अजिंठा

  • Home
  • अजिंठा

अजिंठा सकारात्मक आणि "अराजकिय"

इतिहास | संस्कृती | कला | विज्ञान

खरं यशस्वी कोणाला म्हणायचं?बहुतेक लोक म्हणतील — ज्या व्यक्तीकडे कोट्यवधींची संपत्ती, मोठं घर, आलिशान कार, आणि जगभर प्रवा...
11/10/2025

खरं यशस्वी कोणाला म्हणायचं?
बहुतेक लोक म्हणतील — ज्या व्यक्तीकडे कोट्यवधींची संपत्ती, मोठं घर, आलिशान कार, आणि जगभर प्रवास आहे तो. पण झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी या सगळ्या कल्पना पूर्णपणे उलट करून दाखवल्या आहेत.

अमेरिकेतील उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतात परत येऊन, तामिळनाडूतील एका छोट्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कोट्यवधींचे मालक असूनही ते दररोज सायकलने प्रवास करतात, पारंपरिक कपडे घालतात आणि गावकऱ्यांसोबतच राहतात. त्यांच्या साध्या आयुष्यात एक विलक्षण तेज आहे — कारण त्यांचं ध्येय स्वतःचं आयुष्य सुखी करणं नाही, तर गाव आणि देशाला सक्षम बनवणं आहे.

वेंबू यांनी झोहोच्या माध्यमातून हजारो ग्रामीण तरुणांना IT क्षेत्रात रोजगार मिळवून दिला. मोठ्या शहरांपेक्षा, त्यांनी गावातच ऑफिस उभारलं आणि सांगितलं — “तंत्रज्ञान फक्त मेट्रो सिटीजसाठी नाही, ते भारताच्या प्रत्येक गावात फुलायला हवं.”

अलीकडेच त्यांनी भारतात बनवलेलं मेसेजिंग अ‍ॅप ‘अरट्टै (Arattai)’ सुरू केलं, जे “मेड इन इंडिया व्हॉट्सअ‍ॅप” म्हणून ओळखलं जातं. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे डेटा भारतातच ठेवला जातो, जाहिराती नाहीत, आणि वापरकर्त्यांची गोपनीयता सर्वात वरचं प्राधान्य आहे.
वेंबू म्हणतात — “आपण लोकांवर नव्हे, लोकांसाठी तंत्रज्ञान बनवत आहोत.”

आजच्या जगात जिथे यशाचं मोजमाप पैशाने केलं जातं, तिथे श्रीधर वेंबू यांनी दाखवून दिलं की साधेपणा, विनम्रता आणि समाजासाठी केलेलं कार्य हाच खरा श्रीमंतीचा मार्ग आहे. त्यांच्या जीवनातून एकच संदेश मिळतो — “खरी संपत्ती म्हणजे हृदयाचं समाधान, आणि खरा यश म्हणजे आपल्या समाजाला काहीतरी परत देणं.” 💛

घराबाहेर हाकललेला,दिवाळखोर,जुगारी,भुरटा चोर लाखोंचा व्यवहार करणारा ब्रिटिश आणि बादशाहांचा सौदागर कसा झाला ?या कथेचा काळ ...
11/10/2025

घराबाहेर हाकललेला,दिवाळखोर,जुगारी,भुरटा चोर लाखोंचा व्यवहार करणारा ब्रिटिश आणि बादशाहांचा सौदागर कसा झाला ?
या कथेचा काळ आहे अठराव्या शतकातला.तेव्हा ब्रटिश इस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात हातपाय पसरत होती.मद्रास,मुंबई आणि कलकत्ता या शहरात कंपनीने चांगला जम बसवला होता,इतर ठिकाणी राजाश्रय मिळवून व्यापार वाढत होता,कंपनी सरकारची फौज तयार होत होती, त्या काळातली ही कहाणी आहे.
****
त्याकाळात वाहतूक व्यवस्था मुख्यत: घोड्यांवर अवलंबून होती. उत्तम जातीचे घोडे अफगाणिस्तान, इराक,अरेबियातून भारतात आणले जायचे.जहाजातून हे घोडे कच्छ्च्या आखातात यायचे आणि मांडवी बंदरात उतरायचे. एका घोड्यापोटी कंपनीला साडेसातशे रुपये मोजावे लागायचे.त्याकाळी मुंबई बंदर विकसित व्हायचे होते. व्यापारासाठी कच्छ आणि काठियावाड ही दोन ठिकाणे प्रमुख होती.आफ्रिका, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या देशातून येणारा व्यापारी माल मांडवी, पोरबंदर, गोगा आणि आसपासच्या छोट्या बंदरात उतरायचा.फौजा बनवणे आणि सामानाची वाहतूक करणे या दोन्ही कामांसाठी घोड्यांना मोठी मागणी असायची.
****
काही वर्षांतच कच्छ आणि काठियावाड परिसरात देशी घोड्यांच्या जाती तयार झाल्या. बाहेरच्या घोड्यांना 'बहेर' घोडे म्हटले जायचे, तर देशी घोड्यांना 'अप्सान-इ-कच्छी' म्हणून ओळखले जायचे. अरबी घोड्यांना मागणी होती, पण ते महाग पडायचे. त्यानंतर हळूहळू काठियावाडी-कच्छी-राजस्थानी घोड्यांचा खास बाजार तयार झाला.घोडे घेणे आणि विकणे यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असल्याने व्यापारी कमी आणि दलाल जास्त असायचे. या सौद्यात विकणार्‍यापेक्षा दलालाचे काम कठीण असायचे. 'बोल बच्चन' देणाराच फक्त दलालाचं काम करू शकायचा. असे बोल बच्चन दलाल फसवाफसवी, हातचलाखीने घोडे विकायचे. घोडेबाजार म्हणजे या गोष्टी गृहितच धरल्या जायच्या. आज प्रचलित असलेला घोडेबाजार हा नकारात्मक शब्द इथेच जन्मला!
पण याच घोडेबाजारातल्या एका माणसाने इतिहास घडवला. त्या माणसाचे नाव आहे सुंदरजी शिवजी खत्री! निव्वळ प्रामाणिकपणाच्या भांडवलावर या माणसाने घोडेबाजारात आपली 'मोनोपोली' बनवली होती. त्याच्या व्यापाराच्या स्टाईलमुळे इतिहासात त्याची नोंद ‘सुंदरजी सौदागर’ अशी आहे.
****
गोष्ट पुढे वाचण्यापूर्वी आपल्या कथेचा नायक सुंदरजी सौदागरबद्दल जाणून घेऊया.
सुंदरजी सौदागरचे आयुष्य फारच विलक्षण होते. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याला जुगाराची चटक लागली होती. जुगारासाठी अधूनमधून भुरट्या चोर्‍या पण तो करायचा. त्याच्या वागण्याला त्याचे वडिल कंटाळले होते. त्यांनी सुंदरजीला कौटुंबिक वारशाचे २००० कोरी (तेव्हाचे चलन) देऊन त्याच्याशी कायदेशीर फारकत घेतली. थोड्याच दिवसांत ते पैसेही जुगारात संपले आणि सुंदरजीने बायकोचे पैसे चोरायला सुरुवात केली. बायकोनेही त्याला घराबाहेर काढले. बायकोने घराबाहेर काढल्यावर सुंदरजी मांडवी शहरात आला.
****
मुळात हुषार असल्याने मांडवीच्या नगरशेठची- मनसंग भोजराजची मर्जी त्याने संपादन केली. त्याच्याकडून ७००० कोरी कर्ज घेतले आणि सुंदरजीने घोड्यांची दलाली सुरु केली. सुरुवातीला पाच उत्तम घोडे घेऊन ते मुंबईला पाठवले. त्यात नफा झाल्यावर मनसंग भोजराजने आणखी भांडवल ओतले. त्यातून चौदा घोडे विकत घेऊन कोचीनला पाठवले. थोड्याच दिवसांत एक अट्टल जुगारी मोठा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर त्याचा लौकिक इतका वाढला की मद्रास सरकारने माँटगोमरी या कर्नलच्या हस्ते सुंदरजीसोबत ५३५ रुपयांत एक घोडा या हिशेबाने विकत घेण्याचा करार केला आणि एक लाख रुपये अगाऊ रक्कम त्याच्या हातात ठेवली.
****
या नंतर सुंदरजीचा धंदा वाढतच गेला. त्याने काठियावाड आणि सिंध प्रांतात आपले एजंट नेमले. आता त्याचे ग्राहक फक्त ब्रिटिशच नव्हे तर, दक्षिणेत निजाम, टिपू सुलतान यांनाही घोडे पुरवण्याचे काम त्याला मिळाले. त्या वेळच्या एका पत्रात सुंदरजीने मुंबईच्या गव्हर्नरला २२५ घोडे घेण्याचा सल्ला दिलेला आढळतो. सन १८१०-१२ च्या पत्रव्यवहारातून हे पण आढळून येते की त्याने कंपनी सरकारला १८०० घोडे विकले होते.
****
एकेकाळचा दिवाळखोर जुगारी मुलगा आता कच्छचा मोठा व्यापारी झाला होता. १८३०मध्ये त्याने एक नवा धंदा सुरु केला. घोडे ने-आण करण्यासाठी त्याने सात जहाजे विकत घेतल्याची नोंद आहे. घोड्यांसोबत व्यापार वाढतच गेला. व्यापारी असल्याने कच्छ-काठियावाडचा भूभाग त्याने पिंजून काढला. त्याकाळी कंपनी सरकारची जहाजे कच्छ्च्या आखातात लुटली जात. या समुद्री चांच्यात आणि ब्रिटिशांमध्ये समझौता घडवून आणण्याचे काम त्याने केले. यामुळे कंपनी सरकारात त्याचे महत्व वाढले. एवढे महत्त्व वाढले की ब्रिटिश अधिकार्‍यांना, "सुंदरजी सांगेल त्याप्रमाणे वागा" असे आदेश देण्यात आल्याची नोंद सापडते.
****
आजही गुजरातमध्ये त्याचे नाव टिकून आहे ते या श्रीमंतीच्या जोरावर नव्हे, तर त्याच्या औदार्यासाठी! १८१३ साली मोठा दुष्काळ पडला. तेव्हा कच्छच्या ८००० लोकांना त्याने दरदिवशी ३०० रुपये खर्च करून वर्षभर पोसले. पोरबंदरच्या दुष्काळ पिडितांसाठी त्याने रुपये ९००० देणगी दिल्याची नोंद आहे. काठियावाडच्या दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवठा करण्यासाठी दर दिवशी ६० रुपये खर्च केल्याची नोंदही आढळते. याच दरम्यान बेट द्वारका, द्वारका आणि इतर ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निमितीसाठी मोठा निधी त्याने दिला.
****
एकेकाळी घराबाहेर काढलेला, दिवाळखोर, भुरटा चोर अशी ख्याती असलेला सुंदरशेठ सौदागर झाला होता. खत्री सुंदर शिवजी यांचे अधिकृत चरित्र अजूनही लिहिले गेलेले नाही, पण लिहिले गेलेच तर त्याच्या कर्तबगारीच्या,औदार्याच्या कथांसोबत ब्रिटिशांनी गुजरात कसे काबीज केले यावरही प्रकाश पडेल.

महिन्द्रा ची Thar येण्या अगोदर म्हणजे साधारण 95-96 दरम्यान रस्त्यावर केवळ याच गाडीचे राज्य होते.सीट बेल्ट सोडा ! साधं दा...
07/10/2025

महिन्द्रा ची Thar येण्या अगोदर म्हणजे साधारण 95-96 दरम्यान रस्त्यावर केवळ याच गाडीचे राज्य होते.

सीट बेल्ट सोडा ! साधं दार सुद्धा नव्हतं या गाडीला .
लेदरचे पडदे असायचे पण ते सुद्धा ड्रायवर गुंडाळून ठेवायचा .
सरकारने काळी - पिवळी टॅक्सीचा नियम करण्यापूर्वी खेडयापाडयात प्रवासाचं मुख्य साधन केवळ "कमांडर" होती.

दणकट बॉडी, जवळपास नो सस्पेंशन कितीही माणसं भरा ! आत भरा,दारात लटकवा,टपावर बसवा ! ही गाडी चलतच राहायची.

प्रवासी वाहतुक करणारे ड्रायवर तर जवळजवळ एका पायावर म्हणजे ? अर्धा आत अर्धा बाहेर लटकलेला गाडी चालवायचा .

या गाडीने खुप प्रवास केलाय .
त्यातले त्यात या गाडीच्या ड्रायवरकडचे कॅसटमधले गाणे म्हणजे ? तर काय विचारूच नका ! जगभराचा सगळा "दर्द" केवळ यांच्याच कडे असायचा.

तुम्ही कधी या गाडीने प्रवास केला आहे का?

आज वाल्मिकीजयंतीच्या सरकारी सुट्टीच्या शुभदिवशी (असते हो आमच्या कर्नाटकात) रामायणाशी संबंधित ही एक कथा वाचूया.या सगळ्या ...
07/10/2025

आज वाल्मिकीजयंतीच्या सरकारी सुट्टीच्या शुभदिवशी (असते हो आमच्या कर्नाटकात) रामायणाशी संबंधित ही एक कथा वाचूया.
या सगळ्या पात्रांचा उल्लेख रामायणात असला तरी पूर्ण कथा महाकवी कालिदासाने ‘रघुवंशम्’ या काव्यात लिहिलीय.
पूर्वी अशी एकाची स्टोरीलाईन दुसऱ्याने आपलंच काही नविन लिहून पुढे चालवली तरी चालायची. हल्ली लोक काय तो ‘प्रताधिकार’ , इंटेलिजंस राईट वगैरे कायदा घेऊन येतात तसं पूर्वी नव्हतं. भारत हल्ली खूप कट्टरवादी होत आहे. असो.
फेसबुकावर याचं त्याचं लिखाण ढापून स्वतःच्या नावावर खपवणारे या कायद्यांचा आपापल्यापरीने अविनय कायदेभंग करतात ते पाहून बरं वाटतं.

मागे हा फोटो एकांनी फेसबुकवर टाकून ‘कोणाचा आहे ओळखा पाहू?’ विचारलं होतं.
याला बरेच लोक सत्यवान सावित्री म्हणतायत म्हणे.
पण हा सत्यवान सावित्रीचा फोटो नाही हे तर उघडंच आहे. आजकाल लोक कितीही धार्मिक आणि कट्टर असल्याचाआव आणत असले तरी सत्यवान सावित्रीच्या कथेत सत्यवान मरून पडला होता, सावित्री नव्हे हे त्यांना या चित्रावर कमेंट करताना माहित नसतं. म्हणून मग आमच्यासारख्या लोकांना पुराणातली वांगी (वानगी)नव्यानव्या प्रकारच्या रेसिपी करून नव्या पिढीला खायला घालावी लागतात.

हा फोटो आहे आपल्या प्रभू श्रीरामांच्या आजीआजोबांचा.
आजकाल लोकांना वाटतं प्रेम, नायक नायिका, खलनायक , आईबाबांच्या मनाविरूद्ध पळून जाऊन लग्न करणं वगैरे सगळे आधुनिक प्रकार आपल्याकडे युरोपियनांच्या आक्रमणानंतर सुरू झाले.
आपल्या लव्हस्टोऱ्याही सोनी मेहवाल, हीर रांझा, रोमिओ ज्युलिएटपर्यंत मागे जातात.
विरहाने व्याकुळ होऊन मरणाला लागणारे हिरो आपल्याला जास्तीत जास्त देवदास या पात्रापर्यंत आठवतात. एखादवेळी क्वचित मेघदूत.
पण आपली प्रेमाची प्रथा आणि विरहाचा कहाण्या यापेक्षा कितीतरी अधिक आहेत.
जुन्या काळातल्या तर अनेक प्रेमकथा विरहकथा प्रसिद्ध आहेत.

संस्कृतच्या शालेय बहिःशालेय परीक्षांचा अभ्यास करताना आमच्या पोखरणकर सरांनी यातल्या कित्येक कथा रंगवून आणि भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून आम्हाला शिकवल्या होत्या.
आपल्या बऱ्याच लव्हस्टोऱ्यांत हिरो हिरॅाईन बदलत असले तरी मुख्य व्हिलन प्राणसारखा इंद्रच असायचा बरं.

तर या चित्रात आहेत ते अज आणि इंदुमती.
अज म्हणजे कोण, तर आपल्या प्रभू श्रीरामांचे आजोबा.
इंदुमती कोण तर आपल्याच विदर्भातल्या भोजराजाची कन्या जी मूळात एक शापित अप्सरा होती.
आता अप्सरेला शाप मिळायचं कारण काय तर तेच आपले नेहमीचे व्हिलन इंद्रप्पा.

या इंद्राभाऊंना कायम आपलं सिंहासन जायची भिती असायची. मग जरा कोणी वरचढ होतंय असं दिसलं की चालले महाराज अंधारात वेषांतर करून किंवा दुसऱ्या काही मार्गाने त्याला नामोहरम करायला.
इंद्र म्हणजे, देवेंद्र म्हणजे देवाधिराज इंद्र बरं का? तुम्हाला काय ते पुरणपोळीवाले वाटले ते नव्हेत. हे अमृतवाले इंद्र.
तर काय सांगत होते, या इंद्रप्पांना कोण म्हणजे कोण पुढे गेलेलं चालायचं नाही. मग त्या पतिव्रता बायका असोत, ऋषीमुनी असोत, मानवी राजे असोत की राक्षस.
कुणाचं सामर्थ्य आपल्या पुढे जातंयसं वाटलं की चाललेच हे त्यांचा डायरेक्ट/इनडायरेक्ट तेजोभंग करायला. आणि आपल्या ईडी/सिबाआय सारखी यांच्या हातातली शस्त्र म्हणजे अप्सरा.

एक बिचारे तृणबिंदू नावाचे ऋषी आपापलंच तप वगैरे करत होते. इकडे इंद्राला इतकी ॲंक्सायटी झाली की पाठवलं एका हरिणी नावाच्या अप्सरेला तेजोभंग करायला त्यांचा.
तृणबिॅदूबाबांचा तेजोभंग झाला, पण त्यांना अप्सरेचा आला राग. त्यांनी तू अप्सरेचा जन्म सोडून पृथ्वीवर एक मर्त्य मानव म्हणून जन्मशील असा शाप दिला.
हरिणी बिचारी घायाळ झाली. घेणं ना देणं इंद्राच्या नादात शिव्या खाणं. तिने उःशाप मागितला. मग एकदा स्वर्गीय फुलांची माळ तुझ्या अंगावर पडली तर तू शापमुक्त होशील असा उःशाप मिळाला.
इंद्र आपला करून सवरून नामानिराळा.

इकडे ही हरिणी पृथ्वीवर विदर्भनगरीचा राजा भोज याची कन्या राजकुमारी इंदुमती म्हणून जन्मली.
आधीच अप्सरा , त्यात राजकुमारी. मग ती काय सुंदर झकपक दिसत असेल पहा.
इकडे कोसलनगरीच्या आयोध्या राजधानीतल्या राजा दिलीपाचा नातू अज(म्हणजे प्रभू श्रीरामांचे आजोबा).
तो ही दिसायला सुंदर, रूपवान, गुणवान.

एकदा इंदुमतीचे स्वयंवर ठरले आणि देशोदेशीच्या राजांमधून या अजराजाची निवड इंदुमतीने केली.
आम्हाला आमच्या सरांनी हे सगळं रामायण (खरं तर रामायणाचा प्रोलॅाग असणारं रघुवंश) शिकवायचं कारण हे स्वयंवर. कालिदासाने यात स्वयंवराला आलेल्या एकेका राजाची अशी वर्णने केलीत की बास.
त्यात नखशिखांत दागिन्यांनी नटलेली ही सुंदर इंदुमती एकेका राजाला नाकारून पुढच्या राजाकडे वळते तेव्हा मागच्या राजाचे तोंड काळवंडून जाते. याचं वर्णन कालिदासाने रसत्यावरून पुढे जाणारा दिवा (दीपशीखा)) जसजसा पुढे जाईल तसतसा मागचा रस्ता अंधारतो या शब्दास केलंय ज्यांना कालिदासाची सर्वोत्तम उपमा समजले जाते.

तर या अजाचे वर्णनही भारी आहे.
त्याच्या बाबांचे कर्तृत्त्वही भारी आहे, पण आता पोस्ट मोठी होत्येय म्हणून नंतर कधीतरी लिहेन.
या अजाला इंदुमतीने वरले. मग त्यांना दशरथ नावाचं बाळ झालं. ते बाळ आठ महिन्यांचं असताना एकदा राजाराणी बागेत फिरत होते इतक्यात त्रैलोक्यसंचारी नारदमुनींच्या वीणेला लावलेला स्वर्गीय फुलांचा हार इंदुमतीच्या अंगावर पडला आणि ती गतप्राण झाली.

केवळ नाजूकश्या हाराच्या माराने ही कशी वारली याचं दुःखद आश्चर्य करत अज रडू लागला.

त्याचं विरहगीतही अजाचं विरहगीत- अजविलाप म्हणून देवदासाच्या स्टोरीपेक्षा अजरामर झालं हो.
आजची जेन झी सैयारा बघून उन्मळून पडते तशी त्यांची काही पिढ्यांपूर्वीची लिहता वाचता येणारी जनरेशन ‘अजविलाप’ वाचून रडत असे.

तर तो अज इतका दुःखी झाला की आठ महिन्याच्या बाळाला सोडून जीव द्यायला चालला होता.
त्याला वसिष्ठ मुनी आणि त्यांच्या शिष्यांनी कसंबसं काही वर्षे शहाणपणाच्या गोष्टी सांगत जगवलं.
मग वसिष्ठांनीच दशरथाचे खरं पालनपोषण केलं.
मग पुढचं रामायण तर माहितीच आहे.

तर त्या गोष्टीतलेच हे अज इंदुमती आणि त्या अजाच्या हातातला हा तो नारदहार.

Credit- स्वाती स्वाती

कधीतरी एखादी घटना अशा पद्धतीने समोर येते की विचार करण्याची क्षमताच थांबते. अपघाताला सावरलेलं मन पुन्हा एकदा अस्थिर होऊन ...
06/10/2025

कधीतरी एखादी घटना अशा पद्धतीने समोर येते की विचार करण्याची क्षमताच थांबते. अपघाताला सावरलेलं मन पुन्हा एकदा अस्थिर होऊन जातं. चित्रपटात आपण कल्पनेपेक्षाही पुढच्या अशा गोष्टी बघतो पण एखादी गोष्ट चित्रपटालाही लाजवेल अशी घडते.

अपघात विभागाला ड्युटीवर होतो, नवरात्रातील नवव्या दिवसाची संध्याकाळ होती. अचानक सायरन वाजवत एक ॲम्बुलन्स वेगात येऊन थांबली. अशी ॲम्बुलन्स येऊन थांबणं हे काही नवीन नाही. नेहमीसारखं काहीतरी असेल म्हणून समोर बघत होतो तोच एक कर्मचारी मामा वेगात स्ट्रेचर ढकलत मध्ये येत होता.

जवळ जाऊन पाहिलं, स्ट्रेचरवर एक पंचविशीतील स्त्री झोपलेली होती. सोबतीला तीन-चार लोक होते. तिला तपासलं आणि बाजूला घाबरून उभा असलेल्या तिच्या नवऱ्याला विचारलं की काय झालं, तेव्हा त्याने सांगितलं...

ती स्त्री आठ महिन्यांची प्रेग्नंट होती. अचानक पोट दुखू लागलं आणि तिला श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. तसं तिला घराजवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात प्रवेश करताच ती बेशुद्ध झाली. तिथल्या डॉक्टरांनी तपासलं... तिचं हृदय बंद पडलं होतं!

आठ महिन्याचं बाळ पोटात आहे...‌ आणि आईचा जीव गेला! काही सेकंदापूर्वी रडत पोटावर हात फिरवत असलेली, तडफडत असलेली ती आई शांत झाली.

ताबडतोब डॉक्टरांनी सीपीआर द्यायला सुरुवात केली. तिचं बंद झालेलं हृदय सुरू व्हावं म्हणून इमर्जन्सी इंजेक्शन दिले, एकानंतर एक छातीवर दाब पडू लागले... सीपीआर सुरू झाला... पोटावर दाब वाढला आणि... बाळाचं डोकं बाहेर आलं!

पुढच्या काही क्षणात बाळाला बाहेर काढण्यात आलं... ते जिवंत होतं! मुलाला जन्म देण्याआधीच आई गेली होती!

त्या बाळाला वाचवणं आता पुढची पायरी होती. त्यासाठीच आमच्याकडे ते आले होते. समोर एक नर्स उभी होती... तिच्या हातात एक नुकतंच जन्मलेलं बाळ होतं. बाळाची हालचाल सुरू होती पण त्याची वाढ पूर्ण झालेली नव्हती. त्या मुलाला पटकन आयसीयूमध्ये भरती करणं आवश्यक होतं.

बाजूला त्या मृत स्त्रीचा पती आणि त्या बाळाचा बाप उभा होता. बालरोगाच्या डॉक्टरांना आयसीयूमध्ये अर्जंट एक जागा उपलब्ध करायला सांगितली आणि तिकडे बाळासाठी धावपळ सुरू झाली.

माझ्यासमोर ती स्त्री शांत पडून होती. जीव सोडण्याआधी ती खूप रडली होती याची साक्ष देणारे डोळ्यातून निघालेले दोन थेंब अजूनही सुकले नव्हते. बाळाला आयसीयूमध्ये घेऊन जायला बाप निघाला. त्या बाळाची आणि आईची भेट आता कधीच होणार नव्हती.

जन्माला येऊन काही मिनिटं झालेलं ते बाळ मिटल्या डोळ्यांनी हालचाल करत होतं... मिटलेल्या डोळ्यांनी ती आई शांत पडून होती!

बापाला दुःख दाटून आलं होतं पण तो रडत नव्हता. त्याने हातानेच काहीतरी हालचाल केली तसं मी त्याला होकार दिला. नर्सच्या हातातून घेऊन बापाने ते बाळ अलगद आईच्या पोटावर ठेवलं. आईला सीपीआर देताना ते बाळ जन्माला आलं होतं...मायलेकाची ती पहिली आणि शेवटची भेट होती!

पुढच्याच क्षणी बाळाला उचलून मागं न‌ वळून बघता तो बाप आयसीयूच्या दिशेने धावला. त्याच्या डोळ्यात फक्त प्रश्न होते. एकाचंही उत्तर त्याच्याकडे नसावं...

खरंतर आपल्या सगळ्यांच्या धावपळीत ही काही फार मोठी गोष्टी नाही. ही घटना इथं न मांडल्यानं फार काही फरकही पडणार नव्हता पण नवरात्रेत गेलेली एक 'आई' विस्मृतीत जाऊ नये म्हणून हे लिखाण.

(ते बाळ सुखरूप आहे, उपचार सुरू आहेत.)

डॉ. प्रकाश कोयाडे

एका कॅनेडियन छायाचित्रकाराने एक लांडग्यांचा कळप एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना बघितला.या प्रवासासाठी कळपातल्या में...
06/10/2025

एका कॅनेडियन छायाचित्रकाराने एक लांडग्यांचा कळप एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना बघितला.
या प्रवासासाठी कळपातल्या मेंबर्सच्या रांगेची जी रचना होती त्यावरून Risk Management आणि Leadership याबद्दल अनेक आश्चर्यकारक समजून आल्या
१. कळपाचा नेता पुढे नसून मागे राहून सगळ्यावर लक्ष ठेवतो.
२. सगळ्यात पुढे चालणारे लांडगे हे सर्वात वृद्ध किंवा अशक्त, ते चालण्याचा वेग ठरवतात.
३. ताकदवान व आक्रमक लांडगे दुसऱ्या रांगेत, धोक्यांना तोंड द्यायला तयार अअसतात
४. मादी व पिल्लं तिसऱ्या रांगेत, कळपाच्या भविष्यासाठी सर्वात सुरक्षित जागी ठेवली जातात.
५. चौथ्या रांगेत अंगरक्षकासारखे लांडगे, मागून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करतात.
६. नेता एकटा थोडा मागे राहून संपूर्ण गटावर व परिसरावर लक्ष ठेवतो.
थोडक्यात : नेतृत्व म्हणजे फक्त पुढे चालणं नव्हे, तर सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं.वृद्ध किंवा अशक्त लांडगे पुढे घेणे ही एकजुटीची खूण आहे. ताकदवान लांडगे Risk घेतात आणि Future Safety बघतात. चौथ्या रांगेत तगडे लांडगे Unexpected Risk Cover देतात.
फरक इतकाच आहे की लांडग्यांना हे आपोआपच येत असतं. आपल्याला मात्र MBA वगैरे करावं लागतं

किस्से संस्थानिकांचे!         1870 साली विलासी जीवन जगणारे बडोदा संस्थानचे महाराज खंडेराव गायकवाड हे निपुत्रिक मृत्यू पा...
05/10/2025

किस्से संस्थानिकांचे!
1870 साली विलासी जीवन जगणारे बडोदा संस्थानचे महाराज खंडेराव गायकवाड हे निपुत्रिक मृत्यू पावल्याने राजगादीवर त्यांचे लहान बंधू मल्हारराव गायकवाड हे विराजमान झाले. पहिला बरा... असे म्हणण्याजोगा त्यांनी राज्यकारभार सुरु केला. सल्लागार सगळे अडाणी, निरक्षर, स्वार्थी व अनितीमान. पैशासाठी, फायद्यासाठी हांजीहांजी करणारे. राज्यात व राजवाड्यात सर्रास नंगानाच सुरु झाला. कोणाचे कोणाला बंधन राहिले नाही. जवळपास एक हजार "पोरी, बाटकी, " जनानखान्यात गुलाम स्त्रिया म्हणून डांबून ठेवलेल्या होत्या. त्यांना त्यांचे नवरे, नातेवाईक यांपासून बळजबरीने हिसकावून तेथे ठेवण्यात आले होते. त्यांच्या नवर्‍यांवर महाराजांचे खुषमस्करे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात येई. काही घरंदाज घराण्यातील स्त्रियांनाही सेनापती / दिवाणची माणसे रस्त्यावरून राजरोस उचलून नेत. याचा धसका घेऊन अनेक लोकांनी आपल्या स्त्रियांना बडोदा संस्थानबाहेर ब्रिटिश टेरीटोरीत पाठवून दिले. स्त्रियांनी राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जाणे बंद केले. पळवून नेल्या जाणाऱ्या स्त्रियांमध्ये जातीभेद केला जात नव्हता. तरीही यांत ब्राम्हण, वाणी, मुसलमान स्त्रियांची संख्या अधिक होती. काही सरदार या स्त्रियांना वाड्यात पाठविण्यापुर्वी स्वतः अगोदर उपभोग घेत. जगोबा जगताप याने हा प्रकार घडत असताना पळवून नेणाऱ्यांवर तलवार उपसली तर त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. एकदा नागपंचमीच्या दिवशी काही स्त्रियांना राजवाड्यात समारंभासाठी बोलावण्यात आले. तेथे महाराजांनी अश्लील प्रकार सुरु केले. या गोष्टीला स्वतः महाराजांची कन्या कमलबाई इतकी वैतागली की ती स्वतःच बडोदा शहर सोडून पुण्यात गेली. राधाबाई या मल्हारराव महाराजांच्या थोरल्या विधवा भावजय होत्या. वयामुळे त्यांना कमलबाई सारखा निर्णय घेता आला नाही तरी त्यांनी ब्रिटिश सरकारला अर्ज केला की, त्यांची बडोद्याबाहेर व्यवस्था करावी. मल्हारराव महाराजांनी नितीमत्तेच्या सर्व सिमा ओलांडल्या होत्या.
सुरत बंदरावरील गोदीत एक पांडू नावाचा हमाल होता. त्याची पत्नी लक्ष्मीबाई हीदेखील हमाली करत असे. मल्हारराव महाराजांनी तिला उचलली व डायरेक्ट लग्नच लावून टाकले व तिला महाराणी केले. पांडूने ब्रिटिशांकडे दाद मागितली. अखेर त्याला तहहयात 25 रूपये महिना कबूल करून प्रकरण मिटवले. या लग्नाच्या वेळीच ती गर्भवती होती. या लक्ष्मीबाईंचे वडिल रखमाजी शिंदे बारा पैसे रोजाने कामावर जात होते, ते आता मोठ्या जहागिरीचे मालक होऊन बसले.
14 ऑक्टोबर 1873 रोजी महाराज रस्त्याने जात असताना त्यांना भाईचंद झवेरीची पत्नी जैन मंदिराजवळ दिसली व डोळ्यात भरली. महाराजांनी ताबडतोब दोन शिपाई पाठवले व तिला राजवाड्यात बोलावले. पण ती पटकन मंदिरात घुसली. बाहेरुन शिपाई दरवाजा ठोठावत राहिले. दरम्यान, ही बातमी भाईचंदला व तिच्या भावाला कळाली. ते ताबडतोब मोठा जमाव घेऊन आले व त्यांनी दोन्ही शिपायांची धुलाई केली.
बडोद्याच्या तुरुंगात अनेक जणांचे संशयास्पद मृत्यू होत असत. भाऊ शिंदे ( माजी मंत्री), रावजी केशव ( वृत्तपत्र संपादक), गोविंद नाईक या प्रतिष्ठित लोकांचे तुरुंगात मृत्यू झाले. स्थानिक वृत्तपत्रांना लाच देऊन बातम्या दाबण्यात येत.
तरीही ब्रिटिश रेसिडेंट यांकडे दुर्लक्ष करत होता. राजगादीवर बसवण्यापुर्वी मल्हारराव गायकवाड यांची तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश रेसिडेंटच्या पायाचे चुंबन घेतले होते व ते रेसिडेंटला नेहमीच खूष ठेवत असत.
परंतू याचा इतका अतिरेक झाला की, अखेर ब्रिटिशांना याची दखल घ्यावीच लागली. मल्हारराव महाराजांना पदच्युत करण्यात आले व मद्रासला स्वतंत्र रेल्वेने पाठवून दिले.
मल्हाररावच्या छळाला कंटाळून पुण्यास निघून गेलेल्या खंडेराव महाराजांच्या विधवा पत्नी महाराणी जमनाबाई यांना ब्रिटिशांनी पाचारण केले व त्यांच्या मांडीवर व्हाईसरॉयच्या संमतीने नासिक जिल्ह्यातील कौळाणे गावातील गायकवाड घराण्यातील शेतकरी मुलगा दत्तकपुत्र देण्यात येऊन त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. ( तेज्यायला तिढून पुढं फक्त पन्नास किमी अंदरसुलला बी गायकवाड होते. आले अस्ते थोडं पुढं दत्तक घ्यायला.)
तो राजपुत्र म्हणजेच
पुरोगामी विचारांचे महाराजा सयाजीराव गायकवाड! ज्यांनी बाबासाहेब डाॅ. आंबेडकरांसारख्या हिऱ्याची पारख केली व प्रोत्साहन दिले.
*****
टीप:
1874 साली बडोद्यात दिवाण म्हणून दादाभाई नौरोजी यांना 5000 रुपये महिना पगार होता. तर कोणतेही काम न करता नानासाहेब खानविलकर यांना दिवाण म्हणूनच 9000 रुपये पगार होता.
*****

लेखक:
राजा गायकवाड
संदर्भ:
पाक्षिक ' हितेछ्यू ' ... दिनांक 19 ऑगस्ट 1873.

05/10/2025

असा असतो खरा राज्यकर्ता. नाहीतर आताचे मराठीला विकून खाणारे राज्यकर्ते बघा.

राहीबाई पोपेरे ही महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील कोम्बळणे गावातील एक आदर्श शेतकरी आणि पर्यावरण रक्षक आहे. राहीबाई ‘बीज...
05/10/2025

राहीबाई पोपेरे ही महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील कोम्बळणे गावातील एक आदर्श शेतकरी आणि पर्यावरण रक्षक आहे. राहीबाई ‘बीजमाता’ किंवा ‘सीड मदर’ म्हणून ओळखली जाते कारण तिने पारंपरिक शेतकी आणि स्थानिक बियांचा संवर्धन करण्याचा अनोखा मार्ग राबवला आहे. शिक्षण नसतानाही तिने स्वतःच्या मेहनतीने आणि ज्ञानाने शेतकऱ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत बनली आहे.

राहीबाईचा जन्म 1964 साली एका आदिवासी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिने कुटुंबाला मदत करण्यासाठी शेतात काम करणे सुरू केले. लग्नानंतर तिने आणि तिच्या पतीने पावसाळ्यात शेती केली तर बाकीच्या वर्षात साखर कारखान्यात मजुरी करून कुटुंबाचा भरणा केला. या अनुभवातून तिने पारंपरिक शेतीच्या पद्धतींचे गहन ज्ञान मिळवले आणि जमीन व जलसंपत्ती जतन करण्याच्या तंत्रांचा अवलंब केला. राहीबाईने शेतीसाठी जलसंधारणाचे उपाय राबवले, जसे की छोटे तळे आणि पारंपरिक जलसाठा यंत्रणा, ज्यामुळे आधी उपयुक्त नसलेली जमीन सुपीक बनली आणि विविध प्रकारची पिके घेता आली. यामुळे तिच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली.

राहीबाईने स्थानिक बियांचा संवर्धन करण्यासाठी बियांच्या बँकेची स्थापना केली. या बँकेत 32 प्रकारच्या 100 हून अधिक स्थानिक बियांची देवाणघेवाण होते. शेतकऱ्यांना बियांचे कर्ज दिले जाते, जे परत करताना दुप्पट प्रमाणात परत करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे हायब्रिड बियांवर आणि रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी झाले, जमीन निरोगी राहिली आणि खर्चात बचत झाली.

तिचा कार्यक्षेत्र फक्त बियापुरते मर्यादित नाही. राहीबाई शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना शाश्वत शेतीच्या पद्धती शिकवते, ज्यात बियांची निवड, मातीची सुधारणा, कीड व्यवस्थापन यांचा समावेश आहे. तसेच तिने महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छता, पोषण आणि शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनातून तिने संपूर्ण गावाच्या जीवनमानात बदल घडवून आणला आहे.

राहीबाईच्या कार्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळाली आहे. 2018 साली तिला बीबीसीच्या "100 Women" यादीत स्थान मिळाले. पुढच्या वर्षी तिला नारी शक्ति पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2020 साली तिला पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. राहीबाईच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीकडे परतावे सुरु केले आहे, ज्यामुळे भारतात शाश्वत शेतीच्या चळवळीला चालना मिळाली आहे.

तिच्या कार्यामुळे भविष्यातील पिढ्यांवरही सकारात्मक परिणाम झाला आहे. राहीबाई पोपेरे यांनी दाखवले की, स्थानिक ज्ञान आणि परंपरागत पद्धती जतन केल्यास शेती अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक होऊ शकते. तिने न केवल स्वतःच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावले, तर संपूर्ण समुदायासाठी अन्नसुरक्षा, आर्थिक स्थिरता आणि पर्यावरणसुरक्षा सुनिश्चित केली. राहीबाईची कथा प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरते.

#राहीबाईपोपेरे #बीजमाता

05/10/2025

'चंद्रहास' या तेलुगू चित्रपटातील हा सीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते आहेत 'कृष्णा’ प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे वडील.

या आठवड्यात एका कफ सिरपमुळं एमपीत १२ आणि राजस्थानात ३ मुलं दगावल्याची बातमी वाचली आणि मला ‘पिवळं लेबल’ आठवलं..नायजेरियात...
04/10/2025

या आठवड्यात एका कफ सिरपमुळं एमपीत १२ आणि राजस्थानात ३ मुलं दगावल्याची बातमी वाचली आणि मला ‘पिवळं लेबल’ आठवलं..

नायजेरियातील ‘कानो’ शहरातली उष्णता म्हणजे त्वचेवर चिकटून राहणारा शाप होता; दुपारपर्यंत भर उन्हात शेकडो आया आपल्या आजारी लेकरांना कडेवर घेऊन रांगेत उभ्या होत्या रडून डोळे सुजलेल्या आणि आशा संपलेल्या..

शहरात अचानक मेंदूज्वराचा प्रकोप झाला होता; डॅा.अमिना बेलोला गेले ३ दिवस झोप लागली नव्हती..

वार्डमधला एकही बेड शिल्लक नव्हता,एव्हाना औषधंही संपत आली होती,मृत्यूची नोंद ठेवण्यापेक्षा अधिक मृतदेह जमा होत होते; तेवढ्यात तिनं दारात काहीतरी विचित्र पाहिलं..

व्हॅनमधून आलेले काही परदेशी डॅाक्टर्स ‘चंदेरी खोके’ घेऊन दारात आले होते आणि त्यावर पिवळं लेबल होतं ज्यावर लिहिलं होतं ‘Trovan’

"हे औषध कोणत्या यादीत आहे? कपाळावर आठ्या घालत अमिनानं त्यांना विचारलं..
“मॅम ते अमेरिकेतून आलंय,अबुजाकडून परवानगी आहे म्हणे” एक नर्स कुजबूजली..

‘परवानगी’ या शब्दाचे आपल्याकडं असतात तसे नायजेरीयातही अनेक अर्थ-अन्वयार्थ होते..

संध्याकाळी इस्पितळाच्या आवारात तात्पुरतं क्लिनिक उभं राहिलं.शुभ्र कोटातले गोरेगोमटे डॅाक्टर डोळ्यात अस्वस्थता घेऊन चमत्काराचं आश्वासन देत होते,”हे नवं औषधांसोबत काही तासातच आजार बरा करतं.”

आपल्या मुलांना वाचवण्यासाठी हतबल पालकांनी कागदावर पटापट सह्या केल्या न वाचता,काहीही न विचारता..

अमिनाला मात्र शंका आली; इथं काही मुलांना Ceftriaxone दिलं जात होतं तर काहींना Trovan आणि पण का? हे कुणालाच ठाऊक नव्हतं..

ती मूख्य डॉक्टर डॉ. मिलरकडं गेली,”तुम्ही दोन औषधांची चाचणी घेताय?” तिनं विचारलं..
थोडं थांबत “दोन्ही उपचार प्रभावी आहेत.आम्ही तुलना करत आहोत." तो पुटपूटला..
“मरत्या मुलांवर?" ती चिडून जवळपास ओरडलीच..
“डॉ. बेलो, ही साथ एक संधी आहे. आम्ही जीव वाचवू शकतो..आणि भविष्यासाठी काही शिकू शकतो.” तो थंड आवाजात म्हणाला..

‘संधी’ हा शब्द तिच्या कानात दीर्घकाळ घुमत राहिला..

तीन दिवसांनी कुजबूज सुरू झाली; Trovan घेतलेल्या काही मुलांना झोप येत नव्हती काही बेशुद्ध,काही तडफडत होती..

परदेशी डॉक्टर म्हणत होते,”हे रोगामुळंय” पण अमिनाला पॅटर्न दिसत होता; तेच औषध, तेच परिणाम आणि तीच शांतता..”

ती रुग्ण नोंदी पहायला गेली, पण फाईल्स गायब होत्या "सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.” क्लर्कनं चाचरत उत्तर दिलं..

त्या रात्री अमिनानं क्लिनिकमध्ये शिरकाव केला. मंद लाईटच्या उजेडात, जनरेटरचा गोंगात तिला काही खोके
दिसले. "Trovan - Experimental."
दुसरा शब्द लाल मार्करनं अधोरेखित केला होता Experimental..

अचानक तिला मागं पावलांचा आवाज ऐकू आला,
दरवाजात हातात फाईल्स घेतलेला डॅा.मिलर उभा होता..

“डॅाक्टर बेलो” तो पुटपूटला,”जास्तीचं कुतूहल धोकादायक असतं.”
“तुम्ही प्रयोग करत आहात? लहान लेकरांवर?” निर्भयपणं तिनं प्रश्न विचारला..
"पण..इतिहास आमचं कौतुक करेल." थकलेल्या आवाजात तो पुटपूटला..
तो आल्या पावली निघून गेला आणि अमिना त्या अंधाऱ्या फिनेलच्या वासानं भरलेल्या खोलीत एकटी उरली..

काही आठवड्यांनी पावसाळा आला तशी साथ ओसरली. पण सगळ्यांसाठी नाही. काही मुलं बहिरी झाली, काहींना पक्षाघात झाला आणि काहींनी डोळे पुन्हा उघडलेच नाही..

परदेशी डॉक्टरांनी आपले उरलेले चंदेरी खोके उचलले, आणि शांतापणं शहर सोडलं..

अमिनानं गायब झालेल्या फाईल्सच्या प्रती निनावी एका पत्रकाराला पाठवल्या आणि काही महिन्यांनी बातमी आली,”नायजेरियामध्ये अमेरिकन कंपनीनं गुप्त औषध चाचणी केली."

संपूर्ण देश हादरला. खटले भरले गेले, वर्षांनंतर माफ्या मागितल्या गेल्या. पण कानोमधलं कुणीच त्या पिवळ्या लेबलला अजूनही विसरलं नाही..

- डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर(जन्म: १८ जानेवारी,१८८९; मृत्यू: १ ऑक्टोबर, १९३१)मराठी रंगभूमीवर "नाट्यछटा" हा स्वतंत्र ले...
04/10/2025

शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर
(जन्म: १८ जानेवारी,१८८९; मृत्यू: १ ऑक्टोबर, १९३१)
मराठी रंगभूमीवर "नाट्यछटा" हा स्वतंत्र लेखनप्रकार रुजवून त्याला कलात्मक प्रतिष्ठा देणारे लेखक म्हणजे शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचं स्मरण करणं म्हणजे मराठी साहित्यविश्वातील एका महत्त्वाच्या पर्वाला उजाळा दिल्यासारखं आहे.
१८ जानेवारी १८८९ रोजी पुण्यात जन्मलेल्या दिवाकरांचं बालपण वेगळ्याच अनुभवांनी भरलेलं होतं. दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले.
त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झालं. आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही. मात्र, ज्ञानलालसा आणि साहित्यावरील प्रेमाने त्यांनी वाचन-मननाचा मार्ग स्वीकारला.
पुढे १९१० साली फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजी प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्या सहवासाने दिवाकरांना इंग्रजी साहित्याची गोडी लागली. टॉलस्टॉय, इब्सेन, गॉल्झवर्दी, माटरलिंक, हाउप्टमान यांसारख्या युरोपीय साहित्यिकांचं लेखन त्यांनी मनापासून वाचलं.
शेक्सपिअर, वर्डसवर्थ आणि ब्राउनिंग यांच्या लेखनाने त्यांना विशेष प्रेरणा दिली. विशेषतः ब्राउनिंगच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग्समधून दिवाकरांना "नाट्यछटा" या नव्या लेखनप्रकाराची प्रेरणा मिळाली.
ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या शाळेत शिक्षक झाले. पुढे नूतन मराठी विद्यालयातही त्यांनी अध्यापन केलं.
ते इंग्रजीचे उत्तम शिक्षक म्हणून लौकिकास आले. प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांना विशेष भावे.
शिक्षकी पेशासोबतच दिवाकरांनी लेखनास सुरुवात केली. त्यांनी तब्बल ५१ नाट्यछटा लिहिल्या.
त्यांच्या लेखनात जीवनातील खोल तत्त्वचिंतन, साधे पण प्रभावी प्रसंग, आणि वाचक-प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आशय असे.
त्यांच्या काही गाजलेल्या नाट्यछटा म्हणजे –
• मग तो दिवर कोणता
• वर्डसवर्थचे फुलपाखरू
• चिंगी महिन्याची झाली नाही तोच
• शिवी कोणा देऊ नये
• फाटलेला पतंग
"नाट्यछटा" या प्रकारातून दिवाकरांनी वाचकांना केवळ मनोरंजन नाही, तर आत्मपरीक्षणाची प्रेरणा दिली.
१ ऑक्टोबर १९३१ रोजी पुण्यात दिवाकरांचं अल्पवयात निधन झालं. परंतु त्यांनी रुजवलेला "नाट्यछटा" हा साहित्यप्रकार आजही मराठी रंगभूमीवर त्यांच्या योगदानाची साक्ष देतो. दिवाकर हे नाव केवळ लेखकाचं नव्हे, तर मराठी रंगभूमीला नव्या प्रयोगांचा धाडसी वारसा देणाऱ्या साहित्यिकाचं प्रतीक ठरलं.

-श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

Address


411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजिंठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अजिंठा:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share