District Information Office

District Information Office News and Public Awareness

28/08/2026

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

परभणी, दि. २८ (जिमाका) : आगामी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व उमेदवारांनी जातविषयक आवश्यक पुरावे व कागदपत्रांची पूर्तता ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थी व उमेदवारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही किंवा त्यांच्या प्रकरणामध्ये जातविषयक आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर करणे बाकी आहे, त्यांनी वरील दोन दिवशी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी. तसेच मानीव दिनांकापूर्वीचे आवश्यक जातविषयक पुरावे व कागदपत्रे सादर करावीत.

निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास संबंधित प्रकरणांची पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी त्याचा लाभ होईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*-*-*-*-*

28/08/2026

कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

परभणी जिल्ह्यात विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

परभणी, दि. २८ (जिमाका) : राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ अंतर्गत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

याच धर्तीवर परभणी जिल्ह्यात ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय योजनेत स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये डेअरी प्रोसेसर, शेळीपालन, रेशीम उद्योग, शिलाई मशीन प्रशिक्षण, चर्मकार प्रशिक्षण, जिनिंग मशीन फिटर, हापसा/हातपंप दुरुस्ती (प्लंबर), शेळी व मेंढीपालन, नीडल क्राफ्ट ऑफ बंजारा/बंजारी, सोलार क्षेत्र आदी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना किमान ५० टक्के लाभार्थी महिला असणे आवश्यक असून, एकल महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

दरम्यान, स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत तसेच संलग्नता व मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रे व प्रशिक्षण प्रदाते यांनी परभणी जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याबाबतचे प्रस्ताव ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे सादर करावेत.

जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित प्रशिक्षण केंद्रे व प्रशिक्षण प्रदात्यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, परभणी यांनी केले आहे.
*-*-*-*-*

28/08/2026

परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची शेतकऱ्यांना संधी
परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची ४ सप्टेंबरला सोडतीद्वारे निवड

परभणी, दि. २८ (जिमाका) : कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून सन २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे’ ही राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

या अभ्यास दौऱ्यामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण तसेच विविध कृषीविषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे.
परभणी जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत एकूण ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांकडून १३ ऑगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यात प्राप्त अर्जांची संख्या निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. ही सोडत ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून जिल्हास्तरीय समिती तसेच संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
*-*-*-*-*-

देऊळगाव गात येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पणआधुनिक शिक्षण सुविधांनी सुस...
27/08/2026

देऊळगाव गात येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

आधुनिक शिक्षण सुविधांनी सुसज्ज शाळा विद्यार्थ्यांच्या सेवेत

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर

परभणी दि.२७ (जिमाका) : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, देऊळगाव गात (ता. सेलू) येथे सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकळे, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रीती डख, अजय डासाळकर, पंचायत समिती सदस्य शिवराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माऊली कदम आदी उपस्थित होते.

सन १९४३ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध शालेय स्पर्धा, परीक्षा तसेच ज्ञान-विज्ञानविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत.

यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, देऊळगाव गात येथे खासगी शाळांनाही लाजवेल अशी सुसज्ज शाळेची इमारत उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या परिसरातच मिळावे, यासाठी अशा शाळा विकसित होणे आवश्यक आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या शाळेचा लाभ घ्यावा. शाळा सुसज्ज झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची जबाबदारीही वाढली आहे.

केवळ नोकरी मिळविण्यासाठी नव्हे, तर उद्यमशीलता निर्माण करणारे शिक्षण आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याला विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असून, त्या संधींचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

समाजातील सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याच तोडीच्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. या शाळेतील प्रयोगशाळा, टिंक लॅब आणि डिजिटल सुविधांचा विद्यार्थ्यांनी प्रभावी वापर करून प्रयोगशील व नवोन्मेषी विचार विकसित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

तालुक्यातील रोजगाराच्या संधींबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सेलू येथील आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातून सुमारे ६०० युवकांना रोजगारनिर्मितीची संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत पालकमंत्री म्हणाल्या की, येथील मुला-मुलींना जगातील सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. पालक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना रक्षाबंधनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबरच शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती, मिश्रशेती आणि विविध पिकांच्या लागवडीकडे वळावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच ‘लाडक्या बहिणी लखपती दीदी व्हाव्यात’ या उद्देशाने विविध उपक्रम राबवावेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. रेशीमशेतीसारख्या व्यवसायातून उत्पन्नवाढीच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ‘अहिल्या बचत गट भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोनकांबळे यांनी शाळेची वाटचाल आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभल्याचे त्यांनी सांगितले. संचमान्यतेनुसार मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक आणि एक शिपाई अशी एकूण चार पदे रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेसाठी संरक्षण भिंत, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच परिसरातील रस्त्याचे काम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. तालुक्यात पीएमश्रीच्या दोन शाळा असून, एनएमएमएस परीक्षेत १२ विद्यार्थी पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. देऊळगाव गातची शाळा डिजिटल असून, प्रयोगशील विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी लवकरच सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या माध्यमातून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता तांबे यांनी केले. यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*-*-*-*-*

27/08/2026

कापूस उत्पादकता अभियान ‘कापूस क्रांती’ अंतर्गत
बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि. 27 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान ‘कापूस क्रांती’ अंतर्गत कृषी विभागामार्फत बायोचार युनिट व कॉटन श्रेडर या बाबींसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले आहे.

बायोचार युनिटसाठी वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र आहेत. या घटकासाठी प्रति युनिट 10 हजार रुपये किंवा खर्चाच्या 50 टक्के, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देय आहे. लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

कॉटन श्रेडरसाठीही वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र आहेत. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 50 टक्के, कमाल 75 हजार रुपये प्रति युनिट, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 टक्के, कमाल 60 हजार रुपये प्रति युनिट अनुदान देय आहे. या घटकासाठीही लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी उत्स्फूर्तपणे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*

27/08/2026

सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाकरीता मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी

परभणी 27 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 21 ते 30 सप्टेंबर, 2026 या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी : [email protected] व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र.9156073306 वर कार्यालयीन वेळेत अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीनी केंद्रामध्ये 20 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे 10 सप्टेंबर, 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे, मुलाखातीस येते वेळी त्यांनी डिर्पाटमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसब्लू) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एस.एस.बी. 66 कोर्स साठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झमिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झमिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शनबोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी मुखाखतीसाठी कॉल लेटर असावे. व टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत आणावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*-*-*-*-*

21/08/2026

मालकी हक्क न सांगितलेल्या 28 दुचाकी वाहनांबाबत नागरिकांना आवाहन

परभणी, दि. 21 (जिमाका) : परभणी शहर वाहतूक शाखेने विविध कारवायांदरम्यान मागील काही दिवसांपासून 28 दुचाकी वाहने ताब्यात घेतली असून, या वाहनांच्या मालकांचा शोध घेतला आहे. मात्र अद्याप एकाही वाहनमालकाने या वाहनांवर मालकी हक्क सांगितलेला नाही. त्यामुळे संबंधितांनी या दुचाकीवर हक्क सांगून ताब्यात घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. ताब्यात घेतलेली 28 दुचाकी वाहने कोणाची मालकीची असल्यास संबंधितांनी वाहनांच्या मालकी हक्काची संपूर्ण कागदपत्रे व आवश्यक पुरावे घेऊन दि. 12 सप्टेंबर 2026 पर्यंत शहर वाहतूक शाखा, परभणी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून संपर्क साधावा.

तसेच अनुसूचीतील कोणतेही वाहन इतर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्यास संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह शहर वाहतूक शाखा, परभणी येथे संपर्क साधून वाहन ताब्यात घेण्याबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी.

दि. 12 सप्टेंबर 2026 पर्यंत सदर वाहनांच्या मालकीबाबत कोणताही दावा अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, या वाहनांच्या निर्गतीबाबत शहर वाहतूक शाखेकडून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन संबंधित वाहनांबाबत काही माहिती किंवा मालकी हक्क असल्यास विहित मुदतीत शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*

पाणी व माती संवर्धनासाठी चालले परभणीकर‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन’ उत्साहा...
21/08/2026

पाणी व माती संवर्धनासाठी चालले परभणीकर
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन’ उत्साहात

परभणी, दि.21 (जिमाका): माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत परभणी येथे ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज राज्यभरात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. यावेळी, महापौर सय्यद इकबाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माती आणि पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.

जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि मातीची धूप रोखणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि मातीच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी केले.

जलसंधारण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘आपला सहभाग, आपली बांधिलकी – जलसंवर्धनाची हीच खरी शक्ती’ हा संदेश प्रत्यक्षात आणावा. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध आणि हिरवागार महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी केले.

‘पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पावसाचा प्रत्येक थेंब अडवूया, हिरवागार महाराष्ट्र घडवूया’, ‘थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’, ‘जल है तो कल है’ अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलसंधारण विभागाच्या वतीने ‘रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाकडून करण्यात आले.
*-*-*-*-

20/08/2026

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य; नो-मॅपिंग व अनामली प्रकरणांवर सुनावणी

परभणी, दि. २० (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १५ लक्ष ४१ हजार ७ मतदार आहेत. त्यापैकी एकूण १ लक्ष ८० हजार २४७ मतदारांचे नोंदी सापडत नाहीत. तसेच ६,३९० मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आल्या आहेत. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

नोंदी नसलेल्या १,८०,२४७ मतदारांच्या याद्या जिल्हा प्रशासनाकडून पारदर्शकतेच्या दृष्टीने सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. सदर याद्या परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या मतदार यादी भागातील राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांना सदर याद्यांची प्रत देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना प्रत्येकी एक प्रत उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व माननीय आमदार व माननीय खासदार यांनाही सदर याद्या ई-मेलद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सदर अनकलेक्टेबल मतदारांच्या यादीबाबत काही आक्षेप अथवा हरकत असल्यास ती दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. निर्धारित प्रक्रिया पूर्ण करून पात्रता सिद्ध न झालेल्या व नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या अनकलेक्टेबल मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच माहितीच्या नोंदी सापडत नसलेल्या व मँपींग न झालेल्या मतदारांची सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार आहे. सुनावणीच्या वेळी संबंधित मतदारांना आपले म्हणणे मांडण्याची तसेच आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करण्याची संधी देण्यात येईल. उपलब्ध अभिलेख, कागदपत्रे व संबंधितांचे म्हणणे विचारात घेऊन नियमानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पात्र मतदारांचे हक्क अबाधित ठेवत मतदार यादीतील त्रुटी, विसंगती व अनियमित नोंदींचे नियमानुसार निराकरण करण्यास मदत होणार आहे.

मतदार यादीशी संबंधित कोणत्याही कामासाठी कोणत्याही व्यक्तीस लाच अथवा अनधिकृत रक्कम देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना केले आहे. मतदार यादीतील नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे, मॅपिंग करणे, या प्रक्रियेतील कार्यवाही करणे अथवा इतर कोणत्याही निवडणूकविषयक कामासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसून निश्चित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून सदरील सेवा निशुल्क पुरविण्यात येतात. त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य व्यक्तीकडून लाचेची किंवा अनधिकृत रकमेची मागणी झाल्यास नागरिकांनी अशा मागणीस बळी पडू नये व संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तत्काळ तक्रार करावी.

एसआयआर प्रक्रिया ही पारदर्शक व नियमानुसार राबविण्यात येत असून, पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि अपात्र, विसंगत अथवा नियमबाह्य नोंदींचे नियमानुसार निराकरण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व मतदारांनी सुनावणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले आहे.
*-*-*-*-*

20/08/2026

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे
– जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी, दि. २० (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीच्या माध्यमातून सहाय्यकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रिया करून एकूण 16.96 लाख इतक्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 13.48 लाख इतक्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, उर्वरित शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आधार प्रमाणीकरण प्रक्रियेमध्ये बँकर्स/बँकिंग यंत्रणांना नोंद न झालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे यादीतील विशिष्ट क्रमांकासह भेट द्यावी. सोबत आधार कार्ड व पासबुक घेऊन जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर आपल्या कर्जाबाबतची विस्तृत माहिती दिसेल. या माहितीनुसार मान्य/अमान्य पर्यायाची नोंद ऑनलाइन बोटाच्या ठशांची नोंद घेऊन करण्यात येईल. आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाच्या ठशाची नोंद होत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करावा.

किमान तीन वेळा प्रयत्न करूनही आधार प्रमाणीकरण होत नसल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडून आपले सरकार केंद्र चालकास कळवावे. या पर्यायाचा वापर केल्यानंतर आपले सरकार केंद्र चालकाने स्वतःच्या बायोमेट्रिकद्वारे आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तक्रार तालुकास्तरीय समितीच्या पोर्टलवर पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयात स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी कागदपत्रे सोबत ठेवावीत. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता निश्चित करेल. पात्र शेतकऱ्यांची तक्रार मान्य केल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकरी/बँकर्स यांची नोंद होऊन न झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची ऑनलाइन पद्धतीने निकषानुसार रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी/बँकर्स यांची नोंद होऊन न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाबाबत वर नमूद प्रक्रियेनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*

Address

1st Floor, Administrative Building
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to District Information Office:

Shortcuts

Share