Rajkiy News राजकीय न्यूज

Rajkiy News  राजकीय न्यूज राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण करणारी वेबसाईट.

📍 शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार- नाशिक येथील कार्यकर्ता प्र...
15/09/2025

📍 शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

- नाशिक येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील शरद पवारांच्या भाषणाचा सारांश

पक्षाच्या वतीने 'झेप विश्वासाची, स्वाभिमानी महाराष्ट्राची' या शीर्षकाखाली नाशिक येथे आयोजित एक दिवसीय पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहिलो. संघटना बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उचित मार्गदर्शन केलं.

प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्यांचे आपण आत्ताच विचार ऐकले ते आपले यापूर्वीचे अध्यक्ष जयंतराव पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू-भगिनींनो..

आज आपण नाशिकला मोठ्या संख्येनं आणि सातत्य ठेवून या बैठकीसाठी हजर आहात. नाशिक हे ठिकाण का निवडलं? असं कुणीतरी मला विचारत होतं. नाशिक हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर आहे. पण त्याहीपेक्षा आपला पक्ष हा गांधी- नेहरूंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. नाशिकचा इतिहास हा जर आपण बघितला तर महाराष्ट्रातल्या ज्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये गांधी- नेहरुंचा विचार हा लोकांनी स्वीकारला होता, त्यामध्ये नाशिक येतं. स्वातंत्र्याच्यापूर्वी 'अखिल भारतीय काँग्रेस कमिटी' याचं अधिवेशन नाशिकला झालं होतं. वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. नाशिकच्या बैठकीला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्यानंतर हा काँग्रेसचा विचार, गांधी- नेहरूंचा विचार हा विस्तारित करण्याचं काम नाशिकने केलं होतं. स्वातंत्र्याच्यानंतर भाऊसाहेब हिरे यांच्यासारखे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि महत्वाचे महाराष्ट्रातले नेते हे नाशिकचेच होते. गोविंदराव देशपांडे लोकसभेचे सभासद हे नाशिकचे होते. गावकरीचे संपादक दादासाहेब पोतनीस हेही गृहस्थ गांधी नेहरूंचा विचारांचा प्रचार करणारे एक अत्यंत महत्वाचे नेते होते. मराठी साहित्यामध्ये योगदान देणारे अनेक व्यक्ती या ठिकाणी होऊन गेल्या. जिचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. पण महाराष्ट्राचं साहित्य, काव्य याचा विचार केला तर, तात्यासाहेब शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास कधी पुरा होत नव्हता. तात्यासाहेबांच्या आयुष्यातला मोठा काळ हा नाशिकला गेलेला होता. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे.

स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा एक मोठा नेता महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राची निर्मिती त्यांच्या प्रयत्नांतून १ मे १९६० साली झाली. सबंध महाराष्ट्रामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण त्या कालखंडामध्ये होता. सबंध महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने न्यायला दृष्टी असलेला असा नेता म्हणून महाराष्ट्राची जनता ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहत होती. त्याच सालामध्ये चीनचं युद्ध झालं, चीनने हल्ला केला. व्ही. के. कृष्ण मेनन नावाचे गृहस्थ देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या कालखंडामध्ये देशाचं अभूतपूर्व असा पराभव झाला. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते. पण ते अतिशय अस्वस्थ झाले, लोकांच्यात नाराजी होती. पराभव झाल्यामुळे भारतीय सेना, सैन्यदल यांचा आत्मविश्वास ढळला होता. पुन्हा याची उभारणी करण्याची आवश्यकता होती. त्यावेळेला पार्लमेंटने आणि विशेषतः जवाहरलाल नेहरू यांनी एक निर्णय घेतला की, आता या चीनच्या धक्क्यातून भारताला सावरायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये निमंत्रित केलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण खात्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी दिली. गंमत अशी की, चव्हाण साहेबांनी ज्या दिवशी संरक्षण खात्याची शपथ घेतली त्या संध्याकाळी चीनने आपलं सैन्य मागं करायला सुरुवात केली. यशवंतरावजींनी हा मोठा विश्वास सैन्य दलाला आणि देशाला दिला. पण ते खासदार नव्हते, खासदार होण्याची आवश्यकता होती. त्यावेळेला ती खासदारकीची गरज भागवण्यासाठी नाशिककर पुढे आले. नाशिकने यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं, हा या नाशिकचा इतिहास आहे. म्हणून मला आनंद आहे की, शशिकांत शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांना नाशिकला या ठिकाणी निमंत्रित केलं.

आज सकाळपासून अनेकांची भाषणं तुम्ही- मी सगळ्यांनी ऐकली. काही लोकांनी अतिशय चांगली मतं मांडली. प्रा. सुभाष वारे असतील, पैगंबर शेख असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशोक वानखेडे असतील, जयंतराव पाटील असतील, सुप्रिया असेल आणि बाकीचे सहकारी या सगळ्यांनी दिलेल्या विषयांची मांडणी ही आपल्या सगळ्यांसमोर अतिशय चांगल्या रीतीने केली. नाशिकचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे हा एक उत्तम शेती करणारा जिल्हा आहे. या शेतीचं वैशिष्ट्य फलोज्ञान आणि फुलं! आज देशाची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त द्राक्ष आणि डाळिंब हे कुठे होत असेल, तर ते नाशिकला होतं. नाशिकचे शेतकरी अतिशय उत्तम शेती करतात. त्यामुळे शेतीवर नाशिककरांचं अधिक लक्ष असतं. नुसतं लक्ष नाही तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि जागृती नाशिकमध्ये शेतकरी वर्गात फार आहे. तिथे आधुनिकता कशी येईल? याचा विचार करणारा शेतकरी आहे. मी अनेकदा या जिल्ह्यात येतो, अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्यांचा आणि माझा सुसंवाद असतो. नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं. जगातल्या अन्य देशांमध्ये शेतीच्या संदर्भात जे जे काही संशोधन होतं त्याची नोंद घेणारे अनेक शेतकरी आज नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून शेतीच्या संबंधी आस्था असलेला हा जिल्हा आहे. तुम्हाला आठवत असेल एक काळ असा होता की, महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघर्षासाठी रस्त्यावर उतरला. त्याचं नेतृत्व शरद जोशींनी केलं. त्या शरद जोशींची शेतकरी संघटना याची उभारणी नाशिकमधनं झाली. म्हणून नाशिक ही शेतीच्या संबंधी एक वेगळ्या दृष्टीने बघणारा असा हा जिल्हा होता.

आज आपण बघत आहोत की, देशामध्ये कांद्याची चर्चा झाली की नाशिक येतं. आजच्या वर्तमानपत्रांमध्ये कांद्याची निर्यात करणारा भाग म्हणजे नाशिक! हे आपण बघतो. सोयाबीनची निर्मिती अधिक करणारा जिल्हा म्हणून नाशिक हा या ठिकाणी ओळखला जातो. पण शेतकऱ्यांशी सुसंवाद ठेवल्यानंतर काही गोष्टींच्या बाबतीत अधिक लक्ष तुम्ही मी सगळ्यांनी दिलं पाहिजे. कालची लोकसभेची निवडणूक झाली, तीन जागा इथे होत्या अडीच. एक भगरे गुरुजी मोठ्या मतांनी निवडून आले. दुसरी सिन्नरचे वाजे तेही मोठ्या मतांनी निवडून आले. तिसरी अर्धी जागा शोभाताईंची. म्हणजे तिन्ही जागा नाशिककरांनी आपल्या विचाराच्या दिल्या, याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. त्या सगळ्या प्रचारामध्ये मी इथे असताना एकच गोष्ट दिसायची सबंध शेतकरी वर्ग, तरुण पिढी ही जिवाभावाने तुम्हा लोकांच्या विचारांच्या मागे राहिली आणि त्यामुळेच हे यश आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आलं. आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडं कशा पद्धतीने बघतं? याचा विचार करण्याची गरज आहे. शेतीमालाच्या किंमती घसरल्या, निर्यातीचं धोरण योग्य नाही, काढला निर्यात करायचा म्हटल्यावर त्याच्यावर बंधनं येतात. अन्य गोष्टी पाठवायच्या त्याच्यावर बंधनं येतात. हे सरकार या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत उदासीन आहे. अलीकडे बघितलं आपण हा जिल्हा एवढा महत्वाचा जिल्हा असताना आज कर्जबाजारीपणा आणि त्याच्या सहकारी चळवळीतला कारण या गोष्टींचा अभ्यास केला तर, 'नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' ही जवळपास संकटात गेलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर थकबाकी झालेली आहे. तिथले व्यवहार हे बंद झालेले आहेत आणि हे चित्र आज शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत आज या ठिकाणी झालेलं आहे. इथे कुठे ना कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो त्या वेळेला एक पहिला निकाल घेतला की, व्याजाचे दर कमी कसे करता येतील? १२ टक्के हा शेतीच्या कर्जाचा व्याजाचा दर होता. तो १२ वरनं परत ६ वर आणला, ६ वरनं ३ वर आणला. नियमित परतफेड करणारा कुणी असेल, त्याला आणखी सवलत ही सुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला होता. पण आज केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, ते या प्रश्नांच्या बाबतीत जागृतीची भूमिका घेत नाहीत. या मूलभूत प्रश्नांकडे शेवटी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. यासाठी एक प्रकारची शेतकऱ्यांची संघटना अधिक प्रभावी पक्षाच्या धोरणाने कशी करता येईल? याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. यासाठी एका दिवशी स्वतंत्र बैठक घेऊन या कार्यक्रमाची आपण आखणी करू आणि लोकांच्यामध्ये जाऊया.

आज नवीन नवीन प्रश्न येतात. आजूबाजूला वेगळं चित्र बघायला मिळतं. आज शेजारच्या देशात एक वेगळी स्थिती आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. भारत याचा नकाशा तुम्ही नजरेसमोर ठेवा. एक काळ असा होता की, आपले सगळे शेजारी एखाद दुसरा सोडला तर आपले हितचिंतक होते. आज ती स्थिती राहिलेली नाही. आज तुम्ही देशाचा नकाशा पुढे ठेवलात तर पाकिस्तान आपला विरोधी, शेजारी तुम्ही गेलात नेपाळ हिंदू राष्ट्र! एकेकाळी भारताचे अत्यंत जवळीक असलेलं हे राष्ट्र आज त्या नेपाळची अवस्था काय आहे? हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय. नुसतं ते नाही त्या देशाची अर्थव्यवस्था ही तर उध्वस्त झालीच. पण भारताबद्दल नव्या पिढीमध्ये द्वेष वाढतंय, हे चित्र बघायला मिळतं. पुढे आपण बांग्लादेश बघा. त्याच्या स्वातंत्र्यासाठी या देशाने खस्ता खाल्ल्या. आज तो बांग्लादेश आपल्याबरोबर राहिलेला नाही. त्याच्याखाली आपण गेलो श्रीलंका! आपला शेजारी एकेकाळचा मित्र तोही आपल्याबरोबर राहिलेला नाही. नरेंद्र मोदींच्या हातामध्ये देशाचं नेतृत्व आहे. पण त्यांची परराष्ट्र नीती ही आज देशाला किती फायद्याची आहे? याचा विचार ही करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण एकंदर त्यांची धोरणं ही जवळपास आम्हाला कुणी मित्र नाही अशा प्रकारची आहे.

आता जयंतराव बोलत असताना त्यांनी याचा उल्लेख केला अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा! अमेरिका जगातली मोठी शक्ती आहे, त्याच्यात काही वाद नाही. आपले त्यांच्याशी संबंध चांगले आहेत, त्याच्यातही काही वाद नव्हता. पण अमेरिका आपल्याला Dictate करतंय, अशी कधी स्थिती नव्हती. आज प्रत्येक गोष्टीवर Dictate करण्याची नीती आज ट्रम्पने आणली. आत्ताच एक वाटाघाटी चालू आहे, काही करार अमेरिकेचा आणि आपला हा होतोय. तो करार १५ वर्षांच्या पूर्वी करायचा प्रश्न माझ्याकडे आला होता. मी देशाचा शेती मंत्री म्हणून मला नरसिंहराव यांनी वॉशिंग्टनला पाठवलं होतं. प्रश्न हा होता की, अमेरिकेचा आग्रह हा होता की, अमेरिकेतल्या शेतीचा माल दूध, दुधाची पावडर ही भारताने घेतली पाहिजे. त्यांनी दबाव आणलेला होता, तीन दिवस आमची चर्चा झाली. शेवटी मी सांगितलं की, शेती हा आमचा आत्मा आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्या शेतीचा जोडधंदा हा दुधाचा धंदा आहे. ते दूध आणि शेतीमाल आम्ही अमेरिकेतून इथे आणायला लागलो तर आमचा बळीराजा हा उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय पडेल ते आम्ही किंमत देऊ पण हे आम्ही अमेरिकेचं ऐकणार नाही. शेवटी तो करार आम्ही होऊ दिला नाही. आता त्याची चर्चा अमेरिका आणि भारताची चालू आहे. आपण अपेक्षा करूया की, मोदींचं सरकार या प्रश्नावर उचित भूमिका घेईल. जरी कितीही दमदाटी ट्रम्पने केली अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी तरी त्यामध्ये तडजोड करणार नाही. अशा प्रकारची आपली अपेक्षा आज त्यांच्याकडून राहिलेली आहे.

आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टींवर अतिशय चांगलं विवेचन तुमच्यापुढं केलेलं आहे. म्हणून त्या खोलात मी जात नाही. फक्त दोन-तीन गोष्टी मला स्पष्ट सांगायच्या आहेत. एक शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. गेल्या आठ महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, गेल्या आठ महिन्यांमध्ये. त्याच्यामध्ये विदर्भातले ७०७ आणि मराठवाड्यामधले ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची नोंद ही घ्यावी लागेल. आग्रह करून राज्य आणि केंद्र सरकारला याबाबतीत कठोर पावलं टाकण्याची भूमिका मांडावी लागेल. जर या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर आपल्याला त्याबद्दलचा कार्यक्रम एक वेळेला घ्यावा लागेल, याची तयारी ही आपण करूया.

एक महत्वाचा प्रश्न आज सबंध महाराष्ट्रात झाला आणि तो प्रश्न आरक्षणाचा! जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्याबद्दल सविस्तर चिंतन आपल्यापुढे केलं. मला स्वतःला असं वाटतं, या सगळ्या प्रश्नांकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जे काही चित्र दिसतंय, ते चित्र चांगलं नाही. मी जिल्ह्यांची नावं घेत नाही. पण काही जिल्ह्यांमध्ये मला लोक सांगतात की, कटूता इतकी आहे की एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबाने हॉटेलचा धंदा काढला की, इतर जातीचे लोक तिथे जात नाहीत. कुठे वंजारी समाजातल्या व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला, तिथे मराठे जात नाहीत. असं काहीतरी एक वेगळं वातावरण काही ठिकाणी आहे, असं ऐकायला मिळतं. हे खरं किती? खोटं किती? हे मी आज सांगू शकत नाही. पण तशी चर्चा आहे आणि ही चर्चा आपण नाकारता येत नाही. आज पिढ्यानपिढ्या एकत्र असलेलं कुटुंब आज एकमेकांच्याबद्दल गैरविश्वासाने बघतोय. आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. मला स्वतःला वाटतं की, याच्या खोलात जायची गरज आहे. पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतंय? याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. परवा जाहीर केलं की 'हैदराबादचं गॅझेट' यावर आधारित निर्णय घ्यावा. मी 'हैदराबादचं गॅझेट' शब्दनशब्द दोनदा वाचलं. 'हैदराबादच्या गॅझेट'मध्ये काय लिहिलेलं आहे? त्यांनी काही गोष्टीत सवलती दिल्या आहेत. पण आरक्षणाच्या संबंधित सवलती असतील, त्या नुसत्या शेतकऱ्यांच्या पुरत्या आहेत असं नाही. VJNT हा जो वर्ग आहे, त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात आहे. VJNT आणि वंजारा 'हैदराबादच्या गॅझेट'प्रमाणे त्यांना आदिवासींचं स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यासंबंधीची मागणी वंजारा समाजातून, VJNT मधून सुरू झालेली आहे. दुसऱ्या बाजूने आदिवासी समाजात त्यांचं शिष्टमंडळ मलाही भेटलं आणि त्यांची भूमिका काहीही झालं तरी चालेल. पण आदिवासींच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की, त्याने कटूता वाढेल, समाजामध्ये विभागणी होईल. नेमकं तेच चित्र आज या ठिकाणी दिसलेलं आहे. आज याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो मला योग्य दिसत नाही. राज्य सरकारने दोन समित्या केल्या आरक्षणाच्या संदर्भात. एक VJNT ची समिती बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी मराठा समाजाची विखेंच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिटीत त्याचं Composition आपण जर बघितलं तर, बावनकुळे यांच्या कमिटीमध्ये एकटा ओबीसी सोडून दुसऱ्या समाजाचा एकही सभासद नाही. विखेंची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या एका जातीच्या कधी करायच्या नसतात. तिथे सगळ्या जातीतले असावेत. विशेषतः प्रश्न जिचे असतील त्या घटकांना सहभागी करून त्यांच्याशी सुसंवाद करण्यासंबंधीची ही स्थिती करायची असते. पहिल्यांदा दोन कमिट्यांची आवश्यकता ही होती का? दोन कमिट्या केल्या. यांच्याकडून मागण्या येतात, दुसरी कडून दुसऱ्या मागण्या! याचा अर्थ आत्ताचं राज्य सरकार यांना हा प्रश्न सोडवायचा आहे का? का सोडवायचा नाही? कटूता वाढवायची आहे का? असंच चित्र आज या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर, महाराष्ट्राच्या मी काल एके ठिकाणी सांगितलं की, महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि ही अत्यंत धोक्याची आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष', तुम्ही- मी सगळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. काय राजकीय किंमत द्यावी लागेल, काय त्याची चिंता करू नका. पण सामाजिक ऐक्य याच्या बाबतीत तडजोड नाही. या सगळ्या घटकांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लोकांच्यात आत्मविश्वास वाढवला पाहिजे, कटूता कमी केली पाहिजे आणि प्रश्नांची सोडवणूक सरळपणाने कशी करता येईल? यासाठी जो काही हातभार लावता येईल, तो लावला पाहिजे. त्या दृष्टीने मला असं वाटतं एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आज या ठिकाणी आलेला आहे. आपल्या सहकाऱ्यांनी या प्रश्नांमध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर बोललं पाहिजे. आपल्यातले काही लोक बोलतात. आज अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. पण ती मांडणी करत असताना दोन- तीनदा त्यांनी प्रश्न सोनावणे यांना विचारले. मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण कुणी सोनवणे असोत, नाहीतर बाकीचे असोत. राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी हा सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे, हा आत्मविश्वास असू द्या. त्याच्या बाबतीत तडजोड करायची नाही, या भूमिकेने काम करतोय. त्यासाठी आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे, हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो.

मला असं वाटतं की, पक्ष हा कसा मजबूत करता येईल? शशिकांत शिंदे असोत. तुम्हा सगळ्यांचं भाषण ऐकताना एक गोष्ट मला ठीक वाटली नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणत होतात की, साहेबांचा पक्ष! साहेबांचा पक्ष! हा एका व्यक्तीचा पक्ष नाही, हा साहेबांचा पक्ष नाही. राष्ट्रवादी विचारांची आणि विचारधारा या सगळ्यांनी घेतलेली आहे, त्यांचा हा पक्ष आहे. हा एका व्यक्तीचा आहे, असं वातावरण उभं तुम्ही करू नका. हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे, या भावनेनं काम करण्याची तयारी आणि मानसिकता ही आपण ठेवली पाहिजे. मला आनंद आहे की, आपण दिवसभर इथे बसलो. अनेकांचे चांगले विचार ऐकले आणि हे सगळं ऐकून घेण्यासाठी सकाळपासून आतापर्यंत मोठ्या संख्येनं आपण सगळे सहभागी आहात. आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका यासंबंधीची आपली नीती कशी पाहिजे? याबद्दल जयंतरावांनी अतिशय चांगलं विवेचन आपल्यापुढे केलं. त्या दिशेने जाण्यासाठी आपण तयारीला लागूया. मी माझ्यापुरतं एक ठरवलंय की, आणखी थोड्या दिवसांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सुसंवाद कसा साधता येईल? याची काळजी ही माझ्याकडून घेतली जाईल. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आपला जिल्हा असो, तालुका असो, आपला भाग असो. त्या ठिकाणी आत्मसन्मान वाढेल आणि निवडणुकीची पूर्वतयारी व्यवस्थित होईल, या दृष्टीने काळजी घ्या, अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद!

शरदचंद्र पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र

13/09/2025

BREAKING | सोलापुरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

#राजकीयन्यूज

22/08/2025

BREAKING | ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळींची भाजपच्या नवनाथ बन यांच्यावर सडकून टीका

#राजकीयन्यूज

04/08/2025

BREAKING | सोलापूर मध्ये 100 कोटींचा साखर घोटाळा; माजी आमदारांची ED कडे तक्रार

#राजकीयन्यूज

भाजपने आज राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून केरळ राज्यातील सदानंदन मास्टर यांचे नाव जाहीर झालेय. त्यांचा संघर्षमय प्रवास ...
13/07/2025

भाजपने आज राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून केरळ राज्यातील सदानंदन मास्टर यांचे नाव जाहीर झालेय. त्यांचा संघर्षमय प्रवास मुलाखतीतून शब्दबद्ध केलाय लेखिका शेफाली वैद्य यांनी.. त्यांच्या पेजवरून साभार हा लेख घेतलाय.

आज केरळ येथील संघ कार्यकर्ते सदानंदन मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती झालीय. केरळमधल्या कम्युनिस्टांच्या रक्तरंजित राजकारणाचा आणि नृशंस हिंसेचे जिवंत उदाहरण म्हणजे सदानंदन मास्टर! त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकण्यासारखी आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजपने त्यांना केरळमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती तेव्हा साप्ताहिक विवेकसाठी लेखिका शेफाली वैद्य यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर हा लेख लिहिला होता. तो आज परत शेअर करतेय.

लेखिका : Shefali Vaidya

जिवंत हुतात्मा - सदानंदन मास्टर

पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा लावलेले, जवळ जवळ सहा फूट उंच, वयाच्या पन्नाशीतही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेले सदानंदन मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात, तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले आहेत. गेली वीस वर्षे सदानंदन मास्टरजी कृत्रिम पाय लावून वावरतात, पण त्यांच्या उत्साहात, काम करण्याच्या शक्तीत जराही बदल नाही. त्यांचे विद्यार्थी त्यांना 'माशे' म्हणून ओळखतात. आपल्या ह्या लाडक्या शिक्षकासाठी सदानंदन मास्टर ह्यांचे विद्यार्थी काय वाट्टेल ते करायला तयार आहेत इतके मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

१९९४ साली जेव्हा सदानंदन मास्टरजीना आपले दोन्ही पाय गमवावे लागले, तेव्हा ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यांना अपघात झाला नव्हता किंवा कुठला आजारही झाला नव्हता. सदानंद मास्टरजींचे पाय केरळमधल्या कम्युनिस्ट गुंडानी अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुढघ्यांपासून कापून टाकले होते, तेसुद्धा भर बाजारात. सदानंदन मास्टरजींचा गुन्हा एकच होता, साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटूंबात जन्मूनदेखील त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचं धाडस केलं होतं. कम्युनिस्ट वडिलांचा मुलगा संघविचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता, तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात, जो जिल्हा केरळमधल्या साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्रोत आहे. ह्या जिल्ह्यातली गावंच्या गावं अशी आहेत जिथे फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो. दुसऱ्या कुठल्याही विचारप्रणालीचे वारे जरी इथे फिरकले तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ बिमोड करण्यात येतो, आणि तरीही, राष्ट्रवादी विचार केरळमध्ये संघाच्या रूपाने रुजतोय, वाढतोय. सदानंद मास्टर हे त्या रुजत्या वाढत्या राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. ही आहे सदानंदन मास्टर ह्यांची कहाणी, त्यांच्याच शब्दात सांगितलेली.

'मी कन्नूर जिल्ह्यामधल्या मट्टनूर जवळच्या एका छोट्या गावात वाढलेला मुलगा. माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. माझा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचं काम करायचा. साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचंच बाळकडू मिळालेलं. त्यात कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा. कन्नुरमधल्या पिनरई ह्या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे ह्याच गांवचे. त्यांच्यावर राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहेत. कन्नूरमध्ये दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही हे कम्युनिस्ट पक्षाने ठाम ठरवलेलं. त्यामुळे इथला कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचारांकडे आकृष्ट होताना दिसला की त्याच्याविरुद्ध, त्याच्या कुटुंबाविरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची. आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार, मग पदोपदी कामात अडवाअडवी आणि सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार अशी सगळी शस्त्रे वापरून विरोधी विचारांचा बिमोड करणे हे केरळमधल्या कम्युनिस्टांचे धोरणच आहे. तरीही, अश्या भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्येही कन्नूरमध्ये संघकार्याची स्थापना झाली. साम्यवाद्यांच्या दादागिरीला कंटाळलेले, कम्युनिस्ट विचारांमधला फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघविचारांकडे वळायला लागले. सुरवातीला संघ गावा-गावात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते.

मी कॉलेजमध्ये असताना एसएफआयचं काम करायचो. पण तोपर्यंत मला कळून चुकलेलं होतं की साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नाही. ह्याच दरम्यान माझी गावात काम करणाऱ्या काही संघाच्या कार्यकर्त्यांशी ओळख झाली. त्यांची देशकार्याविषयीची तळमळ, भारताला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे इथल्या मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी ह्याचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी संघविचारांकडे आकृष्ट झालो. अधून मधून शाखेवर जायला लागलो. माझ्या वडिलांनी मला संघविचारांकडे वाळण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला खरा, पण त्यात फार जान नव्हती, कारण तोपर्यंत ते स्वतःही कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीला थोडेसे कंटाळले होते, पण माझ्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते मला अडवत होते. मी संघविचारांकडे वळलेला बघून एसएफआय मध्ये माझ्याबरोबर काम करणारे मित्र मात्र खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण कम्युनिस्टांची अरेरावी, त्यांचा हिंसेकडे असलेला कल, कुठलाही विरोधी विचार निर्घृणपणे चिरडून टाकायची त्यांची असहिष्णू वृत्ती ह्यामुळे माझा पुरताच भ्रमनिरास झाला होता. मी स्वतःला पूर्णपणे संघकार्याला वाहून घेतलं.

आमच्या गावात संघ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने एक बस-थांबा उभारला होता. केरळवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांच्या नाकर्तेपणाचा तो बस-थांबा एक प्रतीक होता. जे सरकार करू शकलं नाही ते संघशक्तीने साध्य करून दाखवलं होतं. त्यामुळे तो बस-थांबा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या डोळ्यात सलत होता. १९९३ मध्ये सप्टेंबरच्या आठ तारखेला कम्युनिस्टांनी कन्नुरमध्ये बंद पुकारला होता. त्या दिवशी काही कम्युनिस्ट गुंडांनी झुंडीने येऊन तो बस-थांबा तोडायला सुरवात केली. आम्हाला खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तिथे पोचलो. दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. मलाही बेदम मारहाण झाली. आम्ही प्रतिकार केला ते कम्युनिस्टांना आवडलं नाही. आतापर्यंत त्यांना त्यांनी केलेली गुंडगिरी मूकपणे लोक सहन करतात हेच माहिती होतं. मी कम्युनिस्ट विचारांची कास सोडून संघविचारांकडे वळलेलो, त्यामुळे मी त्यांच्या डोळ्यात खूपच सलत होतो. मला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवलाच पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं. ती संधी त्यांना लवकरच मिळाली.

मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो. २५ जानेवारी १९९४ ची संध्याकाळ. मी फक्त तीस वर्षांचा होतो तेव्हा. माझ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर आलं होतं. त्या संदर्भात काही बोलणी करायला म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो. आनंदात होतो मी. माझंही लग्न ठरलं होतं. माझ्याच बी.एड च्या वर्गात शिकणाऱ्या वनिता नावाच्या मुलीबरोबर. आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या होत्या. दोघांचंही शिक्षण संपलं होतं आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्ने बघितली होती. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हा दोघानांही कल्पना नव्हती. माझं काम आटोपून मी बसने रात्री आठ वाजता माझ्या गावात परतलो. माझ्या घर जवळच्या बस-स्टॉप वर मी उतरलो. 'ते' माझी वाटच पहात होते. ते, कम्युनिस्ट पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते. माझ्या गावातलेच होते त्यातले काही. मी ओळखतही होतो त्यांना चांगला. त्यांची माझी वैयक्तिक काहीच दुश्मनी नव्हती, पण त्या क्षणी ते द्वेषाने अंध झाले होते. मला घेरून त्यांनी जेरबंद केलं. काहींनी आजूबाजूला गावठी बॉम्ब फेकले. आजूबाजूचे तुरळक लोक घाबरून पळाले. त्या लोकांनी मग मला जमिनीवर पकडून ठेवलं आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापून काढले. त्या प्राणांतिक वेदना मी अगदी आजही विसरू शकत नाही. माझे पाय कापून ते कम्युनिस्ट गुंड थांबले नाहीत, त्यानी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुढघ्यांना शेण फासलं. शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नयेत म्हणून त्यांनी घेतलेली ती खबरदारी होती. त्यांचं काम झाल्यावर मला तसंच तिथे बस-स्टॉपवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले. अतिरक्तस्त्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की मला ओरडण्याचे देखील त्राण राहिले नव्हते. मी तसाच तिथे बेवारशी जनावरासारखा पडून राहिलो, जवळजवळ अर्धा तास, खबर कळून पोलीस तिथे येईपर्यंत.

पोलीस आले तेव्हा मी ग्लानीत होतो. पोलिसांनी आणि इतर संघ कार्यकर्त्यांनी मिळून मला शहरात मोठ्या इस्पितळात नेलं. एकाने दूर फेकलेले माझे पाय बरोबर घेतले. ते परत जोडता येतील म्हणून नव्हे, तर माझे पाय कसे कापून टाकले हे डॉक्टरांना कळावं म्हणून. दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या गुढघ्यांना पांढरंशुभ्र बॅंडेज बांधलेलं होतं आणि खाली? खाली काहीच नव्हतं. कालपर्यंत मी धडधाकट होतो अन आज दोन्ही पायानी पांगळा झालेलो होतो. त्याच दिवशी वनिता, माझी होणारी पत्नी मला भेटायला इस्पितळात आली. तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता. माझ्याजवळ होतं-नव्हतं ते धैर्य एकवटून मी तिला सांगितलं की मी तिला तिच्या वचनातून मोकळं करतोय. तिने माझ्यासारख्या एका पांगळ्याबरोबर आता लग्न करू नये. तिच्या आई-वडिलांनीही तिला हेच सांगितलं. पण ती मानेनेच नाही म्हणून सांगितलं.

मी जवळ जवळ सहा महिने इस्पितळात होतो. खूप कठीण दिवस होते ते. माझं आयुष्य मला निरर्थक वाटत होतं. मी कधीही कुणाचंही वाईट केलेलं नसताना हा भोग माझ्याच वाट्याला का यावा हे मला कळत नव्हतं. नैराश्याने ग्रासलं होतं मला. पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे. मला सतत बोलतं ठेवायचे. माझ्या मनाची उभारी टिकवून ठेवायला मदत करायचे. एकटा असलो की शाखेत शिकवलेली गाणी मी स्वतःशीच गुणगुणत राहायचो. माझे मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करायचो. वनिता ह्या सर्व काळात सतत माझ्या बरोबर होती. माझ्या कुटुंबीयांनी, तिच्या कुटुंबीयांनी, इतकंच काय, ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील ती माझ्याशी लग्न करण्याच्या तिच्या निश्चयापासून ढळली नव्हती. तिचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम, माझ्या कुटुंबीयांनी केलेली सेवा आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेली अथक साथ, ह्यामुळे मी माझ्या नैराश्यातून बाहेर आलो. डॉक्टरांनी जयपूर फूट बसवला. मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो. खूप दुखायचं. पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवताना कातडी सोलवटायची. प्रत्येक पाऊल उचलताना अपरिमित वेदना व्हायच्या. पण हळूहळू सवय झाली. मी परत माझ्या पायावर उभा राहिलो आणि कुणाच्याही मदतीविना चार पावलं चाललो तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर वनिताला आणि संघातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस होता.

आज जवळ जवळ वीस वर्षे मी कृत्रिम पाय लावून वावरतोय. दिवसाला सलग अठरा-अठरा तास काम करतोय. मिळेल त्या वाहनाने, मिळेल तसा प्रवास करतोय. तासंतास शाळेत उभा राहून शिकवतोय. किंबहुना मला पाय नाहीत ही जाणीवच मी विसरून गेलोय. वनिताचं आणि माझं लग्न झालंय. आम्ही एक छोटं घरकुलही उभारलंय. आम्हाला एक मुलगीही आहे. ती बी. टेक करतेय सध्या. मी अजूनही संघाचं काम करतो. मला वनिताचा आणि माझ्या लेकीचा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या कुटुंबातल्या लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचं महत्व पुरेपूर उमजलंय. कम्युनिस्ट विचारांमधील फोलपणा आता त्यांना पुरताच कळलाय. इतकंच काय ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यातलेही काही लोक आता संघाकडे वळलेत.

ज्यांनी माझे पाय कापले त्यापैकी काही जणांनी नंतर येऊन माझी माफी मागीतली. माझा त्यांच्यावर राग नाही. कारण दोष त्यांचा नाही. ज्या विचारापोटी द्वेषाने आंधळे होऊन त्यांनी माझ्यावर हा भयंकर हल्ला केला त्या विचाराचाच हा दोष आहे. मी आज कोवळ्या मुलांना शिकवतो. त्यांना हा घाऊक द्वेष आंदण देण्याची माझी इच्छा नाही. संघ देशावर प्रेम करायला शिकवतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम शिकवायचंय. कुठल्यातरी परकीय देशात उगम पावलेला विदेशी ईझम शिकण्यापेक्षा त्यांनी ह्या देशावर, ह्या मातीवर प्रेम करायला शिकावं. इथल्या प्रश्नांना इथल्या मातीतच उत्तरं शोधायला शिकावं एव्हढीच माझी इच्छा आहे.

पिनरयी विजयन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून केरळमध्ये कम्युनिस्टांचा हिंसाचार परत एकवार उफाळून आलाय. ज्या राज्याच्या मुख्यमंत्री स्वतःच एखाद्या राजकीय खुनाच्या प्रकरणात आरोपी असेल त्या राज्यात हिंसा झाली नसती तरच नवल. केरळमध्ये राष्ट्रीय विचारांच्या लोकांपुढे फार मोठी आव्हानं आहेत. एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाचार तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्ववाद राज्यात हळूहळू मूळ धरत आहे तर केरळच्या काही भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे. तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील कारण ही आदी शंकराचार्यांची जन्मभूमी आहे. संघाचा, राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढतो आहे. मला खात्री आहे की काही वर्षात परिस्थिती जरूर बदलेल.'

— शेफाली वैद्य

08/07/2025

BREAKING | गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ भक्तांसाठी खुशखबर; अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती


#राजकीयन्यूज

12/06/2025

BREAKING | अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल

02/06/2025

BREAKING | महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधारा ओव्हर फ्लो

28/05/2025

Exclusive | काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेना पक्षप्रवेश पुढे ढकलला, ही आहे तारीख

21/05/2025

BREAKING | काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात सामील

21/04/2025

SOLAPUR | सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक पाहा ड्रोन कॅमेऱ्यातून

16/03/2025

BREAKING | मोहिते पाटलांनी डोळ्यात डोळे घालून याचे उत्तर द्यावे : राम सातपुते
Ram Satpute - आमदार राम सातपुते Ranjitsinh Mohite Patil

Address

Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajkiy News राजकीय न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajkiy News राजकीय न्यूज:

Share