Samkaleen Publication

Samkaleen Publication समकालीन प्रकाशन - समकालीन सामाजिक वास्तवाचा शोध घेणारी पुस्तकं.

नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणा

रे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.

खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीचील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.

साधे सुंदर श्रीनिवास- अनिल अवचट‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी' अशा संपूर्ण नावाने लिहिणारा हा लेखक. नुसतं ‘श्रीनिवास कुलकर्ण...
07/08/2026

साधे सुंदर श्रीनिवास

- अनिल अवचट

‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी' अशा संपूर्ण नावाने लिहिणारा हा लेखक. नुसतं ‘श्रीनिवास कुलकर्णी' का लिहित नाहीत, हा प्रश्न तेव्हा पडला होता. पण नंतर ओळख झाल्यावर कळलं, की ते औदुंबरच्या घराशी मनाने, प्रत्यक्ष किती निगडित आहेत ते. आमच्या घरी आले, सुनंदाची चौकशी, आई अलीकडे इथे असते, तर तिची चौकशी, मुलींची दखल... असं करत ते माझ्याकडे येणार. ‘मी लेखक' असा भाव कधीही नसतो. ते आहेत अगदी घरेलू माणूस. घरेलू म्हणजे घरात नुसता राहणारा नव्हे, तर रमणारा.

खूप वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकात कराडला पुरस्कार घेण्यासाठी मी, सुनंदा, मुली गेलो होतो. तिथे रस्त्यात ते भेटले. म्हणाले, ‘चलता का घरी, साबुदाणा भिजवलेला आहे.' आम्हीही पुढे कुठे जात होतो ते विसरून त्यांच्या, त्यावेळच्या गावातल्या घरी गेलो. ललिताताईंनी छान खिचडी केली. किती वर्षं झाली पण मुलींना ती खिचडी लक्षात आहे.

त्यांच्या लिखाणात हा घरेलूपणा तर आहेच. पण साध्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींत रमणंही आहे. ते गप्प असतात. पण गप्प म्हणजे शून्यात नव्हे. ते काहीतरी पाहत असतात. आपल्याला क्षुल्लक वाटतील, पण त्यांना त्या किती महत्त्वाच्या बाबी वाटत असतात. त्यांचे काही लेख, तर कविताच वाटाव्यात, असं तरल.

नंतरच्या काळात ते गावाबाहेर ‘कोयना वसाहती'त राहायला गेले. मागे टेकडी, बाजूला झाडं. मी कोल्हापूरला जाताना वेळ असला की, कराडला थांबतोच. त्यांच्याकडे आधी चहा, गप्पा, मग जेवण. आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघायचं. ललिताबाईंच्या हातचं सुग्रास जेवण. एकदा त्यांनी केलेली सोलकढी इतकी आवडली की, मी पीतच सुटलो. मग कृती विचारली. मी डायरीत लिहू लागताच श्रीनिवास म्हणाले, “थांबा. मीच लिहून देतो.” माझ्या डायरीत त्यांनी रेसिपी लिहून काढली. त्यांचं अक्षर इतकं सुंदर आणि सुवाच्च, की बस्स. बाकी डायरीत माझ्या कशाही, वर रेघा नसलेल्या अक्षरांतल्या नोंदी, पत्रं. आणि मध्येच ओॲसिस दिसावं, तशी त्यांच्या अक्षरातली सोलकढीची कृती.

मग जेवण झाल्यावर निघताना पोहोचवायला सगळे बाहेर येणार. मीही कॅमेरा काढून त्या त्या वेळच्या पोराबाळांसहित, वेगवेगळी समीकरणं करत फोटो काढतो. नंतर त्याच्या प्रतीही पाठवतो. हा सगळा आनंदाचा भाग. आता आर्किटेक्ट होऊन व्यवसाय करणाऱ्या उदयन आणि आलोक या मुलांना मुलं झालीत. बहुतेक सगळी माझ्या कॅमेऱ्या‘खालून' गेली आहेत.

त्यांची पुढची खोली पुस्तकांनी भरलेली. अंकांचे गठ्ठे रांगेत. कशावर धूळ नाही. कसले कागद, कपटे इतस्ततः पसरलेले नाहीत. असा शांत माणूस एकेकाळी ‘ओगले ग्लास वर्क्स'सारख्या तप्त कारखान्यात कामाला होता. पुढे ते काम सोडलं. पण मला ते काम पाहायची इच्छा होती, म्हणून त्यांनी मुद्दाम नेऊन तो कारखाना दाखवला होता. तो काचेचा तप्त रस, त्यात धातूची लांब नळी बुचकळून घेऊन फुंकणारे कामगार. त्यातून होणारे काचेच्या पोकळ गोळ्यांचे, भांड्यांचे विविध आकार...

श्रीनिवासांच्या या भेटीगाठी नंतरच्या. सुरुवातीला माझ्यात त्यांच्यात किंचित अंतरच होतं. दुरावा म्हणावा, तर संबंधच आला नव्हता. पण सुरुवातीच्या काळात मी लिहीत होतो, त्याला ‘ललित गद्य' म्हणावं की नाही, असा समीक्षकांमध्ये वाद चाललेला. तो पेपरातून, मासिकातून व्यक्तही होत असे. मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. पण ‘हे ललित साहित्य नाही' असं म्हणणारे समीक्षक, ‘खरे ललित साहित्य कोणते, तर श्रीनिवास विनायक कुलकर्णींचे', असा हमखास उल्लेख करत. त्यामुळे मला उगाचच वाटे, की त्यांच्या साहित्यात जे आहे, ते माझ्यात नाही. आता कळतंय, की या तुलनेत काही अर्थ नाही. इतकं ते वेगळं आहे.

आणखी एक दुराव्याचा क्षण. हो, आता मात्र त्याला दुरावाच म्हणूयात. मी दरवर्षी ‘मौज' दिवाळी अंकात लिहित आलेलो. संपादन राम पटवर्धनांकडे. जूनच्या सुमारास ‘काय लिहिताय?' या अर्थाचं पत्र यायचं. किंवा मी जाऊन भेटायचो. ते निवृत्त झाले. त्या वर्षीपासून श्रीनिवासांच्याकडे ते संपादन आलं. मी जूनमध्ये फोन केला, तर ते म्हणाले, “यावेळेस आम्ही अंकाची वेगळीच रचना केली आहे.”

“मग त्यासाठी माझे लिखाण नको आहे का?”

“नको.” या एका शब्दाने डोंब उसळला. ‘मौजे'त माझा लेख नाही? मग इतकी वर्षं निष्ठेने लिहीत राहिलो त्याचं काय, वगैरे वगैरे. मी श्री. पुं.ना माझ्या भावना व्यक्त करणारं पत्र लिहिलं. त्यात खूप कांगावा केला असावा. नंतर श्रीनिवासांचा शांत सुरात फोन आला, ‘तुमचं लिखाण हवं आहे. काय लिहिताय?' त्यानंतर सगळं बदललंच. ही जबाबदारी स्वीकारताना काही दगडांना मान द्यावा लागतो, हे त्यांना माहीत नसावं. नंतर ते जूनमध्ये घरी येऊ लागले. काय काय लिहिलंय विचारून लेख मागायचे. तोवर लिहिलेले तिन्ही-चारही लेख काळजीपूर्वक वाचून एक उचलून म्हणायचे, ‘हा आम्हाला द्या.' ते मितभाषी. त्याबाबतीत ते श्री.पु. भागवतांचे शिष्यच जसे. श्री.पुं.कडे

त्यांच्या सायनच्या घरात श्रीनिवास बसलेले भेटले आहेत. पण तिथे ते आणखीच गप्प, आणि नम्र. पूर्वी शाळेत गुरुजी म्हणायचे ना, ‘हाताची घडी, तोंडावर बोट.' श्रीनिवासांची हाताची घडीही होती, आणि तोंडावर तिरपं बोटही असे. श्री. पुं. कडून लिखाणाला पावती दुर्लभ, तसंच श्रीनिवासांचंही. ‘हा लेख आम्हाला द्या', एवढ्या वाक्यात ती पसंती, ते आवडणं, ते कौतुक... सगळं काही मिळायचं.

एकदा असेच सकाळी आले, तेव्हा मी फोडणीचा भात करत होतो. त्यांनाही आग्रह केला. त्यांना तो खूप आवडला. म्हणाले, “तुम्ही या साध्या पदार्थाला किती प्रतिष्ठा दिलीत. आम्ही फोडणीवर भात टाकतो आणि ढवळतो. तो फोडणीचा भात. तुम्ही कांदा चिरून घातलात. शिवाय त्यात दाणे घातलेत, कोथिंबीर घातलीत, लिंबू पिळलेत. वर खोबरं किसून घातलेत. किती लाड केलेत या साध्या पदार्थाचे.” मध्ये मी सकाळी त्यांना कराडला फोन केला, तर म्हणाले, “अगदी तुमच्या पद्धतीने फोडणीचा भात करतोय. तुमच्याकडे तो खाल्ला तेव्हापासून आमच्या घरीही फोडणीचा भात, फोडणीची पोळी या पदार्थांना तशीच प्रतिष्ठा आली आहे.”

पूर्वी ते मुंबईला ‘मौजे'ची कामं करण्यासाठी पंधरा दिवस थांबत, उरलेले पंधरा दिवस कराडला घरी. त्यामुळे वाटेत पुण्याला थांबायचे. माझ्याकडे आणि इतर लेखक वा अन्य मित्रांकडे जाणं-येणं असायचं. घरी स्क्रिप्टचे गठ्ठे घेऊन जात. तपासायला, वाचायला.

मी कराडला जायचो, तेव्हा ते मला प्रकाश नारायण संतांकडे घेऊन जायचे. संत मला त्यांनी जमवलेले, सर्वत्र मांडलेले छोटे-मोठे दगड दाखवायचे. ते भूशास्त्रज्ञ तर मी भूशास्त्राचा हौशी विद्यार्थी. संतांना लिहायचा आग्रह करण्यात श्रीनिवासांचा मोठाच वाटा असणार. त्यांनी काही लिहिलं की ते आधी ‘मौज' दिवाळी अंकात, आणि नंतर ‘मौज प्रकाशना'तर्फे पुस्तक रूपात नंतर प्रसिद्ध होत गेलं. म्हणून हा एक अंदाज. संत गेल्यावर त्यांच्या पत्नींनी त्या दोघांच्या सहजीवनाविषयी लिहिलं. ते लिखाण श्रीनिवासांनी लक्षपूर्वक वाचून संपादित केलं. जवळपास वर्षभर त्या लिखाणावर काम करताना मी त्यांना पाहत होतो. (श्रीनिवास यांचा यशवंतराव चव्हाणांशीही दाट स्नेह होता. त्यांच्या आठवणी मधूनमधून वर येत.) त्यांच्या या लेखक वर्तुळात त्यांनी मलाही सामावलं. ढग दाटून आलेत. लाईट गेलेत. त्यांच्या घरात फळ्यांवरील, पुस्तकांच्या रांगांमध्ये, मासिकांच्या चळतीमध्ये या काहींबरोबर छान जिवाभावाचं बोललो, ते क्षण आजही आठवतात.

आता त्यांना प्रवास जास्त झेपत नाही. म्हणून जाणं-येणं कमीच झालंय. वयाने पंचाहत्तरी ओलांडलीय. सांधेदुखीही त्रास देत असतेच. पण ‘मौजे'च्या काही पुस्तकांच्या संपादनाचं काम ते घरी राहून करतात. त्यात माझ्या अलीकडच्या काही पुस्तकांचं काम त्यांनी केलंय. कधी कधी त्यात उशीर होतो. कारण आधीचं पुस्तक संपल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचा नाही, अशी त्यांची पद्धत. पण एकदा हातात घेतलं की एकदम काटेकोर काम. त्यांच्यामुळे मला कळलं, मी काही शब्द चुकीचे लिहीत होतो ते. इतरांच्या पुस्तकांमध्ये काटछाट, संपादनाचं काम असतं, ते माझ्याबाबतीत नसतं. माझं पुस्तक म्हणजे, आधी प्रसिद्ध झालेल्या लेखांचं संकलन असतं. त्यावेळेला संपादन झालेलंच असतं. पण तरी शब्द न् शब्द पारखून घेतात. कुठे अडलं तर शंका लिहून ठेवणार. चार-सहा शंका साठल्या, की फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत (त्यांच्या एका मुलाने, आलोकने पुण्यातच घर केलं आहे.) त्या शंका विचारणार. एखाद्या गावाकडच्या शब्दाविषयी त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ‘याला असं म्हणतात तुमच्याकडे? किती छान.' एखादा शब्द बदलावा वाटला तर बदला, मला विचारूच नका, असं सांगूनही तसा बदलावा वाटलं, तर आर्जवाने विचारणार, ‘या ऐवजी हा शब्द वापरला तर? तो जास्त योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटतं?

‘जगण्यातील काही', ‘दिसले ते' ही पुस्तकं त्यांनीच संपादित केली. त्यानंतरचं ‘शिकविले ज्यांनी' हे पुस्तकही त्यांनी जीव ओतून संपादिलं आहे. मी त्यात घातलेला ‘माझा शिवबादादा' हा लेख त्यात बसत नाही, हे त्यांनी असंच आवर्जून सांगितलं.

मी म्हणालो, ‘पण त्याने मला तर खूप शिकवलंय. मग या पुस्तकात तो का नको?'

‘इतर लेखांची शैली आणि या लेखाची शैली फार वेगळी आहे, म्हणून म्हणतो.'

मला त्यांचं म्हणणं पटलं. इतर लेख वस्तुस्थिती, अनुभव साध्या शब्दांत सांगणारे, तर हा जरा लडिवाळ शैलीतला लेख. मी त्याला मान्यता दिली.

या पुस्तकाच्या वेळी फोनवर म्हणाले, ‘हे पुस्तक फार चांगलं झालंय.'

मी ‘फार' या शब्दाने शहारलोच. जसं झाड वाऱ्याने हलावं, आणि फुलं अंगावर पडावीत.

मध्ये पुण्याच्या ‘साहित्य परिषदे'ने त्यांचा ‘जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मान केला. मला इतका आनंद झाला, की बस्स. जसा माझाच तो गौरव. हा कधीच व्हायला हवा होता. आणखी मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. सातत्याने, हळूवार, मनातलं लिहिणाऱ्या एका लेखकाचा हा सन्मान. हा त्यांच्या ऋजुतेचा सन्मान, हा काटेकोर संपादनाचा सन्मान. दर्जाच्या आग्रहाचा

सन्मान. कशाकशाचा करणार, सगळंच तिथे मोठं आणि चांगलं आहे. त्यांच्या लिखाणाने साहित्याला एक वेगळा मूड दिला, काय काय सांगावं?

त्या सभेतही किती थोडं बोलले ते. खरं तर तो दिवस त्यांचा होता. मितभाषी म्हणजे किती मितभाषी?

औदुंबरच्या कौलारू, जरा अंधाऱ्या म्हणावं अशा त्यांच्या घरातली संध्याकाळ आठवते. पलीकडे तुडुंब भरलेलं कृष्णेचं पात्र. या जुन्या घरात त्यांच्या कुटुंबातली माणसं जमलेली. साधी, एकमेकांशी जोडलेली. खूप गप्पा, गाणी झाली. सगळ्यांना श्रीनिवासांविषयी वाटणारं अगत्य शब्दांतून, कधी निःशब्दातून जाणवलंच तेव्हा. हाच असेल का श्रीनिवासांच्या घरेलू, सज्जन आत्मीयतेचा स्रोत? याच साध्यासुध्या माणसांमधून पाझरले असतील का, श्रीनिवासांच्या ललित लेखनाचे झरे? आपलं कर्तृत्व कधीही न सांगण्याचा नम्र अभिजातपणा? मनात किल्मिष न ठेवता सहजपणे माझ्याकडे लेख मागायला येण्यातला निगर्वीपणा?

काय काय शिकावं या माणसाकडून?

कुणी म्हणेल यांच्या साहित्यात अमुक नाही, तमुक नाही, सामाजिक दृष्टिकोन नाही की बदलाचा ध्यास नाही. कुणी ‘खास मध्यमवर्गीय' असा शिक्काही उठवतील. मी सामाजिकतेकडे झुकलेला असूनही वाटतं, हे आरोप त्यांना लागू होत नाहीत. त्यांच्यात आहे सच्चेपणा. मग त्या सच्चेपणाचा परीघ लहान असला तर काय झालं? तो इतका सच्चा आहे, की तो वैश्विकही होतोच. त्यांच्या जीवनाशी ते प्रामाणिक राहिले. त्यांनी त्या जलाशयातले तरंग अनुभवले. सृष्टीचा कानोसा घेतला. त्यांना जे मिळायचं ते आपोआप मिळालं. आणि ते आपसूकपणे त्यांच्या लेखनात उतरलं.

त्यांचा एक गुण घ्यावा वाटला तर काय घ्यावा? त्यांचं साहित्यातलं आणि घरचं, खासगी व्यक्तित्व यात काही फरक नाही. ते साधं आहे आणि सुंदर आहे. म्हणून तर मी त्यांच्या (त्यात साहित्य आलंच) प्रेमात पडलोय.

(समकालीन प्रकाशनच्या 'जवळचे' या पुस्तकातून साभार.)
___________________________________

• पुस्तक: जवळचे (व्यक्तिचित्रण/ललित)
• लेखक : अनिल अवचट
• मूळ किंमत : ₹ 250/-
• सवलत किंमत : ₹ 200/- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287

#अनिलअवचट #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #समकालीनप्रकाशन #वाचनसंस्कृती #पुस्तकप्रेमी

रोबस्ट सुर्वे - सुभाष अवचटनारायणरावांची आणि माझी गमतशीर मैत्री होती. पुण्यात आले की कवी नारायण सुर्वे हे दि. के. बेडेकरा...
07/08/2026

रोबस्ट सुर्वे

- सुभाष अवचट

नारायणरावांची आणि माझी गमतशीर मैत्री होती. पुण्यात आले की कवी नारायण सुर्वे हे दि. के. बेडेकरांकडे यायचे. दि. के. बेडेकर म्हणजे मोठे तत्त्वचिंतक, विचारवंत, समीक्षक. त्यांची व माझी मैत्री होती. बेडेकरांचा मुलगा सुधीर- हा माझ्या वयाचा व तोही माझा मित्र.

मैत्रीला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे त्यांच्याकडे माझं येणं-जाणं असायचं. नारायणराव त्यांच्याकडे आले की आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचो. जवळच ‘पूनम’ हॉटेल होतं. तिथं बसायचं, गप्पा मारायच्या, खायचं, प्यायचं व रात्री उशिरा बाहेर पडायचं.

एकदा गप्पा मारता मारता पान खायची इच्छा झाली. जंगली महाराज रोडवर बेडेकरांचा बंगला. रात्री चालत चालत निघालो. पान खाल्लं. थंडी पडलेली. तिथं बाटाचं दुकान होतं- आजही आहे. त्याच्या पायरीवर बसलो. मी म्हणालो, ‘नारायणराव, काहीतरी ऐकवा.’ रात्रीचा दीड वाजला होता. त्यांनी ‘माझे विद्यापीठ’ ऐकवली आणि एकापाठोपाठ एक अशा ‘विद्यापीठा’तल्या सर्व कविता ऐकवल्या. पहाट तिथंच झाली.

आमची मैत्री म्हणजे चहा. नारायणरावांना चहा, सिगारेट आवडायची. हाताचं मधलं बोट आणि पहिल्या बोटाच्या चिमटीत सिगारेट पकडून ते ती ओढायचे. कितीतरी वेळा त्यांचे मित्र बाबूराव बागुल किंवा अमकेतमके- त्यांच्यासोबत रात्र- रात्र जागवायचे. सोबत चहा हवा. बाकी काही नाही. नारायणरावांनी कितीतरी भोगलं होतं, ते त्यांच्या शरीरावर होतं.. चेहऱ्यावर होतं. मागे वळवलेल्या केसांतून हे सारं दिसायचं.

मी त्यावेळी विद्यार्थी होतो. पुण्यात मॉडर्नला. कमर्शिअलचा विद्यार्थी होतो. परीक्षा द्यायला जे. जे. स्कूल ऑफ आर्टला यावं लागायचं. तर मी एकदा परीक्षेला आलो होतो मुंबईला. ‘आऊटडोअर फोटोग्राफी’ हा विषय होता. ते आम्हाला एक कॅमेरा द्यायचे. इनडोअर आणि आऊटडोअर फोटोग्राफी असं दोन्ही करायला लागायचं. म्हणजे त्यांना कळायचं, की उन्हात काढलेल्या फोटोसाठी या मुलाला नीट एक्स्पोजर देता आलं की नाही? आर्टिफिशल लाइटमध्ये ते एक्स्पोजर नीट देता आलं की नाही?

तर मी आऊटडोअर फोटोग्राफीसाठी जे. जे.मधून बाहेर पडलो. आम्हालाच आमचे फोटोग्राफीसाठीचे सब्जेक्ट निवडावे लागत. आम्हालाच फिल्म धुवावी लागत असे. तिचे प्रिंट्स घ्यावे लागत असत. त्या फोटोमागे क्लिक करताना एक्स्पोजर किती वगैरे माहिती लिहावी लागत असे. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीवरून पुढे आलो. समोर बोरीबंदर. (म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!) एकोणिसशे सत्तरच्या दशकातली ही गोष्ट.

त्यावेळी रस्त्याला उंच डिव्हायडर नसायचे. रस्त्याच्या मधे शेजारी शेजारी दोन-दोन दगड लावून रस्ता दुभागलेला असे. भर दुपारी बारा-एकचा सुमार असेल. त्यावेळी त्या डिव्हायडरच्या चार दगडांवर एक माणूस हात उशाला घेऊन शांतपणे झोपलेला मला दिसला. भर उन्हात. इकडनं तिकडनं वाहनं वाहताहेत आणि हा मध्ये डिव्हायडरवर झोपलेला.

मी तो फोटो क्लिक केला. नंतर नारायणरावांचं ‘माझे विद्यापीठ’ पॉप्युलर प्रकाशनाने काढायचं ठरवलं. कव्हरसाठी ते माझ्याकडेच आलं. मी कव्हरवर तोच फोटो दिला. ते पुस्तक आणि ते कव्हर खूप गाजलं. आजही तेच कव्हर आहे. नारायणरावांनी तर येऊन मला मिठीच मारली. मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, तेच विद्यापीठ आहे. त्या रात्री पुण्यातल्या रस्त्यावर.. बाटाच्या दुकानाच्या पायऱ्यांवर ऐकवलेलं.’’

त्यानंतर नारायणरावांच्या सर्व पुस्तकांची कव्हर्स मीच केली. त्यांच्या ‘जाहीरनामा’ किंवा कुठल्या तरी एका कवितासंग्रहाचं प्रकाशन साहित्य संमेलनात करायचं ठरलं होतं. फारसा अवधी नव्हता. मी त्यावेळी परदेशात गेलो होतो. नारायणरावांनी पॉप्युलर प्रकाशनाला सरळ सांगितलं, ‘‘सुभाष येईपर्यंत थांबू या. कितीही महिने लागोत, तोच कव्हर करेल.

त्यानंतर पुस्तक प्रकाशन करू या.’’ मी तीन महिन्यांनंतर परतल्यावर ते कव्हर केलं, त्यानंतर ते पुस्तक प्रकाशित झालं. पुढे नारायणराव गेल्यानंतर पॉप्युलरने ‘सुर्वे’ हे पुस्तक करायचं ठरवलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं माझ्या मनावर जे इम्प्रेशन पडलं होतं, त्यानुसार त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी कारखाने वगैरे सारं काही असलेलं एक पेंटिंग मी वापरलं. ते नारायणरावांना आवडलं असतं. त्या ग्रंथाचं नाव ‘सुर्वे’ हेही मीच सुचवलं होतं. असं आमचं प्रेम होतं.

मी त्यांच्याबरोबर खूप राहिलोय. चिंचपोकळीला, नाशिकला, पुण्याला.. आणि कुठे कुठे. जेव्हा ते चिंचपोकळीला राहत होते तेव्हा मी विद्यार्थीच होतो. कित्येकदा त्यांच्या घरी उतरायचो. चाळच होती ती. बाहेर सतरंजी टाकून झोपायचो. नारायणरावांकडे त्यांचे अनेक मित्र, बाबूराव बागुलांसह अनेक कविमित्र, चळवळीतली माणसं अशी सारी यायची. रात्री गप्पा मारत बसायची.

अपरात्री बाहेर पडून चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवर जाऊन ग्लासातून चहा प्यायची. मला त्यांच्यासोबत ठेवायची. ते सारं इतकं साधं, इतकं साधं असायचं, की बस! मग तिथूनच मी कामाला निघून जायचो.

नंतर मी स्टुडिओ थाटल्यावर पुण्यात आले की नारायणराव तिथं यायचे. माझ्याकडेच उतरायचे. वर कसलाही त्रास नाही. जे जेवायला असेल ते जेवायचे. आम्ही कधी बाहेर जेवायला जायचो. घरी आल्यावर त्यांना झोपायला गादी वगैरे नको असायची. मला सांगायचे, ‘‘सुभाष, मला बेड वगैरे देऊ नकोस. एक सतरंजी दे. उशीही नको.’’ जमिनीवर सतरंजी टाकून डावा हात उशाला घेऊन हा कवी शांतपणे निजायचा.

आम्ही दोघे कित्येकदा नाशिकला तात्यासाहेबांकडे- म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांच्याकडे जायचो. ते नारायणरावांना मुलगा मानायचे. नारायणरावांच्या मोठय़ा मुलाची बायको ही नाशिकची. तात्यासाहेबांनीच सारं जुळवलं होतं, आणि त्या लग्नाला ते मुलीकडून आले होते.. असा त्या दोघांचा स्नेह. तात्यासाहेबांना रात्री उशिरापर्यंत झोप यायची नाही.

मग ते फिरायला बाहेर पडायचे. त्यांना कोणीतरी सोबत लागायचं. काही वेळा त्यांचा नाभिकही त्यांच्यासोबत फिरायला जायचा. तर आम्ही नाशिकला गेलो की मग रात्री तात्यासाहेब, नारायणराव व मी असे फिरायला बाहेर पडायचो. सोबत माझा नाशिकचा मित्र हेमंत टकलेही असायचा. मी त्याच्याकडेच उतरायचो. नारायणराव, तात्यासाहेब गप्पा मारत मारत फिरत राहायचे. पण मी झोपेनं मरायचो. रात्री उशिरा मला झोप अनावर व्हायची.

पण नारायणराव हरायचे नाहीत. या दोघांचं फिरणं सुरूच असायचं. मला आज वाईट वाटतं.. त्यावेळी आजच्यासारखे मोबाइल आणि रेकॉर्डिगच्या सुविधा नव्हत्या, नाहीतर त्या गप्पांचं मी रेकॉर्डिग करून ठेवलं असतं. आजकाल कोणीही उठतं आणि यू-टय़ूबवर काहीही टाकतं. या मोठय़ा माणसांचं केवढं तरी डॉक्युमेंटेशन झालं असतं. असो.

तात्यासाहेबांना जंगलातल्या रेस्टहाऊसचं फार आकर्षण होतं. मलाही हॉटेलवर वगैरे राहण्यापेक्षा जंगलातल्या, डोंगरातल्या, टेकडीवरल्या रेस्टहाऊसवर राहायला आवडतं. तात्यासाहेबांनी एकदा गप्पा मारताना नारायणरावांना व मला सांगितलं, ‘‘एका पावसाळ्यात जव्हार संस्थानात एक डोंगरावरलं रेस्टहाऊस आहे, तिथं जाऊ व भरपूर गप्पा मारू.’’ आम्ही तिघं आणि तात्यासाहेबांचा एक मित्र असं आमचं जाण्याचं ठरलं होतं.

तिथं जायचं, गप्पा मारायच्या, सिगारेटी ओढायच्या आणि मद्य घ्यायचं. पण ते कधी जमलं नाही. जमलं असतं तर मजा आली असती. आयुष्यात तो एक पावसाळा आला असता.. पण नाही आला. तात्यासाहेब गेले, नंतर नारायणराव गेले. माणसं अशी पटापट जातात. नंतर हळहळ लागून राहते.

दि. के. बेडेकरांमुळे मला नारायणराव मिळाले, त्यांचं ‘विद्यापीठ’ मिळालं, त्यांच्या कविता मिळाल्या. कसल्या कविता आहेत त्या! स्वयंभू. सगळं स्वत:चं. साधं. बोलण्यात कुठलाही आव नाही की ताव नाही. आयुष्यभर नारायणराव कठीण परिस्थितीत जगले होते.

सारं जगणं कामगार वस्तीत. अनाथ. त्या आठवणींचे सगळे वळ त्यांच्या शरीरावर उमटलेले होते. त्यांचं पोट्र्रेट करायचं झालं तर एखादा कामगार डोळ्यांसमोर आणावा. रापलेला, खडबडीत चेहरा. त्यापाठीमागे त्यांनी उपभोगलेल्या वेदनाच जास्त होत्या. मी रफ स्केचेस काढतो तसे होते नारायणराव. योग्य शब्दच वापरायचा तर ‘रोबस्ट’!

फोटो - लोकसत्ता वृत्तपत्र
_________________________________________________

• पुस्तक - रफ स्केचेस
• लेखक - सुभाष अवचट
• किंमत - 400 रु/-
• प्रकाशनपूर्व सवलत किंमत - 320 रु/- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

्केचेस #सुभाष_अवचट #युनिक #फीचर्स #समकालीन #प्रकाशन

हेमलकसाची धुरा नव्या पिढीकडे- डॉ. प्रकाश आमटेसंपूर्ण प्रकल्पाचं व्यवस्थापन बघत असतानाच अनिकेतने शाळा चालवण्याची जबाबदारी...
06/08/2026

हेमलकसाची धुरा नव्या पिढीकडे

- डॉ. प्रकाश आमटे

संपूर्ण प्रकल्पाचं व्यवस्थापन बघत असतानाच अनिकेतने शाळा चालवण्याची जबाबदारीही स्वीकारली. शाळा चालवणं हे सोपं खटलं नाही. पहिली बरीच वर्षं आमचे कार्यकर्तेच ते काम करत होते. माझे सुरुवातीपासूनचे सहकारी गोपाळ फडणीस आणि नंतर दादा पांचाळ यांनी ही शाळा उभी केली.

दोघंही या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. तोवर सरकारी ग्रँट सुरू झाल्यामुळे नियम आणि सरकारी जाचही वाढलेला होता. शिक्षकांच्या नियुक्त्या, ग्रँटसाठीच्या कागदांची पूर्तता, होस्टेलची नियमावली आणि प्रत्यक्ष व्यवस्थापन अशा नाना भानगडी. तेही काम अनिकेतने शिरावर घेतलं. थोडक्यात, दवाखाना सोडून उर्वरित सगळी कामं अनिकेतने हळूहळू आत्मसात केली. शाळेचा संचालक म्हणून सहीचा अधिकार मी त्याला बहाल करून टाकला आणि त्याही जबाबदारीतून पूर्णपणे मोकळा झालो.

थोडक्यात काय, हळूहळू आम्ही दोघंही प्रकल्पावरच्या बहुतेक सगळ्या जबाबदाऱ्यांमधून एकेक करून मुक्त होत गेलो. २००८मध्ये अनिकेत आणि समीक्षाचं लग्न झालं. समीक्षा पुण्याजवळच्या निगडीची. हेमलकसा प्रकल्प पाहायला म्हणून ती इकडे आली होती, तेव्हा तिची अनिकेतशी ओळख झाली. पुढे ती परत गेल्यावरही दोघांमध्ये संवाद सुरू राहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं चांगलं जुळतंय. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

समीक्षाने इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. केलेलं. तिलाही बाहेर चांगली नोकरी मिळू शकली असती; पण तिने आपणहून या दुर्गम भागात राहण्याचं ठरवलं. तिच्या घरीदेखील सामाजिक कामाची तशी पार्श्वभूमी नव्हती; पण ती लग्न करून इथे आली आणि बघता बघता रुळलीदेखील. आज तिने शाळेची सगळी जबाबदारी पेलली आहे.

एवढंच नव्हे, तर हेमलकशाच्याही पल्याडच्या दोन दुर्गम गावांमध्ये तिने आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू केल्या आहेत. आम्ही तिच्यावर हेच काम कर किंवा ते करू नकोस, असं कोणतंही बंधन घातलं नाही. एकदा तिने तिचं क्षेत्र पक्कं केल्यावर त्यात लुडबूडही केली नाही. ही आमची चार पोरं आणि इतरही तरुण कार्यकर्त्यांच्या बाबतीत आम्हाला हे जमू शकलं याचं समाधान वाटतं.

दिगंत-अनघा, अनिकेत-समीक्षाने आपल्या सोबतीला अनेक नवे कार्यकर्ते उभे केले. त्यांच्यावर एकेका कामाची जबाबदारी सोपवून धडाक्याने काम सुरू केलं. या सर्वांच्या एकत्रित मेहनतीचं आणि एकदिलाने काम करण्याचं फळ आम्ही प्रकल्पावर चाखतो आहोत. आता पुढे प्रकल्पाचं काय होईल, अशी थोडीही चिंता मनाशी नाही. प्रश्न तयार होतात, अडचणी येत राहतात. त्यात काही वेगळं नाही. पण हे काम माझं आहे, मला ते पुढे न्यायचं आहे, असं म्हणणारे, प्रश्नांना भिडणारे कार्यकर्ते कायमच उभे राहतील याची खात्री वाटते आहे.
_________________________________________

• पुस्तकाचे नाव : नवी पिढी, नव्या वाटा
• लेखक : डॉ. प्रकाश आमटे
• किंमत : रु. २००
• सवलत किंमत : रु. १६०/-
• संपर्क : 93709 79287

#प्रकाश_आमटे #नवी_पिढी_नव्या_वाटा #समकालीन_प्रकाशन #युनिक_फीचर्स

अवलिये आप्त- सुहास कुलकर्णीआपल्याला माणसं काय आयुष्यभर भेटतच असतात. त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो.त्यातल्या का...
02/08/2026

अवलिये आप्त

- सुहास कुलकर्णी

आपल्याला माणसं काय आयुष्यभर भेटतच असतात. त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो.त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. ही माणसं आपली असतात.

अर्थातच, सगळी माणसं सारखी नसतात. कुणी विद्वान असतात, कुणी प्रतिभावान असतात. कुणी लोकसेवक असतात, कुणी जागले असतात. कुणी बोलके असतात, कुणी अबोल. कुणी लोकांमध्ये वावरत असतात, कुणी गुहेत आपल्या कामात गर्क. माणसं कशीही असोत, पण त्यांच्यात एक अवलियापण असतं.

त्यांच्यात एक प्रकारची धुंदी असते. त्यांच्यातील हे धुनीपण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं. तेच त्यांना कार्यप्रवृत्त करत असतं. आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाले किंवा वयोमानाने अगदी शरीरही थकलं, तरी त्यांच्या कामात खंड पडत नाही. त्यांची जीवनेच्छा तसूभरही कमी होत नाही. या माणसांमधलं हे अवलियापणच आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेत असतं.

हे ओढलं जाणं प्रत्येकाचं, ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे आणि आसपासच्या परिस्थितीप्रमाणे आकारत असणार. शिवाय वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते बदलतही असणार. उदाहरणार्थ, मी मूळचा वर्ध्याचा असल्यामुळे आणि कुटुंब व शाळा गांधीविचारांची असल्याने त्या गोतावळ्यातली माणसं आसपास होती. आचार्य विनोबा हे त्यातले प्रमुख.

त्यांचा आश्रम म्हणजे आम्हा पोरांचं खेळण्याचं अंगणच जणू. कधीही जा आणि विनोबांना भेटा, असं आमचं चाले. ते एवढे मोठे विद्वान, तत्वज्ञ, पण आमच्याशी ते छान गप्पा मारत, प्रसंगी बसल्या बसल्या खेळत. वर्ध्यापासून दोन-तीन तासांच्या अंतरावर होते बाबा आमटे. कौटुंबिक संबंधांमुळे त्यांच्याकडेही जाणं येणं असे. देशाला भूषण अशी ही दोन माणसं मला बालपणीच बघायला मिळाली.

पुढे कॉलेजवयात पुण्यात आलो. आणि एका संपूर्ण नव्या जगाला सामोरा गेलो. समाजवादी, हिंदुत्ववादी, मार्क्सवादी, मध्यममार्गी, तटस्थ असे नाना प्रकारचे लोक दिसू लागले. धर्म, इतिहास, संस्कृती, विज्ञान, कायदा, समाज बदल, पत्रकारी, साहित्य, कला अशा क्षेत्रातल्या लोकांची ओळख होऊ लागली.

१९८० च्या दशकातला काळ आठवला तर त्याकाळी पुण्याच्या सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांतील किती थोरांचा सहज वावर होता, हे कळू शकतं. गं. बा. सरदार, मे. पु. रेगे, राम बापट, गो. पु. देशपांडे, रा. प. नेने, सुलभा ब्रह्मे अशी विचारवंत मंडळी सहज भेटू शकत. त्यांना प्रसंगी घरी जाऊनही गाठता येत असे. शरद पाटील, य. दि. फडके, वसंत पळशीकर यांच्यासारखी बाहेरची मंडळी पुण्यात आल्यावर भेटायला सहज तयार असत. त्यांची अभ्यास शिबिरं, व्याख्यानमाला होत, तिथे गाठीभेटी करता येत.

याच काळात राजेंद्र व्होरा-सुहास पळशीकर-गोपाळ गुरू-यशवंत सुमंत-सदानंद मोरे यांच्यासारखे सुप्रतिष्ठित अभ्यासक-प्राध्यापक विद्यापीठात एकगठ्ठा भेटले. नागपूरचे भास्कर लक्ष्मण भोळे आणि कोल्हापूरचे अशोक चौसाळकरही इकडे येऊन जाऊन असत. त्यांच्याकडून अनेक विषय समजून घेता आले. खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत बरीच वर्षं वावरताही आलं. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं इतकं अकृत्रिम आणि मित्रत्वाचं असू शकतं, हे त्यांच्यासोबत वावरताना कळलं.

पुढे पत्रकारितेत हातपाय मारण्याच्या वयात पुण्या-मुंबईतल्या सामाजिक क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी झाल्या. एसएम जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, गोदुताई परुळेकर, शरद जोशी, मृणाल गोरे, नागनाथअण्णा नायकवडी, मेधा पाटकर असे थोरमोठे अनेक. पण बाबा आढाव, गोविंद पानसरे, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, मोहन धारिया, सय्यदभाई, संपतराव पवार, न्या. नरेंद्र चपळगावकर, नरेंद्र दाभोलकर या मंडळींसोबत छान ओळख झाली. त्यांचा कमी-अधिक सहवासही लाभला.

आपापल्या क्षेत्रात दमदार काम केलेली ही माणसं; त्यामुळेच मी त्यांच्याकडे ओढलो गेलो असणार. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, पीड पराई जाणे रे’ ही भावना जवळची असल्यानेही समाजाला समर्पित माणसं आपली वाटणं स्वाभाविकच होतं..

तशीच ओढ लेखकांबाबतही. आसपासचं जग बघून, स्वत:चे आणि इतरांचे अनुभव साठवून, समाजाचा भूतकाळ पचवून नव्या साहित्य कृती घडवण्याची किमया करणारे लेखक-कवी-नाटककार ही जमातच अजब. त्यातले विजय तेंडुलकर खूपच आधी भेटले आणि रत्नाकर मतकरी तुलनेने बर्‍याच नंतर. पण दोघांशीही खास नाती तयार झाली.

नारायण सुर्वे, दया पवार, ग्रेस, मधु मंगेश कर्णिक, ह. मो. मराठे, गंगाधर महांबरे, श्याम मनोहर, दिनानाथ मनोहर, सतीश काळसेकर या लेखक मंडळींशी गाठीभेटी कमी, पण बंध छान. कामामुळे माधव गडकरी, कुमार केतकर, जगन फडणीस, मुकुंदराव किर्लोस्कर, श्री. भा. महाबळ, दत्ता सराफ, एकनाथ बागुल, वा. दा. रानडे, विजय कुवळेकर, अशोक जैन, निखिल वागळे, प्रकाश बाळ, अशोक याळगी अशा अनेक पत्रकार-संपादकांशी संबंध आले. यदुनाथ थत्ते, डॉ. अभय-राणी बंग, अशोक बंग, डॉ. विकास-भारती आमटे, डॉ. प्रकाश-मंदा आमटे, डॉ. सतीश गोगुलवार- शुभदा देशमुख ही तर विस्तारित कुटुंबातलीच माणसं. सुभाष अवचट, अनिल उपळेकर, चंद्रमोहन कुलकर्णी, भ. मा. परसवाळे, दिलिप भंडारे, दीपक संकपाळ ही चित्रकार मंडळी मित्रमंडळीही. असं किती तरी माणसांबद्दल सांगता येऊ शकतं.

पण सांगण्याचा मुद्दा हा, की अशा अनेक धुनी माणसांबद्दल मला ओढ वाटत आली आणि त्यांच्यासोबत वावरता आलं, अनेकांसोबत कामही करता आलं. काहींकडून मित्राचं प्रेम मिळालं, तर कधी कुणाकडून वडिलधारी आपुलकी. काही गुरुजी झाले, तर काही द्रोणाचार्यांसारखे (पण अंगठा कापून न घेणारे) दूरस्थ मार्गदर्शक.

काही माणसं दीपस्तभांसारखी सोबत राहिली. त्यांच्या सोबतच्या अशा विविध नात्यांमुळे त्यांच्याबद्दल लिहावं, असं माझ्याकडे खूप काही आहे. पुढे लिहीनही. खरंतर अनेक वर्षं प्रामुख्याने राजकीय-सामाजिक विषयांवर लिहीत असल्याने व्यक्तिचित्रणात्मक लिहिणं, ही गोष्ट कधी प्राधान्यावर नव्हतीच.

असं काही आपण लिहावं किंवा लिहू शकतो, हेही गावी नव्हतं. पण ‘युनिक फीचर्स’च्या पंचवीस वर्षांच्या पत्रकारी प्रवासाचा धांडोळा घेणारं ‘आमचा पत्रकारी खटाटोप’ हे पुस्तक मी पाच-सहा वर्षांपूर्वी लिहिलं. त्यात ओघाने अनेक माणसांबद्दल लिहित गेलो आणि आपण आपल्याला भावलेल्या अस्सल आणि अव्वल आप्तांबद्दल लिहिलं पाहिजे, असं जाणवू लागलं.

त्याची सुरुवात झाली ती ‘लोकसत्ता’चे संपादक अरुण टिकेकर यांच्यापासून. त्यांच्यासोबत मला १०-१५ वर्षं काम करायला मिळालं असल्याने त्यांच्याशी छान नातं तयार झालं होतं. त्यांच्यावर लिहिण्यासारखं माझ्याकडे बरंच होतं. म्हणून त्यांच्यावर एक मोठा लेख लिहिला. तो छापून आल्यावर टिकेकरांनी वाचला.

ते मनापासून खुष झाले होते. ‘बेटर लेट दॅन नेव्हर... जस्टिस इज डन’ असं खास त्यांच्या शैलीतलं सर्टिफिकेट त्यांनी मला दिलं होतं. आपण व्यक्तिपर लिहू शकतो, हे मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं. या साक्षात्कारामुळे ज्यांच्याशी स्नेहाचे, दोस्तीचे धागे विणले गेले अशांबद्दल आपण लिहावं, असं तीव्रतेने वाटू लागलं. या माणसांसोबतचा प्रवास, त्या काळात दिसलेली त्याच्यातली स्वभाववैशिष्ट्यं, वयातलं अंतर कापून दोस्ती करण्याचं त्यांचं कसब अशा अंगाने आपल्या आप्तांबद्दल लिहावं, असं वाटू लागलं. .. मग मी वर्षभर आमच्या ‘अनुभव’ मासिकात लिहीत गेलो.

मी ज्या माणसांबद्दल इथे लिहिलं आहे, ती सगळी अवलिया आणि आयुष्यभर झपाटून काम केलेली धुनी माणसं आहेत. मराठीतले पहिले लोकप्रिय विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी पोटापाण्यासाठी काहीकाळ नोकर्‍या वगैरे केल्या, पण आयुष्यभर व्रतस्थपणे प्रचंड लिखाण केलं. हजारो लेख लिहिले. दोनेकशे पुस्तकं लिहिली.

त्यांच्या वाचनाचा झपाटा तर काहीच्या काही. आयुष्यभर ते पुस्तकांचा फडशा पाडत आले आणि मिळालेलं ज्ञान वाटत आले. इतकं प्रचंड वाचणारा मराठी लेखक विरळा. तीस-बत्तीस वर्षं मी हा झपाटलेला माणूस बघत आलेलो आहे. निळू दामलेंचंही तसंच. गेली पन्नास वर्षं हा माणूस फिरतो आहे आणि लिहितो आहे. आयुष्यातला बहुतेक काळ त्यांनी मराठी पत्रकारितेची चाकोरी मोडून स्वतंत्र पत्रकारिता केली.

स्वत:ला महत्त्वाच्या वाटणार्‍या विषयांचा माग घेत ते जसे गावाखेड्यांत नि शहरांत फिरले, तसेच जगभर फिरले. त्यांनी ज्या रेंजमध्ये फिरस्ती पत्रकारी केली, तसा माणूस देशात क्वचितच सापडेल. अनिल अवचट यांनी तर मराठी पत्रकारी आणि साहित्यात स्वत:ची वेगळी वाटच तयार केली. कष्टकर्‍यांचं नि वंचिंतांचं जग मराठी वाचकांसमोर मांडून त्यांनी सामाजिक पत्रकारीचं एक स्वतंत्र दालन निर्माण केलं. त्यांचं लेखन आणि सामाजिक काम एकमेकांपासून अलग करता येणार नाही, इतकं मिसळून गेलेलं आहे.

आयुष्यातला बराच काळ संपादक म्हणून काम केलेल्या सदा डुम्बरेंनी स्वत:चं फारसं लेखन केलं नाही, (तरी पाच-सहा पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत) पण वेगाने उलगडणार्‍या जगाकडे सजगपणे कसं पहायचं आणि त्यावर वाचकांना विचारप्रवृत्त कसं करायचं, याचा एक नमुना त्यांनी दाखवून दिला.

तरुण पिढीतील लिहित्या लेखकांना लिहिण्यासाठी संधी दिली, प्रोत्साहित केलं. अरुण टिकेकर तर वाचन, संशोधन, लेखन, संपादन यातील त्यांच्या कर्तृत्वामुळे सगळ्यांचे ‘साहेब’ होते. एकदम शिस्तशीर काम. पण तरुण सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांना परफॉर्म करण्याची संधी देण्याची त्यांची रीत काहीच्या काही.

ही सारी मंडळी पत्रकारितेशी संबंधित. त्यापलीकडील ना. धों. महानोर हे आपल्या प्रतिभेने अखिल महाराष्ट्राला अचंबित करून टाकणारे कवी म्हणून तर थोरच, पण त्यांनी साहित्य-संस्कृतीबाबतचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचं कामही केलं. ते हाडाचे शेतकरी, त्यामुळे शेतीपाण्याच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवला.

महानोर जसे एका छोट्याशा दुर्लक्षित खेड्यात जन्मलेले-वाढलेले, तसे एकनाथ आवाड निर्धन कुटुंबातून पुढे आलेले कार्यकर्ते. अस्पृश्यता, जातिव्यवस्था आणि त्यातून आलेली विषमता यांच्याविरोधात लढाई पुकारलेला ढाण्या वाघच. स्वतःतल्या धडाडीने त्यांनी स्वतःसोबतच आपल्या भोवतीच्या वंचितांचं आयुष्य बदलून टाकलं.

त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिंमत आणि साधनं दिली. हे सारं मी जवळून पाहिलं, त्यांच्याकडून समजून घेतलं. आणि सरतेशेवटी.. सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्रातली ‘फर्स्ट फॅमिली’ अशी ओळख घट्ट झालेले आमटे कुटुंबीय! त्यांच्याबद्दल वेगळं काय बोलणार? महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं हे नाव.

समाजाने नाकारलेल्या घटकांना आसरा देणारं, त्यांना आत्मसन्मान देणारं, त्यांना पुन्हा समाजात आणून सोडणारं त्यांचं काम मोठंच नावाजलेलं. मला या मंडळींच्या विस्तारित कुटुंबाचा भाग बनता आलं. एरवी ज्या संवेदना तुमच्यात निर्माण होत नाहीत, त्या तिथे माझ्यात भिनल्या.

या सगळ्यांवरचे लेख मी झपाटल्यासारखे लिहून काढले. यातील एखादा अपवाद वगळला तर बहुतेकांसोबत भरपूर सहवास लाभलेला. दहा-वीस-तीस वर्षांचा. यातील टिकेकरांसोबचा प्रवास जसा त्यांच्या अकस्मात निधनाने थांबला, तसाच डुम्बरेंच्याही अकाली जाण्याने. पण माणूस जाण्याने प्रवास भलेही थांबत असतील; नातं संपत नाही. विशेषत: ज्या माणसांचं बोट पकडून तुम्ही चार पावलं चाललेले असता तेव्हा.

या सार्‍यांकडून मला आजवर भरभरून मिळालं. ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे’ या न्यायाने मी त्यांच्याकडून घेत राहिलो. ही व्यक्तिचित्रं लिहून मी त्यातून थोडा उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. हे लेख म्हणजे म्हटली तर व्यक्तिचित्रं आहेत, म्हटली तर नाहीत. पण हे लेख म्हणजे त्यांची कार्यचरित्रं नव्हेत, एवढं नक्की.

ही माणसं माझ्या वाट्याला जेवढी आली, आणि त्यामुळे जेवढी दिसली, त्यांचं चित्रण मी केलेलं आहे. यात स्वाभाविकपणे त्यांचं-माझं नातं आणि या नात्याने बांधले गेलेले स्नेहाचे धागे महत्त्वाचे बनतात. यात मी एक पात्र असलो, तरी महत्त्वाचा नाही. या प्रकारचं लेखन मला आनंद तर देऊन गेलंच, पण ज्यांच्यावर मी लिहिलं, त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही ते आवडून गेले. त्यातून माझा आनंद द्विगुणित झाला.

पण माझ्यासाठी खरी आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्यांच्यावर लिहिलं, त्यांनाही हे लेख म्हणजे सुखद धक्का होता. मी त्यांच्यावर लिहीन असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि त्यांना माहीतही नव्हतं. ही सगळी मोठी मंडळी असली, तरी बहुतेकांवर असे लेख कुणी लिहिलेले नव्हते. त्यामुळेही ते सुखावलेले दिसत होते.

त्यामुळे आपण आपल्या या ज्येष्ठ आप्तांना हा आनंद देऊ शकलो, याबद्दल माझ्या मनात निव्वळ समाधानाची भावना भरून आहे. या भावनेची ताकद मला अजूनही जाणवते आहे. या अनुषंगाने महानोरांची-ज्यांच्यावर वर्षानुवर्षं लिखाणाचा आणि कौतुकाचा वर्षाव झालेला आहे- त्यांची प्रतिक्रिया सांगण्यासारखी आहे.

लेख वाचून झाल्यावर महानोर म्हणाले, ‘स्वतःवर छापून येण्याचं अप्रुप आता उरलेलं नाही. लोकांनी माझ्यावर खूप लिहिलं. कवितेवर लिहिलं, कामावर लिहिलं. पुस्तकं लिहिली, प्रस्तावना लिहिल्या. पण आपलं माणूस कसं लिहितो याची उत्सुकता मला लागून होतीच...’

एरवी आपण मराठी लोक कुणाला ‘थँक्स’ म्हणण्याबाबत फारच कद्रू आहोत. चांगल्याला चांगलं म्हणणं, गुणांचं वर्णन करणं, आयुष्यभराच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानणं याबाबत आपल्याकडे कंजुषपणाच फार. ही अपरीत बाजूला ठेवून मी मोकळेपणाने माझ्या या ज्येष्ठ आप्तांबद्दल लिहिलं आहे.

यातील सदा डुम्बरे यांच्यावरील लेख ते हयात असताना लिहिला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झाल्याने त्या लेखावर आवश्यक ते संपादकीय संस्कार करून इथे प्रकाशित केला आहे.

ज्या लेखनाचा मी, या ज्येष्ठांनी, त्यांच्या चाहत्यांनी आणि वाचकांनी भरघोस आनंंद मिळवला, ते लेख आता पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. त्यामुळे उर्वरित वाचकही हा आनंद मिळवू शकतील.

_______________________________

पुस्तकाचं नाव : अवलिये आप्त - अव्वल आणि अस्सल
लेखक : सुहास कुलकर्णी
प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे
पृष्ठं :१८० मूल्य : २०० रुपये.
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287

#अवलिये_आप्त #सुहास_कुलकर्णी #समकालीन_प्रकाशन #वाचाल_तर_वाचाल #पुस्तकं #मराठी #युनिक_फीचर्स

Address

Samakaleen Prakashan, 8 Amit Complex, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 6:15pm
Tuesday 11am - 6:15pm
Wednesday 11am - 6:15pm
Thursday 11am - 6:15pm
Friday 11am - 6:15pm
Saturday 11am - 6:15pm

Telephone

+919922433606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samkaleen Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samkaleen Publication:

Shortcuts

Share