अजिंठा

  • Home
  • अजिंठा

अजिंठा सकारात्मक आणि "अराजकिय"

इतिहास | संस्कृती | कला | विज्ञान

ह्यो किनारो मासळेच्या वासान परमळता!तुम्ही बाजारातून घेतलेले ताजे मासे घरी जाण्यापूर्वीच वाटेत जाता जाता तळून मिळण्याची र...
17/08/2025

ह्यो किनारो मासळेच्या वासान परमळता!

तुम्ही बाजारातून घेतलेले ताजे मासे घरी जाण्यापूर्वीच वाटेत जाता जाता तळून मिळण्याची रसदार सोय असलेला सुंदर गाव कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला मालवण हेच उत्तर द्यावे लागेल.

गेल्या अनेक वर्ष मालवणला जायचे. शिवरायांच्या शोधासाठी सिंधुदुर्गांसह आजूबाजूचे इतर अनेक किल्ले बघायचे हा माझा एक आवडीचा छंद.

पण काल मात्र मालवणात एका साहित्यिक कारणासाठी, म्हणजे आमच्या जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.
साहित्य अकादमी आणि नाथ पै सेवांगण यांच्या विद्यमाने हा सोहळा आयोजित केला गेला होता.

पण माझ्या हृदयावर मालवणचा ठसा अनेक कारणासाठी बिंबवला गेला आहे – शिवरायांचा परिसर, भारतीय स्तरावर एकापेक्षा एक अशी नररत्ने देणारे गाव आणि इथले चविष्ट मासे या कारणासाठी हे गाव मला विशेष करून आवडते.

शिवरायांना त्या काळात सिंधुदुर्ग किल्ला निर्मितीच्या वेळी कर्ज देणाऱ्या कुसे सावकारांचा जुना वाडा अजूनही या गावात त्याच मूळ स्वरूपात उभा आहे. तर तेथूनच काही पावलावर मामा वरेकर यांची एक मोकळी पडळ दाखवली जाते. मामानी शरदचंद्र चतर्जी शंभर वर्षांपूर्वी माय मराठीत आणला होता.

टोपीवाला हायस्कूलच्या समोरून सकाळी पायपीट करताना अनेक बडी मंडळी आठवली. पूर्वीचे या देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक स. का. पाटील यांचाही हाच गाव. कॉम्रेड दत्ता सामंत हे सुद्धा याच परिसरात लहानाचे मोठे झाले, हायस्कूल शिकले. वसंत लाडोबा म्हापनकर हे जुने ज्योतिषाचार्य, जयंतराव साळगावकर, आ. ना. पेडणेकर अशी अनेक कर्तबगार माणसे या गावाने देशाला दिली.

शिवरायांच्या काळात येथेच पलीकडच्या किनाऱ्यावर अरब देशातील अरब दर्यावर्दी लोकांची सर्वात मोठी गढी होती. फेब्रुवारी 1665 च्या पहिल्या आठवड्यात शिवराय आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या सागरी मोहिमेवर इथूनच बाहेर पडले होते. तेव्हा त्यांच्या सोबत लहान-मोठी 80 जहाजे व तरांडी होती. त्यांनी मेंगलोरजवळची पोर्तुगीजांची बसरूर नावाची व्यापारी पेठ लुटून त्या गावाची गुलामीतून मुक्तता केली होती.

असो. “येथे मासे तळून दिले जातात” असे फलक अभिमानाने मिळवणारा हा एक सुंदर गाव. अनेक कारणासाठी अनेक वेळा एखाद्या गावात जावे, राहावे, गाव मनात साठवावे अशी नजाकत असणार हे सुंदर गाव.

इथे भटकंती करताना कविवर्य महेश केळुसकर आणि प्रहसनकार श्रीकांत बोजेवार अशी गप्पाटप्पाला मंडळी सोबत होती. त्यांच्या गप्पा मात्र मालवणी माशासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्या इतक्या चविष्ट होत्या. आदरणीय दळवी यांच्या प्रचंड योगदानाबद्दल लवकरच बोलू.

- विश्वास पाटील (पानिपतकार)

भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे २०२२-२३ मध्ये गाय व म्हैसवर्गीय पशूंच्या ताज्या व गोठवलेल्या मांसाच्या निर्यातीतून मिळाले...
17/08/2025

भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे २०२२-२३ मध्ये गाय व म्हैसवर्गीय पशूंच्या ताज्या व गोठवलेल्या मांसाच्या निर्यातीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा रु. २ लाख ३८ हजार कोटी आहे.

गायींना सरकारी छळछावण्यांत पाठवणाऱ्या, तिथे रोग लावून हत्या करणाऱ्या ह्या कायद्याचा काय फायदा असे शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांना गायी विकण्याची परवानगीदेखील नाही. गायींचे परिवहन करतेवेळी बेरोजगार गोरक्षावाल्यांकडून टेम्पो लुटले जातात. सामान्य शेतकऱ्यांचं रक्त पिणारा हा कायदा कशासाठी हवा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. दूध आटलेल्या गायी कोणी विकत घेत नाहीत, त्यामुळे त्यांचा चारापाणी शेतकऱ्यांना सहन होत नाही. गायीने नराला जन्म दिल्यास त्याची हत्या करून पुरायचे प्रमाण अहिल्यानगर जिल्ह्यात वाढले आहे. कारण बैलाला आयुष्यभर पोसून त्याच्यापासून उत्पन्न काहीच नाही. सरकारी गोरक्षा केंद्रात गायीवासरांना घेऊन जातात खरे, पण तिथे ही आयुष्यभर प्रेमाने वाढलेली जनावरं आपल्याच शेणात तासनतास बसून राहतात. थंडीत कुडकुडत मरतात. जखम झाल्यास त्यात किडे पडून कळवळून मरतात. त्यांना पिण्यासाठी टाकल्या जाणाऱ्या पाण्याचा गढूळपणा, पाण्यातल्या अळ्या तपासायला नंतर गोरक्षक येत नाहीत.

काही गोरक्षक तर रस्त्यात गायींनी भरलेले टेम्पो थांबवून गायी बळकवतात. काही जण ह्या गायी थेट मालेगाव, धुळ्याला पाठवतात. तिथून ह्या कापल्या जाऊन त्यांचं मांस दुबईला एक्स्पोर्ट होतं. हेच का आपलं गोधन? मांस विकणाऱ्या लोकांच्या कंपन्या शोधा, त्यांची नावे बघा. जैन समाजातील लोकांची नावे सापडतील. म्हणजे, अहिंसा तुम्हीच पाळायची आणि गायीचं मटणही तुम्हीच अरबांना विकायचं! पण, गोरक्षकांच्या दहशतवादी उन्मादात आमचा बळी का? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

"१७ ऑगस्ट १६६६ : न भुतो न भविष्यती..!!!"     "पराभव (प्रभव) नाम संवत्सरे, शके १५८८, श्रावण वद्य द्वादशी, शुक्रवार दि.१७ ...
17/08/2025

"१७ ऑगस्ट १६६६ : न भुतो न भविष्यती..!!!"

"पराभव (प्रभव) नाम संवत्सरे, शके १५८८, श्रावण वद्य द्वादशी, शुक्रवार दि.१७ ऑगस्ट १६६६ हा दिवस उजाडला. ३ महिने एकही शस्त्र हाती न धरता, थोडाही रक्तपात न करता सह्याद्रीतील एका स्वतंत्र स्वाभिमानी हिंदु राजाने मोठ्या चलाखीने, उत्तर हिंदुस्थानात निरंकुश सत्ता असलेल्या बलाढ्य व पाताळयंत्री मुघल बादशहा औरंगजेबाच्या शहास अखेर काटशह दिलाच."

त्या दिवशी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान शिवाजीराजांनी आग्र्याच्या कैदेतुन स्वतःची, पुत्र संभाजीराजे आणि मागे राहिलेल्या इतर निवडक लोकांची मोठ्या चतुराईने सुटका करवून घेतली.

नजरकैदेतून निसटण्यासाठीचा हा दिवस शिवाजीमहाराजांनी अतिशय विचारपुर्वक निवडला असावा. कारण -
१) त्या दिवशी शुक्रवार होता. म्हणजेच सरकारी दरबाराला साप्ताहिक सुट्टी होती. तसेच बादशहासहीत सर्वांची गर्दी नमाजासाठी मशिदीकडे असणार होती.

२) जुम्माचा दिवस म्हणून बाजारपेठही बंद होती.

३) दरबार नसल्याने त्यादिवशी संभाजीराजेही पूर्ण दिवस शिवाजी महाराजांजवळच असणार होते.

४) पहारे नित्याचेच होते पण सुट्टीचा दिवस असल्याने त्यातही थोडीशी ढिलाई अपेक्षित होती.

या सर्व गोष्टींमुळे राजांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना निसटून जाण्यास सर्व परिस्थिती पूर्णपणे अनुकूल होती. पूर्व योजनेनुसार त्या दिवशी मथुरेच्या ब्रम्हवृंदाला आणि फकिरांना वगैरे वाटण्यासाठी दुपारी ४ च्या सुमारास मिठाईचे पेटारे पाठवण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे दुपारी पेटारे भरण्याचे काम सुरू झाले.

त्या दिवशी सकाळपासूनच राजांचे 'डोके दुखायला लागले होते' म्हणून महाराज पलंगावरच स्वस्थ पडुन राहिले होते. त्यामुळे त्यांना औषध आणण्याच्या निमित्ताने त्यांचे राहिलेल्यापैकी बरेच लोक आधीच बाहेर पडले.

नंतर दुपारी थोडं उशिरा दोन - अडीचच्या सुमारास महाराजांच्या जागी पलंगावर.. नव्हे नव्हे जणु मृत्यु शय्येवरच हिरोजी फर्जंद अंगावर शेला पांघरून झोपले. हिरोजींना राजांनी सूचना दिल्याप्रमाणे सोन्याचे कडे असलेला एक हात बाहेर काढुन ते झोपले. बलराम पुरोहित व त्याचे पहारेकरी अधुनमधून आत डोकावत होते, तेव्हा त्यांना काय वाटत असेल कोण जाणे..!!

सायंकाळी (४-३०/ ५ च्या आसपास) नमाजाच्या वेळेस मिठाईचे पेटारे राजांच्या डेऱ्यातून बाहेर पडले. प्रतापी शिवशंभू ज्यावेळी पेटाऱ्यातुन निसटले त्यावेळी बादशहा औरंगजेब आणि त्याचे बहुतांश अधिकारी जुम्म्याचा नमाज पढण्यात दंग होते. पेटारे तिथून बाहेर जात असताना पहारेकऱ्यांनी नित्यनेमे पहिले १/२ पेटारे तपासले, नेहमीप्रमाणे त्यात मिठाईच होती. शिवशंभू बहुधा त्यानंतरच्या कुठल्यातरी पेटाऱ्यात बसले असावेत. (किंवा शंभूराजे ज्या पेटाऱ्यात बसलेले त्या पेटाऱ्याचे भोई शिवाजी महाराज झाले होते असाही एक मतप्रवाह आहे).

पुढे रात्र झाली, रात्र पळापळाने वाढत चालली, रामसिंहाचे विश्वासू नोकर रामकीशन, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय व बलराम पुरोहित मात्र अधूनमधून महाराजांच्या शामियान्यात डोकावून बघत होते. पण राजांच्या पलंगापर्यंत कोणीच येत न्हवतं, दुरूनच आत काय चाललंय हे बघून पहारेकरी परत जात. नेहमीप्रमाणे 'महाराज' हात शेल्याबाहेर काढून झोपले होते. त्यांचा नेहमीचा मंदिलही उशाशी होता. एक सेवक पाय चेपत बसला होता. बाकी आत निःशब्द शांतता पसरलेली होती.

तीन महिने सहा दिवस शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मृत्यू सतत वावरत होता पण काहीना काही कारण घडत गेले आणि महाराजांचे मरण टळत गेले. किंबहुना महाराजांनी त्यांच्या बुद्धीचातुर्याने शीतयुद्धाच्या डाव पेचांनी ते पुढे नेले. पण शेवटी पाश आवळले जातील याची खात्री पटल्यामुळे महाराज संभाजीराजांसह आग्र्‍यातून निसटले.

ह्या अत्यंत बिकट प्रसंगाच्या स्वकीय आणि परकीय कागदपत्रांत मिळणाऱ्या नोंदी याप्रमाणे -

{१} जेधे शकावली - शके १५८८, पराभव संवछरे, राजश्री सिवाजीराजे श्रावण वद्य द्वादसी अगरीयातून पेटारियांत बैसोन पळाले.

{२} सभासद बखर -
....मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटारियांत बसले. पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटारियांत बसून चालिले. ते वेळी आपला साज सर्व उतरून, हिरोजी फरजंद यास घालून, आपले पलंगावरी निजविला. हात मात्र त्याचा उघडा बाहेर दिसू दिला आणि शेला पांघरून निजविला. आणि एक पोरगा रगडावयास ठेवला. जवळील कारकून होते त्यास अगोदर दिल्ली पलीकडे तीन कोसावर एक गांव होता तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते. आणि आपण उभयता पेटारियांत बसून निघोन चालिले. चौकीचे लोक होते त्यांनी एक दोन पुढील पेटारे उघडून पाहोन वरकड पेटारे न उघडिता जाऊ दिले. शहरावाहेर दोन कोसांवरी जाऊन पेटारे टाकून पायउतारा होऊन, कारकून ज्या गावी होते त्या गावास गेले.

{३} पोर्तुगीज कागदपत्रांतली नोंद - शिवाजी मोगलांच्या तुरूंगातून एका फळांच्या पेटाऱ्यातून निसटला. तब्बल छत्तीस तास तो त्या पेटाऱ्यात होता.

{४} सुरतच्या ईस्ट इंडिया कंपनीला सेंट जॉर्ज बोटीवरून इंग्रजांनी पाठवलेले पत्र -
शिवाजीवर इतका कडक पहारा ठेवूनही अखेरीला तो आणि त्याचा मुलगा असे दोघे दोन पेटाऱ्यात बसून निसटून गेले अशी खात्रीलायक बातमी नुकतीच आली आहे. त्याचा कोठेच तपास लागत नाही. या बाजूच्या प्रांतात (शिवाजीच्या सुटकेमुळे) सर्वत्र भीती आणि संशय याचे वातावरण पसरले आहे.

© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संदर्भ :
१) शककर्ते शिवराय : खंड २ - श्री.विजय देशमुख
२) राजा शिवछत्रपती : उत्तरार्ध - बाबासाहेब पुरंदरे
३) Shivaji's Visit to Aurangzib at Agra - जदुनाथ सरकार व रघुवीर सिंग
४) शिवचरित्र प्रदीप - द.वि.आपटे, स.म.दिवेकर
५) शिवचरित्र निबंधावली - श्रीशिवचरित्र कार्यालय, पुणे
६) पोर्तुगीज-मराठे संबंध - स.शं.देसाई
७) शिवकालीन पत्रसार संग्रह : खंड १ व २ - श्रीशिवचरित्र कार्यालय, पुणे
८) छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ - प्रमुख संपादक डॉ.जयसिंगराव पवार
९) दिनविशेष - प्रल्हाद नरहर जोशी

#आजच्यादिवशी

इतिहासाच्या पानात हरविलेले मराठा वीर छत्रपती शिवरायांचे शिलेदार गोदाजी जगताप...🙏🚩छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सु...
17/08/2025

इतिहासाच्या पानात हरविलेले मराठा वीर छत्रपती शिवरायांचे शिलेदार गोदाजी जगताप...🙏🚩

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले..

फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला..

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला..

――――――――――――

☀🚩⚔️|| हर हर महादेव ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

आज १७ ऑगस्ट.... बरोबर 358 वर्षांपूर्वी आश्‍चर्यकारक व धाडसी घटनांमधील जागतिक इतिहासातील एकमेवद्वितीय घटना आज घडली. १७ ऑग...
17/08/2025

आज १७ ऑगस्ट.... बरोबर 358 वर्षांपूर्वी आश्‍चर्यकारक व धाडसी घटनांमधील जागतिक इतिहासातील एकमेवद्वितीय घटना आज घडली. १७ ऑगस्ट १६६६ ला शहेनशाह औरंगजेबाच्या भक्‍कम सुरक्षा कवच असलेल्या कैदेतून #छत्रपती_शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडस आणि चातुर्याने एक नियोजनबध्द योजना आखत सुटका करून घेतली.
आपल्या मातृभूमीपासून दूर अत्यंत क्रूर अश्या शत्रूच्या तावडीतून निसटणे हे खूपच अशक्य होते पण ते शक्य झाले आणि मराठ्यांच्या इतिहासातील एक ठळक घटना म्हणून त्याची नोंद झाली.औरंगजेबाने दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी रक्ताची रंगपंचमी खेळला होता.तीन भावांची कत्तल करुन दारा नावाच्या भावाचे मुंडके शहाजहान वडीलांना पेटीतून भेट देणारा औरंगजेबाचे हे एकच उदाहरण.निर्दयता,दयाशून्य,भावनाशून्य,क्रुरता यांची परिसिमा पार करते.जपाची माळ जपणार्‍या याच्या डोक्याने मेंदूने किती कत्तली,खून घडवून आणले असतील.
पाताळयंञी औरंगजेबाचे आमंञण म्हणजे मृत्यूला निमंञण होते.तानाजी मालुसरे,येसाजी कंक,हिरोजी फर्जद,मदारी मेहतर,सर्जेराव जेधे,बाजी जेधे,बाळराजे संभाजी यांच्यासह निवडक 400मावळ्यांना घेऊन राजे राजगडावरुन आग्र्यास आले.औरंगाबादच्या खजिन्यातून वाटखर्चासाठी एक लाख रुपये मंजून केले होते.राजांचे अडीच हजार गुप्तहेर आग्रा परिसरात वावरत होते.आग्रा ते राजगड गुप्तहेरांची एक साखळी निर्माण केली होती.सेनापती प्रतापराव गुजर यांना स्वराज्यातच ठेवले होते.आग्रा भेटीत येण्यापूर्वी जिजाऊ माँसाहेबांकडे सर्व स्वराज्याची जबाबदारी दिली होती.शिवरायांच्या स्वागताची जबाबदारी मिर्झाराजे जयसिंह यांचे सुपुञ रामसिंग यांच्याकडे होती.पण ऐनवेळी रामसिंगास औरंगजेबाच्या राजवाड्याभोवती गस्त घालण्याचे काम देण्यात आले.रामसिंगास राजांपासून दूर ठेवण्यात आले.राजांच्या स्वागताला रामसिंहाचा कारकून गिरीधरलाल मुन्शी आला होता.राजांची व्यवस्था धर्मशाळेत करण्यात आली.राजांना अग्र्यापर्यंत राजाप्रमाणे वागविले होते.एखाद्या शहजाद्याप्रमाणे वागिविले.माञ आग्र्यात प्रवेश केल्यापासून अपमानांची मालिका सुरु झाली.प्रत्येक घटना राजांच्या मनाला वेदना देत होती.राजे सहनशीलपणे सर्व सहन करीत होते.राजमहलाच्या प्रवेशद्वारावर शिवरायांची मावळ्यांची सर्वांची शस्ञे काढून घेण्यात आली.औरंगजेबाची भेट घेताना दरबारात कुर्निश करण्याची पध्दत होती.कुर्निश म्हणजे जमिनीवर कपाळ टेकवून बादशहासमोर जमिनीचे चुंबन घेणे.शिवाजीराजे दरबारात आले.राजांनी कुर्निश केला नाही.फक्त मुजरा केला.औरंगजेब आणि त्याचे सरदार पाहत होते.दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास बादशहाचे दोन दरबार होते.दिवाण-ए-खास हा दरबार अमीर उमराव,वजीर,उच्च अधिकारी यांचीच बादशहा भेट घेत असे.प्रत्येक दरबाराचे कामकाज दोन तास चालत होते.राजे आले तेव्हा दिवाण-ए-खास चे कामकाज संपलेले होते.राजे दिवाण-ए-आममध्ये भेटण्यास गेले.कारण राजांची भेट दिवाण-ए-आम मध्ये ठरली होती.राजांच्या पुढे जसवंत सिंगास उभे करण्यात आले.राजांनी मानसन्मानाची अपेक्षा नव्हतीच.पण राजांना जाणीवपुर्वक अपमानीत करण्यात येत होते.औरंगजेबासमोर बोलताना उंच स्वरात न बोलता हळू आवाजात तोंडासमोर हाथ ठेवून बोलण्याची पध्दत होती.राजे भर दरबारात कडाडले,"रामसिंग हमारे आगे ये कौन खडा है? हमारे सैनिकोँ को पीठ दिखाकर जो जसवंतसिंग दख्खन से सिंहगड के युध्द से भाग गया उस जसवंतसिंगको हमारे सामने खडा किया है? जसवंतसिंग तुम्हारे पिताजी और बादशहा भी जानते है की,हम कोन है.कुतूबशहा आणि आदिलशहा आमची कृपा व्ही म्हणून विनंती करतात.आमचा आणि त्यांचा बरोबरीचाच दर्जा.अपमान सहन करणार नाही".औरंगजेब म्हणतो,"सिवा को खिलत दे दो|"
खिलतीचे ताट राजे दूर उडवतात आणि म्हणतात,"या अशा खिलती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो.बादशहाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही.अरे आम्ही पाचशे कोसांवरुन येतो आणि आमचे स्वागत रामसिंगाचे कारकून करतात.अरे तुझ्या बादशहाला दुनियादारी कळते का नाही" रामसिंग राजांना शांत करण्याचा प्रयत्न करतात.म्हणतात,राजे शांत व्हा याचे परिणाम फार वाईट होतात.हातात हात घेऊन रामसिंग समजवतात.पण राजे हात सोडवून घेतात आणि म्हणतात,"परिणामांची पर्वा करीत नाही आम्ही रामसिंग.मरणाला मरण मानत नाही.आम्ही मरण मानतो लाचारीला आम्ही मरण मानतो आमच्या अपमानाला.सर्व दरबारात वाढदिवसादिवशी स्मशान शांतता पसरली होती.औरंगजेबाला पाठ दाखवून शिवराय ताठ मानेने निघून गेले.दरबारी रितीरिवाजानुसार बादशहाला पाठ दाखविणे हा गुन्हा ठरत होता.बाळराजे संभाजी राजांनी राजांचेच अनुकरण केले.सर्व आग्र्यात शिवरायांचीच चर्चा होती.शिवरायांनी राजाने औरंगजेब बादशहाला खडे बोल सुनावले.शिवरायांच्या निखार्‍यासारख्या शब्दांनी औरंगजेबाच्या कानात कुणीतरी तप्त शिश्याचा रस ओतण्याचा भास झाला.दिल्लीच्या तख्ताला खडे बोल सुनावणारा औरंगजेबाला आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी भेटले होते.औरंगजेबाची बहिण जहाँआरा बेगम हिला शहाजहानच्या काळापासून सुरतेचा महसूल खर्चासाठी मिळत होता.सुरत लुटल्यामुळे शिवरायांच्या बध्दल संतापाचा उद्रेक जहाँआराच्या मनात निर्माण झाला होता.जहाँआरा बेगमने आपल्या भावाला आठवण करुन दिली की,शिवाजीने आपले मामा शाहिस्तेखान यांची बोटे कापली.मामुजानच्या मुला फत्तेखानास ठार केले होते.माझी सुरत याच शिवाजीने लुटली आहे.बादशहाच्या तख्ताचा अपमान वाढदिवसादिवशीच केला आहे.त्या शिवाजीला शिक्षा करा भाईजान शिक्षा करा.औरंगजेब बादशहा म्हणाला,शिवाजीला शिक्षा जरुर होईल पहिल्यांदा आरोप लादला जाईल नंतर शिक्षा केली जाईल.बादशहाला भर दरबारात पाठ दाखवून चालणे,खिल्लत ला ठोकर मारणे,सुरत लुटणे,मक्केपासुन मदिनेपर्यंत शिवाजीने माझी इज्जत घालवली आहे. आग्रा शहरात शिवाजीच्याच नावाची चर्चा सुरु आहे.शिक्षा होणार,जरुर होणार.शिवाजीराजे पर दरबारात जात नाहीत.दरबाराचे बोलावणे येऊनही ते जात नाहीत.आपण आजारी आहोत आमच्या वतीने शंभूराजे येतील असा निरोप पाठवतात.शिवरायांबद्दल औरंगजेबाचे सरदार वेगवेगळे सल्ले द्यायचे.
वजीर सांगायचा शिवाजी भोसले को काबुल कंदहार पर भेज दो पठाण का बंड मोडने के लिए । औरंगजेबाची बहिण जहांआरा बेगम मात्र सांगायची शिवाजी का कत्ल कर दो । औरंगजेबाने आदेश दिला होता.सिवा को नजरकैद मे रखो जो हाल दारा शुकोह का हुआ वही हाल उसका होगा ।जुम्मे के दिन सिवा का कत्ल होना चाहिए । रामसिंगाला या कटाची चाहूल लागते.रामसिंग औरंगजेबाला भेटतात आणि सांगतात.पिताजी मिर्झाराजेंनी शिवरायांना वचन दिले आहे.राजपूत जगतो शब्दांसाठी मरतो शब्दांसाठी शिवरायांना ठार मारण्याअगोदर आम्हाला ठार करावे.औरंगजेब बादशाह विचार करु लागला.शिवाजीला ठार केले तर सर्व राजपूत बगावत करतील.इराणचा शाह दिल्लीवर चालून येत आहे.वातावरण शांततेचे हवे आहे.रामसिंगला जामीन घेतले जाते आणि रणांदाजखानाच्या कोठडीत शिवरायांना ठेवले जाते.चार पाच हजार हशमांचा पहारा राजांभोवती ठेवला जातो.औरंगजेबाला मिर्झाराजेंचे पञ येते.शिवाजी मारण्याऐवजी शिवाजीला दख्खनला पाठविणे कारण शिवाजीच्या गैरहजेरीत प्रत्येक सरदार शिवरायच असतो.रामसिंगला मिर्झाराजे पञ पाठवून सांगतात.शिवरायांच्या­ प्राणांची जबाबदारी तुमच्यावर आहे.ती जबाबदारी तुम्ही पार पाडणे.शिवाजीराजे औरंगजेबाकडे अर्ज करतात.माझ्या सैनिकांना दक्षिणेत पाठविण्याची परवानगी देणे.सैनिकांना दक्षिणेत जाण्याची परवानगी दिली जाते.काही दिवसानंतर मिर्झाराजांचे रामसिंगाना पत्र येते.शिवरायांची तुम्ही घेतलेली जमानत रद्द करुन युध्दावर जाण्याची बादशहाला विनंती करा.रामसिंगाची जमानत रद्द केली जाते.शिवराय आजारी पडण्याचे नाटक करतात.दर्गा,मंदिर,मस­्जिद येथे मिठाई वाटण्याची परवानगी मागतात.परवानगी दिली जाते.संभाजीराजे दररोज दरबारात जात होते.आग्र्याला फिरत होते.राजे दररोज झोपताना हातात सोन्याचे कडे घातलेले हात शालीच्या बाहेर ठेवूनच झोपायचे. पहाऱ्याचे सैनिक वारंवार येऊन पहायचे.राजे झोपलेले दिसायचे.आग्र्याला बाहेर काळोजी कुंभार राहत होते कुंभारवाड्यात अगोदरचं जाऊन थांबले होते.हिरोजी फर्जदच्या वेशात पेटार्याबरोबर चालत चालत आग्र्यातून बाहेर पडले.(काही चित्रपटात बाळराजे संभाजी पेटाऱ्यात बसून सुटल्याचे दाखवतात.परंतु कैद फक्त शिवरायांनाच होती.संभाजीराजे मनसबदार होते.त्यामुळे ते दररोज दरबारात जात होते.आग्र्यालाही फिरत होते.शिवाय राजे हिरोजी फर्जद यांच्या वेशात यापूर्वी अनेकवेळा आग्र्यात फिरुन आले होते) राजे पेटाऱ्यात बसून लपून छपून आतमध्ये बसून सुटले नाहीत.तर सहजपणे हिरोजी फर्जदच्या वेशात सुटले.मदारी मेहतर हिरोजी फर्जदचे पाय चेपीत बसला होता.
बहिर्जी नाईक आणि गुप्तहेर फकीरांच्या वेशात बाहेर वाट पाहत थांबले होते.काळोजी कुभाराच्या कुंभारवाड्यात सर्वजण भेटतात.राजे काळोजी कुंभारांना सुवर्ण मोहरा देतात.पती-पत्नी राजांना भाजी भाकरी देतात.कृष्णाजीपंतांना धन संपत्ती देतात.बाळ संभाजी तुमचे भाचे म्हणून राहतील.स्वराज्याचे धन संभाळा म्हणून सांगतात.राजे संन्यासाचा वेश घेतात आणि घोड्यावर बसून बाहेर पडतात.इकडे आग्रा येथे शिवरायांचा ताप वाढला आहे.औषध आणण्यासाठी वैद्याकडे चाललो आहे असे सांगून हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतरी निसटतात.फौलादखान कत्ल करण्यासाठी जुम्मे के दिन राजांना नेण्यासाठी आलेला असतो.पण शिवराय कैदेतून निसटल्याचे त्यांच्या लक्ष्यात येते.औरंगजेब बादशहाला ज्यावेळी समजते शिवराय कैदेतून निसटले.त्यावेळी औरंगजेब स्वत:चेही पहारे कडक करण्याचा आदेश देतो.आफझलखानास ठार करणारे शाहिस्तेखान मामांची बोटे छाटणारे शिवराय आपल्यावरही आग्र्यात हल्ला करण्याची शक्यता आहे असे समजून तो भितीने पहारे कडक करतो.औरंगजेब शिवरायांचा राग नेताजी पालकरवर काढतो.नेताजी पालकरांना पकडून आणून त्यांना मुसलमान करतो.त्याचे नावे कुलीखान ठेवतो.औरंगजेब उदयनराज मुन्शी जो पुर्वी राजपूत होता.पण नंतर इस्लामधर्म स्विकारलेला असतो.त्या उदयराज मुन्शीकडून औरंगजेब मिर्झाराजे जयसिंगांना विषप्रयोग करुन ठार करतो.शिवरायांचे राहिलेले सामान फकीरांना दान करण्याची आज्ञा करतो.औरंगजेब बादशहाचे हेर संभाजीच्या मृत्यूची बातमी देतात.औरंगजेबाच्या मोगली सेनेची शोध मोहीम थांबली जाते.काही दिवसात बाळराजे संभाजी स्वराज्यात सुखरुप आले.
शिवरायांनी आपल्या जीवनात जी माणसे जोडली होती.त्या माणसांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता राजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.आग्रा येथील कुंभारवाड्यातील काळोजी कुंभार,हिरोजी फर्जंद मदारी मेहतर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे यामध्ये फार मोठे योगदान आहे.शिवरायांनी सर्व माणसे पुढे पाठवली अगोदर आपल्या माणसांची काळजी घेतली.मग त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली.राजे नेहमी सहकाऱ्यांची काळजी घेत होते म्हणून राजे सहकाऱ्यांच्या, मावळ्यांच्या काळजात होते. राजांनी एकही उंट,हत्ती,घोडा मागे ठेवला नाही. ते एकटेच गेले नाहीत त्यांच्याबरोबर आलेले प्राणीसुध्दा घेऊन गेले. याच घटनेमुळे औरंगजेबाचा तिळपापड झाला.आपण, आपली सेना किती सामान्य ठरलो,आपण मुर्ख ठरलो म्हणून तो स्वत:वरच जाम वैतागला. राजांची मात्र सर्व हिंदुस्थानात चर्चा होती.
- योगेश शुक्ल 9657701792

अंदमान बेटांवर राहणारी ‘जारवा’ ही एक अत्यंत प्राचीन आदिवासी जमात आहे, जी आजही बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त जीवन जगते...
17/08/2025

अंदमान बेटांवर राहणारी ‘जारवा’ ही एक अत्यंत प्राचीन आदिवासी जमात आहे, जी आजही बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त जीवन जगते. त्यांचा मुख्य वावर अंदमान बेटांच्या दाट जंगलांमध्ये असून ते शिकार, मासेमारी आणि फळफळावळ गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची भाषा, परंपरा आणि जीवनशैली पूर्णपणे वेगळी आणि पिढ्यानपिढ्या तशीच टिकून आहे.

जारवा जमातीचे लोक बाहेरच्या लोकांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत. सरकारने त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. त्यांच्या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते, आणि परवानगीशिवाय तिथे जाणे कायद्याने गुन्हा मानला जातो.

भारतातील सर्वात दुर्मिळ आणि नाजूक संस्कृतींपैकी एक म्हणून जारवा जमातीचे महत्त्व आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे अंदमान बेटांना एक अद्वितीय ओळख मिळते आणि हे दाखवते की अजूनही जगात काही संस्कृती अशा आहेत ज्या निसर्गाशी पूर्ण समरस होऊन जगतात.

मेकॅनिक   दोन वर्षांपुर्वी मी मुरुड मार्गे श्रीवर्धनला गेलो होतो. मुरूडच्या पुढे आगरदांड्याहून रो रो (अशी बोट ज्यामध्ये ...
17/08/2025

मेकॅनिक

दोन वर्षांपुर्वी मी मुरुड मार्गे श्रीवर्धनला गेलो होतो. मुरूडच्या पुढे आगरदांड्याहून रो रो (अशी बोट ज्यामध्ये कार आणि बस देखील वाहून नेल्या जातात) मध्ये गाडी चढवून पुढे दिघी आणि दिवेआगर मार्गे श्रीवर्धनला पोचलो होतो. दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोडं उशीरा निघालो आणि जेव्हा मी मुरुडमधून बाहेर पडून अलिबागकडे निघालो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. मुरूडपासून पुढे नांदगांव गेल्यावर रस्त्यावर गडद अंधार पडला होता.

काशिदचा समुद्र किनाऱ्यावरून जात असताना मागून एक फोर व्हीलर वेगाने मला ओवरटेक करून पुढे निघून गेली. पुढे काशिद गेल्यावर बारशिव गाव लागतं. बारशिव गेल्यावर रस्त्याच्या कडेला काही मिनिटांपुर्वी मला ओवरटेक करून गेलेली गाडी उभी दिसली. त्या गाडीतून उतरून दोघांनी मला रस्त्यात आडवे येऊन थांबवले. गाडीवर एम एच बारा पासून सुरू होणारा नंबर होता. त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली होती. गाडीत आणखीन चार जण बसलेले होते.

मला त्यांनी विचारले इथे रस्त्यात कुठे गॅरेज आहे का? मी म्हटले मला काही कल्पना नाहीये. गॅरेज असले तरीही आता आठ वाजायला आले आहेत तिथं कोणी मिळणार नाही. इकडे लवकर बंद करून जातात.

बरं आमच्यापैकी दोघं जण तुमच्यासोबत गाडीत येतो रस्त्यात गॅरेज असेल तर मेकॅनिकला घेऊन येऊ. रस्त्यावर अंधार पडलेला होता. इतर वाहनांची पण वाहतूक तुरळकच होती.

एकाचे गॅरेज वाल्या पर्यंत लिफ्ट द्या म्हणून सांगून झाल्यावर दुसरा म्हणाला की, नाहीतर असं कराल का, आम्हाला अलिबाग पर्यंत ड्रॉप कराल का तुम्ही.
मी त्यांना विचारले आता काही वेळापुर्वी तुम्ही वेगाने मला ओव्हरटेक करून आलात आणि लगेच गाडी कशी काय बंद पडली. काय झालं आहे गाडीला.

आता गाडीत बसलेले चौघेही गाडीतून खाली उतरले. दारू पिऊन झिंगले होते पण गाडी चालवणारा आणि त्याच्यासोबत अगोदर उतरलेला दोघांनी दारू प्यायल्या सारखी वाटत नव्हती.

सगळ्यांचे वय एकवीस बावीस वर्षे असावं. एकाच कॉलेज मधील ते सगळे अलिबाग मुरुड फिरायला आलेले पर्यटक वाटत होते.
गाडी चालवणारा मुलगा बोलला की गाडी बंद पडली आहे आणि आता चालूच होत नाहीये काहीच कळत नाही काय झालंय.

मी विचारले काय करता तुम्ही सगळे जण, त्यांनी सांगितलं की आम्ही इंजिनियरिंग करतो आहोत. तिसऱ्या वर्षाला आहोत.

मला त्या सगळ्यांची मजाच वाटली, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग करत आहेत आणि गाडीला काय झालं आहे ते या सगळ्यांपैकी कोणालाही कळत नाहीये.
मी गाडी जवळ गेलो तर गाडीचे बोनेट गरम झाल्याचे जाणवले. तरीही गाडीला चावी लावून फिरवायला सांगितली, गाडीच्या पॅनल वर हाय टेम्परेचरचा इंडिकेटर दिसला. माझ्या अंदाजाप्रमाणे गाडी गरम होऊनच बंद पडली होती.
गाडी चालवणाऱ्याला विचारले, तुला इंजिन टेम्परेचर वाढले ते दिसले नाही का, त्यावर तो म्हणाला आजपर्यंत कधी बघितलेच नाही आणि टेम्परेचर बघायचं म्हणून कोणी सांगितलं पण नाही. आज पहिल्यांदाच असं झालं.
मी मनात म्हटलं मीच बरं यांना सांगतोय की गाडी चालवताना इंजिन टेंपरेचर वगैरे बघायचं असतं.
गाडीचे बोनेट उघडायला सांगितले, बोनेट उघडल्यावर त्यातून गरम वाफा निघायला लागल्या त्यातून जळलेल्या ऑइलचा वास येऊ लागला.
त्या बघून झिंगलेल्या चौघांची दारू उतरली. बाप रे इंजिन जाळलं की काय रव्याने गाडी जोरात पळवून. काय रे रव्या लावलीस का आता वाट असे बोलून एकजण गाडी चालवणाऱ्या कडे रागाने बघू लागला.

त्यांना सांगितले इंजिन वगैरे काही जळलं नाही, इंजिन गरम झाल्याने त्याच्यावर लीक झालेले ऑईल गरम होऊन त्याचा जळाल्या सारखा वास येतो आहे.

रेडिएटर मध्ये कुलंट आहे का बघा, सांगितल्यावर सगळे माझ्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना बोटाने रेडिएटर आणि कुलंटचा टँक दाखवला. कुलंटचा टँक रिकामाच होता, एकजण रेडिएटरचे झाकण उघडायला गेला तर त्याच्या हाताला चटका बसला, त्याला सांगितले गाडी पुसायच्या फडक्याने उघड ते झाकण. रेडिएटर मध्ये बिलकुल कुलंट नव्हते. गाडीच्या खाली मोबाईल ची बॅटरी ऑन करून बघितले तर कुलंटचे थेंब ठिपकत होते.
रेडिएटर आणि इंजिनला जाणारा रबरी पाईप लीक झाला होता. रव्या बोलला आता हा पाईप कुठे आणि कधी मिळायचा. गाडी आता रात्रभर इथेच ठेवावी लागणार आणि उद्या टोविंग करून न्यावी लागणार.
ते सगळे मला बोलायला लागले. आम्ही एकमेकांच्या मांड्यांवर बसतो आम्हाला प्लीज अलिबाग पर्यंत घेऊन जाल का?

मी मनात म्हटलं यांची आता थोडी गंमत करू या.
त्यांना बोललो, हे बघा गाडी अलिबाग पर्यंत टोविंग करायचे तीन चार हजार जातील, इंजिन गरम होऊन गाडी बंद पडल्याने ते दुरुस्त करायला सात आठ हजार जातील आणि मेकॅनिक काम करायचे चार पाच हजार घेईल. दहा पंधरा हजार तर जातीलच शिवाय रात्रभर गाडी इथे रस्त्यावर बेवारस म्हणून पडून राहील. दोघांनी हो दादा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण आता काय करणार.

मी तुमची गाडी आता पंधरा मिनिटांत चालू करून देतो पण मला पाच हजार द्यावे लागतील.
दोघांनी एकदम पाचच हजार ना मग दिले असं समजा आणि एकदाची गाडी चालू करून दया असं सांगितलं.

मी माझ्या गाडीतून स्वीस नाईफ काढला, त्यांच्या गाडीचा रबरी पाईप जिथून लीक झाला होता त्याचा रेडिएटर वरील चिमटा काढून , लीक झालेला भाग कापून रेडिएटरला जोडला, पाईप ची लांबी कमी झाल्याने लावताना थोडी ओढाताण आणि त्रास झाला पण पाईप लागला, त्यावर घट्ट बसणारा चिमटा लावला.

त्यांच्यापैकी एकजण विचारू लागला आता कुलंट कुठून टाकणार तुम्ही, कुलंट शिवाय गाडी कशी चालू होणार ?

मी त्यांच्याकडे गाडीतील पाण्याच्या बाटल्या काढायला सांगितल्या गाडीत पिण्याचे पाणी कमी आणि बिअरचे कॅन जास्त असल्याचे त्यांनी दात दाखवत सांगितले. मी माझ्या गाडीतून पाण्याची दीड लिटर ची बाटली काढली. रेडिएटर मध्ये आणि कुलंट टँक मध्ये पाणी भरले. रेडिएटरचे झाकण उघडे ठेऊन रव्याला गाडी स्टार्ट करायला सांगितली.

रव्या गाडी स्टार्ट करण्यासाठी चावी फिरवू लागला, इंजिनची थोडी घर घर पण गाडी स्टार्ट झाली नाही.
माझी फजिती झाली असं वाटून एकजण दुसऱ्याच्या कानात कुजबुजला बघ मी बोलत होतो ना हा आपल्याला चूत्या बनवतो आहे.

मी रव्याला बोललो खाली उतर आणि सगळ्यांना धक्का मारायला सांग, माझ्या पण लक्षात नव्हते आणि गाडीची लाईट सुरूच ठेवल्याने बॅटरी डाऊन झाली होती. मी गाडीत बसून त्यांना सगळ्यांना धक्का मारायला लावला, गाडी थोडी पुढे गेली आणि गिअर मधे टाकून लगेच चालू झाली. रेडिएटर चे झाकण उघडे होते त्यातून हवा बाहेर आल्यावर पाण्याची आणखीन भर घालून झाकण लावून बंद केले.
त्यातील एकजण विचारू लागला आता गाडी बंद तर नाही ना पडणार आणि कुलंट ऐवजी साधं पाणी टाकलं आहे त्याच्याने नुकसान तर नाही ना होणार.
मला हसायला आलं. त्यांना बोललो माझे पाच हजार द्या मग काय ते सांगतो.
त्यावर एकाने मोबाईल वर जी पे ॲप ओपन करून
माझा जी पे नंबर मागितला.

तुमची गाडी आता बंद पडणार नाही फक्त चाळीस पन्नासच्या स्पीड ने चालवा. कुलंट मध्ये ऐंशी टक्के पाणीच असतं इंजिन मध्ये गंज लागू नये आणि कुलिंग आणखीन चांगले व्हावे म्हणून त्यात केमिकल असतात. गाडी हळू चालवली तर काही बिघडणार नाही.

उद्या सकाळी अलिबाग मध्ये कुलंट विकत घ्या आणि रेडिएटर मधील दोन लिटर पाणी काढून त्यात कुलंट टाकून घ्या. रेडिएटर मधील पाणी कुठून काढायचं ते पण त्यांना दाखवले.
त्यांना विचारले इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहात, तिथं कॉलेज मध्ये काही शिकवत नाही का रे तुम्हाला.

नाही दादा आम्ही कॉलेजमध्ये नुसतं टाईमपास करतो लेक्चर बंक मारतो आणि लेक्चर मधे असलो तरी अर्ध लक्ष मोबाईल मध्ये असतं. लाख लाख रूपये भरून क्लासेस लावतो आणि परीक्षा पास होतो.

मोबाईल मध्ये जी पे उघडलेल्याने माझ्याकडे पुन्हा एकदा पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी माझा मोबाईल नंबर मागितला.

मला एकही रुपया नकोय तुमचा. मी तुमची मस्करी केली होती, गाडी चालू करायचे पैसे द्यावे लागतील म्हणून.

एकाने गाडीतून चिल्ड बॉक्स मधून बिअरचे दोन थंडगार कॅन आणले, आणि हे तर घ्या म्हणून पुढे केले. मी डोक्याला हात मारून ते परत त्यांच्याच गाडीत ठेवायला लावले.
मी माझ्या गाडीत बसत असताना तुम्ही मेकॅनिक आहात का म्हणून एकाने विचारले.

लाखो टन क्षमता असलेल्या एका तेलवाहू जहाजाच्या चीफ इंजिनिअरला रस्त्यात बंद पडलेली गाडी चालू करून दिल्याबद्दल मेकॅनिक आहात का म्हणून विचारल्याने मला हसावं की रडावं असं झालं.
हो मी एक मेकॅनिक असून माझं खोल समुद्रात तरंगणारे गॅरेज आहे.

गाडी हळू हळू चालवा इथून एक तासा ऐवजी सव्वा तासात अलिबागला पोहचाल पण चाळीस च्या पुढे स्पीडने पळवू नका. असं सांगून मी माझ्या गाडीचा स्टार्टर देऊन निघालो.

इंजिनिअरिंग म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवणे किंवा परीक्षा पास होणे एवढंच नाही.

रट्टा मारून क्लासेस मध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक सराव प्रश्नपत्रिका सोडवत राहून सगळेच पास होतात.
कॉमन सेन्स नावाचं ज्ञान कुठल्याही शाळेत कॉलेजात किंवा पुस्तकात मिळत नाही. हल्ली सगळं रेडीमेड मिळत असल्याने, काही बिघडलं की एकतर नवीन घ्या किंवा सर्व्हिस सेंटरला कॉल करा. एखादा प्रकार कशाने झाला किंवा काय केल्याने त्यातून मार्ग निघेल याचा स्वतःहून शोध घेण्याची वृत्तीच दिसत नाही.
इंस्टा फेसबुकवर मध्ये रमणाऱ्याना शंभर गुणिले सहा करायला कॅल्क्युलेटर लागतो, पाचा पाचा पंचवीस असतात याचा पण काहीजणांना विसर पडतो, इतकी वाईट अवस्था बघायला मिळते.

घरात गळणारा नळ बदलण्यासाठी प्लंबर आणावा लागतो, लाईटचा बल्ब बदलण्यासाठी इलेक्ट्रिशियन बोलावावा लागतो, गाडी धुवायला पैसे देऊन माणूस ठेवावा लागतो नाहीतर सर्व्हिस सेंटर वर जावे लागते अशी सध्याच्या कॉलेजला जाणाऱ्या युवकांची परिस्थिती आहे.

लेख: प्रथम रामदास म्हात्रे - मरीन इंजिनिअर

कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावल्यावर "या विक्रमाची कोणी बरोबरी करू शकत नाही" म्हणणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या नाकावर...
16/08/2025

कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावल्यावर "या विक्रमाची कोणी बरोबरी करू शकत नाही" म्हणणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या नाकावर टिच्चून जयजवान पथकाने काही वेळातच त्यांच्या समोरच दहा थर लावून दाखवले.

कोकण नगर असो की जयजवान.. सर्व आपलीच मराठी पोरं आहेत. या बापबेट्यांच्या राजकारणापायी या दोन मंडळानी आपसात वितुष्ट येऊ देऊ नये. दोघांनी आज विक्रम केलाय, दोन्ही मंडळांचं तेवढंच कौतुक.

सरनाईक बापबेट्यांचा पुन्हा एकदा निषेध. दहा थर त्या पोरांनी अपार मेहनत आणि धैर्याने रचून दाखवलेत. यात तुमचं काहीच योगदान नाही.

-राजेश कदम

कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने केला १० थरांचा विश्वविक्रम ! विश्वविक्रमी दहा थर रचत मिळवलं 25 लाखांचं पारितोषिक.👌
16/08/2025

कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने केला १० थरांचा विश्वविक्रम !
विश्वविक्रमी दहा थर रचत मिळवलं 25 लाखांचं पारितोषिक.👌

तांबव्याचा विष्णुबाळाकोयना नदीच्या काठावर वसलेलं तांबवे हे एक साधं, शांत पण स्वाभिमानी गाव. गावातली माणसं मेहनती, सरळमार...
16/08/2025

तांबव्याचा विष्णुबाळा

कोयना नदीच्या काठावर वसलेलं तांबवे हे एक साधं, शांत पण स्वाभिमानी गाव. गावातली माणसं मेहनती, सरळमार्गी आणि थोडीशी तापटसुद्धा जे साताराच्या मातीला साजेशे असते.शेतात दिवसभर कष्ट करायचे, सायंकाळी आखाड्यात मातीत झुंज द्यायची आणि गावच्या वाड्यात बसून गप्पा मारायच्या. कुस्ती ही इथली परंपरा. प्रत्येक घरात कुणी ना कुणी पैलवान. या गावातले दोन भाऊ—आण्णाबाळा पाटील आणि त्यांचा धाकटा भाऊ विष्णूबाळा पाटील. दोघेही आखाड्यातले पक्के पैलवान, ताकदवान शरीर, मजबूत हातपाय, दंडगोलाकार छाती आणि डोळ्यातून ओसंडणारा आत्मविश्वास. आण्णाबाळा शांत, संयमी, गावात भांडण झालं तर ते सोडवणारे, लोकांना एकत्र ठेवणारे. विष्णूबाळा थोडा उग्र स्वभावाचा, चटकन पेटणारा, पण मनाने सोन्यासारखा. ज्याचं वाईट होतंय, त्याच्यासाठी उभा राहणारा. गरीब, अनाथ, शेतकऱ्याचा मुलगा—सगळ्यांसाठी त्याचा दरवाजा नेहमी उघडा.

लहानपणापासून दोघांनीही गावातल्या भैरोबाच्या मंदिराशेजारील आखाड्यात घाम गाळत असतात. मातीचा ओलसर सुवास, पहाटेच्या धुक्यातून झिरपणारा सूर्यकिरनांचा कवडसा, आणि गुरूंचा कडक आवाज—हे त्यांचं आयुष्य. वडिलांच्या मृत्यूनंतर आण्णाबाळांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि विष्णूने त्यांना मदत केली. शेती, कुस्ती आणि गावकामं—याच तिन्ही गोष्टीत ते रमायचे. गावात कुणाच्या घराचं छप्पर झिरपत असेल तर विष्णू स्वतः कारागिराला बोलावून द्यायचा. कुणाचा बैल हरवला असेल तर तो शोधायला निघायचा. कुणाचं पीक खराब झालं तर स्वतःच्या शेतातून धान्य देऊन मदत करायचा. म्हणूनच गावकरी त्याला “आपला विष्णूबाळा” म्हणायचे.

पण एका संध्याकाळी गावाचं वातावरण बदललं. सहकारी सोसायटीच्या हिशोबावरून वाद उडाला. थोडं थोडं बोलणं सुरू झालं आणि ते भांडणात बदललं. तापट शब्द, हातातले दांडके, आणि रागाच्या भरात झालेली चूक. चुलतभावाने आण्णाबाळावर जोरदार प्रहार केला. पायाचं हाड मोडलं. आण्णाबाळा जमिनीवर कोसळले. लोकांनी आरडाओरडा केला, कुणी पाणी आणलं, कुणी गाडी बोलावली. विष्णूबाळा तेव्हा गावाच्या दुसऱ्या टोकाला होता. बातमी कळताच तो धावत आला. भावाला अशा अवस्थेत पाहून त्याचे डोळे लाल झाले. चेहऱ्यावरचं संतुलन गायब झालं, श्वास जड झाला. त्याने लगेच गाडी मिळवली, भावाला कराडच्या दवाखान्यात नेलं.पण विष्णूच्या मनात रागाचा वादळ उभा राहिलं होतं.

त्याला वाटलं—आता पोलिस कारवाई करतील, आरोपीला शिक्षा मिळेल. पण काहीच झालं नाही. साक्षीदार मागे हटले, काहींनी बाजू बदलली. पुरावे अपुरे ठरले. आरोपी सुटून गेले. गावात चर्चा झाली, कुजबुज झाली, पण काहीही बदललं नाही. विष्णूबाळाला हे सहन झालं नाही. “आपल्या भावावर हल्ला झाला, पाय मोडला, आणि तरीही शिक्षा नाही?” हा प्रश्न त्याला आतून पोखरू लागला. काही दिवस त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. गावात कुणाशी भांडण झालं तर तो समजावून सांगायचा. पण आतला राग, अन्यायाची जळजळ, दिवसेंदिवस वाढत होती.पण पैलवान मन अशांत होते.

एक दिवस तो पावसात भिजत गावाच्या बाहेर उभा राहिला होता. पाण्याचे थेंब कपाळावरून ओघळत होते, पण त्याला ते जाणवत नव्हते. डोक्यात एकच विचार—“हा अन्याय थांबवायचा आहे.” आणि त्या विचाराने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. रागाच्या भरात त्याने चार खून केले. मग तो पाटण खोऱ्यातील जंगलात जाऊन लपून राहू लागला. पोलिसांसाठी तो आता फरारी गुन्हेगार होता, पण गावासाठी अजूनही तो “आपला विष्णूबाळा” होता. कारण तो गावकऱ्यांना त्रास देत नव्हता. उलट गरिबांना मदत करत होता. कुणाचं पिक नष्ट झालं असेल तर बियाणं देत होता, कुणाचं जनावर हरवलं तर शोधून आणत होता.

पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले. पहाटे धाड टाकायचे, दुपारी घेराबंदी करायचे, रात्री सापळे लावायचे. पण प्रत्येक वेळी तो निसटून जायचा. कारण गावकरी त्याला लपवत होते. कुणी घराच्या माळ्यावर, कुणी देव्हाऱ्याच्या मागे, कुणी कोठारात. एका शेतकऱ्याने तर स्वतःच्या घराच्या भिंतीत भोक पाडून गुप्त मार्ग तयार केला होता, जेणेकरून विष्णूला हवी तेव्हा बाहेर पडता येईल. गावकऱ्यांसाठी तो गुन्हेगार नव्हता, तर अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला आपला माणूस होता.

शेवटी पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केलं. तरीही तो पकडला गेला नाही. गावात त्याच्याबद्दल आदर आणि भीती, दोन्ही भावना होत्या. काहींना वाटायचं—तो गावासाठी आहे, तर काहींना वाटायचं—त्याचा राग कुणावरही येऊ शकतो. पण ज्यांना त्याने मदत केली होती, त्यांच्यासाठी तो नायकच होता.

एक दिवस त्याच्यापर्यंत संदेश पोहोचला—“शरण आलास तर शिक्षा कमी होईल.” हा प्रस्ताव त्याने गंभीरपणे घेतला. स्वतःला विचार केला—मी लोकांना कायद्याचा आदर सांगतो, मग मीच का पळत राहू? गावकरी मला मदत करत आहेत, पण त्यांनाही धोका आहे. कदाचित आता थांबण्याची वेळ आली आहे. मग त्याने ठरवलं—पोलिसांसमोर शरणागती पत्करायची.

त्या दिवशी तो गावातून निघाला. काही जवळचे मित्र सोबत होते. गावातील प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक बोळाला, प्रत्येक घराला त्याने नजर टाकली. भैरोबाच्या मंदिरात जाऊन मातीचा टिळा कपाळाला लावला. आणि मग थेट पोलिसांसमोर जाऊन बंदूक जमिनीवर ठेवली. “ही गावाच्या रक्षणासाठी होती, कायद्याला आव्हान देण्यासाठी नाही,” असं तो म्हणाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

खटला सुरू झाला. साक्षीदार, पुरावे, आणि प्रत्येक घटनेची चर्चा झाली. न्यायालयात उभा राहून विष्णूबाळाने एकच गोष्ट सांगितली—“रागाच्या भरात पाऊल टाकू नका. अन्याय झाला तरी कायद्याचा मार्ग सोडू नका.” न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं. शिक्षा कठोर होती. पण तो शेवटपर्यंत ठाम राहिला. गावात त्याची चर्चा सुरू होती. काहींना वाटायचं—त्याने जे केलं ते चुकीचं नव्हतं, तर काहींना वाटायचं—रागाने काही सुटत नाही.शिक्षेची अमलबजावणी झाली.विष्णुबाळा गेला.

विष्णूबाळाच्या मृत्यूनंतरही त्याचं नाव गावात जिवंत आहे. पोवाड्यात, ओव्यात, गप्पांमध्ये त्याचा उल्लेख होतो. भैरोबाच्या मंदिराजवळ आखाड्यात मुलं सराव करतात, आणि मोठी माणसं त्यांना सांगतात—“शौर्य म्हणजे फक्त लढणं नाही, तर संयमाने लढणं.” लहान मुलं त्याच्या गोष्टी ऐकतात, मोठे माणसं त्या आठवणींमध्ये रमून जातात. गावात आजही कुणी चुकीचं वागलं, तर कुणीतरी म्हणतं—“अरे, लक्षात ठेव, आपला विष्णूबाळा कसा होता.”

“तांबव्याचा विष्णुबाळा” ही केवळ गुन्ह्याची कथा नाही. ती एका गावाची, एका काळाची आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या माणसाची कथा आहे. ती सांगते—राग आला तरी संयम ठेव, अन्याय झाला तरी कायद्यावर विश्वास ठेव, आणि गावासाठी जग. ती कथा गावाच्या रक्तात मिसळली आहे. तिला शेवट नाही, कारण अशा कथा पुढच्या पिढ्यांमध्ये जिवंत राहतात. आणि म्हणूनच, आजही तांबव्याच्या मातीत उभं राहून कुणी विचारलं—“नायक कोण?”—तर उत्तर येतं—“जो रागानं उठतो, पण न्यायाला नमतो.”

पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

#तांबव्याचाविष्णूबाळा

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजिंठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अजिंठा:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share