Samkaleen Publication

Samkaleen Publication समकालीन प्रकाशन - समकालीन सामाजिक वास्तवाचा शोध घेणारी पुस्तकं.

नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणा

रे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.

खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीचील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.

एका न्यायाधीशाच्या मनातला न संपणारा खटलाएकदा माझ्यापुढे तीन-चार वर्षांपासून ते सात-आठ वर्षांपर्यंतच्या मुलांवरच्या लैंगि...
08/06/2026

एका न्यायाधीशाच्या मनातला न संपणारा खटला

एकदा माझ्यापुढे तीन-चार वर्षांपासून ते सात-आठ वर्षांपर्यंतच्या मुलांवरच्या लैंगिक अत्याचाराचा खटला होता. त्या मुलामुलींची उघडीनागडी छायाचित्रं, तसंच त्यांना मोठ्यांच्या लैंगिक अवयवांबरोबर खेळायला लावून त्याचं फोटोशूट, असं त्या गुन्ह्याचं स्वरूप होतं. त्यात बलात्काराचा मुद्दा नव्हता. तेव्हा 'पोक्सो कायदा' अस्तित्वात नव्हता. ते सर्व फोटो-व्हिडिओ एका संकेतस्थळावरून परदेशी पाठवले जात होते.

अशा प्रकारचे छोट्या मुलांचे फोटो, व्हिडिओ पाहून लैंगिक सुखाचा मार्ग शोधणारे देशी-परदेशी लोक या संकेतस्थळाचे सभासद होऊन फायदा घेत होते. हा सर्व उद्योग एका स्विस जोडप्याचा होता. ते त्यासाठी स्वित्झर्लंडमधून येत. खटल्यात तेच आरोपी होते. ते १५-२० दिवस जुहूमधल्या हॉटेलमध्येच राहत. बरं, त्या मुलांनाही त्यातलं गांभीर्य कळतच नव्हतं. ती सर्व 'गेट वे'वरच्या भिकाऱ्यांची मुलं होती.

आरोपी त्यांच्या आई-वडिलांच्या परवानगीनेच मुलांना मोटारीत घालून, एक दिवस गंमतजंमत करायला मिळेल असं सांगून 'गेट-वे'वरून घेऊन येत. त्यात पळवणं वगैरेही गुन्हा नव्हता. मुलांना तो सर्व खेळ वाटायचा. कारण त्या बदल्यात दोन्ही आरोपी आधी त्यांना स्वच्छ अंघोळी घालायचे, परफ्युम लावायचे. मग फोटो शूट करून झाले की वेगवेगळी खेळणी-खाऊ, नवे कपडे, बूट, थोडे पैसे असं सगळं देऊन परत सगळ्यांना गेट वेवर सोडलं जायचं. सगळा 'आनंदाचाच' व्यवहार होता.

असे एकदा ते भारतात येऊन गेले होते. दुसऱ्यांदा आले तेव्हा हाच सगळा प्रकार सुरू झाला. पण त्यांनी गोळा केलेल्या मुलांपैकी एका सात-आठ वर्षांच्या मुलीला हे वेगळं वाटलं. म्हणून तिने 'गेट वे'वर येणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीला त्याबद्दल सगळं सांगितलं, जबाबदारीचं भान असणाऱ्या त्या कार्यकर्तीने पोलिसांना कळवलं आणि मुंबई गुन्हेशाखेने उत्तम कामगिरी करत त्यांना पकडून त्यांचा लॅपटॉप वगैरे जप्त केला, मुलांच्या व्यवस्थित जबान्या घेतल्या, आणि त्या 'पीडोफाइल्स'चा खटला माझ्यासमोर चालला, त्यात मी त्यांना दोषी धरून सात वर्षांची शिक्षा दिली.

पण तेव्हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला, की त्यांच्या दंडाचं (फाइन) स्वरूप काय असावं? दंडाची रक्कम त्या मुलांना देऊ करावी असं मी ठरवलं, पण रक्कम किती असावी? आरोपीच्या वकिलांनी सांगितलं, की 'दंडाची रक्कम भरपूर वाढवा, पण त्या बदल्यात शिक्षा कमी करा.' पण प्रत्येक गोष्ट काही पैशांच्या मोबदल्यात मोजता वा कमी-जास्त करता येत नाही.

मी शिक्षा कमी केली नाही. पण दंडाची रक्कम त्या मुलांच्या आई-वडिलांच्या हातात ठेवणंही मला फारच धोकादायक वाटलं. कारण काही हजारांची रक्कम विनासायास त्यांच्या हातात पडल्याने कदाचित त्यांचा पुढे हा व्यवसायच होण्याचीसुद्धा भीती होती. (उदा. गाडीखाली अपघात झाल्यावर पैसे मिळतात म्हणून मुद्दाम अपघात घडवणारे आणि पैसे मिळवणारेही आहेत.)

मग मी प्रत्येक मुलाच्या नावे काही हजारांची रक्कम मुदतठेवीच्या स्वरूपात ठेवावी आणि मुलं शिकत असल्यास त्यांची गरज आणि प्रगती बघून त्यांना ती मिळावी किंवा ती १८ वर्षांची झाल्यावर त्यांना देण्यात यावी, असा आदेश दिला.

या खटल्यात पोलिसांनी पुरावा गोळा तर केला, पण खटला सुरू झाला दोन वर्षांनी. त्या काळात तो आरोपींचा लॅपटॉप, त्यातली 'सी.डी.' हे सर्व सीलबंद अवस्थेत पडून होतं. मुंबईच्या ३०-३५ अंश तापमानात, गरम वातावरणात त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पार शिजून गेल्या. तेव्हा लॅपटॉप, इंटरनेट वापर यांचं प्रमाण आजच्या तुलनेत खूपच कमी होतं.

ते संकेतस्थळ शोधणं, तिथून डेटा 'रिकव्हर' करणं, ब्लॉक करणं हे पोलिसांना काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी लॅपटॉप ताब्यात घेऊन सील करून ठेवला होता. खटल्यादरम्यान लॅपटॉप कोर्टासमोर उघडल्यावर सुरूच होईना. हार्ड ड्राइव्ह काढून काही होतंय का ते पाहा असं मी म्हटलं; पण त्याचाही उपयोग झाला नाही.

त्या मुलांचे आणि पुरुषांचे कपड्यांशिवाय फक्त दोन-तीन फोटोग्राफ्स मिळाले. त्यावरून, साक्षींवरून आणि परिस्थितिजन्य पुराव्यांनुसार तो गुन्हा सिद्ध झाला. पण फार मोठा पुरावा हरवला होता. तो गोळाच करता आला नाही हेही खरं.

तर मला नेहमी असं लक्षात येतं, की न्यायाधीशाचं मन हे कायम कुरुक्षेत्र असतं. तिथे रोजच्या लढाया चालतात, शब्दांचे वार होतात, माणसं घायाळ होतात. जिंकण्याचे गुणाकार, हरण्याचे भागाकार सुरूच असतात. अशा अनेक अडल्यानडल्यांचे विदीर्ण उसासे, लबाडांचे फूत्कार, धनवंतांचे उन्माद, लुबाडलेल्यांचे बिचारे अश्रू घेऊन ते दमलेलं कुरुक्षेत्र रात्री झोपी जातं ते परत सकाळी ११ वाजता 'हुश्शार' होतं!

(मृदुला भाटकर लिखित 'गेले लिहायचे राहून' या पुस्तकातील हा भाग आहे)

• पुस्तकाची मूळ किंमत : रु. 200/-
• सवलत किंमत : रु. 160/-
• संपर्क : 93709 79287

#गेले_लिहायचे_राहून #मृदुलाभाटकर #समकालीनप्रकाशन #युनिक_फीचर्स

शांताबाई एकच - शांताबाई शेळके!- सुभाष अवचट४, ‘शाकुंतल'..हा माझ्या ‘साहित्य सहवासा'तल्या घराचा पत्ता. पण तो मूळचा माझा नव...
07/06/2026

शांताबाई एकच - शांताबाई शेळके!

- सुभाष अवचट

४, ‘शाकुंतल'..

हा माझ्या ‘साहित्य सहवासा'तल्या घराचा पत्ता. पण तो मूळचा माझा नव्हे. तो शांताबाईंचा.

शांताबाई एकच- शांताबाई शेळके!

१९८०च्या आसपास कधीतरी पहिल्यांदा मी या घराचं दार वाजवलं होतं. दुपार सरत आलेली. वाटलं, बाई असतील; तर दारात त्यांचे स्नेही-प्रभुणे. चट्ट्यापट्ट्याचा लेंगा आणि वर बनियन. हातात एक फाऊंटन पेन आणि शाई भरायचा ड्रॉपर.

ते ‘आत या..' म्हणाले. मी गेलो.

तर एखादा जुनाट, थकलेला, विटका माणूस असावा तसं घर. सगळीकडे अंधार. चिमुकल्या खिडक्या. आत नुस्त्या भिंती आणि ज्यात त्यात का कोण जाणे, पार्टिशन्स घातलेली. पुस्तकांचा हा एवढा पसारा. पुस्तकं तेवढी चकचकीतशी. बाकी सगळ्या घरावर जुनाट, कुबट कळा.

एक भिंत आणि आणखी एका पार्टिशनच्या मागल्या खोलीत जुन्या प्रचंड पलंगावर शांताबाई बसलेल्या होत्या. गादीवर. मुटकुळं केल्यासारख्या. समोर उतरत्या पाठीचं लाकडी डेस्क. लिहिता लिहिता त्यांच्या पेनातली शाई संपली असावी. प्रभुणेंनी ताजी शाई भरलेलं पेन पुन्हा नीट पुसून शांताबाईंना दिलं आणि माझ्यासाठी चहा टाकायला म्हणून ते आणखी एका भिंतीच्या आत गडप झाले.

मग शांताबाईंशी गप्पा झाल्या. चहा झाला. मी तिथे कशाला गेलो होतो ते आता आठवत नाही. आठवते ती त्यांची गाठोड्यासारखी आकृती आणि त्यांच्या कपाळावरचं ते हसरं, ठळक, ठसठशीत लाल कुंकू!

निघायच्या तयारीत निरोप घेत मी उठलो, तशा शांताबाई हसून म्हणाल्या,“चल, आज मी तुला भेळ खायला नेते. कवितेचं मानधन आजच आलंय. दहा रुपये. आपण भेळेची पार्टी करू!”

साहित्य सहवासच्या कोपऱ्यावर तेव्हा गुप्ता नावाचा कुणीएक भेळवाला होता, त्याच्याकडे ही पार्टी होणार होती. प्रभुण्यांनी बनियनवर शर्ट चढवला आणि शांताबाईंच्या हाताला धरून अलगद जिने उतरून ते त्यांना खाली घेऊन आले. एकेक पाऊल टाकणं शांताबाईंना फार त्रासाचं होत होतं. एकमेकांच्या आधाराने चालणारी ती दोन थकलेली माणसं पाहताना माझ्या पोटात तुटत राहिलं. शांताबाईंचा चेहरा मात्र चमचमीत भेळेच्या नुसत्या कल्पनेनेच चमकत होता.

आम्ही भेळ खाल्ली. पैसे द्यायला मी पाकीट काढलं तर मला रागावल्या. म्हणाल्या, “अरे सुभाष, मी आज श्रीमंत आहे रे! मानधन आलंय ना कवितेचं! तेव्हा आजची पार्टी मीच देणार. तू असा येत जा मात्र. गप्पांना ये. नक्की ये हो!!”

मी कुठला नेहमी जाणार गप्पांना?

शांताबाई मुंबईत. मी पुण्यात.

पण आम्ही गप्पांना रोज एकत्र भेटणार हे नियतीने आधीच ठरवलेलं होतं.

प्रभुणे निवर्तले आणि शांताबाई मुंबईत अगदीच एकट्या पडल्या. त्यांना साधं घर चालवणं जमेना. कसं जमणार? आयुष्यात कधी घरातलं काही पाहिलं नव्हतं. संसार असा केला नव्हता. स्वयंपाक सोडा, साधा आमटी-भातही कधी रांधला नव्हता. मुंबईतलं त्यांचं अख्खं आयुष्य हे अभ्यास, लेखन, कविता, गाणी आणि उदंड यश, कीर्ती यांच्या समृद्ध वैभवाने अखंड गजबजलेलं होतं. त्यांनी इतक्या कमिट्यांवर कामं केली, इतका अभ्यास, इतकं लेखन, इतकी गाणी लिहिली. गायक-संगीतकारांबरोबर इतक्या बैठकी रंगवल्या. खुद्द लताबाई आणि अख्ख्या मंगेशकर कुटुंबासह आयुष्यात इतकी स्नेहाची श्रीमंती मिळवली. दुसऱ्या कशाला जागा होती कुठे कधी?

शांताबाईंच्या अवघ्या आयुष्याला लखलख देणारे हे सगळे दिवे हलके हलके मंदावू लागल्यावर मात्र उतरत्या उन्हांनी कदाचित काहीशी कासाविशी आणली असावी त्यांच्या आयुष्यात.

प्रभुणे गेले.. आणि त्या कासावीस जंगलात एकाकीपणाचं श्वापद घुसलं.

शांताबाईंचे बंधू राम शेळके. पुण्यात राहत. मोठा दिलदार माणूस. रामभाऊंशी, शांताबाईंच्या वृद्ध, पण खणखणीत आईशी माझी सख्खी मैत्री होती. माझं त्या घरी जाणं-येणं होतं.

रामभाऊंना वाटे, आयुष्यभर कुटुंबाबाहेरच राहिलेल्या आपल्या गुणी बहिणीने आता घरी परतावं. तिची निवृत्ती सुखाची व्हावी. एका भेटीत त्यांनी माझ्याकडे विषय काढला. म्हणाले, “बंगला आहे एवढा. वर एक खोली बांधतो मी तिच्यासाठी स्वतंत्र. सगळ्यांमध्ये आनंदात राहील इथे पुण्यात.”

शांताबाईंच्या आईनेही गळ घातली होतीच. मग मी मुंबईत जाऊन एकदा भेटलोच शांताबाईंना. म्हटलं, “रामभाऊ एवढे म्हणतायत तर आता ऐका की त्यांचं. चला पुण्याला.”

शेवटी माझ्यासारखे मित्र आणि कुटुंबाच्या अगत्याचा मान राखून शांताबाई मुंबईतला त्यांचा एकाकी संसार उचलून पुण्यात यायला तयार झाल्या. आल्याही. रामभाऊंच्या बंगल्यात वर एक नवी खोली बांधली गेली. ती पुस्तकांनी सजली. शांताबाईंच्या उत्तरायुष्यातला पुण्यातला काळ सुरू झाला.

मीही पुण्यातच होतो. माझ्या स्टुडिओत कामांचा पूर असे तेव्हा. माझा गोतावळा मोठा. स्टुडिओत मित्रांचे अड्डे पडलेले असत. मी भरपूर मजा करत असे आणि त्याहून दुप्पट कामही करत असे आणि असाच एके दिवशी दुपारी शांताबाईंचा फोन. मला म्हणाल्या, “अरे सुभाष, मी आज येऊ का तुझ्या स्टुडिओत संध्याकाळी? माझं काम काही नाहीये तुझ्याकडे. फक्त गप्पा मारायच्या आहेत.”

मी म्हटलं, “अहो शांताबाई, विचारताय काय? या की!”

त्या आल्या. आणि मग येतच राहिल्या.

त्यांचं अख्खं आयुष्य मुंबईत गेलेलं. इथे पुण्यात आल्यावर त्या एकट्या पडल्या होत्या. त्यांना माणसांची भूक फार. माणसं आणि गप्पा यावरच त्या जगत.. आणि खाणं!

गप्पा मारायला म्हणून दुपारच्या स्टुडिओत आल्या की जमिनीवर अंथरलेल्या गादीवर मुटकुळं करून बसत. डोक्यावरचा पदर सारखा सावरत लडिवाळ, गोड, आग्रहाचं, लाघवी बोलत राहत. मला म्हणत, “सुभाष, तुला त्रास नाही ना रे होत माझ्या बोलण्याचा? मी आपली रिकामी आहे, तू असा कामात!! म्हणशील, काय म्हातारीची टकळी काही थांबत नाही!”

मी म्हणायचो, “नाही हो शांताबाई, बोला तुम्ही.. मला कसलाही त्रास नाही होत.”

कधी कधी मी कामात असलो की नुसत्याच अवघडल्यासारख्या बसत. मग एकदा त्यांना विचारलं, “कागद देऊ का तुम्हाला लिहायला?”

“कागद?” त्यांनी काहीशा विचित्र रिकाम्या नजरेने माझ्याकडे पाहिलं अन् म्हणाल्या, “काही सुचत नाही रे आता..”

चटका बसल्यासारखा मी चरकलो.

मग त्याच म्हणाल्या, “तू असं कर, मला एक ड्रॉईंग पेपर दे. मला चित्र काढायचंय.”

मग मी त्यांना ड्रॉईंग पेपर द्यायला लागलो. सोबत पेन्सिली, रंगखडू असत. शांताबाई दोनच चित्रं काढत. एक त्यांच्या लाडक्या मांजरीचं आणि दुसरं म्हणजे स्मिता पाटीलचं!

स्मिता त्यांची फार लाडकी. तिचं चित्र म्हणजे काय, तर तिचा चेहरा रेखणाऱ्या काही रेघा आणि कपाळावर कुंकू. ही स्मिता. तिच्या-माझ्या दोस्तीबद्दल शांताबाईंना भारी कुतूहल आणि कौतुकही!! स्मिताची आठवण आली की त्यांच्या डोळ्यात लगेच पाणीच भरे!!

मी म्हणायचो, “शांताबाई, स्मिताचं चित्र काढायची ही आयडिया भारी आहे तुमची! दोन-चार रेषा काढल्या आणि वर एक कुंकू ठेवलं की झालं!”

त्या म्हणायच्या, “हो रे सुभाष!! तुला माझंही असंच चित्र काढता येईल. एक मोठ्ठं गाठोडं काढ आणि त्याच्यावर एक कुंकू ठेव, की झाल्या शांताबाई शेळके! काय?”

असं साधंच बोलता बोलता अचानक इतक्या उन्मळून हसत की त्यांच्या डोळ्यांतून पाणीच वाहू लागे. मग गप्पगप्पशा होऊन जात. असं अस्वस्थ अबोलपण आलं की मी त्यांना चित्र काढायला नवा कागद द्यायचो. मग शांतपणे काहीतरी रेघाटत खूप वेळ मुक्याने त्या बसून राहात.

(लेखाचा पूर्ण भाग वाचा 'सुभाष अवचट' लिखित 'रफ स्केचेस' या पुस्तकात)

• किंमत - 400 रु/-
• सवलत किंमत - 320 रु/- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9370979287

#सुभाषअवचट #रफस्केचेस
#मराठीसाहित्य #समकालीन_प्रकाशन

07/06/2026

📖 'पुस्तकदोस्ती'मुळे वस्तीतील मुलांच्या हातात पुस्तकं पोहोचली 📖

वस्तीतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सलाम पुणे मार्फत 'पुस्तकदोस्ती' उपक्रम राबवला जात आहे. नुकताच 'पुस्तकदोस्ती'चा चौथा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील पानमळा वस्तीत आम्रपाली बुद्ध विहारात रणरागिणी प्रतिष्ठान या संस्थेच्या मदतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात ४० हून अधिक मुलांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. शिवाय रागिणी कांबळे यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ग्रंथालयाला पुस्तकं भेट देण्यात आली.

यावेळी 'रणरागिणी प्रतिष्ठान'च्या संस्थापक रागिणी कांबळे, 'मितानिन फाउंडेशन'चे संचालक मुकुंद कुलकर्णी, तसंच स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या इतरही महिला आणि काही पालक उपस्थित होते.

पुस्तकदोस्ती उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क:- 9970355105

#पुस्तकदोस्ती

शोध नेहरूंचा आणि भारताचाही- शशी थरुरभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली सतरा वर्ष जगाच्या दृष्टीने पंतप्रधान पं. जव...
27/05/2026

शोध नेहरूंचा आणि भारताचाही

- शशी थरुर

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली सतरा वर्ष जगाच्या दृष्टीने पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे भारताचा चेहरा होते. खरं तर नेहरू म्हणजेच भारत असं चित्र होतं.

नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विरोधाभास सामावलेले होते. श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरात जन्मलेले ते एक लहरी तरुण होते, पण त्याच वेळी ते समाजवादी विचारांनी भारलेले होते आणि गोरगरीब शेतकरी जनतेविषयी त्यांना काहीशी गूढ म्हणावी अशी कळकळ होती. इंग्लंडमधल्या हॅरो व केंब्रिजच्या वातावरणात शिक्षण घेऊन आंग्लाळलेल्या या तरुणाने पुढे दहा वर्षांहून अधिक काळ इंग्रजांचा तुरुंगवास भोगला. ते स्वतः निरीश्वरवादी बंडखोर होते, पण तरीही संतवृत्तीच्या महात्मा गांधींचे ते पट्टशिष्य बनले.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर तेच राष्ट्राच्या मशालीचे रक्षणकर्ते बनले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा ते सर्वांत दृग्गोचर चेहरा होते. अत्यंत प्रामाणिक, द्रष्टा, सर्वसमावेशक, राजकारणापलीकडचा राजकारणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. हे व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी होतं की त्यांच्याशिवाय देशाची कल्पना करणं अशक्य होतं. त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी वेलेस हँगन या आघाडीच्या अमेरिकी पत्रकाराने 'आफ्टर नेहरू, हू?' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यातून नेहरूंचा उत्तराधिकारी कोण, या चिंतेपलीकडचे काही मुद्दे प्रतिबिंबित होत होते. जगात सर्वत्र जणू एक मूकप्रश्न होता, 'आफ्टर नेहरू, व्हॉट?' (नेहरूंनंतर भारताचं काय होणार ?)

आज त्यांच्या मृत्युपश्चात चार दशकांनंतर या मूकप्रश्नाचं थोडंफार उत्तर आपल्याकडे आहे. एकविसाव्या शतकात पाऊल टाकताना भारतात अजूनही नेहरूवादाचा प्रभाव भासत असला तरी जवाहरलाल नेहरूंचा फारच थोडा वारसा शाबूत असल्याचं दिसत आहे. नेहरूंच्या विचारसरणीपासून भारताने बरीच फारकत घेतली आहे आणि कधी काळी या नेहरूवादाच्या प्रभावाखाली असणारं उर्वरित विकसनशील जगही वेगवेगळ्या मार्गांनी त्यापासून दूर गेलं आहे. स्वातंत्र्य मिळून साठ वर्षं उलटून गेल्यावर भारतात मोठं परिवर्तन घडत आहे, ज्याने वसाहतोत्तर राष्ट्रीयत्वाबद्दलची मूलभूत नेहरूवादी गृहीतकं बदलून टाकली आहेत.

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं राहून विसाव्या शतकातल्या या महान राष्ट्रवादी नेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी या संक्षिप्त चरित्रातून केला आहे. जवाहलाल नेहरूंचं चरित्र ही एक रोमहर्षक कहाणी आहे आणि तिला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. निर्विवाद पंतप्रधान आणि अतुलनीय जागतिक नेता असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातून त्यांचं ऐषोरामी बालपण, विशेष लक्षणीय नसलेली विद्यार्थिदशा, तरुणपणातला लक्षवेधी राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्यलढ्याचं लढवय्यं नेतृत्व या गोष्टी वेगळ्या करता येऊ शकत नाहीत.

या जीवनप्रवासाबरोबरच समारोपाच्या प्रकरणात नेहरूंनी आपल्या देशाला वारसा म्हणून दिलेल्या प्रमुख स्तंभांचं मी समीक्षात्मक विश्लेषण केलं आहे. लोकशाही संस्थानिर्मिती, देशव्यापी कडवा धर्मनिरपेक्षतावाद, समाजवादी अर्थशास्त्र आणि अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण हे ते चार स्तंभ आहेत. त्या सर्वांमध्ये भारतीयत्वाची अंगभूत दृष्टी होती, जिला आज मूलभूत आव्हान दिलं गेलं आहे.

हे पुस्तक विद्वत्तापूर्ण नाही. तसंच कोणत्याही नव्या संशोधनावरही ते आधारलेलं नाही. यामध्ये तळटीपा नाहीत. नेहरूंचं असामान्य जीवन व कारकीर्द आणि प्रत्येक भारतीयाकरता त्यांनी मागे ठेवलेला वारसा यांचा नव्याने अर्थ लावण्याचा हा प्रयत्न आहे. 'भारतीय' या संज्ञेला नेहरूंनी अर्थ दिला. त्यांचं ऋण व्यक्त केल्याशिवाय तिचा वापर करणं अशक्य आहे. भारतीय म्हणून त्यांनी आपल्यासमोर काही आदर्श ठेवले आहेत.

हे आदर्श कोठून आले, त्यांनी स्वतः त्या आदर्शाचं पालन केलं होतं का आणि आज ते किती व्यवहार्य आहेत, अशा काही प्रश्नांचा शोध घेण्याचं काम हे पुस्तक करतं. नेहरूंचा प्रशंसक आणि टीकाकार अशा दुभंगलेल्या अवस्थेत हे पुस्तक मी लिहायला घेतलं; पण नेहरूंचं जीवन जितकं खणत गेलो, त्यांच्याविषयीचा आदर तितका खोलवर वाढला.

जवाहरलाल नेहरूंचा आपल्या देशावर इतका मोठा प्रभाव आहे की काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या कारकिर्दीचं पुनर्मूल्यांकन करण्याचा मोह व्हावा. भले त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटो न पटो, आपल्याला त्यांचा वारसा लाभलेला आहे. आपण भारतीय आज चांगले-वाईट जे काही आहोत त्यासाठी आपण या एका माणसाचे ऋणी आहोत. ही त्याची कहाणी आहे.

- शशी थरूर

(या लेखाचा उर्वरित भाग वाचा पुस्तकामध्ये)

• किंमत : 200 रु /-
• सवलत किंमत : 160 (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287

#जवाहरलालनेहरू #शशीथरूर #भारतीयइतिहास #स्वातंत्र्यलढा #मराठीसाहित्य

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाड यांचा स्मृतिदिन. एकनाथ आवाड यांचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगद...
25/05/2026

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाड यांचा स्मृतिदिन. एकनाथ आवाड यांचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान उलगडून दाखवणारा युनिक फीचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांचा लेख.

एकनाथ आवाड एक वाघ माणूस

- सुहास कुलकर्णी

एकनाथ आवाड हा एक वाघ माणूस होता. या माणसाने त्याच्या वाट्याला आलेल्या जातिव्यवस्थेला नाकारलं, धुडकावलं, तिच्यावर हल्ला केला आणि तिला फाडून फेकून दिलं. या संघर्षातून त्याने स्वत:चं आणि स्वत:च्या कुटुंबाचं भविष्य तर बदलून टाकलंच, पण त्याला साथ देणार्‍या हजारो लोकांना एक नवं आयुष्य दिलं. जातिव्यवस्थेच्या चरकात चिडीचूप जुलूम सहन करत असलेल्या माणसांना तो नाकारण्याची हिंमत दिली, मार्ग दाखवला आणि त्यांचा लढा प्रस्थापितांचे हल्ले सहन करत यशस्वीही केला. २०१५ साली आटोपलेल्या साठ-पासष्ठ वर्षांच्या आयुष्यात एकनाथ आवाड यांनी ही किमया करून दाखवली. एका आयुष्यात एवढा मोठा पल्ला गाठलेली माणसं विरळाच.

१९९० च्या दशकात एकनाथ आवाड यांचं नाव कुठे कुठे ऐकू येऊ लागलं होतं. विशेषत: दलित चळवळीतल्या मित्रांकडून. ‘तिकडे बीडकडे एक तगडा कार्यकर्ता बेडरपणे काम करतोय. त्याला भेटा, त्याच्यावर लिहा,’ असं आम्हाला सांगितलं जात होतं. आमच्यापैकी एक-दोघं त्यांचा माग काढत मराठवाड्यात भेटायला गेले. त्यांच्याशी बोलले. त्यांचं म्हणणं समजून घेतलं. त्यांच्या कामाची पद्धत बघितली. आणि लक्षात आलं, हा एक ढाण्या वाघ आहे.

याला महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे. मग आम्ही एक विस्तृत लेख लिहिला. निखिल वागळे यांनी तो ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात छापला. ही गोष्ट १९९५ ची. त्या लेखाचा तेव्हा बराच गाजावाजा झाला. अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या भिंतींना जोरकस धडका मारणारा माणूस या लेखामुळे महाराष्ट्राला कळला. मराठवाड्यात तेव्हा जातिव्यवस्थेचा वेढा अगदी भक्कम होता.

गावकीची कामं मान्य असोत अथवा नसोत, दलितांनी करायचीच, असा अलिखित कायदाच होता जणू. जातीला धरूनच व्यवसाय करणं, मेलेली ढोरं ओढणं, जत्रेत रेडा कापणं, गावातल्या जमीनदारांचा वेठबिगार बनून पिढ्यान्पिढ्या मजुरी करणं, मंदिरात-पाणवठ्यात प्रवेश नसणं, पिढ्यामागून पिढ्या पोतराजकी करणं, आणि दलितांना नाना प्रकारची अस्पृश्यतेची वागणूक देणं असं सर्रास चाललेलं होतं.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्नही भिजत पडलेला होता. शिवाय हे सगळं मान्य नसलेली अगदी साधी साधी बंडखोर माणसं निर्घृणपणे मारली जात होती. अशा सार्‍या विपरीत परिस्थितीत एकनाथभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते लढत होते. त्यांची लढाई स्वत:च्या अस्तित्वाची होती; स्वाभिमानाचीही होती. ती लढण्यासाठी त्यांनी जी साधनं विकसित केली होती, त्यात नावीन्य होतं. भारताची राज्यघटना आणि कायद्यातली कलमं वापरून अन्यायाला आळा घालण्याची आक्रमक पद्धत त्यांनी शोधून काढली होती.

त्यांच्या कामाला पुढे धुमारे फुटत गेले. ‘मानवी हक्क अभियान’ ही त्यांनी सुरू केलेली संघटना मराठवाडाभर गावाखेड्यात पोहचली. अस्पृश्यतेच्या प्रश्नावर गावोगावी संघर्ष झाले. गावातल्या सर्वसत्ताधीशांविरुद्ध बंडं झाली. त्यांना कायद्याचा इंगा दाखवला गेला. कायदे मोडले, कायदे हातात घेतले म्हणून त्यांच्यावर खटले भरले, शिक्षा झाल्या. ज्यांच्या हाती गावातील सत्तेची आणि त्यामुळे अन्यायाची सूत्रं होती, त्यांची नांगी मोडली. त्याद्वारे त्यांचा ताठा, तोरा नेस्तनाबूत केला गेला. गावोगावच्या अशा संघर्षाचे नायक अर्थातच एकनाथभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते होते.

पुढे एकनाथभाऊंनी वेठबिगार मुक्तीची चळवळ केली. ऊसतोड कामगारांच्या पाठीशी उभे राहिले. गायरान चळवळ सुरू केली. सरकारी पडीक जमिनीवर दावे दाखवायला सुरुवात केली. या चळवळीतून त्यांनी हजारो भूमिहीनांना कसण्यासाठी जमिनी मिळवून दिल्या.

त्यांना जगण्याचा आधार मिळवून दिला. हाती आलेलं उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कर्ज घेऊन छोटे छोटे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी नॉनबँकिंग फायनान्स कंपनी काढली. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याच धर्तीवर मातंग व भटक्या-विमुक्त समाजाला सोबत घेऊन बौद्धधर्म स्वीकारण्याची एक चळवळ उभी करण्याच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आणि आपल्या समर्थकांसह सामूहिक धर्मांतर केलं. असं बरंच काही.

त्यांचा हा प्रवास अचंबित करणारा होता. २००५-०६ साली आम्ही पुन्हा त्यांच्यावर लेख लिहिला. ‘खरेखुरे आयडॉल्स’ पुस्तकात त्याचा समावेश केला. त्यांच्या कामाचा आवाका आणि महत्त्व ओळखून त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित करायचं ठरवलं. या पुस्तकाच्या प्रक्रियेत एकनाथभाऊ आणखी जवळून बघायला आणि अनुभवायला मिळाले.

एकनाथ भाऊंना सगळेजण ‘जिजा’ म्हणायचे. जिजा म्हणजे थोरला भाऊ. त्यांचे सगळे सोबती, कार्यकर्ते, गावोगावची माणसं-बाया त्यांना ‘जिजा’च म्हणायचे. त्यांचं ना आवाड साहेबांमध्ये रूपांतर झालं, ना एकनाथरावांमध्ये. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘जिजा’ राहिले. पण का माहीत नाही, मी त्यांना कधी ‘जिजा’ संबोधलं नाही. मी त्यांना ‘भाऊ’ म्हणत असे, आणि तेही मला ‘भाऊ’च म्हणत असत. बोलताना मात्र उच्चार ‘भाऽऽव’ असा करत. भाऊ म्हणण्याच्या त्यांच्या या लकबीची मोठी गंमत वाटे.

एकनाथ भाऊ खरं तर एकदम रांगडा माणूस. कुठेही घुसणारा आणि दणकेबाज बोलणारा. पण पुस्तकाच्या चर्चेवेळी बर्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदा भेटले, तेव्हा म्हणाले, ‘खरं सांगतो भाऽऽव, इतक्यांदा पुन्याला आलो, या तुमच्या ऑफिसच्या भोवती कित्तींदा चकरा मारल्या. पन ऑफिसात येऊन तुम्माला भेटण्याची हिम्मतच झाली नाही बघा!’ त्यांचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो.

गावोगावच्या जमीनदार, मालदार नि सावकारांना वठणीवर आणणारा आणि ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची रग अंगी असलेला हा माणूस... असा कसा वागू शकतो! पोलिस चौकीत फोन करून त्यांचा मोठा साहेब असल्यासारखा आवाज लावणारा हा माणूस... इकडे असा मऊ कसा पडू शकतो! नंतर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर म्हणाले, ‘भाऊ, तुम्ही तेलगावला या. तिकडे तुम्हाला खरा जिजा भेटेल. तुमच्याकडे आले की जिजाचा आवाज बदलतो, भाषा बदलते, सगळंच बदलतं. हा खरा जिजा नव्हे.’

एकनाथ भाऊंचं आयुष्य खरं तर एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षाही वरताण होतं. या माणसाला स्वत:ची जन्मतारीखच काय जन्मसालही माहीत नव्हतं. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या दुकडेगाव या बारक्याशा गावात एका पोतराजाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मरीआईची गाणी गात आणि लोकांचं शुभ चिंतत भीक मागणारी ही माणसं. तीही वंशपरंपरागत. त्यांनी दुसरा व्यवसाय करायचा नाही. पोतराजकी हीच त्यांची सुरक्षितता आणि तेच त्यांचं नशीब.

लोकांनी दिलेल्या शिळ्या भाकरीवर कसंबसं जगायचं, हे त्यांचं जगणं. ‘अठरा विश्व दारिद्य्र’ हा घासून गुळगुळीत झालेला शब्दही शरमेने मान खाली घालेल, अशा अवस्थेत ही माणसं जगतात. जन्म मातंग समाजातला. एकनाथभाऊंच्या बालपणी सर्रास अस्पृश्यता पाळली जायची.

जातिवाचक शिव्या सहजपणे दिल्या जायच्या. अगदी दलित जातींमध्येही आपापसांत श्रेष्ठ-कनिष्ठपणाची भावना होती. या सगळ्या काळाबद्दल भाऊ कमी बोलायचे. पण बोलले की त्यातली धग जाणवायची. अस्पृश्यता पाळणार्‍यांबद्दल तर ते तिडीकीने बोलायचेच, पण आपल्या माणसांबद्दल बोलतानाही त्यांचे शब्द कठोर होत. पण लगेच म्हणत, ‘पण भाऽऽव, आमची मान्सं वर्षानुवर्षांची गुलाम. ती तरी एका रातीत कशी उठून त्यांच्यासमोर उबी र्‍हानार!’

एकनाथभाऊ त्याच्या कुटुंबातला थोरला मुलगा. त्यामुळे परंपरेमुळे वडील यांनाच पोतराज बनवणार होते. पण आई-बहिणीने हट्ट धरला म्हणून तसं घडलं नाही. मुलाला शिकवायचं असं त्यांच्या आईच्या मनाने घेतलं होतं. त्यामुळे ते आधी जवळच्या कुप्पा नावाच्या गावातल्या शाळेत शिकले. पुढे मॅट्रिकपर्यंत जवळच्या लवूळ गावात. तिकडून कॉलेजात माजलगावला. वडिलांच्या पोतराजकीत मुलाचं शिक्षण कसं होणार! त्यामुळे पाय फुटल्यापासून काम करत चार पैसे मिळवतच ते शिकले. कधी शेळ्या पाळल्या, तर कधी लाकडं फोडली. कधी खड्डे खणले, तर कधी दोरखंड वळून बाजारात विकले. कधी ओझी उचलली, तर कधी मजुरी केली.

मिळेल ते काम करत त्यांनी दिवस काढले. स्कॉलरशिपच्या पैशाने आई-वडिलांच्या संसाराला आधार दिला. कित्येक पिढ्यांमध्ये शिक्षणाचा गंध नसला तरी शिकत राहिले. ‘आईमुळे शिकू शकलो’ हे पालुपद त्यामुळेच त्यांच्या तोंडी असायचं. ‘तेव्हा कळत नव्हतं, पण नंतर अक्कल आल्यावर आईच्या मनात माझ्याविषयी काय स्वप्न होतं, ते कळलं’, असं भाऊ म्हणत. बोलता बोलता आई गात असे ती जात्यावरची ओवी म्हणून दाखवत. भाऊंचा आवाज विनामाईकची भाषणं करून चांगलाच तगडा बनलेला होता. पण तो भरड झालेला नव्हता. दोस्तीत बोलत तेव्हा तर तो चक्क मंजूळ बने. किमान तसा वाटे तरी! आईची ओवी गाताना तर त्यांच्या लकबी देखील बदलत.

लिंब लोनी करीते, तुझ्या शाळंत येऊनबाळ माझ्या एकनाथा, दाव अक्षरं लिहूनलिंब लोनी करीते, तुझ्या शाळंच्या वाटंलाबाळ माझा एकनाथा, वाघ जनू जाळीतून सुटलाही ओवी म्हणताना भाऊंचा आवाज भरून यायचा.

म्हणायचे, ‘भाऽऽव, आपलं पोरगं जाळीतून सुटलेला वाघ आहे, हे तिला तेव्हाच कळलं होतं पहा.’आईची आठवणारी दुसरी ओळी म्हणताना तर भाऊंचा चेहरा बदलून जाई.दहाची पंचाईत माझ्या ऐकल्यानं केलीबाळ माझ्या एकनाथानं सभा सावलीला न्हेलीभाऊ या ओवीचा संदर्भ सांगत.

दहाची पंचाईत ऐकल्याने केली, म्हणजे जिथे दहा पंच बसून न्याय करतात, तिथे एकट्या लेकानेच न्यायाचा झेंडा हाती घेतला. सभा सावलीला नेली म्हणजे सगळ्यांना सावली मिळवून दिली, सगळ्यांना न्याय मिळवून दिला.

पहिली ओवी भाऊ शाळेत शिकत असतानाची आणि दुसरी ओवी भाऊ तरुणपणी गावोगावी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते तेव्हाची.भाऊंचा आईवर विशेष जीव. तिच्यामुळे आपलं आयुष्य बदललं याची जाणीव त्यामागे असणार. तुलनेने त्यांचे वडील प्रवाहपतित. आपल्या मुलाने पोतराज व्हावं आणि संसाराला आधार द्यावा, एवढीच त्यांची मुलाकडून अपेक्षा.

वडील पोतराज बनून रस्तोरस्ती फिरायचे तेव्हा ते जे म्हणत, त्याचीही भाऊ नक्कल करून दाखवत. ‘जय लकापती लक्ष्मी, एकाचे एक व्हव दे. पाचाचे पन्नास व्हव दे. वेल मांडवाला जाव दे. गायी-गोधनानी वाडे भरू दे...’ एवढा सगळा आशीर्वाद चांगल्या उंच आवाजात एका दमात म्हणून दाखवत.

एकदा भाऊ वडिलांना म्हणाले, ‘बाबा, तू एवढे आशीर्वाद मागतोस मरीआई कडे... पण तुझं आयुष्य असं का?’ हा विचार भाऊंना तरुण असताना सुचला आणि त्यांना अस्वस्थ करून टाकू लागला. जातीची गुलामी त्यांना अगदी नको वाटू लागली.

वडिलांच्या डोक्यावरचा तो हळदीकुंकवाने माखलेला बुचडा, त्यांचं अंगात येणं, घुमता घुमता दाताने लिंब फोडणं, कोंबडीच्या जिवंत पिलाची मान दातात धरून हिसक्याने धडावेगळी करणं... आणि तेही सगळं जातीच्या नावावर... हे सगळं भाऊंना नको झालं होतं. एक दिवस त्यांनी वडिलांना पटवून त्यांचा बुचडा कापून टाकला आणि वडिलांसह येणार्‍या पिढ्यांना पोतराजकीतून मुक्त करून टाकलं.

घरचाच पोतराज कातरल्यामुळे नंतर एकनाथभाऊंनी गावातल्या सगळ्याच पोतराजांना केस काढायला लावले. पुढे त्यातून पोतराजमुक्तीची चळवळच उभारली आणि गावोगावचे पोतराज माणसांत आणले. भाऊंनी ऐन तरुणपणी जे अनेक उद्योग चालवले होते, ते सांगायचे तर खूप लिहावं लागेल. त्याऐवजी वाचकांनी भाऊंचं ‘जग बदल घालुनि घाव’ हे आत्मचरित्र वाचावं. भाऊंमधील वाघाचं संपूर्ण दर्शन त्या पुस्तकातून होईल.

या पुस्तकाची रूपरेषा ठरवताना आणि ते रचताना त्यांच्या आयुष्याची एक झलक आम्हाला माहीत असण्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांना किल्ली मारावी लागे. सुरुवातीला ते थोडे अडखळत, पण नंतर एकेक प्रसंग रंगवून रंगवून सांगत. चळवळीतले सोबती मिळण्याच्या आधीच्या काळात भाऊंचा एकट्यानेच संघर्ष चालला होता.

ते प्रसंग स्वत:च्या आठवणीच्या भरवश्यावर सांगत. पण नंतरचे प्रसंग सोबतच्या कार्यकर्त्याची साक्ष काढत सांगत. त्यांचे हे किस्से ऐकले की सर्वस्वी परावलंबी जीवन जगणार्‍या पोतराजाच्या घरात इतक्या स्वतंत्र विचारांचा माणूस कसा जन्मला आणि असा अजब कसा घडला, असं वाटून जाई.ज्या प्रथा शेकडो वर्षं चालत आलेल्या आहेत, त्या मोडण्याचा विचार आणि धाडस भाऊंमध्ये शाळकरी वयातच कसं आलं असेल, हा प्रश्न मला कित्येक वर्षं पडत आलेला आहे.

गावात मेलेलं जनावर विशिष्ट जातीच्या माणसांनी ओढत न्यायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची, असं जातिप्रथेच्या आधारे रुढ झालेलं असताना भाऊंनी त्याला त्या वयात नकार का दिला असावा? गावात मरून पडलेल्या ढोराला शिजवून खाण्याची वेळ गरीबीपायी आणि भुकेपायी काही लोकांवर येई. पण असं वंगाळ खाऊ नये असं भाऊंना त्या वयात कसं सुचलं असावं? तसं खाणार्‍या मित्रांना त्यापासून परावृत्त करण्याचा विचार भाऊंमध्ये कसा आला असावा? अशीच एक प्रथा चालू होती ‘कारन’ करण्याची.

म्हणजे गावच्या जत्रेत रेडा कापून देण्याची. हे कामही विशिष्ट जातींनी करणं बंधनकारक असे. पण जातिव्यवस्थेने बंधनकारक केलेलं प्रत्येक अपमानकारक काम भिरकावून देण्याचा निखारा भाऊंमध्ये सुरुवातीपासून होता. हा कुठून आला असेल? गावात जातीच्या आणि विशेषत: अस्पृश्यतेच्या अंगाने कुणावरही अन्याय होत असेल, तर भाऊ सगळं भान विसरून त्यात उतरत आणि येनकेन प्रकारे न्याय मिळवून देत. ही शक्ती त्यांच्यामध्ये कुठून आली असेल? जातिआधारित अन्यायाला रोखायचं तर गावातलं राजकारण बदलावं लागेल, असं सुचणं हेही अचंबित करणारंच.

पण वर्षानुवर्षं घडी बसलेलं राजकारण असं सहजी बदलू शकत नसतं. अनेकांचे हितसंबंध आणि नेतृत्व स्वीकारायची सक्ती यातून ही घडी तयार झालेली असते. ही घडी विस्कटण्याची शक्कल शाळावयातच भाऊंनी लढवली होती. गावच्या जुलमी पाटलाची सत्ता संपवायची तर ते एखाद्याच्या बळावर शक्य नसतं. म्हणून भाऊंनी गावातल्या दुसर्‍या एका जातीच्या माणसाला उभं केलं नि त्याच्या पाठीशी मुस्लिम, मातंग आणि इतर गरीब जातींची जूट केली. अशी समीकरणं गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जुळवली जाताना आपण बघतो आहोत. पण प्रस्थापित सत्तेला आव्हान द्यायचं तर अशी काहीतरी जुळणी करावी लागेल, ही गोष्ट भाऊंना त्याच्या बरीच आधी कळली होती.

राजकारणाप्रमाणेच कायद्याचा वापर आपल्या हक्कांसाठी करण्याची जाणीवही भाऊंमध्ये फार सुरुवातीपासून होती. दोन-तीन उदाहरणं बघण्यासारखी आहेत. भाऊ तेव्हा जेमतेम मॅट्रिक झाले होते. गावचा पाटील त्यांना सतत त्यांच्या जातीची आणि अस्पृश्यतेची जाणीव करून देत होता. त्यावरून दोघांची जुंपली, हमरीतुमरी झाली. पाटलाने हात उगारला, शिव्या दिल्या.

एवढं सारं झाल्यावर भाऊ पोलिसात गेले, त्याच्याविरुद्ध तक्रार केली आणि खटला चालवला.याच्या वरताण आणखी एक घटना आहे. जवळच्या एका गावात दलित आणि सवर्णांचे स्वतंत्र पाणवठे होते. ही व्यवस्था अर्थातच बेकायदेशीर होती. सवर्णांच्या पाणवठ्यावरून दलितांनी पाणी नेण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन गटांत हाणामारी झाली. दलित वस्तीवर बहिष्कार टाकला गेला. हा सगळा अस्पृश्यता पाळण्याचाच प्रकार होता. भाऊ या प्रकरणात उतरले. त्यांनी गावातल्या सगळ्या दलितांची मोट बांधली आणि संबंधितांवर केस केली. या प्रकरणात गावच्या पाटलाला सात वर्षांची शिक्षा झाली.

गोरगरिबांसाठीचं रेशनवर येणारं धान्य बाजारात विकून टाकलं जातं आणि त्यामुळे लोक गावात हक्काच्या अन्नापासून वंचित राहतात, म्हणून भाऊंनी सरळ तहसीलदाराकडे तक्रार केली होती. तहसीलदाराला गावात यावं लागलं, चौकशी करावी लागली आणि दुकानदारावर कारवाई करावी लागली. हा दुकानदारही गावातल्या राजकारणातला गड्डा होता. इथे भाऊंचा हल्ला दुहेरी होता.

ही सगळी समज, हक्कांची जाणीव, शासकीय यंत्रणेची माहिती, कायद्याचं ज्ञान हे सगळं भाऊंना त्या बीड जिल्ह्यातल्या दुर्लक्षित गावातल्या दुर्लक्षित घरात कसं काय होतं, याचं खरोखर आश्चर्य वाटतं. त्यामुळे भाऊंची जेव्हा जेव्हा भेट होई, तेव्हा हटकून हा विषय निघे आणि मी याचं खोदकाम सुरू करे. अन्यायाविरुद्धची चीड ही भाऊंमध्ये उपजत होती.

पण पुढे जसं ते वाचू लागले, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पूर्वीच्या काळी कम्युनिस्टांविषयी जसा ओढा असे, तसा तो त्यांनाही वाटला होता. त्यांच्या कार्यपद्धतीत आक्रमकता होती. व्यवस्थेने उभं रहायलाही जागा ठेवलेली नाही, या चिडीतून ती आली असावी. शिवाय व्यवस्थेतली माणसं जेव्हा स्वत:च कायदा पाळत नाहीत, तिथे दणके देण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत. आणि कायद्याचा उपयोग करून ते दणके देतही. पण त्यांनी स्वत:ला कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊ दिलं नाही हेही खरं. त्यांचा एकूण प्रवास बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात झाल्याने त्यांच्यात हा बदल झाला असावा.

पण त्याचवेळीस हेही खरं की एरवी आंबेडकरवादी कार्यकर्ते जसे गांधीविरोधी असतात, तसे भाऊ नव्हते. गांधीजींची ‘पुणे करारा’वेळची भूमिका भाऊंना अजिबातच मान्य नव्हती. पण म्हणून गांधीजी हे त्यांना कधी शत्रू वगैरे वाटले नाहीत. माझं त्यांच्याशी याबद्दल बोलणं होई. ते एकदा म्हणाले, ‘गांधींचं उपोषण वगैरे त्यांच्यासाठी ठीक होतं हो! पण आम्ही आयुष्यभर उपाशी मरतो. आम्ही आंदोलन म्हणूनही उपाशीच रहायचं, हे कसं शक्य आहे! आम्ही खाऊन पिऊनच आंदोलन करणार!’ भाऊंचा गांधींवरील आक्षेप हा असा व्यावहारिक असावा.

सगळं बालपण भुकेने खाऊन टाकलेलं असलं, तरी भुकेच्या आगीत भाऊंमधली जिद्द जळून गेली नाही. उलट ती आणखी बळकट बनली. मांजराला चहूबाजूंनी कोंडलं की शेवटी ते जसं चवताळून हल्ला करतं, तसं भाऊंचं झालं. भाऊ तर साक्षात वाघ.

त्यांना त्या दिवसांमध्ये साथ मिळाली ती दलित पँथरच्या वाघांची. या वाघांनी त्या काळी गावागावात आंदोलनं केली, पाणवठे खुले केले, मंदिरं खुली केली, गावोगावच्या दलितांना एकवटत सार्वजनिकरीत्या आंबेडकर जयंती साजरी केली, दलित अत्याचारांविरुद्ध खटले चालवले, नामांतर चळवळीत भाग घेतला.

जातिव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी जे जे करायचं, ते सारं केलं. ‘भाऽऽव, तुम्हाला सांगतो, माझी एक थिअरी आहे...’ असं म्हणत भाऊ एकदम संशोधकाच्या भूमिकेत जात. म्हणत, ‘जिथल्या लोकांनी आमच्यासोबत गावाशी झगडा केला, त्या गावांमधली अस्पृश्यता संपली. तिथे आता कुणी कुणाशी जातीवरून वेगळं वागू शकत नाही. पण जी गावं तेव्हा डरली आणि संघर्षात उतरली नाहीत, ती अजूनही जातीय द्वेषाला बळी पडत आहेत. या गावातून जोवर तरुण पोरं उभी राहून गावची सत्ता धुडकावत नाहीत, तोवर इथे बदल होणार नाही.’

भाऊंचं बोलणं कधीच हवेतलं नसे. १९९० मध्ये ‘मानवी हक्क अभियान’ नावाची संघटना स्थापन केल्यानंतर त्यांनी तेलगाव या छोट्याशा गावाजवळ एक कॅम्पस उभं केलं. तिथे या सर्व लढ्यांचे दस्तावेज गोळा केले. पुढे अनेक अभ्यासकांनी या लढ्यांचा अभ्यास केला. भाऊ छाती फुगवून अभिमानाने म्हणत, ‘आमच्या कामावर चार-पाच पुस्तकं लिहिली गेलीत आणि पंधरा-वीस डॉक्टरेट झाल्यात.’

भाऊंचं आयुष्य सिनेमासारखंच होतं असं म्हटलं ते म्हणूनच. ज्या माणसाला खायला दोन घास मिळत नव्हते आणि जो मजुरी करून शिकला, पुढे एमए झाला, एमएसडब्ल्यू झाला, एलएलबी करून वकील झाला. त्याने पुढे ठाणे जिल्ह्यात जाऊन विवेक आणि विद्युल्लता पंडित यांच्यासोबत आदिवासी वेठबिगारी मोडून काढण्याचं काम केलं.

नंतर मराठवाड्यात परतल्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वस्ती शाळा चालवल्या, मजुरांच्या युनियन्स बांधल्या, भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून देण्याचं अभियान छेडलं. काही संघटनांच्या समन्वयातून सुमारे ७० हजार हेक्टर जमिनीसाठी लढा उभारला. अडीच लाख दलित कुटुंबांपैकी पन्नासेक हजार कुटुंबांना जमिनीवर ताबा मिळवून दिला आणि कायदेशीर प्रक्रिया चालू केली. एवढंच काय परदेशात जाऊन युनो आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाऊन भारतातील दलितांच्या वतीने जोरकसपणे भूमिका वगैरेही मांडली.

एका माणसाच्या आयुष्यात एवढं सारं घडलेला माणूस खरोखरच विरळा. त्यामुळे भाऊ माझ्यासमोर असले की मला गहिवरून जायला होत असे आणि त्यांना ‘प्यार की एक झप्पी’ दिल्याशिवाय आमची भेट संपत नसे.प्रस्थापित व्यवस्थेला एखादा माणूस आपल्या फौजफाट्यासह धक्के देतो, तेव्हा त्याच्या जिवावर माणसं उठतातच. असे छोटे-मोठे प्रसंग भाऊंच्या आयुष्यात अनेक आले. ज्या लोकांच्या भल्यासाठी ते काम करत होते, त्यातल्याच लोकांना फितवून त्यांच्यावर हल्ले केले गेले.

हे हल्ले अर्थातच जीवघेणे होते. भाऊंच्या अफाट कामामुळे आणि त्यातून त्यांना मिळणार्‍या समर्थनामुळे प्रस्थापित राजकारणीही त्यांच्यावर दात खाऊन असत. एका निवडणुकीत भाऊंच्या प्रभावामुळे एक मंत्री पराभूत झाला, म्हणून त्याने भाऊंवर हल्ला घडवून आणला म्हणे. या हल्ल्यात भाऊंवर एका गुंड टोळक्याने तलवारीने वार केले. प्रसंगावधान राखून कितीही बचाव केला, तरी त्यांचा कान, नाक, छाती आणि पाठीवर तलवारी सपासप चालल्या.

या प्राणघातक हल्ल्यातून भाऊ बचावले खरे, पण तेव्हापासून त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचं संरक्षक कडं वावरू लागलं. ते ऑफिसमध्ये भेटायला येत, तेव्हाही त्यांच्या खिशात किंवा पिशवीत परवानाधारक पिस्तुल सोबत असे. ‘पिस्तुल दाखवा’, असं गंमतीने म्हटलं तरी कधी दाखवत नसत. ‘ते पिस्तुल तुमच्यासाठी नाही भाऽऽव! ज्याच्यासाठी आहे त्याला मात्र नक्की दाखवेन’ असं गोड हसून म्हणत.

भाऊंचं दिसणं तसं राकट. चांगला धिप्पाड देह. रंग पक्का काळा. चेहर्‍याभोवती पांढर्‍या फेक केसांचं जंगलं आणि एकमेकांत मिसळून गेलेल्या मोठ्याच्या मोठ्या दाढी नि मिशा. पांढरा लांब झब्बा आणि निमुळता होत जाणारा पायजमा. हिवाळ्यात अंगावर बटणबंद जाकीट. खांद्यावर टिपिकल मल्टिपर्पज मराठवाडी उपरणं. कार्यक्रम वगैरे असेल तर उपरण्याची जागा लाल-निळी रंगीत शाल घेत असे. याहून वेगळ्या पेहरावात भाऊंना मी पाहिलं नाही.

त्यांचं बोलणं दणदणीत. आवाज खणखणीत. पण एखाद्या सभेत बोलणारे किंवा पोलिसांना कायद्याचे धडे देणारे भाऊ वेगळे, नि खासगीत दोस्तांच्या मैफिलितले भाऊ वेगळे. गप्पांमध्ये भाऊ गोड हसत, गोड बोलत. त्यांचा आवाज अगदी मऊ झालेला असे. पुढचा माणूस बोल लागला, की अगदी मन लावून ऐकत. पटलं तर पूरक बोलत. हे अगदी सहज सहज. मान तिरकी करून बोलण्याची त्यांची शैली. आणि बोलताना ‘बरं का भाऊ...’, ‘भाऊला सगळं माहीत आहे...’, ‘भाऊ होते ना तेव्हा...’, असं जवळीक साधणं. अगदी मन:पूर्वक. ‘भाऽऽव, कुठल्याही कारणानं तुम्हाला कुणी हात लावला, तर अर्ध्या रातीत हा जिजा तुमच्यासाठी धावून येईल...” अशी मनमोकळी दिलदार वाणी.

भाऊंसोबतच्या गप्पांच्या फडात आठवणी, किस्से, गंमतीजमती वगैरे तर असतच, पण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एरवी बाहेर न कळणार्‍या बातम्याही असत. कोण कुणाला भेटलं, कुणी कुणाला काय सांगितलं, त्यातून कशी चक्र फिरली वगैरे त्यांना बरंच माहीत असायचं. विशेषत: मराठवाड्यातल्या मंत्र्या-संत्र्यांबद्दल नि आमदार वगैरे जमातीबद्दल ते मौलिक माहिती बाळगून असायचे. ‘भाऊ, तुम्हाला सांगतो... वरून दिसतं तसं नसतं या लोकांचं...’ असा कानमंत्र देत विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची आपापसात कशी देवाणघेवाण चालते वगैरे उदाहरणांनिशी सांगायचे. विश्वास बसणार नाही अशी माहिती त्यात असे.

मी अनेक वर्षं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहीत आलोय. त्यामुळे त्या अनुषंगाने वाचत राहणं आणि समजून घेत राहणं, हे ओघानेच आलं. पण माझं प्रशिक्षण राज्याची राजकीय प्रक्रिया समजून घेण्याचं झालं होतं. राजकीय पक्ष, त्यांची विचारसरणी, त्यांची निवडणुकांतील कामगिरी, त्यांचं राज्यपातळीवरील आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व, त्या नेत्यांनी बांधलेले मतदारसंघ, त्यासाठी केली जाणारी विकासकामं अशा रीतीने अभ्यास केला जाई. पक्षांमधल्या गटबाज्या आणि एकमेकांवरच्या कुरघोडी वगैरे माहीत होत्या.

पण भाऊंचं बोलणं ऐकून स्थानिक पातळीवर त्या किती प्रभावी ठरतात, हे कळू लागलं. आपल्या प्रभाव क्षेत्रातील (किंवा जातीची) मतं दुसर्‍या मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या उमेदवाराला देऊन त्याच्या बदल्यात त्याच्या प्रभावक्षेत्रातील मतं आपल्याला मिळवण्याचे जुगाड कसे जुळवले जातात, हे त्यांच्याकडून मला लख्खं कळलं. एरवी ज्या दोन जातींचे हितसंबंध एकमेकांविरोधात मानले जातात, त्या जाती आपापल्या नेत्यांच्या आदेशावरून कशा मतदान करतात, हे त्यांच्यामुळे समजलं. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन परस्परविरोधी पक्षांतील प्रतिस्पर्धी नेत्यांचं स्थानिक पातळीवरील राजकारण कसं घडतं नि उलगडतं, हे कळलं तेव्हा तर मला दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यासारखं वाटलं होतं.

भाऊ हे मूळचे दलित पँथर या जहाल राजकीय, सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे पाईक. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील ही निसरडी अवस्था बरोबर हेरली. शरद पवारांच्या राजकारणाचा चेहरा पुरोगामी होता. त्यांची नामांतर चळवळ आणि एकूणच दलित चळवळीला सहानुभूती होती. त्यामुळे भाऊ त्यांना धरून होते. त्यांनी पवारांना कार्यक्रमाला, सभेला वगैरे बोलावलं होतं. पुढे राष्ट्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणातही निसरडी परिस्थिती पाहून त्यांनी १९९६ साली थेट लोकसभेची निवडणूक लढवली.

भाऊंचा कांशीराम या उत्तरेतील बड्या बहुजन नेत्यांशी संपर्क होता. त्यांच्या सांगण्यावरून ते निवडणुकीला उभे राहिले. निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे; प्रस्थापितांना सत्तेवरून खेचण्यासाठी लढ, असं कांशीराम यांनी भाऊंना सांगितलं होतं. भाऊ लढले आणि त्यांना मिळालेली मतं निर्णायक ठरली. पुढे हेच सूत्र धरून भाऊंनी बीडसह मराठवाड्यातील आसपासच्या जिल्ह्यात स्वत:ची ताकद उभी केली. ही ताकद निवडून येण्याएवढी नव्हती, पण उमेदवार पाडण्याएवढी नक्कीच होती. त्यातून भाऊंनी स्वत:चा राजकीय वचक तयार केला.

दलित, वंचित, गरीब घटकांना राजकारणात जी स्पेसच शिल्लक नव्हती, ती कशी मिळवायची याची एक पद्धतच भाऊंनी शोधून काढली. त्याच्या बळावरच त्यांनी आपली पत्नी गयाबाई यांना जिल्हा परिषदेत निवडून आणलं, सभापती बनवलं, गरिबांच्या विकासाची कामं करण्याची वाट खुली करून दिली. भाऊंचा हा राजकीय प्रवास माझं नव्याने राजकीय प्रशिक्षण करणारा होता.

भाऊंच्या पुस्तकाचं काम चालू असताना तर त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी कळत गेल्या. सुमारे एक वर्षभर पुस्तकाच्या लिखाणाचं काम चाललं होतं. माझा सहकारी प्रशांत खुंटे शब्दांकन करत होता. तो चार-सहा महिने त्यांच्याकडेच जाऊन राहिला. त्यांच्याशी बोलला, सगळी माहिती मिळवली. भाऊंना सोबत घेऊन त्या संपूर्ण परिसरात गावोगावी फिरला. भाऊंचं आयुष्य ज्यांच्यासोबत गेलं होतं, त्यांना भेटला. त्यांच्याकडून आठवणी मिळवल्या. लोक ज्या भाषेत त्यांच्या ‘जिजा’बद्दल बोलत, ते ऐकून हरखला. ‘जिजा, तुझ्यामुळं आमचं संसार उभं रायलं बग.

वावर पिकवायला मिळालं, पोराला साळंत धाडायला आलं. साजर्‍या घरात राहायला मिळालं... दगडाच्या देवानी आमच्यासाठी काय केलंय जिजा? आम्हास्नी माय बापाच्या वरचा सहारा तू आहेस बाबा...’ असं बोलणारे लोक त्याने बघितले. ‘जिजा होता म्हणून आमचं जगणं बदललं’ असं लोक सहजपणे म्हणत, तेव्हा जिजांचाही ऊर भरून येत असे. आपल्या कामामुळे हजारो माणसांचं जगणं बदललं याचा त्यांना अभिमान होता आणि तीच त्यांच्या जगण्याची उर्जा होती.

लोकांच्या मनात अशी जागा पटकावलेला जिजा... पण मी त्यांचे फोटो वगैरे काढू लागलो, की अवघडून जात असे. त्यांचे लुकलुकणारे डोळे आणि चेहर्‍यावरचं राकट सौंदर्य गोठून जात असे. त्यांना बोलताही येत नसे. ‘भाऊ, तुम्ही बोला निवांत. त्याशिवाय फोटो चांगले येणार नाहीत’ असं म्हटलं, की रेटून बोलण्याचा प्रयत्न करत. तेव्हा त्यांचं बोलणं-वागणं-हातवारे सगळं औपचारिक होऊन जाई. एकदा निखिल वागळेंनी टीव्हीसाठी त्यांची मोठी दोन तासांची मुलाखत घेतली होती. तेव्हाही ते असेच अवघडून गेले होते. त्यांना म्हटलं, ‘का गडबड करत होतात कॅमेर्‍यासमोर?’ तर म्हणाले, ‘भाऊ, मी रस्त्यावरचा माणूस. लोकांमध्ये राहणारा. हे टीव्ही, मुलाखत वगैरे आपल्याला जमत नाय बगा.’

पुस्तक लिहून तयार झाल्यावर पुस्तकाला प्रस्तावना असावी, अशी चर्चा सुरू झाली. आम्ही मिळून साताठ नावं काढली. मागच्या पिढीतले दलित लेखक, अभ्यासक, विचारवंत, संपादक अशी. पण भाऊंना कुणी पटेना. ‘याचं माझ्याशी जुळत नाही’, ‘याला मी एकदा चांगलं खडसावलं होतं’, ‘याला आपल्या कामाचं मोल नाही’, ‘हा आपल्याजागी थोर आहे, पण जमिनीवरचं वास्तव कळत नाही...’ अशी एक ना अनेक कारणं देऊन त्यांनी सगळी नावं नाकारली.

- सुहास कुलकर्णी

पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंक : https://shorturl.at/b5ddZ

ालुनि_घाव #एकनाथ_आवाड #समकालीन #प्रकाशन #सुहास_कुलकर्णी

Address

Samakaleen Prakashan, 8 Amit Complex, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 6:15pm
Tuesday 11am - 6:15pm
Wednesday 11am - 6:15pm
Thursday 11am - 6:15pm
Friday 11am - 6:15pm
Saturday 11am - 6:15pm

Telephone

+919922433606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samkaleen Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samkaleen Publication:

Share