21/11/2025
जांबोटी माध्यमिक विद्यालयात परमवीरांचे पूजन; देशासाठी सकारात्मक कार्य करण्याचे किशोर काकडे यांचे आवाहन
विश्व भारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयात परमवीरचक्राने सन्मानित २१ शूरवीरांच्या स्मृतिपूजनाचा “परमवंदना” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना किशोर काकडे यांनी विद्यार्थ्यांना देशनिष्ठेचा संदेश देत “परमवीरांकडून प्रेरणा घ्या, देशासाठी सजग नागरिक म्हणून सकारात्मक कार्य करा” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कृष्णानंद कामत होते. व्यासपीठावर जांबोटी गावातील माजी सैनिक चंद्रकांत देसाई, बळवंत इंगळे, पावनाप्पा रमेश देसाई, दत्तात्रय इंगळे, पावनाप्पा मारुती देसाई इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि “ए मेरे वतन के लोगों” हे देशभक्तिगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती-लक्ष्मी पूजन तसेच भारत माता की जयच्या घोषणेसह २१ परमवीरचक्र विजेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
माजी सैनिक चंद्रकांत देसाई यांनी आपल्या सैन्य सेवेतल्या अनुभवांची उजळणी केली. कार्यक्रमात मेजर शैतानसिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, योगेंद्रसिंग यादव, निरजा भनोत यांसारख्या शूरवीरांच्या पराक्रमकथा सांगण्यात आल्या. परमवीर चक्र तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची भूमिकाही काकडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
किशोर काकडे यांनी “२०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे आणि देशरक्षणाची शपथ घ्यावी” असे आवाहन केले. अध्यक्ष कृष्णानंद कामत यांनीही विद्यार्थ्यांना “देश प्रथम” हा विचार अंगीकारण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता चलवेटकर यांनी केले, तर दिनकर पाटील यांनी आभार मानले. शेवटी किशोर काकडे यांच्या ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.