19/08/2026
*माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील व्यासंगी नेतृत्व : मा. प्रवीण टाके साहेब*
प्रशासन, पत्रकारिता, साहित्य आणि समाजसंवाद या चारही क्षेत्रांचा सुंदर संगम ज्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो, त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे मा. श्री. प्रवीण टाके साहेब.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण विभागात नव्या आशा, नवी ऊर्जा आणि नव्या अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यासू वृत्ती, संयमी स्वभाव, प्रभावी संवादकौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टीकोन यांमुळे टाके साहेब हे केवळ अधिकारी न राहता एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना आपल्या कार्यक्षमतेची ठळक छाप उमटवली. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्र असो किंवा मुंबई मंत्रालयातील लोकराज्य नियतकालिकाचे कार्यकारी संपादकपद असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जबाबदारी केवळ निभावली नाही तर त्या पदाला वेगळी उंची दिली. चंद्रपूर, नागपूर, नांदेड आणि कोल्हापूर येथे उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही आदराने स्मरण केले जाते.
टाके साहेबांची विशेष जमेची बाजू म्हणजे त्यांना पत्रकारितेची असलेली सखोल जाण. शासन आणि माध्यमे यांच्यातील सुसंवाद किती महत्त्वाचा असतो, याची त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून आलेली जाण आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीत संवेदनशीलता, पारदर्शकता आणि समन्वय या गुणांना विशेष स्थान दिसून येते. उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला “यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” हा त्यांच्या कर्तृत्वाचा मानाचा तुरा आहे.
शासकीय सेवेत येण्यापूर्वी जवळपास चौदा वर्षे त्यांनी विविध नामांकित वर्तमानपत्रांमध्ये काम केले. नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना आणि लोकमत या वृत्तपत्रांतील अनुभवामुळे त्यांची लेखणी अधिक धारदार झाली आणि समाजजीवनाचे निरीक्षण अधिक व्यापक झाले. पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण आणि स्व. वसंतराव ओगले पुरस्कार यामुळे त्यांच्या बौद्धिक व साहित्यिक क्षमतेला अधिक अधोरेखित केले.
मात्र टाके साहेबांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रशासन आणि पत्रकारितेपुरते मर्यादित नाही. ते एक संवेदनशील लेखक, कवी आणि वऱ्हाडी भाषेतील लोकप्रिय स्तंभकार आहेत. त्यांच्या “फकीर” या चरित्रकादंबरीतून मानवी जीवनातील संघर्ष, मूल्ये आणि संवेदना प्रभावीपणे व्यक्त होतात. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी केलेले लेखन हे विचारांना चालना देणारे आणि माणुसकीची जाणीव करून देणारे आहे.
आज माहितीचा वेग वाढला असला तरी विश्वासार्ह संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा काळात टाके साहेबांसारखे अभ्यासू आणि साहित्यिक अभिरुची असलेले अधिकारी विभागाला लाभणे ही मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार अधिक परिणामकारक होईल, पत्रकारांशी संवाद अधिक आत्मीयतेने घडेल आणि प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास वाटतो.
मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीत त्यांचे आगमन हे केवळ प्रशासकीय बदली नसून एका सकारात्मक विचारांच्या आणि संस्कारक्षम नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने त्यांची ही नवी जबाबदारी यशस्वी ठरो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण विभागाला दीर्घकाळ मिळत राहो, हीच मनापासून प्रार्थना.
🌹मा. प्रवीण टाके साहेबांना नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹
— गोपाल बालकिशन सोनी, बीड