
03/12/2024
खानिवडे: वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन क्षेत्र आढळून आले असून ते आता कांदळवन विभागाच्या अखत्यारीत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या भागाची खातरजमा करून ते ताब्यात घेतले जाणार आहे कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार झाला आहे.वसई विरारमध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या मध्ये काही कांदळवन क्षेत्र हे मह़सूल विभागाच्या अखत्यारीत येते. पर्यावरणीय दृष्टीने ही कांदळवने अत्यन्त महत्वाची भूमिका बजावत आहेत. तर कांदळवनांमध्ये विविधि प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत असतात. मात्रमागील काही वर्षापासून वसई तालुक्यातील कांदळवन कत्तल करून अनधिकृतबांधकामे उभारणे. बेसुमार वाळू उपसा. मातीभराव अशा विविध प्रकारे कांदळवने नष्ट केली जात आहेत.त्यासुळे खाडी किनाऱ्याच्या भागातील कांदळवन क्षेत्र कमी होऊ लागले आहे, या कांदळवनांची कत्तल व संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवनक्षेत्राचे संवर्धन केले जात आहे . जे कांदळवन क्षेत्र महसूल विभागाकडे येते ते कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्र लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.कांदळवन क्षेत्र वर्ग करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव दिला आहे. याशिवाय कोण कोणत्या भागात किती कांदळवन क्षेत्र आहे याचा आढावा घेतला जात आहे .नुकताच केलेल्या पाहणी दरम्यान जवळपास ८११ हेक्टर क्षेत्रात कांदळवन असल्याचे आढळून आले आहे.