29/05/2026
ऑपरेशन सिंदूर च्या यशाचे रहस्य काय ???
९ ते १० मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने चीन आणि तुर्कस्थानी ड्रोन आणि मिसाईल यंत्रणेच्या बळावर रात्रीच्या काळोखात पाकिस्तानने एकाच वेळी ६०० हून अधिक ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स सोडली. त्यांचा अंदाज होता की एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी हल्ला केला तर भारताची यंत्रणा गोंधळेल, कुठेतरी फट पडेलच. पण पहाट होईपर्यंत एकही हल्ला लक्ष्यापर्यंत पोहोचला नव्हता. सर्वच्या सर्व ड्रोन, मिसाईल आणि क्षेपणास्त्र हवेतच भेदली गेली आणि उध्वस्त झाली. पाकिस्तान ने हल्ला करताना भारतातील मुख्य शहरे , नागरी वस्ती , वैष्णोदेवी मंदिर , ताजमहाल हे टार्गेट ठेवले होते परंतु भारताच्या हवाई यंत्रणेने शंभर टक्के यश मिळवत सगळी शस्त्रे निष्प्रभ केली. भारताच्या जमिनीवर एकही ओरखडा उमटला नाही.
याचा परिणाम असा झाला की चीन आणि तुर्कस्तान दोघांनाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. इस्रायल अमेरिका आणि यूरोपियन देश स्वतःला तंत्रज्ञानात अग्रणी समजत होते ते अक्षरशः थक्क झाले. इतके निर्भेळ यश भारत मिळवू शकेल. भारत इतका तांत्रिक प्रगत आहे हे त्यांना धक्का देणारे सिद्ध झाले.
हे असं कसं घडलं? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सव्वीस वर्षे मागे कारगिल युद्धात जावं लागेल. आपण ते युद्ध जिंकलो, पण त्या युद्धात आपली प्रचंड प्राणहानी झाली. त्या युद्धाने भारताच्या सैन्याची एक फार मोठी उणीव उघड झाली. युद्धकाळात सेना, हवाई दल आणि नौदल हे तिघेही आपापल्या परीने लढत होते. परंतु त्यांचा परस्पर संवाद नव्हता आणि ही तिन्ही दले एकत्रित आणि समन्वय साधून लढत नव्हती. एकमेकांना काय घडतंय हे कळायला तास लागायचे. त्यामध्ये प्रशासकीय दिरंगाई होत होती. फोन करा, लेखी आदेश पाठवा हे प्रकार सुरू असायचे आणि युद्धात एक एक क्षण महत्वाचा असतो या दफ्तर दिरंगाईमुळे भेदक आक्रमण करण्याच्या आणि निर्णायक विजय मिळवण्याच्या अनेक संधी निघून गेल्या. कारगिल रिव्ह्यू कमिटीने हे सरकारला स्पष्ट सांगितलं आणि त्यानंतरच तिन्ही सैन्यदलांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जाऊ लागल्या.
याला खरे मूर्त स्वरूप प्राप्त झाले २७ फेब्रुवारी २०१९ ला. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, जेव्हा आकाशात भारत-पाक लढाऊ विमानांमध्ये चकमक सुरू होती, तेव्हा श्रीनगरजवळच्या आपल्याच Spyder बॅटरीने आपलंच Mi-17 V5 हेलिकॉप्टर पाडलं. सहा जवान शहीद झाले. कारण एवढंच होतं की ते हेलिकॉप्टर आपलंच आहे हे बॅटरीला सांगणारी कुठलीही यंत्रणा नव्हती. त्या दुःखद घटनेने भारताला आतून हलवलं आणि बदलाची चाकं वेगाने फिरू लागली. त्यातून तीन यंत्रणा निर्माण केल्या गेल्या.
आकाशतीर ही सेनेची यंत्रणा. DRDO आणि ISRO च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली अत्यंत बुद्धिमान यंत्रणा, BEL ने बांधलेली. हिमालयाचे उंच डोंगर असोत, राजस्थानचं वाळवंट असो किंवा सीमेलगतचं शहर अगदी कुठेही तंबू ठोकून कार्यरत होण्याची या यंत्रणेत क्षमता आहे. तिच्यावर तापमान आणि प्रतिकूल निसर्ग यांचा काहीही परिणाम होत नाही.
IACCS ही हवाई दलाची यंत्रणा संपूर्ण भारताच्या आकाशावर नजर ठेवण्याचे काम करते. हवेत उडणारी प्रत्येक गोष्ट क्षणार्धात टिपायची, AI च्या मदतीने ती आपली आहे की परकी हे ओळखायचं आणि योग्य त्या यंत्रणेला रोखण्याचा हुकूम द्यायचा हे तिचे मुख्य कार्य. ऑपरेशन सिंदूरमध्ये निम्म्याहून अधिक हल्ले याच यंत्रणेने थोपवले.
त्रिगुण हे नौदलाचं अभेद्य शस्त्र आहे. सगळ्यात कमी चर्चिले गेलेलं परंतु तितकंच महत्त्वाचं हत्यार. समुद्राच्या दिशेने येणारा धोका जमिनीवरच्या रडारला उशिरा कळतो नेमकी हीच उणीव त्रिगुणने भरून काढली. जहाजांवरचे सेन्सर्स, किनाऱ्यावरचे रडार, समुद्रातली हालचाल हे सारं एकत्र करून सेना आणि हवाई दलालाही दाखवायचं. त्यामुळे कुठल्याही दिशेने आलेला हल्ला तिन्ही दलांना एकाच वेळी दिसतो.
या तिन्ही यंत्रणांनी एकत्र काम केलं आणि त्या रात्री पाकिस्तानचा एकही वार भारताला स्पर्श करू शकला नाही. आपण कारगिलच्या जखमेतून धडा घेतला, बालाकोटच्या दुःखातून शक्ती घेतली आणि शांतपणे, चिकाटीने काम करत राहिलो. जगाला माहीतही नव्हतं आणि भारताने आपली अदृश्य ढाल उभी केली होती.
भारताच्या या अद्वितीय यशाची गाथा इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धात अधिकच झळाळून उठली आहे. कारण इस्रायल आणि अमेरिकेच्या समस्त हवाई सुरक्षा यंत्रणा इराण आणि चीन ने दिलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भेदून दाखवल्या आणि इस्रायल आणि अमेरिकेचे प्रचंड नुकसान केले परंतु याच चीन आणि तुर्कस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारताने 100 % निष्प्रभ करून दाखवले. थोडक्यात आजच्या आधुनिक ड्रोन आणि मिसाईल युद्धात आपण इस्रायल आणि अमेरिकेच्या पेक्षाही तांत्रिक दृष्ट्या सरस आहोत हे आपण सिद्ध केले आहे.