कथाविश्व

कथाविश्व कथाविश्व - भावविश्व माणुसकीचे

 #जगावेगळी #कथाविश्व _लेखिका- प्रणिता खंडकर._        अनिताच्या बाळाचं आज बारसं होतं. घरात सगळी पाहुणेमंडळी जमली होती. हा...
16/07/2025

#जगावेगळी
#कथाविश्व
_लेखिका- प्रणिता खंडकर._

अनिताच्या बाळाचं आज बारसं होतं. घरात सगळी पाहुणेमंडळी जमली होती. हाॅल आणि पाळणा छान सजवला होता. हिरवी कुंची घातलेलं बाळ अनिताच्या मांडीत शांत झोपलं होतं. सगळी तयारी नीट झालीय ना, याकडे आशाताई जातीनं लक्ष देत होत्या.
बाळाला पाळण्यात ठेवलं, तसं हळूच डोळे किलकिले करून ते हसलं आणि परत झोपी गेलं. 'कुणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या', असा गोपा करून झाला. अनिताची आई आणि काकू यांनी खणात गुंडाळलेल्या वरवंट्याला पाळण्याच्या वरून आणि खालून एकमेकींच्या हातात दिलं-घेतलं आणि त्या अनिताला म्हणाल्या, "चला, आता बाळाचं नाव सांगा बरं त्याच्या कानात!"
अनितानं सांगितलं, "हा मान माझ्या सासूबाईंचा" आणि तिनं आशाताईंचा हात धरून त्यांना पाळण्याजवळ आणलं. आईच्या आणि काकूच्या चेहऱ्यावरची नापसंती तिच्या नजरेतून सुटली नाही, पण अजितच्या नजरेतलं कौतुक आणि अभिमान तिला सुखावून गेला.
आशाताईंनी बाळाच्या कानात नाव सांगितलं... 'अर्णव' आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आशाताईंनी अनिताला मिठी मारली. त्यांचे डोळे भरून आले होते.
जेवणाला वेळ होता आणि मंडळी आपसांत गप्पा मारत बसली होती. बाळ अर्णव पाळण्यात निवांत झोपला होता.
अजितनी माईक हातात घेतला, "आज बारशासाठी आपण सगळे जमलो आहोत. बाळाचं आगमन ही आई-वडिलांसाठी किती आनंदाची घटना! आई आणि बाळाचं नातं तर त्याही आधीपासूनचं आणि अधिक गहिरं!
पण आज या सोहळ्याचे औचित्य साधून, मी तुम्हां सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका जगावेगळ्या आणि उदात्त मातृत्वाची!" सगळे जण सरसावून आणि कान टवकारून बसले.
"अरविंद देवधर आणि अवंती जोशी, दोघेही बँकेत नोकरीला होते. एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. अरविंदच्या घरी भांडुपला फक्त त्याची आई आणि तो. अरविंदचे बाबा तो नोकरीला लागला, त्याच वर्षी अचानक हार्ट अ‍ॅटॅकने गेले.
अवंतीच्या घरी नेरळला, आई-बाबा आणि धाकटा भाऊ!
अवंतीचे लग्न होऊन पाच वर्षे झाली, तरी घरात पाळणा हलेना. दोघांनी सर्व तपासण्या केल्या, पण कोणातच काही कमतरता नव्हती. तेव्हा नशिबाचा भाग मान्य करून, अवंती आणि अरविंदनी मूल दत्तक घेण्याचा विचार
केला. अर्थात दोघांच्या घरच्यांनीही संमती दिली होतीच.
मग त्यांनी अनाथाश्रमातून एक बाळ दत्तक घेतलं. त्यावेळी तो मुलगा जेमतेम तीन महिन्यांचा होता. आई-बाबा आणि आजीच्या प्रेमळ सहवासात त्याचं संगोपन सुरू झालं. त्याचं कौतुक करण्यात तिघांची अगदी अहमहमिका लागे. शिवाय दुसरे आजी-आजोबा आणि मामा देखील अधूनमधून यात सहभागी होत होतेच.
तो तीन वर्षांचा झाला, तसं त्याला कोणत्या शाळेत घालायचं असा विचार अरविंद आणि अवंती करू लागले होते. तशात एक दिवस अवंती ऑफिसमधून घरी आली तीच, बरं वाटतं नाही म्हणून! घरी आल्या आल्या तिला उलटी झाली. ॲसिडिटी किंवा अजीर्ण असेल म्हणून घरगुती उपचार केले, पण उलट्या थांबेचनात. म्हणून अरविंद तिला डाॅक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी तिला हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करून सलाईन लावलं आणि काही तपासण्या करायला सांगितल्या, आणि दुसर्‍या दिवशी काविळीचं निदान झालं. अवंतीला तापही बराच होता. उपचार सुरू होते पण.. पण आठच दिवसात अवंती हे जग सोडून गेली.
अरविंद तर पार कोलमडून गेला. त्याचं चित्त थाऱ्यावर राहात नव्हतं. त्याच्या आईला देखील सुनेच्या अचानक मृत्यूमुळे जबरदस्त धक्का बसला. त्यांचा रक्तदाब खूप वाढला आणि आठवडाभर आय. सी. यू. त ठेवायची वेळ आली.
इकडे बाळानेही आई हवी म्हणून घर डोक्यावर घेतलं. अवंतीचे आई-बाबा आणि भाऊदेखील या आघाताने खचून गेले होते. कोणी कोणाला सावरायचं अशी सर्वांची अवस्था! आई घरात दिसत नाही आणि बाकी सगळे असे रडताहेत, याचा उलगडा त्या लहानग्याला होईना. तोही रडून गोंधळ घालू लागला.
मग बाजूच्या ब्लाॅकमध्ये राहणाऱ्या दातेबाई या लेकराला आपल्या घरी घेऊन गेल्या. दोन महिन्यांपूर्वीच त्या इथे राहायला आल्या होत्या. फारसा परिचय नसला तरी शेजारी म्हणून त्यांचं अरविंदच्या आईशी, क्वचित अवंतीशी तर कधी या छोटूशी हाय-बाय चालायचं.
त्यांनी त्याला चुचकारून कसंबसं जेवायला घातलं. जवळ घेऊन गोष्ट सांगत, थोपटत त्याला झोपवलं. अवंतीचं दिवसकार्य होईपर्यंत रोजच अधून-मधून दातेबाई त्याला सांभाळू लागल्या.
पण नंतर अवंतीचे आई-बाबा नेरळला आपल्या घरी जाणार होते. अरविंदची आई आजारीच होती, त्यांना विश्रांतीची गरज होती. अरविंद एकटा तरी सगळं कसं सांभाळणार?
अवंतीच्या आईने काही दिवस बाळाला, नेरळला घेऊन जाण्याची तयारी दाखवली. पण एकतर मुलगी गेल्याने त्याही सैरभैर होत्या आणि अरविंदलाही ते प्रशस्त वाटत नव्हतं.
अरविंदकडे स्वैपाकाला आणि धुणं-भांडी करायला दोन बायका होत्याच.आता बाळाला सांभाळायला आणि आईकडे लक्ष द्यायला एखादी बाई शोधायची असं त्यानं ठरवलं.
बाई मिळेपर्यंत बाळाला सांभाळायची आणि जमेल तशी मदत करायची दातेबाईंनी तयारी दर्शविली. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांचे मिस्टर मरिन इंजिनिअर असल्याने दोन-दोन महिने बोटीवर, परदेशात असायचे. त्यामुळे त्यांना ते जमण्यासारखं होतं. शिवाय बाळालाही आता त्यांची सवय झाली होती. तो आनंदाने त्यांच्याजवळ राहात होता.
महिनाभर गेला पण योग्य बाई काही मिळत नव्हती. अरविंदला कामावर जाणंदेखील आवश्यक होतं. या धक्क्यातून सावरण्यासाठी थोडी मदत झाली असती. त्यामुळे काही दिवस
स्वैपाक करणाऱ्या आणि कामवाल्या बाईंना थोडा जास्त वेळ थांबायची व्यवस्था करण्यात आली.
अरविंद कामावर रूजू झाला खरा, पण त्याचं मन अजून अस्थिरच होतं. एके दिवशी सकाळच्या गर्दीत तो गाडीत चढला, गाडीने वेग घेतला आणि कसा कोण जाणे, पण गाडीतून बाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. चार दिवसांनी हाॅस्पिटलमध्ये कोमातच तो गेला.
त्याच्या आईवर तर आभाळच कोसळलं. जवळचे असे फारसे कोणी नातेवाईकही नव्हतेच. आणि जे होते त्यांनी या दोघांची जबाबदारी घ्यावी लागेल, या भीतीनं संबंधच तोडून टाकले.
दातेबाईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी या स्थितीत त्यांची खूप काळजी घेतली. अरविंदचं क्रियाकर्म व्यवस्थित पार पाडलं. अवंतीचे आई-वडील येऊन गेले. पण बाळाविषयी फारशी आस्था त्यांनीही दाखवली नाही. त्या बाळाशी काही त्यांचं रक्ताचं नातं नव्हतं ना!
दातेबाईंच्या मिस्टरांनी, अशोकरावांनी बँकेत खेपा घालून, अरविंदच्या
मृत्यूनंतरचे सर्व आर्थिक व्यवहार मार्गी लावले. मिळालेले पैसे अरविंदची आई आणि मुलगा यांच्या संयुक्त नावाने गुंतवून त्यांच्या योगक्षेमाची तरतूद करून दिली. बाळाचं संगोपन आणि आजींचीही जबाबदारी दातेबाईंनी स्वतःहूनच स्विकारली.
काळ कोणासाठी थांबून राहात नाही. त्याप्रमाणे बाळ शाळेत जाऊ लागला, मोठा होऊ लागला. तो चवथीत असताना त्याची आजीही हे जग सोडून गेली. त्यानंतर दातेबाईंनीच बाळाला मुलाप्रमाणे सांभाळलं.
मुलगा शिकून साॅफ्टवेअर इंजिनिअर झाला. नोकरीला लागला. त्याच्यासाठी श्री व सौ. दातेच त्याचे आई-बाप होते.
ते बाळ म्हणजेच मी.. अजित अरविंद देवधर. आणि माझी ही जगावेगळी आई म्हणजे आशाताई दाते आणि बाबा अशोक दाते."
सगळे जण ही कहाणी ऐकून स्तब्ध झाले होते. अनिताची आई आणि काकू अवाक् झाल्या होत्या. कारण अनिताचं लग्न ठरवताना त्यांना फक्त एवढंच माहित होतं की, अजितला दत्तक घेण्यात आलंय, आशाताई त्याची आई नव्हे, आणि म्हणूनच निपुत्रिक स्त्रीला बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमात महत्त्व देणं त्यांना पटत नव्हतं. अजितच्या तोंडून ही हकिकत ऐकून मात्र त्यांना आपल्या वागण्याची आता लाज वाटत होती.
बाळाला केवळ जन्म दिला म्हणजेच कोणी स्त्री आई होत नसते. उलट आपल्या पोटी जन्म न घेतलेल्या मुलाला, आईचं प्रेम देणं ही मातृत्वाची भावना फार उदात्त आहे, नाही का?.
_*© प्रणिता खंडकर,*_ डोंबिवली.
*+91 98334 79845*
कथाविश्व - आपले कथांचे विश्व🎉
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

16/07/2025

#नक्की_चुकतंय_कोण? भाग ३
#कथाविश्व

मी हाॅस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचलो. खाली चौकशीच्या खिडकीवर चौकशी करून मी महेशच्या बाबांच्या खोलीपाशी पोहोचलो. महेश माझी वाट बघतच होता तिथल्या पॅसेज मध्ये.

मी महेशला काही विचारायच्या आधीच त्याने माझे हात पकडले आणि रडकुंडीला येत तो मला म्हणाला," काही कर पण बाबांची समजूत काढ आणि पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला की त्यांना माझ्या घरी येण्यासाठी तयार कर."
मी त्याला शांत करत म्हणालो मी त्या साठीच आलोय ना. मी बघतो काय करायचं ते. तु आता निश्चिंत रहा. त्याच्या पाठीवर हाताने थोपटत आम्ही दोघांनी बाबांच्या खोलीत प्रवेश केला.

किती वर्षांनी मी काकांना बघत होतो. शांतपणे झोपलेले होते. फार थकलेले दिसत होते चेहऱ्यावरून. शिस्तप्रिय माणसाच्या शरीरात त्या आजाराने शिस्तीत कसा काय प्रवेश केला ही खरोखरच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट होती. आमच्या पावलांच्या आवाजाने त्यांची झोप चाळवली बहुतेक. खोल डोळ्यांच्या डोहात किंचित हालचाल जाणवली मला. ते बघून मी थोडासा पुढे होऊन त्यांच्या बेडजवळ आलो. ग्लानीत असून देखील काकांनी मला ओळखले. अंगावर घातलेल्या पांढऱ्या शुभ्र चादरीतून दोन्ही हात बाहेर काढून त्यांनी ते माझ्या समोर जोडले. ते बघून क्षणभर मला कससंच झालं. मी त्यांचे जोडलेले हात हातात घेऊन म्हणालो," ओळखलंत ना मला काका".

का नाही ओळखणार. हृदय साथ देत नाहीये पण अजून माझी दृष्टी ठणठणीत आहे. मी नुसतं तुला ओळखले नाहीये तर तु इथे का आला असशील ह्याचा अंदाज आला आहे मला.

काकांनी तर पहिल्याच चेंडूवर मला बाद केले होते. तोच धागा पकडून मी म्हणालो,चला हे बरं झालं. उगाच नमनाला घडाभर तेल वाया नाही गेलं. थोडक्यात तुम्ही फलंदाजीला तयार आहात. हरकत नाही. मी सुद्धा टिच्चून गोलंदाजी करणार आहे."

माझं बोलणं ऐकून काका मंदपणे हसले. पुर्वीचे त्याने गडगडाटी हास्य इतिहासजमा झाले होते.

महेश कडून त्यांचा बेड काकांनी डोक्याच्या बाजूने थोडा वर करून घेतला आणि एका जाडजूड उशीला पाठ टेकवत ते मला म्हणाले,बस माझ्या जवळ असा आणि बोल आता. कसा आहेस तू. घरी कसे आहेत सगळे."

मी जरा औषधे घेऊन येतो खाली जाऊन असं म्हणून महेश खोली बाहेर पडला. थोडक्यात मला तो इशारा होता माझी गोलंदाजी सुरू करण्याचा. काकांनाही आता मनमोकळेपणाने गप्पा मारता येणार होत्या माझ्या सोबत.

काका भगवंताच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. महेश कडून समजले की पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याबाबत. आज सुट्टी होती म्हणून मग आजच तुम्हाला भेटायला यायचे ठरवले.

"महेशचा आग्रह आहे की डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी त्याच्या घरी जाण्यासाठी "

"काका बरोबरच आहे त्याचं. घरी गेल्यावर देखील काही महिने पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायला लागणार आहे. काकूंना एकट्याला कठीण जाईल म्हणून तर महेशने तसा आग्रह केला आहे."

काका मुद्द्यावर येणार ह्याची खात्री होतीच मला. पण मी देखील घरुन संभाषणाची उजळणी करून आलो होतो.

"तु तर ओळखतोसच आम्हाला लहानपणापासून. काय कमी रे त्याच्यासाठी मी. नोकरी सांभाळून अर्धवेळ नोकरी केली. शिकवण्या केल्या. स्टेशनवरून बस ने न येता चालत यायचो. तो आणि मदन दोघांसाठी मी आणि महेशच्या आईने खस्ता खाल्ल्या. मी कडक शिस्तीचा होतो पण त्या त्या वयात मुलांना धाकात ठेवणं आवश्यक असते नाही तर मुलं हाताबाहेर जायला वेळ लागत नाही. इतकं करूनही कमवायला लागल्यावर महेशला शिंग फुटली आणि त्यानं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आमच्या साठी तो प्रचंड मानसिक धक्का होता. आमचा नाही का झाला संसार ह्याच जागेत. थोडंसं सामान ठिकठाक ठेवून महेशचा देखील संसार सुरू झाला असता इथे. पण माझ्या आजवरच्या शिस्तबद्ध पद्धतीने जगण्याच्या चक्रातून त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. किती स्वप्नं बघितली होती आम्ही दोघांनीही. मुलं मोठी होऊन कमावती झाली की आईवडिलांना एक प्रकारचा आधार मिळतो रे. पण त्या आधाराचा थोडा सुध्दा आनंद मिळू दिला नाही महेशने आम्हा दोघांना. महेश पाठोपाठ मदनने देखील वेगळी वाट धरली. अशा वेळी उध्वस्त झालेले घर बघण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले होते. मी लवकर सावरलो ह्या धक्क्यातून. पण महेशची आई तेव्हापासून जी गप्प गप्प झाली ती अजूनही तशीच आहे. हळूहळू एकमेकांना आधार देत जगणं आमच्या नशिबात आहे हे आम्ही दोघांनीही आपापल्या मनाला पटवून दिले आणि तिथून नवीन आयुष्याला सामोरे गेलो आम्ही. प्रत्येक दिवस आनंदात जगायचा प्रयत्न करायला सुरुवात केली आम्ही. नाटक सिनेमा हाॅटेलात जेवायला जाणं. इतकी वर्षे ज्या ज्या गोष्टींना आम्ही जाणीवपूर्वक दूर ठेवले ती प्रत्येक गोष्ट आम्ही अनुभवायला लागलो. आमचं घर हेच आता आमचं सर्वस्व होते. दोन्ही मुलांनी परकं आणि पोरकं केल्यावर ज्या घराने आम्हाला आधार दिला, समजून घेतलं आणि जमेल तितकं माया करत सांभाळून घेतलं त्याच घराला दूर सारून महेश कडे जाण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. महेशच्या आईचं देखील हेच मत आहे. आता जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते माझ्या हक्काच्या घरात व्हावे येवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा कृपा करून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नकोस "
येवढं बोलून काका दमले. घामाघूम झाले. मी जवळच असलेल्या टाॅवेलने त्यांचा घाम पुसत त्यांना म्हणालो," काका तुम्ही सांगितलंत ते सगळं बरोबरच आहे. त्यात काही शंकाच नाही. मला मात्र आता भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे येवढं मात्र खरं "

माझं बोलणं ऐकून काका हसले. मी सोबत आणलेल्या फळांच्या पिशवीतून दोन सफरचंद बाहेर काढून ती कापून त्याच्या फोडी एका डिश मध्ये ठेवून ती डिश काकांजवळ ठेवली.
काका हे खा आता हळूहळू. मघाशी येवढं बोललात. घसा सुकला असेल तुमचा "

मी आता खाता खाता तुझं बोलणं ऐकून घेतो. येवढा मोठ्या हुद्द्यावर आहेस तू म्हणजे नक्कीच तुझं म्हणणं माझ्या गळी उतरवायचा प्रयत्न करणार तु हे ओघाने आलेच.

काकांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं.

मी बरोबर बोललो ना 🤔
हो काका. शरणागती पत्करणं आवश्यक होते मला कारण तरंच माझं म्हणणं तितक्याच निर्धाराने मला काकांसमोर मांडता आले असते.

इतक्यात महेश औषधे घेऊन आत आला आणि मला खुणेनेच विचारलं त्याने. आमच्या खाणाखुणा नेमक्या काकांच्या लक्षांत आल्या आणि मग तेच महेशला म्हणाले माझी बाजू मांडून झाली. आता मला ह्याची बाजू ऐकायची आहे. तु माझ्या सोबत बसलास तरी हरकत नाही माझी. सध्या सफरचंद खाण्यासाठी आम्ही ब्रेक घेतला आहे.

सफरचंदाची फोड शांतपणे खाताना मला जे बोलायचे आहे त्याची मी उजळणी करत होतो.

क्रमशः .....४

© सतीश बर्वे
१४.०७.२५.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

16/07/2025

#खेळ_मांडला!
#भागनऊ
#कथाविश्व

मिट्ट अंधार होता तरीही मला एक आकृती दिसत होती . जवळपास सहा फूट तरी उंच असावी . बहुदा त्या व्यक्तीने अंगावर कपडे घातले नसावेत ..फक्त एक पांढरा पंचा गुंडाळला होता . त्यावरून तो एक पुरुष आहे एवढं तरी लक्षात आलं .त्या अंधारात मला तेवढंच दिसलं .ती व्यक्ती त्याच्या जवळच्या वस्तूने खणत होती . बहुदा पहार असावी किंवा कुदळ . पण स्पष्ट काहीच दिसत नव्हतं . मी डोळे फाडून बघत होते . हे खरं आहे की मला भास होतो आहे .खरं असेल तर ही व्यक्ती कोण आहे आणि ती इतक्या अपरात्री इथे काय करतेय .. का खणते आहे ? बाबांना फोन करू का .. की आजीला उठवू ..एक थंड वाऱ्याची लहर आली आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला .आता ती व्यक्ती गुडघ्यावर बसली होती आणि डोकं जमिनीवर ठेवलं होतं .. बहुतेक !पानांची सळसळ , डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार , मधेच येणारी थंड हवेची लहर , रातकिड्यांचा आवाज ,झाडावर बघीतलं तर एक घुबड मान वाकडी करून त्याच्या बटबटीत डोळ्यांनी जणू माझ्याकडेच बघत होतं. झाडावरचं घुबड आणि तो वाकलेला माणूस ..ते दृश्य इतकं भयानक होतं की माझ्या तोंडून शब्द ही फुटला नसता . मी प्रसंगावधान ठेऊन मोबाईल वर फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण इतका अंधार होता की त्या पांढऱ्या पंच्याव्यतिरिक्त काहीही फोटोत आले नाही .धूसरशी आकृती आली होती . आजीने कूस बदलली .. आणि ती जागी झाली . मी उठून बसले आहे आणि खिडकीतून बाहेर पहाते आहे हे तिच्या लक्षात आलं तसं तिने मला हाक मारली ..

' तनू .. काय बघतेस गं .. झोप येत नाहीये का ..'

मी दचकून आजी कडे बघीतले आणि तिला माझ्याजवळ बोलावलं . ती पण ' श्री राम .. श्री राम ' म्हणत माझ्याजवळ आली . तिने ही बाहेर पाहिलं तशी ती ही दचकली ,आम्ही दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरला..माझ्या हात भीतीने घामटला होता ..ती आकृती आता पिंपळाला फेऱ्या मारत होती . मग त्या खणलेल्या खड्ड्यात काहीतरी टाकलं .. काय होतं ते कळलं नाही . मग माती सारून टाकली .तिथे एक उदबत्ती लावली . आणि सावकाश तिथून निघून गेली .

मी आणि आजी तशाच बसून राहिलो. माझ्या घशाला कोरड पडली होती . लाईट लावायला उठायची ही भीती वाटत होती .मी आजीला मघाशी दाराबाहेर दिसणाऱ्या त्या हलणाऱ्या सावलीबद्दल ही सांगितलं . आजी उठली .तिने लाईट लावला आणि पाणी दिलं मला . मी ते घटाघटा प्याले . माझ्या डोक्यावरून हात फिरवत आजी म्हणाली ..
' श्री राम .. श्री राम ..एवढं घाबरून कसं चालेल तनू .. तालुक्याचं ठिकाण असलं तरी फार काही मोठं शहर नाहीये हे .. गावच म्हणता येईल .शिक्षण घेतलं तरी लोक सुशिक्षित होतात असं नाही . अगदी शहरातही अंधश्रद्ध लोक पहायला मिळतात की आपल्याला . प्रमाण कमी असेल पण नाहीच असं ठामपणे नाही सांगता येत .मनात सतत कशाची तरी भीती असणं त्यातूनच अंधश्रध्दा तयार होत असते . अमुक देवाला तमुक केलं नाही की ढमुक होतं ही भीती म्हणजे अंधश्रद्धा .. त्यातूनच असे काहीतरी अघोरी प्रकार केले जातात . सकाळी बोलू आपण तुझ्या बाबांशी .आणि सावली काय ..कुत्र , मांजर कशाचीही असू शकते की . सध्याची तुझी मनस्थिती इतकी नाजुक आहे त्यामुळे तू अशी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता घाबरते आहेस . आपला जन्म , मृत्यू हे सगळं त्याच्या हातात आहे . '

' हे जे तुझं ..त्याच्या हातात आहे म्हणतेस ती नाही का अंधश्रद्धा ? '

' वेडाबाई .. ती श्रध्दा ! श्रद्धेमुळे मन निश्चिंत होतं .. स्वस्थ होतं आणि अंधश्रद्धेने अस्वस्थता येते . बरं .. उद्या बोलू आपण झोप तू .. ये माझ्याजवळ ये ..झोप येईल तुला ..'

मी अगदी लहान होऊन आजीच्या कुशीत जाऊन झोपले . आजी माझ्या डोक्यावरून हात फिरवत रामरक्षा पुटपुटत राहिली . त्यामुळे खरं च मला खूप निश्चिंत , आश्र्वस्त वाटत राहिलं आणि कधी झोप लागली ते कळलं च नाही .

सकाळी मला लवकर जाग आलीच नाही . सानू आली मला उठवायला . आजी केंव्हाच उठून गेली होती . सानू आली तशी तिने सगळे पडदे भरभर उघडले ..आणि चिवचिवली ' गुड मॉर्निंग '

' गुड मॉर्निंग '

मला आश्चर्यच वाटलं काल अगदी जुजबी बोलून स्वतः च्या रूम मध्ये निघून गेलेली हीच का ती असा प्रश्न मला पडला .माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये चांगलं दहा , अकरा वर्षांचं अंतर होतं .बाविसाव्या वर्षी ती लग्न करतेय म्हणजे तसं आजच्या काळात खूप लवकर लग्न करत होती ती . पण लव्ह मॅरेज आहे आणि अमेरिकेत शिकत असतानाच दोघे प्रेमात पडले वगैरे सगळं माझं ऐकुन झालं होतं .मी फ्रेश होऊन बाहेर आले तोपर्यंत ती माझ्यासाठी चहा घेऊन आली होती . मी ओशाळलेच ..

' अगं कशाला .. मी येतच होते किचन मधे .. आणि तू नवरी किनाई ..मग तू नाही हो काम करायचं ..आता मी आले आहे ना ..मी करेन '

सानुच्या येण्यामुळे काल रात्रीचा प्रकार मी विसरले होते . थोडावेळ का होईना पण मला छान , प्रसन्न वाटलं . मग तिच्याबरोबर मला ती तिच्या खोलीत घेऊन गेली , सगळी खरेदी दाखवली .आजी ही आली ..न राहवून मी पुन्हा विचारलं विमल काकी आणि प्रमोद काका कुठे आहेत गं ? माझ्या या प्रश्ना सरशी तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले . तिच्या कपाळावर पडलेली आठी माझ्या नजरेतून सुटली नाही .मी विषय बदलायचा म्हणून तिच्याशी तिच्या घरी कोण कोण आहे , पराग बद्दल तिच्याशी बोलत राहिले .

नाश्ता तयार आहे ..म्हणून बोलावणं आलं .आम्ही डायनिंग हॉल मधे आलो तर तिथे विमल काकी बसलेली दिसली . खाली मान घालून बसली होती . जणू ती या जगात नव्हतीच . डोळे खोल गेलेले .. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं .. शरीर सूजलेलं ! आम्ही तिथे जाऊन बसलो तरी तिच्या मनाने त्याची नोंद घेतली की नाही कोणास ठाऊक !अगदी तटस्थ.. कसला खेद नाही , खंत नाही , कसला आनंद नाही ..याला जीवंत पण म्हणावं .. फक्त श्वास चालू आहेत म्हणून जीवंत!. स्वतःशीच खूप प्राणांतिक झगडा करून श्रांत झाल्यासारखी बसून होती ..जणू ते फक्त शरीरच होतं ..आत्मा कुठेतरी तळात पडून आहे नीचेष्ट!हिच्याशी संवाद तरी कसा साधावा .. जेंव्हा हिला गरज असेल कोणाची तेंव्हा आपण नव्हतोच तिच्या भोवताली .आणि आता ती संवाद हीन झालीय तर आपण खोटे शब्दांचे पुल बांधू पहातोय .तिने छाटलेत पंख अस्तित्वाचे तेंव्हा तिच्या न भरारण्यावर करतोय दुबळी चर्चा ! मला माझाच राग आला ..मी तिच्याजवळ गेले . तिला नमस्कार केला ..पण तिच्या डोळ्यात ओळख नाही दिसली . मग आजी तिच्या जवळ बसली , तिचे हात हातात घेऊन म्हणाली ..
' कशी आहेस विमल ?बरी आहेस ना ..'

अचानक तिच्यामध्ये काय संचारलं माहिती नाही पण तिने आजीला घट्ट मिठी मारली आणि जोरात रडायला लागली . तो तिचा आवाज भेसूर वाटत होता .आजी तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. रडत रडतच ती म्हणाली ..
' तू मला सोडून जाणार नाहीस .. कुठेही जायचं नाही तू ..मी एकटी पडले आहे गं इथे .. मला कोणी समजुन घेत नाही .. तू नाही ना जाणार सोडून '

तेवढ्यात प्रमोद काका आले आणि त्यांना पाहून मी दचकले . कपाळावर लाल भडक कुंकू आणि पांढरा पंचा गुंडाळलेला होता त्यांनी . मला क्षणभर त्या रात्रीच्या आकृतीची आठवण झाली . त्यांनी विमल काकीला हाताला धरून उठवलं आणि धरुनच बाहेर घेऊन गेले . मी , आजी तिथे बसलो आहोत याची त्यांनी दखल ही घेतली नाही . मुळातच प्रमोद काकांची पर्सानालीटी खूप पॉवरिंग होती पण आता ती मला उग्र वाटली .. बीभत्स वाटली.

त्या एका घटनेने घरातलं वातावरण पुन्हा ढवळलं गेलं .आज मिसेस जोशींच्या माहेरचे लोक येणार होते . त्यामुळे त्या तयारीत त्या होत्या . मग मी , आजी आणि सानू आमचा ग्रुप झाला .
गप्पा मारताना सानूने विमल काकी ची अवस्था कशी वाईट झाली आहे आणि प्रमोद काका आणि तिची आई कसे गंडेदोरे करतात ते ही सांगितलं . बोलता बोलता एका हळव्या क्षणी सानू म्हणाली ..' ताई ..तू सुटलीस .. खरंच सांगते तू सुटलीस..नाहीतर या घरात शहाण्या माणसाला ही वेड लागेल .. जसं विमल काकीला लागलं आहे तसं '

मी चमकुन तिच्याकडे बघीतलं ' सानू काय बोलतेस तू हे ..बाबा तर मला वेगळंच काहीतरी सांगत होते ..'

' हेच ना तिला मोठी मम्मी दिसते , तिच्याशी बोलते .. बूलशीट आहे सगळं ..तिला वेड लागलं आहे पण हे लोक मानायलाच तयार नाहीत . रोज नवनवीन अघोरी प्रयोग करत असतात .'

माझ्या पोटात कालवाकालव झाली . वेड लागलं .. असं कसं म्हणू शकते ही . एका चांगल्या बाईला अचानक कसं असं वेड लागेल . अशी एका रात्रीतून होणारी गोष्ट नाहीये ना ही .तिला काय काय सहन करावं लागलं असेल .. ती कोणत्या मानसिक त्रासातून गेली असेल . बाबांशी या विषयावर बोलायचंच असं मी ठरवलं . बाबा इतके बिझी होते की ते फक्त खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी घरी येत असावेत की काय असं वाटलं .

बाहेरून आरडा ओरड ऐकु यायला लागली तशी आम्ही तिघी बाहेर आलो . अंगणात विमल काकी खुर्चीवर बसली होती .कपाळावर मळवट .. लाल भडक कुंकवाचा ..हातात एवढ्या मोठ्या हिरव्या बांगड्या .. केसात भरपूर गजरे माळले होते . डोळ्यात एक विशिष्ठ चमक जाणवली . सकाळच्या खंगलेल्या , आक्रसलेल्या विमल काकीचा कुठेही मागमूस नव्हता .हातात काठी घेऊन ती दारासमोर बसली होती . आणि दाराबाहेर सानूचे आजी , आजोबा , मामा , मामी उभे होते .

क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

 #प्रश्नचिन्ह #भाग_3 #कथाविश्व जीप हळू हळू पुढे सरकतच होती.... अचानक माझ्या अंगावर घेतलेल्या ओढणीचा शेव उडायला लागला, हळ...
16/07/2025

#प्रश्नचिन्ह
#भाग_3
#कथाविश्व

जीप हळू हळू पुढे सरकतच होती.... अचानक माझ्या अंगावर घेतलेल्या ओढणीचा शेव उडायला लागला, हळू हळू खांद्यावरून सरकणार इतक्यात दुसर्‍या बाजूचा पण शेव हवेत उडायला लागाला..... “अरे हे काय चाललाय काय? इतका वेळ केस त्रास देत होते आता ओढणी पीडत्ये....” इतक्यात ओढणीचे दोन्ही शेव शांतपणे विसावले पाठीवर..... चला बरं झालं, असं म्हणत माझी नजर पुन्हा कॅमकॉर्डरकडे वळली..... तेच ते रूप समुद्राचे, खेचून घेणारे, पुरते अडकवून टाकणारे....

जरा अजून आजूबाजूचे सौंदर्य टिपणार तेवढ्यात अंगावरची ओढणी उडत येऊन चेहेर्‍यावर पसरली.....”च्यायला.... काय हे आता !” मी मान हलवून हलवून ओढणी गळ्याजवळ आणली.... आणि माझी नजर पुन्हा कॅमकॉर्डरच्या लेन्स मधून ‘गंमत’ बघू लागली...... “अरे हे काय होताय आता ?” माझीच ओढणी आता गळ्याजवळ गोल गोल गुंडाळून पडली होती, आणि अचानक तिला खेच लागल्यासारखे वाटले...... “ओढणी का खेचली जात्ये? आणि कोण खेचताय?”

जीपच्या सीटवर असलेल्या डाव्या हाताची पकड मी घट्ट केली, आणि उजव्या हातात कॅमकॉर्डर सांभाळत, आणि स्वत:चा तोल सांभाळत मी उजव्या खांद्यावरून मान वळवून मागे पाहिले, आणि बघते तर काय? ओढणीचे दोन्ही खांद्यावरून मागे गेलेले शेव, तारा अडकवल्यासारखे. अगदी ताठ आणि सरळ असे हवेत उडत होते....”हे काय आहे?” मी चरकले.... तितक्यात पुन्हा एकदा दोन्ही शेव पाठीवर विसावले.....

आत्ता मात्र मला जराssss भीती वाटायला लागली होती.... माझ्या नजरेचा खेळ तर नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा मागे वळून पाहिले,,,,, आता मात्र ओढणी उडत नव्हती..... मी “हुश्श” म्हणाले खरी, पण मनातल्या मनात मात्र घाबरले होते...... पुन्हा एकदा माझी नजर समुद्रात स्थिरावली, पण कुठेतरी अजून काही नाही ना होणार हयाकडे ही लक्ष होताच.... बराच वेळ काहीच झालं नव्हत.... “कदाचित मलाच वाटलं असेल” असं म्हणून मी त्याकडे थोडं दुर्लक्षच केलं....

कदाचित तिथेच चुकले मी...!!!

बर्‍याच वेळाने माझ्या डाव्या कानाच्या अगदी जवळ “हाssssssssss” असा आवाज आला, मी एकदम दचकून मागे पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं...मी आता बर्‍यापैकी घाबरले होते..... मी एकदम मागे वळून बघितलं हे बघून आईने विचारलं, “काय गं, काय झालं, काय बघतेस?” आईच्या आवाजाने मला खरच खूप बरं वाटलं.... “का...काही नाही...... काहीच नाही गं” मी चाचरतच तिला उत्तर दिलं...”बास आता, बस आत, खूप केलस शूटिंग....”

“हो आई” असं म्हणून मी पुन्हा कॅमकॉर्डरमध्ये नजर गुंतवली...... भीती वाटत्ये हे सांगितलं असतं तर आईने ताबडतोब खाली बसायला लावलं असतं...... काहीच मिनिटात पुन्हा एकदा तोच आवाज, पण आता उजव्या कानाजवळ.....” “हाssssssssss”

"ए हाड".... मी मनातल्या मनात म्हटलं...... आणि तो आवाज थांबला. मला खूप हायस वाटलं..... वरती आकाशाकडे पाहिले तर अजून सूर्य तळपत होता, कमी प्रमाणात का होईना, पण तो होता.... म्हणजे माझ्या मनातली भीती पोकळच होती म्हणायची,….

मी पुन्हा एकदा नीट उभी राहिले.... पहिल्यांदा उभी होते तशीच, म्हणजे दोन्ही पाय आणि डावा हात जीपच्या आत आणि माझा उर्वरीत देह जीपच्या बाहेर..... आणि अचानक माझा कुडता पाठीमागून कुणीतरी ओढताय असे वाटायला लागले, “पाठीपागून हवेने ड्रेस फुगला असेल, म्हणून खेच लागली असेल” मी पुन्हा एकदा स्वतःशीच बोलले. बघता बघता ती खेच वाढत होती, सततच कुणीतरी खेचताय मागे, माझा तोल जातोय.....

मी भानावर येऊन स्वत:चा तोल व्यवस्थित सांभाळण्यासाठी चालत्या जीप मधून माझा उजवा पाय उचलला.... डावा पाय अजूनही जीपच्या आताच होता.... पाय जीपच्या बाहेर असलेल्या फूटस्टेप वर ठेवते, म्हणजे मी मागे पडणार नाही ह्या विचाराने मी उजवा पाय जीपच्या बाहेर घेतला आणि.......
...आणि माझा पाय फूटस्टेप वर न पडता, पावलाच्या मागचा, खोटेच्या जरा वरचा मऊ भाग गंजलेल्या नंबर प्लेटच्या पत्र्यात घुसला...
(क्रमश:)
#मेधाकानिटकर
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

16/07/2025

पोऱ्या*
#कथाविश्व
-दीपक तांबोळी

सकाळची साडेदहाची वेळ.ऑफिस सुरु व्हायला थोडा अवकाश होता.समोरच्या हाॅटेलमध्ये चहा छान मिळतो म्हणून आम्ही त्या हाॅटेलात शिरलो.मागच्या बाजूच्या टेबलवर आम्हांला जागा मिळाली
"ए पोऱ्या पाणी आण"शेजारच्या टेबलवरुन एकजण ओरडला.
" ए पोऱ्या अरे कचोरी आण ना "
"ए पोऱ्या दोन मिसळ आण.वरुन दही टाक"
आजुबाजूच्या टेबलवरुन ऑर्डर्स सुटत होत्या आणि हाॅटेलमधला एकमेव वेटर असलेला १३-१४ वर्षाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता.प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब ऑर्डर हवी होती.तोही कुणाला नाराज करत नव्हता.मी हात दाखवून त्याला दोन चहाचा इशारा केला.तसा तो समोर गेला.दोन ग्लासात कटींग चहा घेऊन आला.

तहसील कचेरीसमोरचं ते हाॅटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं.आमचा चहा ,नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं.चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस त्यामुळे त्या छोट्याशा हाॅटेलात कायम गर्दी असायची.आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.सकाळी हाॅटेलमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची.ग्राहक कधी कधी त्याला रागवायचे,त्याच्यावर चिडायचे,दिलेली ऑर्डर लवकर आणण्याची घाई करायचे पण याचा आवाज कधी चढलेला मी बघितला नाही.
"हो काका आता आणतो तुमचे पोहे"
"हो मावशी आणतो.फक्त दोन मिनिट,आता आली तुमची मिसळ"
" दोन मिनिट साहेब,चहा तयार झाला की आणतोच "असं सांगून तो ग्राहकांचं समाधान करायचा.त्याला बसलेला मी कधी बघितलाच नाही. कधी माणूस आला नाही तर टेबल पुसतांना,कपबशा आणि नाश्त्याच्या प्लेट्सही धुतांना तो दिसायचा.

एक दिवस दुपारच्या वेळेस हाॅटेलमध्ये फारसे ग्राहक नसतांना मी त्याला बोलावलं.
"नांव काय रे तुझं?"
"दिलीप"
"कुठला तू?"
त्यानं बावीस किमी.वरच्या गावाचं नांव सांगितलं.
"शाळेत जातोस?"
"नाही.४थी नंतर सोडली.
"का?"
"गावात दुष्काळ पडला.कामं मिळेना.अण्णांनी (त्याच्या वडिलांनी)इथं पाठवून दिलं"
"किती पगार मिळतो?"
"खाऊन पिऊन पाचशे रुपये"
"काय करतो पैशांचं?"
"गावी पाठवतो अण्णांकडे"
"पुढं शिकावसं वाटत नाही?"
"खुप वाटतं पण काय करणार?नाईलाज आहे.आईअण्णांच्या मजुरीत भागत नाही "
तेवढ्यात ग्राहक आल्याने संवाद संपला.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप सर्वात मोठा मुलगा.एक लहान भाऊ आणि एक बहीण.आईवडील शेतमजूर.अर्थातच घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची.त्यामुळे शाळेत हुशार असुनही दिलीप शिकू शकला नाही.दिलीप हाॅटेलमध्येच झोपायचा.सकाळी पाच वाजता उठायचा.बाहेरच्या नळावर अंघोळ करायचा.हाॅटेलच्या टाक्यांमध्ये पाणी भरायचा.आचारी आला की वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी तो त्याला मदत करायचा.कांदे आणि मिरच्या चिरायचं कामही त्याच्याकडेच होतं.ग्राहक यायला लागले की वेटरच्या कामाला भिडायचा. मग रात्री दहापर्यंत त्याला फुरसत नसायची.ते छोटंसं हाॅटेल हेच त्याचं विश्व होतं.कधी दिवाळीला तर क्वचित प्रसंगी लग्नसमारंभाला तो गांवी जायचा तेवढाच काय तो त्याच्या आयुष्यातला बदल.

एकदा चार पाच दिवस तो दिसला नाही.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप गांवी गेला होता.त्याचा लहान भाऊ डेंग्यूने आजारी होता.गावात इलाज झाले नाहीत.जिल्ह्याच्या गावी नेण्याइतके पैसे नव्हते.शेवटी तो इलाजाविना तिथंच वारला.त्याच्या अंत्यविधीचा खर्चही हाॅटेलमालकाने केला.मला खुप वाईट वाटलं.अगोदर कळलं असतं तर काहीतरी मदत करता आली असती.त्या चारपाच दिवसात हाॅटेलमालकालाच वेटरचं काम करावं लागलं म्हणून हाॅटेलमालक चांगलाच वैतागला होता.
गावाहून परतल्यावर भाऊ वारल्यामुळे दिलीप गंभीर असेल अशी माझी कल्पना. पण हा पठ्ठ्या हसतमुखच! मी त्याला या बाबतीत छेडल्यावर म्हणाला
" साहेब किती दिवस दुःख करणार?गरीबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं रहावंच लागतं "
खरंच होतं त्याचं म्हणणं.हे हाॅटेल काय सरकारी कार्यालय होतं चौदा दिवस पगारी रजा द्यायला?

त्यानंतर माझी आणि दिलीपची चांगली दोस्ती जमली.मी त्याला गोष्टीची,ज्ञानवर्धक पुस्तकं आणून द्यायचो. तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्त मिसळ,जास्त भजी द्यायचा.आचाऱ्याला माझा चहा स्पेशल बनवायला सांगायचा.अर्थात मी दिलेली पुस्तकं वाचायला त्याला वेळ मिळत होता की नाही शंकाच होती.कदाचित रविवारी सरकारी कार्यालयं बंद असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी असायची तेव्हा वाचायला त्याला सवड मिळत असावी.एक मात्र खरं की मी पुस्तकं दिल्यावर त्याचा चेहरा खुलायचा.

एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता.बाहेरचं विश्व काय असतं हे सतत हाॅटेलमध्ये राबणाऱ्या दिलीपने जरा तरी बघावं म्हणून मी त्यालाही बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं.पण सायंकाळी खुप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला.मी हाॅटेलमधून निघालो तसं त्याने मला थांबवलं.मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्यावेळाने परतला तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं.
"साहेब मी तर येऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरीबाची भेट"
"अरे याची काय गरज होती दिलीप?तू आला असतास तर खुप बरं वाटलं असतं"
"असू द्या साहेब"
म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं.
रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढ्या सगळ्या गिफ्ट्स मध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं.पाचशे रुपये पगार कमवणाऱ्या त्या पोराने चक्क तीनशे रुपयाचं गिफ्ट दिलं होतं.मला एकदम गहिवरून आलं.त्या गरीबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं.दुसऱ्या दिवशी मी त्याला केक आणि कॅडबरीचं मोठं चाॅकलेट दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच खुप समाधान वाटलं.

त्या दिवसानंतर दिलीपबद्दल माझं मन एकदम बदलून गेलं.त्याच्या बद्दल मला आत्मीयता वाटू लागली.त्याचं आयुष्य असं वेटरच्या कामात किंवा कपबशा धुण्यात जाऊ नये असं मला प्रकर्षाने वाटू लागलं.शेवटी मी निर्णय घेतला.

या घटनेला आज दोन वर्षे होऊन गेलीत.आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे.खटपट करुन एका फाऊंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपुर्ण खर्च उचलायला राजी केलं आहे आणि दिलीप ऐवजी त्याच्या आईवडिलांना पाचशे रुपये मी दरमहिन्याला पाठवतोय.या पाचशे रुपयात काही होत नाही हे मलाही कळतंय पण मीही काही धनाढ्य माणूस नाही. एका कारकुनाची क्षमता तरी किती असणार?त्या पाचशे रुपयाच्या बदल्यात दिलीपने चांगली नोकरी लागली की शेतमजूरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मी त्याच्याकडून वचन घेतलंय.

*©️ दीपक तांबोळी*
9503011250
(ही कथा माझ्या "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे.क्रुपया कोणतेही बदल न करता लेखकाच्या नावासहितच शेअर करावी.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

'माफी' #कथाविश्व नुकताच काॅलेजात जायला लागलेलो.एकटाच रहायचो.आजोबांची जागा होती मुंबईत.तिथंच रहायचो.आजोबा, आई, बाबा सगळे ...
16/07/2025

'माफी'
#कथाविश्व

नुकताच काॅलेजात जायला लागलेलो.
एकटाच रहायचो.
आजोबांची जागा होती मुंबईत.
तिथंच रहायचो.
आजोबा, आई, बाबा सगळे पुण्यात.
शोभामावशी.
आजी, आजोबांकडे गेली तीस पस्तीस वर्ष काम करायची.
धुणं ,भांडी,केर, लादी पुसणं, पोळ्या,सब कुछ.
कामाला चोख,अतिशय प्रामाणिक.
अगदी घरच्यासारखी.
आजी गेल्यानंतर आजोंबांना एकटं राहू द्यायचं नाही,
म्हणून बळजबरीनं पुण्यात आणलेलं.
तरी सुद्धा शोभामावशीकडे घराची किल्ली असायचीच.
एक दिवसाआड ती घर घासून पुसून लख्ख ठेवायची.
मी रहायला आलो तेव्हा आजोबा बरोबर आलेले.
आजोबांनी बजावलेलं, "नातवाला सांभाळून घे माझ्या".
शोभामावशी मनापासून हसली फक्त.
फार कमी बोलायची ती.
आजोबा पुण्याला परत गेले अन् मी ऊधळलो.
ते दिवस, वय आणि मी.
रात्र रात्र वाचत बसायचो.
कथा, कादंबर्या, आत्मचरित्र.
अभ्यासाचं सोडून काहीही चालायचं.
पेटींगचं वेड लागलेलं.
सकाळी लवकर ऊठणं व्हायचं नाही.
घरभर पसारा.
इथं तिथं पसरलेली पुस्तकं.
कॅनव्हास, पॅलेट अन् रंगपंचमी.
कपड्यांचे बोळे.
विस्कटलेली चादर, फेकलेली पांघरूणं.
ओट्यावर सांडलेली खरकटी भांडी.
पूछो मत!
सकाळी शोभामावशी येऊन गेली की,
जादू व्हायची.
घर लख्ख.
ती बिचारी न बोलता, मान खाली घालून,
सगळं निमूट आवरायची.
पोळी भाजी करून डबा भरून ठेवायची.
जाता जाता मला हलकेच ऊठवून जायची.
बाबा, काका तिला शोभामावशी म्हणायचे म्हणून ,
मीही म्हणायचो.
खरं तर सख्ख्या आजीईतके लाड करायची माझे.
खरंच सांभाळून घेतलं तिनं मला.
सांगतो.
खरं तर माझीच मला लाज वाटतेय सांगायला.
तरीही सांगायलाच हवं.
माझ्या मुंजीत आजीनं मला एक गोफ केलेला.
तीन साडेतीन तोळ्याचा असेल.
ईतके दिवस लाॅकरमधेच होता.
मी काॅलेजमधे जायला लागलो तेव्हा आईनं घालायला दिला.
'नेहमी शर्टाच्या आत, बनियनखाली लपवून ठेवायचा.
थोडं तरी सोनं अंगावर हवं .
अडी अडचणीला तेच ऊपयोगी पडतं'
आई ऊवाच.
रोज आंघोळीला जाताना गोफ टेबलवर काढून ठेवायचो.
आंघोळ झाली, डोक्याला तेल थोपटलं की पुन्हा गळ्यात.
रात्री वाचताना गळ्यातला गोफ दातानं सहज चघळायचो.
सवय.
एकदा रात्री वाचत होतो.
सहज गळा चाचपला.
रविवारच्या शाळेसारखा शून्यरिकामा.
मला पक्कं आठवतंय.
काल सकाळी आंघोळीआधी मी टेबलवर काढून ठेवलेला.
नंतर ?
शोभामावशी...
मी ताबडतोब घरी फोन लावला.
बाबांनी सोलून काढला मला.
"तुलाच सांभाळता येत नाहीत गोष्टी.
पाडला असशील कुठे तरी.
ऊगाचच आपलं पाप दुसर्याच्या माथी मारू नकोस..."
'मी काय सांगू ?
आपलेच दात अन् आपलेच ओठ.
एखाद वेळी होतो मोह.
आपलं माणूस म्हणून सोडून द्यायचं.
तू मावशींना काहीही विचारू नकोस.
त्यांना ऊगाचच वाईट वाटेल..."
आई म्हणाली.
"शक्यच नाही.
घरातच असेल कुठे तरी.
नीट शोध.
मी येऊ का तिथे ?"
आजोबांचा सकाळी सक्काळी फोन.
'नको, मी बघतो.'
सगळं घर शोधून झालं.
नाही....
शोभामावशी रोजच्यासारखी यायची.
निमूट काम करून निघून जायची.
माझ्या नजरेला संशयाचा मोतीबिंदू झालेला.
शोभामावशीला जाणवलं असावं.
"का रे पोरा काय बिनसलंय सद्द्या ?'
'काही नाही'
मी ऊगाचंच म्हणलं.
गुंतून चालणार नव्हतंच.
ईलेक्ट्राॅनीक्सची ओरल आलेली तोंडावर.
आज रात्री अभ्यासाला मूहूर्त लागायलाच हवा.
रात्री व्हीके मेहता ऊघडलं अन् ,
पान चकाकलं.
वेटोळं घालून पहुडलेला गोफ दिसला.
लाज वाटली...
झोपच येईना.
सकाळी सकाळी आवरून तयार.
नाक्यावरच्या हलवायाकडनं पेढे आणले.
पूजा करून नैवेद्य दाखवला.
शोभामावशीची वाट बघत बसलो.
मावशी आल्याआल्या तिचे पाय धरले.
पेढे दिले.
" चुकलो मी !'
तिला काही कळेना.
सगळी हकीगत सांगितली.
ती नेहमीसारखी, मनापासून हसली फक्त.
'रस्त्यावर सापडलं असतं तर एक वेळ मोह जाला बी असता.
ह्ये तर माजंच घर हाये.
माफी देणारा न्हाई,
मनापासून माफी माग्नाराच देवाला आवडतो.
ऊठा.
परीक्षा हाई ना आज...'
आजोबांना फोन केला.
ईनफाईनाईट टाईम्स साॅरी म्हणलं.
परीक्षाच होती.
काठावर पास झालो ईतकंच.
चुकीला माफी...आहेच.
मनापासून मागितली की झालं.
............कौस्तुभ केळकर नगरवाला.

*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919422769350

Alerts

Be the first to know and let us send you an email when कथाविश्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कथाविश्व:

Share

Perfect Computers

Join “Perfect” Be “Perfect”

Master in Computer Education since 21 years.

Specialty in MS-CIT & Tally. Even if have done Tally anywhere; to get the Job come to us for at least 1 Month; and don’t tell us the result; but please tell others who need Quality Education to get the Job.

Also you can Come to us for your Online Services need like Pan Card,Passport,Registered Rent Agreement,Marriage Certificate,Food Licence,Railway/Air Ticket Booking,2 Wheeler & 4 Wheeler Insurance,PF Work. Get in touch to avail the Services.