21/04/2026
आरक्षण उपवर्गीकरणाच्या निमित्ताने....
मातंग समाजातील अनेकांना आज महार समाजासोबत सलगी नको आहे,त्यांना आंबेडकर चळवळ नको आहे,त्यांना बौद्ध धम्म नको आहे,मातंग समाजातील जे तरुण आज आंबेडकरवादी मातंग म्हणून कार्य करत आहेत ते त्यांना नको आहे परंतु त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्व अधिकार हवे आहेत अशा लोकांना माझे सांगणे आहे की तुम्हाला वाटेल त्या चळवळी काढा, वाटेल राजकीय ते नेतृत्व माना,तो तुमचा अधिकार आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श माना म्हणजे त्यांच्या जातीतील आजच्या राजकीय नेत्यांनाच नेता माना, असं माझं बिलकूल म्हणणं नाही.
तुम्हाला महार समाजाशी दुश्मनी ठेवायची असेल तर ती ठेवा, तुमच्या वाटेल त्या राजकीय भूमिका घ्या,त्यावर कुणाचं बंधन नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारांची जाण ठेवलीच पाहिजे. त्या माणसाने स्वतःचं आयुष्य झिजवलं, रक्ताचं पाणी केलं, संघर्ष केला, तेव्हा आज आपण इथे उभे आहोत हे विसरून चालणार नाही.
मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे हे नक्कीच जातीचे मोठे आदर्श आहेत, त्यांनी इतर क्षेत्रात खूप मोठं काम केलंय त्यांना मानायलाच हवं.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांचे सामाजिक काम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचा उद्धार केलेले काम यात जमीन आसमानचा फरक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आपल्याला बुद्ध,शाहू,फुले,अण्णाभाऊ,लहुजी ही नावे ऐकायला देखील भेटली नसती.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांचे मुक्तिदाता आहेत हे सत्य आहे, आणि ते आजिबात बदलणार नाही हे लक्षात ठेवा.
काल एक पोस्टर पाहिलं, ज्यात बाबासाहेबांबद्दल अतिशय घाणेरडी भाषा वापरली होती. कदाचित मातंग बांधवांनी ते केलं नसेल, पण अनेकांनी ते शेअर केलं ही गोष्ट खूप चिड आणणारी आहे. आपल्या मुक्तिदात्याबद्दल अशी घाणेरडी विचारसरणी ठेवणं योग्य नाही.
तुम्हाला जे काही मतभेद ठेवायचे आहेत ते ठेवा, पण एक लक्षात ठेवा बापाला बाप म्हणायला शिका… आणि दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं बंद करा.
Santosh Shinde ✍️