अजिंठा

  • Home
  • अजिंठा

अजिंठा सकारात्मक आणि "अराजकिय"

इतिहास | संस्कृती | कला | विज्ञान

येसाजी कंकयेसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या ...
12/12/2025

येसाजी कंक

येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.

शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.

पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

सदर फोटो मध्ये दिलेली तलवार हि येसाजी कंक यांचीच आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा तसेच रोज अशीच नवनवीन दर्जेदार माहिती मिळवण्यासाठी आपले पेज नक्की फॉलो करा.

ख्रिसमस जवळ आला की ‘सांता नको वासुदेव’ वगैरे पद्धतीच्या पोस्ट दिसू लागतात. वासुदेव, कुडमुडे जोशी, गोसावी, बहुरूपी, नदीबै...
12/12/2025

ख्रिसमस जवळ आला की ‘सांता नको वासुदेव’ वगैरे पद्धतीच्या पोस्ट दिसू लागतात. वासुदेव, कुडमुडे जोशी, गोसावी, बहुरूपी, नदीबैलवाले, पिंगळा, कडकलक्ष्मी, पोतराज वगैरे जातीपरंपरागत आलेले व्यवसाय आहेत. मुख्यतः कुणबी संस्कृतीच्या आधारे जगणाऱ्या या जाती. त्यांचे या ग्रामीण संस्कृतीत प्रसंगात्मक म्हणून तात्पुरते महत्व असते/असायचे. वेष काढून ठेवला की ही माणसं गरिबीनं पिचलेली कष्टकरी. दिवाळी, दसरा किंवा ठरावीक सणांना किंवा दरम्यान फक्त आता यांचे अस्तित्व दिसते.

प्रचंड पायी चालणं, मिळेल ते घेणं, अधिक पैसे देण्याचा आग्रह/विनवणी करणे आणि हतबलतेनं निघून जाणं हेच या लोकांच्या भाग्यात आलेलं आयुष्य.

मी ज्या सोसायटीत राहतो तिथे पोतराज किंवा नंदीबैलवाला आला की त्याला गेटच्या बाहेर, गाड्यांच्या मध्ये येऊ नये असं उभा रहावं लागतं. एकदा कुडमुड्या जोश्याचा आवाज आला, तेंव्हा मी खाली गेटवर गेलो. सहसा मी अश्या वेळी ५०-१०० जे काही असतील सुट्टे तेवढे पैसे देतो. पैसे दिले की जात विचारतो आणि पोरं-बाळं काय करतात, गाव कुठलं आणि इथवर कसे आला अशी जुजबी माहिती विचारतो. बहुतांश लोक पोरं शाळेत-कॉलेजात शिकतायत असं सांगतात तेंव्हा बरं वाटतं. सोसायटीवाले,सेक्युरिटी या लोकांना सोसायटीत येऊ देत नाहीत. तेवढ ठीक आहे पण गेटजवळसुद्धा इथं नको उभारू, तिकडे जा वगैरे म्हणतात. एकदा असाच कुडमुडा आल्यावर खाली गेलो आणि आधी त्याला सावलीत उभार म्हणालो. तर सेक्युरीटीने इथे उभारू नको म्हणालं असं तो म्हणाला. सेक्युरीटीला बोलवून समजवून सांगितलं. कुडमुड्याला पैसे दिले. तो आलेला सासवड वरून. रेल्वे-बस-वडाप करत तो पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या आमच्या सोसायटीत आलेला.

माझ्या सोसायटीसमोर छोटी कमर्शीयल बिल्डिंग आहे. तिथे बहुरूपी नेहमी भेटतो. पोलिसाच्या वेशात नेहमीचं गिमिक करत पैसे मागतो. तिथल्या एका उत्तर भारतीय दुकानदाराने काठी काढली आणि पोलिसाला बोलवायची त्याला धमकी दिली. यो जरा घाबरून बाहेर जाऊ लागला तेंव्हा मला दिसला. मला नमस्कार केल्यावर नेहमीप्रमाणे पैसे दिले, चौकशी केली तर त्याने झालेला प्रसंग सांगितला. त्याला घेऊन त्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये गेलो. सेक्युरीटीवाला पण उत्तर भारतीय, त्याला काय सांगणार?! मग शेवटी आवाजात जबर आणून म्हणलं, परत ह्यांना हाकललास तर बघ. तिथेच गाडी लावली आणि बहुरूप्याने सगळी दुकानं मागोस्तोवर तासभर बाहेर थांबलो. तो पोलिसाला बोलण्याची धमकी देणारा बाहेरच आला नाही.

हे सगळे भटक्या-विमुक्त जातीचे लोक, फार देवभोळे असतात किंवा संस्कृतीबद्दल ह्यांना फार प्रेम असतं असं नाही, पण वंशपरंपरागत आलेला व्यवसाय किमान काही पैसे मिळावेत म्हणून त्यांनीही पत्करलेला असतो. आणि संस्कृती जपा, ह्यांव करा, त्यांव करा म्हणणारे ह्यांच्या सन्मानासाठी काही करताना दिसत नाहीत. नाही म्हणलं तर भाजप, काँग्रेसमध्ये भटक्या-विमुक्तांना प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय मिळावा म्हणून काम करणारे अनेकजण आहेत (माझ्या ओळखीचे बरेच आहेत यातले.).

पण हे नेमके ख्रिसमसच्या वेळी कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवणारे संस्कृतिरक्षक बिनकामाचे नालायक असतात. जिथे गरज आहे तिथे बोलत नाहीत. भले पैसे देऊ नका पण सामाजिक न्याय आणि आरक्षणाविरुद्ध बोंबलूही नका. तुम्हाला काय संस्कृती जपायची आहे ती तुम्ही जपा. आपल्या मुला-बाळांना पोतराज, बहुरूपी, पिंगळा, वासुदेव बनवा. एवढीच हौस आहे तर या विमुक्तांना (तथाकथित) संस्कृती जपण्याचा पगार द्या, त्यांचे घर चालवा. पण उगा फेसबुकवर कोरडं कोरडं संस्कृतीरक्षण करू नका.

-आशिष शिंदे

त्या शोकाकुल नातेवाईकांना कृपया सांगा, कदाचित त्यांना हे कळेल.छाती दाबून का फोडली?तुमच्या रुग्णाचं हृदय थांबलं होतं.ते च...
12/12/2025

त्या शोकाकुल नातेवाईकांना कृपया सांगा, कदाचित त्यांना हे कळेल.

छाती दाबून का फोडली?
तुमच्या रुग्णाचं हृदय थांबलं होतं.
ते चालू करायला ह्रदयाला बाहेरून दाब द्यावा लागतो.
या दाबाने छाती किमान दोन इंच खालीवर व्हावी लागते. मिनिटाला किमान १०० ते १२० वेळा. (सेकंदात दोनदा)
याला CPR म्हणतात. बरगड्यांवर हृदयाच्या 'धकधक' तालात दाब देऊन त्याला चालतं करणं.
तो दाब बरगड्यांपलीकडे पोचायला तितका जोर लावावा लागतो!
माणूस जगला तर बरगड्या बऱ्या होतात. माणूस जिवंत ठेवायचा जुगार असतो तो.

व्हेंटिलेटरने चेहरा का फुटला?
बेशुद्ध रुग्णाचा श्वास चालायला आत नळी सोडावी लागली, तर त्या नळीने आत जखमा होऊ शकतात. टोचलेल्या भूलीची ॲलर्जी येऊ शकते. पेशंटचं शरीर वाळू नये म्हणून टोचलेल्या सलाईनचं पाणी शरीरात साठून सूज दिसू शकते -बारीक रक्तवाहिन्या फुटू शकतात. हे पाच मिनिटात होत नसतं. अनेक तास - अनेक दिवस घडणारी ही प्रक्रिया असते.
----
या सगळ्या खुणा डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांच्याच आहेत.
आता चुका प्रयत्नांतही होऊ शकतात.
पण तुमचे पैसे घेऊन, जाणूनबुजून तुमचं माणूस मारून विद्रूप कोण करेल?
----

थोडी जागृती वाचकांमध्ये आणा.
उद्या तुम्ही किंवा तुमच्या घरचे कदाचित यामुळेच वाचूही शकतात.
एकीकडे विज्ञान, पुरोगामित्व, जोतीसावित्री अशी टॅणटॅण करायची, त्यानिमित्ताने नाकातून तीर सोडून समाज दुभंग करायचा हलकटपणा करायचा, पण अवैज्ञानिक सनसनाटी पसरवून व्ह्यूझ वाढवून डॉक्टरांबद्दल संशय पेरायचा... ही पापं पेरू नका. तुमच्या आदरस्थानांना हेच डॉक्टर वाचवत असतात. ही पापं आपल्या लाडक्यांवर उलटवणारी कर्मं पेरू नका

-योगेश दामले

१९७० साली हॉटेलमध्ये असणारे दर बघा. त्याकाळी पगारही किमान ३००/४०० प्रतिमहिना असे. आजच्या मानाने त्याकाळी किती स्वस्ताई ह...
11/12/2025

१९७० साली हॉटेलमध्ये असणारे दर बघा. त्याकाळी पगारही किमान ३००/४०० प्रतिमहिना असे. आजच्या मानाने त्याकाळी किती स्वस्ताई होती हे दाखवणारे हे चित्र.

साधेपणाचा महामेरू: गणपतराव अण्णासाहेब देशमुख (आबासाहेब)महाराष्ट्राच्या राजकारणात ५० वर्षांहून अधिक काळ तत्त्वनिष्ठ राजका...
11/12/2025

साधेपणाचा महामेरू: गणपतराव अण्णासाहेब देशमुख (आबासाहेब)
महाराष्ट्राच्या राजकारणात ५० वर्षांहून अधिक काळ तत्त्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे नाव एका अढळ स्थानी आहे. सांगोला मतदारसंघाचे निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जाणारे आबासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर ते साधेपणा, सचोटी आणि लोकनिष्ठा यांचा मूर्तिमंत आदर्श होते.
🌟 ५४ वर्षांची विक्रमी कारकीर्द
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) सदस्य असलेल्या गणपतराव देशमुखांनी सांगोला मतदारसंघातून ११ वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. १९६२ मध्ये सुरू झालेली त्यांची ही राजकीय यात्रा त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत, म्हणजे सुमारे ५४ वर्षे विधानसभेत कार्यरत राहिली.
🚌 साधेपणाची ओळख
आबासाहेबांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पाय जमिनीवरची वृत्ती. आमदार आणि मंत्री असतानाही ते अनेकदा एस.टी. बसने प्रवास करायचे. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांनी कधीही राजकीय पदाचा गैरवापर केला नाही किंवा संपत्ती जमा केली नाही. त्यांच्या याच स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचे "चालते-बोलते विद्यापीठ" म्हणून ओळखले जात होते.
🗣️ कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज
आयुष्यभर त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. सांगोला मतदारसंघाच्या विकासासाठी आणि येथील जनतेच्या मूलभूत गरजांसाठी ते सतत झटले. दोन वेळा (१९७८ आणि १९९९) मंत्रिमंडळात संधी मिळूनही त्यांनी आपले मूलभूत विचार आणि जनतेप्रती निष्ठा कधीही सोडली नाही.
गणपतराव देशमुख यांचे राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी होते. त्यांची ही आदर्श आणि प्रेरणादायी कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमीच लखलखीत तारा म्हणून मार्गदर्शक राहील.

11/12/2025

मानसिकता.

"सर, एक प्रश्न विचारायचा आहे.. विचारू का??", आज आठवितल्या एका विद्यार्थ्याने बिनधास्तपणे विचारणा केली.. प्रायव्हेट कोचिं...
11/12/2025

"सर, एक प्रश्न विचारायचा आहे.. विचारू का??", आज आठवितल्या एका विद्यार्थ्याने बिनधास्तपणे विचारणा केली.. प्रायव्हेट कोचिंग करत असल्याने मुलांना वाट्टेल ते काहीही विचारता येतं.. ऑनलाईन कोचिंग मध्ये तितक्या ओपनली विचारता येत नाही, पण जरा चुणचुणीत मुलं अभ्यास वेळेत संपवून थोड्या अवांतर गप्पासाठी असे काही विषय काढतात..
ठरवलेला अभ्यास वेळेत झाला असेल तर मलाही विशेष चिंता नसते..

"सर, जर आपण अंक मोजायला डेसिमल सिस्टीम वापरतो तर अँगल मोजताना डिग्री वापरतो त्या ३६० का असतात??
चार क्वाड्रंटच्या मिळून ४०० का नसतात?? 🤔"
जनरली हा प्रश्न अनेकांना पडतो, पण आपल्या शाळांमध्ये परिक्षेतल्या मार्क्सना जास्त महत्त्व असल्याने फार कोणी शिक्षक ह्या शंकेचं निरसन करत नाहीत.. अनेकदा तर शिक्षकांनाही ह्याचं योग्य उत्तर माहीत नसतं.. त्यामुळे फजिती होण्यापेक्षा प्रश्नाला बगल देऊन अनेक जण पुढे जातात..

पण हे गणित शिकायचं तर थोडं खगोल बघायला हवं.. आपल्या सुदैवाने भारतीयांनी खगोल विषयात प्रचंड अभ्यास करून ठेवला आहे, पण दुर्दैवाने कित्येक वर्ष परकिय आक्रमक/राज्यकर्त्यांनी तो अभ्यास आपल्यापर्यंत येऊ दिला गेला नाहीये..

पृथ्वीवरून आकाशात सूर्य आणि चंद्र हे प्रमुख गोल दिसतात.. त्यातही चंद्राला ऑबझर्व्ह करणं साध्या डोळ्यांना जास्त सोपं असतं त्यामुळे आपण भारतीय लोक कालगणनेसाठी चांद्रवर्ष प्रमाण मानतो.. सद्ध्या व्यवहारात पाश्चात्यांचं सौरवर्ष रेफरंस म्हणून वापरत असलो तरीही आजही सगळे सण उत्सव आपण चांद्रवर्षाला अनुसरूनच करतो..

चांद्रवर्ष चंद्राच्या कलांवर अवलंबून असतं.. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचवेळी चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो.. चंद्र आणि सूर्य जेव्हा परस्पर विरुद्ध बाजूला असतात तेव्हा पौर्णिमा येते तर दोघेही जेव्हा एकाच बाजूला असतात तेव्हा अमावस्या येते.. ह्या दोन्ही घटनांमध्ये चंद्राच्या १४ कला दिसून येतात.. ह्या काळाला शुक्ल आणि कृष्णपक्ष म्हणतो..

ग्रह ताऱ्यांभोवती फिरतात, पण नक्षत्रांची जागा बऱ्याच प्रमाणात स्थिर असते.. नक्षत्रांची जागा शेकडो वर्षातून बदलली तरी ती नजरेला मात्र अगदीच नगण्य असते.. सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना पृथ्वीवरून १२ नक्षत्र दिसतात..
चंद्राला पौर्णिमा ते पौर्णिमा अशी एक फेरी पूर्ण करायला ३० दिवस लागतात.. तर पृथ्वीला बारा टप्प्यांची सूर्याभोवतीची फेरी १२ राशींमधून पूर्ण करावी लागते.. म्हणजेच चंद्र सर्व बारा राशींमधून फिरून यायला ३० × १२ = ३६० दिवस लागतात..

त्यामुळे भारतासह अनेक प्राचिन संस्कृतींनी हीच पद्धत वापरली आहे.. त्यामुळेच पृथ्वीवर उभ्या काल्पनिक रेषा ज्यांना आपण रेखांश किंवा लाँजीट्युड्स म्हणतो त्याही ३६० मानल्या गेल्या आहेत..
ह्या सर्व कारणामुळे वर्तुळाला ३६० अंश/डिग्री मध्ये मोजलं जातं..

गणिताच्या दृष्टीने बघायला गेलं तर जवळच्या राऊंड फिगर ४०० चे १५ डिवायजर बनत असून ३६० ह्या संख्येचे मात्र तब्बल २४ डिवायजर येतात.. ज्यामुळे जास्तीतजास्त समान भाग करणं सुद्धा सोयीचं होतं..

लेखक- अमेय गोखले

ज्या भागात रस्त्यावर खड्डा दिसेल, तात्काळ तिथल्या आमदार ,खासदाराला, नगरसेवकाला निलंबित करा.आहे का तयारी ?नियम जनतेला आणि...
10/12/2025

ज्या भागात रस्त्यावर खड्डा दिसेल, तात्काळ तिथल्या आमदार ,खासदाराला, नगरसेवकाला निलंबित करा.
आहे का तयारी ?
नियम जनतेला आणि जनतेच्या सेवकांना दोघांनाही लागू झाले पाहिजेत.

काही दिवसांपूर्वी एक तरुण आला होता. रात्रीचे अडीच वाजले होते. अंगावर कुठे जखम नाही, कुठे रक्त नाही, सूज नाही. अंगात जॅके...
10/12/2025

काही दिवसांपूर्वी एक तरुण आला होता. रात्रीचे अडीच वाजले होते. अंगावर कुठे जखम नाही, कुठे रक्त नाही, सूज नाही. अंगात जॅकेट, महागडे शूज, मनगटावर घड्याळ होतं, बऱ्या घरातला असावा. श्रीमंत लोक अशा अवेळी सरकारी दवाखान्यात काही गुन्हा किंवा चुकीचं घडलं तरच येतात.

तो तरुण रुग्ण वाटतच नव्हता. भिंतीवरील घड्याळाकडे पहात मी विचारलं, "काय झालंय?
तो काहीच बोलला नाही तसं पुन्हा विचारलं, "काय झालंय तुम्हाला? रात्री अडीच वाजता का आलात?"
तरीही तो काहीच बोलला नाही.
तो फक्त माझ्याकडे बघत होता. काय प्रकार आहे लक्षात येत नव्हतं. दारू वगैरे पिऊन आलाय की काय अशी शंका येऊन थोडा पुढं सरकलो, अंदाज घेतला पण तसंही काही नव्हतं.
मागं सरकत पुन्हा थोडं मोठ्यानं विचारलं, "काय झालं सांगा?"

पुढच्याच क्षणी तो तरुण माघारी फिरला आणि काहीच न बोलता दरवाजातून बाहेर पडला. हा काय प्रकार आहे म्हणून बाजूच्या डॉक्टरांकडे पाहिलं तर त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो दोन पावलं चालत बाहेर गेला, तो पुन्हा परत आला आणि म्हणाला,
"डॉक्टर मला इथून जाऊ देऊ नका!"

तो नेमकं काय म्हणतोय हे लक्षात येत नव्हतं म्हणून विचारणार तोच तो तरुण बोलला,
"मला इथून जाऊ देऊ नका सर! मी इथून बाहेर गेलो तर माझी बॉडी परत येईल! मला आत्महत्या करायचीय!"
ते वाक्य ऐकून आणि त्याच्या नजरेतील निर्धार बघून नकळत मणक्यातून एक थंड लहर गेली... कारण तो खोटं बोलत नव्हता!

त्याला म्हटलं, "आधी बसून घ्या."
तो नाही बसला. त्या प्रसंगाला कसं हँडल करायचं काही लक्षात येत नव्हतं. तोंडातून वाक्य पडलं,
"मी तुमची काय मदत करू?" तसं तो एक नाव घेत म्हणाला,
"त्या डॉक्टरांना बोलवा... प्लीज आत्ता बोलवा!"

त्याने ज्या डॉक्टरचं नाव घेतलं, ते सायक्याट्रीचे रेसिडेंट डॉक्टर होते. त्याचे हात थरथरत होते. पापण्यांची उघडझाप वाढली होती. प्रचंड अस्वस्थ दिसत होता तो.
तो पुढे बोलू लागला,
"मी खूप अडचणीत आहे डॉक्टर, खूप थकलोय. मी डिप्रेशन मध्ये आहे, माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात आणि त्यासाठी माझी त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू आहे. त्या डॉक्टरांनी एकदा सांगितलं होतं... आयुष्यात स्वतःला संपवायचा अगदी टोकाचा विचार आलाच तर फक्त एकदा मला संपर्क कर, मी कुठूनही येतो! आज ती वेळ आलीय सर, म्हणून मी आलोय. मला जगायचंय पण स्वतःला थांबवू शकत नाही... मला इथून जाऊ देऊ नका नाहीतर इथंच माझं पोस्टमार्टम होईल."

तो शुद्धीत होता, तो खोटं बोलत नव्हता, धमकीही देत नव्हता. तो आतून संपला असावा. पुढच्या क्षणी त्या डॉक्टरांना त्यावेळी फोन केला आणि परिस्थिती सांगितली. ते सायक्याट्रिस्ट एकच म्हणाले,
"मला माहीत आहे तो पेशंट. मी पंधरा मिनिटात पोहोचतो, एका क्षणासाठी सुद्धा त्याला तुमच्या नजरेसमोरून बाजूला होऊ देऊ नका... नाहीतर आज जाणार तो."

फोन ठेवला आणि नजरेनेच त्याला खाली बसायला सांगितलं. तसं त्यानं खिशातून काहीतरी काढलं... हातात सिगारेट होती. त्याला म्हटलं, "ही जागा नाही याची."
ते ऐकून तो माघारी वळला आणि बाहेर जाऊ लागला, परिस्थिती अवघड झाली होती. खरंतर मीच घाबरलो होतो... कारण मला माहीत होतं ... 'हा आत्महत्या करण्यासाठी जातोय'!

पुढच्या काही क्षणात तो कुठेतरी निघून गेला आणि पटकन सिक्युरिटीला त्याला शोधायला सांगितलं. तो मधला काळ हृदयाची प्रचंड धडधड वाढवणारा होता. पाच मिनिटांनी गार्ड त्याला घेऊन आले, तेव्हा जीवात जीव आला. तो समोर उभा होता, त्याच्या हातातील सिगरेट त्याने अजून पेटवलेली नव्हती. डोळे भरून आले होते... मनात काहीतरी प्रचंड सुरू असावं... स्वतःशीच भांडत असावा कदाचित... पण त्याला मार्ग मिळत नसावा!

त्याला खुर्चीत बसवलं. मला कसंही करून तो पंधरा मिनिटांचा 'काळ' पुढं ढकलायचा होता. त्याला नाव विचारलं, गाव विचारलं, काम विचारलं. तेव्हा समजलं की तो एका आयटी कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीवर होता. पाच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि डिव्होर्सची प्रक्रिया सुरू होती! कौटुंबिक वादातून तो नैराश्यात गेला होता.

त्याला प्रश्न विचारत गेलो, हळूहळू तो बोलू लागला, व्यक्त होऊ लागला. बोलतेवेळी डोळ्यातून पाणी येत होतं. कौटुंबिक वादात एक तरुण उध्वस्त झाला होता. त्याचे मागे जाण्याचे किंवा पुढे सरकण्याचे दोन्ही रस्ते बंद झाले होते. त्याच्याच शब्दात 'आयुष्याचं गटार झालं होतं'! तब्बल वीस मिनिटं तो बोलला. काही गोष्टी त्याला समजावून सांगितल्या, तोही व्यक्त झाला. गेल्या काही महिन्यात तो कधीच, कोणाशीच हे बोलला नव्हता...‌‌ आतल्या आत कुढत होता. कदाचित त्याला कोणी हे विचारलंही नसावं!

थोड्या वेळाने ते डॉक्टर आले. त्यांना पाहताच तो उभा राहिला. ते डॉक्टर त्याला घेऊन गेले. मनावरचं ओझं कमी झालं. तो मरण्याच्या निर्धारने आला होता आणि त्याला आपण पंधरा-वीस मिनिटं लांबवलं याचा आनंद होता. पुढच्या पाच-दहा मिनिटांत ते डॉक्टर त्या तरुणाला घेऊन परत आले आणि म्हणाले,
"सर, मी औषधं वगैरे लिहून दिली आहेतच पण हे सांगा की, तुम्ही याला काय बोलले?"
"काही नाही जरा गप्पा मारल्या." मी
तसं ते डॉक्टर म्हणाले, "तो म्हणतोय की, आता त्याच डॉक्टरकडून पुढचे उपचार घ्यायचेत." ते ऐकून चेहऱ्यावर हसू आलं.

तो तरुण पुढे होत म्हणाला,
"सर आत्ताच या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही लेखक आहात आणि ती वेब सीरिज तुमची आहे."
"मी लेखक वगैरे काही नाही, दोन-तीन पुस्तकं आहेत माझी." मी म्हणालो
"तुमच्याकडं बघून वाटत नाही?" तो
"कोणालाच वाटत नाही." मी
तसं तो हसून म्हणाला,
"सर तुमची वेब सिरीज आवडली पण आणखी चांगली बनवता आली असती. मी डॅन ब्राऊनचा खूप फॅन आहे, त्याची सगळी इंग्लिश पुस्तकं वाचली आहेत. अशा सिरीज आपल्याकडे यायला पाहिजेत."

त्यावेळेस कळलं की त्याचं वाचन प्रचंड होतं. अर्ध्या तासापूर्वी आत्महत्या करण्यासाठी आलेला 'तो रुग्ण' आणि समोरचा 'हा तरूण' हे दोघे एकच वाटत नव्हते. एक चांगला पोरगा आज नैराश्यात जाऊन मरायला निघाला होता. त्याला वाचवण्यात अर्धा टक्का तरी देता आला हा आनंद फार छान होता.

तो तरुण म्हणाला,
"पहाटे तीन वाजता एका लेखकाला द्यायला माझ्याकडे एकच एक गोष्ट आहे." असं म्हणून त्यानं खिशातून पेन काढला आणि माझ्या हाती दिला. मीही कसलाही नकार देता तो पेन ठेवून घेतला.

तो परत जायला निघाला तसं सायक्याट्रीचे डॉक्टर म्हणाले,
"पुढच्या वेळेस आलास की माझ्याकडे येऊच नकोस... याच डॉक्टरांना दाखव."
तसं तो हसून म्हणाला,
"आता पुढच्या वेळेस येण्याची गरजच पडणार नाही!"

आमच्याकडे नेहमी वाईटच गोष्टी घडत नाहीत, कधीतरी एखादी फार छान, आनंदाची, समाधानाची गोष्टही घडते. तो तरुण आणि त्यांनं प्रेमानं दिलेली ही भेट कधीच विसरणार नाही...

- डॉ. प्रकाश कोयाडे

10/12/2025

हा आहे नवीन भारत..

१८६८ सालचे पर्वती टेकडीचे चित्रपर्वती टेकडीचे प्रतिबिंब खाली तळ्यात पडले आहे ते 'पर्वतीचे तळे' आहे. ते सारसबागेभोवती असल...
10/12/2025

१८६८ सालचे पर्वती टेकडीचे चित्र
पर्वती टेकडीचे प्रतिबिंब खाली तळ्यात पडले आहे ते 'पर्वतीचे तळे' आहे. ते सारसबागेभोवती असलेले भव्य तळे पेशव्यांनी बांधले होते. आज ते अस्तित्वात नाही. टेकडी व त्यावरील देवस्थान, खालचे तळे, तळ्याभोवती निर्मित बागा, मध्यभागी असलेला सिद्धिविनायक गणपती हा भाग त्याकाळी किती नयनरम्य असावा हे चित्रातून स्पष्ट होते.

आज महाराणी ताराबाई यांचा पुण्यस्मरण दिन !10 डिसेंबर 1761 सातारा किल्ल्यावर महाराणी ताराबाईंचे निधन झाले. त्यांच्या पार्थ...
10/12/2025

आज महाराणी ताराबाई यांचा पुण्यस्मरण दिन !

10 डिसेंबर 1761 सातारा किल्ल्यावर महाराणी ताराबाईंचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संगम माहूली येथे अंत्यसंस्कार ही करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची समाधी ही बांधण्यात आली होती. पण कालोघात त्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज त्या ठिकाणी दोन-चार पाषाणातील अवशेष सोडले तर नाही चिरा नाही पणती अशी अवस्था आहे. या समाधीच्या जिर्णोद्धारासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पण दुर्दैवाने हे तडीस जात नाहीत. खरे तर 10 डिसेंबर हा महारणी ताराबाईंचं निधन दिन आहे. महाराष्ट्रातील महान इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे महाराणी ताराबाई यांचे चरित्रकार. त्यांच्या नुकत्याच नव्याने प्रकाशित झालेल्या महाराणी ताराबाई या ग्रंथात ही हीच 10 डिसेंबर 1761 ताराबाईंचं पुण्यस्मरण दिन देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी रंगूबाई साहेब जाधव, (मूळच्या बेळगावच्या असणाऱ्या या महिलेने 1940 मध्येच महाराणी ताराबाई यांचे चरित्र शब्दबद्ध करून ठेवले होते, लौकीक अर्थाने रंगूबाईसाहेब जाधवांनी लिहिलेले हे चरित्र महाराणी ताराबाईंचे पहिले चरित्र असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.) या कर्तुत्वान महिलेने महाराणी ताराबाईंचे जे चरित्र "मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई" या नावाने लिहिले होते. त्या चरित्राचे संपादन करताना मी त्या ग्रंथामध्ये 10 डिसेंबर 1761 हीच निधन तारीख निश्चित केली होती. यासाठी समकालीन आणि उत्तरकालीन साधनांचा आधार घेतला होता. महाराष्ट्रातील तमाम इतिहास अभ्यासकानी या गोष्टीची नोंद घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे.

महाराणी ताराबाईंची कीर्ती खरंतर आज अखिल विश्वाच्या पातळीवर चमकायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं आपलाच इतिहास मांडण्यात आपण वारंवार कमी पडतोय हे यावरून लक्षात येतंय.

मराठ्यांची एक कर्तुत्वान महिला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून औरंगजेबासारख्या तत्कालीन जगातील शक्तिशाली सम्राटाशी झुंज देते आणि त्याला या महाराष्ट्राच्या मातीतच गाडते! एका महिलेने गाजवलेला असं कर्तत्व जगाच्या इतिहासाची पाने कितीही बारकाईने अभ्यासली, चाळली तर आपल्याला उपलब्ध होत नाही! एवढं महत्त्वाचं कर्तृत्व असणाऱ्या शौर्यशाली, धैर्यशाली, पराक्रमी, वीर अशा महाराणी ताराबाईंचा इतिहास आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यांच्या इतिहासामध्ये वाद होऊ नये त्याची काळजी घेतली पाहिजे. महाराणी ताराबाई या फक्त शिवाजी महाराजांच्या स्नृषाच नव्हत्या तर महाराणी ताराबाई या मराठ्यांच्या पराक्रमाचे एक प्रतीक आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे! असं मला वाटतं.

महाराणी ताराबाईंचा इथून पुढचा पुण्यस्मरण दिन आपण १० डिसेंबरलाच त्यांना अभिवादन, मुजरा , जोहार करू!!!

इंद्रजित सावंत, कोल्हापूर.

Address


411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजिंठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अजिंठा:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share