राजापूरकर

राजापूरकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजापूरकर, Digital creator, Rajapur.
(1)

प्रिय..
कोकण..😊
पुढचा जन्म भेटलाच तर..
पुन्हा तुझ्याचं कुशीत यायला आवडेल.✅♥️

जन्मभूमी, कर्मभूमी, मायभूमी माझं कोकण 😍♥️

जगात भारी आमची राजापूर नगरी ♥️

#राजापूरकर 🏠🏡🌴🌊🌍🐟🐠⛵🛶🌳💚 कोकण म्हणजे स्वर्ग.....
कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण....
कोकण म्हणजे फळा-फुलांनी नटलेले विश्व.....
कोकण म्हणजे कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी....
पण हल्ली डिजीटलच्या जमान्यात या आठवणी लोप पावत चालल्या.

  #भावांमधीलनातेआईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी ज...
20/09/2025


#भावांमधीलनाते
आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.
भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.
माणुसकी हा एकच धर्म,,,,,,,,, मेल्यावर खांदा देऊन काय उपयोग,,,,,,जिवंत असताना हात द्या एकमेकांना,,,,

माहिती साभार ✍🏻_________

कोकणी गावातलं जीवन म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक साधं, पण सुंदर चित्र. गावाच्या गल्ल्या अरुंद, वळणदार, आणि एका बाजूला ना...
20/09/2025

कोकणी गावातलं जीवन म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक साधं, पण सुंदर चित्र. गावाच्या गल्ल्या अरुंद, वळणदार, आणि एका बाजूला नारळ, सुपारीच्या बागा तर दुसऱ्या बाजूला लाल मातीचे रस्ते असतात. या गल्ल्यांतून चालताना झाडांच्या सावलीतून येणारी थंड हवा अंगावर येते.

गावातील रस्त्यांमध्ये चढ-उतार सतत असतात. एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर जाण्याचा प्रवास म्हणजे एक छोटं साहसच असतं. रात्रीचं वातावरण विशेष रमणीय असतं. रात्रीची शांतता आणि फक्त झाडांवरून येणारा वाऱ्याचा आवाज, मध्येच ऐकू येणारी झिंगुरांची गाणी आणि गावाच्या वेशीवर पेटलेल्या मिणमिणत्या दिव्यांची शीतलता हे अनुभवताना मन हरवून जातं.

गावातलं जीवनही असंच शांत आणि समाधानी असतं. लोक आपापल्या घरात किंवा अंगणात बसलेले असतात, थकलेल्या दिवसानंतर शांततेचा आनंद घेत. कोकणी जीवनातील ही साधी रात्र, त्यातली शांतता आणि निसर्गाची साथ, यातून कोकणाचं खरं सौंदर्य अनुभवता येतं.
कोकण आणि निसर्ग.
कोकण आणि निसर्ग: जिथे भूमी आणि आकाश मिळून सौंदर्याचे नवे रूप निर्माण होते

कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला प्रदेश आहे, ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय विविधता जगभरात प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांपासून ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यांपर्यंत पसरलेल्या कोकणाला निसर्गाचे आशीर्वाद मिळाले आहेत. येथे डोंगर, नद्या, समुद्रकिनारे, धबधबे, घनदाट जंगलं, आणि पावसाळ्याचे आल्हाददायक वातावरण यामुळे निसर्गाचा कळस गाठला आहे.

१. पर्वतरांगांचे सौंदर्य

कोकणातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत, ज्या हिवाळा आणि पावसाळ्यात हरित शाली नेसल्यासारख्या दिसतात. या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी सापडतात. पावसाळ्यात धबधबे कोसळतात आणि दऱ्यांतून वाहणारे पाणी हा निसर्गाचा अनमोल खजिना आहे.

२. पावसाळ्याचे आल्हाददायक दृश्य

कोकणामध्ये पावसाळा म्हणजे निसर्गाचे अनोखे रूप. जुलै ते सप्टेंबर या काळात कोकणातील भूमी हिरव्या रंगाच्या विविध छटांनी बहरते. झाडे, वेली, आणि शेती या काळात नव्याने अंकुरतात. छोटे-मोठे धबधबे, ओढे, आणि नद्या भरून वाहतात. पावसाचे मुसळधार थेंब आणि ढगाळलेले आकाश हे कोकणाला एका नवीन रंगात रंगवतात.

३. समुद्रकिनारे आणि किनारपट्टीचे जीवन

कोकण किनारपट्टीने समृद्ध आहे. गणपतिपुळे, हरिहरेश्वर, आरे-वारे, गणेशगुळे यासारख्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे कोकणातील पर्यटन वाढले आहे. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू, आणि नारळी-पोफळीच्या बागा या समुद्रकिनाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. कोकणातील मच्छीमार समाजाचे जीवनही समुद्राशी निगडित आहे. त्यांच्या परंपरागत होड्या आणि मासेमारीचे तंत्र आजही पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे.

४. घनदाट जंगल आणि वन्यजीवन

कोकणातील घनदाट जंगलांमध्ये बिबट्या, रानमांजर, ससे, रानडुक्कर, आणि अनेक प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी सापडतात. वनराईमधील विविध प्रकारच्या फुलपाखरांपासून ते दुर्मिळ पक्ष्यांपर्यंत निसर्गप्रेमींसाठी येथे अनेक गोष्टी आहेत. जंगलांमधून जाणारे पाऊलवाटांचे मार्ग ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत.

५. फळबागा आणि शेती

कोकणातील सुपीक माती आणि हवामानामुळे येथे फळबागांची समृद्धी आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, आणि फणस हे येथील प्रमुख फळ आहेत. विशेषत: आंबा म्हणजे कोकणाची शान आहे. हापूस आंब्याचे नाव घेतले की कोकणाची ओळख लगेच होते. येथील शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, आणि त्यामुळे येथे भातशेती मोठ्या प्रमाणात होते.

६. निसर्गाच्या सानिध्यातील पर्यटन

कोकणात निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून निसर्गाचे दृश्य पाहणे, नद्या आणि धबधब्यांच्या सानिध्यात फिरणे, किंवा समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवणे, यामुळे पर्यटकांना कोकणाची शांतता अनुभवता येते. तसेच, येथील पारंपरिक गावे आणि आदिवासी संस्कृती हे सुद्धा एक आकर्षण आहे.

७. सांस्कृतिक महत्त्व

कोकणातील निसर्ग केवळ नैसर्गिक सौंदर्यापुरता मर्यादित नाही, तर तो येथील सांस्कृतिक जीवनाशीही जोडलेला आहे. येथे होणारे धार्मिक उत्सव, जसे की नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, हे सुद्धा निसर्गाशी सुसंगत असतात. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मच्छीमार आपल्या होड्या पाण्यात सोडतात, आणि गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीच्या रूपात निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करतात.

निष्कर्ष
कोकण आणि निसर्ग हे एकमेकांना पूरक आहेत.

माहिती साभार ✍🏻 Adnan N Hakim

📸 #फेसबुक
#कोकण 🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

 #तत्त्वनिष्ठा दरवर्षी मी देऊळवाडा मालवण येथील सातेरी मंदिरनजीक "मराळ" यांच्याकडून कोकम घेतो. गणपतीला गावी जायच्या पंधरा...
20/09/2025

#तत्त्वनिष्ठा
दरवर्षी मी देऊळवाडा मालवण येथील सातेरी मंदिरनजीक "मराळ" यांच्याकडून कोकम घेतो.

गणपतीला गावी जायच्या पंधरा दिवस अगोदरच मी श्री. गजा मराळ यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही.

नंतर मी श्री. अरविंद मराळ यांना फोन लावला.
त्यांना सांगितले दोन किलो कोकम माझ्यासाठी राखून ठेवा.

देऊळवाडा मालवण येथील कोकमाला खूप चांगली मागणी आहे, म्हणून मी अगोदरच त्यांना कोकम राखून ठेवायला सांगितले.

मालवणला गेल्यावर मी अरविंद मराळ यांना भेटलो.
ते म्हणाले, "यंदा मी कोकम नाही बनवली पण शेजाऱ्यांनी बनवली आहेत ती देतो, उद्या या".

दुसऱ्या दिवशी माझा मुलगा Ninad श्री. मराळ यांचेकडे गेला आणि दोन किलो कोकम घेऊन आला.
साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे दोन किलोचे सातशे रुपये त्याने दिले.

उत्तम दर्जाची कोकम मिळाल्यामुळे मी खूप खुश झालो.

त्यानंतर पाच दिवसांनी माझा चुलत भाऊ Sagar माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातावर शंभर रुपये ठेवले.

मी विचारले "कसले पैसे सागर"?

सागर उत्तरला, "विक्रांतदादा, मराळांनी तूला दिले आहेत".

मी विचारले, "कसले"?

सागर म्हणाला, "मराळ वहिनींनी सांगितले, आम्हाला कोकम तीनशे रुपये किलोने विकायचे आहेत, चुकून किलोचे साडेतीनशे रुपये घेतले गेले. म्हणून दोन किलोचे शंभर रुपये विक्रांत चव्हाण यांना परत करायचे आहेत.
विक्रांतदादा तुला त्यांनी हे शंभर रुपये परत दिले आहेत.
आणि मलाही त्यांनी तीनशे रुपये किलो प्रमाणेच कोकम दिले आहेत."

खरंच माझा उर भरून आला.

ते किती मेहनतीने कोकम बनवतात हे लहानपणापासून मी डोळ्यांनी पाहत आलो आहे.
कोकम सोलताना नखांजवळ दुखापत होते. त्यानंतर ते कोकम उन्हात वाळवणे, पुन्हा पुन्हा आगळात भिजवून ती पुन्हा पुन्हा उन्हात वाळवणे हे खूप मेहनतीचे काम आहे.

मराळांचा तो तत्वनिष्ठपणा माझ्या मनाला खूप भावला.

कोकणची माणसं प्रेमळ, साधी-भोळी हे खरंच खरं आहे.

अशा कोकणात मालवणात देऊळवाड्यात माझं घर आहे याचा मला खूप आनंद आहे.

:- © विक्रांत गोपीचंद चव्हाण
https://www.facebook.com/konkan.harmony

हा फोटो आहे कोकण रेल्वे वरील उक्शी या इटुकल्या स्टेशनचा. या स्टेशनची रचना मोठी चमत्कारीक आहे. याच्या समोर एक बोगदा आहे आ...
20/09/2025

हा फोटो आहे कोकण रेल्वे वरील उक्शी या इटुकल्या स्टेशनचा. या स्टेशनची रचना मोठी चमत्कारीक आहे. याच्या समोर एक बोगदा आहे आणि लागूनच मागे एक बोगदा आहे. म्हणजेच दोन बोगद्यांच्या मध्ये हे स्टेशन वसलेले आहे.

एखाद्या सौंदर्यवतीचे वर्णन करायला जसे शब्द सापडत नाहीत तसे या स्टेशनचे सौंदर्य वर्णायला शब्द अपुरे पडतात. या स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत. पण आज सकाळी कणकवलीला जाणारी आमची तुतारी एक्सप्रेस पासिंगसाठी इथे वीस मिनिटे थांबली. ट्रेन लेट झाली म्हणून इतर प्रवासी रेल्वेला शिव्या घालत होते तेव्हा मी मात्र सृष्टीचा हा नजारा अधाशासारखा डोळे भरून अनुभवत होतो.

असे पागल होण्याचे क्षण परमेश्वर कधी तरी अवचितपणे ओंजळीत टाकतो. ज्याच्या ओंजळीत ते पडले तो भाग्यवान. आज कोकण रेल्वेने आमची ओंजळीत भरली. ज्यांना हे कळले नाही ते बोटे मोडत बसले. ज्यांना कळले त्यांना परमेश्वर सापडला.

(संगमेश्वर आणि रत्नागिरी यांच्यामध्ये येणारं हे स्टेशन)

 सन 1980सुमारास चिपळूण खेड मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला वडाप प्रयोग सुरू झाला.या गाड्या प्रवासी वाहतूक करू लागल्...
20/09/2025


सन 1980सुमारास चिपळूण खेड मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला वडाप प्रयोग सुरू झाला.या गाड्या प्रवासी वाहतूक करू लागल्या त्यात एक मागे बंदिस्त हौदा असलेला मालवाहक मेटाडोर होता.M WT 9054नंबर होता.अमरनाथ मंजल यांचे ज्येष्ठ पुत्र सुदेश हेअलोरे येथून चिपळूण बाजारपेठ येथे गाडी लावून गाडी व्यवसाय करायला जात असत.सकाळी साडेनऊची अलोरे चिपळूण एस टी बस अगदी वेळेत यायची वळायची आणि उभी राहताच सगळ्या पंचक्रोशीचा प्रवासी भार स्वीकारत होती.पण दहा मिनिट अगोदर ही गाडी स्टँडवर उभी राहत असे.कोणतेच व्हेंटिलेशन नसलेल्या हौद्यातूनसुद्धा दहाबारा सहज मागे बसून चिपळूण गाठत होते.पास नाही आणि पैसे देऊन चिपळूणला जायचे तर मंजल यांच्या घराजवळ पुढे बसण्यासाठी नंबर लावायची सवय आम्हाला होती.पण कधीच पूर्ण सीटवर बसता आले नाही.बसणारा आणि गाडीमालक गृहितच धरायचे आणि आम्ही इंजिनवर हलकेच बसायचो आणि चिपळूणपर्यंत तापलेल्या अवस्थेत असायचो.चिपळूणवरून पंचक्रोशीत कुणाचेही काही आणायचे तर हा एकच मार्ग होता.अनेक वर्ष मजबुत शरीरयष्टी असलेल्या मंजल यांनी तालुक्यात नाव कमावले होते. मेटाडोर कालबाह्य झाला आमच्या डोक्यात आठवणी ठेवून...तसेच वाहनमालक सुदेश मंजल यांचेही अनेक वर्षापूर्वी अपघाती निधन झाले.धन्यवाद.....

पोस्ट साभार ✍️ DM

कुर्ला टू वेंगुर्ला ही प्रसिद्धी नाही,जाहिरात नाही,प्रमोशन नाही.माझ्या मनगटावरचं अत्तर दुसऱ्याच्या मनगटावर फासणं.मला मि...
20/09/2025

कुर्ला टू वेंगुर्ला

ही प्रसिद्धी नाही,जाहिरात नाही,प्रमोशन नाही.माझ्या मनगटावरचं अत्तर दुसऱ्याच्या मनगटावर फासणं.मला मिळालेलं वरदान वाटून देणं.....रामायणातल्या पायसदानासारखं आणि माऊलीच्या पसायदानासारखं!
मी किंचित कवी वगैरे असल्याच्या गैरसमजातून आणि अफवेतून वा अंधश्रद्धेतून चारू सोमणनी मला बोलावलं असावं.सिनेमाच्या नावात कुर्ला आणि वेंगुर्ला असं यमक असल्यामुळे!
शहरानं खेड्याला मारलेली विचारी/अविचारी मिठी म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला.यावर्षी काय दर्जेदार पाहिलंत या प्रश्नाला मनापासून उत्तर देण्यासाठी हा चित्रपट पहाच.संग्रह ह्या हेतूसाठीच आग्रह!
स्पंदन हे जगण्यासाठी अत्यावश्यक.हा अर्थ अक्षरश:जगणारी संस्था "स्पंदन!
सरपटणाऱ्याना पंख द्यायचे तेही गरुडाचे हा ध्यास जगणारी संस्था.
कित्येक राष्ट्रीय किर्तीचे कलावंत आणि तंत्रज्ञ निर्माण करणारी संस्था.
सिनेमा पहाताना व.पुं.च्या "हसरं दुःख"कथेची आठवण आली.दु:ख हसवत सांगणं म्हणजे हा चित्रपट!
या चित्रपटाच्या निर्मितीत आणि पडद्यावर माझे बरेच मित्र असल्याने त्याला एक वैयक्तिक स्पर्श आहे.अनेक गडग्यावरची मुलं पडद्यावरती नेणाऱ्या अमरजीत आमले आणि विजय कलमकरानी लेखन,दिग्दर्शन,संकलनाची अक्षरश:कमाल केलीय.
लेखन आणि आशय प्रगल्भ असला तरच टपरीचा ताज होतो.अनेकानेक ठिकाणी कमाल आणि सूक्ष्म लेखनाचा प्रत्यय आला आणि अनाठायी हसणारांचा व्यत्यय आला.सिनेमा का आणि कसा बघावा यासाठी रसिकांचीही कार्यशाळा स्पंदनने घ्यावी.
काही सार्वकालिक आणि तात्वज्ञानिक वाक्याना वा,वा येऊ नये याचं वाईट वाटलं म्हणून प्रेक्षकांसाठीही कार्यशाळा हवी हा उल्लेख पुन्हा करतो.
सभ्य विनोद ज्या सूक्ष्म निरिक्षणातून आणि चपखल शब्दयोजनेतून आलेत त्याला तोड नाही.
आधी दृष्य झोका केलं म्हणून झोपाळा दिसायच्या आधीच दिसला.वधुपक्षाच्या रिकाम्या खुर्च्यात आशय मात्र दाटीवाटीने बसला होता.
भंगाराला शृंगारात बदलण्याची किमया खूप काही सांगून जाते.
कृष्ण आणि राधा ह्यांच्या प्रेमाचं चिरंतन स्मारक म्हणजे तुळस.तुळशीच्या साक्षीनं विसंवाद दाखवण्यातली कळ जिवघेणीच.
नुसत्या नळाला पाणी येणं या एका घटनेतून किती वेगवेगळी असहायता दाखवलीय!प्रवाहपतीत करणारा नळ.
पडद्यावर वैभव मांगले,सुनिल तावडे,विद्याधर कार्लेकर,सागर जोशी,स्वानंद देसाई असे अनेक मित्र भेटले.विजय कलमकर अमरजीत आमले यांची प्रतिभा भेटली,सृजनशीलता भेटली.चारुची धडपड भेटली,ध्यास भेटला.
प्रबोधनाचा बाऊ न करता एक कथा किती प्रासादिक व्यथा समजावते.खळात मालवणी,तळात इंग्रजी भाषा कथा सर्वदूर पसरवण्यासाठी आतूर.
कमालीच्या संवेदनशील छायाचित्रणावेळी ज्याने प्रकाशाची जबाबदारी निभावलीय त्याला साष्टांग.
नविन तंत्रज्ञान द्रोणाच्या वापरामुळे कोकणचं सौंदर्य,आणि नाकाला रुमाल लावल्यानं शहराचं बकालपण फार नेमकं दिसलं.
विनोदाच्या जागा किती सूक्ष्म,सभ्य,प्रगल्भ आहेत हे सांगितलं तर सिनेमा बघणार नाहीत.
दरवळणारी अगरबत्ती आणि तिची राख साठलेलं तबक दोन्ही बघणं एक समृद्ध अनुभव!

प्रमोद जोशी
देवगड
9423513604

 कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाच्या निमित्ताने.. - विनित विचारे _ १९ सप्टेंबर २०२५कुर्ला टू वेंगुर्ला आज पाहिला. दशावतार नंत...
20/09/2025


कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाच्या निमित्ताने..
- विनित विचारे _ १९ सप्टेंबर २०२५

कुर्ला टू वेंगुर्ला आज पाहिला. दशावतार नंतर सहाच दिवसात दुसरा सिनेमा बघितला. सारखं सारखं थिएटरला जाण्याची अशी काही सवय नाहीये. तरी ५२ किमी प्रवासाचे पुन्हा एवढे कष्ट यासाठी कारण या सिनेमाचा विषय माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर थेटपणे जोडलेला आहे आणि सध्यातरी खूप महत्वाचा आहे. गावातल्या मुलांची लग्न न होणे या विषयावर मागच्या वर्षी 'नवरदेव Bsc Agri' हा सिनेमा आला होता. तोही फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि आता हा ही. खास कोकणातल्या मुलांच्या लग्नाविषयक समस्यांवर भाष्य करणारा सिनेमा कोणीतरी काढलाय, तेही फार अडचणी पार करून असं वाचलं होत. त्यामुळे यंदाही कर्तव्य नसलं तरी या सिनेमाला जाणं हे कर्तव्य समजून आलो.

माझ्या गावी येण्याच्या निर्णयाच्या प्रवासाबद्दल जेव्हा २५ जूनला सविस्तर लिहिलं तेव्हा त्यात माझ्या लग्नाविषयक अडचणींबद्दल उल्लेख वगळता काहीच लिहिलं नव्हतं. उगाच लेख लांबला असता. पण आता कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाच्या निमित्ताने बदलापूर टू राजापूर प्रवासामधल्या लग्नाबद्दलच्या टप्पाबद्दल सांगतो. पण त्याआधी सिनेमाबद्दल काय वाटलं ते लिहितो.

सिनेमा मस्त हसत खेळत, मधेच सीरियस होत विषय मांडतो. नव्याने लग्न झालेल्या एका जोडप्याचा संसार आणि त्यातल्या महिलेची मुंबईला जाण्याची आकांक्षा हा कथानकाचा मुख्य आधार आहे. मग दाखवलाय गावातील आणखी एक तरुण आणि त्याचं शहर सोडून गावी परत येणं. गावी उद्योग सुरू करणं. एक कॉलेजवयीन तरुण तरुणी ज्यांचं प्रेम आहे पण मुलगा आयुष्याबद्दल सीरियस नाही. अशी आपल्या आजुबाजूला दिसणारी पात्रे आहेत. सिनेमाच वेगळेपण आणि यश यात की तो फक्त समस्या मांडून हात वर करत नाही, तर समाधानही दाखवतो. आणि अशाच सिनेमांची आज गरज आहे. कोकणातल्या मुलांची लग्न होत नाहीत, किंवा एकंदरच महाराष्ट्रातल्या गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत हे वास्तव आहे. हा विषय असाच कल्पकतेने सिनेमे, मालिकांमधून मांडला गेला पाहिजे. स्वानंदी टिकेकरच्या तोंडी एक डायलॉग आहे की, 'इथे लग्न हा प्रॉब्लेम नाहीये, इथल्या लोकांच्या मनात असलेलं शहराबद्दलच खुळ हा प्रॉब्लेम आहे.'

सिनेमाचा दुसरा भाग जास्त आवडला ज्यात आनंद आपल्या बायकोच्या इच्छेप्रमाणे शहरात जातो. गावात वाढलेल्या मुलींना जी शहराची क्रेझ असते ती कधीच शहरात न राहिल्याने तशीच राहते आणि शहरात जाण्यासाठी जीव घुटमळत राहतो. शहरात राहूनच शहराचे वास्तव अनुभवता येते. शहर की गाव ही निवड आहे. ही कोणीच कोणावर थोपू नाही शकत. ज्याला त्याला अशीच अनुभव घेऊन निर्णय घेण्याची संधी दिली पाहिजे. संपूर्ण चित्रपट मुलांचीच बाजू दाखवतोय की काय असे वाटण्यापूर्वीच स्वानंदी टिकेकरची एन्ट्री होते. तिच्या interviews च्या patch मधून सिनेमाने मुलींची लग्नाबद्दलची आणि शहराबद्दलची मते कव्हर केली आहेत. सिनेमाचा शेवट थोडा अपेक्षितच आहे, पण तो छान नाट्यमयरित्या मांडलाय. एकूणच सिनेमाची आपली जी भाषा असते ती दिग्दर्शकाने उत्तररित्या वापरली आहे. मुंबईतल्या आयुष्याचे routine, तोचतोचपणा अगदी थोड्या patch मध्ये पण कथेसाठी जेवढा हवा तितका मांडला आहे. लेखकाची मातीशी, कोकणाशी नाळ किती घट्ट जुडलेली आहे ते स्पष्ट दिसतं. दशावतार सारखे मोठे स्टार्स नसले तरी सिनेमातल्या कलाकारांनी आपली पात्रे उत्तम रंगवली आहेत. सिनेमा धरून ठेवतो शेवटपर्यंत.

सिनेमाची विषय मांडण्याची मर्यादा असते. पण हा विषय आता चर्चेत आहेच तर गावातल्या मुलांची लग्न का होत नाहीत याबद्दल मला आणखी 2 कारणे जोडायची आहेत. ती माझ्या व्यक्तिगत अनुभवासोबत मांडतो.

लग्न या विषयावर कितीही भरभरून बोलू शकतो, लिहू शकतो, कारण यामुळे फक्त विचारांना नाही तर या वयात मनाला झोके देणाऱ्या भावनांना धक्के मिळाले आहेत. अगदी लोकल ट्रेन मध्ये मिळतात तसे अनपेक्षित धक्के. तरी जरा थोडक्यात सांगतो. गावी येण्याचा निर्णय घेण्याआधीपासूनच मी लग्नासाठी जोडीदार पाहत होतो. पण तेव्हा घाई नव्हती. जेव्हा गावी यायचं confirm झालं तेव्हा जरा घाई सुरू झाली. 😎कारण प्लॅन असा होता की गावी गेल्यावर लग्न जुळणं कठीण आहे, आता मुंबईत आहे, स्वतःचा फ्लॅटही आहे तर करून घेतो लग्न. मग 2-4 वर्षांनी गावी जाता येईल. तोवर थोडे पैसेही जमतील गावी काहीतरी करायला.

झालं, गावी जायचं ही ठरलं आणि लग्नाचंही. हळूहळू गावी जायची आतुरता एवढी वाढली की लग्न हा गावी जाण्यासाठी अडथळा वाटू लागला. कारण गावी जाणं सोप्प होत. जरी risky असलं तरी जे काही होतं ते माझ्या कंट्रोल मधलं होत. लग्नाच्या बाबतीत हळुहळू कळायला लागलं की हे आपल्या कंट्रोल मध्ये नाही. Love marriage तर नशिबात नव्हतं. आणि त्याआधी नुकतेच आयुष्यात एवढे एकाएकी बदल घडले होते की पूर्ण सोशल सर्कल आणि सोशल लाईफ बदललेले होते. Arranged marriage हाच उपलब्ध पर्याय होता. मग त्यासाठीच्या सर्व प्लॅटफॉर्म्स वर माझे खाते उघडले. माझ्या सवयीप्रमाणे एक तर एकच विषय मनावर घेऊन दिवसरात्र प्रयत्न केले तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे कळली की Arranged marriage हे pure market आहे. आणि त्याला मार्केटचेच सर्वसाधारण नियम लागू होतात. या मार्केट मध्ये येणारा/येणारी आपल्यापाशी असलेल्या assets आणि एकंदर उपलब्धींच्या जोरावर जास्तीत जास्त चांगली निवड प्राप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. मुलाकडे नुसता फ्लॅट असून उपयोग नाही. फ्लॅट बदलापूरला आहे की so called main मुंबईत आहे ते matter करतं. पुन्हा, मी फक्त मुलींना दोष देत नाहीये, relax! मी मुलगा आहे आणि माझा अनुभव सांगताना मुलाच्या बाजूने अनुभव मांडले जाणं साहजिक आहे. मुलीही आपले अनुभव लिहित असतात. पुन्हा एकदा हे अधोरेखित करतो की इथे येणारे सर्वच सहभागी मार्केट मध्ये आपल्याला best product कसं मिळेल हेच बघतात. आणि हे साहजिक आहे. लग्न हे मार्केट सारखं असावं का हा वेगळा विषय आहे पण माझ्यासमोर जे वास्तव आणि उपलब्ध पर्याय होते त्यालाच सामोरे जाणे होते.

बरं, या market मध्ये मी काही एवढाही downmarket नव्हतो. स्थळं आली. पण तीन गोष्टींमुळे जमलं नाही. एकतर जात, आणि दुसरं म्हणजे पत्रिका आणि तिसरं म्हणजे गावी येण्याचा निर्णय. साधारणपणे बहुतांश लोकं arranged marriage मध्ये जातीतलाच जोडीदार बघतात. मला ते पटत नाही म्हणून मी तरी स्वतःहून इतर जातींतील मुलींना approach केलं पण बहुतांश मुलींच आणि पालकांचं स्पष्ट होत की त्यांच्या जातीतच बघत आहेत. त्यातही एक दोन तयार होते पण इतर दोन अडचणी आल्या.

मी तर आधीच सांगितलेले की माझा पत्रिकेवर विश्वास नाही, पण तरी मुलीकडच्यांनी मागितली म्हणून पत्रिका दिली. एकीशी पत्रिका जुळली, भेटायचं ठरलं. मी म्हटलं मुलीशी आधी बोलायचंय. अशी मुलीला भेटायची त्यांच्यात पद्धत नाही म्हणून फोनवर बोललो. माझे सगळे प्लॅन सांगितले. गावी येण्याचा निर्णय ऐकल्यावर नकार आला. असंच पुन्हा पुन्हा घडलं. त्यातूनही शेवटी 3 जणी अश्या भेटल्या की ज्या गावी यायच्या निर्णयाबद्दल सकारात्मक होत्या. पण त्यांच्याशी पत्रिका नाही जुळली😓. माझं गणित चांगलं होत. मेंदूत venn diagram तयार व्हायचे. लग्नस्थळांच्या pool मध्ये एकूण उपलब्ध मुलींपैकी असे एक एक वर्तुळाचे फिल्टर लावून छाटत गेलो तर मधल्या उरल्या किती? उत्तर फार आशादायी नव्हतं. गावी जातोय म्हणून लग्न होणार नाही या frustration पेक्षा मला जास्त राग आला तो जात आणि पत्रिका बघण्याचा. त्यातही मंगळ! एवढा सुंदर तो मंगळ ग्रह पण माझी 2 स्थळं घालवली 😒. भारताने मंगळाकडे केव्हाच यान पाठवले🚀, तो इलॉन मस्क तिकडे मंगळावर राहायला जायचे प्लॅन बनवतोय🛸 आणि माझ्या वयाच्या शिकलेल्या मुली त्यांच्या पत्रिकेत मंगळ असल्याने माझ्या जीवाला धोका असल्याची भीती सांगत होत्या.😑
Hopeless होती परिस्थिती!
म्हणून hopes सोडलेत असं नाही पण शहर सोडायचं होतं ते सोडलं, आता इथेच गावी कोणी भेटेल तर बघतो.

अजून 4 वर्ष थांबलो असतो तर जमलं ही असतं शहरात असताना. पण कशाच्या आधारे जमणार होत ते? तर शहरातील फ्लॅटच्या? नको मग. माझ्या प्लॅन मध्ये एवढा मोठा विरोधाभास होता. शेवटी समजला.
आणि गावी येण्याला 4 वर्षे उशीर झाला असता त्याचं काय? मी काही retirement नंतर relax व्हायला गावी येणार नव्हतो. स्वतःच काहीतरी उभं करायचंय मग त्यासाठी जेवढं लवकर सुरवात करेन तेवढं चांगलं हे समजलं आणि निर्णय घेतला.

लग्न न जुळण्याचा परिणाम फक्त मुलांच्या वैवाहिक आयुष्यावर होत नाहीये तर सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत. हा कोकणच्या भविष्याचा प्रश्न आहे. लग्न जुळत नाही म्हणून एक एक करून गावातले तरुण शहरात जाणार असतील तर गावांचं भविष्य काय असेल? कोकण कोकणी माणसांचा राहील का? तेच तेच मुद्दे परत मांडत नाही. लग्न जुळणं आधीच कठीण झालंय त्यात पत्रिका आणि जात बघणं थांबवा, अनावश्यक अपेक्षा कमी करा. वास्तववादी व्हा. मी फक्त माझ्या अनुभवातून बोलत नाहीये तर इतरांच्या आयुष्यात काय घडतंय याच्या निरिक्षणातून हे अधोरेखित करावंस वाटलं. या विषयावर मुलींचा दृष्टिकोन काय आहे यावर मागेही फेसबुकवर चर्चा झालीय. मी बऱ्यापैकी सर्व पोस्ट्स आणि कमेंट्स वाचल्या आहेत. मुलींचे गावातील वैयक्तिक अवकाश आणि सामाजिक आयुष्याबद्दलचे मुद्दे मान्य आहेत. पण त्यावरही एकत्र मिळून काहीतरी पर्याय काढुया ना.🙂

कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमा नक्की बघा. सिनेमाला खूप यश मिळो ही सदिच्छा🎉. आणि सिनेमात ज्यांचं दुःख मांडलय त्यांनाही यश मिळो.😄

Vinit Vichare

#कुर्लाटूवेंगुर्ला #गावं_वाचवा #राजापूरकर

!!श्री स्वामी समर्थ!!!!जय जय स्वामी समर्थ!!
19/09/2025

!!श्री स्वामी समर्थ!!
!!जय जय स्वामी समर्थ!!

 जेवणाची थाळी फक्त 30 रुपयांत, पुण्यात प्रसिद्ध ठिकाण, कधी दिलीये का भेट ?     पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षां...
19/09/2025


जेवणाची थाळी फक्त 30 रुपयांत, पुण्यात प्रसिद्ध ठिकाण, कधी दिलीये का भेट ?
पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. विशेष म्हणजे फक्त 30 रुपयांत मिळणाऱ्या जेवणासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात.माणूस म्हणून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना आणि स्वामी समर्थांवर असलेली भक्ती या माध्यमातून एक पुणेकर मोठं काम करतोय. पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र चालवत आहेत.विशेष म्हणजे फक्त 30 रुपयांत मिळणाऱ्या जेवणासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. दररोज 700 लोक इथं पोटभर जेवण करतात. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तरुणांना कमी पैशात जेवण मिळावं, या उद्देशाने आपटे यांनी पोळी भाजी केंद्राची सुरुवात केलीये. बाहेर गावावरून जी मुलं शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यांच्याकडे मोजकेच पैसे असतात. शिक्षण सांभाळत जर जेवणाचा खर्च कमी झाला तर यासाठी आपण काही तरी करू शकतो, अशी कल्पना अनिल आपटे यांच्या डोक्यात आली. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्याला जोड देत श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र 2017 मध्ये सुरु केले. जवळपास गेली 7 वर्ष ते चालवत आहेत.
श्री स्वामी समर्थ पोळीभाजी केंद्र आपटे हे वर्षभर चालवतात. रोज दुपारी 12 ते 2.30 या वेळात तीन ठिकाणी हे केंद्र सुरु आहे. सहकार इथे सातव हॉल, कुमठेकर रस्ता आणि सारसबाग इथे हे केंद्र सुरू असते. विशेष म्हणजे ते हे सगळं समाज कार्य म्हणून करत आहेत.लोकांसाठी काही तरी देणं लागतं, या भावनेतून ते पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. गरीब हमाल लोकांना कमीत कमी खर्चात चांगलं जेवण मिळावं हा उद्देश असल्याने हा उपक्रम सुरू असून या कामामुळे 15 लोकांना रोजगार मिळत आहे. फक्त 30 रुपयांत हे जेवण देत असून रोज 700 जण भरपेट जेवतात, असंही आपटे सांगतात.दरम्यान, प्रत्येक दिवशी वेगळा मेनू असतो. यामध्ये पोळी भाजी, चटणी आणि भात असं एकवेळचं पोटभर जेवण दिलं जातं. बुधवार आणि गुरुवारी मेनू ठरलेला आहे. बुधवारी पोळीभाजी करणाऱ्या महिलांना एक दिवस सुट्टी मिळावी हा उद्देश असतो.या दिवशी पावभाजी आणि पुलाव हा मेनू असतो. तर गुरुवारी स्वामींचा प्रसाद म्हणून पिठलं – भाकरी, खिचडी आणि खर्डा असा मेनू असतो. या दिवशी वेगळा मेनू असल्याने 1 हजार लोकं जेवतात. इतर वेळी ही संख्या 700 पर्यंत असते, असंही अनिल आपटे सांगतात.
यांच्या दोन शाखा आहेत ऍड्रेस खालील प्रमाणे वेळ दुपारी 12 ते 2.30 वाजेपर्यंत पण साधारण 3 वाजेपर्यंत चालू असते.

1). स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र कुमठेकर रोड, पेशवाई क्रिएशनच्या समोर, चित्रशाळा चौक लक्ष्मण भुवन मंगल कार्यालय 9011047115

2). श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र सातव मंगल कार्यालय, शिंदे हायस्कूल जवळ, गवळीवाडा, सहकार नगर पुणे

Photo credit - malvani pahunchar यूट्यूब चॅनेल
कॅप्शन क्रेडिट / ibn lokmat...

'दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री'.थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्य...
19/09/2025

'दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री'.
थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्यावर दिसायला लागली आहे याचा खुप आनंद आहे.'राखणदारा' बद्दल नितांत आदर आणि श्रद्धा अजून कोकणात टिकून आहे म्हणूनच 'कोकणातला चाकरमानी म्हूंबयसहून खास राखण देऊक गावाला येतलो'.

कोकणातल्या लोकांची श्रद्धा,त्यांच भावविश्व तिथल्या रूढी परंपरा आणि तिथं होणारा विकास या सगळ्याला अनुसरून कोकण वासियांच्या डोळ्यात म्हणण्यापेक्षा मनांत जळजळीत अंजनाचे दोन थेंब टाकणारा आणि सिनेमाच्या मध्यंतरालाच तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित 'दशावतार' सिनेमा जसा मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा तसा हा सिनेमा प्रत्येकाने बघावा असाच आहे.

सुबोध खानोकर यांच अप्रतिम लेखन,लाजवाब संवाद हा 'दशावताराचा आत्मा' आहे आणि दिलीप प्रभावळकरांचा अभिनय 'दशावताराचा श्वास' आहे.खुपच तगड्या स्टार कास्ट ची फौज घेऊन सिनेमा बनवला आहे.सिद्धार्थ आणि प्रियदर्शनी ची जोडी खुप छान शोभून दिसते आहे.भरत जाधव,सुनील तावडे,अभिनय बेर्डे,गीतकार गुरु ठाकूर,विजय केंकरे यांच्याही भूमिका छान.दिलीप प्रभावळकारांनंतर अभिनयासाठी कुणाच नावं घ्यावं तर ते आहे 'मायकल डिकोस्टा' साकारणारे 'महेश मांजरेकर'.या भूमिकेला पूरक असलेला जॉनर मांजरेकरांच्या ठाई अगोदरपासूनच आहे.त्यामुळे मांजरेकरांची एंट्रि त्यांना साजेशी अशीच आहे.मांजरेकरांसारख्या हायव्होल्टेज पर्सनॅलिटीची एंट्री सिनेमाच्या मध्यांतरा नंतर होते आणि तरीही मी प्रभावळकरां नंतर अभिनयाच्या बाबतीत मांजरेकराचं नावं घेतोय यावरून दिग्दर्शकाने या भूमिकेचा प्रोटोकॉल किती काळजीपूर्वक सांभाळलाय आहे हे लक्षात घ्या.

दशावतार हा फक्त दोघांचाच सिनेमा आहे एक या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि दुसरे 'बाबुली मिस्त्री' म्हणजेच सशक्त अभिनयाचे भीष्माचार्य CAPTAIN OF THE SHIP दिलीप प्रभाळकर.अतिशय आव्हानात्मक आणि शारीरिक दृष्ट्या चॅलेंजीग असलेला 'बाबुली मिस्त्री' प्रभाळकरांनी अजरामर केला आहे.हा बाबुली मिस्त्री प्रभावळकरांच्या वाट्याला खुप उशिराच आलाय.ज्या वयात आपल्याला जीवन गौरव मिळायला हवा त्या वयात दिलीप काकांनी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार द्यायला भाग पाडलं आहे.इतका आपल्या सशक्त अभिनयाने फुल्ली लोडेड असा नुसताच बाबुली मिस्त्री नाही तर 'शाश्वत बाबुली मिस्त्री' करून ठेवला आहे.'दशावतार' का बघावा तर तो कोकणासाठी आणि दिलीप प्रभावळकरांसाठी बघावा इतकंच.

काही प्रसंगाची परिणामकता यासाठी व्हिएफेक्स ची मदत घेतली गेलेय ती इतकीही नाही कि दशावतारची तुलना साऊथ इंडियन सिनेमाशी व्हावी.याच व्हिएफेक्स च्या मदतीने चित्रपटाच्या अगदीच सुरवातीला काजवे लुकलूकताना दिसतात पण संपूर्ण चित्रपटभर आपल्या तगड्या लेखणीने आणि संवादाने सुबोध खानोलकर तुमच्या अंतरमनातल्या सुप्त काजव्यांना खाडकन जागे करतात.सिनेमाच्या उत्कंठावर्धक शेवटापेक्षा जास्त परिणामकारक या चित्रपटाचा 'मध्यांतर' झालाय.तुमची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचते कि मध्यांतरात पॉपकॉर्न खायची १० मिनिटांची उसंत सुद्धा नकोशी वाटते.

गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि अजय गोगावलेंच्या आवाजातलं 'रंगपूजा' तुम्हांला नंटरंग मधलं 'खेळ मांडला' या गाण्याची आठवण करून देत.फक्त या एका गाण्यापुरतेच या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक ए.व्हि.प्रफुल्लचंद्र लक्षात राहतात बाकी अजून पुर्ण दशावतार मध्ये प्रफुल्लचंद्रांकरवी सोनं करायच बाकी राहुन गेलंय.पार्श्वसंगीताच्या बाबतीत कोकणच्या मातीच्या अत्तराचा सुगंध मिसिंग वाटला.त्यामुळे अमराठी संगीत दिग्दर्शकाच्या हाती मराठी सिनेमा पडणं म्हणजे मोमोज ला मोदक समजून गोड मानून घेण्यासारखं आहे.असो.कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही आणि चित्रपट म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायॉलॉजि अर्पून बघायची गोष्टच नाही.जर तुम्हांला या लेन्स लावायच्याच असतीलच तर त्या कोकणाकडे पहाताना लावा,'कोकणची रंगपूजा' अजून उजळून निघेल.

हा चित्रपट म्हणजे कोकणचा दशावतार नव्हे,कथेला पूरक संदर्भ म्हणुन या लोककलेची मदत घेण्यात आली आहे.पण या कथेतुन काय सांगायचंय यासाठी लेखक म्हणुन सुबोध खानोलकर आणि त्यांची मित्रमंडळी कमालीची यशस्वी झाली आहेत.

'एप्रिल मे ९९' च्या माध्यमातून रोहन मापुस्करांनी कोकणाला पहिली ट्रॉफी बहाल केली आणि आता सुबोध खानोलकरांनी 'दशावतार' नावाची अजून एक ट्रॉफी बहाल केली आहे.कुर्ला टू वेंगुर्ला ऑन द वे आहे.या आणि अशाच ट्रॉफ्यांनी आमचा कोकणाचा शोकेस दुथडी भरून व्हावंन्दे रे महाराजा.

बाकीचा जा काय चुकला माकला असलाच तर 'राखणदार' बघून घेतलोच.

माहिती साभार ✍🏻प्रसाद बेंडखळे,लांजा.


#दशावतार



   कोकण आणि तिथली निसर्ग संपदा, कोकणातील आंबा, फणस, कोकम, कोकणातल्या भात पिकांच्या जाती, कोकणातील भूताखेतांच्या गोष्टी अ...
19/09/2025


कोकण आणि तिथली निसर्ग संपदा, कोकणातील आंबा, फणस, कोकम, कोकणातल्या भात पिकांच्या जाती, कोकणातील भूताखेतांच्या गोष्टी अगदी जग प्रसिद्ध आहेत.. पण ह्या शिवाय ही कोकणात बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या ही तितक्याच दर्जेदार आहेत.. कोकणातली खाद्य संस्कृती हा तर खूप मोठा विषय आहे.. फक्त मासे आणि भात ही कोकणची खरी ओळख नक्कीच नाही... कोकण, गोवा ह्या पट्यात बऱ्याच अशा भाज्या, फळं आणि मुख्य म्हणजे शाकाहारी पदार्थांची ही जी काही रेलचेल आहे तशी क्वचितच एखाद्या भागात असेल.. अर्थात इथे माझ्यातली कोकण कन्या बोलतेय जी कुठे ही गेली तरी कोकण मनातून कधीच काढू शकणार नाही..🥰..असो.. तर आजचं आपलं हे फळं ही असच खास कोकण आणि गोवा भागात मुबलक प्रमाणात आढळणारे फळं आहे चिबुड..

हे नाव ऐकल्यावर कदाचित पटकन खाण्याची इच्छा होणार नाही नवीन व्यक्तीला पण जे कोकणात वाढलेत किंवा ज्यांना ह्या फळाची चव कळली आहे ते अगदी आवडीने हे फळं खातात..चिबुड हे एक वेल वर्गीय फळं आहे.. दिसायला मोठ्या काकडी सारखे (तवसं), थोडेसे गोलाकार असे हे चिबुड चविष्ट असते.. थोडीफार खरबूज(musk melon) सारखी चव पण तरीही चिबुड जरा खरबूज पेक्षा वरचढच.. साधारण गणपती म्हणजे सप्टेंबर पासून कोकणातील बाजारात हे फळं दिसू लागतं..ह्याची साल एकदम पातळ असते आणि आतमध्ये भरपूर बिया असतात...चिबुड नुसतं खाऊ शकतोच.. त्याच बरोबर चिरून मीठ किंवा साखर घालून ही छान लागतं.. आमच्याकडे चिबुड घरी आला म्हणजे चिबुडाची कोशिंबीर ही अगदी ठरलेली असते.. बारीक चिरलेला चिबुड, घट्ट सायीच ताजं दही, मीठ, साखर आणि तूप जिरे मिरची घालून केलेली फोडणी घालून मस्त मिक्स करायचं की मग जेवणाला बाजूला करून पोटभर ही कोशिंबीर खाऊन ही आत्मा तृप्त होतो.. उपवास असेल तर आणि यथेच्छ खायचं असेल तर चिबुड हा एक छान पोटभरीचा ऑप्शन आहे...छान गोडसर चवीच हे सुवासिक फळं पोटाला थंडावा देतं... आणि समजा जर चिबुड पाणचट निघाला तरी फेकून द्यायचा नाही बरं.. त्या गरात मस्त खमंग भाजणीचे पीठ घालून खरपूस अशी थालिपिठ बनवायची.. आणि आता थालिपिठ खायचं म्हणजे ताजं पांढर लोणी आणि चटणी लोणचं तर लागतच हो की नाही..🤪

ऑक्टोबर च्या कडकडीत उन्हात दुपारी फॅन खाली बसून नुसती साखर पेरणी केलेला चिबुड म्हणजे पोटाला आणि मनाला मस्त गारवा... वामकुक्षी न घेणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ही मग मस्त साखरझोेपेची स्वप्न पडू लागतात...पण लहानपणी खाल्लेल्या चिबुडाला जो एक गोडसर असा सुगंध असायचा तो हल्ली कमी झालाय हे अगदी प्रकर्षाने जाणवलं... पूर्वी घरी चिबुड पिकलाय हे अगदी ओटीवर सुद्धा जाणवायचं हल्ली मात्र तो त्याचा घमघमाट तेवढा राहिलेला नाही... कदाचित मला जो बाजारात मिळाला ते वाण वेगळं असेल... तर मंडळी ह्याच्या नावाकडे फारसं लक्ष न देता चिबुड एकदा तरी चाखला पाहिजेच.. कोकणात गेलात ह्या दरम्यान तर आवर्जून हे फळं खाऊन पहा नक्की आवडेल...

माहिती साभार ✍🏻 __सौ. अलका ओमप्रकाश...

19/09/2025

"दशावतार" हा फक्त एक चित्रपट म्हणून पाहू नका कोकणकरांनो..आपली गावं वाचवण्यासाठी आता तरी जागे व्हा....!

Address

Rajapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजापूरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share