20/07/2024
दक्षिण मुंबईची दैना!
मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून दक्षिण मुंबईशी माझं एक वेगळं नातं आहे. मी राहायला मालाडच्या डोंगराळ भागातल्या झोपडपट्टीत आहे. मात्र माझ्यातला लेखक, पत्रकार आणि कलाकाराला नेहमीच दक्षिण मुंबईतील सण, उत्सव, कलाकारांची मांदियाळी आणि इथल्या जुन्या झालेल्या इमारती आकर्षित करत आल्या आहेत. कदाचित त्यामुळेच माझा कामाव्यतिरीक्तचा वेळ मी दक्षिण मुंबईतल्या विविध ठिकाणी फिरून घालवतो.
वांद्रे ते कुलाबा हा परिसर तसा उचभ्रू लोकांचा. टोले जंग इमारती, कॉर्पोरेट हब, गणपती मंडळं, मंत्रालय, विधीमंडळ, सीएसटी स्टेशन, दादर स्टेशन, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, बॅण्ड स्टँण्ड, बाबुलाथ मंदीर, लालबाग, मुंबादेवी, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजी अली दर्गा, अवघ्या 30 ते 50 चौ.कि.मी.च्या परिसरात अवघ्या भारतात सापडणार नाही. इतकी विविधता आहे.
इतकंच नाही, तर ह्या एवढ्या छोट्याश्या परिसराशी अवघा महाराष्ट्र जोडला आहे. राज्याचं सत्ता केंद्र असो किंवा मुंबईतली भाईगीरी, क्रिडा, कला, व्यवसाय असो किंवा लोकांची श्रद्धा. सगळ्याच बाबतीत दक्षिण मुंबई स्वतःमध्येच एक परिपूर्ण शहर आहे.
पण हळूहळू ह्या शहराच्या अस्तित्वाला Unorganised Development च्या कॅन्सरचा विळखा बसत चाललाय. ह्या शहराचं सौंदर्यच जणू ह्या शहराला शाप ठरू लागलंय असं मला वाटतंय. ह्या शहरात फिरताना स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या वास्तू पाहतांना डोळ्यांना एक समाधान वाटतं. त्यांच्यात एक विचार दिसतो, वावरण्यासाठी जगण्यासाठी एैस-पैस जागा असते.
पण अलिकडे ह्या वास्तू जुन्या होऊन ढासाळत आहेत. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला जसं शिवाजी महाराजांच्या वाघनखांची काळजी घेता नाही आली (जशी इंग्रजांनी घेतली आहे) तसंच आपल्याला ह्या वास्तूंची काळजी घेता आली नाही. शेवटी काय तर आपल्याला विकास हवा आहे. तर जुन्या वस्तू आणि वास्तू जायला नको?
हो...जुन्या वस्तू आणि वास्तू दोन्ही आपल्याला नकोत. आपल्याला विकास हवा आहे. विकास...आणि हा विकास कसा करायचा? 4 मजली सुंदर आणि सुबक असलेल्या इमारती पाडायच्या आणि तिथे 20 ते 100 मजली टॉवर आणायचे, चांगल्या वावरता येणाऱ्या चाळीतल्या माणसाला 300-400 फुटाच्या खुराड्यात टाकायचं म्हणजे झाला विकास. (इथे दक्षिण मुंबईतून हाकण्यात आलेल्या मराठी माणसाविषयी एक वेगळं पुस्तक लिहिता येईल)
असो, आज ग्रँट रोड स्टेशन बाहेर असलेल्या एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आणि एका महिलेला आपले प्राण गमावावे लागले आहेत, तर काही लोक जखमी आहेत. (अजून लोक अडकल्याची शक्यता आहे). तसं मुंबईसाठी आता लोकांचं मरणं रोजचं झालं आहे. कुठे ना, कुठे अशा दुर्घटना घडतच असतात. मात्र ह्या घडणाऱ्या घटनांमधून आपण काही शिकत नाही.
आपल्याकडे शहर नियोजन समिती आहे. पण शहराचं नियोजन नाही. आपल्याकडे महापालिका आहे, पण लोकांचं पालकत्व घ्यायला कोणी नाही. आज दक्षिण मुंबईत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत, परंतु त्या अजूनही रिकाम्या करुन लोकांना Develop कराव्या का वाटत नाही? त्याचं कारण म्हणजे त्यांना त्या परिस्थितीतही त्या ऐस-पैस असलेल्या घरात राहायला आवडतं. त्यांना माहित आहे. Devlopment झाल्यानंतर त्यांना जेमतेम त्यांचे पाय पसरता येईल इतकीच जागा मिळेल.
मुंबईत मोठी जागा घ्यायचा विचारच त्यांच्यासाठी धाडसी आहे. सामान्य माणसाच्या चाळीवर इथे टोलेजंग काचेच्या इमारती बांधल्या गेल्यात, आणि आता त्याच सामान्य माणसाला एसआरएच्या उभ्या झोपडपट्टीत कोंबड्याच्या खुराड्या इतकी जागा दिली आहे. त्यांच्या हक्काच्या जागेवर बिल्डरांचा हक्क आलाय. मुंबईत अनेक नव्या बांधलेल्या इमारती पाहिल्या की ह्यांचं आर्किटेक्चर ऑडीट, सेफ्टी ऑडीट झालंय की नाही असा प्रश्न पडतो. कारण त्यांच्या उंचीकडे पाहिल्यानंतर ह्या कधी कोसळतील हे सांगता येत नाही, असं वाटतं.
दक्षिण मुंबईतला इंग्रजांनी बांधलेला गिरणगावचा जुना परिसर पाहिल्यावर त्यांच्या नियोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. रस्त्याच्या कडेला झाडं, इमारतींमध्ये असलेली वावरण्याची जागा, दोन इमारतींमधील अंतर, समांतर रस्ते, मंदीरं, शाळा, कॉलेज, इस्पितळं आणि बरंच काही. हे सगळं आजही उभं आहे...कारण त्यांचा दूरचा विचार.
असा दूरचा विचार आपले राज्यकर्ते कधी करतील हा प्रश्न तर आहेच. परंतु मुंबईत वाढणारी लोकसंख्या ते होऊ देईल का हा ही प्रश्न आहे. तुर्त दक्षिण मुंबईचं सौंदर्य हळू हळू हरवत जात आहे, आणि दक्षिण मुंबईची दैना होण्याकडे वाटचाल सुरु आहे असं वाटत आहे.
सुशांत वाघमारे
20-07-2024