09/06/2026
कवी नैनेश तांबे यांच्या ‘या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नैनेश तांबे यांच्या आई-वडिलांच्या शुभहस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हा क्षण उपस्थितांसाठी विशेष भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नितीन शिंदे यांनी पुस्तकाचा प्रवास, त्यामागील भावना आणि नैनेश यांच्या काव्यलेखनाविषयी अत्यंत समर्पक भाष्य केले. प्रकाशक म्हणून मनोगत व्यक्त करताना आ. अमृता तांदळे मॅडम यांनी पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया, प्रकाशकाच्या दृष्टीने या संग्रहाचे महत्त्व आणि या पुस्तकामागील साहित्यिक मूल्य याविषयी आपले विचार मांडले.
नैनेश यांचे जवळचे मित्र आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अपूर्व राजपूत यांनी नैनेश यांच्या कवितांचा, त्यांच्या दीर्घ मैत्रीचा आणि एकूणच समकालीन काव्यविश्वाचा वेध घेतला. आजच्या काळात नैनेश यांची कविता का महत्त्वाची आहे, तिच्यातील प्रामाणिकपणा आणि माणसांशी जोडून घेण्याची ताकद याविषयी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षणांपैकी एक क्षण म्हणजे नैनेश यांचे वडील संतोष तांबे यांचे मनोगत. उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानताना मुलाविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.
मित्र म्हणून मनोगत व्यक्त करताना सारंग पांपटवार यांनी नैनेश यांच्या कवितेची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली. नैनेश हे केवळ सामाजिक विषयांवर लिहिणारे कवी नसून सामाजिक चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे, हा त्यांचा अनुभव त्यांनी मांडला. नैनेश यांच्या कवितेचे महत्त्व आणि तिच्या आशयातील सामाजिक बांधिलकी यावर त्यांनी विशेष भाष्य केले.
प्रमुख उपस्थिती असलेल्या अभि मुंढे यांनी नैनेश यांच्या कवितेइतकंच त्यांच्या माणूसपणाचं आणि सच्चेपणाचं मनापासून कौतुक केलं. त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा उल्लेख करताना त्यांनी नैनेशविषयी आपले जिव्हाळ्याचे विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. स्वप्निल चौधरी यांनी नैनेश यांच्या कवितेच्या सामाजिक अंगावर भाष्य केले. समाजातील विविध प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि त्या अनुभवांना कवितेतून अभिव्यक्त करण्याची ताकद याविषयी त्यांनी आपले मनोगत मांडले.
कवी म्हणून मनोगत व्यक्त करताना नैनेश तांबे यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि रसिक यांचे मनःपूर्वक आभार मानले. पुस्तकाविषयी आणि आपल्या जवळच्या माणसांविषयी बोलताना त्यांच्या भरून आलेल्या डोळ्यांतून एक संपूर्ण प्रवास दिसत होता. कविता लिहायला सुरुवात केलेल्या पहिल्या दिवसापासून ते स्वतःचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होईपर्यंतचा! त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक आठवणी तरळत असाव्यात, असे प्रत्येकालाच वाटून गेले.
अध्यक्षीय समारोपात सुरेशकुमार वैराळकर (अण्णा) यांनी नैनेश यांच्या कवितेचा, त्यांच्या माणूसपणाचा आणि आजच्या तरुण पिढीच्या साहित्यिक जाणीवांचा गौरव केला. नव्या पिढीविषयी आशावाद व्यक्त करत त्यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाला एक सुंदर पूर्णविराम दिला.
एकूणच हा प्रकाशन सोहळा केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नव्हता; तो मैत्रीचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि कवितेच्या खरेपणाचा उत्सव होता. विशेष म्हणजे नैनेश यांचं यश हे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं वैयक्तिक यश वाटत होतं. ही भावना, हा जिव्हाळा आणि हे सामूहिक आनंदाचं रूपच कदाचित या संपूर्ण सोहळ्याचं सर्वात मोठं यश ठरलं.