13/12/2025
अखेर सिंधी बांधवांना घरांच्या मालकी हक्काचे पट्टे – अनेक वर्षांचा प्रतीक्षा काळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांनी संपला
(महा लाइव्ह न्यूज श्रीकांत कुरुंभटे यांची रिपोर्ट)
नागपूर : नागपूरमध्ये आज एक ऐतिहासिक क्षण साजरा झाला. तब्बल ४० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सिंधी समाजातील शेकडो कुटुंबांना त्यांच्या घरांचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली. प्रतापनगर येथील शांतिनिकेतन कॉलनीच्या मैदानावर आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना त्यांच्या घरांचे मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी बांधवांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आपले संसार उभारले. व्यापार आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी सातत्याने प्रगती करत देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. मात्र स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही त्यांना स्वतःच्या घरांचा मालकी हक्क मिळाला नव्हता. आज हा ऐतिहासिक अन्याय संपवण्यात सरकार यशस्वी झाले असून, सिंधी समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. मालकी हक्काचे पट्टे मिळाल्यानंतर सिंधी समाजातील कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
खामला येथील रहिवासी लीलाराय शर्मा गेल्या २५ वर्षांपासून आपल्या घराच्या मालकी हक्कासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही तोडगा निघत नव्हता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
“आज आम्हाला आमच्या स्वतःच्या घराचा मालक असल्याचा अधिकार मिळाला आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो.” यावेळी लीलाराय शर्मा यांनी सरकारकडे मागणी केली की, केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विस्थापित सिंधी बांधवांना त्यांच्या घरांचे मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावेत, जेणेकरून सर्वांना स्थैर्य आणि सुरक्षितता मिळू शकेल.