Coffee House Publications

Coffee House Publications A Publication House

नवीन पुस्तक - क्रूसेडचा इतिहास.हे नवीन पुस्तक आपल्या हाती देण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये सध्...
28/11/2024

नवीन पुस्तक - क्रूसेडचा इतिहास.
हे नवीन पुस्तक आपल्या हाती देण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये सध्या जे काही चालले आहे त्याच्या पार्श्र्वभूमीवर हे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे...तुर्कांनी १०७१ मध्ये जेरुसलेम काबीज केले. सुरुवातीला त्यांनी या यात्रांमध्ये फारशी ढवळाढवळ केली नाही, कारण त्यांना यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडायचे नव्हते. शिवाय अतसिझ आणि आर्तुक हे दोन तुलनेने सभ्य राजे होते. फारसे धर्मवेडे नव्हते. दुर्दैवाने फातिमिड घराण्याच्या पाडावानंतर अनेक छोटी छोटी संस्थाने उदयास आली ज्यांच्यात करातील हिश्यासाठी चकमकी सुरू झाल्या. थोड्या थोड्या अंतरावर आता जकात नाकी दिसू लागली. तुर्कांमुळे ख्रिश्चन यात्रेकरूंवर मोठे संकट कोसळले. असंख्य धर्मगुरूंना हद्दपार करण्यात आले. गावेच्या गावे ओस पडली, पुल कोसळले, विहिरी आटल्या किंवा बुजवण्यात आल्या. याच वातावरणात फ्लँडर्सच्या रॉबर्ट - १ या काऊंटने १०८९ मध्ये जेरुसलेमची यात्रा केली, पण बहुतेक यात्रेकरूंचा अपमान करून तुर्कांनी त्यांना परत पाठवले.
जे हजारो यात्री एशियामधे जात होते, दुर्दैवाने त्यातील काहीच परत येत होते. पण ते येताना युरोपमधील प्रांतांतून येत आणि त्यांनी भोगलेल्या छळांच्या रक्तरंजित कहाण्या स्थानिकांना ऐकवत. पवित्र जेरूसलेमच्या कहाण्या ऐकायला त्यांना चांगला श्रोतृवर्ग मिळे व छळाच्या या कहाण्या युरोपमध्ये दूरदूरवर पसरत. त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्यावर व जेरूसलेममधील त्यांच्या धर्मबांधवावर होणारे अत्याचार यांच्या कहाण्या अशा रितीने युरोपभर पसरल्या व तुर्कांविरुद्ध सूडाची आग धगधगू लागली. वर्षामागून वर्षे उलटली आणि ही आग भडकतच गेली. एक काळ असा आला की या आगीत काय जळणार हा प्रश्न उभा राहिला. या मुसलमानांचे काय करायचे हा प्रश्न विचारला जाऊ लागला. क्रुसेडने त्याचे उत्तर दिले...
काय उत्तर दिले हे कळण्यासाठी मी लिहिलेले ‘‘क्रूसेडचा इतिहास’’ हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. मला वाटते क्रूसेडवर मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे.. (खात्री नाही)
किंमत खालीलप्रमाणे -
नाव : क्रूसेडचा इतिहास
किंमत रु. ४००
२० डिसेंबरनंतर पुस्तके पाठवण्यात येतील.
सवलत : २०% व घरपोच.
कृपया रु ३२१ + 00 पोस्टेज + १ = रु ३२१ एवढे पैसे मला जीपे करावेत.
कृपया ३२२ किंवा ३२० पाठवू नयेत. ३२१ आले म्हणजे ते क्रूसेडसाठी आले आहेत हे लगेच समजते म्हणून हा खटाटोप.
ज्यांनी पूर्वी कुठलेतरी पुस्तक घेतले असेल, तर त्यांचा पत्ता माझ्याकडे आहे, पण बदलला असेल तर जरूर परत पाठवावा. (किंवा परत पाठवला तरी चालेल.)
जीपेसाठी टेलीफोन क्रमांक : ९८२३२३०३९४
स्कॅनसाठी क्यूआर कोड खाली दिला आहे.

26/10/2024

तरपत हूं जैसे जलबिन मीन... भाग - ३ (शेवटचा)
..त्यांना तसेच तेथे टाकून मी गाडीकडे पळालो, गाडी सुरू करून ते पडले होते तेथे आणले, डावीकडचा दरवाजा उघडून त्यांना कसेबसे आत टाकले. माझी जागा घेतली आणि स्टार्टर मारला.... पुढे काय... जायचे कोठे.. काय करावे काही सुचेना. नशीब माझे, म्हातार्‍याने डोळे उघडले. हे सगळे अंगलट तर येणार नाही ना असा एक स्वार्थी विचारही मनात येऊन गेला पण मनात ते स्वर गुंजत होते... म्हटलं चला काय होईल ते होईल, हे प्रकरण तडीस नेऊया.

गाडी तशीच पुढे दामटली. जरा वारा लागल्यावर आमच्या दोघांचीही धुंदी जरा उतरली.
“काका, कुठे सोडू तुम्हाला ? बघा पहाटेचे ४ वाजले. पटकन सांगा मलाही घरी जायचे आहे.”
“इथेच सोड मला मी जाईन चालत”
“नको ! त्यापेक्षा पटकन सांगा” मी वैतागून म्हणालो.
“लातूर रोड...” मी तिकडे गाडी वळवली. गावाबहेर ५/६ मैल आल्यावर एकदम त्या ओसाड जमिनीवर, जेथे एकही झाड आत्तापर्यंत दिसले नव्हते, तेथे एक झाडांचे बेट दिसले. आजुबाजुला एकही घर नव्हते. मी त्यांना उठवत म्हणालो “काका उठा जरा बघा..येथे तर काहीही दिसत नाही. चुकलो तर नाही आपण ?”
त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि एकदम म्हणाले “ अरे थांब! अरे थांब येथेच राहतो मी !”
“इथे ? विश्वास न बसून मी विचारले.
“हो इथच रे बाबा इथच ! दिसत नाय का तुला ?” त्यांनी जवळजवळ जमिनीवर सपाट झालेल्या दगडांच्या ढिगांकडे बोट दाखवले.
“येतोस का आत ? थोडी आहे शिल्लक अजून..”
“नको आता जातो. उशीर झाला.”
“अरे ये ! नाय म्हणू नको. चल तुला अशी गोष्ट दावतो की तू इथेच गटांगळ्या खाशील. ”
मी चमकून त्यांच्याकडे बघितले ’हा हा ते गाण्यात गटांगळ्या म्हणत असावेत’ मी मनाशी म्हणालो.
“ बर चला पण आता ड्रिंक्स नाही. कबूल ?”
“बर राहिलं चल तर खरं !”
त्यांच्या हाताला धरून मी त्यांना घेऊन जायला लागलो तर म्हातार्‍याने माझा हात झटकला. चायला स्वत:च्या गल्लीत आल्यावर....

समोर बघितले तर त्या भल्या मोठ्या वाड्याचा वरचा सगळा भाग पडून गेला होता आणि तळघरात जायचा दरवाजा जोत्याच्या थोडासा वर आला होता. अच्छा म्हणून मगाशी काही दिसले नव्हते तर. त्या नक्षिकाम असलेल्या दरवाजाला ना होते कुलप ना कडी. सागवानी असणार तो. मोठ्या कष्टाने त्यांनी तो ढकलला आणि भयपटात दाखवतात तसा आवाज करत तो उघडत जाऊन भिंतीवर आपटला. त्याबरोबर तो आवाज घुमला आणि मी दचकलो.

“ये ये आत ये !” त्यांच्या मागे जात मी ते तळघर न्याहाळू लागलो. जमिनीवर सगळीकडे दगड,खडी पसरली होती. छतात मोठमोठ्या भेगापडून त्यातून माती मिश्रीत चूना गळत होता. भिंतीवर असलेल्या ओलीचा कुबटवास सगळीकडे पसरला होता. हा म्हातारा एकटा येथे रहात असेल तर कठीण आहे.एका छताला असलेल्या कवाडातून पहाटेचा कोवळा प्रकाश आत झिरपत होता आणि त्याच्या तिरप्या किरणांमधे धुळीचे असंख्य कण आत बाहेर करत होते. तेवढीच काय ती हालचाल होती त्या तेथे. मी त्यांच्या मागे जात कशाला तरी आडखळलो, बघतो तर एका पिआनोचा पाय होता तो. त्या पिआनोची अवस्थाही अशी झाली होती की एखादी शुल्लक पेटी असावी. तेवढ्यात डावीकडे असलेल्या दरवाजाची कडी काढल्याचा आवाज झाला आणि आम्ही एक मोठ्या खोलीत प्रवेश केला. येथेही धुळीचे साम्राज्य होतेच पण येथे जरा वावर दिसत होता. आता किती वेळ जाणार आहे कोणास ठाउक असे मी मनाशी म्हणणार तेवढ्यात त्यांनी त्या पलंगापाशी जमिनीवर बसकण मारली आणि ते पलंगाखाली असलेल्या वस्तूशी झटापट करू लागले. त्यांना मदत करायला मी उठणार तेवढ्यात ते ओरडले “जपून खाली बघ...पाय देशील.” मी बघितले तर एक लाकडाची सुंदर नक्षिकाम केलेली पेटी तेथे पडलेली. एखादे किमती वाद्य असणार तेथे.

आजोबांनी पलंगा काढून एक मोठी पेटी बाहेर ओढायचा प्रयत्न चालवला होता अर्थात त्यांना एकट्याला ते शक्यच नव्हते. शेवटी ती जड पेटी मी बाहेर काढली. हाशहुश करत ते म्हणाले
“हा ! उघड ती आता.”
मी ती उघडली आणि बघितले तर माझी छातीच दडपली. एवढ्या संख्येने काळ्या तबकड्या मी तरी पाहिल्या नव्हत्या. वरचीच मी घेतली कोलंबियाची अमीरखाँसाहेबांची...
“मग बरं झाल का नाय आत आलास ते !” आजोबा विचारत होते.
मी भानावर येत म्हणालो “ काका मी निघतो आता. उद्या संध्याकाळी येतो मग गप्पा मारू”
“ये ! ये ! पण....” कसे सांगावे ते त्यांच्या लक्षात येईना.
“आलं लक्षात. त्याची काळजी करू नका” मी म्हणालो आणि उठलो, त्यांचा निरोप घेऊन पळतच गाडी गाठली आणि घर गाठले.

उठलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते.
१ जानेवारीला तसेच काही काम होत नाही. मी कामाला गेलो पण कामात लक्षच नव्हते. डोळ्यासमोर सारखे त्या तबकड्या आणि तो वाडा येत होता. कशीबशी चार पर्यंत कळ काढली आणि लातूर रोड पकडला. जाताना व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणि सोड्याच्या सहा बाटल्या घेतल्या आणि ते झाडांचे बेट गाठले. धाकधूक होती, म्हातारबा भेटतोय की नाही. पण नाही बाहेरच एका झाडाखाली परवाचाच फाटका, ठिकठिकाणी उसवलेला सूट घालून झोपले होते. बहुतेक त्यांच्याकडे घालण्यासारखे हेच कपडे असावेत. उठवावे का यांना का झोपू द्यावे काय करावे समजत नव्हते. अखेरीस धीर करून त्यांच्या खांद्याला स्पर्ष केला. त्यांनी हळूच डोळे उघडले व मला ओळखून त्यांनी स्मित केले.
“चला...” माझा आधार घेत ते म्हणाले.
खोलीत गेल्यावर बघितले तर ती पेटी तशीच उघडी पडली होती. वाद्याच्या पेटीतून एक सुंदर सारंगी डोकावत होती आणि शेजारी भेळेचे कागद पडले होते. ते सगळं साफ करत मी म्हणालो “हं सांगा कुठे बसायचे ?”
“इथेच आणि कुठे ? त्या कपाटात भोंगा आहे बघ तो काढ. त्याच्या सुयाही असतील त्याही काढ. तुला काय ऐकायचे आहे ?”
“काका मला सांगा ही सारंगी कोण वाजवत होतं ?”
“मीच दुसरे कोण......
“मग आज आपण जमेल तेवढी सारंगीच ऐकू”
“ही सारंगी साधी सुधी नाही माझ्या वडिलांना खाँसाहेबांनी बक्षीस दिली आहे. बघ केवढीशी आहे ती. पण गळ्याशी हीच गळा लावते बघ.....”
१ जानेवारीला संध्याकाळी जी मैफिल आम्ही जमवली तशी मी माझ्या आयुष्यात कधीही जमविली नव्हती आणि जमवीन असे वाटत नाही. म्हातार्‍याने सारंगी कशी ऐकायची हे शिकवले त्या दिवशी. अर्थात एक व्हिस्कीची बाटली संपली आणि रात्रीचे दोन वाजले.
उद्या परत यायचे ठरवून त्यांचा निरोप घेणार तेवढ्यात ते म्हणाले “ ती दुसरी बाटली घेऊन जा, उद्या परत आण.”
“उद्या आपण रेकॉर्डस ऐकू” मी म्हटले.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नेहमीचे सामान व खाण्याचे चांगले पदार्थ घेऊन मी आपला परत बेटावर हजर. आजचा दिवस तर कधीही न विसरता येण्यासारखा. ऐकावे तेवढे अचाट... रात्रीचे २ वाजल्यावर मी म्हटले “काका तरपत हूं जैसे जलबीन मीन” म्हणाना.
“नको ते नको. ते तू ऐकले आहेस. हे ऐक ! हे मला एका भिकार्‍याने शिकवले” असे म्हणून त्यांनी त्यांच्या कापत्या आवाजात एक साधे गाणे म्हणून दाखवले.

देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...
देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...

आजवरी कधीना मनी वैर कुणाचे धरिले
परी त्याचे विपरीत हे फल का रे दिधियले
देवा देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...

गाणे म्हणताना आमच्या डोळ्यातून केव्हा पाणी वहायला लागले तेच कळले नाही. हे सगळे झाल्यावर माझ्या हातून एक फार मोठी चूक झाली.. घोडचूक म्हणायला हवी.... न राहवून मी एकदम म्हणालो
“काका तुमच्यानंतर हा ठेवा मला द्याल का ?”
झाले म्हातारा बिथरला आणि माझ्या अंगावर धावून आला. हातातला ग्लास, बाटली काय हाती लागेल ते त्याने भिरकावयला चालू केले. चायला मरायचा हा ! नसती भानगड व्हायची म्हणून मी तेथून पळालो. दरवाजात मला गाठून तो ओरडला “ याद राख इथे परत आलास तर. पोलीसात कंप्लेंट करेन. तंगड्या तोडीन तुझ्या.”

त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन मी गाडी गाठली आणि स्वत:च्या हावरटपणाला शिव्या घालत गाडी स्टार्ट केली.

आठवडा झाला या प्रसंगाला. जावे का नको, जावे का नको असा विचार करत मी संध्याकाळी बेटावर पोहोचलो. सगळीकडे अंधार पसरला होता. माझा काही धीर झाला नाही आत जायचा. तसाच परत आलो. नंतर कामानिमीत्त पुण्याला गेलो तो दोन आठवड्याने परतलो. ताराबाई अजून आल्या नव्हत्या त्यामुळे परिवारवर गेलो. रात्री बाहेर पडलो तर एक मित्र म्हणाला” अरे यार चल तुला एक गाणे ऐकवतो” थोडे दूर चालत गेलो तर एका खांबापाशी हा म्हातारा भीक मागत होता. त्याच्या हातात १० रुपायाची नोट कोंबत आम्ही परतलो. मला त्याच्याकडे जायचे होते पण त्याच्या प्रकृतीला आणि पोलिसाच्या धमकीला मी घाबरलो. हळू हळू ही मनाला लागलेली बोच मागे पडायला लागली आणि शेवटी निर्ढवलेल्या मनाने मी माझ्या वागणुकीचे समर्थनही करायला लागलो. पण त्या नंतर एक असा प्रसंग घडला की मी आयुष्यभर स्वत:ला कधीच माफ करू शकलो नाही...

फेब्रूवारीच्या शेवटाला अखेरीस ताराबाई आल्या आणि आमचा आरामदायी जिवनक्रम परत चालू झाला. एकदा अशाच संध्याकाळच्या पार्टीत गाणी म्हणायचा कार्यक्रम चालला होता. मला आग्रह झाल्यावर माझ्या तोंडून तान बाहेर पडली देऽऽऽऽऽवा बाळ मी तुझे नाऽऽऽऽ तू रे कसाई नाही ना.....त्या दिवशी माझा आवाजही चांगला तापला होता.... तेवढ्यात मित्र काहीतरी खुणेने सांगतोय हे माझ्या लक्षात आले. मी गाणे थांबवून बघितले तर ताराबाईंनी हातातल्या ताटासहीत खाली बसकण मारली होती आणि त्या चक्क ढसाढसा रडत होत्या. आम्ही सगळेजण त्यांच्या भोवती जमा झालो. कोणी पाणी आणले कोणी साखर आणली..... सावरल्यावर ताराबाईंनी विचारले “ साहेब हे गाणे कुठे ऐकले तुम्ही ?”
“का हो ? तुम्हाला माहिती आहे का हे गाणे ?”
“माझ्या सासर्‍यांची रेकॉर्ड आहे ती. मी जाते आता, उद्या येते.” असे म्हणून त्या तडकाफडकी निघून गेल्या.
आमचाही मुड गेलाच होता. पार्टी आवरती घेत सगळ्यांनी पळ काढला आणि मीही बिछान्याला पाठ टेकवली.

दुसर्‍या दिवशी सकाळी ताराबाईंनी आल्या आल्या माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली...

“वाट बघितली. बाळा, म्हातार्‍याला जरा समजून घेतले असतेस तर बरं झालं असतं. जे काही संगीत आहे ते तुला दिले आहे. जपून ठेव.

सरदार साळूंके”.

मला रडताही येईना. घुसमट म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळाले.
मी प्रश्नार्थक नजरेन ताराबाईंकडे बघितले.
“चला साहेब आपल्याला ते सामान गोळा करायला जायला पाहिजे आता.”
“अहो पण झाले तरी काय ? मी विचारले.
“काय होणार दारूपायी... गेला तो उमदा माणूस...” मरायच्या अगोदर आम्ही घरी आणला होता. पांढर्‍या फियाटवाल्या साहेबाला हे सगळे द्यायचे वचन घेतले आहे त्याने आमच्याकडून. आता मला वो काय माहीत तुम्हीच ते नाहीतर त्यांची गाठ घालून दिली असती.”

खाली मान घालून त्या तळघरात शिरलो आणि सगळे सामान गोळा केले.

आजही माझ्याकडे पुण्यात माझ्या बंगल्यात ती सारंगी, त्या तबकड्या, तो भोंगा, तो मोडका पियानो... आणि स्कॉचची माझी बाटली जी ताराबाईंनी त्यांच्या सासर्‍याला दिली होती या वस्तू मी जपून ठेवल्या आहेत. बायको अनेक वेळा म्हणाली “फेकून द्या हो ही बाटली”.

शेवटी मी शांतपणे ती उचलली आणि माझ्या ऑफिसमधे नेऊन ठेवली.

समाप्त.

- जयंत कुलकर्णी.
ही कथा काल्पनिक आहे.

25/10/2024

तरपत हूं जैसे जलबिन मीन... भाग - २
..ताराबाईंनी घराचा ताबा घेतला आणि माझ्या घराचे स्वरूपच बदलून गेले. गाडगीळ काका दुसर्‍या आठवड्यात आले तेव्हा ते तर जाम खूष.
“अरे एवढे पैसे कशाला देतो तिला ? तुम्हा मुलांना ना पैशाची किंमतच नाही.” ते ओरडले.

पण ताराबाईंमुळे माझे कशाला, आमच्या सगळ्यांचे पारिजातचे बिल कमी झाले होते. त्या हल्लीच्या भाषेत एक चांगल्या “शेफ” होत्या. मटण-भाकरी खावी तर त्यांच्याच हातची असे माझे सगळे मित्र म्हणू लागले. थोड्याच दिवसात सगळ्यांच्या घरी ताराबाईंची ओळख झाली. ताराबाईंना आम्ही माझ्या घरी दारू प्यायचो त्याचेही काही वाटत नसे. उलट त्यांनीच एक दिवस मला पेग मेजर आणायला सांगितल्यावर मी उडालोच.

“ते बर असतया ! कमी पिली जातेया !” ताराबाई म्हणाल्या.

असे एकंदरीत सगळे छान चालले होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती मात्र मला खटकली पण मी तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. माझ्या महागड्या दारुच्या बाटलीत जी काही दारू उरायची त्याचा मात्र मला कधीही पत्ता लागला नाही..... काय फरक पडत होता म्हणा.....

अशाच अजून एका प्रसंगात माझी दांडी गूल झाली. एका कंपनीच्या पाटील नावाच्या साहेबांना घरी जेवायला बोलावले असताना त्यांनी नंतर एक हसत इंग्रजीमधे कॉमेंट टाकली “ मजा आहे बुवा तुमची सावंत” ते ज्या प्रकारे ते म्हटले ते वास्तविक मला आवडले नव्हते, पण त्यांना ओळखत असल्यामुळे ते गंमत करत असावेत हे गृहीत धरून मी काही त्यांना प्रत्युत्तर केले नाही. पण ताराबाईंनी मात्र सगळे गेल्यावर माझ्याकडे निषेध नोंदवला.
“ताराबाई तुम्हाला इंग्रजी येते ? मी विचारले.
“जावदेत सांगन मी तुमाला कधीतरी”... ताराबाई म्हणाल्या.

ताराबाईंवर विसंबून आम्ही सगळ्यांनी इयरएंडची पार्टी माझ्याच घरी ठरवली. त्यांनीही आनंदाने होकार दिला...आता त्या आम्हाला सगळ्यांनाच चांगले ओळखत होत्या. ३१ डिसेंबरला सकाळी उठलो तर उशाशी एक चिठ्ठी. गाडगीळ काकांची.

उमेश अ.आ.
ताराबाई काही महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी त्यांच्या गावाला गेल्या आहेत. त्या कधी येऊ शकतील हे सांगता येत नाही पण आल्यावर परत कामावर येतील.
काका. (गाडगीळ)

नांदेडमधे माझ्या ओळखीचे हे एकच वयस्कर गृहस्त होते तरी पण ते कंसात गाडगीळ असे का लिहित असत हे मला न उलगडणारे कोडे आहे.

आता आली का पंचाईत. संध्याकाळची पार्टी तर करणे क्रमप्राप्त होते. मग काय शेवटी आसरा पारिजातचा. त्या दिवशी पार्टी झाली. दारूकाम भरपूर झाले त्यामुळे जेवणाची कोणालाच शुद्ध नव्हतीच. रात्री कसले, पहाटे ३ वाजता आम्ही सगळे भेलकांडत बाहेर पडलो. एवढा उशीर कधीच झाला नव्हता पण ३१ डिसेंबर-सगळे गुन्हे माफ ! एक एक करत सगळे एकामेकांचा निरोप घेत पांगले. मी ही माझ्या गाडीकडे बोटात किल्ली फिरवत निघालो. खोटे बोलण्यात अर्थ नाही, आजच्या जमान्यात तुरुंगातच जायला लागले असते अशी अवस्था होती. गाडीपाशी आलो, टपावर पडलेल्या पारिजातकाची फुले गोळा केली आणि वळसा घालून गाडीच्या दरवाजापाशी आलो आणि थबकलो. चायला हे काय... डोळे चोळत बघितले तर एक जख्ख म्हातारा माझ्या दरवाजाला टेकून बसला होता. त्याचीही अवस्था माझ्या सारखीच होती. शेजारीच अर्धवट भरलेली बाटली पडली होती...स्कॉचची...

माझे तर डोकेच चालेना. हा रस्त्यावरचा फाटका म्हातारा सिंगल माल्ट व्हिस्की चढेपर्यंत पितोय आणि रस्त्यावर पडलाय.... काय गडबड आहे.. काही कळेना.
त्याला काय हाका मारावी हे न उमजून मी त्याच्यावर जवळजवळ ओरडलोच.
“ओ ! उठा ! मला जायचय.”
हूं नाही का चू नाही.
“उठता का जरा, काका मला जायचेय !”
काका हा शब्द ऐकताच त्याची जरा चुळबुळ झाली. सगळे दारुडे दारू प्यायल्यावर प्रेमाला बळी पडतात हेच खरे. दोनतीन वेळा हेच संभाषण वेगवेगळ्या तीव्रतेने झाल्यावर आजोबांनी डोळे उघडले आणि त्यांनी मोठ्या कष्टाने इकडे तिकडे बघितले.
“सॉरी हं बाळा ! जरा जास्तच झाली आज. साठवून ठेवली होती आजच्या दिवसासाठी ही दारू ! उठतो मी !”
असे म्हणून त्यांनी उठायचा प्रयत्न केला. त्या धडपडीत त्यांचे डोके माझ्या गाडीवर आपटले आणि मी वेड्यासारखा गाडीला काही झाले का हे बघायला धावलो. तेवढ्यात त्या म्हातार्‍याने हेलपाटत चालायला सुरवातही केली होती. मीही हताशपणे त्याच्याकडे बघत खिशातून सिगारेटचे पाकीट काढले आणि एक सिगारेट पेटवली व त्याच्याकडे बघू लागलो. माझीही अवस्था फार वेगळी नव्हती म्हणा....तेवढ्यात मी जे ऐकले त्याने माझी दारूची धुंदी खरर्कन उतरली. पहाटेचा मंद गार वारा सुटला होता, रस्त्यावर मिणमिणते दिवे आपला कीव येणारा प्रकाश रस्त्यावर कसाबसा फेकत होते. माझी पांढरीशूभ्र गाडी त्यात जास्तच उठून दिसत होती आणि त्याला टेकून सिगरेट ओढणारी माझी तोल सावरणारी आकृती व तिची सावली, खाली पडलेली फुले....आणि....दहा फुटावर एका हातात दारूची बाटली घेत, धडपडत चालणारा, एक दारूडा.... रस्त्यावर चिटपाखरू नाही आणि त्या निरव शांततेत त्याच्या तोंडातून तडपत येणारी ती ललीतची चीज......तरपत हूं जैसे जलबिन मीन....फैयाज खॉसाहेब...

त्यांच्या तोंडातून ते गाणे येणे माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते. नकळत माझ्या मनात “तो म्हातारा” चे “ते आजोबा” झाले. मी पटकन पुढे झालो आणि त्यांना सावरले. त्यांच्या आवाजात कंप जरूर होता पण स्वरात जादू होती. मला क्षणात जाणवले ते म्हणजे गाणे आणि सूर ह्रदयातून येत होते. नुसते टेक्निकल गाणे नव्हते ते...मी त्यांना सावरल्यावर मी सहजच तीच तान गुणगुणलो. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले आणि म्हणाले...अरे व्वा ! छान...गाण्याची आवड हाय वाटतं”
“हो काका आणि तुम्हीही चांगले गाता”.
“हंऽऽऽऽऽऽ“ त्यांनी एक सुस्कारा सोडला. “एक सिगारेट देतोस का ?”
मी तत्परतेने एक सिगारेट काढून त्यांच्या ओठात ठेवली आणि ती पेटवत नैसर्गिकपणे विचारले “गोल्ड फ्लेक आहे चालेल ना ?
“आता मला बिडीही चालते....आता ५५५ परवडत नाही बाबा....ही शेवटची स्कॉच ...हे हॉटेल आहे ना हेही माझेच....”
मला वाटले या आजोबांना आता बहुदा चांगलीच चढलेली दिसते. यांना घरी सोडलेले बरे....
“इथेच थांबा मी गाडी घेऊन येतो, सोडतो तुम्हाला....”
“माझ्याकडे पैसे नाहीत आता तुझा पगार करायला...” असे बरळत असतानाच त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले.
त्यांना तसेच तेथे टाकून मी गाडीकडे पळालो, गाडी सुरू करून ते पडले होते तेथे आणले, डावीकडचा दरवाजा उघडून त्यांना कसेबसे आत टाकले. माझी जागा घेतली आणि स्टार्टर मारला.... पुढे काय... जायचे कोठे...

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

24/10/2024

बारा साली, म्हणजे आता बारा वर्षे झाली मी ही कथा लिहिली. ही कथा काल्पनिक आहे का खरी, हे मी ठामपणे सांगू शकत नाही, पण काही प्रमाणात खरी असावी , माझ्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेली. तो ते गाणेही गाऊन दाखवत असे.. त्याचा आणि माझा संपर्क तुटला तो तुटलाच. आता तो कुठे आहे ते मला माहीत नाही, तो जिवंत आहे का नाही हेही मला माहीत नाही, कारण तो माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होत १५ वर्षांनी तरी.

तरपत हूं जैसे जलबिन मीन...
..नांदेडचा उन्हाळा ! म्हणजे रात्री झोपेचा प्रश्नच नाही. पहाटेच थोडा वेळ झोप येत असे तेवढीच. अशा ठिकाणी माझी बदली झाल्यावर आणि हातात १९७८ साली महिन्याला देन तीन हजार रुपये हातात खुळखळत असल्यावर उन्हाळ्यात संध्याकाळी काय होत असणार हे मी सांगायला नको. पण ते जाऊदेत अगोदर नांदेडला कसा पोहोचलो ते सांगायला पाहिजे.

१९७६ साली ग्रॅज्युएट झाल्यावर चार आकडी पगारावरच नोकरी करणार या हट्टापायी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली आणि त्यांनी नांदेड येथे जावे लागेल हे सांगितले. म्हटले ठीक आहे. काय फरक पडतो ? एकटा जीव सदाशीव. त्या काळी हा पगार खूप म्हणजे खूपच होता. एक चांगली जागा गावाबाहेर भाड्य़ाने मिळाली आणि अस्मादिक त्या जागेत १० जानेवारी १९७८ रोजी रहायला गेले. १ ते ९ माझा मुक्काम हॉटेलमधेच होता. त्या काळात आमच्या सारख्यांचा आसरा होता तेच हॉटेल ‘‘परिवार हॉटेल’’. नावात होते परिवार पण कुठलाही परिवार त्या हॉटेलात येत नसे कारण आमच्यासारखे लोक. ज्यांच्याकडे पैसे असत त्या लोकांचा परिवार मात्र रोज संध्याकाळी येथे मद्य प्राशन करण्यास, (बियर) गप्पा मारायला जमत. घर सोडून आलेल्यांना संध्याकाळ कशी खायला उठते हे आपल्याला घर सोडल्याशिवाय समजणार नाही. दिवसभर काम करून दमूनभागून घरी आल्यावर जेवणासाठी बाहेर पडायलाच लागायचे मग थोडे अगोदर जाऊन करमणूकही करून घ्यायची असा सर्व ब्रह्मचार्‍यांचा पायंडाच पडला होता. अर्थात काही वैतागलेले विवाहीत, मध्यमवयीन माणसेही आमच्याबरोबर प्यायला बसायची. पण मला वाटते त्यांना आमची तरूण कंपनी आवडायची, बहुधा त्याचे कारण तरूणांमधील चावट गप्पा हे असावे. असो...

आमचा हा जो कंपू जमला होता त्यात एकंदरीत ८.५ लोक होते. करंदीकर, आठवले हे दोन कोके, भोसले, जाधव हे दोन देशमूख, मी व देवकर हे दोन कोकणी आणि उरलेल्यात होता एक सलीम खान जो उत्कृष्ट मराठी भावगीते म्हणत असे आणि एक होता पानसे. सलीम खान प्रोहिबिशन खात्यात कामाला होता त्यामुळे आमच्या दृष्टीने साला साहेबच होता. पण आमच्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय होता संगीत....कुठलेही संगीत. इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्रीय, उपशास्त्रीय...आम्हाला कशाचेही वावडे नव्हते. इन फॅक्ट दोन कोके, सलीम खान, मी आणि पानसे यांना संगीताची उत्तम जाण होती. वेळात वेळ काढून आम्ही आंबेजोगाईला संगीत महोत्सवाला जायचोच. अर्थात त्या काळी त्याचे स्वरूप फार खाजगी होते पण सलीम मियॉ असल्यावर काहीच अडचण नव्हती.....हा अर्धा मेंबर होता तो होता उद्योगपती अग्रवाल-आमचा डिस्ट्रिब्युटर. तो अर्धा कारण तो कधीकधीच असायचा...

त्या काळी माझ्याकडे तीन खोल्यांचा एक छोटा बंगला होता आणि एक दिवस त्या घराचे मालक जेव्हा माझ्याकडे भाडे गोळा करायला आले तेव्हा त्या बंगल्याची हालत बघून गाडगीळ काकांनी कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हणाले
“अहो सावंत, तुम्हाला घर भाड्याने दिले आहे याचा अर्थ विकत दिलेले नाही. काय अवस्था केली आहे तुम्ही माझ्या बंगल्याची. साधी साफसफाई करता येत नाही तुम्हाला, कमाल आहे.”

“काका, अहो मला वेळच मिळत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर जेवायला बाहेर जावे लागते आणि घरही खायला ऊठते, म्हणून बाहेर जातो. सकाळी लवकर उठून कामाला जावे लागते. केव्हा साफ करू हे घर ! सांगा तुम्हीच.

“मग एखादी बाई का नाही ठेवत....... डोळे मिचकावत काकांनी वाक्य पूर्ण केले.... साफसफाईसाठी !”

“नको रे बाबा ! आईने सक्त ताकीद दिली आहे असले काही करायचे नाही म्हणून .....”

“बरं ! मी बोलतो वहिनींशी” काका.

काका गाडगीळ आणि बाबा सावंत कॉलेजपासून मित्र होते.

दुसर्‍या दिवशी सकाळीच काका एका बाईला घेऊन हजर झाले.

“काका आत्ता मी चाललोय उदगीरला. आपल्याला नंतर नाही का बोलता येणार ? मला अजून गाडीत पेट्रोल भरायचे आहे” मी म्हणालो.

“नाही तुझ्याशी काही बोलायचेच नाही मला. मी वहिनींशी सगळे बोललो आहे. या ताराबाई. आमच्या सौंच्या चांगल्या ओळखीच्या आहेत. घरंदाज आहेत. उद्यापासून या तुझ्याकडे कामाला येतील. पैशाचे काय ते तू त्यांच्याशीच ठरव.. या स्वयंपाकही करतील अर्थात तुला पाहिजे असेल तर. चल निघ तू आता. उशीर होईल. मी सांगतो यांना कामाचे स्वरूप”

“ठीक आहे. मी उद्या यांच्याशी बोलतो” असे म्हणून मी गाडीला चावी लावली आणि फिरवली. फिआटचा फाटका आवाज करत त्या गाडीने जागा सोडली आणि एक डौलदार वळण घेत ती रस्त्याला लागली.

त्या रात्री नेहमीप्रमाणे परिवारमध्ये बरीच बीअर पिऊन झाल्यामुळे नेहमीप्रमाणे झोपायला उशीर झालाच. सकाळी उठतो तो मला दुसर्‍याच्याच घरात असल्यासारखे वाटायला लागले. मुख्य म्हणजे उशाशी असणारे सिगरेटचे रक्षापात्र कमालीच्या पलिकडे स्वच्छ होते. अजून मला बरेच धक्के बसायचे होते..... मी डोळे चोळत होतो, तेवढ्यात हाक आली “ साहेब उठा आता. चा बी तयार होईल हितक्यात”

हंऽऽऽऽ आत्ता डोक्यात प्रकाश पडला. ताराबाई आलेल्या दिसतात.

सकाळच्या ब्रेक्फास्टला ताराबाईंची गाठ पडली. मी तसा खूष होतो... कारण ब्रेकफास्टला त्यांनी ब्रेड ऑमलेट आणि तेही टोमॅटो घालून केले होते. बर्‍याच दिवसांनी घरीच वेळेवर ब्रेकफास्ट मिळाल्यामुळे माझी तब्येत खूष होती. त्या मागतील ते पैसे द्यायला मला तरी काहीच प्रश्न नव्हता.

ताराबाई साळूंके ! वय साधारणत: असेल ५० ते ५५. बुटक्या, हाडकुळ्या, बारीक चणीच्या, गोर्‍यापान. कपाळावर मोठे लालभडक कुंकू. विरलेल्या नववारीचा कपाळावर पदर अगदी व्यवस्थीत. भूर्‍या रंगाच्या पापण्या, पिंगट, मिचमिचे, डोळे, पण चेहर्‍याला शोभणारे. खरे तर त्या सुंदरच म्हणायच्या. वयाचा अंदाजही लागणे कठीण पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि नंतर माझ्या अनेक मित्रांच्या लक्षातही आली ती म्हणजे बघताच त्यांचे सौंदर्य डोळ्यात भरायच्या ऐवजी त्यांचे सोज्वळ स्वरूप डोळ्यातून मनात उतरायचे आणि सगळ्यांना स्वत:च्या आईची, आजीची आठवण यायची. ..

क्रमशः
- जयंत कुलकर्णी

18/10/2024

रत्नहार - भाग २ (शेवटचा)

तिच्या गळ्यात तो नवरत्नांचा हार नव्हता............

तिचा चेहरा पांढराफटक पडला होता तो बघून नवर्‍याने वैतागून विचारले
“आता काय झाले?”

ती रडकुंडीला येऊन म्हणाली “मी तो...मी तो... रत्नहार हरवलाय !”

अमोल खाडकन उभा झाला आणि किंचाळलाच “नीट बघ असेल ! हे कसे काय झाले बावळट कुठली ! तरी मी सांगत असतो की......जाऊदेत....”

त्यांनी दोघांनी मग सोडलेल्या साडीत तो रत्नहार पुन्हा पुन्हा शोधला. पर्समधे बघितला, बावळटासारखा त्याच्या पॅंटच्या खिशातही बघितला..पण छे !

“आपण बाहेर पडलो तेव्हा तो होता का तो? निश्चित ?”

“हो ! पायर्‍या उतरताना तर तो होताच . मीच माझ्या हाताने तेव्हा तो चाचपून बघितला होता.”

“पण तो रस्त्यात पडला असता तर आपल्याला काहीतरी आवाज आला असता ना ! बहुतेक तो त्या रिक्षात पडला असावा.”

“हो ! मलाही असेच वाटतय. तू त्याचा नंबर घेतला आहेस का ?”

“आता मला काय स्वप्न पडले होते की तो बावळटासारखा तो रत्नहार तेथे टाकशील म्हणून !”
अबोलीच्या नवर्‍याचा आवाज त्याच्या नकळत बराच वर चढला होता. ती आता केव्हाही ओक्साबोक्शी रडायला लागेल अशी तिची अवस्था पाहून तो म्हणाला

“थांब आता मी सगळा रस्ता पायी पालथा घालतो”
असे म्हणून तो पुटपुटत बाहेर चालता झाला.

अबोली बिचारी एकटी तेथचे बसून राहिली. तहान लागूनही ती पाणी पिण्यासाठी उठली नाही. दरवाजाकडे एकटक पहात ती शून्यात नजर लाऊन बसली. पहाटे अबोलीचा नवरा हात हालवत परत आला. त्याला काहीच सापडले नव्हते. मग त्याने पोलिसांमधे तक्रार नोंदवली व तो रिक्षा संघटनेच्या कार्यालयातही जाऊन आला. वर्तमान पत्रात आता जाऊन तो बक्षिसाची जाहिरातही देणार होता...पण त्याचा काही उपयोग होईल असे त्याला स्वत:लाच वाटत नव्हते.

अबोली बिचारी दिवसभर त्याच अवस्थेत स्वत:ला दुषणे देत घरात बसली. रात्री नवरा ओढलेल्या चेहर्‍याने घरी आलेला बघून तिला काय झाले असावे याची कल्पना आली व इतक्यावेळ रोखून धरलेले तिचे रडू कोसळले.

“मला वाटते तू कोपर्‍यावरून तुझ्या मैत्रिणीला फोन कर. तिला सांग त्या हाराचा फासा तुटल्यामुळे मी तो दुरूस्तीला टाकलाय एक दोन दिवसात मिळेलच.
आपल्यालाही थोडा वेळ मिळेल शोधाशोध करायला.

अबोली म्हणाली "नको तूच कर ते काम. हा नंबर !”

सात दिवस झाले रत्नहार काही सापडला नाही. रिक्षा संघटनेच्या कार्यालयातून निरोप आल्यावर त्यांची उरली सुरली आशाही नष्ट झाली. शेवटी अमोलने खिन्न मनाने जाहीर केले

“हंऽऽऽऽ आता दुसरा विकत घेऊन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही”. आत्ताच तो दोन वर्षाने म्हातारा दिसायला लागला होता.

दुसर्‍यात दिवशी त्यांनी त्या रत्नहाराची पेटी घेतली आणि सोनारगल्ली गाठली. पेटीवर नाव असलेल्या सोनाराकडे जाऊन त्यांनी त्याला ती पेटी दाखवली. दुकानदार म्हणाला “बाईसाहेब मी काही असला हार कोणाला विकलेला नाही पण मी ही पेटी मात्र विकलेली आहे. त्या तयार करायचा माझा छोटासा कारखानाच आहे ना !”

हताश होऊन त्या दोघांनी आख्खी बाजारपेठ पालथी घातली. अखेरीस एका दुकानात अबोलीला अगदी तसाच रत्नहार शोकेस मधे लावलेला दिसला.

आनंदाने चित्कारत ती म्हणाली, “हाच. असलाच होता तो.”
त्याची किंमत ऐकून त्या दोघांनाही भोवळच यायची बाकी होती.
“ दीड लाख”

पण बिचार्‍यांपूढे दुसरा पर्यायच नव्हता. अबोलीच्या नवर्‍याकडे त्याच्या वडिलांनी मरताना ठेवलेले ५०,००० होतेच व उरलेल्याची उसनवारी करावी लागणार होती पण नाईलाज होता. त्यांनी सोनाराकडून तीन दिवस तो हार विकायचा नाही असे कबूल करून घेतले, त्याला सगळी परिस्थिती सांगितली आणि अजून एक विनंती केली.

“आमचा हरवलेला रत्नहार जर तीन महिन्यात सापडला तर तूम्ही हा परत याच किंमतीला परत विकत घ्यायचा.”
दुकानदाराने त्यांची अवस्था बघितली होतीच. त्याने होकारार्थी मान हलविल्यावर दोघांचा जीव भांड्यात पडला.
उरलेले तीन दिवस पैसे गोळा करण्यात गेले.

त्याने मित्रांकडून उधार घेतले, बॅंकेकडे अर्ज केला, कार्यालयातून आगावू रक्कम उचलली, सहकारी पतपेढीत प्रॉमिसरी नोट लिहून दिली व पैसे उचलले. अजूनही काही कमी पडत होते ते पठाणी व्याजाने एका सावकाराकडून कर्जावू घेतले. बेअब्रू होण्याच्या भितीने मिळतील तेथून पैसे गोळा करून त्याने ते दुकान गाठले आणि तो रत्नहार ताब्यात घेतला.

अबोली जेव्हा तो तिच्या मैत्रिणीला परत द्यायला गेली तेव्हा तिचा नवरा बाहेर उभा होता. आल्यावर त्याने विचारले ‘‘काय म्हणाली ग ती?”

“अग लवकर दिला असतास तर बरे झाले असते. मला लागला नाही म्हणून ठीक. मला नाही बाई असे परत मागायला आवडत”. असे म्हणाली. अबोलीने रडत उत्तर दिले.

नशीब तिने ती पेटी उघडून बघितली नाही. तिच्या लक्षात जर तो बदललेला रत्नहार आला असता तर मोठा गोंधळ उडाला असता. सोने ठीक आहे हो, पण रत्नांचे काय सांगणार ? “आपल्याला चोरच समजली असती ती” अबोली मनात म्हणाली.

त्या दिवसापासून अबोलीला गरज म्हणजे काय याची कल्पना येऊ लागली. गरीबी म्हणजे काय याचा अनुभव तिला यायला लागला. अर्थात तिने ते आव्हान मोठ्या हिमतीने स्विकारले त्यात वाद नाही. बायकांना ती ताकद देवानीच दिली आहे म्हणा. आता तिच्या पुढे एकच लक्ष होते - ते कर्ज फेडणे. आणि तिने निश्चय केला की ती ते फेडेलच. तिने पहिल्यांदा तिच्या मोलकरणीला रजा दिली. त्यांनी कंपनीच्या बाहेर स्वस्तातील घर भाड्याने घेतले. घरकाम म्हणजे काय हे अबोलीला आता चांगलेच समजले. ती आता भांडी घासू लागली, केर काढू लागली. तिच्या नखावरचे नेल पॉलीश केव्हाच उडून गेले आणि धूणी धुताना तिचे हात खरखरीत झाले पण तिला आता या फालतू गोष्टीची तमा नव्हती. प्रत्येक खरेदीत ती आता पैसे वाचविण्यासाठी घासाघीस करू लागली. आरश्यासमोरचा नटण्यामुरडण्याचा वेळ आता लहान मुलांना सांभाळण्यात जाऊ लागला. एक एक पै ती साठवू लागली. एकही पैसा आवश्यक नसेल तेथे खर्च होत नव्हता. प्रत्येक महिन्यात आता कर्जाचा आणि पैशाचा हिशेब होऊ लागला.

अबोलीच्या नवर्‍यानेही संध्याकाळी दुसरी नोकरी पकडली व तो रात्री उशीरा घरी येऊ लागला. अशी पाच सहा वर्षे गेली आणि त्यांना आता परिस्थिती सुधारली असे वाटल्यावर अबोलीने तिच्या नवर्‍याला तिला एक गजरा आणायला परवानगी दिली. चक्रवाढ व्याजाने घेतलेली, अजून एक/दोन वर्षाने त्यांची सगळी देणी फिटली.

अबोली आता खुपच वयस्कर दिसायला लागली होती. ती आता सामान्य बायकांप्रमाणे कणखर, कशालाही न घाबरणारी, हाताला घट्टे पडलेली अशी स्त्री झाली होती. कामाची तिला आता इतकी सवय झाली होती की कर्ज फिटल्यावरही तिने सगळी कामे चालूच ठेवली होती कारण तिने एक महिनाच ती बंद करण्याचा प्रयोग करून बघितला तर तिला वेड लागायचेच बाकी होते.

कधी संध्याकाळी खिडकीपाशी आपल्या नवर्‍याची वाट बघत उभी असताना तिला अवचित ती संध्याकाळ आठवायची आणि तिला हसू यायचे.

जर तिच्या हातून तो रत्नहार हरवला नसता तर काय झाले असते ? देवाला माहीत. हे आयुष्य अशा विचित्र घटनांनी भरलेले आहे की एखादी छोटी गोष्टही आपल्याला आयुष्यातून उठवू शकते तिने स्वत:च्या मनाची समजूत घातली.

एक दिवस नवर्‍याबरोबर डेक्कनवर फिरताना तिला एक बाई तिच्या मुलाला घेऊन चाललेली दिसली जुई परांजपेच होती ती. शंकाच नाही. अजूनही तशीच सुंदर टवटवीत...

अबोलीच्या काळजात जून्या आठवणींनी धस्स झालं. बोलावे का हिच्याशी ? तिला तो बदललेला रत्नहार कळला असेल का ? धीर धरून ती तिच्या बालमैत्रिणीला सामोरे गेली.

“ओळखलस का ?”

“नाही हो ! तुमची काहीतरी चूक होती आहे का ?”

“नाही जूई, मी अबोली ! ओळखलस का आता ?”

“अरे देवा ! काय ग तुझी ही हालत ?” आश्चर्याने जुई ओरडली.

“हंऽऽऽऽ कष्टात गेले ग माझे ते दिवस. फार गरीबीत आणि तेही तुझ्यामुळे”

“माझ्यामुळे ?”

“अग तुला तो मला उसना दिलेला रत्नहार आठवतोय का ?:
हो काय झाले त्याचे?”

“मी तो हरवला !”

“अग तू मला तो परत दिलास की ! ”

“मी अगदी तसाच दुसरा हार विकत घेऊन त्या पेटीत ठेवला होता आणि त्यासाठी आम्हाला एक लाख कर्ज काढायला लागले ते आम्ही कसेबसे फेडले एकदाचे ! आम्हाला फार त्रास झाला या सगळ्याचा ! पण ते जाउदेत ! तू कशी आहेस आता ?”

“तू म्हणतेस तू एक रत्नहार, विकत घेतलास, माझा परत करण्यासाठी आणि तो सुद्धा लाखभर रुपायाला ?’

“म्हणजे ते तुझ्या लक्षात आले नाही तर. कसे येणार म्हणा, अगदी सारखेच होते ते !”

अबोलीच्या चेहर्‍यावर हे बोलताना अभिमान, आनंद ओसंडून वहात होता. डोळ्याच्या कडाही पाणवल्याचा भास झाला तिच्या मैत्रिणीला.

जूईने, तिच्या बालमैत्रिणीने अबोलीचे हात हातात घेतले, त्या खरखरीत हाताकडे बघत ती काही म्हणणार तेवढ्यात तिच्या डोळ्यातून दोन अश्रू त्या तळाहातावर पडले.

“अबोली कसे सांगू तुला.... अग तो काही खर्‍या रत्नांचा हार नव्हता...फक्त १००० रुपयाचा होता तो”..........

अबोलीला हसावे का रडावे हेच कळेना.........

अनुवाद : जयंत कुलकर्णी
बऱ्याचजणांनी ही कथा इंग्लिशमध्ये वाचली असेल, पण जे इंग्लिश कथा वाचत नाहीत त्यांच्यासाठी ही लिहिली होती.

17/10/2024

पूर्वी मी अशा कथांचा अनुवाद करायचो. पण जेव्हा मी रशियन लेखकांच्या आणि काफ्काच्या कथांचा अनुवाद करायला लागलो तेव्हा या असल्या कथांचा अनुवाद करणे मी बंदच केले... या मला फारच बाळबोध वाटायला लागल्या. असो, पण गी द मुपासाँच्या “The Diamond Necklace या लघूकथेचा स्वैर अनुवाद मी केला तेव्हा बऱ्याच वाचकांना आवडला होता...:-)

रत्नहार... भाग - १

अबोली म्हणजे नाजूक सौंदर्याचा एक सर्वोत्तम नमूनाच. नासीफ, चंका, कालिदासांच्याही प्रतिभा कमी पडाव्यात असे तिचे सौंदर्य मग आम्ही कुठे पडावे त्या भानगडीत.. पण म्हणतात ना देवाच्या दरबारात न्यायच नाही. ही नाजूक मुलगी ऐश्वर्यात लोळायची सोडून एका कारकूनाच्या पोटी जन्माला आली आणि आमच्या या नायिकेनेही बापाच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून एका डिप्लोमा होल्डरच्या गळ्यात माळ घातली. नाहीतरी लग्नाच्या बाजारात तुमच्या आर्थिक परिस्थितीला फारच महत्व असते. तर अबोलीचा नवरा एका मोठ्या कंपनीत शिफ्ट सुपरवायझर म्हणून कामाला होता. कंपनी पिंपरीत आणि रहायची सोयही भाड्याने का होईना कंपनीच्या कॉलनीत होती. दोन खोल्याचे का होईना स्वतंत्र घर होते....अजून काय पाहिजे होते ?

बिचारी अबोली साधी रहायची कारण तिच्याकडे चांगले कपडेच नव्हते. बिचारीला कुठे येऊन पडलो याचे अतोनात दु:ख होते. ती कुठे जन्माला आली, तिच्या घरची परिस्थिती काय होती याचा तिला हळुहळु विसर पडत चालला होता आणि त्याची जागा तिच्या सौंदर्याच्या अभिमानाने घेतली कारण होतीच तशी ती सुंदर !. बायका शक्यतो दुसर्‍या बाईच्या सौंदर्याची स्तुती करत नाहीत असे म्हणतात पण अबोलीच्या बाबतीत तेही खोटे ठरले होते. सोसायटीच्या कित्येक बायकांनी तिला ती किती सुंदर आहे ते स्पष्टपणेच सांगितले होते. त्याने ती खुष व्हायची खरी पण दुसर्‍याच क्षणी तिच्या मनात विषाद दाटून यायचा.

स्वत:कडे आरशात बघताना तिची खात्री होत चालली होती की तिचा हा जन्म जगातील सर्व सुखे भोगण्यासाठीच झाला आहे. तसे होत नाही हे बघून ती आतल्या आत तडफडत होती, चरफडत होती. तिच्या गरिबीने, तिच्या घराच्या ओक्याबोक्या भिंतींनी, डुगडुगणार्‍या खुर्च्यांनी, मळलेल्या एकदोन पडद्यांनी तिच्या आयुष्याची रयाच घालवली होती. सामान्य मध्यमवर्गातील बाईच्या मनात येणारही नाहीत अशा गोष्टींचे विचार तिच्या मनात अगदी सहज येत व तिला छळत. तिला तिच्या असल्या परिस्थितीची अतोनात चीड येई. विशेषत: ती आरश्यासमोर असताना जास्तच. असे झाले की ती डोळे मिटून घेई पण त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर, पापण्यांच्या आत ती स्वत:ला तिच्या मोलकरीणीच्या रूपात बघत असे. मग शांताबाईवर राग निघत असे. आता यात त्या बिचारीचा काय दोष ? रात्री अबोलीला सुंदर चार बेडरूमच्या बंगल्याची विलक्षण स्वप्ने पडत. नक्षीचा दरवाजा, गालीचा, मस्त तांब्याच्या रंगाचे पडदे, कोपर्‍यात मंद प्रकाश फेकणारे उंच दिवे, आरामदायी गुबगुबीत खुर्च्या, टेरेस आणि त्यात मंद वार्‍यावर मंद हलणारा तो मस्त झोपाळा आणि त्यावर केस सोडून, पायातील पैजण वाजवत बसलेली ती स्वत:....व्वा.. तिच्या स्वप्नात एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमधे एक सुंदर तरूणी पायर्‍या चढून आत येत आहे आणि सगळ्यांच्या नजरा परत परत तिच्याकडे वळत आहेत असे दृष्य नियमीत येई. तेथे बसलेली प्रतिष्ठीत माणसे तिची ओळख करून घेण्यासाठी धडपडत असत तर त्यांच्या बरोबर असलेल्या स्त्रिया तिच्याकडे मत्सराने कटाक्ष टाकत. थोडे निरखून बघितल्यावर त्या तरूणीला ती सहज ओळखत असे.

रात्री सनमायकाचे ढलपे उडालेल्या टेबलावर जेव्हा ती समोर बसलेल्या नवर्‍यासाठी वांग्याच्या भाजीच्या भांड्याचे झाकण उघडत असे तेव्हा तिच्या नवर्‍याच्या तोंडून अगदी सहज उदगार बाहेर पडत “व्व्वा ! काय मस्त वास येतोय, जगात यापेक्षा चांगले खायला मिळत असेल असे वाटत नाही” पण त्यावेळी तिचे लक्ष त्याच्याकडे नसे. तिच्या डोळ्यासमोर एखाद्या मेजवानीचे दृष्य तरळत असे. भले मोठे टेबल. त्याच्या भोवती मोजकीच माणसे. भिंतीवर भले मोठे ऑईल पेंटींग त्याच्यातील हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर उडणारा तो गूढ पक्षी, टेबलावर चमचम करणारी भांडी, चमचे....कुजबुजत्या आवाजातील संभाषण कधी कधी नुसतेच हसणे....बस....बस.....बस.....

तिच्याकडे साधी प्युअरसिल्कची साडी नव्हती ना एखादा दागिना. अंगभर दागिने घालून एखादी चांगली साडी नेसून लोकांच्या कौतूकाच्या व मत्सरी नजरा झेलत जायचे तिचे एक स्वप्न होते. त्यातच तिची बाळपणाची मैत्रीण आता पुण्यात रहायला आली होती आणि तिचा बंगला पुण्यात डेक्कन वर पीवायसीच्या मागे होता. ती कधी घरी आल्यावर तर तिला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. शक्यतो तिने घरी येऊ नये अशीच ती देवापाशी प्रार्थना करायची पण तिने बोलाविले की मात्र ती जायची संधी वाया घालवायची नाही. शीऽऽऽ काय आयुष्य चालले आहे आपले...एक दिवस ती स्वत:चाच तिरस्कार करत स्वत:लाच म्हणाली.

पण एक दिवस संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने उल्हासित नजरेने घरी आला तोच हातातील लिफाफा फडकवत.

“हे घे ! खास तुझ्यासाठी आणलंय.”

तिने घाईघाईने तो लिफाफा फोडला आणि आतला गुळगुळीत कागद बाहेर काढला. कसलेसे निमंत्रण होते ते.

“आरोग्यमंत्री श्री त्रिपाठी आणि सौ. निलिमा त्रिपाठी आपल्याला कंपनीला नवरत्न उद्योगाचा दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीसाठी सोमवारी १८ मे रोजी आमंत्रीत करत आहे.
वेळ : संध्याकाळी ७ ते ११”

तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसण्याऐवजी एक विषादाची छाया झरकन पसरून गेली. तिने ते निमंत्रण कॉटवर फेकले आणि पुटपुटली

“काय करू मी त्याचे ?”

“का ग ! मला वाटले तुला आनंद होईल. तुला अशा सभारंभांना कधी जायला मिळत नाही आणि आता जायला मिळते आहे तर तुझे तोंड वाकडे. फक्त खास लोकांनाच आमंत्रण आहे आणि सगळ्यांनाच जायचे आहे. आम्हाला खरे तर नव्हते आमंत्रण,
पण मी माझ्या साहेबाला विनंती करून ते मिळवले आहे त्याचे तुला काहीच नाही”
तिने कपाळाला आठ्या घालत त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.

“आणि मी त्या दिवशी काय घालू असे तुझे म्हणणे आहे ?”
हा विचारच त्याच्या मनात आला नव्हता. त्याचे त...त..प..प झाले.

“का आपण परवा नाटकाला गेलो होतो ती साडी नेस की. चांगली दिसते तुला ती...खरे तर तुला काहीही...”

बोलता बोलता तो थांबला. त्याच्या बायकोच्या सुंदर डोळ्यातून अश्रूचे दोन थेंब ओघळत होते. तिच्या गालावरून ओघळत ते तिच्या ओठाच्या महिरपीच्या कडेला जमा झाले...

“काय ग ? काय झाले ? आठवण येते आहे का कोणाची ....” त्याने घाबरून काळजीने विचारले.
स्वत:च्या दु:खावर प्रयत्नपूर्वक ताबा मिळवत तिने तुसडेपणाने पण शांतपणे उत्तर दिले

“काही नाही. माझ्याकडे चांगले कपडे नाहीत म्हणून मी या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. हे निमंत्रण तुमच्या मित्राला द्या किंवा साहेबाला द्या.” “उगंच वाया जायला नको” ती फणकार्‍याने म्हणाली.
त्याला काय बोलावे ते सुचेना....तो हताश झाला...बिचारा...

“हे बघ प्लिज रडू नकोस ना ! बघूया आपण काही करता येते का ते. सांग बर किती पैसे लागतील तुला एखाद्या चांगल्या साडीला ? पण ही साडी नंतर इतर कार्यक्रमातही वापरता आली पाहिजे हं !”

विचार करून तिने अडखळत उत्तर दिले “ मला वाटते दहा हजार रुपये पुरेत.”
तो आकडा ऐकताच त्याच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले व पोटात खड्डा पडला कारण बरोबर तेवढीच रक्कम त्याने त्याच्या स्कूटरसाठी बाजूला ठेवली होती.

“एवढे ?”

“हो... ब्लाउजची शिलाई किती महाग झाली आहे, आणि त्याचर मॅचींग परकर शिवाय सॅंडल्स, लिप्स्टीक, पर्स हे सगळे धरून कसेबसे बसेल त्यात..”

“ठीक आहे. मी देतो तुला दहा हजार ! आणि चांगली साडी आण. ते महत्वाचे. खूष ?”
जशी जशी कार्यक्रमाची तारीख जवळ येऊ लागली तसे अबोली मॅडम उदास दिसू लागल्या. त्यांची साडी आली होती ती तिला फारच खुलून दिसत होती. पर्स, सॅंडल्सचे तर विचारायलाच नको..पण त्यांच्या चेहर्‍यावरची ही काळजी....

“काय ग ! काय झाले. आता काय बिनसले आहे तुझे ? पूर्वीसारखी हसत नाहीस तू आजकाल !” तिचा नवर्‍याने एका दिवशी संध्याकाळी न राहवून विचारले.

“हे सगळे ठीक आहे पण मला राहून राहून असे वाटते आहे की या सगळ्यावर एखादा दागिना असता तर किती बरे झाले असते ! पण माझ्याकडे मेलं हे काळे मणी सोडल्यास काहीच नाही. मी याच्यात तेथे अगदी दरिद्री दिसेन. मला वाटते न गेलेले बरे !”

“अगं एखादा मस्त मोगर्‍याचा गजरा घाल ना ! किती मस्त दिसतो तुला आणि हल्ली त्याची फॅशनही आली आहे परत !”

“अहो ! मी गळ्यात काय घालू असे म्हणते आहे, केसात नाही”
बाईसाहेबांना अर्थातच ते काही पटले नाही.

“नाही, दागिन्यांनी मढलेल्या बाकीच्या श्रीमंत बायकांमधे दरिद्री दिसणे हा फारच मोठा अपमान होईल माझाही आणि तुमचाही.”

अबोलीचा नवराही आता हट्टाला पेटला. विचार करून तो म्हणाला
” काय ग तुझी एक श्रीमंत मैत्रीण पुण्यात आली आहेना रहायला ? काय बरे नाव तिचे ?

“जूई परांजपे. आमच्याच शेजारी रहात होती कोकणात. नशीबवान आहे मेली. कसले श्रीमंत घर मिळाले आहे तिला !” जाता जाता अबोलीने तिच्या नवर्‍याला बोचकारले.

“एवढी जवळची म्हणवतेस तर ती देईल का एखादा दागिना तुला एक संध्याकाळ ?”
अबोलीचा चेहरा आनंदाने उजळला.

”अय्या ! हो देईल की ! कसं लक्षात नाही आले माझ्या ? उद्याच जाऊन येते मी तिच्याकडे”.
दुसर्‍या दिवशी अबोली साने जूई परांजपेच्या घरी हजर झाली आणि तिने तिची अडचण सांगितली.
जूई आत गेली आणि दागिन्यांची पेटीच घेऊन बाहेर आली.

“हात्तिच्या ! एवढेच ना ! घे तुला काय पाहिजे ते यातले.”

ते दागिने पाहून अबोलीचे डोळे लकाकले. तिने अगोदर पाटल्या हातात घालून बघितल्या पण त्या काही तिच्या मनास आल्या नाहीत. मग तिने मोत्याचा एक जाडजूड सर घालून बघितला पण जूईच “हा तुला फारच मोठा वाटतो बाई” असे म्हणाल्यावर तिने तोही काढून ठेवला.

“जूई अजून काही आहे का ग तुझ्याकडे?”

“अगं नीट बघना त्या पेटीत अजून एक कप्पा आहे.”
अबोलीने तो कप्पा उघडला आणि तिची नजर अधाश्यासारखी एका पेटीवर गेली. उघडल्यावर तीच नजर नवरत्नहारावर खिळली. तो घालायला मिळणार या कल्पनेनेच तिच्या ह्रदयाची धडधड वाढली. तिने तो गळ्यात घातला, मोहक हालचाल करत पाठीवरचा मणी सरकवला आणि तिने आरश्यात बघितले. तिचा स्वत:च्याच डोळ्यावर विश्वास बसेना. हा एवढा महागडा रत्नहार ही देईल की नाही या भितीने तिने भितभितच विचारले” हा देशील का ग मला एक दिवस? फक्त हाच ! ?

“हो ! घे की. खरे तर दृष्टच काढायला पाहिजे तुझी”

“काहीतरीच तुझे !” लाजून अबोलीने उत्तर दिले.
जूईच्या गळ्यात पडून अबोलीने आपल्या या बालमैत्रीणीचे आभार मानले आणि तो रत्नहार घेऊन ती लगबगीने बाहेर पडली.

१८ मेच्या संध्याकाळी बाईसाहेबांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. जमलेल्या सगळ्या स्त्रियांमधे अबोली इतके सुंदर कोणीच दिसत नव्हते. तिचे डौलदार पावले टाकत चालणे, मधेच पदर सावरणे, बोलण्याची पद्धत, मोहक हसणे, गळ्यातील तो तिला शोभणारा रत्नहार....सगळे पुरूष जमेल तसे तिच्याकडे बघत होते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मुख्य पाहुण्यांच्या पत्नीने तर तिला शेजारी बसून तिचा रत्नहार हातात घेउन बघितला देखील... अबोलीला आता आस्मान ठेंगणे वाटू लागले. तिची पावले आता हवेत तरंगत होती. तिच्या अनेक स्वप्नांपैकी एक तरी तिने पूर्ण होताना बघितले याचा सार्थ अभिमान तिच्या चेहर्‍यावर डोकावत होता त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. कधी एकदा घरी जातेय आणि नवऱ्याचे आभार मानते असे झाले होते तिला. रात्री ११.३० वाजत ती दोघे त्या पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा दोघांच्याही चेहर्‍यावर समाधान फुलले होते.

त्याने हातातील शाल तिच्या खांद्यावर टाकली. त्या नवीन साडीवर ती शाल कशीचीच दिसत होती. तिने ती झटकली. हो ! कोणी बघायला नको. भरभर चालत ती तशीच पुढे गेली.

अमोल म्हणाला “ अग ! थांब जरा. सर्दी होईल तुला. ही शाल घे अंगावर. मी टॅक्सी मिळतेय का ते बघतो. !”
पण तिने ते एकले न ऐकल्यासारखे केले आणि ती झपझप पायर्‍या उतरायला लागली.
रस्त्यावर पोहोचल्यावर त्यांना रिक्षाही मिळेना. अखेरीस त्यांना एक खटारा रिक्षा मिळाली. जणू काही दिवसा तोंड दाखवायला लाज वाटल्यामुळे ही रिक्षा रात्री यांच्यासाठीच बाहेर पडली होती.

त्या खटार्‍याने त्यांना घरी सोडले आणि संध्याकाळच्या हुरहुर लावणार्‍या आठवणींनी बेचैन होत ते घरात गेले. परत एकदा आपले रूप आरशात बघावे म्हणून ती आरशासमोर उभी राहिली आणि तिने आपले दागिने काढायला सुरवात केली तेवढ्यात तिच्या तोंडून एक अस्फूट किंकाळी बाहेर पडली...

क्रमशः
- अनुवाद - जयंत कुलकर्णी

Address

Gloriosa Apartments, Flat No 5, Udaybaug
Pune
411013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coffee House Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Coffee House Publications:

Share

Category