18/06/2020
🧙🏻♂️🌧️💦🧙🏻♂️💦🌧️🧙🏻♂️
➖➖➖➖➖➖➖
_*📌 ‘मोसमी पाऊस’ आणि हवामाखाते या वरील संशोधनाचा ब्रिटिश काळापासून सुरू झालेला अभ्यास आणि इतिहास जाणून घेऊ...*_
➖➖➖➖➖➖➖
_*📍एच. एफ. ब्लँडफोर्ड भारतीय हवामान संशोधनाचे जनक...*_
➡️ भारतात आल्यानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की या देशात बरोब्बर ४ महिने पाऊस पडतो. (ब्रिटनमध्ये वर्षभरात कधीही पाऊस पडत असतो.) मग भारतातल्या या वेगळ्या, शिस्तशीर पावसाचा अभ्यास त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सकरायला सुरुवात केली आणि त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात हवामान खातं स्थापन केलं. इ. स. १८७५ मध्ये ब्रिटिश सरकारने एच. एफ. ब्लँडफोर्ड यांची हवामान खात्याचे सरसंचालक म्हणून नेमणूक केली. त्या आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वेधशाळा प्रस्थापित केल्या होत्या. पण त्यांचा नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज आणि भारतीय पारंपरिक हवामानाचा अंदाज यात फारसा फरक नव्हता. त्या वेधशाळांचे फायदे म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे पडलेल्या पावसाचे आकडे हवामान अभ्यासकांना उपलब्ध आहेत.
➡️ ब्लँडफोर्डनी मोसमी पावसाच्या अंदाजशास्त्राचा पाया घातला. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी मोसमी पावसाच्या अभ्यासाला वाहिलं होतं. मोसमी पाऊस ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं त्यांनी जगासमोर आणलं. त्यांच्या मनावर मोसमी पावसानं घातलेली मोहिनी आयुष्यभर टिकली. जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमार्गे भारतात शिरणाऱ्या वाऱ्यांमुळे संपूर्ण देशात पाऊस पडतो, हे लक्षात आल्यावर या वाऱ्यांचं नामकरण 'माॅन्सून' असं करण्यात आलं. अरबीमधल्या 'मौसम' (ऋतू) या शब्दापासून 'माॅन्सून' हा शब्द तयार झाला. मॉन्सून हे ‘मोसमी’ या शब्दाचं अपभ्रष्ट रूप असल्याचं त्यांनी सर्वप्रथम लिहून ठेवलं.
_*📍दरवर्षी पावसाळ्यात पाऊस पडतो. पण पावसाळा जूनमध्येच का सुरू होतो? पाऊस कधी कमी तर कधी जास्त का पडतो? हे ढग येतात कुठून? त्यांना माॅन्सून का म्हणतात..???? नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात आणि का येतात..???*_
➡️ एप्रिल-मे महिन्यांत राजस्थानचा वाळवंट जोरदार तापतो. त्यामुळे तिथली हवा विरळ होऊन वर सरकते आणि तिथला हवेचा दबाव कमी होतो. तुलनेने हिंद महासागर कमी तापतो. थंड हवा असल्यामुळे तिथे हवेचा दबाव जास्त असतो. स्वाभाविकपणे, अधिक दबाव असलेल्या ठिकाणाहून कमी दबाव असललेल्या ठिकाणाकडे हवेचा प्रवास सुरू होतो. समुद्रावरचे वारे जमिनीवर येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. भारतात प्रवेश केल्यावर या बाष्पाचा पाऊस पडतो. (हवेच्या दबावातील फरक हे माॅन्सूनच्या वाऱ्यांच्या प्रवासाचं मुख्य कारण आहे. इतरही अनेक छोटी-मोठी कारणं आहेत.)
_*📍या वाऱ्यांना नैर्ऋत्य माॅन्सून का म्हणतात?*_
➡️ कारण या वाऱ्यांचा भारतात प्रवेश नैर्ऋत्येकडून (साउथ-वेस्टकडून) होतो. मुळात माॅन्सूचे वारे भारताच्या दक्षिण टोकाजवळ दुभंगतात. एक शाखा केरळकडून कर्नाटकमार्गे पश्चिम किनारपट्टीवरून वर सरकते. तर दुसरी बंगालच्या उपसागरावरून पूर्व किनारपट्टीजवळून वर चढते. पहिली शाखा केरळ, कर्नाटक, गोवा करत कोकणात येते. पुढे माॅन्सूनचे ढग मध्य भारतातल्या सपाट प्रदेशातून हिमालयाच्या दिशेने प्रवास करतात. हेच ढग थेट पाकिस्तानपर्यंत पाऊस पाडतात. हिमालय आडवा आल्यामुळे तिथे ढग अडतात आणि वरवर सरकतात. उंचावरच्या थंड वातावरणामुळे बाष्पाचं पाणी होतं आणि पर्वतांमध्येही मजबूत पाऊस कोसळतो.
➡️ दुसरी शाखा ओडिशामार्गे बंगालपर्यंत येते. बंगालमध्ये दुसऱ्या शाखेच्या आणखी दोन पोटशाखा होतात. एक पोटशाखा आसाम, मेघालयच्या दिशेने जाते. याच पोटशाखेमुळे मेघालयातला चेरापुंजी-मौसिनराम हा पट्टा जगातला सगळ्यांत ओलागच्च प्रदेश आहे.
_*📍भारतात कुठे पाऊस कमी तर कुठे जास्त का पडतो?*_
➡️ एकदा माॅन्सूचे ओले वारे भारताच्या भूमीत शिरले, की कुठे आणि किती पाऊस पडेल हे प्रत्येक ठिकाणचं तापमान, दबाव, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचं अंतर, वाऱ्यांच्या मार्गापासूनचं अंतर, वनीकरण, अंतर अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. कुठे नेमका किती पाऊस पडेल, हे शोधून काढण्यासाठी अनेक माॅडेल्स आहेत.
➡️ ब्लँडफोर्डनी मोसमी पावसाच्या अभ्यासासाठी आशिया खंडात जिथं जिथं ब्रिटिश अंमल होता तिथं तिथं वेधशाळा उभारल्या. आंतरजालच काय दूरध्वनी सेवा उपलब्ध नसताना या सर्व वेधशाळांनी गोळा केलेली माहिती एकत्र करून अभ्यासायची, त्यानंतर त्या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढता येतात का आणि हे निष्कर्ष काळाच्या कसोटीवर टिकतात का, याचा पडताळा घ्यायचा, हे काम खरंतर आजही सोपं नाही. त्या काळात ब्लँडफोर्डनी ते करायचा प्रयत्न केला. यावरून त्यांची अथक परिश्रम घ्यायची तयारी, चिकाटी आणि अशा तऱहेच्या अभ्यासाची कल्पना मनात आणून ती राबवणं, यावरून त्यांच्या बुद्धिमतेची चमक आपल्या लक्षात येते. एक इंग्रज त्याच्या मातृभूमीपासून दूर राहून हे काम आयुष्यभर करतो, अशी ध्येयनिष्ठा क्वचितच बघायला मिळते.
➡️ अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश (आता म्यानम्यार) येथून तारा येत. या दैनंदिन संगतवार लावणं हेच मोठं कटकटीचं काम होतं. ब्लँड फोर्डनी शक्य होतं, तिथं पर्वत शिखरावर वेधशाळा उभारल्या. पतंगाच्या साहाय्यानं वातावरणाचा अभ्यास करायची कल्पना त्यांचीच. या पतंगांची जागा आता बलूननी घेतली आहे. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी हवामान खात्यात नोकऱया दिल्या.
➡️ ब्लँडफोर्ड यांच्या निवृत्तीनंतर (सर) जॉन एलियट हे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख बनले. त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मोसमी पावसाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच होऊ शकतो, हे ओळखून त्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलली. त्यांच्या पुढाकारानं इ. स. 1897 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मेघ अभ्यास वर्ष’ म्हणून घोषित केलं गेलं. एलियटनी तिसेराँ द बोर्ट या प्रेंच शास्त्रज्ञाच्या सहकार्यानं मोठय़ा प्रमाणात भारतीय वातावरणाच्या अभ्यास सुरू केला. वातावरणाच्या या अभ्यासात द बोर्ट यांनी स्तरितांबराचं अस्तित्व शोधून काढलं. वातावरणातला हा स्तर फार महत्त्वाचा मानला जातो. मोसमी पावसाबद्दलचा अंदाज जाहीर करण्याची कल्पनाही सर जॉन एलियट यांचीच. अगदी सुरुवातीस हा अंदाज हे राष्ट्रीय गुपित असे. अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकाऱयांनाच तो पहायला मिळत असे.
➡️ एलियटनंतर त्यांचे एक साहाय्यक गिल्बर्ट वॉकर यांच्याकडं हवामान खात्याची सूत्रं आली. वॉकरनी मोसमी पावसाच्या अभ्यासाला गती दिली. मोसमी पावसाच्या त्यांच्या अभ्यासामुळं त्यांना जागतिक स्तरावरचे शास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. भारतीय हवामान खात्याच्या इतिहासातही त्यांचं नाव अग्रणी शास्त्रज्ञ म्हणून आदरानं घेतलं जातं. वॉकर यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल वाटत असे. प्रत्येक नैसर्गिक घटनेमागचं वैज्ञानिक कारण शोधणे, त्याची खात्री करून घेणे आणि ती कारणमीमांसा पूर्णत्वास नेणं, हा त्यांचा पिंडच होता. सर विल्यम विल्कॉक्स यांनी इजिप्तमधील जलसाठा नियोजन प्रकल्पाच्या महासंचालकपदी कार्यरत असताना ‘नाईल नदीला येणाऱया पुरांचा आणि भारतीय मोसमी पावसाचा काहीतरी निश्चित संबंध आहे.’ असे एक विधान केलं होतं. या विधानाची सत्यता पडताळून पाहण्याच्या निश्चयाने वॉकर कामास लागले. त्यासाठी त्यांनी बरीच आकडेवारी गोळा केली. वृक्षतोड आणि मोसमी पाऊस यांच्या परस्पर संबंधांचा त्यांनी अभ्यास केला. सौर डाग आणि मोसमी पाऊस यांच्यातील संबंधांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचबरोबर भारतातील मोसमी पाऊस हा जागतिक हवामान चक्राचा एक भाग असावा, हे सांगून त्यांना तो सिद्ध करता येईल का, यासाठीही प्रयत्न केले.
➡️ वॉकर यांच्या संशोधनानं त्या काळात खूप खळबळ माजली. वॉकर प्रसिद्धीसाठी काय वाट्टेल ते वैज्ञानिक पाया नसलेलं बोलतात, असंही म्हटलं गेलं. खरंतर वॉकर एक द्रष्टे वैज्ञानिक. सखोल निरीक्षणातून ते त्यांचे निष्कर्ष काढत असत. ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि अर्जेंटिनामधील ब्यूनोस आयर्स अशा पृथ्वीच्या दोन टोकांच्या शहरांच्या हवेचा दाब आणि पश्चिम घाटातील पाऊस, अंटार्क्टिकातील हिमखंड आणि भारतातील पाऊस यांचा संबंध असावा, अशी त्यांची विधानं काही काळ टीकेचा विषय ठरली. या बाबी पुढे शंभर वर्षानंतर खऱया असल्याचे पुरावे मिळाले. पॅसिफिक महासागराचा आणि मोसमी पावसाचा संबंध असावा, त्याच बरोबर पॅसिफिक महासागरावरील जास्त दाबाचा हवेचा पट्टा, त्याच वेळी हिंदी महासागरावरील कमी दाबाच्या हवेच्या पट्टय़ाची निर्मिती, तसंच हवेचा हा कमी दाबाचा पट्टा हिवाळाभर टिकून राहणं यांचा आणि भारतीय उपखंडामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याचा संबंध आहे, असंही वॉकर म्हणत असत. त्यामुळं आता सर गिल्बर्ट वॉकर इज फादर ऑफ मॉन्सून स्डटीज असं म्हटलं जातं.
➡️ आज भारतासह अनेक देश मोसमी पावसासंबंधीच्या माहितीची देवाण घेवाण सातत्याने करीत असतात. मोसमी पावसाच्या अभ्यासासाठी खास उपग्रह अवकाशात भ्रमण करतात. दूरध्वनी उचलला की जगाची दोन टोकं जोडली जातात. या पार्श्वभूमीवर या संशोधकांनी मोसमी पावसाच्या संशोधनात जे पथदर्शक काम करून ठेवलंय त्याला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. भारत वर्ल्ड मेटिऑरॉजिकल असोसिएशनचा सदस्य आहे. या संघटनेचे 160 सदस्य आहेत. त्यांनी मोसमी पावसाच्या उन्हाळी हालचालीचं केंद्र दिल्लीत स्थापन केलंय. त्यावरून मोसमी पावसाच्या संशोधनातील भारताचे महत्त्व दिसून येते.
➖➖➖➖➖➖➖
🧙🏻♂️🌧️💦🧙🏻♂️💦🌧️🧙🏻♂️