17/07/2026
मराठी चित्रपट क्षेत्राशी निगडित असलेल्या आणखी एका दांपत्याच्या घटस्फोटाची बातमी काल रात्री उशिरा सगळीकडे पसरली.काही लोकांनी ती वाचली पण असेल. असो...
ह्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण त्यांनी सांगितले नाहीये आणि आपल्यालाही त्यात पडण्याचं काही कारण नाहीये.ह्या जोडप्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि निर्णयाचा संपूर्ण आदर मला आहे पण जे चाललंय त्याबद्दल माझं एक निरिक्षण खाली देतोय.
हा सध्याच्या समाज जीवनात पडत असलेला नवीन पायंडा (शुद्ध मराठीत- नवीन ट्रेंड) आहे.१५-२० वर्ष केलेले संसार (मुलं- बाळ असताना) मोडायचे.... का तर ह्यांच्या नात्यात तो स्पार्क नाही राहिला किंवा तिसरा माणूस(कधीकधी चौथापण- कारण एकाचवेळी दोघेही सारखीच कृती करताना आढळतात) ह्यांच्या आयुष्यात आलेला असतो.
असं सगळं करताना हे लोक सोबत घालवलेली वर्षे, त्यातले चांगले- वाईट प्रसंग विसरू कसे शकतात आणि जसे ते दिवस गेले तसे हे पण जातील यावरचा विश्वास कसा काय हरवून बसतात.अचानक किंवा अलिकडेच आलेला नवीन व्यक्ती इतका महत्त्वाचा कसा काय होतो. जो तुमच्या आयुष्यात शारीरिक,मानसिक आणि बर्याचदा आर्थिक अंगाने व्यापलेल्या तुमच्या जोडीदाराची जागा घेतो. असं काय झालेलं असतं की आपण आपलं माणूस जपलं पाहिजे हे विसरून नवीन आलेल्या व्यक्तीला प्राधान्य द्यायला लागतो.
अशा गोष्टी करताना सामाजिक किंवा सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या लोकांनी (नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती) भान ठेवायला नको का?
कारण तुम्हांला पाहणारा,तुमची स्तुती करणारा, तुमचं अनुकरण करणारा जनसमुह आहे. तुमची उदाहरणं घेऊन समाजात चुकीचे पायंडे, प्रथा पडण्याची शक्यता जास्त असते. ह्याची जबाबदारी कोण घेणार?
टीप - परत एकदा नमूद करतो.ह्या लेखात सदर जोडपं किंवा इतर कोणत्याही जोडप्याची बदनामी करण्याचा अजिबात हेतू नाही
-आशिष भोसले