । दुर्गंधी सुटली दारुण । मक्षिका वरी घोंगावती ॥१६॥

ऐसा येऊनि राजद्वारी । द्वाररक्षकांस म्हणे ते अवसरी । अतिथि पातलो तुमचे घरी । भूपतीसि वेगे सांगारे ॥१७॥

धावोनि जाती सेवकजन । अतिथि आला ब्राह्मण दीन । ऐसे सांगती जनका लागोन । ऐकोन राजा धावत ये ॥१८॥

करोनिया नमन तेवेळी । घेनि गेला पूजास्थळी । पूजन करोनि करतळी । तया जवळी बैसला ॥१९॥

काय इच्छा आहे स्वामी । येरू म्हणे मी अन्नकामी । मग नेवोनि पाकधामी । पात्र पुढे विस्तारिले ॥२०॥

वाढिली षड्‌रस अन्ने । जेविता कदा पुरे न म्हणे । सर्व खावोनि पक्वान्ने । मग हिर्वी धान्ये भक्षिली ॥२१॥

नाहीसे केले किंचित धान्य । मग वाढिली फळे वन्य । लोक म्हणती धन्यधन्य । राक्षस हा होय की ॥२२॥

अतृप्त बोले ब्राह्मण । नाही उदर भरले पुर्ण । राजा पाहे दीनवदन । सत्व याणे घेतले ॥२३॥

तेथून तसाच निघाला । एके द्विजाचे घरी पातला । तेथे दूर्वांकुरे तृप्त जाहला । मग उद्धरिला ब्राह्मण तो ॥२४॥

कौंडिण्य म्हणे सीमंतिनी । दूर्वामहात्म्य तुजलागुनी । सांगीतले प्राणप्रिया म्हणोनी । सत्य मानी राजसे ॥२५॥

दूर्वामहात्म्य ऐकता कानी । संशय न जोडी मानिनी । मग तिजलागी कौंडिण्यमुनी । एक दूर्वांकुर देतसे ॥२६॥

हा दूर्वांकुर घेवुनी । तुवा जावे इंद्रभुवनी । याचे भारंभार तयापासुने । सुवर्ण तुवा आणावे ॥२७॥

मग ती वंदोनि पतिचरण । प्रवेशली इंद्राचे भुवन । त्यासि देवोनि आशिर्वचन । पतिवचन निवेदी ॥२८॥

इंद्रे देवोनिया दूत सवे । म्हणे तुवा कुबेरमंदिरे जावे । तेथे दूर्वाभार सुवर्ण घ्यावे । मग जावे निजगृही ॥२९॥

तेथून निघाली आश्रया । आली वैश्रवणालया । धनाधीशे तुला आणोनिया । दुर्वांकुर ठेविला वरी ॥३०॥

आत घातले नवनिधी । परी पारडे न हाले कधी । मग मानोनिया अपूर्वविधी । म्हणे कधी न पाहिले असे ॥३१॥

मग आपले स्त्रियेची भूषणे । पारड्यात घातली वैश्रवणे । परी न ये दूर्वांकुर तुळणे । मनी म्हणे नवल जाहले ॥३२॥

इंद्रादि देवांची संपत्ती । मग आणोन पारड्यात घालिती । तव धावला कमलापती । तोही घाली निजभूषणे ॥३३॥

परी पारडे किंचित न हाले । मग सर्व देव ऋषीस शरण आले । म्हणती नेऊ दूर्वामहात्म्य भले । तूच जाणिले ऋषिवर्या ॥३४॥

मग तेणे पाचारिली प्रिया । आश्चर्य करी तेव्हा आश्रया । मनी म्हणे पतिवचनी अविश्वासोनिया । मी तो वाया श्रमी जाहले ॥३५॥

मी आहे महापापिणी । मग मस्तक ठेऊनिया पतिचरणी । म्हणे आता उद्धरावी आपली रमणी । क्षमा करोनि अपराध ॥३६॥

ऋषीने तिशी उचलोन । प्रेमे दीधले आलिंगन । म्हणे नित्य दूर्वा आणोन । गजवदन अर्चन करी ॥३७॥

गणेशदूत म्हणती ऋषीशी । दूर्वामहात्म्य कथिले तुम्हाशी । दूर्वायोगे खरवृषभांशी । चांडालिशी उद्धार तेणे ॥३८॥

करिता दूर्वांचे स्मरण । पातक दग्ध होय दारुण । चिंतामणी क्षेत्रमहिमा वर्णन । स्फुट केले यथामती ॥३९॥

गणेशोपासके दूर्वांकुर । आणोनि पूजावा लंबोदर । प्रमादे न करी जो नर । नरक घोर तयासी ॥४०॥

जो दूर्वांकुरे करी अर्चन । इतर त्याचे दर्शनेकरून । उद्धरताति पातकी जन । काय महिमान वर्णू आता ॥४१॥

ब्रह्मा म्हणे कृतवीर्य पित्याशी । चतुर्थीव्रत करिता त्वत्सुताशी । संतती होईल गा त्याशी । निश्चयेसी जाण पा ॥४२॥

शूरसेन राजा इंद्रासि पुसे । मग कृतवीर्ये केले कैसे । ते आता प्रसन्न मानसे । मज उल्हासे कथी का ॥४३॥

शक्र म्हणे नरवीरा । कृतवीर्य जनके निजकुमरा । स्वप्नी उपदेशिल या चरित्रा । दूर्वामाहात्म्यसमवेत ॥४४॥

संकष्टीव्रत महिमान । एक पुस्तकी करून लेखन । स्वप्नी दीधले पुत्रालागोन । म्हणे संतान होईल तुजसी ॥४५॥

जागृत होवोनि राजा वनी । शोकहर्ष करी मनी । सन्निध पाहे पुस्तकालागुनी । मग मनी आश्चर्य करी ॥४६॥

येऊनिया स्वनगरासी । पाचारोनि पंडितांसी । मग सोडोनिया पुस्तकासी । त्यातील अर्थासी श्रवण करी ॥४७॥

मग बोलाऊनि अत्रीशी । विध्युक्त करी व्रतग्रहणाशी । तेणे संतोष जाहला गणरायाशी । मग रायासी तुष्टला ॥४८॥

संकष्टचतुर्थी व्रतमहिमान । भृगू सांगे सोमकांतालागोन । ब्रह्मदेव करी कथन । पराशरनंदन श्रवण करी ॥४९॥

श्रोते श्रवण करा निश्चित । पुढे कार्तवीर्य जन्मेल सुत । जो विष्णुअंश वियात । पुण्यवंत सहस्त्रकर ॥५०॥

जयजयपुराणपुरुषा जगदीशा । परात्परा परेशा । माझी पूर्ण करी तू आशा । जन्मपाशा छेदोनिया ॥५१॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंडरसभरित । अष्टादशोध्याय गोड हा ॥५२॥

श्रीगजाननार्पणमस्तु । अध्याय ॥१८॥ ओव्या ॥५२॥

कार्तवीर्य ची कथा
अध्याय १९
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

श्रीक्षेत्रपालाय नमः । गणेशप्रसादे कृतवीर्यकांता । दोहदवती जाहली तत्वता । तेणे सुखे प्रसन्नता । राजगृही वाढली ॥१॥

राये मांडिला उत्साह थोर । नवमास भरता साचार । प्रसूत जाहली सुंदर । थोटा कुमार प्रसवली ॥२॥

स्कंदहीन चरणहीन । वाळबाकी सुलक्षण । चंद्रकलाजिद्वदन । नयन कमळासारिखे ॥३॥

ऐसा पुत्र अवलोकिता । शोक करी राजकांता । धरणीवरी फोडोनि माथा । शोकी वनिता बुडाली ॥४॥

म्हणे माझे जन्मांतरीचे पाप । ते हे पावले आपोआप । कैसा जाहला हा कुळदीपक । थोटा माझे प्रालब्धे ॥५॥

ऐकोन तिचे दीर्घरुदन । रडू लागले सकळजन । राजा आला धाऊन । तोही रुदन करू लागला ॥६॥

म्हणे कैसे विपरीत घडले । तपव्रत कैसे वाया गेले । कुलदैवत कैसे क्षोभले । असत्य जाहले विधिवाक्य ॥७॥

राजा कपाळ पिटोन करी । दीनस्वरे रुदन करी । तेथे मिळाल्या नगरनारी । हलकल्लोळ माजला ॥८॥

सचिव म्हणती रायासी । व्यर्थ कारे शोक करिसी । प्रारब्धाची गती जैसी । भोगणे तैसी विवेके ॥९॥

चांगला होईल तुझा कुमर । कृपा करील लंबोदर । जातकर्म संस्कार आता कर । धरी विचार सुजाणा ॥१०॥

ऐकोनि त्यांची बोधवचने । राजा विचार करोनिया मने । पुरोहित आणोनि समाधाने । मंगलस्नाने शुद्ध जाहला ॥११॥

लागला वाद्यांचा गजर । जातकर्म संपादिले समग्र । राये फोडोन भांडार । धन अपार वेचिले ॥१२॥

गोभूहिरण्यदाने । सुखी केली ब्राह्मणांची मने । सेवकजन धनेमाने । कृतवीर्याने गौरविले ॥१३॥

राये सोडिले बंदीजन । द्वादशवर्ष सोहळा जाण । कार्तवीर्य हे नामाभिधान । तयालागून ठेविले ॥१४॥

ऐसी लोटली द्वादशवर्ष । राये केला परामर्ष । पुत्र वाढविला विशेष । परी हर्ष रायासि नाही ॥१५॥

तव खंडली कर्माची गती । दत्तात्रेय पातला महामती । ज्याचे दर्शन या त्रिजगती । दुलर्भ जाणे सोमकांता ॥१६॥

ऐसा तो अत्रिनंदन । पाहता राजा जाय धाऊन । दंडवत करोनिया नमन । सिंहासन समर्पिले ॥१७॥

अर्पोनि षोडशोपचार । नमन करी वारंवार । म्हणे धन्यधन्य माझे पितर । दर्शने साचार धन्य जाहलो ॥१८॥

महत्पुण्य असेल गाठी । तरी चालवभर तुमची भेटी । तो मी हा चर्मदृष्टी । त्याते तुष्टी देतसा ॥१९॥

जरी होय प्रालब्धोदय । तरीच दृष्टी पडती पाय । कोण चिंतूनिया कार्य । मुनिराय जाहले येणे ॥२०॥

दत्तात्रेय म्हणे गा भूपती । ऐकोन तुझे पुत्राची कीर्ती । कौतुक पाहावया निश्चिती । आलो सुमती तव गृही ॥२१॥

मग राये तयेवेळा । पुत्र समारंभे आणविला । मग अत्रिनंदने पाहिला । खेद वाटला तयासी ॥२२॥

माता पदर पसरून । ऋषीपुढे करी रुदन । राजा विनवी कर जोडून । येव्हडा नंदन नीट करी ॥२३॥

ऐकोनि त्यांची करुणावचने । अत्रिनंदन द्रवला मने । कृपा करिता गजवदने । नीट नंदन होईल तुझा ॥२४॥

मंत्र एकाक्षर उपदेशिला । मस्तकी वरद कर ठेविला । दत्त तेव्हा अदृश्य जाहला । राजा गेल तपोवनी ॥२५॥

वायुभक्षण जितेंद्रिय । तप करी तेव्हा राय । तेणे तुष्टला महाकाय । गणराय धावला ॥२६॥

सहस्त्र सूर्याचे समतेजे । मस्तकी मुगुटप्रभा विराजे । वरी दूर्वावतंस साजे । चंद्र लाजे मुखी ज्याच्या ॥२७॥

परशांकुश शोभती हाती । मुक्तमाळा गळा रुळती । कटितटवेष्टित भोगीपती । शुंडा दंती मुरडली ॥२८॥

ऐसे पाहूनिया भूपती । महद्भय पावला चित्ती । ना भी म्हणे भक्तपती । मंगलमुर्ती मी असे ॥२९॥

पुरवावया तुझा हेत । मी पावलो एकदंत । ऐसे ऐकता नरनाथ । पदी दंडवत घाली तेव्हा ॥३०॥

करोनिया जयजयकार । नमन करी वारंवार । नयनी वाहे प्रेमे नीर । ह्रदयी गहिवर नावरे ॥३१॥

धन्यधन्य माझे नयन । आज पाहती गजानन । धन्य जाहले माझे जनन । मातापिता धन्य ते ॥३२॥

तू आदिपुरुष परमात्मा । कोण जाणे तुझा महिमा । ठाव नसे निगमागमा । पुरुषोत्तमा तुझा पै ॥३३॥

तूच जगी नानावेष । धरोनिया आकृति विशेष । भक्तपालन करिसी परमपुरुष । परम तोष त्वद्भक्ता ॥३४॥

ऐसी ऐकोनि परमस्तुती । संतोषला तो भक्तपती । वर माग म्हणे गणपती । ऐकोन भूपती संतोषला ॥३५॥

दर्शने पुरले मनोरथ । जगी प्रसन्न तू गणनाथ । तरी सांग होवो माझा सुत । गणनाथ तथास्तु म्हणे ॥३६॥

होऊनिया अणुमान । त्याचे ह्रदयी प्रवेशता गजवदन । सांग जाहला सहस्त्रार्जुन । सहस्त्र करी मंडित तो ॥३७॥

जैसा कनकाचळ । तैसा उठोनि बसला बाळ । पाहता आनंदले सकळ । जयजयकारे गर्जती ॥३८॥

देव वर्षती कुसुमभार । विष्णूअंश हा सहस्त्रार्जुन वीर । हो का विजयी निरंतर । आशीर्वाद निर्जर देती ॥३९॥

राये मांडिला महोत्सव । धनदाने गौरविले भूदेव । वस्त्राभरणे सेवक सर्व । गौरविले रायाने ॥४०॥

तुष्टता दीननाथ संकटहरण । मग तेथे काय पडेल उण । राजा परमानंद पावोन । वारणानन अर्चीतसे ॥४१॥

व्यास म्हणे गा विष्णुसुता । विमानासहित शक्र पडता । मग शुरसेन काय जाहला करिता । हे आता मज सांगे ॥४२॥

ऐकोनि म्हणे सावित्रीपती । चतुर्थीव्रतमहिमा ऐकोनि भूपती । पाचारोनिया सेवकांप्रती । त्यासि नरपती सांगतसे ॥४३॥

तुम्ही जाऊनिया नगरात । शोध करावा बहुत । कोणी संकष्टीचतुर्थीव्रत । करणार स्त्रीपुरुष शोधावे ॥४४॥

दूत सहस्त्रावधी नगरात । हिंडती तेव्हा शोध करीत । तव विमान अकस्मात । परम अद्भुत देखिले ॥४५॥

तेथे एक चांडाली । महा अमंगळ होती पडली । तिची पुण्यरेखा उदयास आली । कृपा केली गजवदने ॥४६॥

पाठविले दिव्य विमान । मग ती दिव्य देही होऊन । अवलंबिले तिणे दिव्य यान । राजदूत पाहून आश्चर्य करिती ॥४७॥

राजदूत म्हणती गणेशदूतांशी । काय चांडाळी आचरली पुण्याशी । तेणे ही गती पावली ऐशी । हे आम्हासि सांगावे ॥४८॥

बंगालदेशी सारंगधर नामाभिधान । क्षत्रिय होता सुलक्षण । पूर्वजन्मी त्याची ही कन्यारत्‍न । सुंदरी नाम इयेचे ॥४९॥

लावण्यसागरींची लहरी । सिंहकटी कृशशरीरी । देवांगना नागकुमरी । जीची सरी न पावती कदा ॥५०॥

जीचे कटाक्षावलोकने करून । योगी टाकिती जपध्यान । रंभातिलोत्तमा अधोवदन । लज्जायमान जीचे पुढे ॥५१॥

चित्रनामा क्षत्रियवर । त्यासि अर्पिली जनके सुंदर । परी ते स्वैरिणी करी दुराचार । सदा जार भोगीतसे ॥५२॥

वंचोनिया निजपती । जारकर्मी रत अहोराती । परमलावण्य पाहोन उपपती । सदा संगती तयासी ॥५३॥

रत्‍नजडित पर्यकावरी । घेवोनि जार ती सुंदरी । स्वेच्छ तेव्हा क्रीडा करी । मन मोही तयाचे ॥५४॥

तव पातला तिचा पती । तेणे धिःकारिली ती युवती । पापिणी तू जाराची संगती । करोनि प्रीती वागविसी ॥५५॥

तुझे न पाहावे गे वदन । बुडविले दोहो कुळालागून । ऐसे ऐकता त्याचे वचन । क्रोधायमान ती जाहली ॥५६॥

घेवोनिया शस्त्र प्रखर । त्याचे फोडिले तिणे उदर । रात्र जाहले दोन प्रहर । गेली जार भोगावया ॥५७॥

मग त्यासी स्वइच्छे रमली । राजदूती तेव्हा धरिली । राजासमीप उभी केली । मग विधिली राजाने ॥५८॥

येऊनिया यमदूत । तीते नेती वोढीत मारित । यमाज्ञे करोनि भोगवीत । नरक अद्भुत तियेकडूनी ॥५९॥

करोनिया अधोवदन । मांस तोडिती जेव्हा श्वान । तेव्हा पूर्वकर्म आठऊन । चित्ती म्हणे अहाहा ॥६०॥

सांडसाने मांस तोडिती । सवेच वृश्चिक दंश करविती । असिपत्रावरूनि हिंडविती । मग घालिती नरककुंडी ॥६१॥

ऐसी भोगवोनि महायातना । मग जाहली चांडाळ अंगना । दुर्भगा ती भ्यासुरवदना । अयोग्य दर्शनाकारणे ॥६२॥

करोनिया मदिरापान । निद्रा केली इणे अवघा दिन । रात्री जागृत होऊन । भिक्षे लागोन निघाली ॥६३॥

गेली गणेशभक्तांचे मंदिरी । त्याणी घातली माधोकरी । चंद्रोदयी भोजन करी । गणेश उच्चारी निजमुखे ॥६४॥

संकष्टिचतुर्थीचा दिवस । न कळोनि घडला तिला उपवास । तेणे तुष्टला जगनिवास । विमानास पाठविले तेणे ॥६५॥

ऐसे ऐकोन राजदूत । म्हणती इंद्र पडला विमानासहित । त्यासि चतुर्थीव्रत पुण्यप्राप्त । होता त्वरित जाईल तो ॥६६॥

ईते संकष्टीव्रत घडले । ते पुण्य इणे पाहिजे दीधले । देता होईल द्विगुणित भले । हे जाणा वहिले दूत हो ॥६७॥

उभय दूतांचा संवाद घडता । विमानी आरूढली ती दिव्यकांता । ते विमान ऊर्ध्वपंथे जाता । आले अवचिता शक्र जेथे ॥६८॥

तिचा लागता अंगवात । शक्रविमान निघाले त्वरित । शूरसेनास पुसोन पुरुहूत । निजभुवनात प्रवेशला ॥६९॥

शूरसेनराये व्रतग्रहण । करिता तुष्टला गजकर्ण । तेणे पाठविले विमान । तयालागोन आणावया ॥७०॥

येवोनिया गणेशदूत । करिती रायासि दंडवत । म्हणती तुजवरी तुष्टला एकदंत । तेणे त्वरित बोलाविले ॥७१॥

ऐकोनिया त्याची वाणी । राजा प्रेमाश्रु टाकी नयनी । म्हणे मजवरी कैवल्यदानी । कोण्या योगे हा तुष्टला ॥७२॥

ज्याचा वेदा न कळे पार । तो मज पाचारितो लंबोदर । याहून लाभ तो कोण थोर । जन्म साचार साफल्य माझा ॥७३॥

हे अवघे जन टाकोनी । मी एकला न बैसे विमानी । दूत म्हणती सर्वास घेउनी । त्वरित आता निघावे ॥७४॥

मग सकल नगरासमवेत । विमानी आरूढला नगरनाथ । विमान न चले ऊर्ध्वपंथ । पाहून दुश्चित्त दूत जाहले ॥७५॥

म्हणती आत आहे कुष्टी पापी । तेणे विमान न चले किमपी । हा धरणीतली नेऊन सोपी । तरीच विमान चालेल वरी ॥७६॥

राजा करोनि नमस्कार । दूतांसि विनवी जोडोनि कर । कोणे दोषे कुष्टी हा नर । अति पापतर जाहला ॥७७॥

दूत म्हणती ऐक भूभुज । गौडदेशी गौडनागर द्विज । शाकिनीनामे त्याची भाज । तेजःपुंज पतिव्रता ॥७८॥

तिचे उद्धरी जन्मांतरी । हा जन्मला दुराचारी । सावित्रीनामे याची नारी । रूपे दुसरी रंभा जैशी ॥७९॥

येणे करोनि तिचा त्याग । नरमोहिनी वेश्येचा धरिला संग । तिशी जाहला सदा दंग । अनंगरंग खेळे तिशी ॥८०॥

करोनि गृही दुष्ट हा चोरी । वस्त्राभरणे तिला शृंगारी । सदा उन्मत्त मद्यपान करी । दुराचारी दुरात्मा ॥८१॥

गृही न देखोनिया स्वसुत । याची माता रुदन करित । पिता होवोनि स्नेहभरित । जाय शोधित घरोघरी ॥८२॥

तव वेश्यागारी रममाण । पाहोनि पिता खिन्न जाण । म्हणे कैसा जन्मलासि कुठारपूर्ण । स्ववंशवन छेदावया ॥८३॥

ऐकोनिया पितृवचन । तो जाहला क्रोधायमान । पित्यासि म्हणे तू पापिष्ठपूर्ण । रती माझी विध्वंशिली ॥८४॥

म्हणोनि घेऊनिया टोणपा । तेणे मारिले आपल्या बापा । न मानोनीच किमपि पापा । पदी बांधोनि भिरकाविले ॥८५॥

करोनिया पितृहनन । पुन्हा करूनि मदिरापान । वेश्येसि क्रीडा करून । प्रातःकाळी आला घरी ॥८६॥

तव माता करी रुदन । तिणे पुत्र अवलोकून । म्हणे लेकरा तुझेविण । आम्ही दीन जाहलो ॥८७॥

पुत्रमोहे जाकळली माता । तिणे ह्रदयी धरिले सुता । पान्हा दाटला ह्रदयी व्यथा । म्हणे सुता प्राशन करे ॥८८॥

तुज धुंडावया कारणे । पिता गेला तुझा जाणे । त्याचा तुवा शोध लावणे । मग बा येणे घरासी ॥८९॥

ऐसे तिचे वचन श्रवण करून । शुष्ककाष्ठे मारिले तियेलागुन । मग रज्जूने पाय बांधून । दूर भिरकाऊन दीधली ॥९०॥

पुन्हा जाऊनि वेश्यासदनी । तिशी रमे निशिदिनी । मदिरा यथेच्छ प्राशुनी । निजसदनी पातला ॥९१॥

घरी होती तरुणी वनिता । तिणे पाहून याची अवस्था । म्हणे ऐका प्राणनाथा । वचन सर्वथा हे माझे ॥९२॥

मस्तक ठेवूनिया चरणी । स्फुंदस्फुंदोनि रडे तरुणी । म्हणे नका करू विपरीत करणी । टाकोनि रमणी निजगृही ॥९३॥

मी धर्मपत्‍नी नवयौवना । लावण्यलहरी सुभग ललना । टाकोनिया वेश्यासदना । काय मना प्रशस्त वाटे ॥९४॥

घरी सांडूनि सुंदरकलत्र । पराचे भोगिता उच्छिष्ठपात्र । नरकाचे साधन ते अपवित्र । नाही परत्रगती येणे ॥९५॥

लोक निदिती तुम्हास । तेणे लज्जा मज वाटे बहुवस । मी काय सांगावे आपणास । सद्विचारास मनी धरा ॥९६॥

अहोरात्र रमावे मजशी । तेणे कल्याण होय तुम्हाशी । मी अनुकूल आहे दासी । सदा सेवेशी सादर ॥९७॥

ऐसी ऐकता तिची वाणी । म्हणे तू उन्मत्त जाहलीस गे तरुणी । तुला आता टाकीन वधुनी । पापखाणी तू मोठी ॥९८॥

सावित्री म्हणे प्राणजीवना । पतिहस्ते पावता निधना । सुख भोगीन देवसदना । परी वेधना या न साहती ॥९९॥

मद्यपाने जाहला मस्त । तिची वेणी धरोनि त्वरित । आसडोनि पाडिली अकस्मात । मग मारित तयेते ॥१००॥

घालोनि तिचे मुखी बोळा । ठाईठाई झोडिली ती अबळा । पाषाणघाते तयेवेळा । मारिली बाळा चांडाळे ॥१॥

न लगता सोडिला तिणे प्राण । मग तिचे हातपाय बांधून । दूर टाकिली भिरकाऊन । आपण तेथोन निघाला ॥२॥

येवोनिया वेश्येपाशी । कौतुके सांगे वर्तमान तिशी । तुजकारणे वधोन सर्वांशी । निर्वेधपणे आता आलो ॥३॥

येरू करी मनी विचार । हा तो केवळ राक्षस क्रूर । यासि देता प्रत्युत्तर । करील संहार त्यांचेपरी ॥४॥

मग म्हणे भले केले । आता मजशी पाहिजे रमले । धरोनिया चरणकमले । प्रेम दाखवी वरी सदा ॥५॥

मद्यपाने दुराचारी । नित्य तिशी क्रीडा करी । मग कोणे एके अवसरी । ग्रामांतरी प्रवेशला ॥६॥

कालभिनामा एक ब्राह्मण । गेला स्नानसंध्याकारण । त्रिकालज्ञानी भगवत्परायण । त्याचे घरी संचरला ॥७॥

घरी एकटी त्याची तरुणी । तिची धरोनिया बळे वेणी । गेला एकांत स्थळी घेऊनी । म्हणे भामिनी नको नको ॥८॥

तिचे नायकता वचन । बळे केले नीवीमोचन । निःशंक करोनिया नग्न । मुखचुंबन घेतसे ॥९॥

करोनिया कुचमर्दन । बळे भोगिले तिजलागुन । मग ती होवोनि क्रोधायमान । शापवचन बोलली ॥११०॥

बळात्कारे परवनिता । भोगिली तुवा रे पापभरिता । कुष्टी होशील पावशील व्यथा । सुख सर्वथा न पाहसी ॥११॥

मग भयभीत होऊन । तेथोन करी पलायन । मग पुढे पावला निधन । यमसदन पावला ॥१२॥

तेथे भोगविली यमे यातना । पुढे जन्मला हा शूरसेना । याचे कदा न पाहवे वदना । सांडसुमना होवोनिया ते ॥१३॥

राजा म्हणे दूतांशी । कैसा टाकू मी पतिताशी । तुम्ही सांगा उपाय याशी । जेणे पातकाशी खंडेल ॥१४॥

दृढ धरोनिया त्याचे चरण । राजा विनवी तयालागुन । आता तुम्ही कृपा करून । या लागोन उद्धरावे ॥१५॥

दूत म्हणती सोडी पाय । आता सांगतो यासि उपाय । कृपा करील गणराय । तरीच सोय होईल याची ॥१६॥

या अधमास अधिकार । दुसरा नाही साचार । विनायक हे नाम थोर । कर्णरंध्रे परिसवी ॥१७॥

नामे न जळे पातक । ऐसे नाही नरनायक । मग तयाचे कर्णी अलोलिक । त्रिवार नाम ऐकविले ॥१८॥

तेणे पातकाच्या कोटी । पळोन गेल्या उठाउठी । नाम श्रवण केलियापाठी । देहयष्टी शुद्ध जाहली ॥१९॥

मग चालले विमान । न कळे नामाचे महिमान । गेले गणलोकालागुन । जाहले दर्शन प्रभूचे ॥१२०॥

संकष्टिचतुर्थीमहिमान । व्यास कथिले तुजलागून । वर्णिता भागेल सहस्त्रवदन । काही कथन म्या केले ॥२१॥

जो चतुर्थीव्रत सांग पाळी । त्याचे पातकाची होऊनि होळी । विनायक उभा त्याचे जवळी । कदा काळी विसंबेना ॥२२॥

श्रोते परिसा सावधान । पुढे सहस्त्रार्जुनाख्यान । विनायक हा आवडीन । करील कथन गणेशकथा ॥२३॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । एकुणिसावाध्याय गोड हा ॥१२४॥

श्रीगजाननार्पणमस्तु ॥ अध्याय १९ ॥ ओव्या ॥१२४॥

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक     ॥वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ॥      ॥निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा॥अष...
01/09/2025

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

॥वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ॥
॥निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा॥

अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.
श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा :
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्यांने अनेक दैत्यांचा संहार केला. श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर : या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. मुख्य मंदिरा शेजारी एक ५३ फुट बाय ५१ फुट लांब व ७ फुट उंचीचे सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मध्ये कोठेही खांब नाही. कडेला फक्त ६ खांब आहेत
या मूर्ती इतर अष्टविनायकां प्रमाणे आखीव रेखीव नाही.
या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.
पूजा आणि उत्सव :
दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.
जाण्याचा मार्ग :
पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरजवळ हे देऊळ आहे. पुण्यापासून अंदाजे ९६ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.
जवळची इतर दर्शनीय स्थळे :
छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला. अंतर ६.२ किमी ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यस्वामी यांची समाधी. अंतर १७ किमी‌कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर. अंतर ८.६ किमी
माळशेज घाटातील अभयारण्य. अंतर २८ किमी ऐतिहासिक नाणेघाट. अंतर ३३ किमी

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9503209484

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दत्त माझा । मी दत्ताचा ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दत्त माझा । मी दत्ताचा ।।:

Share