13/10/2025
*“हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नव्हे, तर समाजातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कार्याचा सन्मान”*
*ज्ञानराज माणिक प्रभू यांच्या हस्ते ‘समाज स्नेह पुरस्कार’ स्वीकारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक*
पुणे : “ब्राह्मण जागृती सेवा संघ पुणे यांच्यावतीने ' समाजस्नेह ' पुरस्कार दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. ज्ञानराज माणिक प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. या पुरस्काराचे पावित्र्य वाढले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. हा पुरस्कार मी समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना समर्पित करतो.” अशी कृतज्ञता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हा पुरस्कार समाजातील एकोपा, सामाजिक समरसता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आहे. पुरस्कार घेण्यासाठी मी पात्र आहे की नाही, हे मला माहिती नाही. मी आतापर्यंत कोणतेही काम पुरस्कार मिळवण्यासाठी केलेले नाही. जे काही केलं ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच केलं आहे. पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. अशा प्रकारचे पुरस्कार समाजाची आणि काळाची गरज आहेत.”
ते पुढे म्हणाले, “जिथे संकट असेल तिथे एकनाथ शिंदे असतो. इर्शाळवाडीचे संकट असो, कोल्हापूर-महाड-चिपळूणचा महापूर असो, किंवा उत्तराखंड, केरळमधील मदतकार्य असो आम्ही तिथे जाऊन काम केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते, त्यांच्या मदतीसाठी मी तिथे पोचलो आणि त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणले. त्यांना माझा आधार वाटला.”
“सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास सोपा नव्हता. तो संघर्षमय होता. शेतकरी-वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतकऱ्यांवरती आलेल्या आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. पूरग्रस्तांचे दुःख दूर करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. काही दिवसांपूर्वी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज आम्ही जाहीर केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हे दिलेले अभिवचन आम्ही पूर्ण केले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
“लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. आम्ही जे बोलतो ते करतो. मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवण दिली आहे. कार्य करताना कधीही जात-धर्म आडवा आला नाही,” असेही ते म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे यांनी ब्राह्मण समाजातील शिक्षक मनोहर जोशी सरांना मुख्यमंत्री केले होते. जोशी सर मला म्हणाले होते की, ‘एक दिवस तू नक्की मुख्यमंत्री होशील.’ आनंद दिघे साहेबांनीही असेच भाकीत केले होते,” असे सांगत शिंदे यांनी आठवणी जागवल्या.
“मी केलेले काम राज्यासमोर आहे. जनतेच्या सेवेसाठी मी रात्रंदिवस झोकून दिले आहे. लोकाभिमुख कामामुळेच महायुतीला 232 जागा जिंकता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत आहेत, तर देश पुढे नेण्याचे काम मोदीजी करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा मला विश्वास आहे,” असे शिंदे म्हणाले.
“देशाच्या सुरक्षेबाबत मोदींनी कधीच तडजोड केली नाही. पाकिस्तानलाही चांगला धडा शिकवला आहे. राज्याच्या विकासात मोदी आणि अमित शाह यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्राह्मण समाजाचे योगदान विसरता येणार नाही. राज्यात जातीपातीच्या भिंती उभ्या राहता कामा नयेत,” असे ते म्हणाले.
“परशुराम आर्थिक विकास मंडळाला चालना देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. ब्राह्मण जागृती सेवा संघ प्रामाणिकपणे काम करत आहे,” असा गौरवोद्गार त्यांनी काढला.
“आज दिलेल्या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणालाही आत्महत्या करावी लागू नये, म्हणून 100% फी सरकार देणार आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.
“माझ्या वाढदिवशी तब्बल साडेसात हजार मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या आहेत. मी दोन्ही हातांनी देण्याचेच काम केले आहे. सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’ आणि डेप्युटी सीएम म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ मी स्वतःला तसेच समजतो,” असे त्यांनी सांगितले.
“सत्तेत असताना सगळे ओळखतात, पण सत्ता गेल्यानंतरही लोक सोडून जात नाहीत, हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते. सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी माणिक प्रभू संस्थानचे अधिपती सिद्धगुरू ज्ञानराज माणिक प्रभू महाराज, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, उद्योगरत्न सिद्धार्थ गाडगीळ, फायनान्स इन्फ्लुएन्सर रचना रानडे, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अंकित काणे, ईशानी जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.