23/05/2026
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी उभारलेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यातील पहिले शहीद नामांतरवीर पँथर पोचिराम कांबळे यांच्या सहचारिणी धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धोंड्यामाय यांचे जीवन हे संघर्ष, स्वाभिमान आणि आंबेडकरी विचारांवरील निष्ठेचे जिवंत उदाहरण होते. अशिक्षित असूनही त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मार्गावर आयुष्यभर ठामपणे वाटचाल केली. जीवनात असंख्य अपमान, अन्याय, जखमा, द्वेष आणि सामाजिक विषमता सहन करतानाही त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.
काही लोक शिक्षणाने कदाचित मागे असतील, पण वर्तनाने अत्यंत प्रामाणिक असतात. कारण त्यांनी आयुष्यात अपमान, अन्याय आणि संघर्ष प्रत्यक्ष जगला असतो. आज अनेक सुशिक्षित लोकांना जे सहज मिळाले, त्यामागील वेदना, लढे आणि बलिदान त्यांना अनुभवावे लागलेले नसतात. म्हणूनच अशा पिढीचे अनुभव, त्याग आणि जीवनमूल्ये समाजासाठी अमूल्य ठेवा असतात.
मातंग समाजात जन्म घेऊन संपूर्ण बहुजन समाजात सन्मानाने ओळख निर्माण करणे, हीच या कांबळे परिवाराची खरी कमाई आहे. धोंड्यामाय यांच्यासारखी माणसे समाजातील जाणत्या आणि अजाणत्या पिढीमधील जिवंत पूल असतात. त्यांचे जीवन, त्यांचे संघर्ष, त्यांची शिकवण जर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली नाही, तर अनेक तरुण दिशाहीन होऊ शकतात आणि चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतात.
म्हणूनच समाजातील बुद्धिजीवी, अभ्यासक आणि जाणत्या वर्गाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या समाजाचा खरा इतिहास, प्रेरणा आणि बलिदान जपले पाहिजे. कारण इतिहास विसरणारा समाज भविष्य घडवू शकत नाही.
शहीद पोचिराम कांबळे यांच्या बलिदानानंतर एक विधवा म्हणून धोंड्यामाय यांनी केवळ संसार सांभाळला नाही, तर आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमानही जपला. त्यांचे आयुष्य बहुजन समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ राहील.
धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांना विनम्र अभिवादन. भावपूर्ण श्रद्धांजली.