24/08/2025
माहिती." रत्नागिरीची "
रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्वर, काळबादेवी, पालगड, मंडणगड, आयनी-मेटे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. खारेपाटणपासून रत्नागिरी जिल्ह्यास सुरवात होते.
पहिले गाव लागते राजापूर. एकेकाळचे प्रसिद्ध बंदर, राजापूरहून तीस किलोमीटरवर डावीकडे आडिवरे येथे श्री महाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. राजापूरजवळ श्री धूतपापेश्वराचे मंदिर नदीकिनारी आहे. राजापूरपासून पाच किलोमीटरवर गंगातीर्थ आहे. राजापूरची गंगा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध असले तरी तेथे पाणी असल्याची खात्री करूनच भेट द्यावी. पुढे गेल्यावर हातखंबा येथून डावीकडे वळल्यावर रत्नागिरी लागते.
रत्नागिरीपासून १५ किलोमीटरवर पावस आहे. हे गाव स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत होऊन तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे स्वामींची समाधी व सुंदर मंदिर आहे. पावसला जाताना भाट्याच्या खाडीवरील राजिवडा बंदर ओलांडून जावे लागते. भाटये येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र आहे. तेथे नारळाची रोपेही विकत मिळतात. शिवरायांच्या आरमारातील शूर सेनानी मामाजी भाटकर भाट्ये येथीलच. त्यांची समाधी तेथे आहे. पावसला जाण्यासाठी लांजा येथूनही मार्ग आहे, पण तो अरुंद. रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. श्रीमती इंदिराबाई गोरे यांचा हा वाडा आता टिळक स्मारक म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतच प्रसिद्ध थिबा पॅलेसही आहे. ब्रिटिशांनी १९१०-११ मध्ये ही वास्तू उभारली. तेथे आता वस्तूसंग्रहालय आहे, तसेच बाजूला असलेला थिबा पॉइंटही चांगला आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर जाता येते, तेथे दिवसा जाणे कधीही चांगले. किल्ल्यात शिवकालीन भगवतीचे मंदिर आहे. रत्नदुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेला किनारा काळ्या वाळूचा असल्याने त्याला काळा समुद्र तर उत्तरेकडील समुद्राला पांढरा समुद्र असे म्हणतात. या किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरातील खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्गचित्रे कोरलेली आहेत. अथांग समुद्रकिनारा, निसर्गसंपन्न परिसर आणि प्राचीन गणेशमंदिर. पावसजवळचे गणेशगुळे आकर्षक आहे.
रत्नागिरीहून पन्नास किलोमीटरवर गणपतीपुळे आहे, रत्नागिरीहून झाडगावमार्गे गणपतीपुळे येथे जाताना वाटेत मत्स्य महाविद्यालय लागते. गणपतीपुळेला गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून समोर अथांग सागर व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण किनारा पसरलेला आहे. या देवस्थानचा इतिहास १६०० पासूनचा आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे हे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाईपर्यंतचा इतिहास या मंदिराशी निगडित आहे. देवालयाचा गाभारा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सचिव अण्णाजी दत्तो यांनी, सभामंडप व मंदिराभोवतालची दगडी पाखाडी सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी तर आवारातील धर्मशाळा रमाबाई पेशवे यांनी बांधलेली आहे. नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी तर नगारखाना चिमाजी अप्पा यांनी बांधला आहे. गणपतीपुळेच्या शेजारी मालगुंड असून ते कवी केशवसुतांचे गाव. त्यांचे वस्तुसंग्रहालय वजा स्मारक पाहण्यासारखे आहे.
चिपळूणच्या दिशेने जाताना वाटेत संगमेश्वर लागते. त्याच रस्त्यावर आरवली व तुरळ येथे गरम पाण्याचे झरे रस्त्यालगतच आहेत. या पाण्याला गंधकाचा वास येतो. त्वचारोग बरे करण्यासाठी तेथे स्नान करण्यासाठी अनेकजण थांबत असतात. संगमेश्वरजवळील कसबा येथे चालुक्य घराण्यातील कर्ण राजाने बांधलेले श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. तेथे सरदेसायांचा मोठा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने अचानक हल्ला करून अटक केली होती. या ठिकाणी संभाजी राजांचा स्मारक स्तंभ आहे. संगमेश्वरहून चिपळूणकडे जाताना डावीकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. देवरूखपासून १५ किलोमीटरवर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे हे देवस्थान पाहण्याजोगे आहे. उंच डोंगराला वळसा घालून गेल्यावर एका गुहेत हे स्वयंभू देवस्थान आहे. या डोंगरावर मोठा धबधबा आहे. देवस्थानपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कशेळीचा कनकादित्य रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे ही सारी ठिकाणं पर्यटकांच्या परिचयाची. पण इथून जवळच आहे, एक आगळं-वेगळं ठिकाण. त्याचं नांव आहे कशेळी. (मंडणगड जवळचं केळशी नव्हे) महाराष्ट्रात एकेकाळी सौरसंप्रदाय पसरला होता. परंतु सूर्याची फारशी मंदिरं आजमितीस अस्तित्वात नाहीत. पण कोकणात काही सूर्यमंदिरे आहेत. आरवली, आंबव, नेवरे, कशेळी अशा काही गावांमध्ये ही सूर्यमंदिरे आहेत. कशेळीचा कनकादित्य हे आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण निश्चित आहे. रत्नागिरीपासून २२ कि.मी. आणि राजापूरपासूनही २२ कि.मी. अंतरावर कशेळी हे छोटं गाव आहे. रत्नागिरी - भाट्ये - पावस - पूर्णगड - कशेळी असा हा उत्तम रस्ता आहे. या टुमदार गावाला विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभला आहे. तिथला डोंगरकडा अन् केवड्याचं बन केवळ अनुभवण्याजोगं. सुमारे ८०० वर्षे नांदतं, असं श्री कनकादित्याचं मंदिर गावात उभं आहे. चहूबाजूंना आंबा-फणस-नारळी-पोफळीची दाटी आहे. त्यातच धनेश म्हणजे हॉर्नबिल हा पक्षी हमखास पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातच श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी चार मंदिरे आहेत. म्हणजे हे सूर्यपंचायतन आहे. शिवाय एक मारुती मंदिरही आहे. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने कशेळी गावातच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आवर्जून भेट देण्याजोगे आहे. इथून जवळच वेत्ये गावचा विलोभनीय समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणेच फेडतो. आडिवरे येथील देवीच्या महाकालीची मूर्ती येथेच सापडली. कशेळीच्याच भेटीत राजापूरमधील अनेक ठिकाणांनाही भेट देता येते. चिपळूणहून खेडला जाताना परशुराम हे गाव लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या श्री परशुराम मंदिराची, आदिलशाही विजापूरकर वैभवाची वास्तू तेथे आहे. परशुराम, काम व काळ या अनुक्रमे विष्णू, ब्रह्मदेव व शंकराचा अवतार असलेल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती मंदिरात आहेत. परशुरामात प्राचीनकाळी घरोघरी पाणी पोचविण्याची पाटवजा व्यवस्था होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. परशुराम घाटात पावसाळ्यात सवत कडा हा धबधबाही दिसतो. खेडहून पुढे दापोलीला जाता येते. दापोलीत पाहण्यासाठी जवळपास ६२ पर्यटनस्थळे आहेत. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि दुर्गादेवीचं मंदिर अनेकांच्या परिचयाचं. बकुळ वृक्षांच्या गराड्यात असलेलं श्री गणेश मंदिर आणि तेथून हर्णे-मुरूडच्या किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - फत्तेगड आणि गोवा किल्ला. आंजर्ले - केळशी रस्त्यावर आडे - पडले गाव आहे. इथे पुलाजवळ श्रीभार्गवरामाचं म्हणजे श्री परशुरामाचं देखणं मंदिर आहे. शिवाय श्री बेलेश्वराचंही मंदिर आहे. आंजर्ले इथे मुक्काम करून हर्णे - मुरूड (अण्णासाहेब ऊर्फ भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव) आसूदचा श्री व्याघ्रेश्वर आणि श्री केशवराज, दापोली - लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, चिखलगाव दाभोळ - कोळथरे - पंचनदी - पन्हाळे लेणी अशी अनेक ठिकाणं पाहून दिवसभरात परत येता येतं. दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे. श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. दाभोळहून होडीने किंवा फेरी बोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशुराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो. आसूदच्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर व्याघ्रेश्वर मंदिर लागते. हे मंदिर ८०० वर्षे जुने आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी सुमारे पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आतल्या लाकडी खांबांवर दशावतार कोरलेले आहेत. मुरुड आसूद पुलापाशी डावीकडे वळल्यानंतर मुरुड गाव लागते. इथेच दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळचा रस्ता थेट समुद्रकिनारी जातो. कर्देमुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे इथला निसर्गरम्य समुद्रकिनारा लागतो. हा समुद्रकिनारा बराच प्रसिद्ध आहे. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरुड, कर्दे परिसरात बरेचसे स्थलांतरित पक्षी येतात., त्यामुळे हे ठिकाण बघण्यासारखे आहे.
🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा