25/06/2025
॥ बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद ॥
इंद्रजित भालेराव यांच्या तीन बालकविता संग्रहांची ओळख - फारूक एस.काझी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
इंद्रजित भालेराव. नाव वाचताच शब्दांची एक अनोखी लयबद्ध कलाकुसर डोळ्यासमोर येते. त्यांची कविता म्हणजे सहजता आणि आशयगर्भता यांचा एक अनोखा संगम. गाव, निसर्ग, गावपांढरी,निरागस माया, पाखरं, गुरं आणि निसर्गाच्या कुशीत वसणाऱ्या चराचराला आपल्या कवितेत शब्द म्हणून पेरणारे एक प्रतिभावंत कवी. त्यांची प्रत्येक कविता ही जणू त्यांची एखादी आठवण तरी असते किंवा त्यांच्या आतीव इच्छेला दिलेलं शब्दरूप तरी असतं. ते कविता लिहित नाहीत तर जगत असतात, असंच वाटत राहतं. त्यामुळे वाचक त्या कवितेत हरवून जातो. ते सातत्याने आपलं बालपण, तो काळ, ते निर्व्याज प्रेम आणि ती निर्मळ माया शब्दांत पेरत असतात.
नुकतेच इंद्रजित भालेराव सरांचे मुलांसाठीचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजी नगरकडून हे तीनही अत्यंत सुंदर निर्मिती असणारे कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.तीनही पुस्तकांसाठी चित्रकार म्हणून प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी अत्यंत सुंदर अशी चित्रं दिली आहेत. मुखपृष्ठ आणि आतील चाररंगी चित्रं खूपच बोलकी आणि आकर्षक झाली आहेत. या पुस्तकांवर खूप मेहनत घेतली गेल्याचं जाणवतं.
१. रानमळ्याची वाट
घरातील एखादी मोठी व्यक्ती लहान मुलाला हाताला धरून शेतात घेऊन जाते. तिथली पिकं, झाडं, फुलंपाखरं, प्राणी आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं लयबद्ध भाषेत सांगू लागते. तेव्हा तीच कविता होऊन जाते. शब्दांची लय आपोआप ओठांवर रेंगाळू लागते आणि मन रानभर विहरून येतं. अख्खं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. मग वाचक गावातील असो की शहरातील. कारण भालेराव सरांना पक्कं ठाऊक आहे, आपल्या प्रत्येकाची नाळ निसर्गाशी जोडली गेली आहे. आपण शहरात जरी वसलो तरी निसर्ग तुम्हाला सतत हाकारत असतो. आणि आपणही वेळ मिळेल तसं निसर्गाच्या कुशीत विसावत असतो.
हा कविता संग्रह एका अद्भुत अशा निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती देतो. याच्या प्रत्येक कवितेत निसर्गाची ओढ आहे, त्याला भेटण्याची आस आहे आणि मुलांना याचा अनुभव देण्याची एक आंतरिक इच्छाही आहे.
वाट नव्हे ही कूस मायेची
मातीच्या काळ्या कायेची
ओढ मला घनदाट, रानमळ्याची वाट
शीर्षक कवितेतील या ओळी पाहा. माती, वाट यांच्याशी मायेचं नातं जोडलं गेलं आहे. निसर्ग आई आहे. आणि गावाकडे तो अजूनही शाबूत आहे. त्याचीच ओढ कवीला सतत लागली आहे. वडाला आजवर पुराणपुरुष म्हणून अनेकदा उल्लेखलं गेलं आहे. परंतु या संग्रहात ‘वडमाऊली’ अशा शीर्षकाची कविता येते. आणि विठ्ठलाप्रमाणे वडाला माऊली का म्हटलं गेलंय त्याची प्रचिती येते.
दूरदुरून यायचे
तान्हेजले भुकेजले
नित्य देतच जाणारे
हात इथे निपजले
‘गावाकडचे घर’ कवितेतल्या या ओळी लक्ष वेधून घेतात. ग्रामीण जीवनात दानतीची वाणवा नाही. माया असो की घासातला घास काढून देणं असो, मानवी नातेसंबंधांची वीण कवितेत जाणवल्याशिवाय राहत नाही. कुणाला या कविता ग्रामीण वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या कविता वैश्विक आहेत. यातील प्रत्येक भावना आणि त्यांचा गोडवा वैश्विक आहे.
‘शेळीचं पिल्लू’ नावाची एक अतिशय गोड कविता यात आहे. मुलांना प्राण्यांची किती ओढ असते याचा अनुभव आपण सर्वजण घेतच असतो. मुलांची घरातल्या कोकरा, वासरांवर, कुत्र्या-मांजरावर, कोंबड्यावर अत्यंतिक माया जडलेली असते. त्यांना जणू त्यांचा खेळगडीच मिळालेला असतो. ते सतत त्यात रमलेले असतात. या संग्रहात अशाच आशयाच्या पोळा, गाय, दारात आली कपिला या कविता आल्या आहेत. आपल्याकडे काही कल्प कथा प्रसिद्ध असतात. तशाच आशयाच्या ‘मोराचे पाय, भाऊ हरपला’ या दोन कविता एका वेगळ्याच अनुभवाची चुणूक दाखवतात.
निसर्ग म्हटलं की पाऊस आलाच. या संग्रहात पाऊस विविध रुपात येतो. भेटतो. ‘पाऊस’ कवितेत कधी ओढ लावताना दिसतो तर कधी ‘झड’ कवितेत बाप हरपलेल्या पोराच्या आईच्या काळजीच्या रुपात भेटतो. ‘ये रे ये रे पावसा’ या कवितेत तो पारंपारिक गीताची ढब घेऊन येतो.
म्हातारी लई खट खट खट
म्हणून लवंगा तिखट तिखट
“आरिंग मिरिंग’ या लोकगीतांशी जवळचं नातं सांगणाऱ्या कवितेत खूप मजा लपली आहे. यात अर्थाचं ओझं नाही. लयीची फोडणी आणि लोकगीतांच्या गोडव्याची खडीसाखर जरूर आहे. ‘गाऱ्या गाऱ्या भिन्गोऱ्या’ ही कविता तसाच आनंद घेऊन येते. पारंपारिक लोकगीतांची मजा अनुभवायची असेल तर या कविता जरूर अनुभवल्या पाहिजेत. या संग्रहात ‘कोडं’ नावाची एक भन्नाट कविता आहे. पालकांनी मुलांसोबत ही कविता अनुभवली पाहिजे.
रातभर मामा
पाजळला
सकाळ होताच
काजळला
ही कविता खरंच एक अनोखं कोडंच आहे. वाचताना मजाही येते आणि नेमकं काय ? याचं उत्तर शोधण्याची घाईही झालेली असते. लोकसंस्कृती हा ग्रामीण जीवनाचा अभिन्न भाग. आजही गावाकडे गोंधळ प्रकार चालतो. कवींनी ‘चिमुकला गोंधळी’ उभा केला आहे. हुबेहूब शब्दचित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
शेवटी ‘बालमित्र’ या कवितेचा वेगळा उल्लेख करण्याची इच्छा अनावर होते आहे. शहरात राहू लागलेला मित्र गावातल्या मित्राला भेटतो आणि आनंदासोबत एक वेदनाही घेऊन येतो. हल्ली होत असलेलं गावांचं बकालपण तर कविला मांडायचं नसेल ? शहरी सुखवस्तू जीवन जगताना गावातील मित्राच्या दारिद्र्याची, त्याच्या हालअपेष्टांची टोचणी त्याला सुख अनुभवू देत नाही. ही कविता वाचताना पापणी ओली होते. गावाच्या सौंदर्यासोबतच तिथल्या हलाकीच्या जीवनाची एक झलक या कवितेतून होते. या संग्रहात आलेले शब्द पाहा- कुपाटी, उन्हाचा कार, सुईसाट, डोळ्यांची कोर, मातला, लवणे, खोडा घालणे, पांद, सांद, लोळी, वशिंड इत्यादी. ‘शेळीचं पिल्लू’ या कवितेत तर तब्बल चौदा क्रियापदांचा कल्पक वापर केलेला आहे. हे भाषिक सौंदर्य तर मराठीच्या मुळच्या देखण्या रुपड्यात आणखीनच भर घालतं. अभिजात मराठी ही मराठी आणि तिच्या भगिनींनी मिळून तयार झाली आहे. तेव्हा त्या भाषा भगिनींचं सौंदर्य अनुभवण्याची संधी या कवितांच्या रूपाने मिळते.
मुलांनी स्वत: वाचून अनुभवावा, मोठ्यांनी वाचून दाखवावा, इतरांना वाचायला द्यावा असा गोड आणि मनात खोलवर रुंजी घालणारा हा कवितासंग्रह!
.........................
२. गाणे गोजिरवाणे
मराठी भाषेत मुद्रणकला येण्याअगोदर मोठी मौखिक साहित्य परंपरा आढळते. लीळाचरित्रातील काऊ-चिऊची गोष्ट पहिलं बालसाहित्य मानलं जातं. याचा अर्थ त्याकाळी बाल साहित्य जनमानसात प्रचलित होतं. परंतु त्याला मौखिक परंपरा होती. या परंपरेत अनेक गीतं महाराष्ट्रभर गायली जात. आजही त्यातली बहुतांश गीतं मोठ्या प्रमाणावर गायली जातात. त्यांचं चिरंतन मूल्य आजही टिकून आहे. अशा लोकगीतांनी लयबद्ध पद्य रचनेला वाट दाखवण्याचं काम केलं आहे. या गीतांचे रचयिता जरी अज्ञात असले तरी त्यांनी या गीतांत अनेक शक्यतांना जागा सोडली आहे. रचनाकार आपल्याला हव्या त्या ओळींची भर त्यात घालू शकतो. त्याने ती गीतं आणखी एक नवीन रूप धारण करतात. आणि जनमानसांत रुजतात. वाढतात आणि पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरीत होतात.
इंद्रजित भालेराव यांची जडणघडणच मुळात ग्रामीण जीवन, तिथल्या परंपरा, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांच्या कुशीत झालेली आहे. लोकगीतांनी त्यांच्या बालपणात कवी होण्याचं स्वप्न पेरलं असणार. ‘गाणे गोजिरवाणे’ या कवितासंग्रहात हे पदोपदी जाणवतं. हा कविता संग्रह म्हणजे मुलांच्या लोकगीतांचा संग्रह आहे. आजच्या जॉनी जॉनी आणि ट्विंकल ट्विंकलच्या गर्दीत हा अस्सल मराठी भाषिक खजिना कुठंतरी हरवल्यासारखा झालाय. अडगळीत पडल्यासारखा झालाय. परंतु भालेराव सरांनी या गीतांना एका नव्या रुपड्यात मांडून नवसंजीवनीच दिली आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका खास आहे. एका लोकसाहित्याचं पुस्तक एका लोक कलाकाराला म्हणजेच ‘छोट्या गोंधळ्याला’ अर्पण केलं आहे.
एकूण ३१ लोकगीतं यांत आहेत. ही गीतं वाचताना बरेचदा आपण अर्थ शोधण्याचा अट्टाहास करतो. परंतु निरर्थक शब्दाकडून अर्थपूर्ण शब्दांकडे बालकविता जसा प्रवास करते तसंच लोकगीतांचाही प्रवास होत असतो. त्यातूनच लोकोत्तर म्हणी, कल्पकथा, दैवतकथा, भीती कथा, चित्रकथा, कथागीतं जन्म घेत असतात. यात स्थूल विनोदही असतो आणि त्याचबरोबर भाषिक करामतीही घडवलेल्या असतात. लोकगीतात अभिजनवर्गीय भद्र-अभद्र असा भेदही नसतो. अत्यंत स्पष्ट आणि सहज मांडणी असते. त्यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसतं. एक नमूना पाहू ,
भोंगळं रे भोंगळं
कांद्याचं चिंगळ
घाल आता चड्डी
नाहीतर फोडील हड्डी
बाळ जेव्हा चड्डी घालत नाही तेव्हा आई आधी लाडात बोलते आणि मग बेदम मार देण्याची भाषा करते. इथं आई त्याला खरोखर मारणार नसते. पण ती दम भरत असते. हे अस्सलपण लोकगीतांचं खास असं वैशिष्ट्य.
माय मी भेले
चावडीला गेले
चावडीचे लोक
हसू हसू मेले
कावळे मारून
दिवस केले
या गीतात एक लयबद्धपणा आहे. एक मजा आहे. सहज शब्दांची रचना असल्याने सहज गुणगुणता येते. नव्या ओळी जोडण्याची संधीही आहे. यात कावळ्यांना इजा पोचवणे हा हेतू नाही. उलट त्यातून विनोद निर्मिती केली आहे. अकल्पित शब्दचमत्कृती साधली आहे.
ये रे ये रे ढगा
पुढं नगं जाऊ
धान्याची मूठ घेऊन
थांबलाय भाऊ
ये रे ये रे ढगा
खाली भराभरा
बापाच्या डोळ्याला
लागल्यात धारा
ढगाला आर्जव करणारं हे गीत. आपल्या भाऊ आणि बापासाठी ढगाला साकडं घालणारी एक माहेरवाशीण. या गीताला वेदनेची एक किनारही आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर एक वेगळीच मजा आणि एक वेगळाच अनुभव येतो. चित्रांमुळे अजूनच बहार आली आहे. लोकगीतांचा हरवत चाललेला खजिना जपून पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी स्वत:ला मराठी भाषिक म्हणवणाऱ्या आपल्या सारख्या लोकांनी घ्यायला हवी. या संग्रहातील एक शेवटचं गीत,
चकुल्या बाई चकुल्या
चंदनाच्या टिकुल्या
एक टिकली उडाली
गंगेला जाऊन मिळाली
गंगेला आला लोंढा
भिजला माझा गोंडा
या आणि अशा एकाहून एक धम्माल लोक गीतांची भेट भालेराव सरांनी दिलेली आहे. यातील सर्वच गीतं मुलांना आवडतील यात अजिबात शंका नाही. आजोबा आजीची उणीव भरून काढण्याचं काम या कविता निश्चितच करतील. ................................
३. नातूऋतु
साहित्यात साहित्यिकाच्या अनुभवांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. साहित्यिक जे जगतो, भोगतो ते शब्दांत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. भालेराव सरांनी त्यांच्या नातवाला केंद्रस्थानी ठेऊन काही कविता केल्या होत्या. त्या मूळ कल्पनेवर हा कवितासंग्रह बेतलेला आहे. आजोबा, आजी, आई, पपा, आजोळ यांच्या नजरेतून बाळलीळा चितारल्या आहेत. बाळाचा जन्म, त्याचं रांगणं, दुधाचे दात, जावळ, चालणं, दुडूदुडू धावणं, फिरायला जाणं, त्याचा लागलेला लळा, तो नसल्यावर येणारी उदासी या सर्व गोष्टी यात आलेल्या आहेत. एका आजोबांनी नातवाला केंद्रस्थानी ठेऊन केलेला हा मराठीतील पहिलाच कवितासंग्रह असेल.
नातवाच्या जीवनातल्या वाढीच्या काळातले विविध ऋतु इथं अनुभवायला मिळतात. जन्मापासून तो धाऊ लागेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. बाळाच्या वाढीचे ऋतूच म्हणा ना!
बाळ गेला आजोळाला
आजोबांना करमेना
कशी रिकामीच मांडी
हलविती पुन्हा पुन्हा
बाळ गेला आजोळाला
आजोबांना करमेना
बाळा रुसले आजोबा
जरा तातडीने ये ना
नातवाची ओढ आजोबांनी किती मार्मिक शब्दांत व्यक्त केलीय. मुलं जेव्हा या कविता वाचतील तेव्हा त्यांना आपल्या आजी आजोबांच्या प्रेमाची ओळख पटायला सुरुवात होईल. कारण आजोबा बोलून प्रेम व्यक्त करत नाहीत. पण त्यांचं कासावीस मन लेकरांसाठी सतत झुरत असतं.
झाले बोबडे आजोबा
बोले बाळाची बोलणी
नातवाच्या संगेमंगे
आजोबांची उजळणी
या ओळी असोत की, ‘दुधाचे दात’ कवितेतील या ओळी असतील,
नाजूक हिरडीत मोगऱ्याच्या कळ्या
एक एक नव्हे, खाली वरी जुळ्या
आजोबांना नातवाचं वाटणारं कौतुक, त्याच्याविषयीची ओढ या ओळींतून सतत जाणवत राहते. दातांना मोगऱ्याच्या कळ्यांची उपमा भन्नाटच! एक कवी आपल्या अनुभावांना शब्दांत मांडून ते जपून ठेवतो. कवटाळतो, पुन्हा पुन्हा अनुभवतो.
कवी कवितेच्या माध्यमातून बालमानस पण खूप सुंदररित्या उलगडून दाखवतात. मुलांचं जगाला निहाळणं, वस्तू हाताळणं, कागद-पुस्तक फाडून त्याचा आनंद घेणं, पेपर वाचनं या सर्व गोष्टी खूप माजेदारपणे येत राहतात. आणि सर्व कौतुक आजोबा न्याहाळतात आणि शब्दांत मांडत राहतात. आजोबा बाळाचं कौतुक करताना काय म्हणतात,
म्हणतात कसे माझ्याकडं
पाहत एकटक
हाच माझा पेपर
हेच माझं पुस्तक
'जावळं’ या कवितेत दोन ओळी फार मार्मिक आहेत. बाळाच्या भावी आयुष्याची चुणूक त्यात जाणवते.
तान्हेपण सरले माझे
आता वाढेल एकेक ओझे
आयुष्यात पुढे वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची ही चुणूक तर नसेल? असंही वाटत राहतं. या ही कवितासंग्रहात नवनव्या शब्दांची मेजवानी आहे. बिनले, आनंदाचा कंद, आरबळून, महूर, कल्लावान, सैताडला, वर्ख, ठकडा, नुरली, मूळ, पाखवा, साजरं असे अनेक अनोखे शब्द मुलांना समजून घ्यायला मजा वाटेल. हा कवितासंग्रह एक वेगळा अनुभव आहे. लहानांना तर लहानांना पण मोठ्यांनाही आपल्या बालपणाची आठवण करून देईल. या कवितासंग्रहात स्पर्श मातीचा, सीताफळाची गोडी, मळ्याची माती या काही कविता समविष्ट केल्या नसत्या तर या पुस्तकाचा एककेंद्री विषय ओघ टिकून राहिला असता.
एकंदरीत खूप सुंदर आणि आनंदी अनुभव देणारा हा कवितासंग्रह. वाचायला हवा. वाचून दाखवायला हवा. वाचायला द्यायला हवा.
-------------------------------
१. रानमळ्याची वाट (किंमत- १६०/-)
२. गाणे गोजिरवाणे (किंमत १६०/-)
३. नातूऋतु (किंमत १८०/-)
कवी : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर - ८४४६७९६५५७, ८७८८१३८२६०
💐