27/02/2020
माणसं जपण्यातच जीवनाचं सौंदर्य शोधणारे : काळेवार सर..
काही माणसांचा संवाद , सहवास खूप हवाहवासा वाटतो, त्यांचं बोलणं इतकं गुदगुल्या आणणारं असतं की, तात्काळ त्या व्यक्तिच्या प्रेमात आपण पडतो तेही कायमचंच. मिलिंद प्राथमिक शाळेचे निवृत्त शिक्षक गंगाधर बळीराम अर्थात जी.बी.काळेवार नावाचं रसायन खूपच विलोभनीय..
कालच २६ फेब्रुवारी रोजी काळेवार सर ,अल्पशा आजाराने आपल्यातून गेले..
कुंडलवाडी सारख्या छोट्याशा शहरात शिक्षकी सेवा बजावताना काळेवार सरांनी जो गोतावळा जमवलाय तो लाजवाबच.. खरं म्हणजे जी.बी.काळेवार हे माझ्या बाबांचे (एन. जी. वाघमोडे ) यांचे बालमित्र. वाघमोडे- काळेवार ही जोडी बिलोली तालुका व परिसरात नावाजलेली जोडी, सार्वजनिक उत्सवात सामाजिक जनजागृतीत ते नेहमी पुढेच , या दोघांनी अखंडपणे शाळेतल्या विविध प्रयोगांसह सामाजिक, धार्मिक , सांस्कृतिक आघाड्यावर दिवसरात्र धडपड केली आहे .
विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी काळेवार काकांची धडपड पाहण्यासारखी , एखाद्या रस्त्याने काळेवार सर जात असतील त्याचवेळी विद्यार्थ्यांची धांदल उडायची ,पोरं रस्ता बदलून जात असत ,इतकी कठोर शिस्त त्यांच्या वागण्यातून लख्खपणे दिसत. पोर एकमेकांना काळेवार सर येण्याची भीती दाखवायचे.
काळेवार काकांनी कधीही कुणाची भीती न बाळगता आपलं काम नेटाने केलंय.. त्यांचं खुमासदार बोलणं, बिलोली तालुक्यात इतक्या वेगाने पसरलंय की, विद्यार्थी आणि पालकांत ते सर्वांचे आकर्षण बनले.
त्यांनी शिक्षकी सेवा बजावताना विज्ञान विषयात अनेक नवनवे प्रयोग केले, ते प्रयोग जिल्हा वा विभाग स्तरावर चर्चेचा विषय बनले. काळेवार नावाची व्यक्ती ग्रामीण बोलीभाषेच्या संदर्भात खुप प्रयोगशील राहिलेली आहे ,विविध माणसांच्या नकला, ग्रामीण भाषेतले किस्से, विनोद ,चुटकुले इतक्या भन्नाट असायचे की , त्या घोळक्यातल्या हरेकानं हसून लोटपोट व्हावं,
आदरणीय काळेवार काकांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या एकाही माणसाला स्वतःपासून दूर होऊ दिलं नाही ,जिव्हाळा इतका की अनेक कुटुंबियांचे ते कायमचे सदस्य होऊन जात असत.
एखाद्या माणसाच्या व्यंगावर नेमकेपणाने भाष्य करीत , इतक्या मासलेदार पद्धतीने वर्णन करणं फक्त काळेवार काकांनाच जमायचं..
बाजारातली माणसं कोणत्या पद्धतीनं बोलतात त्यांच्या आवाजाविषयी व्यंग, शाळेतल्या हरेक शिक्षकांच्या लकबीची नक्कल, इतक्या खुबीने ते संवाद साधत की तातडीची कामं असलेल्या माणसाला उठुच वाटू नये, इतका हवाहवासा माणूस आपल्यातून जावं किती वेदनादायी आहे हे ..!
काकांनी आयुष्यभर माणसं जपली, आपल्या विनोदी शैलीने ती टिकवून ठेवली, सगळा परिसर आज त्यांच्या जाण्याने गलबलून गेलाय, मित्रपरिवाराला त्यांच्या जाण्याने मोठा धक्काच बसलाय,
माणसं अचानक आपल्यातून कशी भुरर्कन उडून जातात,जी नेहमीच आपल्याला हवीहवीशी वाटतात, हे सगळं हृदयाला दुःख देणारं आहे .
काळेवार काकांच्या जाण्याने माझ्या बाबांचा जीवलग सखा,सोबती गेला आहे , बाबा सकाळपासून अस्वस्थ दिसत होते ..मित्राची उणीव आणि यापुढे त्यांना वाटणारी भावना तसेच आम्हा पोरासुरांना खळखळून हसविणाऱ्या आपल्या काकांची कमतरता नेहमीच जाणवेल..
काळेवार सरांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली वाहावी लागते आहे .
✒
कुलदीप नंदूरकर
पत्रकार ,नांदेड