कथाविश्व

कथाविश्व कथाविश्व - भावविश्व माणुसकीचे

🌹 *भक्ती*🌹       ....*सौ. मधुर कुलकर्णी, पुणे* #कथाविश्व         भक्तीला आज उठायला जरा उशीरच झाला.   सकाळी अलार्म बंद के...
03/09/2025

🌹 *भक्ती*🌹
....*सौ. मधुर कुलकर्णी, पुणे*
#कथाविश्व
भक्तीला आज उठायला जरा उशीरच झाला. सकाळी अलार्म बंद केला आणि * तिचा डोळा लागला.त्यामुळे रोजचं वेळेचं गणित चुकलं.तिने स्वतःच सगळं पटपट आवरल. सुधाताईंसाठी स्वयंपाकाचं काय काय करायचं ते टेबल वर लिहून ठेवलं. आज सुधाताई पण नेमक्या उशिरा येणार होत्या. तिने गाडीची,घराच्या लॅच ची किल्ली घेतली आणि आप्पांच्या खोलीकडे वळली."आप्पा,मी निघतेय.सुधाताईंसाठी टेबल वर चिठ्ठी ठेवली आहे.आज जरा उशीरच झालाय मला, म्हणून तुमचा सांजा केला नाही,आजच्या दिवस राजगिरा लाही दुधात कालवून घ्या.पूजेची तयारी करणं पण जमलं नाही मला,फुलं फक्त परडीत ठेवलीय.आणि हो,सगळ्यात महत्वाचं, दाराला आतून कडी लावू नका,लॅच लावा,मी किल्ली घेतलीय.येते मी" भक्ती धावतच दाराकडे वळली.

भक्ती ही आप्पांची सून,शिशिर ची पत्नी.आप्पा आणि शालिनीताईंना दोन मुलं..शिशिर आणि रावी. रावी लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली.शालिनीताई कालच मुंबईला त्यांच्या मावस भावाकडे गेल्या होत्या,सगळी भावंड खूप वर्षांनी एकत्र जमणार होती.शिशिर ची नोकरी शीप वरची त्यामुळे घरात सध्या आप्पा आणि भक्ती.

शिशिर प्रथम भक्तीला घरी घेऊन आला होता तेव्हा भक्ती टीशर्ट, जीन्स मधेच होती,आधुनिक राहणीमान. आप्पांना काही ते रुचलं नाही.पहिल्यांदा सासरी चाललोय तर साडी घालावी ही त्यांची अपेक्षा.भक्तीचं बोलणंही अगदी मोकळं,कुठेही संकोच नव्हता,जणू काही आधी खूपदा भेटलीय.आप्पांच्या जुन्या मतांच्या सगळं विरुद्ध. शालिनीताई म्हणल्या,"अहो,गोड, लाघवी पोर आहे,बाह्यरूपावर जाऊ नका."शेवटी आप्पांनी पडतं घेतलं आणि लग्नाला होकार दिला.

भक्ती खरं तर फिजिओथेरपिस्ट होती.पण शिशिर ची नोकरी शीपवरची, दोन महिने पुण्यात,दोन महिने शीप वर.लग्नानंतर त्याने भक्तीला सांगितले,"आपल्याला पैशाची कमी नाही पण तुझं शिक्षण वाया जाऊ नये म्हणून तू हवं तर पार्ट टाईम जॉब कर. आई,आप्पांची काळजी घे कारण दोन महिने मी इथे नसतो." भक्तीनेही ते आनंदाने स्वीकारलं. दोन तास ती एका वृद्धाश्रमात जाऊन फिजिओथेरपी देत असे.पण हे काम ती विनामूल्य करत होती,एक समाजसेवा म्हणून.

आप्पांच्या मनात नेहमीचेच विचार घोळू लागलेत.हिच्या आईवडिलांनी हिचं नाव भक्ती कसं काय ठेवलं?नास्तिक नसली तरी फक्त देवाला नमस्कार करायची.माझी वृद्धाश्रमातली सेवा हाच माझा देव आहे म्हणायची.कुठलेही उपास तापास तिने कधीही केले नाहीत.आप्पांना ते पटत नव्हतं पण घरात वाद नकोत म्हणून ते बोलत नसत.

दारावरची बेल वाजली म्हणून आप्पा उठले.सुधाताई आल्या होत्या. त्यांनाच सांजा करायला सांगून ते स्नान करायला गेले.स्नान करून आल्यावर आज आप्पांना फार थकल्यासारखं वाटलं.देवाची स्तोत्र म्हणत ते पूजेची तयारी करू लागले.देव्हाऱ्यात देवही बरेच असल्यामुळे पूजेलाही निदान अर्धा तास तरी लागायचा.सुधाताई स्वयंपाक करून लॅच ओढून गेल्यात. आप्पांची आरती झाली आणि त्यांना दरदरून घाम फुटला, अस्वस्थ वाटायला लागलं. कसंबसं त्यांनी आवरलं आणि पाटावरून उठताच ते कोसळले.

भक्तीला आज विशेष काम नव्हतं,वृद्धाश्रमात गाण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे बरीच मंडळी हॉलमधे होती.संयोजकांना सांगून ती घरी निघाली.पार्किंग मधे गाडी पार्क करून,पर्समधून तिने लॅच ची किल्ली काढली.दार उघडत ती म्हणली,"आप्पा,मी आलेय". किल्ली जागेवर ठेऊन ती आत आली आणि आप्पांना खाली कोसळलेल्या अवस्थेत बघून ती घाबरली.तिला एकटीला आप्पांना उचलता येईना.शेजारच्या मिहीर ला तिने हाक दिली.दोघांनी मिळून आप्पांना कॉटवर ठेवले.फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे तिने भराभर फर्स्टएड केलं आणि डॉ देशपांड्यांना फोन लावला.डॉ देशपांड्यांनी आप्पांना तपासलं, शुगर अचानक वाढली होती आप्पांची,त्यांनी इंजेक्शन दिलं आणि काही औषध लिहून दिलीत.भक्ती अजूनही घाबरलेलीच होती.डॉ नी तिच्या पाठीवर थोपटलं आणि तिला धीर दिला,"डोन्ट वरी, दोन तीन तासात बरं वाटेल त्यांना,काही वाटलं तर मला फोन कर".भक्तीने त्यांचे आभार मानले.तिने मिहीरला औषध आणायला सांगितली.

भक्ती आप्पांजवळ आली,त्यांच्या कपाळावरून हात फिरवला आणि नकळत तिचे डोळे भरून आलेत.ती आप्पांजवळच खुर्ची घेऊन वाचत बसली.तिला आप्पांच्या कण्हण्याचा आवाज आला.ती हळूच उठून त्यांचे पाय चेपू लागली.जरा वेळाने आप्पांना जाग आली तर भक्ती पाय चेपताना दिसली.त्यांनी अस्फुट हाक मारली,"भक्ती."

भक्ती ताबडतोब उठली,त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणली,"आप्पा,किती घाबरले मी,आता थोडे दिवस तुम्ही फक्त आराम करायचा.तुमच्या देवांची पूजा सुद्धा मीच करेन,अगदी साग्रसंगीत,तुम्ही करता तशी"आप्पा मनापासून हसलेत.इतक्यात मोबाईल वाजला,शालिनीताईंचा फोन होता,"भक्ती,कसे आहात ग?ह्यांची तब्येत ठीक आहे ना?" "अहो आई,आम्ही दोघेही मजेत आहोत,तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघांनी आता मस्त पत्त्याचा डाव टाकलाय, रमी खेळतोय.तुम्ही मनसोक्त एन्जॉय करून या."

आप्पांनी भक्तीकडे बघितलं,आज प्रथमच त्यांना तिच्या चेहऱ्यावरचे निर्मळ भाव दिसलेत,तिची नात्यांवरची श्रद्धा दिसली आणि आपण ह्या मुलीवर नास्तिक म्हणून नाराज होतो. "आप्पा कसला विचार करताय?मी आता तुम्हाला आवडतो तसा आलं घालून चहा आणते आणि आज तुमची आवडती जुनी गाणी ऐकू."

स्वयंपाक घराकडे वळलेल्या भक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना आप्पांचे डोळे काठोकाठ भरले आणि तिचं नाव किती सार्थ आहे हे जाणवलं.

माणसातल्या देवावर तिची भक्ती होती....

----x----

©®सौ मधुर कुलकर्णी..पुणे
फोटो सौजन्य - pintrest
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

 #कथाविश्वआयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई वडिलांच्या मनाची पर्वा न करता काल परवा भेटलेल्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करणाऱ...
03/09/2025

#कथाविश्व

आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई वडिलांच्या मनाची पर्वा न करता काल परवा भेटलेल्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न करणाऱ्या आजच्या तरुण मुलीनी मधुबालाची कहाणी जरूर वाचायला हवी. आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या दहा भावंडांसाठी वयाच्या १४ व्या वर्षी तिने जो संसाराचा भार उचलला तो मरेपर्यंत कायम तर ठेवलाच पण ज्याच्यावर तिने अफाट प्रेम केलं त्या प्रियकरापासूनही तिला कायमचं दूर जावं लागलं.

मधुबाला म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्नं होतं. कॉस्मेटिक सौंदर्याच्या आजच्या जगात भले माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय सुंदर असतीलही, पण मधुबालाच्या नैसर्गिक सौदर्याची सर इतर कुठल्याही अभिनेत्रीच्या सौदर्याला कधी येऊ शकली नाही. गेल्या १०० वर्षात किती अभिनेत्री आल्या अन गेल्या पण मधुबालाच्या सौंदर्याची जादू आजही कायम आहे. आजही तिची पोस्टर्स बाजारात हमखास विकली जातात. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ती राज कपूरची नायिका म्हणून सिनेसृष्टीत अवतरली. भारताची मेरीलीन मन्रो म्हणून ती ओळखली जायची. हॉलीवूडच्या एका बड्या निर्मात्याने तर तिला इंग्लिश चित्रपटाची ऑफरही दिली होती, पण तिने ती नाकारली..

तारुण्यात पदार्पण केल्यावर मधुबाला अशा एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली कि स्वप्नातील राजकुमार म्हणतात तो हाच अशी तिची अवस्था झाली. तो सुंदर, उंचपुरा आणि राजबिंडा तर होताच पण त्याच्या अदाकारीवर फिदा असलेले त्याचे लाखो चाहते देशभर होते. सिनेरसिक त्याला ' अभिनय सम्राट ', 'ट्रॅजेडी किंग ' म्हणूनच ओळखायचे. तिचं त्याच्यावर अफाट प्रेम होतं. तोसुद्धा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दोघंही एकमेकांच्या तोलामोलाची होती. दोघंही मुस्लीम होती, त्यामुळे त्यांच्या लग्नाला कुठली आडकाठी येणं शक्यच नव्हतं. पण नियतीला मात्र हे मंजूर नव्हतं. मधुबालाच्या वडिलांना तिने त्याच्याशी लग्न करणं पसंत नव्हतं. सतत ६-७ वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मधुबालाच्या ठिकाणी इतर कुठलीही मुलगी असती तर तिने आई वडिलांना ठेंगा दाखवून त्याच्याशी लग्न केलं असतं. पण मधुबाला तसं करू शकली नाही, ज्यांनी आपल्याला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांना आपल्या प्रेमासाठी दुखावणं तिला जमलं नाही. आपल्या भावंडापासून आपली ताटातूट होईल ह्या कल्पनेनेही तिचा जीव कासावीस व्हायचा.

एकदा शूटिंगच्या वेळी तिला रक्ताची उलटी झाली. तेव्हा तिच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे ती फार काळ जगू शकणार नाही हे जगाला कळलं. त्यासाठी परदेशात जाऊनही तिने उपचार केले. मधल्या काळात एका चित्रपटाच्या वादामुळे तिला आपल्या प्रियकरासमोर कोर्टात उभं राहावं लागलं तेव्हा त्याने आपल्या वडिलांची माफी मागावी इतकीच अपेक्षा तिने व्यक्त केली. पण तोसुद्धा मानी होता. तिची सूचना त्याने धुडकावून लावली. अबोला असूनही तिने त्याच्या बरोबरचा 'मोघल-ए- आजम ' चित्रपट पूर्ण केला. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मधुबालाशी आधीच विवाहित असलेल्या किशोर कुमारने लग्न केलं पण दुर्दैवाने महिन्याभरातच ती घरी परतली. पुढली नऊ वर्ष तिने एकाकी काढली. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला, तेव्हा लाखो चाहत्यांनी तिच्यासाठी अश्रू ढाळले. आजही तिच्या आठवणीने लाखो रसिक भावूक होतात. संसार चालविण्यासाठी तिने मिळतील ते चित्रपट स्वीकारले, पण चांगल्या चित्रपटासाठी आपण एक रुपया मानधन घेऊनही काम करू असं म्हणणारी मधुबालासारखी अभिनेत्री विरळाच. दुर्दैवाने अप्रतिम अभिनय क्षमता असूनही रसिकांनी आणि चित्रपट समिक्षकांनी तिच्या मोहक सौदार्याचीच अधिक दाखल घेतली.

असो.पैसा पैसा आणि पैसा करणाऱ्या आजच्या चित्रपट दुनियेत मधुबालासारखी एक तरी अभिनेत्री मला दाखवा?.कॉपी पेस्ट..
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

03/09/2025

एका शिक्षकाचा प्रश्न उत्तराचा तास....
#कथाविश्व
दहावीचा वर्ग....
आज माझा वर्गावरचा शेवटचा तास होता. तसा मी खूप उदासही होतो. माझ्या मनात सकाळपासून अनेक प्रश्नांची घालमेल चालू होती, तणावही खूप होता. आता मला परत कोणीही भेटणार नव्हते.
शेवटी मी तास घेण्यासाठी वर्गाकडे निघालो.

मुलांनी माझं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. वर्गात सगळं काही रोजच्या सारखं सुरु होतं. त्यांनी पुस्तक, वह्या बाहेर काढली.
मी आल्यानंतर संपूर्ण वर्गाकडे न्याहळून बघितल, संपूर्ण वर्ग नजरेत भरून घेतला, टेबलावरच डस्टर उचलल आणि फळ्याकडे बघितल, मराठीचा तास आत्ताच होऊन गेला होता.
फळ्यावरचा सुविचार मी वाचला, त्यावर लिहिलं होतं,
"जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत,या दोन गोष्टी परमेश्वराच्या इच्छेनेच झालेल्या शोभतात."
मी सगळा फळा पुसला.आज मला फळ्यावर काहिही नको होतं.मी प्रत्येक गोष्ट मिटवून टाकत होतो.

मुलांना वाटलं आज मी नेहमीप्रमाणे काहीतरी शिकवणार,
पण खरं तर आज मी काहीही
शिकवणार नव्हतो.मुलांना हे माहित नव्हतं.
"मुलांनो,आज आपण काहीही शिकणार नाही. वह्या, पुस्तके बंद करा ". मी मुलांना सांगितले.
हे ऐकून सर्वांना आनंद झाला, पण काहींना आश्चर्य वाटले. हे पहिल्यांदा घडत होतं, मुलं खुश झाली आणि त्यांची उत्सुकता वाढली.
सर काही शिकवणार नाहीत मग आज कोणता विषय असणार याचं कुतूहल प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं, तशी त्यांची चर्चाही सुरु झाली.
माझ्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते.

आज मी ठरवलं होतं आज त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. रोज मी त्यांना शिकवतो आणि प्रश्न विचारतो, आज त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मी देणार होतो, मला त्यांना शेवटच्या दिवशी खूष करायचे होते.
"मुलांनो,आज आपण गप्पा मारणार, तेही तुमच्या आवडत्या प्रश्नांवर"!!. मी त्यांना सांगितलं.
सगळ्यांना खूप आनंद झाला. आज सर्वांना स्वातंत्र्य मिळालं, मनातलं बोलण्यासाठी,मनातले प्रश्न विचारण्यासाठी...!
प्रत्येक जण विचार करू लागला की आता काय विचारायचं.
सर्वांनी एकमेकात चर्चा सुरू केली. काही मुलं गंभीर झाले तर काही आनंदी होऊन हसत होते.
मी मात्र सगळ्यांना डोळे भरून न्याहाळून घेतलं. वर्गाचे सगळं दृश्य मी माझ्यात सामावून घेतलं. प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप जड चालला होता.
मुलं विचार करायला लागली की नेमकं काय विचारावं....

मुलांना बोलकं करण्यासाठी मीच अक्षताला विचारले,
"अक्षता, तू विचार तुझ्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे..?
अक्षता वर्गातली हुशार मुलगी..!!
अभ्यासक्रमातील विषयांच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलं अनेक गोष्टींवर विचार करत असतात, अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात, त्यांची उत्तरं कधी मिळतात तर कधी मिळतच नाही. मला वाटतं मी आज ही संधी मुलांना दिली होती. प्रत्येकाला समस्या असतात, प्रत्येकाला प्रश्न असतात, योग्य उत्तर देणारा न भेटल्यामुळे त्यांचे ते प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतात किंवा त्यांना चुकीची उत्तरे मिळतात.
अक्षता उभी राहिली.
सर माझा एक प्रश्न आहे,
अक्षता काय प्रश्न विचारते हे मला बघायचं होतं.
"सर,जीवनात आनंदी राहण्यासाठी काय आवश्यक आहे"? तिने विचारले.
सर्व वर्ग शांत झाला. खरोखर अक्षताने विचारलेला प्रश्न अगदी वाजवी होता. जीवनामध्ये तिला आनंद हवा असेल पण मिळत नसेल. हा काही फक्त तिच्या एकटीचा प्रश्न नव्हता, हा वर्गातल्या प्रत्येक मुला मुलींचा प्रश्न असेल, फक्त तिला तो सुचला आणि तिने मांडला. आनंद कुणाला नको आहे? आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं. सर्वांचे लक्ष आता माझ्या उत्तराकडे होते.
आमचा आजचा तास हा असाच अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या विषयावर होणार होता.
अक्षता खाली बसली.

"मुलांनो, अक्षता ने खूप सुंदर प्रश्न विचारला.
जीवनात आनंदी राहण्यासाठी काय आवश्यक आहे.....?

मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, जीवनात आनंदी राहण्यासाठी काही करावं लागत नाही.?
आपला मूळ स्वभावच हा आनंदी आहे.
सगळेजण माझं लक्ष देऊन ऐकत होते.
आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे तणाव घेतो, त्या तणावातून नंतर भीती उत्पन्न होते आणि त्यामुळे आपला आनंद हरवल्यासारखं वाटतं.
तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात काम करता, त्या कामाशी सकारात्मक आणि प्रामाणिक रहा, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला तणाव येणार नाही.
तुम्ही जेव्हा एखाद्या ध्येयाकडे,
उद्दिष्टाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे प्रयत्न असतात त्यावर ठेवा.
जसं की तुमचं ध्येय हे परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होण, तेव्हा तुम्ही परीक्षेच्या वेळी निकाल काय लागेल यापेक्षा तुमचं लक्ष त्या ध्येयासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीकडे दिले तर तुम्हाला तणावही येणार नाही आणि तुमचं लक्ष ही साध्य होईल.
आनंदी असणं ही आपली नैसर्गिक मूळ अवस्था आहे, आपणच तिला अनेक बाह्य गोष्टींमुळे विचलित करून टाकतो, त्या बाह्य गोष्टी कोणत्या तर खूप मोठ मोठ्या अपेक्षा, पैसा, प्रसिद्धी आणि झटपट यश मिळवण्यासाठी केलेल्या चुकीच्या गोष्टी.

अक्षताच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. आनंद कसा जपायचा, तो कसा निघून जातो हे तिला एका साध्या उदाहरणात समजलं होतं.

मुलांमध्ये आता प्रश्न विचारायची ओढ लागली, प्रत्येकाला प्रश्न सुचायला लागले. आपल्या आयुष्यातील समस्या आणि त्यावर निर्माण झालेले प्रश्न हे माझ्यापर्यंत ऐकू यायला लागले.
"हे बघा, सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तर देता येणार नाही." मी सर्वाना सांगितले.
मुलांना एखाद्या विषयावर विचार करायला लावलं की ते किती अगदी मनापासून विचार करतात,अगदी प्रामाणिकपणे विचार करतात.
आता सुभाष ची प्रश्न विचारायची खूप इच्छा होती....
मी त्याच्याकडे बोट करून त्याला उभे केले.
"सुभाष विचार, तुझा काय प्रश्न आहे ?
सुभाष हा जरा अंतर्मुख मुलगा होता. वर्गात कधीही जास्त न बोलणारा, जास्त न बोलणारी मुलेच प्रत्येक घटनेकडे गांभीर्याने बघत असतात.
सुभाष उभा राहिला.
"सर,माझा प्रश्न थोडा खाजगी आहे."
"विचार की तुला जे वाटेल ते विचार." मी म्हणालो.
मी आज सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे विचारायला परवानगी दिली होती.
"सर ,मला असं विचारायचं आहे की,
"घरात आई-वडिलांची सारखी भांडण का होतात."? सुभाषने विचारले.
वर्गातली काही मुलं हा प्रश्न ऐकून हसायला लागली. त्यालाही थोडं लाजल्यासारखं झालं.

त्याचा हा प्रश्न खूप गहन होता,
त्याला एकदमच वाईट वाटू नये म्हणून मीच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला,
"तुमच्या प्रत्येकाच्या घरात आई-वडिलांची भांडण होतात का
रे "?
सर्वांचा एका सुरात आवाज आला, हो..........
हे ऐकून सुभाषलाही बरं वाटलं.
आपण काही चुकीचा प्रश्न विचारला नाही हा भाव त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसला....
सुभाषचा हा प्रश्न नव्हता, ही त्याची नेहमीची समस्या असेल, त्याच्या मनामध्ये चाललेली कदाचित कित्येक वर्षाची चिंता असेल, आज जेव्हा त्याच्या प्रश्नाला मोकळीक मिळाली, तेव्हा तो त्याच्या ओठावर आला.
कदाचित हा प्रश्न त्याला कित्येक वर्षापासून भेडसावत असेल, परंतु विचारणार कुणाला आणि कोण काळजीने उत्तर देईल असेच त्याच्या मनामध्ये कायम येत असेल....
"मुलांनो,तुमच्या घरात सुद्धा आई-वडिलांची भांडण होतात ना?
बघा, तुम्ही आईवडिलांची झालेली भांडण बघता, पण नंतर ते पुन्हा गोड होतात, ते पुन्हा बोलायला लागतात... नाही कां.?

सर्वांनी होकारार्थी मान हलवली.

"बघा, जगामध्ये कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. "
"सारख्या म्हणजे काय सर."?
एका मुलाने मध्येच विचारले...

सारख्या म्हणजे एकाच प्रकारच्या आवडीनिवडी, एकाच प्रकारचे विचार, एकाच प्रकारचे आवडते खाद्यपदार्थ, एकाच प्रकारचे छंद...
अशा प्रकारच्या दोन व्यक्ती एकत्र भेटणे हे खूप दुर्मिळ असते.

आणि जेव्हा दोन भिन्न प्रकारच्या आवडीनिवडी,विचार, छंद असलेल्या दोन व्यक्ती पैकी जेव्हा एका व्यक्तीला असे वाटते की माझेच बरोबर आहे आणि समोरच्या व्यक्तीने माझ्याच विचाराने चाललं पाहिजे तेव्हा अशा दोन पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होतात.
भांडण होण्याचं कारण हे मूळतः वैचारिक असते. कोणतीही व्यक्ती वाईट नसते, त्या व्यक्तीचे विचार, आचरण आणि स्वभाव त्या व्यक्तीला वाईट बनवतो.
मुलांनो, तुम्ही आई-वडिलांच्या भांडणाकडे लक्ष न देता नेहमी तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, त्यांची कितीही भांडणं झाली तरी ते तुमच्याकडे दुर्लक्ष कधीच करणार नाहीत कारण त्यांना त्यांची जबाबदारी माहित असते, बऱ्याच वेळेस ते तुमच्यासमोर भांडण करायचं टाळतातही पण कधीकधी त्यांनाही स्वतःवर नियंत्रण करता येत नाही.
सुभाष मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकत होता. मला काय सांगायचंय हे सुभाषला समजलं होतं, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं.

मी आज जे काही बोलत होतो ते फक्त विद्यार्थ्यांसाठी बोलत होतो, त्यांच्या समाधानासाठी बोलत होतो,
मलाही माझ्या मुलीसमोर आम्ही नवरा बायको ने केलेले भांडण आठवलं, कदाचित तिच्याही मनामध्ये हा प्रश्न असेल? परंतु ती बिचारी कधीही बोलली नाही.

वर्गात थोडं उशिरा आल्यामुळे माझा तास संपत आला होता, मी सगळ्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नव्हतो.
कोपऱ्यात बसलेल्या वंदनाला खूप काही विचारायचं होतं असं मला तिच्या चेहऱ्यावरून दिसलं.
मी मुद्दामहून तिच्याकडे बोट करत तिला विचारलं.
"तू विचार वंदना, तुझा काय प्रश्न आहे"?
बिचारी प्रश्न विचारताना मला खूप नाराज दिसली.
तिच्या चेहऱ्यावर तिची नाराजी स्पष्ट दिसत होती.
परंतु तिने धीर धरून मला शेवटी प्रश्न विचारलाच.
"सर, लोक आत्महत्या का करतात? माझा भाऊ आम्हाला सोडून गेला. त्याने आत्महत्या करताना आमचा विचार का नसेल केला? खरोखरच आत्महत्या करणे योग्य आहे का."?

हा प्रश्न ऐकून सगळा वर्ग शांत झाला. सगळ्यांना तिचा प्रश्न समजला होता. काही दिवसापूर्वीच तिच्या भावाने आत्महत्या केली होती. मी मात्र क्षणभर स्तब्ध झालो. मी तिच्याकडे बघतच राहिलो.
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं.
मी काय उत्तर देणार ?
मला काहीही सुचत नव्हतं.या प्रश्नाने मलाच गोंधळात टाकलं.
त्याच क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं, तीही माझ्यासमोर भावाच्या आठवणीने रडत होती. वर्गातील सर्व वातावरण भावनिक होऊन गेलं. तिचं दुःख मी समजू शकत होतो. तिचा हा प्रश्न नव्हता, तर तिच्या जीवनातलं न सुटणार कोडं होतं.
माझी कितीही इच्छा नसली तरी मी मात्र उत्तर देण्यास बांधील होतो.
परंतु माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. माझ्या पायाखालची जमीन हलली होती, कपाळावर घाम होता.
संपूर्ण शांत झालेला वर्ग वंदनाच्या आणि माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना बघत होता.
मला तिचं दुःख समजलं होतं, त्याचबरोबर मला माझंही दुःख समजलं होतं.
तेवढ्यात तास संपल्याची बाहेर घंटा वाजली.
"वंदना, तुझ्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या वेळेस देईल."
ती मात्र अजूनही भावाच्या आठवणीने रडत होती.माझ्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
मी टेबलावरून पुस्तक उचललं आणि बाहेर आलो.
मी सरळ रेस्ट रूम मध्ये गेलो.
रेस्ट रूम मध्ये आज कुणीही नव्हतं. मी दरवाजा लावून घेतला, खुर्चीवर बसलो आणि दोन्ही हात चेहऱ्याला लावून टेबलवर डोके ठेवून रडायला लागलो.
तिने विचारलेला प्रश्न माझ्या कानांमध्ये घुमत होता.
माझ्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबत नव्हते.
आणि बराच वेळ मी समोरच्या भिंतीकडे एकटक बघत राहिलो. रूम मध्ये अजूनही मी एकटाच होतो.
परंतु वंदनाच्या प्रश्नाने मला खूप विचार करायला लावला होता.

मी माझ्या खिशातून लिहिलेलं दोन पानाचे पत्र काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं, त्याच्याकडे पुन्हा एकदा बघितलं आणि ते पूर्णपणे फाडून त्याचे बारीक तुकडे केले आणि कचरा पेटीमध्ये टाकून दिले.

मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी मी आजच हे पत्र लिहिलं होतं माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलींसाठी...!!

वंदनाच्या एका प्रश्नामुळे तिने मला विचार करायला लावला होता.
आज एका विद्यार्थिनीने माझ्यासारख्या एका शिक्षकाचा जीव वाचवला होता.
मी माझ्या वैयक्तिक वैवाहिक जीवनाला कंटाळून आत्महत्येसारखा भयानक निर्णय घेतला होता, परंतु मी हा विचार केला नाही की पत्नी आणि मुलीचं काय होईल? खरोखरच हे करणे योग्य आहे का? या प्रश्नाची उत्तरे मला वंदनाने शोधायला लावली होती.

मी जेव्हा वर्गात गेलो होतो तेव्हा फळ्यावर लिहिलेला सुविचार आठवला.

"जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत,या दोन गोष्टी परमेश्वराच्या इच्छेनेच झालेल्या शोभतात."
हे अगदी खरं होतं.

मी उठून चेहरा पाण्याने धुतला, आणि रेस्ट रूमचे दार उघडले.
शाळा सुटली होती. मुलं आपल्या घरी निघाली.
मीही घरी निघालो , माझ्या मुलीकडे आणि पत्नीकडे....

©® प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

नजरबंदी.. #कथाविश्व  झालं.. आज  गौरी चा एक एक दागिना उत्सव मूर्ती  वरून बाजूला केला.स्वच्छ धूवून  पुसून  परत पेटीबंद केल...
03/09/2025

नजरबंदी..
#कथाविश्व

झालं.. आज गौरी चा एक एक दागिना उत्सव मूर्ती वरून बाजूला केला.स्वच्छ धूवून पुसून परत पेटीबंद केला.

ही चार वाक्य लिहायला खूप सोपी आहेत.जेव्हा ह्या साजशृंगारने माझी गौरी सजत असते तेव्हा तिचे उजळून येणारे रूप डोळ्यात मावत नाही.जेव्हा तिच्या कपाळावर कुंकुमतिलक रेखाटला जातो तेव्हा तिचे तेज अधिकच वृध्दिंगत होते. तिच्या कानात झुमके हलकेच अडकवले की असे वाटते मानेला नाजूक झटका देऊन ती गालातल्या गालात हसेल.जेव्हा अंबाड्यावर वेणी माळली जाते तेव्हा तिचा सुगंधी दरवळ चहूकडे पसरतो नाकात नथ घातल्यावर मात्र ती अल्लड तरुणी न राहता तिच्या भोवती एक सोज्वळ आभा प्रकाशमान होते. लफ्फेदार साडीचा भरजरी पदर अंगा खांद्यावर घेऊन ती जेव्हा मखरात विराजमान होते तेव्हा शालीन सभ्यतेने अख्खे देवघर प्रकाशमान होते.

एक अगदी मनातलं सांगू हे मी अनेक वर्ष अनुभवले आहे जेव्हा गौरी चा साज शृंगार करायला मी आणि आकांक्षा (माझी सून)बसतो तेव्हा मनात काही तरी ठरवले असते की यंदा आपण हे दागिने, हा मुकुट,हे अलंकार तिला घालू या .पण तुम्हाला सांगते तिला जशा प्रकारे नटवून घ्यायचे असेल ना तेच दागिने तिच नथ त्या वेळेस तिला आणि पर्यायाने आम्हाला पसंत पडते.आणि तिचा शृंगार झाल्यावर डोळा भरून तिच्याकडे बघतांना मला माझ्या आईची सुखावलेली तृप्त झालेली नजर आठवते.

मला आठवतयं माझं लग्न ठरले.तेव्हा बस्ता खरेदी साठी आम्ही बाहेर पडलो.(बस्ता खरेदी हा त्या वेळेस साधारणपणे दिवसभराचा कार्यक्रम असे.नंतर बाहेरच हाॅटेल मधे जेवण करून दमूनभागून घरी येईपर्यंत संध्याकाळ झालेली असे) पहिली साडी अंबाबाई साठी घेतली आणि नंतर यादी प्रमाणे खरेदी सुरू झाली.दागिने तर भरपूर दिले होते आई बाबांनी पण तिथे ही नियम तोच होता पहिला जोडवी जोड आणि मला वाटतं 2/4 gram सोनं अंबाबाई साठी घेतलं आणि मग दागिने खरेदी झाली होती.घरी आल्यावर एक एक साडी परत एकदा अंगा खांद्यावर ठेवून आणि हातात, गळयात दागिने घालून तृप्त नजरेने माझ्याकडे बघणारे आई बाबा आज ही मला आठवतात.

हा सर्व अनुभव मी माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नात घेतला तेव्हा सालंकृत सजलेली माझी मुलगी आणि सून या दोघी ही मला गौरी सारख्याच सोज्वळ आणि शालीन भासल्या.

कदाचित वयापरत्वे हळवेपणा अधिक येत असेल पण मायेने चेहर्‍यावरून फिरणारा हात साई पेक्षा मऊ आणि नजर अधिकच प्रेमळ होते.

गौरींचे दागिने,कपडेलत्ते आज कपाटबंद झाले तरी सालंकृत गौरी नेहमीच माझ्या नजरेसमोर असतात.आणि अजाणते पणी त्यांच्या चेहर्‍यावरून फिरणारा माझा हात लोण्याहूनही मऊ होतो. मायेची हीच तर मोठी किमया आहे.

शोभा गोडबोले जोशी.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

बॉम्ब टाकला----- #कथाविश्व घराची बेल वाजली तसं रविनं टी.व्ही.चा आवाज बंद करून उठून दार उघडलं. आज सुट्टी असल्यानं तो घरीच...
03/09/2025

बॉम्ब टाकला-----
#कथाविश्व

घराची बेल वाजली तसं रविनं टी.व्ही.चा आवाज बंद करून उठून दार उघडलं. आज सुट्टी असल्यानं तो घरीच होता.

दारात तीन-चार अनोळखी माणसं.

``आहेत का जोशी साहेब?`` त्यातल्या एकानं विचारलं.

``मीच जोशी. बोला...`` रवी म्हणाला.

``तुम्ही नाही, सिनिअर जोशी साहेब...``

``बसा... बोलावतो.`` त्यांना बसायला सांगून रवीनं आपल्या वडिलांना- सुधाकर रावांना `कुणीतरी` आल्याची वर्दी दिली.

काही क्षणात सुधाकरराव काठी टेकत टेकत हॉलमध्ये येऊन त्यांच्या आवडत्या ठिकाणी नव्याने येऊन बसलेल्या सोफ्यावर स्थानापन्न झाले. त्या ठिकाणची त्यांची आवडती आरामखुर्ची मात्र भंगारवाल्याच्या मालकीची झाली होती- काहीच दिवसांपूर्वी.

समोरची मंडळी सुधाकरांना अनोळखी नव्हती. ते हिंडते फिरते असताना त्यांचा या मंडळींशी चांगला परिचय होता.

समोर उभ्या असलेल्या रवीची प्रश्नार्थक नजर सुधाकरांच्या आताशा अंधुक झालेल्या नजरेलाही चांगली समजली.

``रवी, जास्त प्रस्तावना लावत नाही. ओळख वगैरे करून देत नाही. तुझा जास्त बोललेलं आवडत नाही. ही सगळी मंडळी वाईच्या एका आश्रमातील आहेत. मला घेऊन जायला आली आहेत... कायमची!``

``पण बाबा...`` रवीला काय बोलावं सुचेना. मनातला आनंदही लपवता येत नव्हता आणि व्यक्तही करता येत नव्हता. त्यानं नुकत्याच आतून बाहेर आलेल्या सुचेताकडे- आपल्या बायकोकडे पाहिलं. तिलाही मनातील आनंद लपवता येत नाहीये इतकं मात्र त्याच्या लक्षात आलं. आपण काहीतरी बोलायचो, आणि सुधाकररावांचा plan बदलायचा, असंही व्हायला नको, हेही त्याच्या डोक्यात आलं. इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आलं आणि न राहवून तो बोलून गेला,

``पण बाबा, शशी...``

``काळजी करू नकोस. मी त्यालाही घेऊन जाणार आहे. तोही आता पस्तीशीला आला आहे. लग्नानंतर जरा उशीराच आम्हाला झालेली तुम्ही दोघं मुलं. त्यात तू हुशार निपजलास तर शशीची मानसिक वाढ होऊ शकली नाही. आता माझं म्हातारपण आणि शशीची जन्मभराची जबाबदारी दोन्हीही हिच्या जाण्यानं तुझ्याच खांद्यावर पडली. सुदैवानं आर्थिक बाबतीत आम्ही दोघेही एका रुपयानेही तुझ्यावर अवलंबून कधीच राहणार नाही हे तुलाही माहीत आहे. उलट शशी असा निपजल्यानं माझ्यानंतर माझं सगळं तुझं एकट्याचंच झाल्यासारखं होतं...`` इतकं सलग बोलण्यानं सुधाकररावांना कमालीचा थकवा जाणवला. ते काही क्षण थांबले.

``तर... ही मंडळी आम्हा दोघांनाही घेऊन जायला आली आहेत. मी आणि माझ्यानंतर शशी जिवंत असेल तोपर्यंत आमची आश्रमात व्यवस्थित काळजी घेतली जाईल यासाठी आवश्यक ती सगळी सोय मी केलेली आहे. शशीच्या मर्यादित क्षमतांना ओळखून त्याचा वेळ योग्य प्रकारे कसा व्यतीत होईल, तो त्याला आवडतील अशा कामांमध्ये कार्यक्षम कसा राहील आणि तो जास्तीत जास्त आनंदी कसा राहील याकडे तिकडे खास लक्ष दिलं जाईल. मुख्य म्हणजे तिथे त्याला सतत हिडीसफिडीस केलं जाणार नाही. त्याच्या अंगावर हात टाकला जाणार नाही आणि सतत न झेपणारी, तो जी करायला घाबरतो अशी कामं मुद्दाम त्याच्यावर सोपवली जाणार नाहीत. तर... आम्ही दोघंही आता तुमचा दोघांचा निरोप घेतो. सुखी राहा...``

परक्यांसमोर आपल्यावर असे अप्रत्यक्ष आरोप झाल्यानं रवी आणि त्याची पत्नी अस्वस्थ झाले. पण तरीही ते गप्प राहिले. सुधाकरराव खोटं नक्कीच बोलले नव्हते. तोपर्यंत या पाहुण्यांपैकी एक जण आतमध्ये जाऊन शशीला बाहेर घेऊन आला होता.

आपल्या काठीची मदत घेत सुधाकरराव सोफ्यावरून उठले. बरोबर न्यायला आवश्यक तेव्हढं त्यांनी आपल्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत आधीच ठेवलेलं होतं. बाकी या घरातून त्यांना काहीही न्यायचं नव्हतं. आवश्यक कपड्यालत्त्यांची खरेदी ते आता वाईला जाऊनच करणार होते.

आलेल्या मंडळींपैकी दोन व्यक्ती शशीला घेऊन सुधाकररावांच्या पहिल्या मजल्यावरच्या त्या flatमधून जिन्यानं खाली जाऊ लागली. उरलेल्या दोन मंडळींबरोबर सुधाकरराव आपल्या flatच्या दरवाजाबाहेर पडले.

दरवाजाबाहेर पडल्यावर सुधाकरराव थांबले. वळले. त्यांनी आपल्या घराला मनापासून शेवटचा नमस्कार केला. त्यांचं ते स्वकष्टार्जित घर होतं. खूप हौसेनं घेतलेलं. अगदी प्रशस्त. ते चांगले धडधाकट, हिंडतेफिरते असताना या घरातच त्यांनी संपूर्ण कुटुंबीयांबरोबर अतिशय आनंदाचे असंख्य क्षण घालवलेले होते, काही समस्यांचाही अगदी धाडसाने सामना केला होता.

या आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या घराला सुधाकररावांनी अखेरचा नमस्कार केला. समोर त्यांचा ज्येष्ठ पुत्र रवी आणि त्याची पत्नी उभी होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरताना अगदी स्पष्ट दिसत होता.

``रवी, सुनबाई, निरोप घेतो आता या घराबरोबर तुमचाही. आणखी एक सांगायचं राहिलं. महिनाभरानंतर आज आलेली ही मंडळी पुन्हा येतील.``

दोघांच्याही चेहऱ्यावर आता एक प्रश्नचिन्हही उमटले.

``हे आपले चार बेडरूमचे इतक्या मोक्याच्या जागेवरचे आणि अतिशय उच्चभ्रू इमारतीतले घर माझे स्वकष्टार्जित आहे. मी हे लवकरच विकून टाकणार आहे. माझी सारी बँकेतली रक्कम आणि हा flat विकून येणारी सर्व रक्कम मी एक ट्रस्ट करून त्या ट्रस्टतर्फे सुरक्षित ठिकाणी गुंतवणार आहे. आमची दोघांची काळजी वाईचा आश्रम घेणारच आहे. आमच्या नंतर या रकमेच्या व्याजातून आश्रमातून गरजूंसाठी विधायक कामे केली जातील.

महिनाभरात ही मंडळी या घराचा ताबा घ्यायला येतील तेव्हा तुम्हालाही या घराला निरोप द्यावा लागणार आहे. त्यामुळे नवीन भाड्याची जागा पाहायला आजपासूनच सुरुवात करा. इतकी वर्ष माझ्या जीवावर जी उधळपट्टी चालू होती ना, ती आता जमणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे उत्पन्न-खर्चावरही लक्ष द्या आता थोडं... आणि एक लक्षात घ्या. ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे. मी वेळोवेळी तुमच्याकडून जे जे चुकीचं होत होतं, ते ते तुम्हाला दाखवून देत होतो. अगदी न चिडता, व्यवस्थित. पण तुम्हाला एका थेरड्याची ती नेहमीचीच कुरकुर वाटत होती. मग पुढे नाईलाजानं मी घरात काही सांगणं, बोलणं बंद केलं आणि शेवटी मला हृदयावर दगड ठेवून हा टोकाचा निर्णय घ्यायला लागला आहे. चला जातो मी...``

सुधाकरराव वळले. आज कित्येक दिवसांनी समोरच्या लिफ्टचे बटण न दाबता, काठीच्या आधाराने त्यांनी जिन्याची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली.

रवी आणि त्याची पत्नी यांचे पाहण्यासारखे झालेले चेहरे पाहायला आता तिथे कुणीच नव्हते..
बा स कुलकर्णी
**
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

'अगाध' #कथाविश्वभालचंद्र कान्हेरे घरी आले... आणि बसले सोफ्यावर, धप्पकरुन. दमले होते ते, इतकावेळ पायी चालून. त्यांची पत्न...
03/09/2025

'अगाध'
#कथाविश्व

भालचंद्र कान्हेरे घरी आले... आणि बसले सोफ्यावर, धप्पकरुन. दमले होते ते, इतकावेळ पायी चालून. त्यांची पत्नी भागिरथी, मुलगा भुषण, सून आसावरी आणि त्यांची लाडकी नात इशा... असे सगळेच त्यांना सांगून थकले होते की, तुम्ही नका येऊ... दमाल. पण कोणाचं ऐकतील ते भालचंद्रराव कुठले. "ह्या माझ्या शेवटच्या गौरी विसर्जनाला, मी शेवटपर्यंत येणारच"... असा हट्टच धरुन बसले होते ते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होते भालचंद्रराव... आणि उपचारही चालू होते त्यांच्यावर. अर्थात गोळ्यांद्वारे... कारण किमोथेरपी त्यांना ह्या ऐंशीव्या वर्षी, अजिबातच झेपण्यासारखी नव्हती. उपचार करणार्‍या डाॅक्टरांनी आधीच सांगून ठेवलेलं घरच्यांना की... "येणारा प्रत्येक दिवस आता, बोनसच असणार आहे. कॅन्सर अगदीच शेवटच्या स्टेजला गेलाय... आणि भालचंद्र कान्हेरे अजुनही चालते बोलते आहेत, ते केवळ त्यांच्यात असलेल्या विल पाॅवरमुळेच". पण मुळात रिझर्व्हवर आलेली गाडी, पळून पळून किती पळणार? घरच्या सगळ्यांनीच ही वस्तुस्थिती स्विकारल्यामुळे... भालचंद्ररावांना आता काहीही करण्यापासून, कोणीही आडकाठी करत नव्हतं. त्यामुळे ते नाही ऐकत म्हंटल्यावर... गौरी विसर्जनापासूनही त्यांना कोणीच, आग्रहाने रोखलं वैगरे नव्हतं.

भागिरथीबाई भालचंद्ररावांच्या, जवळ येऊन बसल्या... नी आपल्या पदराने यजमानांच्या चेहर्‍यावरचा, घाम टिपू लागल्या त्या. भुषणही बाबांच्या दुसर्‍या बाजूला जाऊन बसला... आणि त्यांच्या पाठीवरुन हात फिरवू लागला तो. इशा पायाशी बसली आजोबांच्या, त्यांच्या पोटर्‍या चेपत. तेवढ्यात आसावरी आतून पाणी घेऊन आली, ट्रे मधून सगळ्यांना. आसावरीनेच बाबांच्या हातात भांडं दिलं... बाकीच्यांनी एक एक भांडं उचललं. भालचंद्ररावांनी पाणी प्यायलं, आणि ते भांडं तसंच हातात धरुन बसले ते. भागिरथीबाई, भुषण, आसावरी आणि इशा बघत बसले भालचंद्ररावांकडे. कारण भालचंद्ररावांनी रिकामं भांडं, घट्ट धरुन ठेवलं होतं छातीशी. "ह्याच फुलपात्रातून नेमकं पाणी मिळावं मला?"... भालचंद्रराव बोलले, आळीपाळीने चौघांकडेही बघत. आसावरी म्हणाली... "बाबा अहो गौरी - गणपतीसाठी, माळ्यावरुन चांदीची भांडी काढली होती... ती धुऊन ओट्यावरच होती उपडी ठेवलेली... तुम्हाला दम लागल्यासारखं झालेलं... म्हणून समोर जी दिसली, त्या भांड्यांतूनच पाणी घेऊन आले पटकन... काय झालं हो बाबा?".

भालचंद्रराव किंचितसं हसत बोलले... "हे फुलपात्र कुठलंय माहितीये का आसावरी?... भैरवीच्या बारशाला, माझ्या आईने तिला दिलेलं आहे हे... भैरवी... इवलीशी होती गं पोर माझी, माझ्या हातावर मावेल एवढीच... हातात घेतल्या घेतल्या, फुलपात्र जोरात टाकलं होतं जमिनीवर तिनं... हा बघ... हा पोचा पाहिलास?... हा ही तेव्हाच पडलेला... अगदी तेव्हापासूनच धडाडीची होती बरं भैरवी... ते तुम्ही काय ते म्हणता हल्ली... हा... टाॅमबाॅय... भुषणहून तीन वर्षांनी धाकटी, पण कायम अरेरावीच केली तिने भुषणवर... आणि हा आमचा लेक म्हणजे, सौजन्याचा पुतळाच पहिल्यापासून... स्वतः दादा असूनही, दादागीरी तिचीच सहन करत राहिला... अगदी निमूट... तरीही प्रचंड जिव होता बरं भुषणचा भैरवीवर... तळहाताच्या फोडासारखा जपत असे तो तिला... कायम बॅकफुटवर जात राहीला हो, आपल्या धाकट्या बहिणीचा हट्ट पुरवण्यासाठी... त्या दिवशीही भैरवी जिंकावी म्हणून, मुद्दामहून मागे राहिला भुषण... आपल्या आधीच्या बिल्डिंगच्या विंगपासून, पन्नासेक मिटरवर गेट होतं आपलं...".

"आम्ही दोघं अगदी रोज रेस लावायचो, पन्नास मिटर्सची". आजोबांना मध्येच अडवत, इशा बोलली होती हे वाक्य. आजोबांच्या पायाशी बसलेली इशा, आजोबांकडेच बघत होती. एक वेगळीच चमक होती, तिच्या डोळ्यांत आता. ती जागेवरुन उठली... नी हळूवार फेर्‍या मारत हाॅलमध्ये, पुढे बोलू लागली ती... "त्या दिवशीही रेस लावली होती, मी आणि दादाने... मला त्यावेळी खरंच वाटायचं की, मी जास्त जोरात पळते दादापेक्षा... पण दादा मुद्दामहून मागे रहायचा, हे आत्ता बाबांकडूनच कळलं... त्या दिवशीही मग हा दाद्या, मुद्दामच मागे राहिला असावा... मी दे मार धावत होते... नेहमीप्रमाणेच... अगदी भान हरपून... इतर दिवशी आमच्या त्या कायम बंद असणार्‍या मोठ्या गेटला हात लावला, की मी जिंकायचे... पण त्या दिवशी मी पहिल्यांदाच, डावीकडून धावले... आणि माझ्यासमोर होतं छोटं गेट... जे कायम उघडंच असे... सुसाट वेगात असल्याने, मला थांबताच आलं नाही वेळेत... धावतच गेटच्या बाहेर जात, थेट रस्त्यावर गेले मी... आणि... आणि नेमकी एक कार येत होती डावीकडून, बर्‍यापैकी वेगात... त्या ड्रायव्हरनेही प्रयत्नांची पराकाष्टा करत, ब्रेक मारलाच... पण उशिर झाला होता तोपर्यंत... मी पुर्णपणे गाडीच्या खाली येत, चारही चाकं माझ्या अंगावरुन गेली होती... आणि मी जागीच...". इतकं बोलून इशा फेर्‍या मारायची थांबली.

एव्हाना बाकीचे चौघेही, चांगलेच हबकले होते. इशाकडून हे सगळं ऐकून. कोणालाही काहीच सुचत नव्हतं. भालचंद्रराव सोफ्यावरुन उठत उभे राहिले. थरथरत होतं त्यांचं सर्वांग. इशाकडे बघून बोलले ते... "म्हणजे... म्हणजे... आपली भैरवीच आलीये परत, इशाच्या रुपात?... बरोबर... आता लख्ख आठवतंय मला... भैरवी गेली त्याच्या दोन दिवस आधीच, ह्या चांदीच्या भांड्यातून शेवटचं पाणी प्यायली होती ती... अन् मला हिच्यासमोरच म्हणाली होती की, बाबा... आता मी हे भांड नाही वापरणार... हे माळ्यावर ठेऊन द्या... जेव्हा कधी बाबा तुम्ही ह्या भांड्यातून पाणी प्याल, मी अगदी असेन तिथून समोर येईन तुमच्या... आणि बघा... बघा आज इतक्या वर्षांनी आपली भैरवी, इशाच्या रुपात माझ्या समोर आलीये".

भालचंद्ररावांनी इशाला... म्हणजे त्यांच्या भैरवीला घट्ट कवटाळून घेतलं छातीशी. आणि घळाघळा रडू लागले ते. देवाच्या ह्या 'अगाध' लिलेबद्दल, त्याचे आभार मानू लागले भालचंद्रराव. भागिरथीबाई, भुषण आणि आसावरी... तिघेही भालचंद्ररावांचा चेहरा होता, त्याच्या विरुद्ध दिशेला एकमेकां शेजारी उभे होते. भालचंद्ररावांच्या छातीवर आपलं डोकं टेकवून, डोळे मिटून उभी होती इशा. तितक्यात इशाने डोळे उघडून पाहिलं त्या तिघांकडे, आणि हलकसं हसली ती. तिच्या आजीने लांबूनच हात गोल फिरवत, डोक्याच्या दोन्ही बाजूंना बोटं मोडली. तिच्या बाबांनी भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत, कौतुकाने मान हलवली. आणि तिची आई समाधांनाने हसली, लेकीकडे बघून... कारण... कारण माळ्यावरुन ते चांदीचं भांड शोधून काढत, ठरल्या प्लॅनप्रमाणे पुढचं सगळं पार पडलं होतं.

आपल्या लाडक्या लेकीचं... भैरवीचं अवघ्या 'पंधरा' वर्षांची असतांना असं जाणं, कमालीचा चटका देऊन गेलं होतं भालचंद्ररावांना. त्यांच्या आत्म्यावरच्या ह्या ओझ्याने, त्यांना कधीच सुखाने जगू दिलं नव्हतं... आणि सुखाने त्यांना जाऊही दिलं नसतं त्याने. पण आता मात्र जितके दिवस असणार होते भालचंद्रराव... त्यांची लाडकी लेक सतत जवळ असणार होती त्यांच्या, 'पंधरा' वर्षांच्याच इशाच्या रुपात.

गौरी सोडून आल्या दिवशीच, लेक परतून आली होती जणू काही... भालचंद्ररावांच्या दृष्टीने.

---सचिन श. देशपांडे
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Address

Pavan Nagar, CIDCO
Nashik
422008

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919422769350

Alerts

Be the first to know and let us send you an email when कथाविश्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कथाविश्व:

Share

Perfect Computers

Join “Perfect” Be “Perfect”

Master in Computer Education since 21 years.

Specialty in MS-CIT & Tally. Even if have done Tally anywhere; to get the Job come to us for at least 1 Month; and don’t tell us the result; but please tell others who need Quality Education to get the Job.

Also you can Come to us for your Online Services need like Pan Card,Passport,Registered Rent Agreement,Marriage Certificate,Food Licence,Railway/Air Ticket Booking,2 Wheeler & 4 Wheeler Insurance,PF Work. Get in touch to avail the Services.