08/06/2026
आव्हाळवाडी गावच्या हद्दीत लोकवस्ती जवळ रात्री कचरा जाळला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वाघोलीतील कचरा आव्हाळवाडीत
वाघोली टाईम्स : लोकवस्तीशेजारील मोकळ्या माळरानावर दररोज रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या दाट धुराचे लोट थेट लोकवस्तीत पसरत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आव्हाळवाडी दत्तविहार येथील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा कचरा जाळण्याचे प्रकार मागिल काही दिवसा पासून सुरू आहे.प्लास्टिक, कागद तसेच औषधी गोळ्यांच्या स्ट्रीप इतर घातक पदार्थ जाळले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या कचऱ्यातून निघणारा धूर वाऱ्यासोबत घरांपर्यंत पोहोचत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,महिला,तरुणांना त्रास सहन करावा लागत आहे. प्लास्टिक व इतर घातक कचरा जाळल्याने वातावरणात विषारी वायू निर्माण होतात. यामुळे दमा, फुफ्फुसांचे आजार तसेच इतर गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. तसेच या प्रकारामुळे परिसरातील वायूप्रदूषणात मोठी वाढ होत आहे.
लोकवस्तीच्या अगदी जवळ सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर या कचऱ्यात वाघोलीतील एका हॉटेलची बिले आढळल्याने वाघोलीतील हॉटेलचा कचरा या ठिकाणी टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कचरा जाळण्याचे प्रकार त्वरित बंद करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.