
09/06/2025
⚡विकास हवा यात वाद नाही, पण हा विकास कोकणच्या मुळावर का?
⚡समुद्राची गाज' नव्हे, लोकांच्या आवाजाची गरज आहे!
मुंबई ते सिंधुदुर्ग फक्त ५ तासांत! गेमचेंजर सागरी मार्ग!
मथळा वाचून क्षणभर डोळे विस्फारले जातात. कोकणातील भविष्यासाठी मोठं स्वप्न उभं राहतंय असा भास होतो. पण नंतर लक्षात येतं की ही अजून एक बुलडोझर घोषणांची साखळी आहे, जी जमिनीवर नांगरायला विसरते.
आज कोकणवासीयांचा आवाज स्पष्ट आहे – "गरज नाही या रस्त्याची." आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा. त्या रस्त्याची अवस्था काय आहे हे पावसाळ्यात कुणालाही विचारता येईल. ६ तासाचं अंतर म्हणे, पण कधी १६ तर कधी २० तास लागतात. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि त्यावर कोणी उत्तर देत नाही.
तरीही प्रत्येक वर्षी एखादं नवीन स्वप्न दाखवायचं – कधी बुलेट ट्रेन, कधी सागरी मार्ग, कधी हायस्पीड कोरिडॉर. पण जे आहे ते निट करू शकत नाहीत. लोक विचारतात – "विकास म्हणजे नेमकं काय?"
➡️ निसर्गाच्या कुशीत कोकणाला काँक्रिटचा बेल्ट घालणं?
➡️ माशांच्या पोटावर पाय देऊन सी-रूट काढणं?
➡️ चार हॉटेलवाल्यांच्या हितासाठी संपूर्ण समुद्रकिनारा विकायला काढणं?
हे जर विकासाचं मॉडेल असेल, तर कोकणवासीयांना त्याचा तीव्र विरोध आहे. कोकणाच्या सौंदर्याला, जैवविविधतेला, आणि माणसांच्या जगण्याला गाडून 'विकास' करणं म्हणजे धोका आहे, प्रगती नव्हे.
तेच तर वाचकाने उपहासाने म्हटलं – "विकासाच्या नावाखाली घाण घालून ठेवणार ती वेगळीच. आता समुद्राची गाज ऐकत तेथेच राहतो!"
ही हास्यविनोदी पंक्ती खूप काही सांगून जाते –
राजकारण्यांच्या घोषणांच्या गाजेपेक्षा, खऱ्या समुद्राची गाज शंभर पट जास्त प्रामाणिक आहे. ती खोटं बोलत नाही, तारखा बदलत नाही आणि टेंडरमधून टक्केवारीही घेत नाही.
लोकांना हवे आहेत –
✅ पूर्ण आणि सुरक्षित महामार्ग
✅ वेळेवर रेल्वे
✅ आरोग्य, शिक्षण, रोजगार
✅ आणि सर्वात महत्त्वाचं – निसर्गाची अबाधितता
हे सगळं बाजूला सारून, 'फोटोजनिक' रस्त्यांची स्वप्नं दाखवणं म्हणजे केवळ राजकीय बाजारबुणग्या आहेत. हे जनता ओळखून आहे.
समुद्राची गाज ऐकवत नवीन रस्त्यांचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी, एकदा का होईना, लोकांच्या मनातील आवाज ऐकावा – "जे आहे ते जपा, आधी ते पूर्ण करा."
नाहीतर उद्या सागरी मार्गाच्या उदघाटनाला फक्त खड्डे, खर्च, आणि खंत हजर राहतील... जनता नाही.
पावसाळा सुरू झाला की कोकणातल्या रस्त्यांचा खराखुरा चेहरा उघड होतो. वरकरणी गुळगुळीत दिसणारे रस्ते पहिल्या पावसातच खरडून निघतात आणि खड्ड्यांचा उधाण येतो. वर्षभर "समृद्धी", "विकास", "५ तासांत सिंधुदुर्ग" अशा घोषणा ऐकवणाऱ्यांची झोपी गेलेली तंत्र यंत्रणा मग एकदम मौनात जाते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली कित्येक वर्षं लांबणीवर टाकलं जातंय. अधूनमधून एखादं फित उघडण्याचं उदघाटन, पाण्याखाली गेलेली अपूर्ण कामं आणि मंत्रीमहोदयांचं गाजरगप्प आश्वासन – हाच परिपाठ झालाय. आजही रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत रस्ता म्हणजे खड्ड्यांची साखळी, वाहतूक ठप्प आणि प्रवाशांची परीक्षा.
ही परिस्थिती 'विकास' म्हणून खपवण्याचा प्रकार म्हणजे कोकणवासीयांची खुलेआम थट्टा आहे. हाच रस्ता, हाच पावसाळा, पण प्रत्येक वर्षी तेच प्रश्न – मग विकास कुठे गेला? "१५ दिवसात रस्ता तयार करतो", "संपूर्ण महामार्ग जूनपर्यंत पूर्ण" या घोषणा ऐकून आता जनतेनेही त्यावर विनोद करायला सुरुवात केली आहे.
कोकणच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांना हा नविन सागरी महामार्ग नको आहे. जे आहे ते जपा – ही मागणी आता बळावते आहे. पण सत्ताधाऱ्यांचं डोळ्यांत केवळ निवडणूक निकालच दिसत असतील, तर रस्त्यावरचे खड्डे त्यांना कसे दिसणार? निवडणुकीआधी "गेली ७० वर्षांत काहीच झालं नाही" म्हणणारे सत्तेवर आल्यावर मात्र, ७० दिवसातही काहीच करत नाहीत!
आज कोकणातील रस्त्यांची अवस्था म्हणजे एकाचवेळी सत्तेचा फसवणूकनामा, प्रशासनाची बेजबाबदारी, आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीचं जिवंत उदाहरण आहे.
जनतेने आता निर्णय घ्यायला हवा. विकास हवा पण झकास हवा – खोट्या जाहिरातींच्या घोषणांमध्ये नव्हे, तर जमिनीवर जाणवेल असा. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये सापडलेली गाडी फसलेली नाही – फसवलेली आहे, आणि हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे.
ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार