18/06/2020
मुक्त शब्द , जून २०२०
जातिव्यवस्था आणि स्त्रीवाद
- रूपाली जाधव
जातिव्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीला कमी लेखते, आपल्यापेक्षा वरच्या जातीचा द्वेष आणि खालच्या जातीला तुच्छ लेखते या समीकरणातून जातिव्यवस्थेची उतरंड टिकून राहते. हे बाबासाहेबांचे वाक्य आजही इथल्या समाजव्यवस्थेला तंतोतंत लागू पडते. आज वर्णव्यवस्था अस्तित्वात नसली तरी जातिव्यवस्था आणि पितृसत्ता ही शोषण शासनाची व्यवस्था भारतात आहे . जातीच्या उतरंडीमध्ये स्त्रियांचे स्थान हे सर्वांत खालचे मानले गेले आहे.
पुरुष सत्तेचा उदय हा शोषण व वरकड मूल्याच्या आधारावर झाला.
‘‘ढोल, गंवार, शूद्र, पशु, नारी सकल ताड़न के अधिकारी" अशी ही धारणा प्रचलित असली तरी त्याही खाली बाई ही पायाखालची धूळ आहे तिला पायाखालीच ठेवले पाहिजे". हेही याच मनुस्मृतीत म्हटले आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही कुटुंबापासून ते सार्वजनिक क्षेत्रापर्यंत दुय्यम वागणूक दिली जाते. आपल्या समाजामध्ये ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या आधी मातृप्रधान गणपद्धती अस्तित्वात होती. जी की, "समता, बंधुता, स्वातंत्र्य" या मूल्यांवर आधारित होती. जिथे खाजगी मालकीला कुठलाही थारा नव्हता. निसर्गाशी मैत्री करत प्रत्येक घटकाला म्हणजे नारी-नर असा कुठलाही भेद न मानता स्त्रियांच्या नेतृत्वाखाली समान न्याय देणारी पद्धती अस्तित्वात होती. ही मातृप्रधान पद्धत नेस्तनाबूत करून येथे पितृसत्ताक पद्धती प्रस्थापित केली गेली. ती इथल्या विषमता, शोषण व वरकड मूल्याच्या आधारावर. या कब्जा केलेल्या खाजगी संपत्तीचे जतन, समृद्धी व संवर्धन, या प्रश्नांतून पुढे पुरुषसत्तेचा उदय झाला.
ही सत्ता टिकवण्यासाठी धर्म आणि पितृसत्ताक विचारधारा एकमेकांच्या हातात हात घालून, ब्राह्मणी पितृसत्ता म्हणून काम करू लागली. या ब्राह्मणवादाला कुठलाही जातिवाचक अर्थ न चिटकवता जातिसंस्था व पितृसंस्था यांचे गठण व भरणपोषण करणारी सांस्कृतिक यंत्रणा म्हणून समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण्यवाद ही फक्त स्त्री-पुरुषांच्या विषमसंबंधावर नव्हे तर जातिव्यवस्थेच्या शोषण शासनालाही आधारभूत ठरते. स्त्री लैंगिकतेच्या नियंत्रणाची व्यवस्था हा जातिव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणावर व पायावरच जातीची निर्मिती व सातत्य टिकून आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे.
ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांच्या भागीदारीचा प्रश्नच नसून यात स्त्रियांचे संबंध हे जाचक, अन्यायकारक आहेत. येथे जातीनुसार स्त्रियांच्या भागीदारीचे स्वरूप बदलते. यात कोणा एकाची हुकूमशाही, व्यक्तिवाद, हक्क, वारसा,मालकी याचा समावेश होता, अशा गोष्टींच्या पायावर उभारलेली ही सत्ता मुळातच "कुणा एका वर्गाचे हित, तर कुणा एका वर्गाचे शोषण" घेऊन उदयास आलेली दिसून येते. या जातीय पितृसत्ताक समाजव्यवस्थेमुळे श्रमिकांची विभागणी, जातीचे अस्तित्व, उत्पादनपद्धती उभी राहिली. त्याचबरोबर श्रेणीबद्ध उतरणीचे सातत्यही टिकून राहिले.
ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या उभारणीचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा इथल्या ब्राह्मणी पितृसत्ताक विचारधारेने इथले राजकारण, अर्थकारण,धर्मकारण, समाजकारण, रूढी,परंपरा, या सर्व गोष्टींवर आपले प्रभुत्व व त्याचबरोबर आपली सत्ता प्रस्थापित केली. ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी धर्माचा मोठय़ा प्रमाणावर आधार घेतला आणि एकाधिकाराच्या दृष्टीने सर्व नीतीनियम, हक्क, लिंग आधारित श्रमविभागणी, कर्तव्य व नौतिक-अनौतिक भ्रामक कल्पना यांची मांडणी धर्माच्या आडून केली. या सत्तेचे संवर्धन करण्यासाठी सत्ता वंशपरंपरेने पुरुषांकडे बहाल केली.
पितृसत्तेच्या वृद्धीसाठी कुटुंबसंस्था,सार्वजनिक जीवन, विवाहसंस्था, जात-जमात, इत्यादींसारख्या सर्व स्तरांवर ब्राह्मणी पितृसत्ताक पुरुष घडविण्यासाठीची तरतूद करण्यात आली, ज्यातून त्यांचा कच्चा माल हा या व्यवस्थेत तयार होऊन इथल्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला पूरक असे साधन तयार होईल.
याच धर्माने स्त्रीला देवत्व बहाल केले आणि दुसरीकडे
‘‘चूल आणि मूल" या लिंगाधारित श्रमविभागणीत अडकवून तिला परावलंबी बनवले. जाति-धर्माच्या आडून रोटी-बेटी व्यवहार, योनिसशुचिता, वंशशुद्धीच्या नैतिक कल्पनेतून जातीतच स्त्रीचे लग्न होऊन संपत्तीचे रक्षण आणि केंद्रीकरण होईल याचे षडयंत्र आखले . प्रत्येक जातीची दोरी ही पुरुषाच्या हातात दिली व सोयीस्करपणे विविध संस्था, शिक्षणव्यवस्था, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांत पुरुषसत्तेला पूरक असे वातावरण मिळून त्या त्या जातीतील स्त्रीवर अंकुश ठेवता येईल असे मोठे जाळे आखले गेले.
भंवरीदेवी ही अस्पृश्य असल्यामुळे तिच्यावर सवर्ण पुरुष बलात्कार कसा करू शकेल?
स्त्रीद्वेष किंवा स्त्री-संघर्ष हा तिच्या जन्मापासूनच सुरू होतो. तिला या जगात येऊ द्यायचे की नाही इथून सुरुवात झालेली असते. लहानपणापासून तिला घरात समान वागणूक दिली जात नाही. आजही शिळे अन्न हे नेहमी घरातील बाईच्या वाटय़ाला तर ताजे व मर्जीचे अन्न पुरुषाला हे कित्येक घरांत होताना दिसून येते. खेडय़ात, झोपडपट्टय़ांमध्ये आजही सरकारी शाळांसाठी मुली तर प्रायव्हेट दर्जेदार शिक्षणासाठी मुलाचा विचार केला जातो.
पुरुषाच्या करिअरवर तर बाईच्या लग्नावर खर्च विभाजित केला जातो. लग्न झाल्यानंतरही सासरी बाईचं मूल्य हे ‘‘बिनपगारी अन् फुल अधिकारी" असेच असते. ती किती त्यागमूर्ती आहे यावर तिचे गौरवीकरण तसेच मूल्यमापन केले जाते.
जमीन, स्थावर मालमत्ता या गोष्टींवर तिची फक्त कागदोपत्री मालकी राहते. स्त्रीचे शोषण हे प्रत्येक जातीत वेगवेगळ्या स्तरावर अवलंबून असते. प्रत्येक जात ही ब्राह्मणी पितृसत्ताक विचारधारेचे अनुकरण करून जातिनिहाय बाईचे शोषण करते.
ब्राह्मण अथवा सवर्ण स्त्री ही जरी दलित स्त्रीपेक्षा उच्च असली तरी तिच्या जातीतील पुरुषाच्या तुलनेत तिला मिळणारे हक्क, अधिकार, नियम हे तुलनात्मकरित्या नगण्यच होते व आहेत. ब्राह्मण/सवर्ण स्त्रीवर तिचा वंश, कुळ, जात, धर्म शुद्ध ठेवण्याची तसेच ती जपण्याची - परिणामी स्वत:ला पिंजऱ्यात ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर लादली जाते. ती जरी ब्राह्मण/सवर्ण म्हणून प्रतिष्ठित असली तरी तिला तिच्या पती, पिता, पुत्र या सर्वांची कामे करणे, कुटुंब सांभाळणे नैतिकदृष्टय़ा बंधनकारक असते. शिवाय ते न केल्यास ती आदर्श स्त्री नसते दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या नजरेतही.
एखादी सवर्ण बाई ही जरी राजकीय पदावर असली तरी ती फक्त नामधारी असते. सर्व कामे ही पुरुषच करतात. तिच्या बुद्धिमत्तेवर घेतलेली ही एक शंकाच म्हणावी लागेल. परिणामी त्यांना शैक्षणिक कुवत असूनही नेतृत्वात येण्यासाठी खूप साऱ्या अडथळ्यांना पार करावे लागते. ती जरी ब्राह्मण/सवर्ण असली तरी, जातीच्या उतरंडीनुसार खालच्या जातीतील समजल्या जाणाऱ्या पुरुषांकडून तिला फक्त एक मादी म्हणूनच भक्ष्य बनवले जाते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हैदराबाद येथील एका उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित महिलेवर झालेला बलात्कार व तिची हत्या.
खालच्या जातीच्या पुरुषांना उच्चजातीय स्त्रियांच्या तुलनेत खालचे स्थान प्राप्त झालेले असते. या पुरुषाने उच्च जातीतील स्त्रियांचा विनयभंग केल्यास त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ही ठरलेली असते. परंतु याच ठिकाणी दलित महिलांवर झालेल्या बलात्काराला शिक्षा होणे तर दूर उलट दलित महिलेवर सवर्ण पुरुष बलात्कार करूच शकत नाही असे प्रतिपादन भंवरीदेवीच्या केसमध्ये झालेले दिसून येईल. भंवरीदेवी ही अस्पृश्य असल्यामुळे तिच्यावर सवर्ण पुरुष बलात्कार कसा करू शकेल? हे एका न्यायालयाचे प्रतिपादन आहे.
सर्व प्रकारच्या हिंसा हे जातपितृसत्तेचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
उच्चजातीय स्त्रिया पतीला मालक धनी संबोधतात पण त्याच स्त्रिया जातिउतरंडीनुसार निम्नजातीतील पुरुषांच्या मालक किंवा धनी ठरतात. याउलट दलित पुरुष जो स्वतः जातीच्या उतरंडीत पिचला गेला असला तरी पुरुषसत्तेचे काही अंशी फायदे मिळतात (जे ब्राह्मण पुरुषांच्या तुलनेत कमी असतात.) उदाहरणार्थ, खालच्या जातीतील पुरुषांना पितृसत्ता शुद्धता, श्रेष्ठता, स्वामित्व, प्रदान करते त्याचप्रमाणे दलित स्त्रीला अशुद्धता, कनिष्ठता व अवलंबित्व बहाल करते. दलित पुरुषांना उतरंडीप्रमाणे त्यांच्या खाली कोणती दुसरी जात नसून ती एका बाईच्या/लिंगभेदाच्या स्वरूपात आपले पुरुषी वर्चस्व गाजवत असते. याची कैक उदाहरणे दलित वस्त्यांमध्ये बाईला फक्त मारझोड करण्यापुरती नव्हे तर तिला चारचौघांत नागडी करण्यात, पावित्र्याच्या संकल्पनेतून तिचे नाक कापण्यातही दिसून येते.( याची मी स्वत: साक्षीदार आहे.)
दलित पुरुषामध्ये असणाऱ्या ब्राह्मणी पितृसत्तेच्या अहंकाराला दलित महिला बळी पडतात. त्या शोषणासाठी उच्चजातीय पुरुषालाही उपलब्ध असतात आणि स्वतः शोषित असलेल्या दलित पुरुषालाही उपलब्ध असतात. दलित पुरुषांकडून तिचे शोषण जात आणि स्त्री म्हणून दुहेरी असते.
उदाहरणार्थ, तिला घरामधे कुटुंबातील सर्व कामे करणे बंधनकारक तर आहेच शिवाय तिला सवर्णाच्या घरी मजुरी/घरकामे करावी लागतात. त्याचबरोबर सर्व घाणीची कामे उदाहरणार्थ, संडास धुणे, मुलांची,आणि घरातील वृद्ध लोकांची शुश्रुषा, साफ करणे ही बाईचीच अलिखित स्वरूपातील कामे मानली जातात. घराची इज्जत राखण्याची आद्य जबाबदारी म्हणजे त्या पुरुषाबद्दल कुठेही न बोलणे व आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता कुठेही न करण्याची जबाबदारी ही समाजमान्य पद्धतीने तिच्यावर लादली जाते.
एकीकडे बाईला अबला म्हणत दुसरीकडे मात्र तिच्याकडून खूप मोठमोठय़ा अपेक्षा ठेवण्यात येतात. पुरुषाला नेहमी बाईमध्ये आई हवी असते जी त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देईल, निःस्वार्थी पद्धतीने प्रेम करेल, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवेल म्हणजे यामध्ये केंद्रस्थानी पुरुष असतो, ‘‘मी" असतो. बाईमधे आई असावी याचे उदात्तीकरण करणारी कैक उदाहरणे आपल्या साहित्यामध्ये आहेत..
येथे पुरुषाचा दांभिकपणा दिसून येतो. एकीकडे ती अबला, पीडित, सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे पण दुसरीकडे मात्र तिच्याकडून मोठी अपेक्षा करणे आणि सतत आपल्या सोयीनुसार नात्यांची गुंफण करणे हे किती योग्य आहे?
मी असं म्हणेल की सगळ्यात आधी तुम्ही तिचं माणूसपण स्वीकारा.
तिला तिचं ‘‘माणूसपण जगू द्या" मग ती स्वत: ठरवेल की तिला काय हवंय काय नको ते.
जातिव्यवस्थेमुळे सगळ्यात जास्त दबलेला शोषित परंतु तरीही आवाज न काढता येणारा घटक म्हणून दलित बाईची होणारी कुचेष्टा आपल्याला इथे दिसून येते.
पितृसत्ता का टिकते? याचे एक महत्त्वाचे हेही कारण आहे की काही प्रमाणात समाजव्यवस्थेत पुरुषसत्तेच्या वाहक या मोठय़ा प्रमाणावर स्त्रियाही बनल्या आहेत, परिणामी शोषकांच्या संस्थेत आणखीन भरच पडली आहे.
सर्व प्रकारच्या हिंसा हे जातपितृसत्तेचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये शाब्दिक, भावनिक हिंसा, लैंगिक, शारीरिक, आर्थिक हिंसा, या सर्व स्त्रियांवर नियंत्रणासाठी वापरल्या जातात.
महिलांचे तथाकथित चारित्र्यहनन हे जातपितृसत्तेचे महत्वाचे साधन आहे. स्त्रीची प्रतिष्ठा तिची जात, वैवाहिक दर्जा, विधवा, परित्यक्त्या स्त्रिया मूल/मुलगा आहे की नाही. प्रतिष्ठेचे खोटे भ्रम तयार करून महिलांमध्ये ही फूट पाडली जाते
उदाहरणार्थ, टाकलेली बाई विरुद्ध नवरा असलेली बाई, विधवा विरुद्ध नवरा असलेली, मुले असलेल्या विरुद्ध नसलेल्या, समलिंगी विरुद्ध हेट्रोसेक्शुअल.
शासनसंस्था तिचे विविध घटक आणि जातपितृसत्ता यांची घट्ट मैत्री असते. पारंपरिक आणि नव्या रूपात असलेल्या जातपंचायती याही महिलांवर नियंत्रणे ठेवतात. आजच्या भांडवली डिजिटल युगात स्त्रीचे चारित्र्यहनन सायबर क्राइममार्फत केले जाते, या हिंसेची अनेक उदाहरणे आहेत. त्यातून महिलांना मोठय़ा प्रमाणावर शारीरिक-मानसिक हिंसेला सामोरे जावे लागते.
येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरुषांना जरी या ब्राह्मणी पुरुषसत्तेचे फायदे मिळाले असले तरी काही प्रमाणात त्याचे तोटेही अप्रत्यक्षपणे त्यांच्यात समाविष्ट झाले आहेत. निदान बाईचे होणारे शोषण हे दृश्य स्वरूपाचे आहे, परंतु पुरुषांचे होणारे शोषण हे अदृश्य स्वरूपाचे आहे. जे मर्दानगीच्या, पुरुषार्थाच्या खोटय़ा भ्रामक कल्पनांनी इथल्या पुरुषाचे निरागस, संवेदनशील जगणे, सुखं, दुःख, हसणे, रडणे, लाजणे या सर्व क्रिया जे की जिवंत माणसाचे वैशिष्टय़ आणि लक्षण आहे ते हिरावून घेऊन त्याला एक निगरगट्ट, असंवेदनशील, क्रूर चालतेफिरते यंत्र बनविते आहे, ज्यामुळे खोटय़ा मर्दानगीच्या ओझ्याखाली दबून त्याला आपले माणूसपण गमवावे लागते.
या जातिधर्माने स्त्री शोषित तर केलीच त्याचबरोबर या शोषणव्यवस्थेचा भार आपल्या डोक्यावर वाहण्याची आद्य जबाबदारीही कशी तिचीच आहे हेही तिच्या माथी मारण्याची व्यवस्था सफल झालेली आपणास दिसून येते, परिणामी कुठल्याही जातीतील स्त्री ही (जरी त्या जातीत तिचा तिरस्कार होत असेल तरी) त्या जातीचा द्वेष करताना दिसत नाही, तर ती जात,धर्म, वंश पुढे कसा जाईल त्याचे संवर्धन कसे होईल याची तरतूद करताना दिसून येते. जातीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय स्त्रिया थोडय़ा प्रमाणात का होईना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधा मिळाल्याने त्या शोषणावर बोलताना अथवा ते नाकारताना दिसतात. परंतु दलित स्त्रीला यापैकी कुठलीही गोष्ट न मिळाल्याने ती पुन्हा याच शोषक व्यवस्थेच्या आधारावर विसंबून असलेली आपणास दिसून येते. आजच्या भांडवली युगात स्त्रीच्या शोषणाचे स्वरूप काहीसे बदलेले दिसून येत आहे.
डिजिटल युगात तिचे प्रॉडक्ट वस्तू म्हणून शोषण झालेले दिसून येते. इथल्या ब्राह्मणी भांडवलशाहीने आणखी पुढे जाऊन तिचे वस्तूकरण करत तिच्या शरीराला बाजारात वस्तू म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. आजही आपण पाहू शकतो की आर्थिक - सामाजिक - सांस्कृतिक हे सर्व अधिकार महिलांना नसल्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीत पुढे येत नाहीत. त्या स्वतः त्याबद्दल जागृत नाहीत आणि जरी जागृत झाल्या तरी त्यांना पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या या व विविध संस्था मोठय़ा प्रमाणावर काम करताना, साधं तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचे असेल तरी घरातील कामे कोण करणार हा छोटा वाटणारा पण गंभीर प्रश्न तिच्यासमोर असतो. घरातील कोणीही व्यक्ती तिला मदत करणे तर दूरच परंतु तिच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेही जात नाही. ही आजची परिस्थिती आहे.
स्त्रीवाद
महात्मा फुले यांनी जातिअंताच्या लढाईतील स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न हा केंद्र व मध्यवर्ती ठेवला; मात्र त्यानंतर चळवळीमध्ये हा प्रश्न मागे पडला. सर्व जातिचळवळी व वर्गचळवळी या पुरुषमुक्ती चळवळ असल्याचे कॉम्रेड शरद पाटील नोंदवतात. वर्चस्वाचा सामना करण्याच्या धुमाकुळीत आक्रमक पुरुषी आवेशाने चळवळी व्यापून गेल्या. दलित चळवळीतही तेच घडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर स्त्रीसहभाग कमी होत गेला. स्त्रियांचे अधिकाधिक गृहिणीकरण होत गेले आणि चळवळ पुरुषप्रधान बनत गेली.
गुलामाला गुलामीची जाणीव झाल्यानंतर तो पेटून उठणारच..
गुलामाला गुलामीची जाणीव झाल्यानंतर तो पेटून उठणार या बाबासाहेबांच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक शोषित घटक - मग तो कुठल्याही जाती ,वर्ण,वर्गातील असेल वा कोणत्याही लिंगाचा असेल - तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आज शाहीनबागमध्ये एनआरसी, सीएएसारख्या आंदोलनात आपल्या समूहासाठी राजसत्तेशी निर्भीडपणे भिडणाऱ्या, लढणाऱ्या मुस्लीम स्त्रिया उद्या स्वतःच्या मूलभूत न्याय्य हक्कासाठी झगडणार नाहीत, पेटून उठणार नाहीत या भ्रमात कोणी राहू नये.
स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या पुरुषांनी जातीय, वर्गीय, धार्मिक प्रश्नांप्रमाणे लिंगभेदाचा मुद्दा पुढे आणला नाही. प्रस्थपितांप्रमाणेच इथेही स्त्रियांची संख्या ही प्रातिनिधिक स्वरूपाचीच दिसून येते.
चळवळीतील भाषा, संस्कृती, लिखाण हे अजूनही पुरुषप्रधानच आहे. आजही चळवळीतील लोक पारंपरिक पद्धतीचे सर्व सोहळे करताना दिसतात. स्वत:च्या लग्नात मंगळसूत्र अथवा हुंडा याला ठामपणे नकार देताना कुणीही दिसत नाही.( हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत काही मान्यवर सोडून.)
स्त्रीला नेतृत्वात अथवा चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी कुठल्याही चळवळी विशेष श्रम घेताना दिसून येत नाहीत. किंबहुना ते त्याच्या जाणिवेत नेणिवेत दूरपर्यंत नसल्याचे लक्षात येते.
चळवळीमध्ये येणारा खालच्या जातीतील पुरुष हा जात-लिंगभावाच्या उतरंडीमधून येताना विशिष्ट मनोद्वंद्वामध्ये अडकलेला असतो. एका बाजूला पुरुष म्हणून प्राप्त झालेली श्रेष्ठता, वर्चस्व, स्वामित्व ; दुसऱ्या बाजूला जातीने दिलेल्या कमीपणा, सेवावृत्ती पालन करताना दिसतात. त्याचबरोबर उच्च स्त्रियांमध्ये असणारी श्रेष्ठता वर्चस्व स्वामित्व तर दुसऱ्या बाजूला बाई म्हणून मिळालेली हीनता, सेवावृत्ती, अवलंबित्व या परस्परविरोधी गोष्टी घेऊन दोघेही आपल्या जातवास्तवासहित चळवळीत येतात. परिणामी स्त्रीदास्याचा मुद्दा लांब फेकला गेला.
स्त्रीदास्य चळवळीची भूमिका पत्रात बंद झालेली दिसून येते.
एकोणिसाव्या शतकात संपूर्ण जगात स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले. स्त्रियांचे प्रश्न पुढे आले. भारतामध्ये स्त्रियांच्या प्रश्नावर काम चालू होतेच; परंतु १९७५नंतर स्त्रीवादाची खरी मांडणी सुरू झाली. यामध्ये बलात्कार, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा मुख्यतः या प्रश्नांना घेऊन महिला पुढे येताना दिसल्या.
१९९० साली दलित स्त्रियांनी आपला स्त्रीवाद आणि सवर्ण स्त्रियांचा स्त्रीवाद यामध्ये काही फरक असल्याचे नमूद केले. जातीने, वर्गाने आणि लिंगाधारित होणाऱ्या शोषणाने त्या उच्चवर्णीय स्त्रियांपेक्षा कशा वेगळ्या आणि अधिक शोषित होत्या हे त्यांनी इथे नमूद केले.
‘‘माझं जगणं, माझा अनुभव, माझा स्त्रीवाद" अशी मांडणी करत त्या पुढे आल्या.
‘‘( परंतु त्याचबरोबर सवर्ण महिलांशी मित्रभावी पद्धतीने सतत संघर्ष करत राहू ही मांडणी झाली.)''
स्त्रीदास्य ही गोष्ट चळवळीच्या भूमिका पत्रात बंद झालेली दिसून येते.
आजही चळवळीत १०० पुरुषांमागे साधारण एक स्त्री येताना दिसते, बाहेरील ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेप्रमाणेच इथेही थोडय़ाफार प्रमाणात तिला लिंगभेदाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. किंबहुना इथे झालेल्या अनपेक्षित अन्यायामुळे ती आणखीनच निराशेच्या गर्तेत जाते व समाजबदलाच्या विचारापासून कोसो दूर फेकली जाते. तिला कुठल्याही चळवळीत सुरक्षित हक्काची व ती आत्मविश्वासाने वावरेल असे वातावरण अशी जमीन अजून तरी तयार झालेली दिसून येत नाही.
पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक पटींनी स्त्री ही आधी घरात, मग समाजात संघर्ष करत ती चळवळीचा भाग बनू पाहते.
प्रत्येक मोर्चा, आंदोलन, वर्गभेद, जातिभेद या विषयावर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भिडते; परंतु जेव्हा लिंगभेदाची लढाई समोर येते तेव्हा नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण सोयीस्कर पद्धतीने स्त्रीप्रश्न डावलताना दिसतात.
स्त्रीदास्य ही गोष्ट फक्त चळवळीच्या भूमिका पत्रात लिखित स्वरूपात बंद झालेली दिसून येते. स्त्री प्रश्नाकडे मुळातच फक्त महिलांचा विषय म्हणून बघितले गेले. जरी जात ,वर्ग, स्त्रीदास्यअंत हे एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात असले तरी.
कित्येक नेते,कार्यकर्ते, कॉम्रेड यांच्या घरी स्वतःच्या बायकोला, आई, बहिणीला चहा-पोहे देण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम नसते. (मी स्वतः याची साक्षीदार आहे ) हेच नेते पुढे जाऊन स्त्रीमुक्तीची मोठमोठय़ा चर्चा विचारपीठावरून तासन् तास करताना आपल्याला दिसतात. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत लिंगाधारित श्रमविभागणीचा प्रश्न चळवळीने अजेंडय़ावर घेतलेला दिसत नाही, किंबहुना तो प्रश्नच अस्तित्वात नाही असे वातावरण उभे केले जाते. महिलांनी जर स्त्रीप्रश्न उपस्थित केलाच तर समस्त पुरोगामी पुरुष एकत्र होऊन प्रतिगामी रूप धारण करतात व प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्त्रीलाच मूर्ख ठरवतात. परिणामी काही स्त्रियांना या प्रश्नांना घेऊन वेगळे काम करायला लावण्यास ह्या सर्व पुरोगामी संघटनाच जबाबदार आहेत.
स्त्रीने केलेला विद्रोह हा लिंगभेदाला तर छेद देतोच सोबतच शोषणावर उभ्या राहिलेल्या जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था या सगळ्यांना हादरा देतो, हे सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्षित केले जाते.
ज्यांनी या जातिअंतासाठी व स्त्रीदास्यासाठी योगदान दिले आणि ब्राह्मणी पितृसत्तेची उकल करण्यात पुढाकार घेतला त्यात महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड शरद पाटील, उमा चक्रवर्ती, शर्मिला रेगे. अशा थोर विचारवंतांची मोठी परंपरा आहे.
कोणताही समाज तेव्हाच प्रगत असतो जेव्हा त्यातले स्त्री आणि पुरुष समान असतात.
एक गोष्ट ही काळ्या दगडावरची पांढरी रेष समजून लक्षात ठेवायला हवं की स्त्रीची प्रगती झाल्याखेरीज कुठल्याही समाजाची प्रगती होणे हे अशक्यप्राय आहे. कोणताही समाज तेव्हाच प्रगत होऊ शकतो जेव्हा इथला पुरुष आणि स्त्री हे समान पातळीवर आपले जीवन सुखकर पद्धतीने जगू शकतील. त्यासाठी स्त्रीची मुक्ती, प्रगती, विकास होणे आवश्यक आहे, तिचा झालेला विकास हा या समाजाला नक्कीच परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही. परंतु या समताधारित समाजनिर्मितीसाठी फक्त ती एकटी लढून चालणार नाही, तर इथल्या लिंगाधारित ब्राह्मणी पुरुषसत्ताक व्यवस्थेशी लढण्यासाठी समस्त नारी-नर सर्वजातीय स्त्रिया दलित, आदिवासी,बहुजन, ब्राह्मण भटक्या, मुस्लीम, LGBTQ समुदाय आणि पुरुषमित्रांनी एकमेकांच्या हातात हात घालून भगिनीभाव जपत हा समतेचा गाडा पुढे न्यावा लागेल, मिळून लढावं लागेल. तरच या ब्राह्मणी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या खडकात हे समतेचं बीज रुजेल व समतेचा हा वटवृक्ष आभाळझेप घेत, बहरेल, फुलेल व इथल्या प्रत्येक पीडित, शोषित, वंचित घटकाला समान फळ देईल.
मैं तब भरूंगी ऊंची उड़ान..
जब आज़ाद होगी मेरी सखी सहेली
हर बंधन से हर लगाम से….
वह दिन एक नया उजियारा लाएगा...
उस दिन मैं भरूंगी ऊंची उड़ान आत्मविश्वास के साथ
क्योंकि तब नहीं रहूंगी सिर्फ आजाद मैं..
आजाद होगा मेरा पूरा समाज
आजाद होगी मेरी सखी-सहेली.
- रूपाली जाधव
(कबीर कला मंच,महाराष्ट्र)
संपर्क : ९८८१८४४८५३