10/09/2026
डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सिंघानिया ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका आणि लेखिका डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित 'क्रिएटिंग क्लासरूम्स व्हेअर एवरी चाईल्ड बिलॉंग्ज' या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील 'सत्कार रेसिडेन्सी' येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, खासदार नरेश म्हस्के, पूर्वेश सरनाईक, डॉ. अंकित ठक्कर, डॉ. अशेष भुमकर, डॉ. कमल घनशमनानी, डॉ. लता घनशामनानी, डॉ. विवेक बिर्ला, डॉ. मंजुश्री बिर्ला, डॉ. संजय ओक, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी खासदार आनंद परांजपे, डॉ. संदीप केळशीकर, डॉ. अंकुश देशमुख, जश्न भुमकर, प्रिया भुमकर, मंजुश्री पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल थत्ते, विक्रांत चव्हाण, एमआयडीसीचे सीईओ विपिन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे गरजेचे आहे. हे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या ग्रामीण व वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. लंडनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे, असेही श्री.शिंदे म्हणाले. कार्यक्रमात 'ठाणेवैभव'चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी लेखिका डॉ. रेवती श्रीनिवासन यांची मुलाखत घेतली.