03/11/2025
✨ धम्म, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम!
म्हसळे तालुका बौद्धजन समितीच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
मुंबई, २ नोव्हेंबर २०२५
वार्ताहर : योगेश जनार्दन येलवे
रायगड जिल्ह्यातील सामाजिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या म्हसळे तालुका बौद्धजन समिती (मुंबई) या संस्थेच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात व ऐतिहासिक उत्सवमूर्तीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबईतील फोर्ट विभागातील बोरा बाजार येथील आर्य समाज हॉल येथे, रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. रघुनाथ कांबळे यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहणाने झाली. केलडे गावच्या उदयोन्मुख गायिका आयुनी संजना सुनिल जाधव हिने आपल्या मधुर आवाजात वंदनगीत सादर करून सभागृहात भक्तीचा आणि प्रेरणेचा दरवळ पसरविला. बौद्धाचार्य रविंद्र तांबे आणि पत्रकार विनायक जाधव यांनी प्रबोधनपर गीतांनी धम्मविचारांचा संदेश दिला, तर लहान बालकलाकार वेधा विनोद तांबे हिने “चवदार तळ्याचा प्रसंग” कवितेद्वारे सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळविला.
📚 गुणवंतांचा गौरव आणि प्रेरणेचा वर्षाव
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि समाजकार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित अभय बोधी यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून धम्ममार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. तर विशेष अतिथी म्हणून आलेले जागतिक शिक्षणतज्ज्ञ आणि CEO एईजी, महाराष्ट्र भूषण रामटेके यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की –
“यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य दिशा हेच खरे तीन स्तंभ आहेत.”
विद्यार्थी आणि पालकांनी रामटेके सरांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत साध्या, समर्पक भाषेत उत्तरे देऊन सर्वांच्या मनात प्रेरणेचा दीप उजळविला.
🌿 चार दशकांची समाजसेवेची परंपरा
गेल्या चार दशकांपासून म्हसळे तालुका बौद्धजन समिती ही संस्था समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. या कार्याचा गौरव उपस्थित पाहुण्यांनीही केला.
कार्यक्रमात आयु. प्रकाश जाधव, अनंतराव येलवे, परशुराम साळवी, गणेश मोरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रश्मीताई तांबे, कार्याध्यक्ष मुकुंदराव पवार, तसेच विद्यार्थिनी अर्चना रविंद्र येलवे यांनी मनोगते व्यक्त करत समाजकार्यात तरुण पिढीने सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
🎤 सुत्रसंचालन आणि आयोजन
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आयु. संतोष चापडेकर आणि आयु. विनोद येलवे यांनी केले, तर स्वागत समारंभाची जबाबदारी आयु. मुकुंद पवार आणि आयु. संदीप गोपाळे यांनी समर्थपणे पार पाडली.
समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी भोजनदान करून पुण्यकर्म केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड. प्रतीक मोहिते, पत्रकार विनायक जाधव, वसंत मोहिते, पांडूशेठ जाधव, बौद्धाचार्य रविंद्र तांबे, राजा पवार, मंगेश तांबे, अनंत तांबे, राजेंद्र मोहिते आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
शेवटी समितीचे उपाध्यक्ष आयु. सुनिल कासारे यांनी सर्वांचे आभार मानले. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
“धम्म, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम म्हणजे म्हसळे तालुका बौद्धजन समिती” — अशी भावना उपस्थित सर्वांच्या मनात या सोहळ्यानंतर उमटली.