Aditya Prakashan

Aditya Prakashan Aditya Prakashan , Aboli Appartment , Flat Number - 32 , third floor,New Osmanpura ,Near Citycare Ho

30/07/2025

शेतीमातीची कविता लिहिणारे लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव ‘रानमळ्याची वाट’, ‘गाणे गोजिरवाणे’ आणि ‘नातूऋतू’ या ती...

*इंद्रजित भालेराव यांच्या लोभस बालकविता* ©डॉ. सुरेश सावंत, नांदेड.शेतीमातीची कविता लिहिणारे लोकप्रिय कवी अशी इंद्रजित भा...
06/07/2025

*इंद्रजित भालेराव यांच्या लोभस बालकविता*

©डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

शेतीमातीची कविता लिहिणारे लोकप्रिय कवी अशी इंद्रजित भालेराव यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांच्या बालकवितेतही दगड-माती, झरे-ओढे, पाऊस-पाणी, पशुपक्षी, झाडंझुडपं यांचा वावर अधिक असतो. यापूर्वी त्यांचा 'गावाकडं' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. आता ते 'रानमळ्याची वाट', 'गाणे गोजिरवाणे' आणि 'नातूऋतू' ह्या तीन पुस्तकांचा संच घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत.
'रानमळ्याची वाट' ह्या संग्रहात २२ कविता आहेत. पहिल्याच कवितेत कवीने बाळगोपाळांना रानमळ्याच्या निसर्गरम्य वाटेवरून फिरवून आणले आहे. ह्या कवितेत गुरावासरांवर हिरवी माया पांघरणारी 'वडमाउली' भेटते. बच्चे कंपनीचा आवडता पाऊस भेटतो. झड लागली, की घरात अडकून पडावे लागते. तर कधी कधी हाच पाऊस वाट पाहायला लावतो. मोराचे पिवळे पाय पळवून नेणारी लबाड साळुंकी एका कथाकाव्यात भेटते. दु:खी मोराच्या केका ऐकून वाचकही अस्वस्थ होतो.

ह्या कवितेत आपल्याला एक 'गावाकडचा कवी' भेटतो. तो कवितेचे चाळ पायात बांधून डोंगरमाळ फिरत असतो. कवीच्या पायात जोडा नव्हता, पण काटेच त्याची वाट सोडून बाजूला व्हायचे. या कवीला आपल्या गावाचा अभिमान वाटायचा आणि गावाला ह्या कवीचा अभिमान वाटायचा. म्हणूनच तर..
'माणसं म्हणायची शहाणी सुरती
कवीनं वाढवली गावाची कीर्ती'.
गावाची कीर्ती वाढविणा-या कवीचा गावाला अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे.

शहरातल्या पोराला कवी आपल्या गावी येण्याचे आवतन देतो आणि म्हणतो :
'तू न्याहाळ हिरवी धरती
ये बस ना ओढ्यावरती
मग होशील निसर्गवेडा'.
अशी ही निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी आणि निसर्गाचे वेड लावणारी बालकविता आहे.
पोळ्याचा सण म्हणजे बैलांचा सोहळा. ह्या सोहळ्याचे सुंदर वर्णन असलेली कविता ह्या संग्रहात वाचायला मिळते. ही कविता बैलगाडीच्या सुखद प्रवासाचा अनुभव देऊन जाते. शेताशिवारातील चित्तर पक्षी जिवाच्या आकांताने दीर्घ आवाज काढतो. त्या आवाजाच्या प्रतीकातून कवीने लोकजीवनातील बहीण- भावाच्या ताटातुटीचे सुंदर कथाकाव्य गुंफले आहे.
ह्या कवितेतील बालकाला आकाशातील चांदण्या म्हणजे आपल्या मामाच्या वाड्यातील खंडीभर गाईच आहेत, असे वाटते. रात्रीचा हा चांदवा सकाळी उठून पाहावे, तर गायब झालेला असतो. याचे ह्या कवितेतील भाच्याला खूप वाईट वाटते.

लवंगा तिखट का? याचे उत्तर कवीने आपल्या पद्धतीने शोधून काढले आहे :
'म्हातारी लई खट खट खट
म्हणून लवंगा तिखट तिखट'
आहे की नाही मज्जा!
शहरातील मुलांना 'शिंदोळ्या' हे रानफळ माहीत असण्याची शक्यताच नाही. त्या शिंदोळ्यांची चव ह्या कवितेत चाखायला मिळते. इथल्या मामाच्या मळ्याची वाट मायाळू आहे.
'मामाच्या मळ्याची मऊशार माती
लावावी वाटे मला सन्मानाने माथी'
इतका कवीला ह्या मातीचा अभिमान आहे.
गावाकडे सगळे चांगलेच असते, असे नाही. तिथेही अभावाच्या अनेक जागा आहेत. गावाकडच्या घराची दैना वर्णन करताना कवी लिहितो :
'न्यावे चोरून चोराने
असे नव्हतेच काही
घर पाहून रिकामे
दया येई चोरालाही'.

अलीकडेच कवी इंद्रजित भालेराव आजोबा झाले आणि त्यांच्या आयुष्यात सातवा ऋतू बहरून आला. त्यातून साकारला त्यांचा नवीन बालकवितासंग्रह 'नातूऋतू'. ह्या संग्रहाचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे. नातूऋतू हा प्रत्येक आजोबाच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा ऋतू असतो. त्याचा पुरेपूर अनुभव कवी इंद्रजित भालेराव यांनी घेतला आणि नातवाच्या निमित्ताने आपले सुंदर बालपण पुन्हा एकदा अनुभवले आहे. नातवाने कवीचे आनंदविश्व व्यापलेले आहे. म्हणूनच ही कविता नातवाच्या पायातील घुंगुरवाळा होऊन अवतरली आहे. कवीने आपल्या नातवाला अतिशय जिवीच्या जिव्हाळ्याने ह्या शब्दांत रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
'तू सदैव व्हावा आनंदाचा धनी
हे शब्द टाकितो तुजवर ओवाळुनी'
अशा शब्दांत त्यांनी नातवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बाळाचे पहिले हसू, बाळाचे मोठे मोठे डोळे, बाळाचा उबदार स्पर्श, बाळाचे दुधाचे दात, बाळाची गंगाळातली अंघोळ, बाळाचे रांगणे, पहिले पाऊल टाकणे, बाळाचे मम्मम करणे अर्थात जेवणे, आई आणि आजीच्या दुहेरी वात्सल्यात चिंब भिजलेले बाळाचे बालपण,
बाळाच्या बोबड्या बोलांमुळे आजोबांनी मुद्दाम स्वीकारलेले बोबडेपण, बाळाचे पेपर आणि पुस्तक वाचणे, बाळाचे कवडसे पकडणे, बाळाचे जावळं काढणे, बाळाचे रंगांसोबत खेळणे, कुत्र्याच्या आणि शेळीच्या पिलासोबत खेळणे, खेकडा भज्यांची चव चाखणे, गाडीत बसून आजोबांसोबत गल्लीभर फिरणे, बाळाची पहिली होळी अशा सगळ्या बाळलीलांचे कौतुक करताना आजोबा आणि आजोबांची लडिवाळ कविता मुळीच थकत नाही. बाळ आजोळी गेल्यावर झालेला विरह आणि परत आल्यावर झालेला आनंद ह्या दोन्ही गोष्टी ह्या कवितेत तितक्याच उत्कटतेने उतरल्या आहेत.
'बाळ गेला आजोळाला आजोबांना करमेना
बाळा, रुसले आजोबा जरा तातडीने ये ना'
अशी ती आतुर उत्कटता आहे.

'तांब्याचे गंगाळ। गुलाबाचे पाणी
उघडी नहाणी। बागेतली'
हा बाळाच्या अंघोळीचा आनंदानुभव आहे.
'आई दटावते आणि आजीबाई करी लाड
एक म्हणे बाळ गुणी एक म्हणे बाळ द्वाड'
हा दोघींच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीतील लाडीक फरक कवीने छान टिपला आहे.
'त्याचा स्पर्श वाटे मला कसा फुलाहून फूल
त्याच्यामुळे उमलते रोज माझ्यामध्ये मूल'
हा कवीचा अनुभव बघता बघता सार्वजनिक होऊन जातो.
बाळ रांगू लागले की घरअंगणअपुरे पडते. बाळाच्या रूपात ससाही दिसतो आणि बागडणारा मोरही!
जरा पाय फुटू लागले की हाच बाळ कधी वारकऱ्याच्या रूपात नटतो, तर कधी बाळकृष्णाच्या रूपात नटतो.

बाळाचे पेपरवाचन आणि पुस्तकवाचन म्हणजे काय विचारता!
'एकेकाचे दोन दोन
त्यांचेही करतो तुकडे
चित्राचेही होतात हाल
अर्धे इकडे अर्धे तिकडे'
असे असले, तरी कौतुकाचा धनी होतो तो बाळच.
बाळाच्या हातून झालेल्या लाभ किंवा हानीचा विषय मग अगदीच गौण ठरतो, कारण नातू हा आजोबांच्या काळजाचा तुकडा असतो. दुधावरची साय असतो. स्निग्ध आणि हवीहवीशी!
बाळाचा कवडसे पकडण्याचा छंद तर अफलातून असतो.
ज्या मातीने कुणब्याच्या अनेक पिढ्या पोसल्या, त्या मातीचा बाळाला झालेला पहिला स्पर्श मोठाच रोमांचकारी आहे.
बाळाच्या आयुष्यातील पहिला हिवाळा फारच तापदायक असतो. बाळ थंडीने बेजार होतो. यावर कवीआजोबांनी एक उपाय शोधला आहे :
'या थंडीचं करावं काय
खाली मुंडकं वरी पाय'
हाच तो साधा सोपा उपाय आहे.

'गाणे गोजिरवाणे' ह्या संग्रहातील कविता ही नवनिर्मिती नसली, तरी ही मुलांची लोकगीते आहेत. ह्या लोकसंचितातील लोकगीतांवरच ग्रामीण भागातील आमच्या अनेक पिढ्यांचे मानसिक भरणपोषण झालेले आहे. आपडी थापडी, गा-या गा-या भिंगो-या, आपरी खाली टिपरी, इमले इमले दिवा लाव, दिन दिन दिवाळी, ये रे ये रे पावसा, आर घोडी पार घोडी, च्याऊ म्याऊ, धोंडी धोंडी पाणी दे, पिंगा, चकुल्या बाई चकुल्या इ. लोकगीते गेली कित्येक वर्षे बाळओठांवरून संक्रमित होत इथपर्यंत आली आहेत. ही लोकगीते म्हणजे आमचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे. प्रा. इंद्रजित भालेराव यांनी हा अनमोल असा ठेवा संकलित आणि संपादित करून मोठेच सांस्कृतिक कार्य केले आहे. नवनिर्मितीबरोबरच ते ह्या संपादनासाठीही अभिनंदनास पात्र आहेत!

तिन्ही पुस्तकांतील कवीची लडिवाळ कविता आणि सरदार जाधव यांची बोलकी चित्रे हातात हात गुंफून आणि गळ्यात गळे घालून आली आहेत. आदित्य प्रकाशनाचे विलास फुटाणे यांनी ह्या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे! सोन्याला सुगंध म्हणतात, तो हा! नवनिर्मिती असो की लोकगीते असोत, ह्या कवितेतील निसर्ग आणि शेतकरी जीवनाचा धागा कुठेही सुटत नाही, हे विशेष! ह्या कवितेत लय आहे, ताल आहे, नाद आहे, गेयता आहे आणि आंतरिक संगीत आहे. आकलनसुलभ आणि चपखल शब्दयोजना हा भालेराव यांच्या बालकवितेचा लक्षणीय विशेष आहे. म्हणून त्यांची बालकविता बालकुमार वाचकांच्या मनाचा लवकर ताबा घेते. 'नातूऋतू' मधील कविता एकाच विषयावरची असली, तरी ती कंटाळवाणी होत नाही. कारण रचनाबंधाचे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आणि जगण्याची जीवनदृष्टी देणा-या ह्या कविता बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो.

इंद्रजित भालेराव यांचे ३ बालकवितासंग्रह
१) रानमळ्याची वाट, पृष्ठे ३६, किंमत रु. १६०
२) नातूऋतू, पृष्ठे ४८, किंमत रु. १८०
३) गाणे गोजिरवाणे, पृष्ठे ३६, किंमत रु. १६०
तिन्ही पुस्तकांचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट : सरदार जाधव
प्रकाशक : विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर.
संपार्कध्वनी:८४४६७९६५५७

25/06/2025
जगण्याशी जोडलेली सुंदर आणि निरागस बालकविता ©बालाजी मदन इंगळेकवी इंद्रजित भालेराव हे लहानथोरांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल...
25/06/2025

जगण्याशी जोडलेली सुंदर आणि निरागस बालकविता
©बालाजी मदन इंगळे

कवी इंद्रजित भालेराव हे लहानथोरांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले नाव आहे! त्यांच्या कविता जशा मोठ्या वाचकांना आवडतात तितक्याच त्या लहानांनाही भावतात. कवितेची आणि वाचकांचीही नेमकी नस त्यांना सापडली आहे. बालवाचकांना अभ्यासक्रमात असलेल्या भालेराव यांच्या कविता तोंडपाठ असतातच; पण अभ्यासक्रमात नसलेल्या त्यांच्या कविताही तोंडपाठ असतात. कारण कविता म्हणून त्यांच्या कविता श्रेष्ठ असतातच पण मुलांपर्यंत या कविता फार सुंदर पद्धतीने ते पोहचवतात.

नुकतीच त्यांची बालकवितेची तीन पुस्तके ‘रानमळ्याची वाट’, ‘गाणे गोजिरवाणे’ आणि ‘नातूऋतु’ एकाचवेळी प्रकाशित झाली आहेत. बालवाचकांचा विचार करून लिहिलेली आणि दर्जेदार निर्मिती असलेली ही पुस्तके पाहताक्षणी नजरेत भरतात.

मराठी बालसाहित्य हे प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय अथवा निसर्ग किंवा अद्भुतता आणि काल्पनिकतेवर आधारित होते. ते असावेही. पण पहिल्यांदा भारतीय संस्कृतीशी आणि इथल्या मूळ कृषीसंस्कृतीशी मराठी बालकवितेला जोडण्याचे काम भालेराव यांच्या बालकवितेने केले आहे. अद्भुतता, अतिरंजकता, अनाकलनीय कल्पनाविलास आणि खऱ्या वास्तवाशी फारकत घेतलेल्या मराठी बालकवितेला इथल्या जगण्याशी जोडण्याचे काम भालेराव यांची ही बालकविता करते. सुंदरता आणि निरागसता हे या कवितेचे अविभाज्य अंग आहे. भालेराव यांच्या बालकविता मातीचा सुगंध घेऊन आणि ग्राम जीवनाशी एकरूप होऊन येतात. आणि म्हणूनच मुलांना त्या वाचताक्षणीच आवडतात. त्यांचा ‘गावाकडं’ हा पहिला बालकविता संग्रह खूप लोकप्रिय असा आहे. शालेय अभ्यासक्रमात सातत्याने त्यांच्या कवितांचा समावेश असतो.
पहिल्या बालकविता संग्रहात गावाची छान, मजेशीर आणि महत्त्वपुर्ण सफर कवींनी घडवून आणली होती. आता ‘रानमळ्याची वाट’ या नव्या संग्रहात रानावनाची उत्कंठावर्धक आणि रम्य अशी सफर ते घडवून आणतात. एकूण बावीस कवितांमधून सगळा रानमळा बारीकसारीक गोष्टींसह वाचकांसमोर उभा करतात.

रानमळ्याच्या वाटेने एकदा मळ्यात प्रवेश केला की मग तिथे आपल्याला भेटतात वेगवेगळी झाडे, पाऊस, पक्षी, ओढा, बैलगाडी, गाय, शेळीचे पिल्लू, मळ्याची माती, रानमेवा वगैरे. कविता वाचता वाचता आपण या कवितांशी कधी एकरूप होऊन जातो आणि प्रत्यक्ष रानळ्यातच फिरत राहतो हे आपल्यालाही कळत नाही. ‘ओढा’ ही कविता वाचताना ओढ्याबरोबर आपण शिवार फिरून येतो. या कवितेमध्ये कवी लिहितात -

मग फिरतो रानीवनी
गाई गुरांना पाजीत पाणी
शीळ घालीत जातो वेडा
आमच्या रानामधला ओढा
वाहे झुळझुळ थोडा थोडा…

‘गाय’ या कवितेत गाईचे शेतकऱ्यांच्या आयुष्यातले महत्त्व तर अधोरेखित होतेच; पण नादमधुर व लयबद्ध शब्दरचनेमुळे कविता मुलांना वाचताक्षणी तोंडपाठ होऊन जाते. या कवितेतील या ओळी पहा -

गाय माझी ढवळी, मोत्यावानी पोवळी
गायीनं दिला गोऱ्हा, नंदी झाला मोरा
नंदी गेला शेताला, जुपून घेतलं औताला
शेत पिकलं काठोकाठ, गाड्या भरल्या तीनशे साठ
नंदिनं माझ्या डौलत, घरात आणली दौलत.

मुलांना गोष्टी खूप आवडतात. ‘रानमळ्याची वाट’ या संग्रहामध्ये काही कथाकाव्य समाविष्ट केले आहेत. बालमित्र, चिमुकला गोंधळी, भाऊ हरपला, मोराचे पाय या कवितांमध्ये खूप सुंदर अशा गोष्टी आहेत. त्या एका लयीत मांडलेल्या आहेत. त्यामुळे या कविता मुलांना खूपच आवडतील अशा आहेत. बालकवीतेमध्ये कथाकाव्य हा दुर्मिळ प्रकार आहे. तो इथे भालेराव यांनी सहजपणे वापरलेला आहे.

‘नातूऋतू’ या संग्रहात इंद्रजीत भालेराव यांनी त्यांचा नातू नरेन याच्याविषयी कविता लिहिलेल्या आहेत. जरी या कविता स्वतःच्या नातवाबद्दल लिहिलेल्या असल्या तरी त्या कविता कुठल्याही नातवाला किंवा कुठल्याही बाळाला सहज लागू पडतील अशा कविता आहेत. एखादे बाळ वाढत असताना घरातील प्रत्येकजण त्या बाळाची प्रत्येक हालचाल टिपत असतो. तसा एक-एक क्षण टिपून या कविता भालेराव यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकालाच आपल्या घरातील बाळाविषयीच्याच कविता आहेत असे वाटते. अशी वैश्विकता कवितेत येणे महत्त्वाचे असते. ते भालेराव यांनी या कवितेत आणली आहे. त्यामुळे ही कविता फक्त त्यांच्या नातवाची रहात नाही; तर प्रत्येक नातवाची कविता होते. खरे तर मुलांना आपल्या घरातील लहान बाळाविषयी खूप उत्सुकता असते. ते सतत त्याच्या आसपास घुटमळत असतात. या कविता बाळाशी संबंधित असल्यामुळे आणि आपण जे बाळामध्ये पाहतो तेच शब्दात रेखाटलेले असल्यामुळे या कविताही मुलांना खूप आवडणाऱ्या आणि आपल्या जवळच्या अशा वाटणाऱ्या आहेत. बाळाच्या अगदी पहिल्या हसण्यापासून ते बाळाचे डोळे, बाळाचे पहिले चालणे, बाळाला पहिल्यांदा थंडी वाजणे, बाळ वेगवेगळ्या रूपात पहिल्यांदा सजणे इथपासून ते बाळाची आंघोळ, त्याचे पहिले बोबडे बोल, त्याचा पहिला मातीचा स्पर्श, त्याचा रंग खेळणे अशा ज्या बारीकसारीक गोष्टींमध्ये सारे कुटुंब दंग झालेले असते त्या सगळ्या गोष्टींचे चित्र आपल्या नाजूक आणि नजाकतदार शब्दांनी कवितेत रेखाटलेले आहे, आणि हेच बाल वाचकांना आवडते. या संग्रहात एकूण 41 कविता आहेत. ‘पहिले हसू’ या पहिल्याच कवितेत कवींनी लिहिले आहे -

बाळाचे पहिलेच हसू
चिमणचांदवा लुखुलुखु

बाळाचे पहिलेच हसू
समोर आपण असूनसू

बाळाचे पहिलेच हसू
कारण त्याचे नका पुसू

‘हिवाळा’ या कवितेमध्ये बाळाच्या बाबतीत थंडीचे मजेशीर वर्णन कवीने केले आहे. कवी लिहितात -

इतकी थंडी आली कुठून
मी तर बाबा गेलो गारठून

अख्ख्या घराचा झाला फ्रिज
आई म्हणते गुपचूप नीज

या थंडीचं करावं काय
खाली मुंडकं वरी पाय

तिसरा कवितासंग्रह ‘गाणे गोजिरवाणे’ हा कवीने संपादित केलेला कवितासंग्रह आहे. यामध्ये मुलांची लोकगीते संग्रहित केली आहेत. मराठीमध्ये मुलांसाठीची लोकगीते आहेत. आणि ती खूप मजेशीर आहेत. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात आजच्या मुलांना ही लोकगीते माहिती नाहीत. म्हणून हा संग्रह आजच्या मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. यामध्ये पारंपारिक मुलांसाठीची लोकगीते कवीने संग्रहित केली आहेत. एकूण 31 लोकगीते या संग्रहामध्ये आहेत. ते खूप मजेशीर असे आहेत. ‘भोंगळं रे भोंगळं’ ही पहिलीच कविता वाचली की मुलांना खूप मज्जा येणार आहे.

‘चाऊ म्याऊ’ हे लोकगीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आजच्या मुलांना माहिती असण्याची शक्यता खूपच कमी आहे. ते लोकगीत असे आहे -

चाऊ म्याऊ
घुगऱ्या खाऊ
पखालीचं
पाणी पिऊ

बोलू नका
चिडीचूप
तोंडाला लावा
ओठाचे कुलूप.

दुसरे एक लोकगीत जे सुप्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘पिंगा’ -

आड बाई आड गं
सुपारीचं झाड गं
झाडाला आल्या शेंगा
घाल गं पोरी पिंगा

एकीचा का दोघीचा
मामाजीच्या लेकीचा
मामाची लेक गोरी
हळद लावा थोडी

हळदीचा उंडा
रेशमाचा गोंडा
रेशमकाठ हलती
चिंचेखाली डुलती.

या संग्रहातील जी लोकगीते आहेत ती कमी शब्दातली, लयदार अशा रचनेतील आहेत. आणि मुलांना आनंद देणारी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाने ही लोकगीते वाचणे खूप आवश्यक आहे. ही लोकगीते वाचता वाचताच मुलांना ती सहज पाठ होऊन जातात. त्यामुळे हे संपादन मराठी बालसाहित्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

मुलांच्या साहित्यामध्ये चित्रांचे खूप महत्त्वाचे स्थान असते. या तीनही संग्रहांना चित्रकार सरदार जाधव यांनी अप्रतिम अशी चित्रे काढली आहेत. मुलांना या कवितांशी सहजपणे जोडण्याचे काम ही चित्रे करतात. प्रकाशक विलास फुटाणे यांनी या पुस्तकांची सुंदर आणि दर्जेदार अशी निर्मिती केली आहे. पाहताक्षणीच पुस्तक हातात घ्यावे असे वाटते.

अल्पाक्षरत्व, लय आणि सुंदर चित्रे यामुळे बालसाहित्य सकस होत असते. हे सर्व गुण भालेराव यांच्या कवितेमध्ये आहेत. मुलांचे मनोरंजन करणे, नकळतपणे मूल्य आणि ज्ञान देणे, भावनांचा विकास करणे, साहित्यातून समाजाशी जोडणे हे सर्व जर बालसाहित्याची वैशिष्ट्ये असतील तर इंद्रजित भालेराव यांच्या या कवितांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी बालसाहित्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या कविता जशा लहानांना आवडणाऱ्या आहेत तशाच त्या मोठ्यांनाही आवडणाऱ्या आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ही कविता मराठी बालसाहित्यात ठळकपणे उठून दिसते. ही तिन्ही पुस्तके प्रत्येक मुलांकडे संग्रही असावीत अशी आहेत.

पुस्तकाचे नाव -
१. रानमळ्याची वाट
२. गाणे गोजिरवाणे‌
३. नातूऋतू

कवी - इंद्रजित भालेराव
चित्रे - सरदार जाधव
प्रकाशक - आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर.

यापृष्ठे - १२० (एकत्रित)
किंमत - ५००/- रू. (एकत्रित)
दूरध्वनी :८४४६७९६५५७

पुस्तक परिचय
© बालाजी मदन इंगळे.

॥ बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद ॥इंद्रजित भालेराव यांच्या तीन बालकविता संग्रहांची ओळख - फारूक एस.काझी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,...
25/06/2025

॥ बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद ॥

इंद्रजित भालेराव यांच्या तीन बालकविता संग्रहांची ओळख - फारूक एस.काझी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

इंद्रजित भालेराव. नाव वाचताच शब्दांची एक अनोखी लयबद्ध कलाकुसर डोळ्यासमोर येते. त्यांची कविता म्हणजे सहजता आणि आशयगर्भता यांचा एक अनोखा संगम. गाव, निसर्ग, गावपांढरी,निरागस माया, पाखरं, गुरं आणि निसर्गाच्या कुशीत वसणाऱ्या चराचराला आपल्या कवितेत शब्द म्हणून पेरणारे एक प्रतिभावंत कवी. त्यांची प्रत्येक कविता ही जणू त्यांची एखादी आठवण तरी असते किंवा त्यांच्या आतीव इच्छेला दिलेलं शब्दरूप तरी असतं. ते कविता लिहित नाहीत तर जगत असतात, असंच वाटत राहतं. त्यामुळे वाचक त्या कवितेत हरवून जातो. ते सातत्याने आपलं बालपण, तो काळ, ते निर्व्याज प्रेम आणि ती निर्मळ माया शब्दांत पेरत असतात.

नुकतेच इंद्रजित भालेराव सरांचे मुलांसाठीचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजी नगरकडून हे तीनही अत्यंत सुंदर निर्मिती असणारे कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.तीनही पुस्तकांसाठी चित्रकार म्हणून प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी अत्यंत सुंदर अशी चित्रं दिली आहेत. मुखपृष्ठ आणि आतील चाररंगी चित्रं खूपच बोलकी आणि आकर्षक झाली आहेत. या पुस्तकांवर खूप मेहनत घेतली गेल्याचं जाणवतं.

१. रानमळ्याची वाट

घरातील एखादी मोठी व्यक्ती लहान मुलाला हाताला धरून शेतात घेऊन जाते. तिथली पिकं, झाडं, फुलंपाखरं, प्राणी आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं लयबद्ध भाषेत सांगू लागते. तेव्हा तीच कविता होऊन जाते. शब्दांची लय आपोआप ओठांवर रेंगाळू लागते आणि मन रानभर विहरून येतं. अख्खं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. मग वाचक गावातील असो की शहरातील. कारण भालेराव सरांना पक्कं ठाऊक आहे, आपल्या प्रत्येकाची नाळ निसर्गाशी जोडली गेली आहे. आपण शहरात जरी वसलो तरी निसर्ग तुम्हाला सतत हाकारत असतो. आणि आपणही वेळ मिळेल तसं निसर्गाच्या कुशीत विसावत असतो.

हा कविता संग्रह एका अद्भुत अशा निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती देतो. याच्या प्रत्येक कवितेत निसर्गाची ओढ आहे, त्याला भेटण्याची आस आहे आणि मुलांना याचा अनुभव देण्याची एक आंतरिक इच्छाही आहे.

वाट नव्हे ही कूस मायेची
मातीच्या काळ्या कायेची
ओढ मला घनदाट, रानमळ्याची वाट

शीर्षक कवितेतील या ओळी पाहा. माती, वाट यांच्याशी मायेचं नातं जोडलं गेलं आहे. निसर्ग आई आहे. आणि गावाकडे तो अजूनही शाबूत आहे. त्याचीच ओढ कवीला सतत लागली आहे. वडाला आजवर पुराणपुरुष म्हणून अनेकदा उल्लेखलं गेलं आहे. परंतु या संग्रहात ‘वडमाऊली’ अशा शीर्षकाची कविता येते. आणि विठ्ठलाप्रमाणे वडाला माऊली का म्हटलं गेलंय त्याची प्रचिती येते.
दूरदुरून यायचे
तान्हेजले भुकेजले
नित्य देतच जाणारे
हात इथे निपजले

‘गावाकडचे घर’ कवितेतल्या या ओळी लक्ष वेधून घेतात. ग्रामीण जीवनात दानतीची वाणवा नाही. माया असो की घासातला घास काढून देणं असो, मानवी नातेसंबंधांची वीण कवितेत जाणवल्याशिवाय राहत नाही. कुणाला या कविता ग्रामीण वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या कविता वैश्विक आहेत. यातील प्रत्येक भावना आणि त्यांचा गोडवा वैश्विक आहे.

‘शेळीचं पिल्लू’ नावाची एक अतिशय गोड कविता यात आहे. मुलांना प्राण्यांची किती ओढ असते याचा अनुभव आपण सर्वजण घेतच असतो. मुलांची घरातल्या कोकरा, वासरांवर, कुत्र्या-मांजरावर, कोंबड्यावर अत्यंतिक माया जडलेली असते. त्यांना जणू त्यांचा खेळगडीच मिळालेला असतो. ते सतत त्यात रमलेले असतात. या संग्रहात अशाच आशयाच्या पोळा, गाय, दारात आली कपिला या कविता आल्या आहेत. आपल्याकडे काही कल्प कथा प्रसिद्ध असतात. तशाच आशयाच्या ‘मोराचे पाय, भाऊ हरपला’ या दोन कविता एका वेगळ्याच अनुभवाची चुणूक दाखवतात.

निसर्ग म्हटलं की पाऊस आलाच. या संग्रहात पाऊस विविध रुपात येतो. भेटतो. ‘पाऊस’ कवितेत कधी ओढ लावताना दिसतो तर कधी ‘झड’ कवितेत बाप हरपलेल्या पोराच्या आईच्या काळजीच्या रुपात भेटतो. ‘ये रे ये रे पावसा’ या कवितेत तो पारंपारिक गीताची ढब घेऊन येतो.

म्हातारी लई खट खट खट
म्हणून लवंगा तिखट तिखट

“आरिंग मिरिंग’ या लोकगीतांशी जवळचं नातं सांगणाऱ्या कवितेत खूप मजा लपली आहे. यात अर्थाचं ओझं नाही. लयीची फोडणी आणि लोकगीतांच्या गोडव्याची खडीसाखर जरूर आहे. ‘गाऱ्या गाऱ्या भिन्गोऱ्या’ ही कविता तसाच आनंद घेऊन येते. पारंपारिक लोकगीतांची मजा अनुभवायची असेल तर या कविता जरूर अनुभवल्या पाहिजेत. या संग्रहात ‘कोडं’ नावाची एक भन्नाट कविता आहे. पालकांनी मुलांसोबत ही कविता अनुभवली पाहिजे.

रातभर मामा
पाजळला
सकाळ होताच
काजळला

ही कविता खरंच एक अनोखं कोडंच आहे. वाचताना मजाही येते आणि नेमकं काय ? याचं उत्तर शोधण्याची घाईही झालेली असते. लोकसंस्कृती हा ग्रामीण जीवनाचा अभिन्न भाग. आजही गावाकडे गोंधळ प्रकार चालतो. कवींनी ‘चिमुकला गोंधळी’ उभा केला आहे. हुबेहूब शब्दचित्र डोळ्यासमोर उभं राहतं.

शेवटी ‘बालमित्र’ या कवितेचा वेगळा उल्लेख करण्याची इच्छा अनावर होते आहे. शहरात राहू लागलेला मित्र गावातल्या मित्राला भेटतो आणि आनंदासोबत एक वेदनाही घेऊन येतो. हल्ली होत असलेलं गावांचं बकालपण तर कविला मांडायचं नसेल ? शहरी सुखवस्तू जीवन जगताना गावातील मित्राच्या दारिद्र्याची, त्याच्या हालअपेष्टांची टोचणी त्याला सुख अनुभवू देत नाही. ही कविता वाचताना पापणी ओली होते. गावाच्या सौंदर्यासोबतच तिथल्या हलाकीच्या जीवनाची एक झलक या कवितेतून होते. या संग्रहात आलेले शब्द पाहा- कुपाटी, उन्हाचा कार, सुईसाट, डोळ्यांची कोर, मातला, लवणे, खोडा घालणे, पांद, सांद, लोळी, वशिंड इत्यादी. ‘शेळीचं पिल्लू’ या कवितेत तर तब्बल चौदा क्रियापदांचा कल्पक वापर केलेला आहे. हे भाषिक सौंदर्य तर मराठीच्या मुळच्या देखण्या रुपड्यात आणखीनच भर घालतं. अभिजात मराठी ही मराठी आणि तिच्या भगिनींनी मिळून तयार झाली आहे. तेव्हा त्या भाषा भगिनींचं सौंदर्य अनुभवण्याची संधी या कवितांच्या रूपाने मिळते.

मुलांनी स्वत: वाचून अनुभवावा, मोठ्यांनी वाचून दाखवावा, इतरांना वाचायला द्यावा असा गोड आणि मनात खोलवर रुंजी घालणारा हा कवितासंग्रह!
.........................

२. गाणे गोजिरवाणे


मराठी भाषेत मुद्रणकला येण्याअगोदर मोठी मौखिक साहित्य परंपरा आढळते. लीळाचरित्रातील काऊ-चिऊची गोष्ट पहिलं बालसाहित्य मानलं जातं. याचा अर्थ त्याकाळी बाल साहित्य जनमानसात प्रचलित होतं. परंतु त्याला मौखिक परंपरा होती. या परंपरेत अनेक गीतं महाराष्ट्रभर गायली जात. आजही त्यातली बहुतांश गीतं मोठ्या प्रमाणावर गायली जातात. त्यांचं चिरंतन मूल्य आजही टिकून आहे. अशा लोकगीतांनी लयबद्ध पद्य रचनेला वाट दाखवण्याचं काम केलं आहे. या गीतांचे रचयिता जरी अज्ञात असले तरी त्यांनी या गीतांत अनेक शक्यतांना जागा सोडली आहे. रचनाकार आपल्याला हव्या त्या ओळींची भर त्यात घालू शकतो. त्याने ती गीतं आणखी एक नवीन रूप धारण करतात. आणि जनमानसांत रुजतात. वाढतात आणि पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरीत होतात.

इंद्रजित भालेराव यांची जडणघडणच मुळात ग्रामीण जीवन, तिथल्या परंपरा, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांच्या कुशीत झालेली आहे. लोकगीतांनी त्यांच्या बालपणात कवी होण्याचं स्वप्न पेरलं असणार. ‘गाणे गोजिरवाणे’ या कवितासंग्रहात हे पदोपदी जाणवतं. हा कविता संग्रह म्हणजे मुलांच्या लोकगीतांचा संग्रह आहे. आजच्या जॉनी जॉनी आणि ट्विंकल ट्विंकलच्या गर्दीत हा अस्सल मराठी भाषिक खजिना कुठंतरी हरवल्यासारखा झालाय. अडगळीत पडल्यासारखा झालाय. परंतु भालेराव सरांनी या गीतांना एका नव्या रुपड्यात मांडून नवसंजीवनीच दिली आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका खास आहे. एका लोकसाहित्याचं पुस्तक एका लोक कलाकाराला म्हणजेच ‘छोट्या गोंधळ्याला’ अर्पण केलं आहे.

एकूण ३१ लोकगीतं यांत आहेत. ही गीतं वाचताना बरेचदा आपण अर्थ शोधण्याचा अट्टाहास करतो. परंतु निरर्थक शब्दाकडून अर्थपूर्ण शब्दांकडे बालकविता जसा प्रवास करते तसंच लोकगीतांचाही प्रवास होत असतो. त्यातूनच लोकोत्तर म्हणी, कल्पकथा, दैवतकथा, भीती कथा, चित्रकथा, कथागीतं जन्म घेत असतात. यात स्थूल विनोदही असतो आणि त्याचबरोबर भाषिक करामतीही घडवलेल्या असतात. लोकगीतात अभिजनवर्गीय भद्र-अभद्र असा भेदही नसतो. अत्यंत स्पष्ट आणि सहज मांडणी असते. त्यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसतं. एक नमूना पाहू ,

भोंगळं रे भोंगळं
कांद्याचं चिंगळ

घाल आता चड्डी
नाहीतर फोडील हड्डी

बाळ जेव्हा चड्डी घालत नाही तेव्हा आई आधी लाडात बोलते आणि मग बेदम मार देण्याची भाषा करते. इथं आई त्याला खरोखर मारणार नसते. पण ती दम भरत असते. हे अस्सलपण लोकगीतांचं खास असं वैशिष्ट्य.

माय मी भेले
चावडीला गेले
चावडीचे लोक
हसू हसू मेले
कावळे मारून
दिवस केले

या गीतात एक लयबद्धपणा आहे. एक मजा आहे. सहज शब्दांची रचना असल्याने सहज गुणगुणता येते. नव्या ओळी जोडण्याची संधीही आहे. यात कावळ्यांना इजा पोचवणे हा हेतू नाही. उलट त्यातून विनोद निर्मिती केली आहे. अकल्पित शब्दचमत्कृती साधली आहे.

ये रे ये रे ढगा
पुढं नगं जाऊ
धान्याची मूठ घेऊन
थांबलाय भाऊ

ये रे ये रे ढगा
खाली भराभरा
बापाच्या डोळ्याला
लागल्यात धारा

ढगाला आर्जव करणारं हे गीत. आपल्या भाऊ आणि बापासाठी ढगाला साकडं घालणारी एक माहेरवाशीण. या गीताला वेदनेची एक किनारही आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर एक वेगळीच मजा आणि एक वेगळाच अनुभव येतो. चित्रांमुळे अजूनच बहार आली आहे. लोकगीतांचा हरवत चाललेला खजिना जपून पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी स्वत:ला मराठी भाषिक म्हणवणाऱ्या आपल्या सारख्या लोकांनी घ्यायला हवी. या संग्रहातील एक शेवटचं गीत,

चकुल्या बाई चकुल्या
चंदनाच्या टिकुल्या
एक टिकली उडाली
गंगेला जाऊन मिळाली
गंगेला आला लोंढा
भिजला माझा गोंडा

या आणि अशा एकाहून एक धम्माल लोक गीतांची भेट भालेराव सरांनी दिलेली आहे. यातील सर्वच गीतं मुलांना आवडतील यात अजिबात शंका नाही. आजोबा आजीची उणीव भरून काढण्याचं काम या कविता निश्चितच करतील. ................................

३. नातूऋतु

साहित्यात साहित्यिकाच्या अनुभवांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. साहित्यिक जे जगतो, भोगतो ते शब्दांत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. भालेराव सरांनी त्यांच्या नातवाला केंद्रस्थानी ठेऊन काही कविता केल्या होत्या. त्या मूळ कल्पनेवर हा कवितासंग्रह बेतलेला आहे. आजोबा, आजी, आई, पपा, आजोळ यांच्या नजरेतून बाळलीळा चितारल्या आहेत. बाळाचा जन्म, त्याचं रांगणं, दुधाचे दात, जावळ, चालणं, दुडूदुडू धावणं, फिरायला जाणं, त्याचा लागलेला लळा, तो नसल्यावर येणारी उदासी या सर्व गोष्टी यात आलेल्या आहेत. एका आजोबांनी नातवाला केंद्रस्थानी ठेऊन केलेला हा मराठीतील पहिलाच कवितासंग्रह असेल.

नातवाच्या जीवनातल्या वाढीच्या काळातले विविध ऋतु इथं अनुभवायला मिळतात. जन्मापासून तो धाऊ लागेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. बाळाच्या वाढीचे ऋतूच म्हणा ना!

बाळ गेला आजोळाला
आजोबांना करमेना
कशी रिकामीच मांडी
हलविती पुन्हा पुन्हा

बाळ गेला आजोळाला
आजोबांना करमेना
बाळा रुसले आजोबा
जरा तातडीने ये ना

नातवाची ओढ आजोबांनी किती मार्मिक शब्दांत व्यक्त केलीय. मुलं जेव्हा या कविता वाचतील तेव्हा त्यांना आपल्या आजी आजोबांच्या प्रेमाची ओळख पटायला सुरुवात होईल. कारण आजोबा बोलून प्रेम व्यक्त करत नाहीत. पण त्यांचं कासावीस मन लेकरांसाठी सतत झुरत असतं.

झाले बोबडे आजोबा
बोले बाळाची बोलणी
नातवाच्या संगेमंगे
आजोबांची उजळणी

या ओळी असोत की, ‘दुधाचे दात’ कवितेतील या ओळी असतील,

नाजूक हिरडीत मोगऱ्याच्या कळ्या
एक एक नव्हे, खाली वरी जुळ्या

आजोबांना नातवाचं वाटणारं कौतुक, त्याच्याविषयीची ओढ या ओळींतून सतत जाणवत राहते. दातांना मोगऱ्याच्या कळ्यांची उपमा भन्नाटच! एक कवी आपल्या अनुभावांना शब्दांत मांडून ते जपून ठेवतो. कवटाळतो, पुन्हा पुन्हा अनुभवतो.

कवी कवितेच्या माध्यमातून बालमानस पण खूप सुंदररित्या उलगडून दाखवतात. मुलांचं जगाला निहाळणं, वस्तू हाताळणं, कागद-पुस्तक फाडून त्याचा आनंद घेणं, पेपर वाचनं या सर्व गोष्टी खूप माजेदारपणे येत राहतात. आणि सर्व कौतुक आजोबा न्याहाळतात आणि शब्दांत मांडत राहतात. आजोबा बाळाचं कौतुक करताना काय म्हणतात,

म्हणतात कसे माझ्याकडं
पाहत एकटक
हाच माझा पेपर
हेच माझं पुस्तक

'जावळं’ या कवितेत दोन ओळी फार मार्मिक आहेत. बाळाच्या भावी आयुष्याची चुणूक त्यात जाणवते.

तान्हेपण सरले माझे
आता वाढेल एकेक ओझे

आयुष्यात पुढे वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची ही चुणूक तर नसेल? असंही वाटत राहतं. या ही कवितासंग्रहात नवनव्या शब्दांची मेजवानी आहे. बिनले, आनंदाचा कंद, आरबळून, महूर, कल्लावान, सैताडला, वर्ख, ठकडा, नुरली, मूळ, पाखवा, साजरं असे अनेक अनोखे शब्द मुलांना समजून घ्यायला मजा वाटेल. हा कवितासंग्रह एक वेगळा अनुभव आहे. लहानांना तर लहानांना पण मोठ्यांनाही आपल्या बालपणाची आठवण करून देईल. या कवितासंग्रहात स्पर्श मातीचा, सीताफळाची गोडी, मळ्याची माती या काही कविता समविष्ट केल्या नसत्या तर या पुस्तकाचा एककेंद्री विषय ओघ टिकून राहिला असता.

एकंदरीत खूप सुंदर आणि आनंदी अनुभव देणारा हा कवितासंग्रह. वाचायला हवा. वाचून दाखवायला हवा. वाचायला द्यायला हवा.

-------------------------------

१. रानमळ्याची वाट (किंमत- १६०/-)
२. गाणे गोजिरवाणे (किंमत १६०/-)
३. नातूऋतु (किंमत १८०/-)
कवी : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर - ८४४६७९६५५७, ८७८८१३८२६०
💐

Address

32, Aboli Appartment , Near City Care Hospital , New Osmanpura
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aditya Prakashan:

Share