03/09/2025
एका शिक्षकाचा प्रश्न उत्तराचा तास....
#कथाविश्व
दहावीचा वर्ग....
आज माझा वर्गावरचा शेवटचा तास होता. तसा मी खूप उदासही होतो. माझ्या मनात सकाळपासून अनेक प्रश्नांची घालमेल चालू होती, तणावही खूप होता. आता मला परत कोणीही भेटणार नव्हते.
शेवटी मी तास घेण्यासाठी वर्गाकडे निघालो.
मुलांनी माझं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. वर्गात सगळं काही रोजच्या सारखं सुरु होतं. त्यांनी पुस्तक, वह्या बाहेर काढली.
मी आल्यानंतर संपूर्ण वर्गाकडे न्याहळून बघितल, संपूर्ण वर्ग नजरेत भरून घेतला, टेबलावरच डस्टर उचलल आणि फळ्याकडे बघितल, मराठीचा तास आत्ताच होऊन गेला होता.
फळ्यावरचा सुविचार मी वाचला, त्यावर लिहिलं होतं,
"जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत,या दोन गोष्टी परमेश्वराच्या इच्छेनेच झालेल्या शोभतात."
मी सगळा फळा पुसला.आज मला फळ्यावर काहिही नको होतं.मी प्रत्येक गोष्ट मिटवून टाकत होतो.
मुलांना वाटलं आज मी नेहमीप्रमाणे काहीतरी शिकवणार,
पण खरं तर आज मी काहीही
शिकवणार नव्हतो.मुलांना हे माहित नव्हतं.
"मुलांनो,आज आपण काहीही शिकणार नाही. वह्या, पुस्तके बंद करा ". मी मुलांना सांगितले.
हे ऐकून सर्वांना आनंद झाला, पण काहींना आश्चर्य वाटले. हे पहिल्यांदा घडत होतं, मुलं खुश झाली आणि त्यांची उत्सुकता वाढली.
सर काही शिकवणार नाहीत मग आज कोणता विषय असणार याचं कुतूहल प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं, तशी त्यांची चर्चाही सुरु झाली.
माझ्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते.
आज मी ठरवलं होतं आज त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. रोज मी त्यांना शिकवतो आणि प्रश्न विचारतो, आज त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मी देणार होतो, मला त्यांना शेवटच्या दिवशी खूष करायचे होते.
"मुलांनो,आज आपण गप्पा मारणार, तेही तुमच्या आवडत्या प्रश्नांवर"!!. मी त्यांना सांगितलं.
सगळ्यांना खूप आनंद झाला. आज सर्वांना स्वातंत्र्य मिळालं, मनातलं बोलण्यासाठी,मनातले प्रश्न विचारण्यासाठी...!
प्रत्येक जण विचार करू लागला की आता काय विचारायचं.
सर्वांनी एकमेकात चर्चा सुरू केली. काही मुलं गंभीर झाले तर काही आनंदी होऊन हसत होते.
मी मात्र सगळ्यांना डोळे भरून न्याहाळून घेतलं. वर्गाचे सगळं दृश्य मी माझ्यात सामावून घेतलं. प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप जड चालला होता.
मुलं विचार करायला लागली की नेमकं काय विचारावं....
मुलांना बोलकं करण्यासाठी मीच अक्षताला विचारले,
"अक्षता, तू विचार तुझ्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे..?
अक्षता वर्गातली हुशार मुलगी..!!
अभ्यासक्रमातील विषयांच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलं अनेक गोष्टींवर विचार करत असतात, अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात, त्यांची उत्तरं कधी मिळतात तर कधी मिळतच नाही. मला वाटतं मी आज ही संधी मुलांना दिली होती. प्रत्येकाला समस्या असतात, प्रत्येकाला प्रश्न असतात, योग्य उत्तर देणारा न भेटल्यामुळे त्यांचे ते प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतात किंवा त्यांना चुकीची उत्तरे मिळतात.
अक्षता उभी राहिली.
सर माझा एक प्रश्न आहे,
अक्षता काय प्रश्न विचारते हे मला बघायचं होतं.
"सर,जीवनात आनंदी राहण्यासाठी काय आवश्यक आहे"? तिने विचारले.
सर्व वर्ग शांत झाला. खरोखर अक्षताने विचारलेला प्रश्न अगदी वाजवी होता. जीवनामध्ये तिला आनंद हवा असेल पण मिळत नसेल. हा काही फक्त तिच्या एकटीचा प्रश्न नव्हता, हा वर्गातल्या प्रत्येक मुला मुलींचा प्रश्न असेल, फक्त तिला तो सुचला आणि तिने मांडला. आनंद कुणाला नको आहे? आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं. सर्वांचे लक्ष आता माझ्या उत्तराकडे होते.
आमचा आजचा तास हा असाच अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या विषयावर होणार होता.
अक्षता खाली बसली.
"मुलांनो, अक्षता ने खूप सुंदर प्रश्न विचारला.
जीवनात आनंदी राहण्यासाठी काय आवश्यक आहे.....?
मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, जीवनात आनंदी राहण्यासाठी काही करावं लागत नाही.?
आपला मूळ स्वभावच हा आनंदी आहे.
सगळेजण माझं लक्ष देऊन ऐकत होते.
आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे तणाव घेतो, त्या तणावातून नंतर भीती उत्पन्न होते आणि त्यामुळे आपला आनंद हरवल्यासारखं वाटतं.
तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात काम करता, त्या कामाशी सकारात्मक आणि प्रामाणिक रहा, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला तणाव येणार नाही.
तुम्ही जेव्हा एखाद्या ध्येयाकडे,
उद्दिष्टाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे प्रयत्न असतात त्यावर ठेवा.
जसं की तुमचं ध्येय हे परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होण, तेव्हा तुम्ही परीक्षेच्या वेळी निकाल काय लागेल यापेक्षा तुमचं लक्ष त्या ध्येयासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीकडे दिले तर तुम्हाला तणावही येणार नाही आणि तुमचं लक्ष ही साध्य होईल.
आनंदी असणं ही आपली नैसर्गिक मूळ अवस्था आहे, आपणच तिला अनेक बाह्य गोष्टींमुळे विचलित करून टाकतो, त्या बाह्य गोष्टी कोणत्या तर खूप मोठ मोठ्या अपेक्षा, पैसा, प्रसिद्धी आणि झटपट यश मिळवण्यासाठी केलेल्या चुकीच्या गोष्टी.
अक्षताच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. आनंद कसा जपायचा, तो कसा निघून जातो हे तिला एका साध्या उदाहरणात समजलं होतं.
मुलांमध्ये आता प्रश्न विचारायची ओढ लागली, प्रत्येकाला प्रश्न सुचायला लागले. आपल्या आयुष्यातील समस्या आणि त्यावर निर्माण झालेले प्रश्न हे माझ्यापर्यंत ऐकू यायला लागले.
"हे बघा, सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तर देता येणार नाही." मी सर्वाना सांगितले.
मुलांना एखाद्या विषयावर विचार करायला लावलं की ते किती अगदी मनापासून विचार करतात,अगदी प्रामाणिकपणे विचार करतात.
आता सुभाष ची प्रश्न विचारायची खूप इच्छा होती....
मी त्याच्याकडे बोट करून त्याला उभे केले.
"सुभाष विचार, तुझा काय प्रश्न आहे ?
सुभाष हा जरा अंतर्मुख मुलगा होता. वर्गात कधीही जास्त न बोलणारा, जास्त न बोलणारी मुलेच प्रत्येक घटनेकडे गांभीर्याने बघत असतात.
सुभाष उभा राहिला.
"सर,माझा प्रश्न थोडा खाजगी आहे."
"विचार की तुला जे वाटेल ते विचार." मी म्हणालो.
मी आज सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे विचारायला परवानगी दिली होती.
"सर ,मला असं विचारायचं आहे की,
"घरात आई-वडिलांची सारखी भांडण का होतात."? सुभाषने विचारले.
वर्गातली काही मुलं हा प्रश्न ऐकून हसायला लागली. त्यालाही थोडं लाजल्यासारखं झालं.
त्याचा हा प्रश्न खूप गहन होता,
त्याला एकदमच वाईट वाटू नये म्हणून मीच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला,
"तुमच्या प्रत्येकाच्या घरात आई-वडिलांची भांडण होतात का
रे "?
सर्वांचा एका सुरात आवाज आला, हो..........
हे ऐकून सुभाषलाही बरं वाटलं.
आपण काही चुकीचा प्रश्न विचारला नाही हा भाव त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसला....
सुभाषचा हा प्रश्न नव्हता, ही त्याची नेहमीची समस्या असेल, त्याच्या मनामध्ये चाललेली कदाचित कित्येक वर्षाची चिंता असेल, आज जेव्हा त्याच्या प्रश्नाला मोकळीक मिळाली, तेव्हा तो त्याच्या ओठावर आला.
कदाचित हा प्रश्न त्याला कित्येक वर्षापासून भेडसावत असेल, परंतु विचारणार कुणाला आणि कोण काळजीने उत्तर देईल असेच त्याच्या मनामध्ये कायम येत असेल....
"मुलांनो,तुमच्या घरात सुद्धा आई-वडिलांची भांडण होतात ना?
बघा, तुम्ही आईवडिलांची झालेली भांडण बघता, पण नंतर ते पुन्हा गोड होतात, ते पुन्हा बोलायला लागतात... नाही कां.?
सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
"बघा, जगामध्ये कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. "
"सारख्या म्हणजे काय सर."?
एका मुलाने मध्येच विचारले...
सारख्या म्हणजे एकाच प्रकारच्या आवडीनिवडी, एकाच प्रकारचे विचार, एकाच प्रकारचे आवडते खाद्यपदार्थ, एकाच प्रकारचे छंद...
अशा प्रकारच्या दोन व्यक्ती एकत्र भेटणे हे खूप दुर्मिळ असते.
आणि जेव्हा दोन भिन्न प्रकारच्या आवडीनिवडी,विचार, छंद असलेल्या दोन व्यक्ती पैकी जेव्हा एका व्यक्तीला असे वाटते की माझेच बरोबर आहे आणि समोरच्या व्यक्तीने माझ्याच विचाराने चाललं पाहिजे तेव्हा अशा दोन पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होतात.
भांडण होण्याचं कारण हे मूळतः वैचारिक असते. कोणतीही व्यक्ती वाईट नसते, त्या व्यक्तीचे विचार, आचरण आणि स्वभाव त्या व्यक्तीला वाईट बनवतो.
मुलांनो, तुम्ही आई-वडिलांच्या भांडणाकडे लक्ष न देता नेहमी तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, त्यांची कितीही भांडणं झाली तरी ते तुमच्याकडे दुर्लक्ष कधीच करणार नाहीत कारण त्यांना त्यांची जबाबदारी माहित असते, बऱ्याच वेळेस ते तुमच्यासमोर भांडण करायचं टाळतातही पण कधीकधी त्यांनाही स्वतःवर नियंत्रण करता येत नाही.
सुभाष मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकत होता. मला काय सांगायचंय हे सुभाषला समजलं होतं, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं.
मी आज जे काही बोलत होतो ते फक्त विद्यार्थ्यांसाठी बोलत होतो, त्यांच्या समाधानासाठी बोलत होतो,
मलाही माझ्या मुलीसमोर आम्ही नवरा बायको ने केलेले भांडण आठवलं, कदाचित तिच्याही मनामध्ये हा प्रश्न असेल? परंतु ती बिचारी कधीही बोलली नाही.
वर्गात थोडं उशिरा आल्यामुळे माझा तास संपत आला होता, मी सगळ्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नव्हतो.
कोपऱ्यात बसलेल्या वंदनाला खूप काही विचारायचं होतं असं मला तिच्या चेहऱ्यावरून दिसलं.
मी मुद्दामहून तिच्याकडे बोट करत तिला विचारलं.
"तू विचार वंदना, तुझा काय प्रश्न आहे"?
बिचारी प्रश्न विचारताना मला खूप नाराज दिसली.
तिच्या चेहऱ्यावर तिची नाराजी स्पष्ट दिसत होती.
परंतु तिने धीर धरून मला शेवटी प्रश्न विचारलाच.
"सर, लोक आत्महत्या का करतात? माझा भाऊ आम्हाला सोडून गेला. त्याने आत्महत्या करताना आमचा विचार का नसेल केला? खरोखरच आत्महत्या करणे योग्य आहे का."?
हा प्रश्न ऐकून सगळा वर्ग शांत झाला. सगळ्यांना तिचा प्रश्न समजला होता. काही दिवसापूर्वीच तिच्या भावाने आत्महत्या केली होती. मी मात्र क्षणभर स्तब्ध झालो. मी तिच्याकडे बघतच राहिलो.
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं.
मी काय उत्तर देणार ?
मला काहीही सुचत नव्हतं.या प्रश्नाने मलाच गोंधळात टाकलं.
त्याच क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं, तीही माझ्यासमोर भावाच्या आठवणीने रडत होती. वर्गातील सर्व वातावरण भावनिक होऊन गेलं. तिचं दुःख मी समजू शकत होतो. तिचा हा प्रश्न नव्हता, तर तिच्या जीवनातलं न सुटणार कोडं होतं.
माझी कितीही इच्छा नसली तरी मी मात्र उत्तर देण्यास बांधील होतो.
परंतु माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. माझ्या पायाखालची जमीन हलली होती, कपाळावर घाम होता.
संपूर्ण शांत झालेला वर्ग वंदनाच्या आणि माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना बघत होता.
मला तिचं दुःख समजलं होतं, त्याचबरोबर मला माझंही दुःख समजलं होतं.
तेवढ्यात तास संपल्याची बाहेर घंटा वाजली.
"वंदना, तुझ्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या वेळेस देईल."
ती मात्र अजूनही भावाच्या आठवणीने रडत होती.माझ्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
मी टेबलावरून पुस्तक उचललं आणि बाहेर आलो.
मी सरळ रेस्ट रूम मध्ये गेलो.
रेस्ट रूम मध्ये आज कुणीही नव्हतं. मी दरवाजा लावून घेतला, खुर्चीवर बसलो आणि दोन्ही हात चेहऱ्याला लावून टेबलवर डोके ठेवून रडायला लागलो.
तिने विचारलेला प्रश्न माझ्या कानांमध्ये घुमत होता.
माझ्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबत नव्हते.
आणि बराच वेळ मी समोरच्या भिंतीकडे एकटक बघत राहिलो. रूम मध्ये अजूनही मी एकटाच होतो.
परंतु वंदनाच्या प्रश्नाने मला खूप विचार करायला लावला होता.
मी माझ्या खिशातून लिहिलेलं दोन पानाचे पत्र काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं, त्याच्याकडे पुन्हा एकदा बघितलं आणि ते पूर्णपणे फाडून त्याचे बारीक तुकडे केले आणि कचरा पेटीमध्ये टाकून दिले.
मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी मी आजच हे पत्र लिहिलं होतं माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलींसाठी...!!
वंदनाच्या एका प्रश्नामुळे तिने मला विचार करायला लावला होता.
आज एका विद्यार्थिनीने माझ्यासारख्या एका शिक्षकाचा जीव वाचवला होता.
मी माझ्या वैयक्तिक वैवाहिक जीवनाला कंटाळून आत्महत्येसारखा भयानक निर्णय घेतला होता, परंतु मी हा विचार केला नाही की पत्नी आणि मुलीचं काय होईल? खरोखरच हे करणे योग्य आहे का? या प्रश्नाची उत्तरे मला वंदनाने शोधायला लावली होती.
मी जेव्हा वर्गात गेलो होतो तेव्हा फळ्यावर लिहिलेला सुविचार आठवला.
"जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत,या दोन गोष्टी परमेश्वराच्या इच्छेनेच झालेल्या शोभतात."
हे अगदी खरं होतं.
मी उठून चेहरा पाण्याने धुतला, आणि रेस्ट रूमचे दार उघडले.
शाळा सुटली होती. मुलं आपल्या घरी निघाली.
मीही घरी निघालो , माझ्या मुलीकडे आणि पत्नीकडे....
©® प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉