07/06/2025
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांच्याकडून राजनंदिनी सावंत हिचा सन्मान
डोंबिवली शहरातील राॅयल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी राजनंदिनी सावंत हिने सीबीएसई परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. राजनंदिनीच्या या उत्तुंग भरारीबद्दल भाजपचे प्रदेश कार्याध्याक्ष आणि डोंबिवली विधानसभेचे स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी राजनंदिनी सावंत हिचे कौतुक करून पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजनंदिनीच्या यशात तिच्या आई वडिलांचाही मोलाचा वाटा असल्याने कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचेही कौतुक केले. याशिवाय राजनंदिनीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याने कार्याध्यक्ष चव्हाण यांनी त्यांचाही शब्दसुमनांनी गौरव केला.
‘डोंबिवली जशी साहित्यिक, सांस्कृतिक नगरी आहे. तशी ती विद्यानगरीही आहे. इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकण्याची डोंबिवली शहराची जुनी परंपरा आहे. तिच परंपरा या शहरातील पालक, शिक्षक, शाळा चालकांच्या सहकार्याने राजनंदिनीसारखे गुणवंत विद्यार्थी पुढे चालू ठेवत आहेत. ही अखंडित परंपरा पुढे चालू ठेवणे हे खूप कौतुकास्पद आहे. राजनंदिनीच्या यशामुळे डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राजनंदिनीचा हाच यशाचा, गुणवंतपणाचा वारसा येणारी शाळकरी पुढे नेईल, डोंबिवली शहराचे नाव उज्जवल करील, असा विश्वास आहे, अशा शब्दात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
सखोल अभ्यास, कष्ट, जिद्द, चिकाटी, ध्येय आणि सातत्य या जोरावर राजनंदिनी सावंत हिने हे यश प्राप्त केले आहे. इतर विद्यार्थ्यांनीही हेच गुण प्राप्त करून आपली शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.