28/07/2026
स्मशानभूमीअभावी चक्क ग्रामपंचायत आवारात अंत्यसंस्कार! मदनापूरातील घटनेने मारेगाव तालुका प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल;
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही जर एखाद्या मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी हक्काची दोन गुंठे जागा मिळत नसेल, तर यापेक्षा मोठी प्रशासकीय आणि राजकीय नामुष्की ती कोणती? मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे स्मशानभूमीची सुविधाच उपलब्ध नसल्याने स्वर्गीय रामदास पुरुषोत्तम मानकर (वय ८१) या वृद्धाच्या पार्थिवावर चक्क ग्रामपंचायत इमारती परिसर आणि पटांगणातच अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत विदारक व धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. या एकाच घटनेने ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाची आणि प्रशासनाच्या पोकळ दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. ८१ वर्षांच्या मानकर आजोबांच्या निधनानंतर संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. परंतु, गावात हक्काची व सुसज्ज स्मशानभूमीच नसल्याने त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे करायचे, असा संतप्त आणि हतबल करणारा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा ठाकला. अखेर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहमतीने थेट ग्रामपंचायतीच्याच पटांगणात अंत्यविधी पार पाडण्यात आला.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनापूर गावात अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात यावी, यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली, ग्रामसभेत ठराव घेण्यात आले. मात्र, दरवेळेस कागदी आश्वासनांशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही पडले नाही. जगताना नागरी सुविधांसाठी हाल सोसायचे आणि मरण आल्यावर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधायची, ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण मारेगाव तालुक्यातून संतापाची लाट उसळली असून, मदनापूर येथे तातडीने स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून निधी मंजूर करावा, अशी आक्रमक मागणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या मारेगाव तालुक्यातील तब्बल ३० हून अधिक गावांमध्ये आजही हक्काची स्मशानभूमीच उपलब्ध नाही! विधिमंडळ अधिवेशनात स्थानिक आमदारांनी हा प्रश्न लावून धरल्याचे सांगितले जाते, पण अधिवेशनाचे वारे शांत झाले की अधिकारी पुन्हा कुंभकर्णी झोपेत जातात, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
शासनाचे डिजिटल इंडिया आणि विकासाचे मोठे मोठे फलक जेव्हा अशा अंत्यसंस्काराच्या चितेला तोंड देतात, तेव्हा त्या प्रत्येक विकासकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. माणसाच्या मरणानंतरच्या अंतिम प्रवासाचा तरी सन्मान राखला जावा, हीच किमान अपेक्षा असते. आतातरी मारेगाव तालुका प्रशासनाने, महसूल विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे. तालुक्यातील ज्या ३० गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे, तिथे तात्काळ जमिनीचे अधिग्रहण करून शेड आणि रस्त्यांची सोय करून द्यावी. जर येत्या काळात हा प्रश्न सुटला नाही, तर पुढील अंत्यसंस्कार थेट तहसील कार्यालयाच्या आवारात करण्याची वेळ नागरिकांवर येईल, हा जाहीर इशारा शासनाने लक्षात ठेवावा!
अशाच प्रकारच्या मारेगाव तालुक्यातील ताज्या घडामोडी, खऱ्या बातम्या आणि जाहिरातीसाठी आजच संपर्क करा: ९७६४१ २०२८९. मारेगाव टाइम्स — स्थानिक घडामोडींचे विश्वासार्ह व्यासपीठ!