11/11/2025
आठवणी...
कै.काशिनाथजी (गुरूजी) गीते बाबांनी इहलोकीचे विहीत कार्य पूर्ण करून आज दिनांक ११/११/२०२५ रोजी ते स्वर्गलोकींच्या प्रवासाला निघून गेले.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेव्हा आपलं कर्म संपलं, की आपल्याला इथला मुक्काम सोडावा लागतो...
मग तुमची इच्छा असो की नसो. त्यात काही फरक पडत नाही...
बाबांच्या जाण्याने गीते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
बाबांना मध्यंतरी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं, तेव्हा भेटायला गेलो. त्यानंतर भेटीचा योगच आलाच नाही...
बाबा दररोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. त्यात त्यांना वृत्तपत्र वाचण्याचा खूप छंद. सकाळी वृत्तपत्र घेऊन गेलो की, हसत मुखाने "जय हरी माऊली" म्हणायचे. ते शब्द आजही आठवतात. बसा चहा घ्या. असा हट्ट करायचे. बोलताना त्यांनी कधीच एकेरी भाषा वापरली नाही हे विशेष...
महिना भरला की, १ तारखेलाच पेपरचं बिल मिळायचं. जर ते बाहेर गावी गेले असतील तर पैसे मिळायला थोडसा उशीर व्हायचा. समजा पेपर मिळाला नाही, तर दिनदर्शिकेवर त्या दिवशी नोंद केलेली असायची. एकदम कडक व्यवहार...
कधी त्यांच्या हिशोबात रक्कम कमी असेल असं मला वाटलं, तर मी म्हणायचो एवढं बील झालं आणि इतकेच लागतील. तेव्हा बाबा हसून म्हणायचे चहा घेतली नाही ना आमच्याकडे त्यामुळे कदाचित चहाचं बील लावलेलं दिसतंय माऊली. अन् खळखळून हसायचे. पण मी म्हणालो तितके पैसे द्यायचे...
असाच व्यवहार कै. भानुदासजी काका मुंढे यांचा सुद्धा होता. ते करोना काळात अचानक गेले.
राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात माध्यमातून बाबांचा सत्कार करण्यात आला होता. ही आठवण आमच्या सोबत कायम राहील...
अशा असंख्य आठवणी आहेत...
बाबा... तुम्हाला ईश्वराच्या चरणाशी जागा मिळो, हीच आमच्या राजर्षी शाहू वाचनालयाच्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना...
ओम शांती शांती शांती...