08/06/2026
मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव
कर्जत : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाची घरगणना आणि जनगणना प्रभावीपणे व्हावी, तसेच त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुशाफिरी यात्रा’ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव, पाटेवाडी, हंडाळवाडी, कर्जत शहर, भांडेवाडी, राशीन, बाभुळगाव दुमाला, पिंपळवाडी आणि कुळधरण येथे भेटी देण्यात आल्या.
भटके-विमुक्त समाजाचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान समाजबांधवांच्या पालांवर, तांड्यांवर आणि तात्पुरत्या निवासस्थानी जाऊन संवाद साधण्यात आला. यावेळी अनेक कुटुंबांनी अद्यापही त्यांची घरगणना अथवा जनगणना झालेली नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 78 वर्षे उलटूनही भटके-विमुक्त समाजाला जगण्यासाठी हक्काचे घर तर दूरच, परंतु मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही जागा उपलब्ध नाही. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित राहत असून त्यांच्या अचूक नोंदी नसल्याने भविष्यात नागरिकत्व सिद्ध करण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या समाजाची घरगणना व जनगणना तातडीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने होणे आवश्यक आहे.
ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिवा उमाताई जाधव यांनी महिलांशी संवाद साधताना भटकंतीमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या आरोग्य सुविधांसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजाची योग्य नोंदणी न झाल्यास भविष्यात नागरिकत्वाशी संबंधित विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शासनाने या समाजाच्या सर्वंकष सर्वेक्षणाला प्राधान्य द्यावे.
बाभुळगावचे सरपंच अमोल चव्हाण यांनी गावातील भटके-विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच घरकुल, शिक्षण, आरोग्य आणि इतर शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान डवरी गोसावी, वडार, भिल्ल, पारधी, कैकाडी, तिरमली, मरीआईवाले आदी विविध भटके-विमुक्त समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी तुकाराम पवार, शितलताई पवार, ललिताताई पवार, राहुल पवार, रेश्माताई बागवान, ऋषी गायकवाड, चंपाताई पवार, काजुरी पवार, उत्तम सावंत आणि नवनाथ शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार तुकाराम शिंदे यांनी मानले. यावेळी दिसेना पवार, रंगीशा काळे, पार्वतीताई भोसले, वैभव काळे, सावकार भोसले, आतिश पवार, बापू काळे, सुनील काळे, दिनेश काळे आणि अविनाश काळे आदी उपस्थित होते.