08/06/2026
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून एक अपहरणाचा थरारक प्रकार समोर आला आहे. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंडे यांचे ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांचा वाढता तपास आणि दबाव पाहून आरोपींनी अखेर त्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सोडून पसार होणे पसंत केले. या हायप्रोफाईल अपहरणाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
४ जून रोजी झाले होते अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार तुकाराम मुंडे (रा. परळी वैजनाथ) हे ४ जून २०२६ रोजी दुपारी आपले काम आटोपून घरी परतत होते. याच दरम्यान वाटेत तीन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले आणि बळजबरीने एका चारचाकी वाहनात डांबून त्यांचे अपहरण केले. या घटनेनंतर अपहरणकर्त्यांनी मुंडे यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल ५ कोटी रुपयांच्या अवाढव्य खंडणीची मागणी केली होती. या धक्कादायक प्रकारामुळे मुंडे यांच्या परिवारासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून बीड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली होती. पोलिसांचे पथक विविध ठिकाणी छापे टाकत थेट अमरावतीपर्यंत पोहोचले होते.
दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवनदान
पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागल्याची चाहूल लागताच घाबरलेल्या आरोपींनी ७ जून रोजी तुकाराम मुंडे यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यांना धोत्रा गावाजवळील एका सुनसान रस्त्यावर सोडून पळ काढला. रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत असलेल्या मुंडे यांनी मदतीसाठी हाक मारली.
त्याच वेळी त्या मार्गावरून दुचाकीने जाणारे आंजदा येथील रहिवासी प्रसन्ना घेमराज मांढवकर यांनी मुंडे यांना पाहिले. मुंडे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीतरी गंभीर घडल्याचे मांढवकर यांच्या लक्षात आले. त्यांनी मुंडे यांची विचारपूस केली असता त्यांनी घडलेला सर्व आपबीती सांगितली. प्रसन्ना मांढवकर यांनी तातडीने मुंडे यांना आपल्या दुचाकीवर बसवून हिंगणघाट पोलिस ठाण्यात आणले. हिंगणघाट पोलिसांनी घटनेची दखल घेत परळी वैजनाथ पोलिसांशी संपर्क साधला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुंडे यांना पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात दिले आहे.