26/07/2025
"गॅजेट्सच्या जंगलात हरवलेली जबाबदारी"
-अविनाश जाधव
आपण अशा एका संक्रमणकाळात उभे आहोत की जिथे जुनं अदृश्य होतं चाललं आहे आणि नवं अजून स्पष्ट झालेलं नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, इंटरनेट, जागतिकीकरण यामुळे समाजाच्या गतिशीलतेत प्रचंड वेग आला आहे. परंतु या वेगामध्ये अनेक मूलभूत गोष्टी कुठे हरवून जात आहेत, हे जाणवतं. या नव्या युगात जी पिढी उभी आहे जिला आपण ‘नव्या पिढी’ म्हणून ओळखतो तिच्याकडून समाजाच्या असंख्य अपेक्षा आहेत. पण या अपेक्षांची दिशा, स्वरूप आणि त्यामागची मुळं समजून घेणं आज अत्यावश्यक आहे.
नव्या पिढीला आज सर्व सुविधा उपलब्ध आहेत. माहिती सहज मिळते, जगाशी त्वरित संपर्क साधता येतो, करिअरचे अनेक पर्याय खुले आहेत, आणि व्यक्त होण्यासाठी हाती हजारो माध्यमं आहेत. तरीसुद्धा विचार केला असता असं दिसून येतं की समाजाशी तिचं नातं सैलावत चाललं आहे. व्यक्तिवाद वाढत असताना समाजहिताची भावना कोमेजतेय, आणि स्वप्नांचा मागोवा घेताना वास्तवाची जबाबदारी पार घसरतेय. केवळ यशस्वी होणं म्हणजेच जबाबदारी नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे. वास्तवाच्या पातळीवर, समाजातला अन्याय, विषमता, अज्ञान, गरिबी, पर्यावरणाचं संकट, शिक्षणातील असमतोल, बेरोजगारी, मानसिक आरोग्य अशा अनेक समस्यांशी नव्या पिढीला सरळसोटपणे भिडावं लागणार आहे.
आज गावागावात तरुण मुलं आणि मुली मोठ्या अपेक्षा घेऊन शिक्षण घेत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत, नोकऱ्या शोधत आहेत. पण केवळ स्वतःच्या पोटापुरतं आणि स्वप्नांपुरतं आयुष्य मर्यादित ठेवलं, तर समाजातल्या मोठ्या प्रश्नांचं काय होणार? नव्या पिढीकडून अपेक्षा ही आहे की ती केवळ परिस्थितीचा बळी ठरू नये, तर परिस्थिती घडवणारी शक्ती बनावी. स्वातंत्र्यसंग्रामात, समाजसुधारणेच्या लढ्यांमध्ये, शैक्षणिक क्रांतीत, अगदी भारताच्या घटना-निर्मितीतही युवकांचा मोठा वाटा होता. ती ऊर्जा, तो प्रगल्भपणा, ती जबाबदारीची जाण आजही आवश्यक आहे. पण ती स्वतःहून जागवावी लागेल.
वास्तव असे सांगतं की, नव्या पिढीच्या हातात मोबाइल आहे, पण संवेदनशीलता हरवते आहे. माहिती खूप आहे, पण जाणिवा कमी आहेत. संवाद खूप आहे, पण ऐकण्याची तयारी नाही. शिक्षण आहे, पण मूल्यं हरवत आहेत. हे चित्र केवळ टीकेसाठी नव्हे, तर आत्मपरीक्षणासाठी आहे. कारण प्रत्येक पिढीला इतिहास एक संधी देतो समाजाचा चेहरा बदलवण्याची. आज तो क्षण नव्या पिढीसमोर उभा आहे.
पर्यावरणाचं उदाहरण घ्यावं, तर वाढत्या प्रदूषणामुळे आज हवामानचं चक्र विस्कळीत झालं आहे. कोकणात पुर, मराठवाड्यात दुष्काळ, विदर्भात तापमानाचा कहर हे संकट केवळ निसर्गाचं नाही, तर मानवी कृतींचं आहे. अशा वेळी झाडं लावणं, पाणी जपणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं यासारख्या गोष्टी नव्या पिढीच्या स्वभावात असाव्यात. कारण पर्यावरण वाचवणं हे फॅड नाही, तर पिढ्यांचं भवितव्य आहे.
तसंच शिक्षणाचं उद्दिष्ट केवळ नोकरी मिळवणं हे नको, तर विचारशील माणूस घडवणं असावं. वाचन, चिंतन, संवाद, शंका विचारण्याची सवय आणि सत्याचा शोध घेण्याची तयारी हे गुण आज नव्या पिढीने आत्मसात करायला हवेत. आपल्या आजूबाजूला जे सामाजिक अन्याय घडत आहेत, ते केवळ वाचून किंवा पाहून थांबायचं नाही, तर त्यावर मत व्यक्त करणं, कृती करणं हीच खरी जबाबदारी आहे. कुठल्याही प्रश्नाकडे डोळसपणे पाहणं, त्यामागचं वास्तव समजून घेणं आणि त्यावर कृती करणं हे आधुनिक युवकाचं लक्षण असावं.
आपण समाजात राहतो. आपण शाळेत, महाविद्यालयात, कॉलेजमध्ये, कार्यालयात, वाडीत, वस्तीत राहतो. आपलं यश हे या समाजानं दिलेल्या संधीमुळे, आधारामुळे, वातावरणामुळे शक्य झालेलं असतं. तेव्हा समाजासाठी काही परत द्यायचं नाही का? हे देणं केवळ पैसे किंवा वस्तूंचं नसतं ते असतं विचारांचं, मार्गदर्शनाचं, वेळेचं, आणि कृतीचं. आपण एक मूल शिकवलं, एक झाड लावलं, एक गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दिला, एका गावात पुस्तकं पोहोचवली तरच आपण ‘जबाबदारी’ निभावतो असं म्हणता येईल.
या सगळ्याचं सार असं की, नव्या पिढीसमोर यशस्वी होण्याची स्पर्धा जितकी तीव्र आहे, तितकीच जबाबदारीची गरज आहे. समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला आहे. इतिहासाने तुम्हाला एक संधी दिली आहे. ती केवळ वैयक्तिक स्वप्नांच्या पूर्ततेत वाया जाऊ देऊ नका. स्वतःचा विकास करताना इतरांना मागे न टाकता त्यांनाही सोबत घेऊन चला. समाजाच्या गरजा ओळखा, प्रश्न समजून घ्या, आणि काही तरी भरीव काम करा.
कारण, अंतिमतः माणूस हेच आपल्या पिढीचं खरं ओळखपत्र असतं किती माणसं तयार केली, किती माणसांना दिशा दिली, किती माणसांत आशा जागवली हेच खरं मोजमाप आहे.
--------------
लेखक नव्या पिढीशी संवाद साधणारा, सामाजिक जाणीव असलेला आणि वैचारिक स्पष्टता बाळगणारा युवक आहे. नव्या माध्यमातून समाजात आशेचा एक नवा सूर निर्माण करण्यासाठी ते सातत्याने लेखन करतात.