
14/07/2025
ज्ञानपथ पब्लिकेशन प्रकाशित Arati zoting लिखित कविता संग्रहला आदरणीय साहित्यिकांचा मिळत असलेले प्रतिसाद
आपनही एकदा वाचावा असा कविता संग्रह
ऍमेझॉन वर उपलब्ध
https://amzn.in/d/3PAJZUq
मनकवडसा …..!
मन म्हणजे काय हे अजूनही कोणाला उमगलेलं नाही पण ते आहे हे तर सगळ्यांना ठाऊक आहे.या मनात काय काय चाललं असतं हे देखील एक आश्चर्य आहे.
' मनकवडसा ' या काव्य संग्रहात आरती झोटिंग यांचे मनच कागदावर शब्द रूपाने अवतरले आहे. काव्याचे विषय जसे वेगवेगळे आहे तसेच प्रत्येक काव्यानुसार अक्षरांचा साज देखील चढला आहे आणि काव्य अलंकृत झाले आहे हे निश्चित.
मनकवडसा म्हणजे मनाचं उमटलेलं प्रतिबिंबित स्वरूप! प्रतिबिंबित स्वरूप इतके सुंदर असेल तर प्रत्यक्ष काव्य,अर्थासह किती अप्रतिम असावं याची कल्पना येते. काव्य वाचन करताना प्रत्येक शब्द जिथल्या तिथे चपखल बसला आहे हे जाणवत राहतं आणि एक एक पान पुढे जाताना मन मात्र मागे कुठेतरी रेंगाळत राहतं.
शब्दात आणि अक्षरात मन हरवून जातं.अक्षर असं असावं असं मनात राहून राहून वाटतं.ती एक कला आहे आणि कलेची साधना आहे याचा प्रत्यय वारंवार येतो.कवितेनुसार वेगवेगळी वळणं,आकार घेत अक्षरं आणि भाव साकारला आहे.प्रत्येक पानावर असलेल्या चित्रात मन अलवारपणे गुंतून जातं.
कविता मनातून फुलते,बहरते आणि मग मनाला आनंद देते.कवीला आणि वाचकांना त्या आनंदाची सुखद जाणीव होते.आनंद,दुःख,हुरहुर,कौतुक, प्रेम,विरह, माया, भक्ती,मैत्री,विश्वास,निसर्ग,मन,असे अनेक पदर उलगडत काव्य समृद्ध होते.काव्य लेखनातून काही अनमोल संदेश देखील कवयित्री सहजतेने देऊन जाते आणि मनात सकारात्मकता पेरून जाते हे निश्चित.विविध उपमा,शब्द सौंदर्य ,शब्द माधुर्य मनाला सहज भावते.
मा.भारत सासणे यांची प्रस्तावना तसेच सुप्रसिद्ध जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका मा.शुभांगी यांच्या शुभेच्छा तसेच सुलेखनकार श्री सिद्ध चिलवंत यांच्या कल्पकतेने एका सुंदर काव्य संग्रहाची निर्मिती झाली आहे .मा.प्रभाकर तांडेकर यांचा ब्लर्ब म्हणजे कौतुकाची पावतीच म्हणता येईल.
मनातले हे कवडसे जीवनाच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळे भासले आणि लेखणीतून ते साकार झाले. पहिल्याच काव्य संग्रहाने एक दमदार पाऊल टाकलं आहे एकूण एकशे दहा विविध काव्यांची माळ इथे गुंफली आहे आणि प्रत्येक विषय उत्तम आहे .
पहिलेच काव्य ' चक्रपाणी ‘ यातून कवयित्री घेई सांभाळूनी अशी आग्रही विनंती करून जाते. दिंडी आणि रेणुका आई ',अभंग ही भावभक्तीने परिपूर्ण रचना मंत्रमुग्ध करून जाते. डोळ्यांसमोर एक सुंदर चित्र साकार होते हे निश्चित…
तर ' पाऊस' ,' ये रे घना ‘,' पाऊस आणि पुरुष ',' पाऊस आठवांचा ‘,सरता आषाढ, ' श्रावण ‘ ,या कवितेतून मन चिंब भिजून जातं.' घर ' पहिलीच ओळ मनाला अक्षरशः घेरून टाकते.
“ सवड मिळताच जरा जिवाला,घेतला सारा पसारा आवरायला .. घराचाही अन् मनाचाही “ वाह क्या बात हैं है! असेच मन म्हणून जाते. प्रत्येक व्यक्तीची मनाची द्विधा अवस्था नेहमी अशीच असते याची जाणीव इथे होते. ' माय व ,' माहेरची आठवण ' ,' आई ' या कवितेतून खरोखरीच सुखाची शिंपण झाली आहे . कारण आई सारखे दुसरे कोणीही असूच शकत नाही हे सत्य आहे.
मुक्तछंदात अवतरलेली ‘ कोरं पान ' आणि वहीत जपून ठेवलेलं ' विद्येचं पान ' म्हणजे खरोखरीच स्मृतींची साठवण आहे .कविता वाचताना आपण देखील भूतकाळात सहज एक फेरफटका मारून येतोच. ' वात ‘ मधून
' कुणा दीर्घायुष्य लाभो म्हणून…जळतात स्वतः वाती ' वास्तवाचे चित्रण किती सहजतेने उलगडले आहे नाही का?...
' हे निसर्गा ', यात प्रत्येक कडव्यातील अखेरची ओळ घेऊन पुढच्या कडव्याची सुरवात केली आहे. हा प्रयोग पण उत्तम साधला आहे.' उधाण ‘, रानजाई काव्य रचना निसर्गाच्या सान्निध्यात सहज घेऊन जाते. ' असोशी ' काव्यातील तरंगावर मन सहज हिंदोळा घेऊन आले आणि यातील
' मन कान्हा तन राधा,
देह रास रंगी न्हाला '
राधा कृष्णाच्या अतूट प्रेमाची साक्ष या दोन ओळीत सामावल्या आहेत ही अनुभूती आली.
' शृंगार ‘, रुदन आणि ' अंगार देहीचा ‘ गझलेचा बाज अप्रतिम साधला आहे…' पुनर्भेट ‘ मधल्या
‘ मीही मग उसवल्या
मनातल्या निरगाठी
आपल्या नात्याच्या
पुनरुज्जीवनासाठी ‘ एक महत्त्वाचा संदेश नव्या पिढीला देणारे हे कडवे निश्चित मोलाचे आहे.
चंद्रबिंब, चांदणे, शारदरात , मधुमिलन,आस या कवितेतून कवयित्रीची काव्य प्रतिभा सहज फुलली आहे चंद्र चांदण्यात ती सहज रमते…' निळ्या अंगणी शिंपला मोत्यांचा सडा ' असे म्हणून वातावरण धुंद होऊन गेले आहे.
परिवर्तन प्रबोधिनी अमरावती यांच्या वतीने ' अंतरंग ' या काव्याला पुरस्कार प्राप्त झाला आहे हे विशेष अभिनंदनीय आहे.'
अंतरंगीचे शांत तरंग
शिकवून जातात'सृजन' भाषा ' खरोखरीच ही एक सत्यता आहे हे मान्य करायलाच हवे.
' स्त्री ' या काव्यातून ' ती एक गरज गरजेपुरती ' मनाला एक वेदना देऊन जाते पण ते वास्तव आहे याची जाणीव होते.' गुलमोहर ' फुलतो तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि धरतीवर केशरसडा शिंपून जातो .काव्य संग्रहाचा शेवट करताना ' प्रवास परतीचा ' ही काव्य रचना खरोखरच जीवनाच्या प्रवासाची आठवण करून देते आणि त्याबरोबरच ' असू दे खांद्यावरी तुझा हात ' ही मनापासून मागणी मागताना कवयित्री भावनेत हरवून जाते.
मनधरणी,धुंद सांजवेळी, फुलपाखरू ,पाऊलवाट अशा उत्तम विषयांच्या इतर देखील कविता आहेत. एकूण एक नितांत सुंदर असा काव्य संग्रह हाती आला याचे समाधान कवयित्री आणि वाचक दोघांनाही आहेच. विविध प्रकारचे सुलेखन यामुळे या संग्रहाला एक वेगळेपण निश्चित मिळाले आहे. मुखपृष्ठ देखील अप्रतिम आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित कवयित्री आरती झोटिंग यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा !
काव्य संग्रह - मनकवडसा
कवयित्री - आरती झोटिंग
प्रकाशक - ज्ञानपथ पब्लिकेशन.
मूल्य - ३५०/
पुस्तक परिचय -
संगीता वाईकर
९९२२५०४७९४
नागपूर