
26/06/2025
भक्तिमय वातावरणात माऊलींचे दत्त घाटावरील नीरा नदीत स्नान.
माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन;चार दिवस मुक्काम.
सातारा दि. २६
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे.दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यात नि:स्वार्थ भावनेने सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने चालत असतात वैष्णवांचा हा मेळा गुरुवारी सातारा हद्दीत दाखल झाला.वारकरी संप्रदायासाठी वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे ती श्रद्धेची आणि आत्मशुद्धीची वाटचाल आहे.याच वाटचालीतला क्षण म्हणजे माऊलींचे निरा स्नान गुरुवारी दुपारी नीरा दत्त घाटावर माऊलींनी स्नान केले.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई,ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,खासदार नितीन पाटील,आमदार सचिन पाटील,आमदार मनोज घोरपडे,माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा,पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, त्यामुळे डिजिटल वारीचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर,आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
चौकट.....
आज माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसरणार आहे.शुक्रवारी (२७) चांदोबाच लिंब येते वारीतील पहिला उभा रिंगण सोहळा होणार आहे तर मुक्काम तरडगाव येथे होणार आहे.शनिवारी (२८) काळज,निंभोरे,वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण मुक्कामी राहील. रविवारी (२९) सकाळी विडणी,पिंपरद, निंबळक फाटा करत बरड येथे मुक्कामी पोहोचणार आहे.
सातारा जिल्ह्यातील चार दिवसांच्या पाहुणचारा नंतर सोमवारी धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात माऊलींचा प्रवेश होणार आहे.