
12/09/2025
एकता- सप्टेंबर -2025
किंमत 50 रु. (कुरीयर दर 40)
वार्षिक वर्गणी -500 (+ 250 पोस्टल दर)
त्रैवार्षिक वर्गणी-1300 (+250 पोस्टल दर)
संपर्क -8956977357
संपादकीय आहे – ‘सार्वभौम भारताचा वास्तववादी राजनय !’
जागतिक परिस्थिती जशी बदलली तशी भारताची भूमिका सुद्धा बदलणे स्वाभाविक आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचा आणि भारताने चीनशी आर्थिक जवळीक साधण्याचा राजनय वास्तववादी आहे. एकीकडे ब्रिक्स संघटन आणि एकीकडे क्वाड संघटन हे सुद्धा वास्तव आहे. भारताने हे सर्व संतुलन उत्तमपणे पेलले आहे. याचे विवेचन यात केले आहे.
नुकतेच तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ‘डाव्यांना आळा’ या लेखात अभिजित जोग यांनी त्यांचे विश्लेषण केले आहे. जनसुरक्षा कायदा, एन.सी.ई.आर.टी च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील बदल आणि जे.एन.यु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरु झालेले अध्यासन, हे ते निर्णय आहेत, जे डाव्या वळवीला नियंत्रणात ठेवू शकतात.
पंकज जयस्वाल यांचा ‘भगवा दहशतवाद नव्हे, भ्रष्ट मानसिकता’ या लेखात मालेगाव खटला आणि त्याच्याशी संबंधीत असणाऱ्या बाबींचे विवेचन केले आहे. ‘हिंदू दहशतवाद’ असे संबोधत अनेकांनी समाजात हिंदू धर्माच्या विषयी मने कलुषित करण्याचे कारस्थान राबवले होते.
अॅड.कुणाल रानडे यांचा ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक – 2024 ’ हा लेख यातील कायदेशीर तरतुदींची माहिती आणि आवश्यकता स्पष्ट करणारा आहे.
सुप्रसाद पुराणिक आणि स्वप्नील नहार यांचा ‘पुणे परिसरातील गणेश उपासना’ हा लेख ऐतिहासिक संदर्भांसह उपयुक्त माहिती देणारा आहे. गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या संप्रदायास गाणपत्य संप्रदाय म्हणतात. त्याअनुषंगाने हा अभ्यासपूर्ण लेख आहे.
शौनक कुलकर्णी यांचा ‘मालभाडे समानीकरण धोरण’ हा लेख –Freight Equalization Policy – या विस्मृतीत गेलेल्या धोरणाविषयी आहे. या धोरणाने प्रादेशिक आर्थिक विषमतेची बीजे रोवली गेली होती. यातूनच पुढे सामाजिक आणि राजकीय अस्मितांची पायाभरणी झाली. यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे.
‘कृतार्थ जेष्ठत्व’ हा अत्यंत वाचनीय लेख आहे प्रकाश क्षीरसागर यांचा. वयोमानाप्रमाणे काही गोष्टींचा शांतपणे स्वीकार करणे आणि आपल्या अस्तित्त्वाने कुटुंबाला समाधान देणे हे या लेखातून घ्यावे. वय वाढल्यावर जीवनाप्रती, कुटुंबातील व्यक्तींच्या विषयी कटुता वाढू न देता, जे जे आयुष्यात मिळाले त्याविषयी समाधान बाळगले पाहिजे. मागितल्याशिवाय सल्ला न देणे, तरुण पिढीशी तुलना करून त्यांना टोमणे न मारणे अशी पथ्ये पाळून, कसे सुखाने जगावे हे या लेखात वाचायला मिळते.
अपर्णा परांजपे यांचा ‘सार्थकता’ हा लेख आपल्याला आध्यात्मिक मार्गाची अनुभूती देतो. जीवनाकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी विकसित करून भगवंत हृदयस्थ आहे याची खत्री बाळगायला शिकवतो.
‘ऑन लाईन यशाची मेजवानी’ – ही मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल यांची मुलाखत घेतली आहे अक्षय जोशी यांनी. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्य यांची जोड द्यावी लागते. मराठी पदार्थांना प्रथमच युट्युबवर घेऊन जागतिक स्तरावर एक चविष्ट ‘क्युझिन’ अशी ओळख मिळवून देणाऱ्या बाचल यांची ही मुलाखत अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
‘वंदनीय प्रमिला मावशी’ हा लेख सुनीला सोवनी यांचा आहे. त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिला मावशी यांच्या कार्याचा, स्वभावाचा परिचय करून देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सोनाली तेलंग यांचा ‘बदलते कुटुंब’ हे लेख समाजातील बदलांचा कुटुंबावर होणारा परिणाम स्पष्ट करतो. फक्त ‘मी’ च्या भोवती फिरणारी व्यक्तीकेंद्रितता, वाढते घटस्फोट ही कुटुंबाच्या विघटनाची नांदी आहे.
डॉ. सुमंगला बाकरे यांचा ‘श्रीसंत जनाबाई यांचा स्त्री जागर’ हा लेख त्याकाळातील ‘स्त्री-भान’ याची जाणीव करून देतो. भक्तीत रंगणाऱ्या जनाबाई त्याकाळातील स्त्रियांच्या जीवनावरही सामाजिकदृष्ट्या भाष्य करीत होत्या. याचे विवेचन या लेखात आहे.
वर्षा दिवेकर यांचा ‘पिवळ्या पानांचा हिरवा देठ’ हा लेख वृद्धापकाळ सुखमय करण्याचा मार्ग सुचवतो.
कै. सुनीलराव खेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख रवींद्र वंजारवाडकर यांचा असून त्यांनी खेडकर यांच्या विषयीच्या अनेक आठवणी यात शब्दबद्ध केल्या आहेत.
असा हा एकताचा अंक असून सुजाण वाचकांना आवडेल याची खात्री वाटते.