Dot.in Marathi

Dot.in Marathi Dotinmarathi is a raigad & maharastra based digital media platform sharing verified local news, public awarness content and important city updates.

we focus on responsible reporting and share information through official and reliable authorities

27/08/2026

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली. महामार्गाच्या कामाचा वेग, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपरोधिक शब्दांत, “मंत्री महोदयांना रस्ते बनवायला दुबईच्या राजाने बोलावलं होतं!” असा टोला नितीन गडकरींना लगावला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात प्रवाशांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई गोवा महामार्गावर पाहणी करताना, हा पूल स्पेस टेक्नॉलॉजीने बांधला आणि काही दिवसातच हा ब्रिज बंद झाला. नॅशनल हायवेच्या लोकांनी ऑडिट केलं, त्यानंतर ब्रिज हा बंद केला. मुंबई गोवा महामार्गावर चा हा ब्रिज आहे, काही ठिकाणी खड्डे आहेत.

महामार्गाच्या पाहणीदरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती, रखडलेली कामे आणि वाहनचालकांच्या अडचणींची माहिती घेण्यात आली. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील नागरिकांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या टीकेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

27/08/2026

करंजाडे बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड; ऑनलाइन कर्जाच्या आमिषाने फसवणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद
कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजाडे परिसरात सुरू असलेल्या या बनावट कॉल सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी टोळीतील चौघांना अटक केली आहे.विजय भंडारी, तुषार पिंगळे, रोहित गौडा, आणि दर्शन उमाशंकर या चौघांना अटक करण्यात आली
आरोपींकडून फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे तीन लॅपटॉप 15 मोबाईल फोन विविध व्यक्तींच्या नावावरील सात बँकांचे डेबिट कार्ड, 31 सिम कार्ड 74 हजार 400 रुपये रोख रक्कम, संशयितांकडून नागरिकांना फोन करून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, होल्डिंग चार्ज आदी विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. कर्जासाठी इच्छुक नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तोडला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन, विविध कागदपत्रे आणि फसवणुकीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे ३ लाख 9500 हजार 5०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, तसेच या टोळीचे इतर सदस्य कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाइन कर्जाच्या जाहिरातींना भुलून अनोळखी व्यक्तींना पैसे किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

27/08/2026

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार मोठी जीवित व वित्तहानी

26/08/2026

ताम्हिणी घाटात घातपात? २० फूट दरीत अज्ञात महिलेचा मृतदेह
माणगाव, २५ ऑगस्ट : ताम्हिणी घाटातील दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
घाटातील एका अपघातग्रस्त परिसरात सुमारे २० फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथकाची मदत घेण्यात आली.
रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तिचा मृत्यू अपघातामुळे झाला की हा घातपात आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी माणगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

26/08/2026

स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला हजारोंचे वीजबिल; श्रीवर्धनमध्ये महावितरणकडे तक्रार
स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत राज्यभर चर्चा सुरू असतानाच श्रीवर्धन तालुक्यातील कोळमांडले गावात वाढीव वीजबिलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या सहा बाय आठ फुटांच्या टपरीला तब्बल हजारो रुपयांचे वीजबिल आल्याने व्यावसायिक मारुती गोविंद पड्याळ यांनी महावितरणकडे तक्रार केली आहे.
पड्याळ यांच्या टपरीमध्ये दोन एलईडी बल्ब असून ते सायंकाळी सहा ते नऊ रात्रीनऊपर्यंत सुरू असतात. तसेच आईस्क्रीम ठेवण्यासाठीचा एक छोटा फ्रीज वापरला जातो. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे दुसरा फ्रीज जूनपासून बंद असल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या कमी वीज वापरानंतरही जून महिन्यात तब्बल ३४४ युनिट वीज वापर दाखवून सुमारे ५ हजार ५० रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
पडघाळ यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी त्यांच्या टपरीचे वीजबिल तुलनेने कमी होते. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलाच्या रकमेत अचानक मोठी वाढ झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कमी वीज वापर असलेल्या छोट्या व्यावसायिक टपरीला एवढे मोठे बिल कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागातील काही ग्राहकांकडून वाढीव वीजबिलांच्या तक्रारी येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोळमांडले येथील या प्रकरणाची महावितरणने तातडीने तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

25/08/2026

महाडमधील चार चोऱ्यांचा छडा; आठ किलो चांदी,३ तोळे सोन्यासह पाच आरोपी अटकेत
महाड शहरात जुलै २०२६ मध्ये झालेल्या चार मोठ्या घरफोड्यांचा स्थानिक गुन्हे शाखा आणि महाड शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ८ किलो चांदी, तीन तोळे सोने आणि १२ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
अत्यंत शिताफीने आणि कल्पकतेने महाड शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनि या चोरट्यांचा माग काढत त्यांना सोलापूर जिल्हातून ताब्यात घेण्यात आले. चोरीसाठी वापरण्यात आलेली इर्टिका कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या कारवाईत सोन्या शंकर शिंगाडे, नितीन गुलाब मदने, किरण सतीश गोसावी, सारंग संजय टोले आणि सचिन राजू माने ऊर्फ लखन अशोक कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे.
रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल आणि अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित shivthare यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व महाड शहर पोलिसांनी ही कारवाई केली. महाड शहर पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

25/08/2026

स्थानिक विकास आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना प्राधान्य : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विकासकामे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचा दौरा तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदेत भाष्य केले. रायगडचा विकास आणि स्थानिक नागरिक व प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण याला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीएसआर निधी रायगडच्या विकासासाठी बाहेरील भागात खर्च न करता जिल्ह्यातच वापरावा, अशी मागणी तटकरे यांनी केली. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांसाठी या निधीचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ३०० खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अलिबाग क्रीडा संकुलासाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिबागच्या भविष्यातील पाणी गरजेसाठी सावळीकुंड धरण प्रकल्प गरजेचा आहे. मात्र, जमीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना भू-संपादन कायद्यानुसार योग्य व न्याय्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास आणि जनहिताला प्राधान्य देणे हे आपले धोरण असल्याचे सांगत, रायगडमधील औद्योगिक प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, आरोग्य, पाणी, क्रीडा आणि दळणवळणाच्या सुविधांसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

25/08/2026

अमरावतीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; आगीत ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत,
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, NICU मधील व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन पहाटे ३:३० वाजताचा सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे काही क्षणांतच कक्षात धुराचे लोट पसरले.
आग आणि धुराची माहिती मिळताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ३६ बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. काही बालकांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. आगीचे नेमके कारण तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

25/08/2026

माझगावमध्ये गणपती आगमन मिरवणुकीवर अंडीफेक; तणावाचे वातावरण
मुंबई, २४ ऑगस्ट : मुंबईतील प्रसिद्ध ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याच्या आरोपामुळे माझगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी रात्री गणपतीची मूर्ती मंडपापासून काही अंतरावर असताना जवळच्या इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याचा आरोप गणेशभक्तांनी केला. 
या प्रकारानंतर संतप्त गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले. काही काळ परिस्थिती चिघळली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंडी नेमकी कोणी फेकली, याचा तपास केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

24/08/2026

रामदास कदम यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपांना खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकारणात मतभेद आणि वादविवाद होणे स्वाभाविक आहे; मात्र आपण कधीही व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाचे नुकसान केले नाही, असा दावा तटकरे यांनी केला.
“माझ्या विरोधात काम केले म्हणून मी कोणाचे व्यक्तिगत नुकसान केले आहे, असे एक उदाहरण या जिल्ह्यात दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईन,” असे आव्हानच तटकरे यांनी दिले.
आपण राजकारणात नेहमी राजकीय भाषेतच उत्तरे दिली असून कोणत्याही वेळी व्यक्तिगत पातळी सोडली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अलिबागमध्ये अनेकवेळा आपल्यावर टोकाची टीका झाली, तरी आपण व्यक्तिगत बोललो नाही, असे तटकरे म्हणाले.
रामदास कदम यांनी घराणेशाहीचा आरोप करण्यामागचे कारण त्यांनाच माहिती असल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या टीकेवर सवाल उपस्थित केला. राजकारणात एखाद्याला निवडून आणणे किंवा एखाद्याचा पराभव करणे हा राजकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय विरोध हा व्यक्तिगत वैर नसतो, असेही त्यांनी सांगितले.
“एखाद्याला निवडून आणणे, एखाद्याचा पराभव करणे किंवा आम्हाला पराभूत करणे अथवा निवडून आणणे, हा राजकारणाचा भाग आहे. त्यामध्ये कोणाला वेगवेगळे मतमतांतर करण्याची गरज नाही,” अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.
आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक विरोधकांशी राजकीय संघर्ष झाला असला, तरी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा उपजीविकेवर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य आपण केले नसल्याचे तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार आली आहे. आता तटकरे यांच्या आव्हानावर रामदास कदम काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Address

Roha/Raigad
Roha
402109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dot.in Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share