कथाविश्व

कथाविश्व कथाविश्व - भावविश्व माणुसकीचे
(2)

 #कथाविश्व *ताईंना सांगा पदर नीट घ्या...*रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्व...
29/09/2025

#कथाविश्व

*ताईंना सांगा पदर नीट घ्या...*

रात्र बरीच झाली होती...
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो...
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती...
कधी दिवसपाळी तर
कधी रात्रपाळी करून मी खूपच थकून जात असे.

ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते.
मीही त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघालो...
मुख्य रस्त्यावरून आमचे मार्ग बदलत होते...
जो तो आपापल्या
निवाऱ्याच्या दिशेने निघून जाई...
नोकरदार मंडळीच शेवटी. कुणाचं स्वतःचं घर होतं तर कोणी भाड्यानं राहत असे...

मीही बाईक वरून निघालो...
काही वेळातच मी मुख्य रस्त्यावर आलो. रात्र बरीच झाल्यानं वाहनांची वर्दळही कमी होती. दिवसा वाहनांच्या रांगांच्या रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता रात्री कुठंच दिसत नव्हती की वेगावर कुठलंच
नियंत्रण दिसत नव्हतं...
कधीतरीच एखादं वाहन मला समोरून येताना दिसे किंवा एखादे वाहन मला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे.

आता पुन्हा मला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता...
थोडं पुढे येत मी मुख्य रस्ता सोडला...
आता कधीतरी दिसणारी वहानांची वर्दळही मंदावली...

आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळाकुट्ट डांबरी रस्ता...
अगदीच एखाद्या अजगरासारखा...
रात्रीच्या काळोखातील ती भयाण जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती...
पण नाईलाज होता.
नोकरी हवी, तर शिफ्ट मधे काम करावंच लागतं...

मी आपल्याच विचारात गुरफटला होता आणि रस्ता ओसाड असल्यानं मी अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होतो. तसंही कोण विचारणार आहे म्हणा...
मधून चालवतोय की कडेने...!
एकटं असलं की माणूस हवं तसं वागू शकतं...
आणि वागतंच...

काही वेळातच माझा
एकटेपणा नाहीसा झाला. कारण मला मागुन येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळे मधोमध जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने चालवू लागलो...

काही सेकंदात एक दांपत्य असलेली बाईक मला ओव्हरटेक करून पुढे गेली...
कदाचित नवरा बायको असावेत...
नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जैकेट होतं तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती...

पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की
बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर...
अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता...!

वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो!
आणि जर तीचा पदर...
चाकात गुरफटला तर ते त्या महिलेच्या जिवावर बेतू शकतं...!

मी झटकन माझ्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणालो...

_“ताई, तुमचा पदर...
चाकात अडकतोय...
तेवढा नीट घ्या...”_

एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो...

एक समाधान होतं...
छोटीशी का असेना
‘आपण मदत केली’
ही भावना.

बऱ्याचदा टीव्ही आणि व्हाट्सअप वर अशा घटनांचे व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतात...
न्युज चॅनलवरदेखील बऱ्याचदा असे व्हिडिओ दाखवले जातात ज्यामधे मागे बसलेल्या एका मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली त्यासरशी ती मुलगी जोरात
रस्त्यावर आदळली आणि वीस पंचवीस फूट बाईक सोबत रस्त्यावरून फरफटत गेली. ओढणीचा फास गळ्यात गच्च आवळला आणि ती बिचारी जागेवरच संपली...

घर अजून बरंच दूर होतं आणि गल्लीतली ती भटकी कुत्री कधी कधी
गल्लीत राहणाऱ्या लोकांच्याच अंगावर येत...
त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा...!
मी आपल्याच विचारात गुरफटला होतो की...
पुन्हा एक बाईक मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली...

मी ओळखलं...
टोपी आणि काळं जैकेट...
पण...
मागे ती महिला... त्याची पत्नी नव्हती...!!!

मी गाडीचा वेग वाढवला आणि विचारू लागलो...

_“अहो तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी....._
चाकात पदर... अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं...”

काही अंतर पुढं आल्यावर त्याने आपली बाईक रस्त्याकडेला घेतली
आणि क्षणभर थांबला तशी मी देखील माझी गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली...

_“काय झालं भाऊ...?_
_तुमची बायको मागे बसली होती ना...!_
त्या कुठं आहेत...?”

तो माणूस अक्षरशः थरथरत होता. राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता...
काहीच न बोलता त्यानं मागे रस्त्याकडे वळून पाहिलं...
मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच आक्राळ विक्राळ वाटत होता...
आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पहात होता की, नुकताच तो एका भयाण मरणातून जिवंत वाचला होता!
त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती...

_“काय झालं...?_
_तुम्ही इतके का घाबरलात...?_
_पाणी देऊ का..?”_

मी पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्यासमोर धरली तसा तो समोरचा माणूस म्हणाला...

_“माझ्या गाडीवर कोण बसलेलं तू पाहिलंस...?”_

_“म्हणजे... ती तुमच्या ओळखीची नव्हती...?”_

_“मी जाॅबवरून घरी निघालोय... एकटाच..._
_कोणालाही लिफ्ट पण नाही दिलेली...!”_

त्या अनोळखी व्यक्तिच बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली...
हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण
हळुवारपणे काढत स्वतःच घोटभर पाणी प्यायलो...

आता आम्ही दोघेही मागे त्या भयाण काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो...
दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली...
दोघेही धडधडत्या काळजानं समोर पाहू लागले तोच मागून कोणीतरी जोराचा हाॅर्न दिला, तसे आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले...
एकमेकांशी काहीच न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईक वर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघाले...

काही वेळातच ती व्यक्ति दुसऱ्या रस्त्याने निघुन गेली...
आणि मीही घरी पोहोचलो...
एव्हाना दोन वाजून गेले होते...
अंथरूणावर पडलो पण काही केल्या झोप येईना...!

सताड उघडे डोळे वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते...
आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं, ज्याची आजवर मी थट्टा करत होतो...
एक अघटीत असंच काहीसं!

राहून राहून माझ्या मनात एकच विचार येत होता...
_‘आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं..?’_
रात्री अपरात्री मी या आधीही अनेकदा
बाहेर भटकून कधी कधी पहाटेपर्यंत घराची वाट न बघीतलेली...
आजच असं का घडलं...?

तो भास तरी नक्कीच नव्हता...
कारण त्या दुचाकीवर बसलेली ती महिला...
तीची ती शुभ्र पांढरी साडी...
हवेच्या झोक्यासरशी वाऱ्यावर हेलकावे घेणारा तीचा तो पदर...
जसा या खिडकीवरचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे
अगदी तसाच तीचा पदर...!

वातावरणातली ही शांतता रोजची असली तरी आज ती अधिकच गुढ आणि
जीवघेणी वाटत होती...
माझी नजर बराच वेळ खिडकीवरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती...
काहीतरी होतं, जे त्या पडद्याला आकार देत होतं...!
जशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असंच मला वाटत होतं...!

याआधी मी कधीच
इतकं निरखून पाहिलं नव्हतं...
पण माझ्या पहाण्यानं वा न पहाण्यानं त्यांच अस्तित्व संपणार नव्हतं...
त्या हेलकावे घेणाऱ्या पडद्याची आता मला भीती वाटू लागली...
त्यातच वाऱ्याच्या झोक्याने अधून मधून खिडकीचं दार
आदळत असल्यानं काळजात धस्स होई! मी बेडवरून उठलो आणि खिडकी बंद करून घेतली...
मघापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला. शांत, अगदी शांत वाटू लागलं.

मी बेडकडे फिरलो इतक्यात...
एक पांढरी साडी घातलेली बाई माझ्या अंगावर धावून आली...
छाती फाडून काळीज बाहेर पडावं असा मी घाबरलो...
आणि झोपेतून जागा झालो!

स्वप्न...
एक भयानक स्वप्न...
अंग घामानं भिजलं होतं...
कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती...!

दोन दिवस मी कामावर जाण्याच टाळलं पण किती दिवस घरात बसून राहणार...?
नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात चाळल्या पण व्यर्थ...
तिसऱ्या दिवशी धाडस करून मी जाॅबला गेलो...
पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती...

साडेबारा वाजले... शिफ्ट संपली...
जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागले, पण माझी पावलं जड झाली होती...
गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आलो.
नेहमीसारखीच तुरळक वाहनं दिसत होती.

आपल्या विचारात मी इतका गुरफटला होतो की, हायवे कधी संपला हे देखील मला समजलं नाही...
पुन्हा सारं काही आठवू लागलं. तशी एका अनामिक भीतीनं माझ्या
काळजाची धडधड वाढु लागली...

तोच मागून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच माझं उरलंसुरलं अवसानही गळुन पडलं...

डोकं सुन्न झालं होतं...
आवाज येत होता...
तो फक्त हृदयाच्या ठोक्यांचा...!
धकधक धकधक धकधक...
गाडी जवळ आली...
एव्हाना माझा चेहरा घामाने भिजला होता.

पुढच्या क्षणी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली...
मी चोरट्या नजरेने पाहिलं तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता...!

माझ्या जीवात जीव आला...
काळजातली भीती आता कमी झाली होती...
मी त्या बाईकस्वाराकडं पाहिलं...
आणि किंचित स्माईल दिलं...

तसं बाईकस्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली
आणि...
माझ्याकडे पाहत म्हणाला...

_*“ताईंना सांगा...*
*पदर...*
*नीट घ्या...!”*_

***💀☠💀***
~अनामिक
फोटो सौजन्य - pinterest
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

29/09/2025

🪁कटी पतंग 🪁
#कथाविश्व
काल खुप वर्षांनी एका दिमाखदार सोहळ्यात तो अगदी जवळून दिसला आणि टचकन् माझ्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने देखील मला बघितलं बहुतेक. पाहुण्यांच्या गराड्यातून अचानक बाहेर पडून तो कधी माझ्या जवळ येऊन गुपचूप उभा राहिला ते माझं मलाच कळलं नाही.

बाजूला कोणीतरी उभं असल्याची जाणीव त्या व्यक्तीच्या बुटांनी करून दिली आणि मी मान वळवून बघितले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क तो माझ्या जवळ उभा होता. आमची नजरानजर झाली. पुढच्याच क्षणी त्याने खाली वाकून माझ्या पायांना स्पर्श करत आशिर्वाद घेतला. मला अवघडल्यासारखे झाले कारण आजूबाजूच्या गर्दीला माझी बिलकुल ओळख नव्हती.

त्याने माझे हात हातात घेऊन मला विचारले, "कसे आहात काका"
मी उत्तरलो," तसाच आहे जसा आपल्या शेवटच्या भेटीत होतो पण तु मात्र...." मला पुढे काहीच बोलवेना.

"तुमच्या मनांतली खदखद स्वाभाविक आहे. मी तेव्हा नुकत्याच आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या यशाच्या धुंदीत नाचत होतो. पण त्या यशामागे ज्यांचा कैक वर्षे निस्वार्थी त्याग होता त्या तुम्हाला मी साफ विसरून गेलो होतो." त्याने आज पहिल्यांदाच स्वतःची चूक कबूल केली.

"तु जा आता आतमध्ये. तुझ्यामुळे कार्यक्रम खोळंबेल कदाचित. तसं नको व्हायला. "

तुम्ही पण चला माझ्याबरोबर. पहिल्या रांगेत बसून कार्यक्रम बघा. असं म्हणून तो मला पुढे बसायला घेऊन गेला.
कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार होऊन संपला. तो परत चाहत्यांच्या घोळात अडकला. मी बराच वेळ तो येण्याची वाट बघितली. पण तो आलाच नाही. शेवटी कंटाळून मी परत जायला निघालो. सावकाश पावलं टाकत मी ऑडिटोरियमच्या प्रांगणात आलो आणि तिथल्या बाकावर बसलो. जवळच्या कापडी पिशवीतून आणलेली पाण्याची बाटली बाहेर काढून त्यातलं थोडंसं पाणी प्यायलो. जरा हुशारी आली मला. मोबाईल मधून कॅब बुक करणार इतक्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर थाप मारली. मी मागे वळून पाहिलं. एक अनोळखी व्यक्ती उभी होती.

ती अनोळखी व्यक्ती मला पाहून म्हणाली प्लीज जाऊ नका तुम्ही. अभिषेक सरांनी तुम्हाला थांबायला सांगितले आहे. असं म्हणून त्याने मोबाईल वरून बहुतेक अभिषेकला मी सापडल्याचे कळवलं.
पाच दहा मिनिटांत अभिषेक आला देखील. आयोजकांचा निरोप घेऊन तो मला म्हणाला "चला काका मी सोडतो तुम्हाला घरी ". नाईलाजाने मी त्याच्या गाडीत बसलो पुढच्या सीटवर त्याच्या शेजारी. अभिषेकने गाडी मुख्य रस्त्यावर आणून थांबवली आणि अचानक तो ओक्साबोक्शी रडायला लागला. तो भावनाविवश होत म्हणाला," काका कोण होतो मी जेंव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आलो तेंव्हा. नाटकाच्या वेडापायी जालन्याहून मुंबई मध्ये आलेला एक होतकरू मुलगा. पहिली २-३ वर्ष नुसती वणवण केली मी कामासाठी. पण पदरी निराशाच आली. माझ्याकडून एक पैसा देखील न घेता पोटच्या पोरासारखं मला सांभाळलंत, खाऊपिऊ घातलंत. नंतरची दोन वर्षे ओळखीने बारीक सारीक भुमिका मिळत गेल्या. मिळालेल्या पैशातून जेमतेम माझाच खर्च भागत होता. पण हिमालयासारखे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. म्हणूनच मी मुंबईच्या मायानगरीत स्थिरावलो. पण अचानकपणे माझ्या नशिबाचे दरवाजे उघडले आणि मला एका नाटकात नायकाची भूमिका मिळाली. त्या नाटकाने खुप यश बघितले आणि त्यानंतर एकामागोमाग एक नाटक मिळत जाऊन आज मी आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागलो नाट्यविश्वात. आज सगळी सुखं माझ्या पायाशी लोळण घेत आहेत...."

अभिषेकला मध्येच थांबवत मी म्हणालो," निराशेच्या बोगद्यातून वाट काढत तु पलिकडच्या टोकाच्या उजेडात जाऊन पोहोचलास खरा. पण बोगद्याच्या सुरवातीचा उजेड मात्र तु कळत नकळत विसरून गेलास. अभिनयाचा पतंग रंगभूमीच्या आकाशात तुझ्या हिंमतीवर उंच नेलास देखील. पण जमिनीवरच्या फिरकीचा तुला सपशेल विसर पडला. तुझ्या अस्तित्वाची नाळ त्या फिरकीशी बांधलेली आहे हे यशाच्या वाऱ्यावर बसून आणखी उंचच उंच जाताना तु सोयीस्करपणे विसरलास. उंच उंच उडताना फिरकीला गुंडाळून ठेवलेला मांजा तुला अलगदपणे सोडायलाच लागतो तरच इतर पतंगाच्या स्पर्धेत तु टिकून रहात अपराजित ठरतोस. पण जर का यशाच्या उन्मादात तुला फिरकीचा विसर पडला तर तुझ्या कारकिर्दीचा पतंग तुझ्या नकळत तुझ्या प्रतिस्पर्ध्यांकडून कापला जाऊन तो कधी कटी पतंग होईल ते तुझं तुलाच कळणार नाही. फिरकीचं काय. आज ह्या पतंगाशी. नाहीतर उद्या दुसऱ्या पतंगाशी नातं जोडून ती तीचं काम परत सुरू करते. पण कापलेल्या पतंगाला मात्र फिरकीचा आधार कायमचा गमवायला लागतो."

मी बोलता बोलता समोरच्या आरशात अभिषेकच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव न्याहाळत होतो. पुढची १०-१५ मिनिटे शांततेत गेली. अखेर माझ्या घराजवळ गाडी थांबवली अभिषेकने.

थांबा काका. दार उघडू नका. असं म्हणून अभिषेकने गाडीतून खाली उतरून माझ्या बाजूला येवून दार उघडले. मला हात देऊन बाहेर उतरायला मदत केली. मी उतरून उभा राहिल्यावर मला कडाडून मिठी मारत म्हणाला," काका, उद्यापासून माझा पतंग आणि तुमची फिरकी हे मला मंजूर आहे. उद्या संध्याकाळी येतो तुम्हाला न्यायला. बाहेर कुठे तरी जेवायला जाऊ या . तुमच्या घरातून बाहेर पडल्यानंतरच्या बऱ्याच जुन्या आठवणींचा मांजा गुंडाळायचा आहे मला तुमच्या फिरकीला"

मी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणालो, "उशिरा का होईना पण तुला शहाणपण सुचलं हे महत्त्वाचे आहे माझ्यासाठी."

मला शुभरात्री म्हणून अभिषेक गाडी घेऊन निघून गेला आणि मी सोसायटीच्या मुख्य दरवाज्याची कडी काढून आत प्रवेश केला.

© सतीश बर्वे
२९.०९.२५.

टीप: कथेतील नटसम्राट कोण असं कृपया कोणी विचारू नये ही विनंती आहे. कारण आज स्वकर्तृत्वाने मराठी रंगभूमीवर तो लोकप्रिय झाला आहे. पहिल्यांदाच भेटला तेव्हा नाटकात काम करण्याच्या वेडापायी त्याने काय काय काम केलं ते ऐकून वाईट वाटलं होतं. मला सोबतीची गरज होती आणि त्याला निवाऱ्याची. तेवढी मी पुढे केली. पोटच्या पोरासारखा त्याला खाऊपिऊ घातलं. यशाच्या धुंदीत जुन्या काळातील आठवणी आणि माणसं कळत नकळत अडगळीत जाऊन पडतात. काही काळासाठी माझं अस्तित्व तो विसरला जरूर पण भानावर आल्यावर मात्र त्याने स्वतःला सावरले आणि नंतर अचानकपणे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो मला भेटला तेव्हा पुढे काय झालं ते कथेत लिहिले आहे.

माणसाने स्वकर्तृत्वाने मोठं जरूर व्हावं पण तिथे पोहोचण्याच्या मार्गात साथ दिलेल्या माणसांना विसरू नये येवढंच इथे नमूद करावेसे वाटते मला.
सतीश बर्वे
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

 #कथाविश्व अतिशय सुंदर,,,,,, रात्री सहजच नवरा बायकोला म्हणाला...*नवरा*:-पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी🙎‍♀भले लागू दे...
29/09/2025

#कथाविश्व

अतिशय सुंदर,,,,,,
रात्री सहजच नवरा
बायकोला म्हणाला...
*नवरा*:-
पुन्हा जावे शाळेत
पुन्हा ती दिसावी🙎‍♀
भले लागू दे शिकाया 📕
लसावि, मसावि 🔢

*बायकोचे उत्स्फूर्त उत्तर*:-
बनून आता गोसावी 👳‍♂
जी आहे ती सोसावी 🧕
विसरून आता लसावि, मसावि 😡
आठवणीने उद्या भांडी घासावी
जमलंच तर फरशी पण पुसावी !!!
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
फोटो सौजन्य pinterest (माधुरी दीक्षित नेने)

 #कथाविश्व बस अपघातात पाय गमावला डॉक्टरांनी पुन्हा कधीच चालत येणार नाही सांगितलं पण व्हील चेअरवर बसायला दिला साफ नकार......
29/09/2025

#कथाविश्व
बस अपघातात पाय गमावला डॉक्टरांनी पुन्हा कधीच चालत येणार नाही सांगितलं पण व्हील चेअरवर बसायला दिला साफ नकार.... वयाच्या १६ व्या वर्षी तिरुचिरापल्लीहून मद्रासकडे जात असताना अभिनेत्री सुधा चन्द्रन यांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्लास्टर लावल्यावर डावा पाय बरा झाला, पण उजव्या पायात ‘गॅंग्रीन’ (एक प्रकारचा कॅन्सर) होण्याची शक्यता दिसू लागली. अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्यांचा उजवा पाय कापण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर अपघातानंतर एका महिन्याच्या आत त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून साडे सात इंच खाली कापण्यात आला. डॉक्टरांनी पुन्हा कधीच चालत येणार नाही सांगितलं पण सुधाने कधीही हिम्मत हरली नाही. सुधाचे वडील म्हणजे अभिनेते के. डी. चंद्रन यांना सुधाला व्हीलचेअरवर पाहून अश्रू आवरता आले नाही. वडिलांचे अश्रू पाहून तिने पुन्हा कधीच व्हील चेअरवर बसणार नाही अशी शपथ घेतली. कुबड्याच्या साहाय्याने त्यांनी चालायला सुरुवात केली. काही काळानंतर मेग्सेसे पुरस्कार विजेते कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉ. पी.सी. सेठी यांच्याशी भेट झाली. “मी नाचू शकेन का?” असा प्रश्न त्यांनी डॉक्टरांना विचारला तेव्हा डॉ. सेठी म्हणाले की , “नक्कीच, प्रयत्न केल्यास सर्व काही शक्य आहे.”

उपचारानंतर सुधाजींनी नृत्याचा सराव सुरू केला. मात्र, या प्रयत्नात कापलेल्या पायातून रक्तस्राव सुरू झाला. सामान्य माणूस या प्रकारच्या घटनेनंतर पुन्हा नाचण्याची हिम्मत करणार नाही. पण सुधा सामान्य नव्हत्या नृत्य प्रशिक्षकाला घेऊन त्या पुन्हा डॉ. सेठी यांच्याकडे गेल्या. नृत्याची आवड समजून डॉ. सेठी अभ्यास करून पुन्हा विशिष्ट रचना करून कृत्रिम पाय बसवला त्यावेळी त्यांनी सुधाला सांगितले की, “मी जे काही करू शकतो ते केले, आता तुझी वेळ आहे.” सुधाजींनी पुन्हा नृत्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला त्रास झाला, पायातून रक्तस्राव झाला, पण त्यांनी कठोर सराव सुरूच ठेवला. पुढे अभिनय क्षेत्रातून त्यांना अनेक ऑफर्स येऊ लागल्या तिचा सहजसुंदर अभिनय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नृत्य सादर करत मालिका, चित्रपट असा तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास तिने जिद्दीने घडवला. त्यांच्या या जिद्दीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

शिर्डी चा प्रसंग आहे! #कथाविश्व महाराष्ट्रात असताना शिर्डीला खूपदा गेलोय, काहीवेळा आईबाबां सोबत, काहीवेळा मित्रांसोबत. य...
29/09/2025

शिर्डी चा प्रसंग आहे!
#कथाविश्व
महाराष्ट्रात असताना शिर्डीला खूपदा गेलोय, काहीवेळा आईबाबां सोबत, काहीवेळा मित्रांसोबत. यावेळी मित्रमित्रच गेलो होतो. जायचो अधूनमधून, मनाला शांत वाटायचं. तुम्हाला माहीत असेलच की हे शहर बारमाही गजबजलेलं असते. दर्शनाला प्रचंड गर्दी असते. तेच प्रसादाचे जेवण त्यावेळी ५ रुपयाला होते. तोच जंबो लाडू, त्यावेळी १० रुपयाला २ होते. मंदिर दरवेळी थोडे आधिक बदललेले दिसे, पण लाडू आणि जेवण या गोष्टी सारख्याच!
छान दर्शन झाले. रांगेत उभे राहून लाडूही घेतले. लवकर बाहेर निघालो कारण परतीचा प्रवासही होता.
रस्त्यात एक आमच्याच वयाचा मुलगा होता. एका कडेला उभं राहून काहीतरी विकत होता. जवळ गेलो तर कळले की साबुदाणा खिचडी होती. पण ती खिचडी वाटण्यात त्याचा एक नियम होता. तो फक्त चेहऱ्याने आणि कपड्याने गरीब दिसणाऱ्या लोकांनाच बोलावे आणि त्यांना द्रोणात खिचडी खायला देई. अगदीच गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी माणसं तिथे उभं राहून खात होती. आम्हालाही हुक्की आली म्हणून आम्हीही तिथे गेलो.
"कितीला आहे रे पोरा एक प्लेट?" आमच्यातल्या एकाने विचारले.
त्याने आमच्याकडे बघितलं आणि अगदी शांतपणे खिचडी समोरच्या एका म्हातारीला देत दबक्या आवाजात म्हणाला,
"पैसे नाही घेत आहे साहेब, फुकट आहे, देऊ का तुम्हाला थोडी?"
म्हणजे, तो फुकट वाटत होता!
‘’पण का?’’ असा प्रश्न मनात चमकला कारण, त्याच्या पेहरावावरून तर तो श्रीमंत वाटत नव्हता. पायात धड चप्पल पण नव्हती. आता त्याने विचारलंच आहे तर काय करावे? घ्यावी की नाही? किती प्लेट घ्याव्या? असे विचार मनात असतानाच त्याने पुन्हा दबक्या आवाजात सांगितले, विचारलेच,
"साहेब, दोन प्लेट देऊ का? कारण मी गरिबांसाठी आणली आहे. मनाला लावून घेऊ नका आणि रागावून जाऊ ही नका. Please, I request you."
आम्हाला राग आला होता पण त्याच्या शेवटच्या इंग्रजी वाक्याने आम्ही थबकलो. आश्चर्यचकित होऊन मी त्याला विचारले,
"तुला इंग्रजी येते? मग इथे काय करतो आहेस?"
"I am a physics student sir. Do come here on weekends." तो शुद्ध इंग्रजीत म्हणाला आणि त्याने दोन प्लेट खिचडी आमच्यापुढे केली.
आम्ही अचंबित…! प्रकरण समजत नव्हते. आम्ही मुकाट त्याच्या तोंडाकडे पाहत खिचडी खाऊ लागलो. तो मात्र रस्त्यावरच्या गरीब लोकांना बोलावण्यात व्यस्त होता.
खिचडी संपत आली होती, आमचीपण आणि त्याने आणलेली पण. त्याने आपली लहानशी टपरी उचलली आणि जायला निघाला. आम्हांला बघत म्हणाला,
‘’येतो सर, सहाची ट्रेन आहे. भेटूया.’’
आम्हाला क्षणभर काहीच कळेना! मी त्याला थांबवले आणि विचारले,
‘’हे तू नक्की काय करत आहेस? आणि का?’’
तो शांतपणे हसला. मानेवरचा घाम पुसत म्हणाला,
‘’सर, इथे मी पण खूपदा यायचो मागायला बाबांकडे. तेव्हा पैसे नसायचे. आई म्हणायची बाबांकडे जा. बाबा शिकवतील कसं जगायचे ते! म्हणून यायचो. आत जेवण आणि लाडूला पैसे कधी असायचे, कधी नसायचे. तेव्हा ना इथे एक माणूस असायचा रस्त्यावर, मी टपरी लावली ना इथेच! ते आम्हां गरिबांना खिचडी वाटायचे, तेही फुकट! मी आलो ना की इथेच त्याच्याकडे खायचो, बोलायचो. तेही चांगले कुठेतरी नोकरीला होते, पण इथे यायचे आणि गरिबांना गुपचूप खिचडी वाटून निघून जायचे.
बोलता-बोलता त्याने आवंढा गिळला. आम्ही एक दुसऱ्याकडे पाहिले. तो पुन्हा पुढे बोलू लागला.
‘’मी त्यानंतर नेहमी त्यांच्यासाठी मंदिरातून आतून ना लाडू घेऊन यायचो. ते मला खिचडी द्यायचे आणि मी त्यांना लाडू द्यायचो. एकेदिवशी आल्यावर ते दिसले नाही आणि कळलं..की ते आता हयात नाहीत!’’
त्याच्या डोळ्यांतून पाणी आले.
‘’त्यांच्या त्या चांगल्या कामाच्या आठवणीत येतो सर. शनिवारीच जमते. येतो आणि जातो.’’ आता मात्र तो हलकासा हसला.
मी विचारले, ‘’त्या माणसाचे नाव काय?’’
तो म्हणाला, ‘’माहीत नाही सर. त्यांनी कधीही मला सांगितले नाही. नेहमी म्हणायचे की तुझं माझं नातं या लाडूचं आहे! बास्स! येतो सर..’’
आम्ही त्याला हाक मारली. त्याने वळुन पाहिले. का कोण जाणे पण बैगेत हात गेला आणि एक लाडू निघाला, तो मी त्याला दिला.
तो रडायला लागला. आणि त्याने तो लाडू घेतला.
"ही कामाची पावती आहे सर! येतो…."
त्यादिवशी एक गोष्ट उमगली,
माणसात आणि देवात तसेच सधन माणसांत आणि गरजू लोकांत फक्त एका लाडूचे अंतर आहे!
फक्त तो नकळतपणे खिश्यात हात घालून देता यायला हवा, प्रसादा सारखा!
आणि मग तो लोकांनी कसाही समजून खावा - प्रसाद म्हणून, मिठाई म्हणून, भूक म्हणून, कसाही.. !
मला समजलंय की आयुष्यात ना आपल्याला न देव बनायचं आहे ना माणूस ना देवमाणूस.. आपल्याला त्या दोघांसारखं त्यांच्यासारखं प्रसाद बनायचं आहे! स्वतःला वाटता आले पाहिजे.
आणि नीट बघाल तर तुम्हालाही कळेल की देवाच्या समोर पुजारी, भक्त, भाविक, पीडित या सगळ्यांच्या पुढे प्रसाद असतो! देवाच्या, देवत्वाच्या जवळ जायचे असेल तर प्रसादच बनावे लागेल!
मी त्याला नाव विचारले नाही. फक्त त्याला दूर दिसेनासे होईपर्यंत पाहिले. नाव विचारले असते तरी त्यांनी सांगितले नसते.
असो! मला त्याचं नाव माहीत आहे!
त्याचं नाव आहे ''लाडू!''
कथाविश्व - आपले कथेतल्या लाडू सारख्या माणुसकीच्या गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

29/09/2025

समाधान
#कथाविश्व
अण्णांनी कानोसा घेऊन बघितलं, नुकतंच झुंजूमुंजू व्हायला लागलेलं. त्यांनी डोळे मिटूनच दोन्ही हातांची ओंजळ डोळ्यांसमोर धरली आणि "कराग्रे वसते..." म्हणू लागले. आज हवेत जरा गारठा जाणवत होता. अंथरुणात बसूनच त्यांनी "... पदस्पर्शम क्षमस्वहे!" म्हणून पावलं जमिनीवर ठेवली. निगुतीनं अंथरूण- पांघरुणाची घडी जागेवर ठेवली. सकाळची आन्हिकं आटपून ते गिरणेवर स्नानास निघाले. गंगाबाईंनी परीटघडीची धोतरजोडी आणि त्यांचा पांढरा सदरा रात्रीच काढून ठेवलेला. सवयीप्रमाणे त्यांनी नेहमीच्या जागेवरून कपडे घेतले आणि ते नदीवर निघाले. नामजप करता करता सूर्याला अर्ध्य देत अण्णांनी कडाक्याच्या थंडीत स्नान उरकत घेतलं. सूर्याच्या पहिल्या किरणाला अण्णा काकड आरतीसाठी रामाच्या देवळात हजर होते. गेल्या चाळीस वर्षांचा हा नेम चुकला नाही. गंगाबाई त्यांच्या आधी उठून- आन्हिकं आटोपून अण्णांच्या आधी देवळाच्या दारात धारोष्ण दुधाचा गडवा घेऊन अण्णांसाठी उभ्या राहत. अण्णांना गडवा दिला की त्या देवदर्शनही न घेताच घरचा धबडगा आवरण्यासाठी निघून जात. अण्णा मग शांतपणे मन लावून देवपूजा, काकड आरती करून मग ध्यान लावून बसत. एव्हाना गावातही जाग आली असे. एक एक करत सगळेजण देवाचं दर्शन घेऊन- कोणी आत येऊन साष्टांग दंडवत घालून तर कोणी जाता-जाता चप्पल बाजूला काढून रस्त्यावरूनच भावपूर्ण नमस्कार करून आणि दुसरा नमस्कार देवळासमोरच्या पारावर ध्यान लावून बसलेल्या अण्णांना करून, मगच दिवस सुरु करत.

घरी गंगाबाई पुढचं-मागचं अंगण झाडून, सडा घालून दाराभोवती सुरेख रांगोळी रेखीत. गोठ्यातल्या गुरांशी गप्पा मारत त्यांना चारा घालून, दूध काढून ठेवीत. ते झालं की परसदारी बंब सुरु करीत, एकेकाच्या आंघोळीसाठी तो बंब दोन-तीन तास धुमसत राही. घरालाही जाग आली असे. मग मुलं, सासू-सासरे, दीर-जाऊ, त्यांची मुलं असा सगळा गोतावळा गंगाबाईंच्या नावानी धोशा लावत. "आई, मला उठवलं का नाहीस, माझा गृहपाठ राहिला होता न थोडा..." "वहिनी, आज डाळ-मेथी, खर्डा आणि ज्वारीच्या भाकऱ्या करू जेवायला, चालेल नं? दोन जुड्या पुरतील नं? अगं बाई,तुमचे पोहे करूनही झाले, मला मेलीला जागच येत नाही हो सकाळी.." "सूनबाई, उद्या एकादशी आहे, लक्षात आहे नं? घरात फराळाचं सामान आहे का, जर बघा बरं..." गंगाबाई हसतमुखाने सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देत, प्रत्येकाच्या हातात नाश्ता-चहा देत, तोवर अण्णाही घरी आले असायचे. मग त्यांचं खाणं होईस्तोवर त्या ओसरीवरच थांबत. खाता-खाता अण्णा दिवसाचा कार्यक्रम सांगत. तेवढाच काय तो पती-पत्नीचा दिवसभराचा संवाद!

पंचक्रोशीत प.पू. अण्णा कुलकर्णी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. दिवसा शाळेत मुलांना संस्कृत शिकवणे आणि शाळा सुटली अन चार घास पोटात सरकवून कीर्तनासाठी जाणे, हाच अण्णांचा दिनक्रम होता. कधीकधीतर संध्याकाळी पायी निघालेले अण्णा मध्यरात्री शेजारच्या गावात पोहचत आणि ताटकळून राहिलेले गावकरी त्यांच्या पायावर लोळण घेत. कुठलाही शिणवटा न जाणवू देता अण्णा रात्र-रात्रभर उभे राहून कीर्तन करीत आणि सूर्योदयाच्या वेळेस गिरणेवर पोहचत.

अण्णा कीर्तन करू लागले की गावकरी अगदी मंत्रमुग्ध होत. अण्णा भावकर्यांना कधी यमुनेतीरीं फिरवून आणीत नाहीतर रामायणाची सफर घडवत. "रामायण झालं ते सीतेमुळे, आदिमायेमुळं. माया कोणाला चुकली आहे? जी दृश्य नाही आणि तुम्हाला नकळत बांधून ठेवते, ती माया... प्रभूवर श्रीराम सुद्धा मायेच्या चक्रात अडकले. श्रीकृष्णाने तर मायेनी सगळ्यांना जखडून ठेवलं आणि स्वतः मात्र अलिप्त राहिला... " अण्णा तासन्तास बोलत राहत आणि गावकरी त्यांच्या शब्दांच्या मायेत हरवून जात. कधीतरी त्यांच्या मनात येत असे, खरंच रामायण फक्त सीतेमुळेच झालं का? मग दशरथ, त्याच्या तीन राण्या, रावण ह्या सगळ्यांचा काय भाग होता? उर्मिलेच पुढे काय झालं, ती का नाही गेली लक्ष्मणाबरोबर, का तिला तीन-तीन सासवा, सासरे, अयोध्येची जबाबदारी जाणवून ती माघारीच थांबली? असो उगाच काहीतरी मनाचे खेळ.

इथे गंगाबाई दिवसभरचा पै- पाहुणा बघत, घरच्या शेतीची-गुराढोरांची काळजी घेत. मुलांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांची दुखणी-खुपणी, कुळाचार मन लावून करीत. वर्षानुवर्षं मेहुणबारे सोडून त्यांनी जग बघितलं नव्हतं. माहेरी अठरा विश्व दारिद्रय, त्यामुळे गंगीला चांगलं दूध-दुभत्याचं घर पाहून दिलं होतं. लग्नानंतर जणू काही माहेरचा संबंधच संपला. आणि बारा मुलांच्या रगाड्यात त्यांच्या आई-तात्यांनाही कधी लेकीची खुशाली विचारायची फुरसत मिळाली नाही. तर अण्णांच्या अशा विरक्त वागण्यामुळे गंगीला माहेरी पाठवलं तर मुलगा सगळं सोडून मठकरी बनेल ह्या भीतीनं, सासू-सासर्यांनीही गंगीला कधी नजरेआड होऊ दिलं नाही. वर्षं सरता सरता यथावकाश दोन मुलं पदरी पडली, आणि त्यांच्या मागे गंगीची गंगाबाई झाली. आधीच घरात रमणारी गंगा आता आणखीनच गुरफटली. एव्हाना तात्यांचं ध्यान लावून बसणं, काही आठवडे घराबाहेर असणं, नव-नविन गुरु करणं आणि त्यांच्याकडून दीक्षा घेणं सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं होतं.

अण्णांचं कीर्तन सुरु असे आणि इथे सगळं आवरून, झाकपाक करून दोघी जावा ओसरीवर येऊन बसत. दुरूनच घंटेचा, चिपळ्यांचा आवाज येई. संध्याकाळी घातलेल्या सड्यामुळं हवेत गारवा जाणवे. मग जावा-जावांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी रंगत. कधी नव्हे ते आज धाकटीनी विचारलं, "वहिनी, तुम्ही का नाही कधी जात कीर्तनाला, सकाळी तासन्तास ध्यान लावायला? तुम्हाला नाही का वाटत हो की, भाऊजी असे दिवस-दिवस बाहेर असतात आणि तुम्ही घरातच अडकून पडता?" गंगाबाईंची तंद्री लागली, त्यांच्या डोळ्यांसमोर इतक्या वर्षांचा संसार उभा राहिला. वर्षानुवर्षं ना अण्णांचा दिनक्रम बदलला ना गंगाबाईंचा. मेहुणबार्यात बाराव्या वर्षी लग्न होऊन आलेली गंगी जी घरच्या गोतावळ्यात हरवली ती आजतागायत. अण्णांची भक्ती, उपासना, त्यांचा कीर्तनातील हातखंडा ह्याचं कौतुक ऐकत आणि अभिमान बाळगत कोणत्या इच्छा राहिल्या आणि कोणत्या नाही ह्याचाही आताशी विसर पडला होता. धाकटीनी पुन्हा एकदा हलवून विचारलं, "सांगा नं, वहिनी..." गंगाबाई गूढपणे हसून म्हणाल्या, "अगं हो, सुरुवातीला मलाही इच्छा व्हायची हे काय करतायेत ते जाणून घ्यायची, ध्यान लावून बसण्याची. पण ते जमायलाही हवं नं... अनुभूती यावी लागते. त्यांचं ध्यान लावणं, कीर्तन करणं, त्यातून आनंद मिळवणं वेगळं... आतापर्यंत काही कमी नाही राहिली माझ्या संसारात. सोन्यासारखी दोन मुलं आहेत, भरलेलं घर आहे.काय कमी आहे मला... त्यांना देवाला आयुष्य वाहून घेता आलं, ते घर सांभाळायला मी होते म्हणूनच नं? आणि त्यांच्या उपासनेत कुठेतरी मलाही पुण्य मिळेलच की गं, काय?", असं म्हणत गंगाबाई स्वतःशीच हसत राहिल्या. आणि तिकडे अण्णा सांगत होते,"ऐका मंडळी, संसारात असूनही संसारातली अलिप्तता जाणवायला लागते. आपल्याकडे काय नाही ह्यापेक्षा काय आहे हे मनःचक्षू उघडून बघावं लागतं, तेव्हा कुठे परमात्म्याची ओळख होते. म्हणा, जय जय रामकृष्ण हरी..." अण्णांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती आणि गंगाबाई याची देही याची डोळा स्वर्गानुभीतीनी तृप्त मनाने निद्राधीन झाल्या होत्या.
बा स कुलकर्णी
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

 #कथाविश्व नवीन सुरवातबघ हा सिया , आता यात हिरवं नारळ थोडं आणि भाजलेल थोडं वाटून घालायचं..लग्नाला जेमतेम आठवडा झाला असेल...
29/09/2025

#कथाविश्व

नवीन सुरवात

बघ हा सिया , आता यात हिरवं नारळ थोडं आणि भाजलेल थोडं वाटून घालायचं..लग्नाला जेमतेम आठवडा झाला असेल , आणि आई ( सासू) मला कोकणातल जेवण बनवणं शिकवत होती..मी त्या किसलेल्या नारळा कडे तो कुठून हिरवा दिसतो हे निरखून पाहत, आई कडे एक कटाक्ष टाकत, आई हा हिरवा नाहीय...अस म्हणताच ती हसून म्हणाली हिरवा म्हणजे कच्चा.. अरेच्या, मग ओला म्हणायचा असेल असं म्हणून स्वतःची समजूत काढली..पण तेव्हा तर फक्त सुरवात होती..
मी पक्की महाराष्टीयन. त्यात अस्सल विदर्भीयन ..तिथे नारळ हा दूर - दूर पर्यंत नाही.असला तरी वर्षातून एकदा सगळे असले नसलेले , सत्यनारायणाचे, कोणत्या पूजेचे, ओटी चे जमा केलेले नारळ फोडायचा कार्यक्रम मोठया थाटामाटात साजरा व्हायचा. हतोडी किंवा खलबत्यानी फोडण्याची मज्जा ती आज कोयत्याने फोडन्याला नाही...असो , तर तेव्हा आजी म्हणायची मला,' अग स्त्रियांनि नारळ फोडायचे नसतात' .आता तिला कोण सांगणार , इथे रोज च हा उपक्रम इथली प्रत्येक स्त्री राबवते...
नारळ आणि भात इथला जीव की प्राण .सकाळी फक्त भात ..चपाती, पोळी, पराठा, थालीपिठ, भाकरी असले प्रकार इथे दुपारी तरी नाही ..त्यात मी राहिली नैवेद्याला दाखवतात तितका भात खाणारी..ते ही कधी कधी..आता माझी अग्निपरिक्षा रोजची च सुरू..
एकदा आई नि कच्या केळांची भाजी केली होती..मी पूर्ण उभ्या आयुष्यात केळ फक्त पिकलेल खाल्लं होत ..ती भाजी खाल्ली ही असती, पण त्यात तेलाचा नामोनिशाण ही नव्हता.एव्हाना मी तिखट खानं जवळ पास विसरले होते..आता ती भाजी आवडीने खाते तो भाग वेगळा...तर, तितक्यात, अहो आलेत..म्हणाले , आज काय स्पेशल..?मी म्हणाले ,'केळाची भाजी..झालं.सगळे माझ्या कडे 'आ' वासून पाहू लागले आणि हसणं सुरू..मला कळेचना काय झालंय..नवीन कोणता शब्दकोशातला शब्द मी उधार घेतला की काय..तर अहो म्हणतात कसे,'अग ,केळ नाही केळं.. मी अख्या माझ्या विदर्भ वासीयांच्या वतीने जीव तोडून मीच कशी बरोबर आहे ते मांडू लागले ..पण ते चार. मी राहिली एकटी..त्या क्षणी वाटलं विदर्भातल्या प्रत्येक फळवाल्या भय्या ला, जो म्हणतो," केळ घ्या केळ 20 रु डझन केळ "त्याला ओरडून सांगावं की, 'ओ दादा ते केळ नाही हो केळं आहे...असे कित्येक शब्द माझे त्यांना आणि त्यांचे मला पचनी पडत नव्हते..अजून ही आहेत..
असच सकाळी भाजी करायला म्हणून मी चवळी ची शेंग काढली आणि आई ला म्हणाले , 'आज चवळी च्या शेंगाची भाजी करूया'?तर ती म्हणते , 'कुठेय?..मी अदृश्य अशी ती हात समोर करून दाखवते , तर म्हणतात , अग ती वालाची शेंग.. मी अक्षरशः ती खालून वरून पाहू लागले..की हिला मी काल पर्यंत चवळी ची शेंग म्हणत होते आज ही वाल कशी झाली..असले ना ना विविध प्रश्न मला मिनिटां मिनिटां ना पडत होते..त्यात आमटी हा एक प्रकार..माहेरी आमटी म्हणजे तुरी च्या शेंगा ची , शेंगदान्याची होते ..इथे ती , तेल न घालता, फक्त नारळ, मीठ, गुळ, आंबट,मसाला घालून होते..मला ते नवीन जमायचं नाही..आता थोडी फार तरबेज झाली..
आम्ही जिथे भाड्याने राहायचो तिथे रस्त्यावरून पोंग्याचा आवाज आला..मी मनात म्हणतेय की ,'वा इथे भाजी वाले मस्त गाडी घेऊन फिरतात पोंगे वाजवतात'..लगबगीनं भांड घेतलं पैसे घेतले आणि फटका जवळ येते तिथे आहे , असला विचित्र वास माझ्या मस्तकात गेला ..ज्यांच्या कडे आम्ही भाड्याने रहायचो त्या म्हणाल्या,'तू कायको आयी.. तू मछली खाती नाही ना..झालं रे बाबा ..कोनत संकट दारा जवळ उभं होत अस म्हणून मी माघे न बघताच धूम ठोकली..त्या नंतर पोदेर वाला म्हणजे पाव विकणारा तो पहाटे आणि मासळी वाला कधी येतो ते लक्षात ठेवू लागले..इथे भाजी वाले ,दही वाले, अश्यातले कोणी चिटपाखरूही दिसत नाही..
लग्नाला एव्हाना पाच सहा महिने झाले असतील तो पर्यंत माझ्या छोट्या मोठ्या चूका तो सहन करी..त्याच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध राहून तो कसा शांत होता ते देव च जाणे.असच आई असताना नावरोबा माझ्या वर चिडले. माझं रडणं सुरू , तर आई त्याला म्हणाली,' कशाला उगाच तिला तापवतो रे .. 'पिक्चर मध्ये जस तीनदा तीनदा पाहतात तस मी आई आणि त्याच्या कडे पाहू लागली.., देवा, "दूध तापवतात, पाणी तापवतात, बाकी गोष्टी ज्या गरम होतात त्या तापवतात..पन हे तापवन कोणत्या तापात बसतं कळत नाहीय रे'..
त्यात आजू बाजूचे कोकणी मध्ये बोलणारे , माका नाका साकी नाका वाले ते तर पूर्ण च डोक्यावरून जायचं..काय बोलाव कसं बोलावं कलेचं ना..आता कळत पण बोलता येत नाही..
भाषेची गंमत च न्यारी , पन प्रत्येक ठिकाणी तिचा मान वेगळा..लग्ना नंतर एका मुलीला आपले आई बाबा नातेवाईक सगळे सोडून यावं लागत..तसच येणारी आपली भाषा ही खूप दा वेगळी ठेवावी लागते..दोन्ही कुटूंबाना समजून घेणं असतंच पण जास्त स मुली आपलं सर्वस्व तिथे ठेवून नवीन सुरवात करते ..हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही..
सिया बापट..
फोटो सौजन्य - pinterest (स्पृहा जोशी)
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

तुमचं काय मत हे मंडळी यावर..😊🙏
29/09/2025

तुमचं काय मत हे मंडळी यावर..😊🙏

29/09/2025

कोण गेले?--+
#कथाविश्व
“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.
विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती. कारण होतं दोघांच्या आजारपणाचं. त्याचीही तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. कमी झालेलं वजन, खोल गेलेले डोळे, दडपणाखाली असल्यासारखा, तरीही सुजातासमोर आनंदी असल्यासारखा वावरायचा. मात्र.. तो आतून खुप खचला होता. दिवस-रात्र एकच चिंता त्याला खात होती – आपल्यामागे सुजाताचं कसं होणार?

“अहो घेताय ना चहा? सकाळपासून दोनदा केला, पण अजून एकदाही घेतला नाहीत.” सुजाताने पेपरचं पान उलटलं.
एव्हाना विनायक बाथरूम मधून बेडरूममध्ये गेला होता.
आता मात्र हद्द झाली ह्यांची असं म्हणत सुजाता पेपर तसाच टेबलवर ठेवून उठली. बेडरूमपाशी येऊन दारावर टकटक करू लागली.
“अरे का मला बापडीला त्रास देतोयस तू? नाही सोसत रे मला आता दगदग. ऐक ना.”
इतरवेळी ‘अहो-जाहो’ करणार्‍या सुजाताचा स्वर क्वचित प्रसंगी ‘अरे-तुरे’ वर यायचा. विनायकलाही ते आवडायचं. त्यामुळे प्रेम, हक्क वाढल्यासारखा वाटतो असं त्याचं म्हणणं. बाकी प्रेमाशिवाय त्यांच्या संसारात दुसरं कुणीच नव्हतं. ना मुल, ना बाळ. त्यामुळे दोघंच एकमेकांचं सर्वस्व होती. दोघही अगदी रसिक. संगीत, नाटक, सिनेमासाठी हटकून वेळ काढायची. विविध विषयांवर चर्चा पण रंगतदार असायची.
मागील काही महिने मात्र घर उदासतेने भरलेलं. पूर्वीचा रसरशीतपणा आता पार सुकलेला. पूर्वीची रसिकता पार नायनापाट झालेली.

“हो. कपडे करायला वेळ तरी दे. दार उघडच आहे.”
सुजाता आत आली. विनायक आवरत होता.
“किती वेळ रे.”
“तू घेतलास का?”
“तुझ्याशिवाय? एकटीने? कधी घेतलाय का?”
“हं. आता सवय क…” उर्वरीत वाक्य त्याने गिळून टाकलं.
“काय?” कपाळावर आठ्या आणत सुजाताने विचारलं.
“काही नाही. चल मी आलो.” केसांवर कंगवा फिरवत विनायकने प्रश्न टाळला.

सुजाता बाहेर येऊन आरामखुर्चीवर बसली. तिला अस्वस्थ वाटू लागलं, कदाचित विनायकच्या बोलण्याने असावं.
ती तशीच डोकं मागे टेकवून निपचित पडून राहिली. समोर त्यांच्या लग्नानंतर काढेलेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची फ्रेम होती. तिच्या चेहर्‍यावर एकदम स्मित आलं, डोळे मिटून ती मागील पाने चाळायला लागली.
---------------------

‘फर्ग्युसन कॉलेज बाहेरील ते चहाचं दुकान. तिथे नेहमी येणारा विनायक आणि समोरच आमचा वाडा. काय दिवस होते ना सुंदर! पंचवीस-तीस वर्षं होत आली पण आजही आठवणी एकदम टवटवीत आहेत!
कितींदातरी विनायक तिथेच दिसायचा. तेव्हापासून हे चहाचं वेड.’
सुजाताच्या चेहर्‍यावर हास्याची रेघ उमटली.
‘पुढे डिग्री घेतल्या घेतल्या घरच्या संमतिशिवाय लग्न. काय ना आई बाबा पण, आधी खपवून घेणार नाही म्हणून सांगितलं आणि लग्नानंतर काही वर्षातच दादा इतका जवळचा वाटू लागला त्यांना विनायक. पण माझं लग्नात नटणं, सजणं राहीलच ना.’
सुजाताला आजही त्या गोष्टीची हुरहुर होतीच.
‘पुढे पुणे सोडून नोकरीसाठी मुंबईला काय आलो आणि इथलेच झालो.
नवा मित्रपरिवार मिळाला. वेळोवेळी त्यांनी खुप सपोर्ट केलं. गरज पण होतीच म्हणा कुणाच्या ना कुणाच्या सपोर्ट्ची, संकटं म्हणून तरी काय कमी आली का. बिचार्‍या विनायकने खुप खुप सोसलं. माझ्या अचानकपणे आलेलं वांझत्वाचा पण किती मोठ्या मनाने स्वीकार केला त्याने. त्याची तर किती स्वप्न होती, पण माझ्या नशीबामुळे….
त्यात मागील दोन-तीन वर्षांत डॉ. पंडितांकडे वाढलेल्या चक्करा… ते कमी होतं म्हणून की काय, त्यात ह्या दम्याच्या त्रासची भर.
किती म्हणून मनस्ताप होतोय विनायकला. आणि त्यात गेल्या वर्षी…’
सुजाता एकदम सुन्न झाली.
‘एकवेळ जे मी सोसतेय ते आनंदाने आयुष्यभर सोसलं असतं. पण…’
आणि सुजाताला त्या काळ्यादिवशीचे डॉ. जयकरांचे शब्द आठवले.
‘बातमी तितकीशी चांगली नाही. माझा संशय खरा ठरला. रिपोर्ट्स पण तेच सांगतायत. तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. डगमगून जाऊ नका. जेवढ शक्य आहे, करुच आपण. पण… पण दुर्दैवाने सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.’

‘विनायकने कोणाचं वाईट चिंतलही नाही, करणं तर दूर राहीलं आणि त्याला ब्लड कॅन्सर. माझ्या विनायकला… तो पण लास्ट स्टेजला. फक्त काही महिने…’
तिने डोळे उघडले, त्यातील शक्ती नाहीशी झाल्यासारखी. नजर पूर्ण हरवली होती.
‘आयुष्यभर सुख दुःख एकत्रीत भोगली, मग हा त्रास एकट्या विनायकलाच का? का… का मृत्यु आपल्याला आपल्या माणसांपासून दूर करतो? तो सुद्धा एकत्र भोगता आला असता तर…’
तिचे डोळे पाणावले. पापण्यांची उघडझाप करत ते बाहेर येणार नाहित ह्याची काळजी घेत ती पुन्हा बेडरूममध्ये आली.
विनायक पलंगावर शांतपणे पडला होता.
“अहो चहा घेताय ना?” तिने खालच्या आवाजात विचारलं, जेणेकरून तो झोपलाच असेल तर त्याची झोपमोड होणार नाही.
तिची चाहूल लागल्याने त्याने वळून पाहिले आणि कुशी पलटत विचारले “काय म्हणालीस?”
“चहा घेतोस?”
“हो चालेल, चहाला काय आपण कधीही तयार.” म्हणत तो उठून बसला.
सकाळपासून दोनदा केला, एकदाही घेतला नाही, किती मिनत्या केल्या, आणि आता म्हणे कधीही तयार. विनायकसुद्धा ना…
ती बेडरूमबाहेर पडू लागली.
‘ह्याने अजुन गोळ्याही घेतल्या नसणार’ ती पुन्हा मागे वळली आणि बघते तर…
विनायक पलंगावर नव्हता. पलंग पूर्ण रिकामा. बेडरूममध्ये कुणीही नव्हतं.
ती गडबडली, गोंधळली.
‘मला परत भास झाला की काय?’ पुटपुटत बाहेर आली.

‘तुम्ही खुप विचार करता. एखाद्या गोष्टीवर तेवढा विचार करायची गरज नसते, तरीही. जे समोर चालू आहे ते तुमचे डोळे पहात असतात, मात्र त्याचवेळी मेंदू बॅकग्राउंडला इतर कोणत्यातरी विचारात व्यग्र असतो. डोळे जे चित्र मेंदूपर्यंत पोहोचवतात त्याच इंटरप्रिटेशन करणं, तसच चालू असलेले विचार ह्यांचा गुंता होतो आणि मनात जे विचार चालू आहेत ते आपले डोळेच बघतायत असा आभास निर्माण होतो.
मेडिकली याला आम्ही ‘टॅक्टिल हॅल्युसिनेशन’ (tactile hallucination) म्हणतो. कामाचा ताण, फ्रस्ट्रेशन, चिंता, अनुवंशिकता बरीच कारण असू शकतात. हल्लीच्या काळात सर्रास अशा केसेस मिळतात. काळजीचं कारण नाही.’ – डॉ. पंडीतांनी विनायक अणि सुजाताला समजावलं होतं दोन वर्षांमागे.

सुजाताला नियमित औषधं पण चालू होती तरीही अधेमधे भास व्हायचाच. त्यामुळे भास झाल्याचं जेव्हां तिला ते जाणवायचं तेव्हा ती लगेच सावरायची, नॉर्मल व्हायचा प्रयत्न करायची.

आज मात्र तिला जरा विलक्षण वाटलं.
‘म्हणजे विनायक अजुन आलाच नाही आंघोळीहून?’ ती संभ्रमित झाली.
‘जेव्हा असं काही होईल, तेव्हां काही विचार न करता शांत चित्ताने थोडावेळ बसून किंवा पडून रहा. आणि झाल्याप्रकारावर अजिबात विचार नको. इट्स डेंजरस.’
डॉ. पंडीतांचा सल्ला तिने लगेच अंमलात आणला.
आरामखुर्चीवर शांत पडून राहिली. डोक्यातील सगळे विचार बाहेर काढले. सगळी विचारचक्र थांबवली.
तिच्या नेटाच्या प्रयत्नांना थोड यश आलं. थोड्यावेळासाठी तिचा डोळा लागला.

“सुजाता, अगं चहा देतेस ना? झाली माझी आंघोळ.”
तिला खडबडून जाग आली.
विनायकचा आवाज हा भास नाही ह्याची खात्री करण्यासाठी तिने उलट प्रश्न केला “काय म्हणालास विनायक?”
ती खुर्चीला पाठ न टेकवता अधीरतेने विनायकच्या आवाजाची वाट पाहू लागली.
पण निरव शांततेशिवाय काहिच प्रतिसाद नाही.
जाऊन नक्की काय प्रकार आहे हे पहायची तिची हिंमत होत नव्हती.
काय होतय आज असं मला? बधिरता आलीय डोक्याला. आपल्याला नक्कीच विनायकच्या आवाजाचा भास झाला याची खात्री सुजाताला पटली.
तिने खुर्चीला पाठ टेकवली आणि स्वथ पडून राहिली.

काही क्षणांतच पुन्हा एकदा विनायकचा आवाज आला “अगं चहा दे.”
तिने खाडकन डोळे उघडले. गडबडीत उठून बेडरूममध्ये आली. विनायक देवासमोर हात जोडून उभा होता. देवासमोर पेटतं निरंजन होतं.
म्हणजे इतका वेळ त्याने उत्तर दिलं नाही त्या अर्थी तो जप करत असणार. आंघोळीनंतर जप करण्याची सवय होती त्याची.
सुजाताला आत्मविश्वास आला. म्हणजे हा भास नव्हता तर!

“आज काही खरं नाही माझं.” असहायपणे सुजाता म्हणाली.
“का? काय झालं?”
“मला वाटलं आज मला पुन्हा भास झाला की काय?”
“पुन्हा म्हणजे?” अंगात शर्ट चढवत विनायकने विचारलं.
“मघाशी हो, तुम्ही पडला होतात आणि मी तुम्हाला चहा विचारायला आले होते, तुम्हाला औषध घ्यायची आठवण करायला परतून पहाते तर तुम्ही…”
“तू गोळी घे बघु आधी. चहा नंतर दे.”
“मी घेते हो, मघाशी जी आठवण करायला आले होते ते आधी करा. तुम्ही आधी घ्या गोळ्या ते जास्त महत्वाच आहे. आणि उद्या जायचंय जयकरांकडे आहे ना लक्षात?”
“हो ग बाई. एक काम करू, जयकरांची अपॉईंटमेंट मी बदलून परवाची घेतो. तुझ्या दम्याच बघ मला टेन्शन आलंय. वाढलाय हल्ली. उद्या आधी ते निस्तरू. काय ना, आजारांची नुसती व्हराईटी आहे.”
विनायकने तेव्हड्यात एक विनोद करून सुजाताला हसवण्याचा प्रयत्न केला.

सुजाता चहा करायला किचनमध्ये आली. काही विचारात असल्यासारखी होती.
“नको, आपण उद्याच जायच जयकरांकडे, दमा बरा आहे तसा. मी निभावू शकते.”
विनायक यावर काहीच बोलला नाही.
“अहो ऐकताय ना? मी काय म्हणते?”
विनायकचा आवाज नाही. सुजाता बिथरली. तिच्या श्वासांचा वेग वाढला.
“विनायक अहो बोला काहीतरी…” पण कोणाचीच चाहूल नाही.
थबकत थबकत बेडरूममध्ये आली पण तिथं कुणीच नव्हतं.
ती पूर्ण ढासळली. देवासमोर हात जोडून उभी राहिली. लक्ष गेलं तर समोरचं निरंजनही शांत होतं. तिने बाथरूमही उघडून पाहिलं पण विनायक नव्हता.
हे जरा जास्तच होतय. पण माझी खात्री आहे हा माझा भास नव्हता. जे काही झालं ते खरं होतं.
पण जर खरं होतं तर आता असं का? आणि विनायक कुठे आहे? कुठं बाहेर गेलाय की काय? गेला असेल तर मला सांगून का नाही गेला? की सांगून गेलाय आणि मला आठवत नाही? नक्कीच तो भास नव्हता, की होता? की हाच माझा भास आहे? काहीच समजतं नाही. खुप थकवा वाटतोय, पडूया जरा.

सुजाता शांत डोळे मिटुन पडून राहिली. पण डोक्यातील विचार काही जाईनात.
‘विनायक बाहेर नाही जाणार असा. मागच्याच आठवड्यात त्याची तब्येत किती बिघडली होती.
अचानक ताप किती वाढला रात्री, आणि कसा तो त्याचा श्वास अडकला. कस त्याने सहन केला इतका त्रास देव जाणे. परमेश्वरा, त्याचे सगळे आजार, त्रास, वेदना मला दे रे.’
तिने तशातच देवाला हात जोडले.
‘रात्री जेवेपर्यंत ठीक होता. नीट जेवलाही होता त्यादिवशी. त्याची आवडती मेथीची भाजी केली होती. किती दिवसांनी काही खावसं वाटतं म्हणाला होता. त्याचा आवडता चहाही झाला जेवणानंतर.
झोपलाही शांत होता, पण अचानक काय झालं नी झोपेत श्वास घ्यायला त्रास पडू लागला. वेळीच मला जाग आली म्हणून बरं.
अंग तर चटका बसावा इतकं तापलं होतं.
त्यात त्याचा ‘सुजाता, सुजाता’ आक्रोश. काय करावं सुचेना. हात पाय गळून गेले विनायकची अवस्था बघून. अंगातील ताकतच नाहीशी झाली, घामाने डबडबले मी. श्व्वास पण लागत होता.
तरी नशीब डॉक्टरांना लगेच फोन लागला. माझी तर बोबडीच वळली होती. काय बोलावं सुचेना. एकदम भिरभिरायला लागलं मला, डोळ्यासमोर अंधारी आली.
डॉक्टर काय ते समजले, लगेच येतो म्हणाले. पण मग पुढे……. काय झालं पुढे……’

----------------

दिवेलागणीची वेळ झालेली. लॅच उघडून विनायक घरात आला. खुप दमलेला, डोळे अधिकच खोल गेलेले, त्या खालील काळी वर्तूळं जास्तच गडद झाली होती.
लाईट्स, पंखा लावून तो आरामखुर्चीवर टेकला. समोर टेबल वर उघडलेला पेपर पाहून तो अवाक झाला.
‘सकाळी निघे पर्यंत तर पेपर आला नव्हता, आणि तो इथे.’ तसाच त्याने तो हातात घेतला.
त्याच पानावर एका सदराखाली सुजाताचा फोटो होता.
सदराचं नांव होतं “सहवेदना”!

तेव्हड्यात फोन वाजला. विनायक खुर्चीवरून सावकाश उठला आणि फोन घेतला.

– “हॅलो”
– “हां, बोला डॉक्टर”
– “हो आताच आलो. सकाळी लवकर निघालो होतो.” बोलताना विनायकला धाप लागली.
– “हो, तब्येत ठीक आहे.”
– “तेव्हडंच तर करु शकत होतो मी सुजातासाठी आता. पुर्वी फार इच्छा होती तिची पंचवटीला जायची, पण… राहून गेलं. निदान तिच्या अस्थितरी…” विनायकला गहिवरून आलं.
– “हो. घेतो काळजी.”
– “त्या रात्री तुम्ही वेळेत आला नसता तर… माझी अवस्था पासून सुजाताला दम्याचा अटॅक आला, तशातच तिने तुम्हाला फोन…”
– “मला मागे सोडून स्वतः पूढे निघून गेली.”
– “सावरतोय. पण असं वाटतं की ती आहे… इथेच…” विनायकने घरात एक नजर फिरवली.
– “हो. घेतो काळजी.”
– “येतो. ठीक आहे. ठेवतो.”

फोन ठेवून विनायक आरामखुर्चीत बसला.
त्याचे डोळे भरून आले.
‘सुजाता असती तर…. तर नक्की विचारलं असतं – अहो चहा घेताय ना?’
बा स कुलकर्णी
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Address

Pavan Nagar, CIDCO
Nashik
422008

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919422769350

Alerts

Be the first to know and let us send you an email when कथाविश्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कथाविश्व:

Share

Perfect Computers

Join “Perfect” Be “Perfect”

Master in Computer Education since 21 years.

Specialty in MS-CIT & Tally. Even if have done Tally anywhere; to get the Job come to us for at least 1 Month; and don’t tell us the result; but please tell others who need Quality Education to get the Job.

Also you can Come to us for your Online Services need like Pan Card,Passport,Registered Rent Agreement,Marriage Certificate,Food Licence,Railway/Air Ticket Booking,2 Wheeler & 4 Wheeler Insurance,PF Work. Get in touch to avail the Services.